वृत्त क्रमांक
शासकीय तंत्रनिकेतन येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न
नांदेड, दि. 4 ऑगस्ट : शासकीय तंत्रनिकेतन, नांदेड येथे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा वृक्षारोपण कार्यक्रम संस्थेच्या प्रांगणात 30 जूलै रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांमध्ये वृक्षारोपण व वृक्ष संगोपनाची जागरुकता निर्माण व्हावी, तसेच संस्थेच्या परिसरात एक निसर्गरम्य व पर्यावरण पूरक वातावरण तयार व्हावे या उद्देशाने प्रेरित होऊन वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे प्राचार्य डॉ. नागेश जानराव यांच्या हस्ते झाले, त्यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जास्तीत जास्त झाडे लावून त्याचे संगोपन करण्याचे महत्व स्पष्ट केले. पर्यावरण संरक्षण ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असून हरित व समृध्द भारताच्या निर्मितीसाठी वृक्षारोपण व वृक्ष संगोपन करावे असे आवाहन त्यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाचे कौतुक करुन अशा उपक्रमांमधून सामाजिक जबाबदारीची जाणीव अधिक दृढ होत असल्याचे नमूद केले. वृक्षारोपण समिती सचिव व्ही.बी. उश्केवार यांनी वृक्षसंवर्धनाचे महत्व स्पष्ट करुन प्रत्येक विद्यार्थ्यांनी किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन केले.
विशेष म्हणजे या कार्यक्रमात शिव सुराणा, अनिल मुद्दमवार, सुशील जैन, बलवीर ठाकूर, शंकर मेडेवाड, भारत देशमुख व संजय शिंदे या माजी विद्यार्थ्यांनी मोठया संख्येने आपला सहभाग नोंदविला. संस्थेच्या परिसरात कडुलिंब, करंज या प्रकारची रोपे लावण्यात आली.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.मोहित मेश्राम व सर्व समिती सदस्य सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले. सर्वाच्या संयुक्त प्रयत्नातून महाविद्यालय परिसर अधिक हिरवागार व पर्यावरणपूरक करण्याचा संकल्प करण्यात आला. हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरुकता निर्माण करणारा आणि शाश्वत विकासाच्या दिशेने प्रेरणादायी ठरला.
00000
No comments:
Post a Comment