Tuesday, September 8, 2026

 भरती परीक्षा पद्धतीत सुधारणांसाठी छत्रपती संभाजीनगर विभागातून सूचना आणि अभिप्राय नोंदवण्याचे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांचे आवाहन

▪️सूचना आणि अभिप्राय संकलित करण्यासाठी मराठवाड्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष


लातूर, दि. ०७ (विमाका) : राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने राज्यातील शासकीय भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी तसेच गैरप्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत केली आहे. या समितीच्या कार्यक्रमानुसार राज्यातील प्रत्येक महसुली विभागातील विद्यार्थी, उमेदवार, शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी आणि संबंधित हितधारकांशी चर्चा करून सुधारणांसाठी सूचना व अभिप्राय प्राप्त करून घेतले जाणार आहेत. या उच्चस्तरीय समितीमधील समिती अध्यक्ष व सदस्य छत्रपती संभाजीनगर येथील स्मार्टसिटी कार्यालयात २१ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता कामाच्या अनुषंगाने भेट देणार आहेत. 

​या पार्श्वभूमीवर, छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, धाराशिव, लातूर, नांदेड आणि हिंगोली या आठही जिल्ह्यांमधील जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये एक विशेष कक्ष स्थापन करण्यात येत असून, हा कक्ष १८ सप्टेंबर २०२६ पर्यंत दररोज सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत कामकाजासाठी खुला राहील. राज्यातील भरती परीक्षा पद्धत अधिक सक्षम व पारदर्शक करण्याच्या दृष्टीने छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा परीक्षार्थी, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस चालक, अभ्यासिका चालक, लोकप्रतिनिधी व नागरिकांनी प्रत्यक्ष भेट देऊन किंवा ई-मेलद्वारे आपल्या सूचना, शिफारशी, हरकती व निवेदने सादर करावीत, असे आवाहन विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी केले आहे.

​नागरिक आपल्या सूचना व अभिप्राय संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयातील विशेष कक्षात प्रत्यक्ष सादर करू शकतात. हा कक्ष ९ सप्टेंबर ते १८ सप्टेंबर २०२६ पर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत उपलब्ध असेल तसेच ज्या नागरिकांना प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य नसेल, त्यांनी आपले लेखी अभिप्राय csn-examreformtaskforce@maharashtra.gov.in या ई-मेलवर पाठवावेत.

​या प्रक्रियेत प्रामुख्याने विद्यमान परीक्षा प्रणालीचा आढावा घेताना राज्य शासनाचे विविध विभाग, प्राधिकरणे व परीक्षा घेणाऱ्या संस्थांच्या सध्याच्या परीक्षा पद्धती व कार्यपद्धतीबाबत अभिप्रायाची अपेक्षा आहे. तसेच परीक्षा अधिक सुरक्षित, विश्वासार्ह, निष्पक्ष आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी आवश्यक सर्वंकष उपाययोजना आखणे आणि प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून मॉडरेशन, डिजिटल अथवा मुद्रित वितरण, गोपनीय वाहतूक, परीक्षा केंद्रांचे व्यवस्थापन, प्रतिसाद नोंदणी, मूल्यांकन व निकाल प्रक्रियेतील सुरक्षेवर भर दिला जाणार आहे. 

डिजिटल प्रणाली, बायोमेट्रिक प्रमाणीकरण, प्रवेश नियंत्रण, ऑडिट ट्रेल्स व सीसीटीव्ही देखरेख यांसारख्या माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याबाबत आणि पेपरफुटी, गोपनीयतेचा भंग, तोतया उमेदवार, संगनमत व इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा गैरवापर रोखण्यासाठी कडक प्रतिबंधात्मक उपाय व उत्तरदायित्व निश्चित करण्याबाबत सूचना मागवण्यात आल्या आहेत. याशिवाय इतर राज्यांतील किंवा देशांतील यशस्वी, आधुनिक व सुरक्षित परीक्षा प्रणालींच्या उत्कृष्ट पद्धतींचा अभ्यास करणे, परीक्षा केंद्रांची निवड, पायाभूत सुविधा, सुरक्षितता, मनुष्यबळ व कार्यसज्जतेबाबत किमान मानके ठरविणे, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस यंत्रणा, शिक्षण विभाग व परीक्षा संस्था यांच्यात प्रभावी संस्थात्मक समन्वयाची चौकट निर्माण करणे आणि उमेदवारांसाठी जलद व पारदर्शक तक्रार निवारण व्यवस्था उभारून परीक्षा प्रक्रियेवरील विश्वास अधिक दृढ करणे या विषयांवरही अभिप्राय अपेक्षित आहेत.

​जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्राप्त होणाऱ्या सर्व सूचना व अभिप्रायांचे संकलन करून ते शासनाच्या उच्चस्तरीय समितीकडे सादर केले जातील आणि ही समिती या शिफारशींचा सखोल अभ्यास करून राज्य शासनास आपला सर्वसमावेशक अंतिम अहवाल सादर करणार आहे. राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षा परीक्षार्थींच्या भवितव्याशी निगडित असलेल्या या प्रक्रियेत छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व नागरिक, अभ्यासक व संस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

******

No comments:

Post a Comment

  वृत्त क्रमांक प्रारूप मतदार यादी अंतिम नसून, पात्र मतदारांनी नोंदणीची संधी घ्यावी विशेष सखोल पुनरीक्षण-२०२६ अंतर्गत अंतिम यादी नोव्हेंबरच्...