Wednesday, August 26, 2026

 वृत्त 

महिला आर्थिक सक्षमीकरणास प्राधान्य;‘उमेद’मुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी चालना मिळणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कृषी अवजार बँक, कृषी निविष्ठा केंद्रांसह महिलांच्या हातात शेतीची यंत्रे 

मुंबई,दि. 26 : ग्रामीण महिलांना केवळ बचत गटांपुरते मर्यादित न ठेवता त्यांना शेती, व्यवसाय आणि उद्योजकतेच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रभावी प्रयत्न राज्य शासन विविध माध्यमातून करत आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’च्या माध्यमातून सक्षणीकरणाचे हे काम ग्रामीण भागात यशस्वीपणे व्यापक स्वरुपात  सुरू आहे. आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर, कृषी निविष्ठांची उपलब्धता आणि विविध व्यवसायांच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना शाश्वत उत्पन्नाचे साधन मिळत असून, त्यांच्या आर्थिक स्वावलंबनाला नवी दिशा मिळत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 

‘उमेद’ अभियानांतर्गत कृषी अवजार बँक आणि कृषी निविष्ठा केंद्र हे दोन महत्त्वाचे उपक्रम राबविण्यात येत आहेत. अल्पभूधारक महिला शेतकऱ्यांना महागडी कृषी यंत्रे स्वतः खरेदी न करता भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देणे, हा कृषी अवजार बँकेचा प्रमुख उद्देश आहे.

 ४०८ कृषी अवजार बँकांची उभारणी

वर्ष २०२४-२५ आणि २०२५-२६ या कालावधीत राज्यातील ३४ जिल्ह्यांमधील ३५१ तालुक्यांत ४०८ कृषी अवजार बँका स्थापन करण्यात आल्या आहेत. त्याचा सुमारे ४० हजार ८०० महिला शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ झाला आहे. या अवजार बँकांमध्ये विविध कृषिपूरक अवजारांसह ट्रॅक्टरचीही सुविधा उपलब्ध आहे. महिला स्वयंसहाय्यता समूह, ग्राम संघ, प्रभाग संघ तसेच महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून या अवजार बँकांचे व्यवस्थापन केले जाते. त्यामुळे या सुविधा केवळ यंत्रसामग्री उपलब्ध करून देणाऱ्या केंद्रांपुरत्या मर्यादित न राहता समुदायाच्या मालकीच्या आणि व्यवस्थापनाखालील कृषी सेवा केंद्रे म्हणून विकसित होत आहेत.

शेतीचा खर्च कमी; उत्पादकतेला हातभार

महागडी कृषी यंत्रे खरेदी करण्याची गरज नसल्याने महिला शेतकऱ्यांचा भांडवली खर्च कमी होत आहे. पेरणी, आंतरमशागत आणि कापणीसारखी कामे आधुनिक यंत्रांच्या साहाय्याने वेळेत पूर्ण होत असल्याने शेतीतील कार्यक्षमता वाढण्यास मदत होत आहे. त्याचबरोबर अवजारे भाड्याने देण्याच्या माध्यमातून समुदाय आधारित संस्थांना नियमित उत्पन्नाचा स्रोत मिळत आहे. अवजार बँकांच्या व्यवस्थापन, देखभाल आणि वाहतुकीमुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधीही निर्माण होत आहेत. त्यामुळे एका उपक्रमातून महिला शेतकरी, बचत गट आणि स्थानिक ग्रामीण अर्थव्यवस्था अशा अनेक घटकांना लाभ मिळत आहे.

५४ महिला उत्पादक कंपन्यांकडून कृषी निविष्ठांचा पुरवठा

कृषी निविष्ठांच्या क्षेत्रातही ‘उमेद’च्या माध्यमातून महिलांना नवी संधी उपलब्ध झाली आहे. राज्यातील ५४ महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांकडे बियाणे व खत विक्रीसाठी आवश्यक परवाने उपलब्ध आहेत. या माध्यमातून सुमारे ५४ हजार महिला सभासदांना सेवा दिली जात आहे.

महिला शेतकरी उत्पादक कंपन्या आपल्या सभासदांची मागणी एकत्रित करून मोठ्या प्रमाणावर बियाणे, खते आणि इतर कृषी निविष्ठांची खरेदी करतात. सामूहिक खरेदीमुळे दर्जेदार निविष्ठा वेळेत आणि योग्य दरात उपलब्ध करून देण्यास मदत होत आहे. परिणामी शेतकऱ्यांचा निविष्ठांवरील खर्च आणि बाजारपेठेवरील अवलंबित्व कमी करण्याच्या दिशेनेही या उपक्रमाची वाटचाल सुरू आहे.

 रेशन दुकानापासून वीट निर्मितीपर्यंत

‘उमेद’ अभियानाने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला कृषी क्षेत्रापुरते मर्यादित न ठेवता विविध व्यवसायांपर्यंत विस्तार दिला आहे. राज्यात स्वयं-सहाय्यता समूहांच्या माध्यमातून रेशन दुकाने, सिमेंट एजन्सी, वीट निर्मिती, केरोसीन एजन्सी आणि टाईल्स निर्मिती यांसारखे व्यवसायही महिलांकडून चालविले जात आहेत.

३२ स्वयं-सहाय्यता समूहांमधील ५८ महिला रेशन दुकाने, तर एका स्वयं-सहाय्यता समूहातील २३ महिला सिमेंट विक्रीचा व्यवसाय सांभाळत आहेत. दोन समूहांमधील २४ महिला वीट निर्मिती व्यवसायात कार्यरत आहेत. याशिवाय दोन महिला केरोसीन एजन्सी, तर दोन महिला टाईल्स निर्मितीचा व्यवसाय चालवत आहेत.

बचत गटातून उद्योजकतेकडे

‘उमेद’च्या माध्यमातून ग्रामीण महिलांचा प्रवास बचत आणि कर्जाच्या चौकटीपलीकडे जाऊन उद्योजकतेकडे होत आहे. व्यवसाय व्यवस्थापन, वित्तीय समावेशन आणि बाजारपेठेशी जोडणी यासाठी संस्थात्मक पाठबळ मिळत असल्याने महिलांची निर्णयक्षमता आणि आर्थिक स्वावलंबन वाढत आहे. ग्रामीण भागातच रोजगार आणि नियमित उत्पन्नाच्या संधी उपलब्ध झाल्याने महिलांच्या कौटुंबिक उत्पन्नाला हातभार लागत आहे. त्याचवेळी गावातील नागरिकांनाही आवश्यक वस्तू आणि सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होत आहेत.

महिला स्वयंसहाय्यता समूहांची सामूहिक ताकद, आधुनिक कृषी तंत्रज्ञान आणि उद्योजकतेला संस्थात्मक पाठबळ यांचा संगम घडवून ‘उमेद’ अभियान ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याबरोबरच गावच्या अर्थव्यवस्थेलाही बळकटी देत आहे. शेतीतील यांत्रिकीकरणापासून व्यवसायाच्या व्यवस्थापनापर्यंत महिलांचा वाढता सहभाग हा ग्रामीण महाराष्ट्राच्या बदलत्या आर्थिक चित्राचा महत्त्वपूर्ण भाग ठरत आहे.

0000

 वृत्त क्रमांक 

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांनी 

जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्राशी संपर्क साधावा

 

नांदेड, दि. 26 : नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर विविध देशांतील पर्यटक व नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे.


या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातील जे पर्यटक सध्या नेपाळमध्ये असून पूरस्थितीमुळे अडकले आहेत किंवा ज्यांचा त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क होत नाही, त्यांनी अथवा त्यांच्या नातेवाईकांनी तात्काळ जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

यासाठी खालील क्रमांकांवर संपर्क साधता येईल :

जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्र, नांदेड

☎️ 02462-235077

☎️ 1077 (टोल फ्री)


नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांची माहिती प्रशासनाला देताना संबंधित व्यक्तीचे नाव, मोबाईल क्रमांक, नेपाळमधील सध्याचे ठिकाण/हॉटेल, प्रवासाचा तपशील आणि कुटुंबीयांचा संपर्क क्रमांक उपलब्ध असल्यास तो द्यावा.


नांदेड जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून न जाता अधिकृत माहितीसाठी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा. आपत्तीग्रस्त भागातील नागरिक व पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती माहिती व समन्वय साधण्याचे प्रयत्न प्रशासनामार्फत करण्यात येत आहेत.

0000

किरण वाघ/विसंअ/

Tuesday, August 25, 2026

राज्यात एकाचवेळी झालेल्या ‘महा वॉकेथॉन–वॉक फॉर वॉटर’ला राज्यभर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तीन लाखांहून अधिक नागरिकांच्या सहभागातून जलसंधारणाचा संदेश महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. हा केवळ शासनाचा विषय नसून प्रत्येक नागरिकाच्या भवितव्याशी निगडित विषय आहे. या उपक्रमाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा महाराष्ट्रातील जनतेची जलसंधारणाबाबतची जागरूकता आणि सहभागाची भावना अधोरेखित करणारा आहे, असे मत मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केले.

मुंबईतील वरळी येथे या उपक्रमाला सुरुवात झाली. त्याचवेळी राज्यभरातील विद्यार्थी, युवक, महिला, शेतकरी, कर्मचारी, महाविद्यालयीन तरुणाई तसेच विविध सामाजिक घटकांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. राज्यात ‘जलयुक्त शिवार अभियान २.०’, ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’, ‘अमृत सरोवर’, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आदी विविध माध्यमांतून जलसंधारणाच्या कामांमध्ये लोकसहभाग वाढविण्यासाठी ‘वॉक फॉर वॉटर’ प्रभावी माध्यम ठरले आहे.
१५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत राज्यात ‘जलसंधारण अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून गावागावांत पाणलोट विकास, जलस्रोतांचे पुनरुज्जीवन, गाळ काढणे, भूजल पुनर्भरण आणि मृदसंवर्धनाच्या कामांना गती देण्यासोबतच अभियानादरम्यान काही निवडक गावांमध्ये जलशोषक खड्डे तयार करण्याचे उद्दिष्ट देण्यात येणार आहे. ‘वॉक फॉर वॉटर’मधून महाराष्ट्राने दिलेला संदेश आता प्रत्यक्ष कृतीत उतरवून जलसंधारणाची लोकचळवळ अधिक व्यापक करूया,' असेही मंत्री राठोड यांनी आवाहन केले.



 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना - २०२६' अंतर्गत ६ लाख ३६ हजार ३६ पात्र शेतकऱ्यांना ₹५,०८६ कोटी रुपयांच्या लाभाचे वितरण

'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने'च्या दुसऱ्या टप्प्यातील पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ वितरित.

 वृत्त क्रमांक 

आपले सरकार सेवा केंद्रांची गुणवत्ता वाढविण्यासाठी विशेष कार्यशाळा

नागरिकांना पारदर्शक, सुलभ व गुणवत्तापूर्ण सेवा देण्याच्या सूचना

नांदेड(जिमाका), दि. २५ : नांदेड तालुक्यातील आपले सरकार सेवा केंद्रांची गुणवत्ता वाढवून नागरिकांना उपलब्ध होणाऱ्या सेवांचा दर्जा अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने तहसील कार्यालयाच्या सभागृहात आज आपले सरकार सेवा केंद्र चालकांची विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

या कार्यशाळेस नांदेडचे उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी अजय शिंदे, नायब तहसीलदार (महसूल) सुनील माचेवाड यांनी उपस्थित सेवा केंद्र चालकांना मार्गदर्शन केले. यावेळी आपले सरकार सेवा केंद्र जिल्हा प्रकल्प अधिकारी नीरज धामणगावे, जिल्हा समन्वयक केदार चोपडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

महाराष्ट्र शासनाच्या इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाच्या निर्देशानुसार तसेच जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार आपले सरकार सेवा केंद्रांमध्ये आवश्यक पायाभूत सुविधा, नागरिकांसाठी सोयी-सुविधा, योग्य ब्रँडिंग, माहिती फलक, तांत्रिक सुविधा तसेच नागरिकाभिमुख सेवा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. या निकषांची पूर्तता करून केंद्रांचे गुणवत्ता मानांकन सुधारण्याबाबत कार्यशाळेत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

आपले सरकार सेवा केंद्र तसेच ग्रामपंचायत स्तरावरील सेवा केंद्रांचे गुणवत्ता मानांकन, कार्यपद्धती आणि सन्मानाची प्रक्रिया अधिक प्रभावी करण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. नागरिकांना वेळेत, पारदर्शक व गुणवत्तापूर्ण सेवा देण्याच्या सूचना सर्व सेवा केंद्र चालकांना देण्यात आल्या.

शासनाने निश्चित केलेल्या निकषांनुसार आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्यास अथवा नियमांचे पालन केले जात नसल्यास नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी दिला. तसेच नियमबाह्य पद्धतीने काम करणाऱ्या किंवा शासनाच्या निर्देशांचे सातत्याने पालन न करणाऱ्या सेवा केंद्र चालकांवर परवाना रद्द करण्यासह नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, अशा सूचना देण्यात आल्या.

या कार्यशाळेस नांदेड तालुक्यातील आपले सरकार सेवा केंद्र चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांना अधिक दर्जेदार, पारदर्शक आणि सुलभ सेवा देण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

***


 वृत्त क्रमांक 

जिल्ह्यात 26 ते 28 ऑगस्टदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू

नांदेड (जिमाका), दि. 25 : नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे दि. 26 ते 28 ऑगस्ट 2026 दरम्यान निघणाऱ्या पोळा मिरवणुका तसेच पंचक्रोशी यात्रा आणि नारळी पौर्णिमेनिमित्त होणाऱ्या विविध धार्मिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 36 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

माहूर येथे नारळी पौर्णिमेनिमित्त मोठ्या प्रमाणात पंचक्रोशी यात्रा भरणार आहे. या कालावधीत महाराष्ट्र व आंध्र प्रदेशातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. तसेच रेणुकामाता मंदिर, महादेव मंदिर, दत्तात्रय मंदिर, देवदेवेश्वरी, रेणुकामाता मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत ठेवणे तसेच यात्रेदरम्यान कायदा व सुव्यवस्था कायम राखणे आवश्यक असल्याने हे आदेश देण्यात आले आहेत.

आदेशाची अंमलबजावणी दि. 26 ऑगरोजीच्या मध्यरात्रीपासून ते दि. 28 ऑगस्ट 2026 रोजीच्या मध्यरात्रीपर्यंत नांदेड जिल्ह्यातील पोलीस ठाणे माहूर हद्दीत पोलीस निरीक्षक तथा पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम 36 नुसार विविध अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.

या अधिकारांतर्गत रस्त्यावरून किंवा रस्त्यावर जाणाऱ्या मिरवणुकीतील अथवा जमावातील व्यक्तींनी कोणत्या रीतीने चालावे व कसे वागावे, मिरवणुका कोणत्या मार्गाने व कोणत्या वेळी जाव्यात किंवा जाऊ नयेत, तसेच मिरवणुकीच्या मार्गात अडथळा निर्माण होणार नाही याबाबत निर्देश देण्याचे अधिकार संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

तसेच मिरवणुका व जमावाच्या प्रसंगी पूजा-अर्चेच्या ठिकाणी गर्दी होऊन रस्ता किंवा सार्वजनिक जागेत अडथळा निर्माण होऊ नये, रस्ते व रस्त्यांच्या आसपास वाहने व्यवस्थित उभी राहतील याची दक्षता घ्यावी, सार्वजनिक ठिकाणी ध्वनिक्षेपकांच्या आवाजावर नियंत्रण ठेवावे, याबाबत सूचना देण्याचे अधिकारही प्रदान करण्यात आले आहेत.

मिरवणुकीदरम्यान किंवा सार्वजनिक ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण होईल, अशा कोणत्याही कृतीस प्रतिबंध करण्यासाठी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्याचे अधिकार राहणार आहेत. तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम 33, 35 ते 40 आणि 42, 43, 45 अन्वये यापूर्वी दिलेल्या आदेशांच्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

पोलीस ठाणे माहूर हद्दीत कार्यक्रम, मिरवणूक, सूचना, मार्ग व वेळ याबाबतची माहिती संबंधित पोलीस उपनिरीक्षक अथवा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय पूर्वप्रसिद्धीस देऊ नये, तसेच शांतता व सुव्यवस्थेला बाधा निर्माण होईल अशा घोषणा देऊ नयेत, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर मुंबई पोलीस कायदा, 1951 मधील कलम 134 नुसार कारवाई करण्यात येईल. सदर प्रतिबंधात्मक आदेश दि. 26 ऑगस्ट 2026 रोजीच्या मध्यरात्रीपासून ते दि. 28 ऑगस्ट 2026 रोजीच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहेत.

**

  मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण २०२६ प्रारूप मतदार यादीत आजच आपले नाव तपासा मतदार मदत क्रमांक १८०० २२ १९५० वर संपर्क करा #मतदारय...