Tuesday, August 25, 2026

 वृत्त क्रमांक 

जिल्ह्यात 26 ते 28 ऑगस्टदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू

नांदेड (जिमाका), दि. 25 : नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे दि. 26 ते 28 ऑगस्ट 2026 दरम्यान निघणाऱ्या पोळा मिरवणुका तसेच पंचक्रोशी यात्रा आणि नारळी पौर्णिमेनिमित्त होणाऱ्या विविध धार्मिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 36 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

माहूर येथे नारळी पौर्णिमेनिमित्त मोठ्या प्रमाणात पंचक्रोशी यात्रा भरणार आहे. या कालावधीत महाराष्ट्र व आंध्र प्रदेशातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. तसेच रेणुकामाता मंदिर, महादेव मंदिर, दत्तात्रय मंदिर, देवदेवेश्वरी, रेणुकामाता मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत ठेवणे तसेच यात्रेदरम्यान कायदा व सुव्यवस्था कायम राखणे आवश्यक असल्याने हे आदेश देण्यात आले आहेत.

आदेशाची अंमलबजावणी दि. 26 ऑगरोजीच्या मध्यरात्रीपासून ते दि. 28 ऑगस्ट 2026 रोजीच्या मध्यरात्रीपर्यंत नांदेड जिल्ह्यातील पोलीस ठाणे माहूर हद्दीत पोलीस निरीक्षक तथा पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम 36 नुसार विविध अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.

या अधिकारांतर्गत रस्त्यावरून किंवा रस्त्यावर जाणाऱ्या मिरवणुकीतील अथवा जमावातील व्यक्तींनी कोणत्या रीतीने चालावे व कसे वागावे, मिरवणुका कोणत्या मार्गाने व कोणत्या वेळी जाव्यात किंवा जाऊ नयेत, तसेच मिरवणुकीच्या मार्गात अडथळा निर्माण होणार नाही याबाबत निर्देश देण्याचे अधिकार संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

तसेच मिरवणुका व जमावाच्या प्रसंगी पूजा-अर्चेच्या ठिकाणी गर्दी होऊन रस्ता किंवा सार्वजनिक जागेत अडथळा निर्माण होऊ नये, रस्ते व रस्त्यांच्या आसपास वाहने व्यवस्थित उभी राहतील याची दक्षता घ्यावी, सार्वजनिक ठिकाणी ध्वनिक्षेपकांच्या आवाजावर नियंत्रण ठेवावे, याबाबत सूचना देण्याचे अधिकारही प्रदान करण्यात आले आहेत.

मिरवणुकीदरम्यान किंवा सार्वजनिक ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण होईल, अशा कोणत्याही कृतीस प्रतिबंध करण्यासाठी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्याचे अधिकार राहणार आहेत. तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम 33, 35 ते 40 आणि 42, 43, 45 अन्वये यापूर्वी दिलेल्या आदेशांच्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

पोलीस ठाणे माहूर हद्दीत कार्यक्रम, मिरवणूक, सूचना, मार्ग व वेळ याबाबतची माहिती संबंधित पोलीस उपनिरीक्षक अथवा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय पूर्वप्रसिद्धीस देऊ नये, तसेच शांतता व सुव्यवस्थेला बाधा निर्माण होईल अशा घोषणा देऊ नयेत, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर मुंबई पोलीस कायदा, 1951 मधील कलम 134 नुसार कारवाई करण्यात येईल. सदर प्रतिबंधात्मक आदेश दि. 26 ऑगस्ट 2026 रोजीच्या मध्यरात्रीपासून ते दि. 28 ऑगस्ट 2026 रोजीच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहेत.

**

Monday, August 24, 2026

शासकीय कर्मचाऱ्यांना विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी, एका क्लिकवर आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी तसेच प्रशासनाला डेटा-आधारित, जलद आणि अचूक निर्णय घेण्यास सक्षम करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या 'महा eHRMS’ या ॲप आधारित डिजिटल मानव संसाधन व्यवस्थापन प्रणालीची सविस्तर माहिती...



 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026' अंतर्गत राज्यातील 6,36,036 पात्र शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यातील ₹5086 कोटींच्या लाभाचा हप्ता वितरीत करण्यात आला. आतापर्यंत कर्जमुक्ती योजनेतील 12,58,243 पात्र शेतकऱ्यांना ₹10,115 कोटींचे वितरण करण्यात आले आहे.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार व मंत्रिमंडळातील इतर सदस्य उपस्थित होते.


 सक्षम शेतकरी, प्रगत महाराष्ट्र !

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना - 2026' अंतर्गत दुसऱ्या टप्प्याचे वितरण. 6,36,036 पात्र शेतकऱ्यांना ₹5086 कोटींच्या लाभाचे वितरण. आतापर्यंत 12,58,243 पात्र शेतकऱ्यांना ₹10,115 कोटींच्या लाभाचे वितरण!

कर्जमुक्तीकडून समृद्धीकडे, शेतकऱ्यांच्या प्रगतीला शासनाची साथ!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील लाभाचे आज वितरण करण्यात आले.
▶️ ६ लाख ३६ हजार ०३६ पात्र शेतकऱ्यांना ₹५ हजार ०८६ कोटींच्या लाभाचे वितरण
▶️ आतापर्यंत १२ लाख ५८ हजार २४३ पात्र शेतकऱ्यांना ₹१० हजार ११५ कोटींचा लाभ
▶️ शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देत समृद्ध आणि सक्षम महाराष्ट्राच्या दिशेने शासनाची वाटचाल!

 शेतकरी  कर्जमुक्ती योजनेच्या दुसरा हप्ता जारी

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ६,३६,०३६ पात्र शेतकऱ्यांना ₹५,०८६ कोटी वितरीत

•       आतापर्यंत १२,५८,२४३ शेतकऱ्यांना ₹१०,११५ कोटींच्या कर्जमुक्तीचा लाभ

 

            मुंबई, दि. २४ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील ६,३६,०३६ पात्र शेतकऱ्यांना ₹५,०८६ कोटींच्या कर्जमुक्तीचा लाभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते थेट ऑनलाइन पद्धतीने वितरित  करण्यात आला.

            मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, या योजनेच्या अंमलबजावणीअंतर्गत आतापर्यंत १२,५८,२४३ शेतकऱ्यांना एकूण ₹१०,११५ कोटींच्या कर्जमुक्तीचा लाभ देण्यात आला आहे. पात्र शेतकऱ्यांना लाभ वितरणाची प्रक्रिया सुरू असून, लाभार्थींची संख्या सातत्याने अद्ययावत होत आहे.आतापर्यंत १३.७० लाख कर्जखात्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे.

            सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील लाभ वितरण ऑनलाइन करण्यात आले.  यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, मंत्रिमंडळातील सदस्य, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी आणि सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे उपस्थित होते.

दुसऱ्या टप्प्यात विभागनिहाय लाभ

अमरावती विभाग : १ लाख ४५ हजार ८०८ शेतकऱ्यांना ₹१,२०८ कोटींचा लाभ.

नाशिक विभाग : ८४ हजार ८१३ शेतकऱ्यांना ₹७५६ कोटींचा लाभ.

छत्रपती संभाजीनगर विभाग : ३ लाख २ हजार २७३ शेतकऱ्यांना ₹२,२८४ कोटींचा लाभ.

पुणे विभाग : ४९ हजार २२४ शेतकऱ्यांना ₹४१७ कोटींचा लाभ.

नागपूर विभाग : ४४ हजार ८६४ शेतकऱ्यांना ₹३६६ कोटींचा लाभ.

कोकण विभाग : ९ हजार ५४ शेतकऱ्यांना ₹५४ कोटींचा लाभ.

योजनेची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येत असून, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या नियंत्रणाखाली या प्रक्रियेचे व्यवस्थापन केले जात आहे.

0000





 वृत्त  

'वॉक फॉर वॉटर’मधून महाराष्ट्रात जलसंधारणाची लोकचळवळ अधिक बळकट – मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड

मुंबई, दि. २४ : माती वाचवणे, पाणी जपणे आणि जलसंधारणाच्या कार्याला व्यापक लोकसहभागाची जोड देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’ला राज्यभर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्यातील ३६ जिल्ह्यांत एकाचवेळी झालेल्या या उपक्रमात तीन लाखांहून अधिक नागरिक सहभागी झाले. या सहभागातून जलसंधारणाचा संदेश महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचला, असे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी सांगितले.

जलसंधारण हा केवळ शासनाचा विषय नसून प्रत्येक नागरिकाच्या भवितव्याशी निगडित विषय आहे. त्यामुळे जलसंधारणाच्या कामांना लोकचळवळीचे स्वरूप देण्याच्या उद्देशाने ‘वॉक फॉर वॉटर’चे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा महाराष्ट्रातील जनतेची जलसंधारणाबाबतची जागरूकता आणि सहभागाची भावना अधोरेखित करणारा आहे, असे मंत्री राठोड यांनी सांगितले.

प्रत्येक सहभागीने तीन किलोमीटर अंतर चालत जलसंधारणाचा संदेश दिला. तीन लाखांहून अधिक नागरिकांच्या सहभागातून हा सामूहिक प्रवास पूर्ण झाला. ही केवळ आकडेवारी नसून माती आणि पाणी संवर्धनासाठी महाराष्ट्राच्या जनतेने व्यक्त केलेली सामूहिक बांधिलकी आहे, असेही त्यांनी नमूद केले.

मुंबईतील वरळी येथे या उपक्रमाला सुरुवात झाली. त्याचवेळी राज्यातील ३६ जिल्ह्यांत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. विद्यार्थी, युवक, महिला, शेतकरी, कर्मचारी, महाविद्यालयीन तरुणाई तसेच विविध सामाजिक घटकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विशेषतः युवकांचा सहभाग हा या उपक्रमाची महत्त्वाची जमेची बाजू ठरली.

जलसंधारणाच्या योजनांना लोकसहभागाची जोड

राज्यात ‘जलयुक्त शिवार अभियान २.०’, ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’, ‘अमृत सरोवर’, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आदी विविध माध्यमांतून जलसंधारणाची कामे राबविण्यात येत आहेत. या योजनांच्या उद्देशांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासोबतच जलसंधारणाच्या कामांमध्ये लोकसहभाग वाढविण्यासाठी ‘वॉक फॉर वॉटर’ प्रभावी माध्यम ठरले आहे.

पावसाचे पाणी अडविणे, जमिनीत मुरविणे, भूजल पुनर्भरण वाढविणे, जलस्रोतांचे संवर्धन करणे आणि मातीची धूप रोखणे यासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग घेणे आवश्यक आहे. शासनाच्या प्रयत्नांना लोकसहभागाची जोड मिळाल्यास जलसंधारणाची कामे अधिक परिणामकारक आणि शाश्वत होतील, असे मंत्री संजय राठोड यांनी सांगितले.

जलसंधारण अभियानाला जनसहभागाचे बळ

 १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत राज्यात ‘जलसंधारण अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून गावागावांत जलसंधारण, पाणलोट विकास, जलस्रोतांचे पुनरुज्जीवन, गाळ काढणे, भूजल पुनर्भरण आणि मृदसंवर्धनाच्या कामांना गती देण्यात येणार आहे. तसेच अभियानादरम्यान काही निवडक गावांमध्ये जलशोषक खड्डे तयार करण्याचे उद्दिष्ट देण्यात येणार आहे. 

‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’ला मिळालेला प्रतिसाद या अभियानाला निश्चितच नवे बळ देणारा आहे. एका दिवसाच्या उपक्रमापुरता मर्यादित न राहता जलसंधारणाचा संदेश प्रत्येक गावापर्यंत आणि प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मंत्री संजय राठोड यांनी केले.

'माती वाचली तर शेती वाचेल, पाणी जपले तर भविष्यातील पिढ्यांचे जीवन सुरक्षित होईल. जलसंधारणाची जबाबदारी शासनासोबतच समाजाचीही आहे. ‘वॉक फॉर वॉटर’मधून महाराष्ट्राने दिलेला संदेश आता प्रत्यक्ष कृतीत उतरवून जलसंधारणाची लोकचळवळ अधिक व्यापक करूया,' असे मंत्री राठोड यांनी सांगितले.

0000



  भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्सचा राज्यव्यापी संवाद #भरती #परीक्षा #महाराष्ट्रशासन #MahaDGIPR