Saturday, March 7, 2026

महिला दिन विशेष लेख     

दि.७ मार्च २०२६

घर आणि विश्व दोन्ही समर्थपणे सांभाळणारी स्त्रीशक्ती

आजचा काळ हा स्त्रीशक्तीच्या नव्या उभारणीचा काळ मानला जातो. समाजातील अनेक रूढी, परंपरा आणि मर्यादा ओलांडत आजची स्त्री प्रत्येक क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करत आहे. पूर्वी स्त्रीची भूमिका केवळ घरापुरती मर्यादित मानली जात होती; परंतु शिक्षण, आत्मविश्वास आणि संधी मिळाल्यामुळे आज स्त्री समाजाच्या सर्व क्षेत्रांत यशस्वीपणे कार्यरत आहे.

आज भारतासह जगभरात स्त्रियांनी अनेक उच्च पदांवर काम करत इतिहास घडवला आहे. राष्ट्रपती पदापासून अंतराळवीरांपर्यंत, वैज्ञानिक, प्रशासकीय अधिकारी, उद्योजक, क्रीडापटू, कलाकार आणि राजकारणी अशा अनेक क्षेत्रांत महिलांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. अंतराळ संशोधन, संरक्षण क्षेत्र, तंत्रज्ञान, वैद्यकीय सेवा अशा आव्हानात्मक क्षेत्रांमध्येही महिलांनी आपली क्षमता सिद्ध केली आहे. त्यामुळे आजची स्त्री पुरुषांच्या तुलनेत कुठल्याही बाबतीत कमी नाही, हे समाजाने मान्य केले आहे.

स्त्रीच्या कर्तृत्वाचा गौरव केवळ महिला दिनापुरता मर्यादित ठेवणे योग्य नाही. वर्षातील सर्व ३६५ दिवस तिच्या कष्टांचा आणि योगदानाचा सन्मान व्हायला हवा. कारण स्त्रीचे आयुष्य हे सततच्या जबाबदाऱ्यांनी व्यापलेले असते. ती आई, पत्नी, मुलगी, बहीण अशा अनेक नात्यांतून कुटुंबाची जपणूक करत असते. तिच्या त्यागामुळे आणि परिश्रमामुळेच कुटुंबाची आणि समाजाची घडी व्यवस्थित बसते.

कुटुंबाच्या जडणघडणीत स्त्रीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. मुलांना चांगले संस्कार देणे, कुटुंबातील सदस्यांची काळजी घेणे, घरातील आर्थिक आणि सामाजिक व्यवस्थापन सांभाळणे या अनेक जबाबदाऱ्या ती समर्पणाने पार पाडते. विशेष म्हणजे आज अनेक महिला नोकरी किंवा व्यवसाय करत असतानाही घरातील जबाबदाऱ्या तितक्याच समर्थपणे सांभाळतात. त्यामुळे घर आणि बाहेर अशा दोन्ही आघाड्यांवर ती समतोल राखताना दिसते.

ग्रामीण भागातही महिलांची भूमिका दिवसेंदिवस अधिक प्रभावी होत आहे. शेतीकामात पुरुषांबरोबर महिलाही खांद्याला खांदा लावून काम करतात. स्वयंसहायता बचत गटांच्या माध्यमातून अनेक महिलांनी आर्थिक स्वावलंबन मिळवले आहे. विविध लघुउद्योग, हस्तकला, अन्नप्रक्रिया उद्योग, दुग्ध व्यवसाय अशा क्षेत्रांमध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला आहे. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळत आहे.

शिक्षणामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढला आहे आणि त्यांची दृष्टीही व्यापक झाली आहे. आज डॉक्टर, अभियंते, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, वैज्ञानिक, पत्रकार अशा विविध क्षेत्रांमध्ये महिलांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. समाजाच्या सर्वांगीण विकासात स्त्रियांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. कारण स्त्री सक्षम झाली तर कुटुंब, समाज आणि राष्ट्रही सक्षम होते.

तथापि, आजही काही ठिकाणी महिलांना सामाजिक असमानता, भेदभाव किंवा अन्यायाचा सामना करावा लागतो. त्यामुळे महिलांना समान संधी, सुरक्षित वातावरण आणि सन्मान मिळणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. महिलांच्या शिक्षणाला, आरोग्याला आणि स्वावलंबनाला प्रोत्साहन दिल्यास समाज अधिक प्रगत आणि समतोल होऊ शकतो.

एकूणच, स्त्री ही केवळ कुटुंबाची आधारस्तंभ नसून समाजाच्या प्रगतीची प्रेरणाशक्ती आहे. तिच्या कष्टांचा, त्यागाचा आणि कर्तृत्वाचा सन्मान केवळ एका दिवसापुरता न ठेवता प्रत्येक दिवशी करणे आवश्यक आहे. स्त्रीला समान संधी आणि सन्मान देणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगत समाज ठरतो. स्त्रीशक्तीचा सन्मान आणि सशक्तीकरण हेच उज्ज्वल भविष्याचे खरे आधारस्तंभ आहेत.

अलका पाटील

उपसंपादक 

जिल्हा माहिती कार्यालय

नांदेड

Friday, March 6, 2026

 वृत्त क्रमांक  281

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे सोमवारी धर्माबाद येथे आयोजन

नांदेड, दि. 6 मार्च :- जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड व लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय, धर्माबाद यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार 9 मार्च 2026 रोजी सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय, धर्माबाद येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय प्लेसमेंट ड्राईव्ह/ रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

या रोजगार मेळाव्यामध्ये विविध खाजगी आस्थापना मध्ये रोजगार व नोकरीच्या संधीसाठी मुलाखती घेण्यात येणार असून जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी सोमवार 9 मार्च 2026 सकाळी 10 ते 2 पर्यत लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय धर्माबाद येथे उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त डॉ. रा.म.कोल्हे यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्कासाठी सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, आनंदनगर रोड, बाबानगर नांदेड ईमेल आयडी nandedrojgar0१@gmail.com दुरध्वनी  क्रमांक02462-251674 वर संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता सहायक आयुक्त डॉ. रा. म. कोल्हे यांनी केले आहे.

00000

वृत्त क्रमांक 280 

कृषी उत्पन्न बाजार समिती मैदानावर १५ व १६ मार्चला जिल्हा कृषी व धान्य महोत्सव

१०० स्टॉलची उभारणी

शेतकरी-ग्राहकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

नांदेड, दि. ६ मार्च :- कृषि विभाग व आत्मा, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने “जिल्हा कृषी व धान्य महोत्सव २०२६” चे आयोजन १५ ते १६ मार्च २०२६ या कालावधीत करण्यात आले आहे. हा महोत्सव सकाळी १० ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत कृषि उत्पन्न बाजार समिती मैदान, नवा मोंढा, नांदेड येथे होणार आहे.

हा महोत्सव नांदेड शहरवासीयांसाठी एक प्रकारची मेजवानी असून नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शेतमालाची खरेदी करून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

या कृषी महोत्सवात कृषी प्रदर्शन, कृषी विज्ञान केंद्र व कृषी विद्यापीठांचे स्टॉल, विविध कृषी तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक तसेच कृषी संलग्न शासकीय विभागांचे स्टॉल असे एकूण १०० स्टॉल उभारण्यात येणार आहेत. तसेच विविध विषयांवर शेतकरी-शास्त्रज्ञ परिसंवाद, चर्चासत्र, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री, कृषी मालाचे प्रदर्शन आणि खरेदीदार-विक्रेता संमेलन आयोजित करण्यात येणार आहे.

या महोत्सवात जिल्ह्यातील शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या तसेच महिला आर्थिक विकास महामंडळाच्या महिला बचतगटांचा सक्रिय सहभाग राहणार आहे. महोत्सवात शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला गहू, ज्वारी, तांदूळ, तूर, मुग, उडीद, चनाडाळ, हळद, मिरची, मसाले तसेच सेंद्रीय उत्पादने (गूळ, हळद पावडर, सेंद्रीय डाळी) विक्रीसाठी उपलब्ध असतील.

याशिवाय मध, गुळाचा पाक, चटणी, लोणचे, पापड, कुरडई, टरबूज, खरबूज, विविध फळे व भाजीपाला यांची थेट विक्री होणार आहे. तसेच जात्यावर दळलेली सेंद्रीय डाळ, गोदाकाठची ज्वारी, सेंद्रीय भाज्या, रानफळे, लाकडी घाण्यावर तयार केलेले करडई, भुईमूग, जवस व तीळाचे तेल, बांबूपासून तयार वस्तू, केळीचे वेफर्स यांचे प्रदर्शन व विक्रीही करण्यात येणार आहे.

या महोत्सवाला शहर व जिल्ह्यातील शेतकरी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी तथा प्रकल्प संचालक (आत्मा) दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

००००००

वृत्त क्रमांक 279  

नवीन सेवार्थ प्रणालीचे ई-बील प्रशिक्षण संपन्न   

नांदेड दि. 6 मार्च :- जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत नवीन सेवार्थ प्रणाली अंतर्गत ई-बील संदर्भात नांदेड तालुक्यातील आहरण व संवितरण यांचे प्रशिक्षण आज शुक्रवार 6 मार्च रोजी जिल्हा नियोजन सभागृह नांदेड येथे घेण्यात आले. या प्रशिक्षणास जवळपास 153 आहरण व संवितरण अधिकारी-कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी जिल्हा कोषागार अधिकारी विक्रम देशमुख यांनी नविन सेवार्थ प्रणालीबाबत मार्गदर्शन केले. 

अप्पर कोषागार अधिकारी श्रीमती वैशाली ताटपल्लेवार यांनी नवीन सेवार्थ प्रणालीबाबत विस्तृत माहिती दिली. तसेच कनिष्ठ लेखापाल मास्टर ट्रेनर शंकर दुमाने, लेखा लिपीक बसवेश्वर वाळके, सुनिल संगेवार यांनीही माहिती सांगितली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार लेखा लिपीक प्रमोद शिंदे यांनी केले. 

सर्व तालुक्यातील आहरण व संवितरण अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी 'नवीन सेवार्थ प्रणाली' ई- बिल संदर्भात पुढील प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन मंगळवार 10 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वा. करण्यात आले आहे. या प्रशिक्षणास संबंधित लेखा विभागातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी विक्रम देशमुख यांनी केले आहे.

00000

Thursday, March 5, 2026

वृत्त क्रमांक  278

छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर अभियानाचे 7 मार्च रोजी सोनखेड येथे आयोजन

नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन

नांदेड, दि. 5 मार्च :- लोहा तालुक्यात 7 मार्च ते 8 मे 2026 याकालावधीत छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर अभियान” टप्पा 1 चे मंडळनिहाय शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी परिसरातील नागरिकांनी या शिबिरास मोठ्या संख्येने उपस्थित राहून, आपल्या प्रलंबित कामाचा निपटारा करून घ्यावा, असे आवाहन लोहा तहसीलदार विठ्ठल परळीकर यांनी केले आहे.

त्यानुसार लोहा तालुक्यात 7 मार्च रोजी सोनखेड याठिकाणी सामान्य जनतेच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी आणि शासनाच्या विविध कल्याणकारी योजना थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी लोहा प्रशासनाच्यावतीने“ छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर अभियान” टप्पा 1 चे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर 7 मार्च रोजी सकाळी 10 वाजता हनुमान मंदिर परिसर, पोलीस स्टेशनच्या समोर सोनखेड येथे संपन्न होणार आहे. प्रशासकीय पारदर्शकता आणि गतिमानता वाढवण्यासाठी हे शिबिर आयोजित केले आहे

शिबिराचा मुख्य उद्देश :

शासकीय कार्यालयात हेलपाटे न घालता, नागरिकांना त्यांच्या हक्काचे दाखले, कागदपत्रे आणि योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळावा, हा याशिबिराचा मुख्य उद्देश आहे. “ शासन आपल्यादारी या योजनेला बळकटी देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

शिबिरात उपलब्ध असणाऱ्या प्रमुख सेवा :- विविध दाखले वाटप, ॲग्रीस्टँक, 

सातबारा अद्यावत करणे, पी.एम.किसान, प्रलंबित फेरफार निकाली, तुकडेबंदी कायद्याच्या अनुषंगाने कार्यवाही, ई-मोजणी सामाजिक अर्थसहाय्य योजनांचा लाभ, पाणंद रस्त्याबाबत कार्यवाही,  लोकसेवा हक्क कायदा, तात्काळ सेवा, अभिलेख दुरुस्ती, हेल्पडेस्क इतर अनुषंगिक विषय असणार आहेत.

0000

 वृत्त क्रमांक  277

निशुल्क ग्रंथालय सदृश अभ्यासिकेचा लाभ घ्यावा

नांदेड दि.५ मार्च :- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नांदेड अंतर्गत जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी निशुल्क ग्रंथालय सदृश अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे. या अभ्यासिकेत स्पर्धा परीक्षा, बँकिंग, रेल्वे भरती तसेच विविध स्पर्धात्मक परीक्षांसाठी आवश्यक संदर्भ पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यामध्ये चालू घडामोडी, वर्तमानपत्रे, विविध मासिके आदी साहित्याचा समावेश आहे.

तसेच सुशिक्षित युवक-युवतींना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधींबाबत मार्गदर्शन करण्यासाठी रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबिरे तसेच ऑनलाईन व ऑफलाईन समुपदेशन कार्यक्रम नियमितपणे आयोजित करण्यात येतात.

तरी जिल्ह्यातील गरजू युवक-युवतींनी या निशुल्क ग्रंथालय सदृश अभ्यासिकेचा लाभ घ्यावा. प्रवेशासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पहिला मजला, शासकीय तंत्र प्रशाला केंद्र, आनंदनगर रोड, बाबानगर, नांदेड येथे प्रत्यक्ष भेट द्यावी किंवा अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक 02462-251674 वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

०००००

 वृत्त क्रमांक  276

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत

जिल्हा-तालुकास्तरीय एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

नांदेड दि. 5 मार्च :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन 2024-25 पासून महाराष्ट्र स्तरावर ऑनलाईन पद्धतीने राबवली जात असून अनुसूचित जातीतील जे विद्यार्थी 50 टक्के पेक्षा अधिक गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत व ज्या विद्यार्थ्यांना समाज कल्याणच्या शासकीय वस्तीगृहामध्ये प्रवेश मिळालेला नाही. अशा विद्यार्थ्यांकरिता स्वाधार योजना राबवली जात आहे. सदरील योजना ही जिल्हास्तर तसेच तालुका स्तरावरती राबविण्यात येते.

नुकतेच 23 फेब्रुवारी रोजी सामाजिक न्याय भवन नांदेड या ठिकाणी एक दिवसीय महाविद्यालयांची मार्गदर्शनपर कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेअंतर्गत कार्यक्रमाचे अध्यक्षपदी संतोष चव्हाण, सहय्यक लेखाअधिकारी समाज कल्याण कार्यालय नांदेड व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती लक्ष्मी गायके, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक तसेच कार्यालयीन अधीक्षक, स.क.नांदेड. व स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथील जालिंदर गायकवाड तसेच तालुकास्तरीय वरील प्रमुख पाहुणे म्हणून राजश्री शाहू जुनियर कॉलेज लोहा प्राचार्य श्री.फाजगे, नांदेड जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयातील प्राचार्य व कर्मचारी समतादूत हे कार्यक्रमास उपस्थित होते. 

तसेच सदरील कार्यशाळेचे प्रास्ताविक श्रीमती अंजली नरवाडे, तालुका समन्वयक यांनी केले व श्रीमती गायके यांनी उपस्थित महाविद्यालयातील कर्मचारी यांना सदर योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना सहकार्य करण्यासाठी सूचना दिल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोष चव्हाण यांनी सदर योजना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावी व जे विद्यार्थी वस्तीगृह प्रवेशापासून वंचित राहिलेले आहेत, अशा विद्यार्थ्यांना सदर योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणींबाबत महाविद्यालय स्तरावरती कार्यशाळा घेऊन त्यांच्या अडचणींचे निरसन करण्यासाठी त्यांनी सूचित केले.

समाज कल्याण कार्यालय अंतर्गत एक दिवसीय कार्यशाळेमध्ये पीपीटी मार्फत शासन निर्णयातील नियम व अटी नुसार सविस्तर मार्गदर्शन उपस्थित सर्व महाविद्यालयाच्या प्रतिनिधींना देण्यात आले त्यामध्ये उपस्थितांचे प्रश्नांचे निरसन करून सदरील योजना प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरिता शिवानंद मिनगिरे सहाय्यक आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून नांदेड जिल्ह्यातील सर्व स्वाधार योजनेस पात्र विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्र महाविद्यालयांमार्फत विहित वेळेमध्ये व योग्यरीत्या पूर्तता करण्याकरिता सहकार्य करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. या कार्यशाळा यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन पांपटवार तालुका समन्वयक यांनी केले तर श्रीमती राणी गडगीळे समाजकल्याण निरीक्षक, स्वाधार विभाग प्रमुख यांनी सदर कार्यशाळा व्यवस्थितरित्या पार पडण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली व  आनंद झंपलवाड कनिष्ठ लिपिक, स्वाधार विभाग, श्री बालाजी खूपसे तालुका समन्वयक यांनी अथक परिश्रम घेऊन सदर कार्यशाळेचे नियोजन केले तेव्हा नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय महाविद्यालयांना महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या व विद्यार्थ्यांच्या अडचणींचे निरसन होण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरावरती मार्गदर्शनपर कार्यशाळा घेणेबाबत अवगत करण्यात आले.

नांदेड जिल्ह्यातील सर्व स्वाधार योजनेला पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नांदेडच्या वतीने आवाहन करण्यात येते की, ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज पात्र झालेले आहेत त्यांनी बँक खाते तपशील ऑनलाइन भरून घ्यावे तसेच ज्या विद्यार्थ्यांना अर्ज सेंड बॅक आलेले आहेत अशा विद्यार्थ्यांनी आपली त्रुटीची पूर्तता योग्यरित्या विहित वेळेत पूर्ण करावी आणि येणाऱ्या अडचणी बाबत आपल्या प्रवेशित महाविद्यालयातील समानसंधी केंद्र व संबंधित योजनेचे कामकाज पाहणारे कर्मचारी यांना संपर्क साधावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे समाज कल्याण नांदेड यांच्यामार्फत केले आहे.

00000

  भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्सचा राज्यव्यापी संवाद #भरती #परीक्षा #महाराष्ट्रशासन #MahaDGIPR