Tuesday, September 27, 2016

महात्मा गांधी जयंती, लालबहादूर शास्त्री जयंतीबाबत आवाहन
           नांदेड, दि. 27 :- महात्मा गांधी जयंती निमित्त 2 ऑक्टोंबर 2016 रोजी सर्व शासकीय-निमशासकीय कार्यालयांमध्ये महात्मा गांधी जयंती व लाल बहादुर शास्त्री जयंती साजरी करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानिमित्ताने केंद्र शासनाच्या निर्देशानुसार स्वच्छ भारत अभियान व त्याअंतर्गत रविवार 2 ऑक्टोंबर रोजी सकाळी 9.45 वा. सर्व शासकीय कार्यालयात महात्मा गांधी जयंती निमित्त स्वच्छता शपथ घेण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने सर्व शासकीय-निमशासकीय कार्यालयांना करण्यात आले आहे.
            राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या  जन्मदिन  आंतरराष्ट्रीय  अहिंसा दिन म्हणून जगभर पाळण्यात येतो. त्यानिमित्त 2 ऑक्टोंबर रोजी सर्वांनी महात्मा गांधीच्या अमर संदेशाप्रती कटिबद्ध राहण्याची शपथ घ्यावयाची आहे. त्या दिवशी राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर विविध समयोचित कार्यक्रम देखील आयोजित करण्यात येणार आहेत. जिल्हा मुख्यालयांसह सर्व ठिकाणी या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी नियोजन करण्यात यावे, त्यासाठी जिल्ह्यातील जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक, अन्य मान्यवर, एनसीसी, एमएसस, छात्रसैनिक, शहरातील महाविद्यालयांचे प्राचार्य व शाळांचे मुख्याध्यापक तसेच विविध सामाजिक व स्वयंसेवी संघटनांचे पदाधिकारी यांना निमंत्रित करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

 00000
 जिल्ह्यात हंगामात 99.82 टक्के पाऊस
गत 24 तासात सरासरी 3.87 मि.मी. 
           नांदेड, दि. 27 :- जिल्ह्यात  मंगळवार 27 सप्टेंबर 2016 रोजी  सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात एकूण 61.94 मिलीमीटर पाऊस  झाला असून  जिल्‍ह्यात  दिवसभरात सरासरी 3.87 मिलीमीटर पावसाची  नोंद  झाली  आहे. जिल्ह्यात या हंगामात आतापर्यंत सरासरी 953.82 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.   
जिल्ह्यात या हंगामात आतापर्यंत झालेल्या पावसाची तालुका निहाय टक्केवारी पुढील प्रमाणे. (सर्वाधिक ते उतरत्या क्रमाने ) लोहा-138.93, अर्धापूर-116.61, नांदेड-115.33, भोकर-111.88, कंधार-109.03, हदगाव-105.05, मुखेड-104.77, बिलोली-103.11, नायगाव-97.64, माहूर-96.37, धर्माबाद-90.69, हिमायतनगर-89.77, मुदखेड-89.12, उमरी-83.56, देगलूर-82.36, किनवट-77.26. जिल्ह्याची यंदाच्या हंगामातील आतापर्यंत पावसाची टक्केवारी  99.82 इतकी झाली आहे.    
जिल्ह्यात मंगळवारी 27 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात  झालेला  पाऊस मिलीमीटरमध्ये  तालुकानिहाय  पुढीलप्रमाणे  कंसात  एकूण  पाऊस  : नांदेड-निरंक (1051.65), मुदखेड- 4.67 (760.69), अर्धापूर-निरंक (1014.00) , भोकर-4.00 (1114.75), उमरी-निरंक (832.60), कंधार-00.33 (879.47), लोहा-निरंक (1157.67), किनवट-6.43 (958.03), माहूर-21.25 (1195.00), हदगाव-5.00 (1026.69), हिमायतनगर-4.00 (877.31), देगलूर-0.33 (741.50), बिलोली-2.80 (998.20), धर्माबाद-10.33 (830.38), नायगाव-1.80 (894.00), मुखेड-01.00 (929.14) आज  अखेर  पावसाची सरासरी 953.82  (चालू वर्षाचा एकूण पाऊस 15261.08) मिलीमीटर आहे. 
 00000
विष्णुपूरी प्रकल्प भेटीत पूर नियंत्रणासाठी झटणाऱ्या
यंत्रणांचे जिल्हाधिकारी काकाणी यांच्याकडून कौतूक
सदैव सतर्कतेचेही निर्देश , माध्यमांचेही मानले आभार

नांदेड, दि. 27 :- संततधार पाऊस आणि गोदावरी नदीत अन्य जिल्ह्यातील प्रकल्पातून येणाऱ्या पाण्याची आवक यांच्या प्रभावी नियंत्रणासाठी जिल्ह्यातील विविध यंत्रणा समन्वयाने प्रयत्न करत आहेत.  या अनुषंगाने जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी आज शंकरराव चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पास भेट देऊन पूर नियंत्रणासाठी प्रयत्न करणाऱ्या विविध यंत्रणाशी चर्चा करतानाच, आगामी काळातही आणखी सतर्क राहण्याचे निर्देश दिले. पूर नियंत्रणासाठी प्रयत्न करणाऱ्या या विविध यंत्रणाचे जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी कौतूक केले आहे, तर या काळातील सहकार्यासाठी  विविध प्रसार माध्यमांचे, त्यांच्या प्रतिनिधींचे आभार मानले आहेत. 
विष्णुपूरी प्रकल्पस्थळी नांदेड पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता बी. एस. स्वामी, नांदेडचे उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी, नांदेड मनपाचे उपायुक्त रत्नाकर वाघमारे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एम. टी. लव्हराळे, उपअभियंता निलकंठ गव्हाणे, यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. राजगिरे, उपअभियंता श्री. लोखंडे, विद्युत विभागाचे उपअभियंता श्री. अवस्थी आदींचीही उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी विष्णुपूरी प्रकल्पातील पाण्याची आवक, जलसंचय क्षमता तसेच विविध तांत्रिक विभागांचीही माहितीही घेतली. नदीपात्राची  जलधारण क्षमता आणि पाणी वहन क्षमता यानुसार पाण्याचासाठा तसेच पुढे पाण्याची पातळी आणि वेग नियंत्रणासाठी करण्यात येणाऱ्या बाबींचीही यावेळी माहिती देण्यात आली. विविध घटकांच्या अहोरात्र संपर्क-समन्वयामुळे पुराच्या पाण्यामुळे होणारे नुकसान रोखण्यात यश आले. काही ठिकाणी शेतीचे नुकसान झाले, जिवीतहानी आणि मालमत्तेचे नुकसान काही प्रमाणात टाळता आले. पूर नियंत्रण यंत्रणेने दिवसाच्या प्रहरातच पाण्याचा विसर्ग करण्यासाठी अथक प्रयत्न केले.  यासाठी नागरिकांपर्यंत नेमकी माहिती पोहचविण्यासाठीही माध्यमांनीही प्रयत्न केले. त्याचेही जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी कौतूक केले.
विष्णुपूरीसह नांदेड जिल्ह्यातील विविध प्रकल्पातून यापुढे रब्बी हंगामासाठी होणाऱ्या कृषि सिंचनासाठीच्या उपाययोजनांबाबतही काटेकोर नियोजनाबाबतही त्यांनी जलसंपदा विभागाशी चर्चा केली. तसेच विष्णुपूरीसह विविध प्रकल्पातील पाणीसाठा स्थिर ठेवण्यासाठी, यापुढेही हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार पावसाचा जोर वाढल्यास आणखी सतर्कता बाळगण्याच्या सूचनाही करण्यात आल्या.
विष्णुपूरी प्रकल्पातून दुपारपर्यंत एकाच दरवाज्यातून विसर्ग सुरु ठेवण्यात आला होता. प्रकल्पात पाण्याची आवक सुरु आहे. त्यामुळे सध्या नव्वद टक्क्यांवर असलेल्या या प्रकल्पात पुन्हा सायंकाळपर्यंत आणखी पाणीसाठा वाढू शकतो. त्यासाठीही आवश्यक समन्वय राखण्याचे निर्देश देण्यात आले.

जलसंपदा विभागाचे कौतूक, माध्यमांचे आभार..
जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांपासून गोदावरी नदीसह, मानार, लेंडी, पुर्णा आदी प्रकल्पांशी निगडीत नांदेड पाटबंधारे मंडळातील कार्यकारी अभियंता, उपअभियंता आदी अधिकारी-कर्मचारी पूर नियंत्रणासाठी झटत होते. माहितीची देवाण-घेवाण करीत होते, त्यासाठी प्रशासनाच्या सतत संपर्कात होते. यातूनच पूर नियंत्रणासाठी प्रभावी प्रयत्न करता आले. याकरिता जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी नांदेड पाटबंधारे मंडळाचे कौतूक केले आहे. तर जिल्ह्यातील नागरिकांपर्यत वेळोवेळी प्रशासनाच्या प्रयत्नांची आणि पुराबाबतची वस्तुस्थिती पोहचविण्यात विविध माध्यम प्रतिनिधी, प्रसारमाध्यमांनीही सहकार्य केले, त्यासाठीही जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी आभार मानले आहेत.
0000000

लेख

जिल्ह्याच्या आरोग्यपुर्णतेसाठी
आरोग्य विभागाची विविध रुग्णालये प्रयत्नशील

सर्वसामान्य जनतेला आरोग्याच्या विविध सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी नांदेड जिल्हयातील स्त्री रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय कार्यरत आहेत. ही सर्व रुग्णालय सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली व जिल्हा शल्य चिकित्सकाच्या अधिपत्याखाली कार्यरत आहेत. या रुग्णालयात विविध राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत आरोग्य सेवा पुरविल्या जातात. नांदेड जिल्हयात एप्रिल, 2015 ते जून, 2016 अखेर उपलब्ध करुन दिलेल्या आरोग्य सेवांचा आढावा या लेखात घेतला आहे.
            जिल्हयात एक स्त्री रुग्णालय, चार उपजिल्हा रुग्णालय व 12 ग्रामीण रुग्णालय आहेत. या जिल्हयातील रुग्णालयांमध्ये या कालावधीत 2 लाख 79 हजार 603 आंतररुग्ण सेवा उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. या कालावधीत 1 हजार 647 लहान शस्त्रक्रिया 396 मोठ्या शस्त्रक्रिया व 2 हजार 897 प्रसूति करण्यात आलेल्या आहेत. 1 लाख 8 हजार 792 रुग्णांची प्रयोगशाळा तपासणी व 26 हजार 505 रुग्णांची क्ष-किरण तपासणीही करण्यात आलेली आहे.
।। माता बाल संगोपन कार्यक्रम।।
            बालके ही उद्याच्या देशाचे भवितव्य आहे. म्हणून सुदृढ बालक जन्माने येण्यासाठी मातेने योग्य काळजी घेतली तर निरोगी बालके जन्माला येतील. त्यासाठी गरोदरपणातील मातेच्या तपासण्या, आरोग्य, आहार, रुग्णालयात प्रसूती, जन्मानंतर त्वरीत स्तनपान, बाळाचे लसीकरण या सर्वावर आरोग्य विभागाने लक्ष केंद्रीत केले आहे. जिल्हयात माता बालसंगोपन कार्यक्रमांतर्गत 2 हजार 897 गरोदर मातांना व 1 हजार 893 बालकांना आरोग्य सेवा पुरविण्यात आलेल्या आहेत. माता व बालमृत्यु दर कमी करण्यासाठी संस्थात्मक प्रसुतीसाठी प्रोत्साहन देण्याकरिता जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमही राबविण्यात येतो. या कार्यक्रमांतर्गत 36 हजार 136 गरोदर मातांना  व 1 हजार 214 बालकांना आरोग्य सेवा देण्यात आलेली आहे.
।। जननी सुरक्षा योजना।।
            जननी सुरक्षा योजनेच्या माध्यमातून संस्थात्मक प्रसुतींना प्रोत्साहन देण्यात येते. अनुसूचित जाती, जमातीतील व दारिद्रय रेषेखालील गरोदर महिलांना नॉर्मल प्रसुतीसाठी 600 रुपये व सिजेरियन प्रसुतीसाठी 19 हजार 500 रुपये अनुदान या योजनेतंर्गत उपलब्ध करुन देण्यात आले आहे. जिल्हयात या योजनेतंर्गत 2 हजार 751 गरोदर मातांना 18 लाख 90 हजार 180 रुपयांचे अनुदान देण्यात आलेले आहे.
।। मानव विकास कार्यक्रम ।।
            गरोदर मातांची प्रसुती सुलभ व सुरक्षित होण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत आरोग्य तपासणी शिबीरे या मानव विकास कार्यक्रमांतर्गत घेण्यात येतात. जिल्हयात 10 शिबीरांचे आयोजन करण्यात आले. 845 गरोदर व स्तनदा मातांना आणि 305 बालकांना आरोग्य सेवा देण्यात आली. या कार्यक्रमांतर्गत अनुसूचित जाती, जमातीतील व दारिद्रय रेषेखालील 8 गरोदर मातांना प्रत्येकी 4 हजार रुपयाप्रमाणे बुडीत मजूरी पोटी 32 हजार रुपये एवढी रक्कम वितरीत करण्यात आली.
            जिल्हयात राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमातंर्गत 3 हजार 987 मोतिबिंदू शस्त्रक्रिया व 93 हजार 750 शालेय विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली. दोन हजार 480 चष्मे वाटपही करण्यात आले. राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रमातंर्गत जिल्हयातील 9 लाख 69 हजार 803 बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आलेली आहे. या कार्यक्रमातंर्गत 68 मुलांच्या हृदय शस्त्रक्रिया, 283 मुलांच्या छोट्या व मोठ्या शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत. याच कार्यक्रमातंर्गत 301 कुपोषित बालकांना औषधोपचार करुन त्यांचे श्रेणीवर्धन करण्यात आलेले आहे.
            मनोधैर्य वाढविण्यासाठी व वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी प्रकल्प प्रेरणा शेतकरी समुपदेशन व आरोग्य सेवा कार्यक्रमाची नोव्हेंबर 2015 पासून जिल्हयात अंमलबजावणी करण्यात येत आहे. 30 जून 2016 अखेर विविध आजारांसाठी 30 हजार 164 शेतकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा पुरविण्यात आलेली आहे.
            आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वैद्यकीय सेवा त्वरेने मिळाली पाहिजे यासाठी महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा (टोल फ्री 108) अंतर्गत 25 रुग्णवाहिकीने 20 हजार 502 रुग्णांना रुग्णसेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमातंर्गत जिल्हयातील मधुमेह, उच्च रक्तदाब, पक्षाघात, सर्व प्रकारचे कॅन्सर व मौखिक आरोग्य तपासणी करुन 7 हजार 992 रुग्णांना त्यांच्या आजारा करिता आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. जिल्हयात पीसीपीएनडीटी कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी करण्यात येत असल्याने लिंग गुणोत्तर प्रमाणात 32 ने वाढ झालेली आहे. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेतंर्गत 844 हृदय शस्त्रक्रिया 838 रुग्णांच्या किडनीच्या आजारावरील उपचार, इतर रुग्णांना मोफत आरोग्य सेवा पुरविण्यात आलेली आहे.
            निरोगी जीवनासाठी आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग विविध योजनांच्या माध्यमातून गरीब व गरजू जनतेला आरोग्याच्या सुविधा पुरवित असते. जिल्हयात जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या अधिपत्याखालील रुग्णालये त्यादृष्टीने प्रयत्नशील आहेत. या आरोग्य सुविधा सर्वापर्यंत पोहचत आहेत त्याचा लाभ घेऊन आरोग्य सुदृढ ठेवावे.

-         दिलीप गवळी ,
जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड

000000000

Monday, September 26, 2016

मानार नदीकाठच्या गावांना सतर्कतेचे आवाहन
नांदेड, दि. 26 :- मानार नदीकाठच्या जनतेने सतर्क राहून आपल्या पशुधनाची व मालमत्तेच्या सुरक्षिततेची उपाय योजना करावी, असे आवाहन नांदेड पाटबंधारे उत्तर विभाग कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.
याबाबतच्या निवेदनात म्हटले आहे की , उर्ध्व मानार प्रकल्प लिंबोटीमध्ये पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात चालू आहे. त्यामुळे धरणाची क्षमता लक्षात घेऊन आश्यकतेनुसार पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे लिंबोटी, डोंगरगाव, हनमंतवाडी, चोंडी, दगडसांगवी, मजरेसांगवी, बोरी खु, उंबरज, संगमवाडी, कोल्हाची वाडी, शेकापूर, अंबेवाडी, जंमलवाडी, बाळंतवाडी व घोडज या नदीकाठच्या गावातील नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टिने सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लिंबोटी धरणाचे जलाशय खोल असल्याने या जलाशयात कोणीही पोहण्यास जावू नये असेही निवेदनात म्हटले आहे.

000000
विधानसभा विरोधी पक्षनेता
राधाकृष्ण विखे पाटील यांचा दौरा
नांदेड, दि. 26 :-  राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेता राधाकृष्ण विखे पाटील हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
शुक्रवार 30 सप्टेंबर 2016 रोजी औरंगाबाद विमानतळ येथून खाजगी विमानाने नांदेड विमानतळ येथे सकाळी 11 वा. आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण. सकाळी 11.15 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. दुपारी 12 वा. स्व. प्राचार्य डॉ. गो. रा. म्हैसेकर यांच्या निवासस्थानी भेट. दुपारी 12.30 वा. वर्कशॉप कॉर्नर येथून मोटारीने शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण. दुपारी 12.45 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. सायंकाळी 4 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून मोटारीने माहूर जि. नांदेडकडे प्रयाण करतील. सायंकाळी 6.30 वा. शासकीय विश्रामगृह माहूर येथे आगमन, राखीव व मुक्काम.
निवार 1 ऑक्टोंबर 2016 रोजी सकाळी 10 वा. शासकीय विश्रामगृह माहूर येथून मोटारीने नांदेडकडे प्रयाण. दुपारी 12.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. दुपारी 12.45 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून नांदेड विमानतळाकडे प्रयाण. दुपारी 1 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व खाजगी विमानाने पुणेकडे प्रयाण करतील.

000000
जिल्हाधिकारी काकाणी यांच्या नेतृत्वात
पूर नियंत्रणासाठी शर्थीचे प्रयत्न
क्षणा-क्षणाच्या संवाद-संपर्क-समन्वयावर भर

नांदेड, दि. 26 :-  संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख नदी असणाऱ्या गोदावरीच्या पाणी पातळीवर जिल्हा प्रशासनाकडून क्षणा-क्षणाला  नजर ठेवली जाते आहे. नदीकाठच्या  परिसराला पुराच्या पाण्याचा फटका बसू नये यासाठी जिल्हाधिकारी सुरेश काकाणी  आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सातत्यपुर्ण संपर्क ठेवला आहे. विशेषतः पोचमपाड या तेलंगणा राज्यातील धरणातून वेळीच पाण्याचा विसर्ग करण्यात यावा यासाठी जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी केलेल्या प्रयत्नामुळे संभाव्य हानी टाळता आली आहे. पूर नियंत्रणासाठी क्षणा-क्षणाला समन्वय राखला जात आहे.
Add caption
तरीही सखल भागातील रहिवाशी आणि पुररेषेतील घटकांनी विशेष सतर्कता बाळगावी. आगामी काळातही पावसाचा जोर वाढल्यास जनतेने अधिक सजग रहावे व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी केले आहे. हवामान खात्याच्या सलग 5 दिवस पावसाचा जोर राहील या इशाऱ्याच्या अनुषंगाने हे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे आगामी काही दिवस कसोटीचे राहणार आहेत.
            गोदावरी नदीवरील विष्णुपूरी हा महत्त्वाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पातील पाणीसाठा स्थिर ठेवण्याबरोबरच, पुढे पाणी सोडण्याने होणाऱ्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात जिल्हा प्रशासन आणि जलसंपदा विभागातील संपर्क-समन्वय उपयुक्त ठरला आहे. जिल्हाधिकारी श्री. काकाणी, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता बी. एस. स्वामी तसेच अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी आणि कार्यकारी अभियंता एम. टी. लव्हराळे, उपअभियंता निलकंठ गव्हाणे यांच्यासह विविध प्रकल्पांवरील अभियंता, अधिकारी-कर्मचारी यांचे सांघिक प्रयत्न महत्त्वपुर्ण ठरले आहेत.
            विष्णुपूरी प्रकल्पाच्या पाण्याचा थेट नांदेड शहर आणि पुढे नदीकाठच्या गावांवर प्रभाव पडतो. त्यामुळे प्रकल्पात परभणी, बीड, जालना जिल्ह्यातून येणाऱ्या अतिरिक्त पाण्याचा विचार करावा लागला. या जिल्ह्यातील प्रकल्प अतिवृष्टीमुळे  पूर्ण भरल्याने तेथून होणारा विसर्ग गोदावरी नदीच्या पात्रात समावून घेता यावे यासाठी नदीपात्राची जलधारण क्षमता विचारात घेवून पाण्याचा विसर्ग करण्याचे नियोजन करण्यात आले. विष्णुपुरी प्रकल्पाची जलग्रहण क्षमता आणि तेथून पुढे सोडावयाच्या पाण्याबाबत ताळमेळ घालण्यात आला. नदी पात्रातील पाणी अन्य नाले आणि ओढ्यांना, छोट्या नद्यांचे पाणी सामावून घेऊ शकत नसल्याचा अंदाज आल्याने तेलंगणा राज्यातील पोचमपाड धरणातील पाणी वेळीच पुढे सोडण्यात यावे यासाठी जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी निजामाबाद जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी योगिता राणा यांच्यासह तेथील जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना परिस्थितीचे गांभीर्य समजावून दिले. त्यामुळे पोचमपाडमधून वेळीच विसर्ग सुरु झाल्याने, पाणी पुढे सरकण्यास वाव मिळाला. दुसरीकडे विष्णपुरीतील पाण्याचा वेगही नियंत्रित करण्यात येत आहे. त्यासाठी कधी दहा, कधी आठ तर कधी सहा दरवाजे उघडे ठेवण्यात येत आहे. या नियंत्रीत प्रयत्नामुळे सखल भागात पाणी शिरुन होणारे संभाव्य नुकसान टाळण्यात आले. नागरिकांना इतरत्र हलवण्याची वेळे येऊ नये. त्याचबरोबर शेतीचे नुकसान होऊ नये अशा पद्धतीने पाण्याचा विसर्ग नियंत्रीत करण्यात येत आहे.  
प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करताना, वेळेचाही प्रामुख्याने विचार करण्यात येत आहे. रात्री-अपरात्री पाणी सोडण्याऐवजी नदीकाठच्या गावांना आणि रहिवाश्यांना हालचाली करणे सोयीचे व्हावे, तसेच त्यांच्यापर्यंत पोहचून, त्यांना मदत करता यावी यासाठी दिवसाच्या प्रहरातच मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. याशिवाय नदीकाठच्या गावातील आपत्ती व्यवस्थापन समित्यांनाही वेळीच सतर्क करण्याची खबरदारी घेण्यात येत आहे. त्यांच्याशी संपर्क प्रस्थापित करण्यात आला आहे. याशिवाय आरोग्य आणि पोलिस प्रशासन अशा विविध यंत्रणांनाही सतर्क राहण्याचे निर्देशित करण्यात आले आहे.       
नियंत्रण कक्षांचे दूरध्वनी क्रमांक
            दरम्यान, जिल्ह्यातील नागरिकांनी विशेषतः नदीकाठची गावे, वस्त्या-रहीवाशी शेतकऱ्यांनी सतर्क रहावे, अफवांवर विश्र्वास न ठेवता जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा. त्यासाठी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. हे क्रमांक असे जिल्हाधिकारी कार्यालय  नियंत्रण कक्ष- 02462-235077, नि:शुल्क दूरध्वनी क्रमांक (टोल फ्री)- 1077, महानगरपालिका नियंत्रण कक्ष- 02462 234461, पोलीस नियंत्रण कक्ष- 02462 234720, आरोग्य विभाग- 02462 236699, नि:शुल्क दूरध्वनी क्रमांक (टोल फ्री)- 108.
जलयुक्त शिवार अभियानातील
जलसाठ्यांबाबत दक्षता घेण्याचेही आवाहन
जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातील कामांमुळे जलसाठे निर्माण झाले आहेत. नदी, नाल्यांच्या खोलीकरण-रुंदीकरण-सरळीकरणामुळे अतिवृष्टीसारखी गंभीर परिस्थिती निर्माण होऊनही शेत जमिनींचे नुकसान टाळता आले आहे. निर्माण झालेल्या जलसाठ्यांच्याबाबत स्थानिक नागरिकांनी दक्षता घ्यावी, लहान मुले, महिला तसेच जनावरांच्याबाबत होणाऱ्या अपघाताच्या घटना टाळण्यासाठी विशेषत दक्षता घ्यावी, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
पाण्याची आवक आणि विसर्ग यांच्या समतोलाचे आव्हान
गोदावरी नदीत येणाऱ्या पाण्याची आवक आणि पुढे विष्णुपूरीसह, आमदुरा, बळेगावातून सोडण्याच्या पाण्याचा समतोल राखण्याचे आव्हान आहे. तेलंगणातील धरणातून चार लाख क्युसेक्सने विसर्ग सुरु ठेवण्याचा आग्रह धरण्यात आला आहे. विष्णुपूरी प्रकल्पातून आज दुपारच्या सुमारास आठ दरवाज्यांतून एक लाख 3 हजार क्युसेक्सचा विसर्ग सुरु होता. हा विसर्गही बारकाईने नियंत्रित करण्यात येत आहे. नांदेड शहरासह, लगतच्या भागातील पाणी पातळी धोक्याच्या पातळीवर जाणार नाही यासाठी संपर्क आणि समन्वय राखण्यात येत आहे. तासा-तासाला माहिती अद्ययावत करण्यात येत आहे. एकमेकांशी संपर्क आणि संवाद साधण्यावर भर देण्यात येत आहे.
000000

मृद व जलसंवर्धन रील्स स्पर्धेला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ #जलसंधारणदिन #वॉकेथॉन२०२६ #वॉकफॉरवॉटर #रीलस्पर्धा #WalkForWater #WaterConservationDay...