Tuesday, April 28, 2026

वृत्त क्रमांक 

जिल्‍हाधिकारी कार्यालयात सेवा हक्‍क दिन साजरा 

सर्व ऑनलाईन सुविधा केंद्रे कार्यान्वित करण्‍याचे निर्देश 

उत्‍कृष्‍ट सेवा बजावणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव

नांदेड दि. 28 एप्रिल:- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ अंतर्गत आज जिल्हाधिकारी कार्यालयात 'सेवा हक्क दिन' उत्साहात साजरा करण्यात आला. नागरिकांना पारदर्शक, गतीमान व कालबद्ध सेवा देण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. तसेच, आपले सरकार पोर्टल द्वारे ऑनलाइन सेवांचा लाभ सक्षमतेने देण्याचे आणि अधिसूचित सेवा वेळेत प्रदान करण्‍याबाबत जिल्‍हाधिकारी राहुल कर्डिले यांनी  निर्देश दिले. सेवा हक्‍क दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

कै. डॉ. शंकरराव चव्‍हाण नियोजन भवन येथे लोकसेवा हक्‍क दिन साजरा करण्‍यात आला. यावेळी अपर जिल्‍हाधिकारी डॉ. रत्‍नदिप गायकवाड, उपजिल्‍हाधिकारी अजय शिंदे, उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी  दत्रात्र्यय गिरी, जिल्‍हा पुरवठा अधिकारी जगदीश बारदेवाड, मनपाचे अपर आयुक्‍त गिरीश कदम, तहसिलदार विकास बिरादार, उषा इज्‍जपवार, सहायक प्रकल्‍प अधिकारी पी.बी. आडे, कौशल्‍य विकासचे एस.जे. परळीकर,नायब तहसिलदार जया अन्‍नमवार , प्रकल्‍प व्‍यवस्‍थापक नीरज धामनगावे, समन्‍वयक कोंडीबा चोपडे आदींची उपस्थिती होती.

नागरिकांना शासकीय सेवा विहित मुदतीत, पारदर्शक आणि गतिमान पद्धतीने मिळवून देण्‍यासाठी जिल्‍हाभरातील सर्व सेतू सुविधा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र पुर्ण क्षमतेने कार्यान्वित राहतील याबाबत खबरदारी घेण्‍याच्‍या सूचना जिल्हाधिकारी श्री. कर्डिले यांनी दिल्‍या. ज्‍या केंद्रावरुन सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍यात हयगय होईल अशा केंद्रावर कार्यवाही करण्यात येईल असे  निर्देश त्यांनी दिले.

जिल्‍हयातील उत्‍कृष्‍ट सेवा बजावणाऱ्या भूमि अभिलेख उपअधिक्षक बळवंत विठ्ठलराव मस्‍के, संतोष बिहारीलाल जगने, नायब तहसिलदार राजेश नागोराव पाठक, नंदकिशोर शंकरराव भोसीकर, ग्रामपंचायत अधिकारी रवि क्षीरसागर, दत्‍ता करपे, गोपाल टोकले, राज तोटावार व श्रीमती एस.बी.श्रीमणवार या लोकसेवकांचा जिल्‍हाधिकाऱ्याच्या हस्‍ते प्रशस्‍तीपत्र देवून गौरव करण्‍यात आला.

सेवा हक्क दिनाचे औचित्‍याने अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सेवा हक्क कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याची प्रतिज्ञा घेतली. यावेळी जिल्‍हाधिकारी कार्यालयासह, पोलिस प्रशासन, जिल्‍हा परिषद, भूमी अभिलेख, कृषी, कौशल्‍य विकास, सिंचन आदी विविध  विभागातील अधिकारी , कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

000000






वृत्त क्रमांक 

पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ध्वजवंदन 

पोलीस कवायत मैदानावर 1 मे रोजी सकाळी शासकीय समारंभ 

नांदेड दि. 28 एप्रिल :- महाराष्ट्र राज्याचा 67 वा स्थापना दिवस समारंभ शुक्रवार 1 मे 2026 रोजी वजिराबाद पोलीस मुख्यालय कवायत मैदान,  नांदेड येथे सकाळी 8 वा. राष्ट्रध्वज वंदन व संचलन समारंभ होणार आहे.  राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे. या समारंभास उपस्थित रहावे, असे आवाहन नांदेड जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. 

या मुख्य शासकीय कार्यक्रमास सर्वांना उपस्थित राहता यावे यासाठी इतर सर्व कार्यालय, संस्था, आदींनी त्यांचे ध्वजवंदनाचे समारंभ सकाळी 7.15 पुर्वी किंवा 9 वाजेनंतर आयोजित करावेत. सर्व निमंत्रितांनी राष्ट्रीय पोशाखात समारंभ सुरू होण्यापूर्वी 20 मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे. सुरक्षिततेच्या दृष्टीने कृपया बँग सोबत आणू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे. 

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या दिनानिमित्त विविध कार्यक्रम, समारंभ आदी ठिकाणी राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पध्दतीबाबत शासन परिपत्रक तसेच ध्वजसंहितेतील सूचनेचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. गृहविभागाच्या राष्ट्रध्वजाच्या उचित सन्मानाबाबतच्या परिपत्रकात नमूद केलेल्या निर्देशनानुसार राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकचा वापर होणार नाही, याची दक्षता संबंधितानी घ्यावी, असेही आवाहनही केले आहे.

00000

वृत्त क्रमांक 

३० एप्रिल रोजी कर्ज वाटप व स्वयंरोजगार मेळावा

मेळाव्यात लाभार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे - मंत्री अतुल सावे 

नांदेड दि. 28 एप्रिल महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती इतर मागास प्रवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील शेतकरी, लघुउद्योजक, सुशिक्षित बेरोजगारांना स्वावलंबी बनविण्यासाठी तसेच त्यांना स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी इतर मागास बहूजन कल्याण विभागाच्यावतीने लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यातील लाभार्थींसाठी कर्जवाटप व स्वयंरोजगार मेळाव्याचे दि.30 एप्रिल 2026 रोजी आयोजन करण्यात आले आहे, तरी या मेळाव्यात लाभार्थींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी केले.

इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, वंसतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, महाज्योती आणि वनार्टी यांच्या संयुक्त विद्यामाने लातुर, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यातील लाभार्थ्याकरीता श्री. शंकरराव चव्हाण सभागृह, विष्णुनगर, नांदेड या सभागृहात दि.30 एप्रिल 2026 रोजी  सकाळी 10.00 वाजता “कर्ज वाटप व स्वयंरोजगार मेळाव्याचे” आयोजन करण्यात आले आहे. 

या मेळाव्यात महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, वंसतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, महाज्योती व वनार्टी या महामंडळाच्या कर्ज वाटप व प्रशिक्षण योजनांबाबत ऑनलाईन अर्ज कसा करावा, अर्जाकरीता आवश्यक कागदपत्रे कोणती आणि अर्जातील त्रृटी कशा टाळाव्यात याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

 महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, वंसतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, महाज्योती व वनार्टी या योजनेतील पात्र, निवड झालेल्या लाभार्थ्यांना सशर्त हेतुपत्र (LOI), मंजुरी पत्राचे वाटप, प्रशस्तीपत्र, मेडलचे वाटप, ट्रॅक्टर, वाहने वगैरे वस्तुचे वितरण करण्यात येणार आहे. 

विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील शेतकरी, लघुउद्योजक, सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी महामंडळाच्या योजनांचा लाभ घेऊन स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी, लाभार्थींना तांत्रिक व आर्थिक मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने, या संधीचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुलजी सावे यांनी केले आहे.

अधिक माहितीस्तव संपर्क –

इतर मागास बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय यांचे संकेतस्थळ :- obcbahujankalyan.maharashtra.gov.in

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ,

प्रशासकीय भवन, 4 था मजला, रामकृष्ण चेंबूरकर मार्ग,

चेंबूर, मुंबई – 400 071 

संकेतस्थळ :- www.msobcfdc.org

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ,

पहिला मजला, जुहू सुप्रीम शॉपिंग सेंटर,

गुलमोहर क्रॉस रोड न.09,

जे.व्ही.पी.डी., विलेपार्ले (पश्चिम), मुंबई 400 049 

संकेतस्थळ :-  www.vnvjntdc.org

000000

 वृत्त क्रमांक 

राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिक वापरास सक्त मनाई  

ध्वजसंहितेचे पालन करण्याचे आवाहन 

नांदेड दि. 28 एप्रिल :- राष्ट्रीय कार्यक्रम,  महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम आदी समारंभाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा वापर करताना, भारतीय राष्ट्रध्वज संहितेचे काटेकोर पालन करावे. तसेच कोणत्याही परिस्थितीत प्लास्टीकचे राष्ट्रध्वज वापरण्यात येऊ नयेत. यासाठी सर्व शासकीय यंत्रणांसह शाळा, महाविद्यालय, संस्था, संघटना आदीसह नागरीकांनी दक्ष रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

दरवर्षी 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मे तसेच मराठवाडयात  17 सप्टेंबर आणि इतर राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रिडा सामन्यांच्यावेळी विद्यार्थी व नागरिकांकडून राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. अशा कार्यक्रमात प्लास्टिक चे ध्वज वापरल्याने, कार्यक्रमानंतर फाटलेले कागदी तसेच प्लास्टिकचे ध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले असतात, पायदळी तुडविले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. राष्ट्रध्वजाचा उचीत सन्मान राखण्यासाठी भारतीय ध्वज संहितेच्या कलम 1.2 ते 1.5 मध्ये राष्ट्रध्वजाच्या उचित वापराबाबत स्पष्ट तरतूद आहे. ध्वजसंहितेच्या कलम 2.2 (x) मधील प्रयोजनासाठीच कागदी राष्ट्रध्वज वापरता येतो. प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या वापराबाबत ध्वजसंहितेमध्ये उल्लेख नमूद नाही. याचा विचार करता ध्वजसंहितेच्या तरतुदींचे पालन करावे. तसेच कोणीही प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नये. 

प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वजांचा वापर थांबविण्यासाठी जनजागृती करण्याकरिता जिल्हा व तालुका पातळीवर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. कार्यक्रम पार पडल्यानंतर खराब झालेले, माती लागलेले राष्ट्रध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले राष्ट्रध्वज गोळा करुन ते तालुका व जिल्हा स्तरावर निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपूर्द करण्याचे अधिकार अशासकीय संस्था तसेच इतर संघटनांना देण्यात आले आहेत. त्यांनी असे खराब झालेले, माती लागलेले ध्वज जिल्हाधिकारी व तहसिलदार यांच्याकडे सुपुर्द करावेत. अशासकीय संस्था, इतर संघटनांनी तसेच नागरिकांनी सुपूर्द केले असे ध्वज गोणी किंवा कपडयामध्ये व्यवस्थित बांधून शिवून बंद करावे. अशाप्रकारे बांधलेले राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक नष्ट करण्याबाबत परिपत्रकात व ध्वजसंहितेत स्पष्ट सूचना आहेत. त्यानुसार खराब झालेल्या ध्वजाची विल्हेवाट लावण्यासाठी तालुका व जिल्हा पातळीवर केलेल्या उपरोक्त व्यवस्थेबाबत सर्व शासकीय कार्यालये, अर्धशासकीय कार्यालये, स्थानिक प्राधिकरणे व शैक्षणिक संस्था यांनी योग्य ती दखल घ्यावी व कार्यवाही करावी, असेही गृह विभागाने म्हटले आहे.

00000

Monday, April 27, 2026



 

 वृत्त क्रमांक 89                                                                                                                     दिनांक 27 एप्रिल 2026

मानसिक आरोग्य आढावा मंडळावर

अशासकीय सदस्यांना अर्ज करण्याचे आवाहन

v अर्ज करण्यासाठी शुक्रवारपर्यंत अंतिम मुदत

v मंडळात लातूर, नांदेडबीड,धाराशिव जिल्ह्याचा समावेश

लातूरदिनांक २७ (विमाका) : लातूरबीड मानसिक आरोग्य आढावा मंडळावर अशासकीय सदस्य पदासाठी इच्छुकांनी सर्व संबंधित कागदपत्रांसह अर्ज आरोग्य संकुलदुसरा मजला उपसंचालकआरोग्य सेवा परिमंडळ लातूर कार्यालयनवीन जिल्हाधिकारी कार्यालया शेजारीलातूर येथे व्यक्तीशकिंवा कार्यालयाच्या ddhslatur2008@yahoo.com  ddhsest12@rediffmail.com मेलवर सादर करावा.

अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत ०१ मे २०२६ रोजी सायंकाळी .१५ वाजेपर्यंत आहेयाबाबत अधिक माहिती पाहण्यासाठी https://nhm.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावीअधिकाधिक इच्छुकांनी अर्ज करावेतअसे आवाहन लातूरचे प्रभारी उपसंचालक डॉसंजय ढगे यांनी केले आहे.

राज्य शासनाने राज्यातील १६ ठिकाणी मानसिक आरोग्य आढावा मंडळ स्थापन करण्यास मान्यता दिली आहेलातूर परिमंडळांतर्गत लातूर मानसिक आरोग्य आढावा मंडळासाठी लातूर आणि नांदेडबीड मानसिक आरोग्य आढावा मंडळासाठी बीड आणि धाराशिव जिल्ह्याचा समावेश आहे.

*****


 वृत्त क्रमांक 

राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेत सहभाग नोंदविण्याचे आवाहन

नांदेड दि. 27 एप्रिल :-  भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या 'ज्ञानभारतम्' या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत देशव्यापी हस्तलिखित सर्वेक्षण मोहिम १६ मार्च २०२६ पासून सुरु आहे, नागरिकांकडे असलेल्या हस्तलिखितांची माहिती ज्ञानभारतम् या मोबाईल अॅपवर अपलोड करुन राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदविण्याचे आवाहन करण्यात येत आहे. 

भारताला हस्तलिखितांचा फार मोठा वारसा लाभलेला आहे. पारंपारिक ज्ञान हे पिढीदर पिढी या हस्तलिखितांद्वारे प्रसारित होत आलेले आहे. परंतू हे सर्व हस्तलिखिते जागोजागी विखुरलेल्या स्वरुपात आहेत. या हस्तलिखिताचे ज्ञानभंडार एकत्र करुन एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्याच्यादृष्टीने भारत सरकारने ज्ञानभारतम् या प्रकल्पाची आखणी केली आहे. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश भारतातील मौल्यवान हस्तलिखित वारशाचे सर्वेक्षण, दस्तऐवजीकरण, संवर्धन, डिजिटायझेशन व प्रसार करणे हा आहे. 

केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत देशभरातील शैक्षणिक संस्था,संग्रहालये, ग्रंथालये, धार्मिक संस्था तसेच खासगी संग्राहक यांच्या सहकार्याने एक कोटीहून अधिक हस्तलिखितांचा शोध व नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच भारताच्या समृद्ध ज्ञानपरंपरेशी संबंधित हस्तलिखितांचा राष्ट्रीय डिजिटल संग्रह निर्माण करून तो राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध करून देण्याचा केंद्र शासनाचा मानस आहे. यामध्ये हस्तलिखितांची मालकी ही संबंधित संस्था, ग्रंथालय अथवा खाजगी संग्राहक यांचीच राहणार आहे. परंतू ही हस्तलिखिते स्वखुशीने शासनाकडे सुपूर्द करावायाची झाल्यास शासन स्वीकारणार आहे. 

या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारांची महत्त्वपूर्ण भूमिका असून राज्यातील विविध सांस्कृतिक संस्था, विद्यापीठे, संशोधन संस्था, हस्तलिखित संग्रहालये तसेच विद्वान यांच्या सहकार्याने ही मोहीम राबविण्यात येणार आहे. 

महाराष्ट्र राज्यात या प्रकल्पासाठी खालील संस्था क्लस्टर केंद्र व स्वतंत्र केंद्र म्हणून कार्यरत राहणार आहेत, यामध्ये कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ, नागपूर क्लस्टर केंद्र, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था, पुणे क्लस्टर केंद्र, आनंद आश्रम संस्थान, पुणे - स्वतंत्र केंद्र, भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे स्वतंत्र केंद्राचा समावेश करण्यात आलेला आहे. 

महाराष्ट्र राज्यासाठी राज्य नोडल संस्था म्हणून पुराभिलेख संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांची नियुक्ती करण्यात आली असून राज्य नोडल अधिकारी म्हणून सुजितकुमार उगले, संचालक, पुराभिलेख संचालनालय तसेच अंजली ढमाळ, उपसंचालक, मराठी भाषा विकास संस्था, तथा अभिजात मराठी भाषा कक्षा, मराठी भाषा विभाग या सहनोडल अधिकारी म्हणून कामकाज करणार आहेत. 

या सर्वेक्षणासाठी ज्ञानभारतम् प्रकल्पांतर्गत "Gyan Bharatam" हे मोबाईल अॅप विकसित करण्यात आले असून त्याद्वारे हस्तलिखितांचे क्षेत्रीय मूल्यांकन, पडताळणी व दस्तऐवजीकरणाची प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. 

या मोहिमेच्या अनुषंगाने सर्व जिल्हाधिकारी यांना त्यांच्या जिल्ह्यात ज्ञानभारतम् प्रकल्पासाठी जिल्हा नोडल अधिकारी नियुक्त करणे, जिल्हास्तरीय समिती स्थापन करणे, तसेच मंदिरे, मठ, धार्मिक संस्था, विद्यापीठे, ग्रंथालये, शैक्षणिक संस्था व खाजगी संग्राहक यांना सर्वेक्षणात सहभागी करून घेणे याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. 

या सर्वेक्षण मोहिमेत शैक्षणिक संस्था, ग्रंथालये, संग्रहालये, संस्कृत पाठशाळा, धार्मिक संस्था, संशोधक, पारंपरिक पंडित, तसेच एनसीसी, एनएसएस स्वयंसेवक, विद्यार्थी व वारसा संवर्धन संस्था यांचा सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

 *****

मृद व जलसंवर्धन रील्स स्पर्धेला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ #जलसंधारणदिन #वॉकेथॉन२०२६ #वॉकफॉरवॉटर #रीलस्पर्धा #WalkForWater #WaterConservationDay...