आदर्श आचारसंहितेतील प्रस्ताव छाननी समितीमार्फतच सादर करावेत
छत्रपती संभाजीनगर, दि.22 (विमाका) : भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी 18 मे 2026 रोजी प्रसिद्ध केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांच्या दैवार्षिक निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे.
या निवडणूक कार्यक्रमात छत्रपती संभाजीनगर विभागातील नांदेड, उस्मानाबाद-बीड-लातूर, परभणी-हिंगोली तसेच औरंगाबाद-जालना या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांचा समावेश असून संबंधित मतदारसंघांमध्ये तात्काळ प्रभावाने आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
शासन परिपत्रकानुसार, आदर्श आचारसंहितेच्या कालावधीत एखाद्या प्रस्तावास मान्यता देणे अथवा कार्यवाही करण्याबाबत संबंधित विभाग अथवा कार्यालय आग्रही असल्यास, अशा प्रस्तावांबाबत मार्गदर्शन किंवा आचारसंहितेमधून सूट मिळण्यासाठीचे प्रस्ताव थेट भारत निवडणूक आयोग किंवा मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडे पाठवू नयेत. हे प्रस्ताव तपासणीसाठी महाराष्ट्र शासन मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली गठीत छाननी समितीमार्फतच सादर करावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत.
सदर सूचना सर्व अधिनस्त कार्यालय प्रमुखांच्या निदर्शनास आणून देऊन त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबत दक्षता घ्यावी, असे आवाहन विभागीय आयुक्त कार्यालय, छत्रपती संभाजीनगर प्रशासनाने केले आहे.
*****
No comments:
Post a Comment