Friday, March 13, 2026

 वृत्त क्रमांक 

मिनी सरस – रेणुका महोत्सवाचे उत्साहात उद्घाटन; महिलांच्या उत्पादनांना विक्रीचे व्यासपीठ

नांदेड, दि. १३ मार्च : उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, नांदेड यांच्या वतीने मिनी सरस – जिल्हास्तरीय रेणुका महोत्सव २०२६ अंतर्गत महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना विक्रीचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी भव्य विक्री व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन उत्साहात पार पडले.

वजीराबाद येथील मल्टीपर्पज हायस्कूल परिसरात आयोजित या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा उमेद अभियानाच्या जिल्हा अभियान संचालक मेघना कावली व जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ. पूनमताई राजेश पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा अभियान सहसंचालक तथा प्रकल्प संचालक (जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा) डॉ. संजय तुबाकले यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या प्रारंभी वसरणी येथील निवासी अंध विद्यालयातील विद्यार्थ्यांनी संगीत दिग्दर्शक पंकज शिरभाते यांच्या मार्गदर्शनाखाली स्फूर्तीदायक गीतांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच विनोदी वासरे यांनी केलेल्या बासरी वादनाने कार्यक्रमात रंगत आणली.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (नरेगा) अमित कुमार राठोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पापु व मयूरकुमार अंदेलवाड, पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. प्रविणकुमार घुले, कार्यकारी अभियंता संजय शिंदे, स्वीय सहाय्यक बालाजी नागमवाड, शुभम तेलेवाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मुंडे व त्यांची टीम तसेच आरोग्य विभागाच्या डॉ. प्रगती निलपत्रेवार उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संजय तुबाकले यांनी केले. कार्यक्रमाची रूपरेषा स्मिता मोहोरी यांनी मांडली तर सूत्रसंचालन इरवंत सूर्यकार व स्मिता मोहोरीर यांनी केले.

उद्घाटनप्रसंगी मनोगत व्यक्त करताना सौ. पूनमताई पवार यांनी महिलांनी तंत्रज्ञानाचा वापर करून अधिकाधिक उद्योग-व्यवसायाकडे वळावे, तसेच त्यांच्या प्रगतीसाठी आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे सांगितले.

यानंतर राज्य अभियान व्यवस्थापक तथा नांदेडचे पालक अधिकारी रामदास धुमाळ यांनी उमेद अभियानाचा इतिहास, उद्दिष्टे व वैशिष्ट्ये यांची माहिती दिली. महिलांना आर्थिक पाठबळ देऊन उपजीविका, लखपती दीदी उपक्रम तसेच स्वावलंबी विचारपीठ निर्माण करण्याचे काम उमेद अभियानातून होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

अध्यक्षीय समारोप करताना मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी सांगितले की, देशातील विविध राज्यांमध्ये ग्रामीण जीवनोन्नती अभियान विविध नावांनी राबविले जाते. महाराष्ट्रात ‘उमेद’ अभियानाद्वारे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवून त्यांना उद्योजकतेकडे वळविण्याचे काम करण्यात येत आहे.

या कार्यक्रमाचे आभार जिल्हा अभियान व्यवस्थापक द्वारकादास राठोड यांनी मानले.

या महोत्सवात नांदेड तसेच इतर जिल्ह्यांतील महिलांच्या सुमारे १०० विक्री स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. तसेच आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर व नेत्र तपासणी शिबिर यांसारखे सामाजिक उपक्रमही पुढील पाच दिवस आयोजित करण्यात येणार आहेत.

दुपारच्या सत्रात महिलांसाठी संगीत खुर्ची स्पर्धा घेण्यात आली, तर सायंकाळच्या सत्रात प्रसिद्ध शाहीर प्रा. गौतम पवार (भूकमारीकर) यांच्या शाहिरी प्रबोधन कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली.

हा मिनी सरस – रेणुका महोत्सव १८ मार्च २०२६ पर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षाच्या वतीने देण्यात आली.

000000



No comments:

Post a Comment

#घरगुतीएलपीजी चा तुटवडा नाही #महाराष्ट्रशासन #LPG #गॅससिलेंडर #पेट्रोल #डिझेल #इंधन