Friday, February 27, 2026

  वृत्त क्रमांक  

श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत “राष्ट्रीय विज्ञान दिन” उत्साहात साजरा

नांदेड,दि. २७ फेब्रुवारी:- भारताचे महान भौतिकशास्त्रज्ञ सी. व्ही. रमण यांनी २८ फेब्रुवारी १९२८ रोजी ‘रमण परिणाम’ हा महत्त्वपूर्ण शोध लावला. 

प्रकाशकिरणांचा पदार्थांशी होणारा परस्परसंवाद आणि त्यातून निर्माण होणाऱ्या विकिरणाचा अभ्यास हा या शोधाचा गाभा होता. या अद्वितीय संशोधनासाठी त्यांना १९३० मध्ये भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले. विज्ञान क्षेत्रात नोबेल पारितोषिक मिळवणारे ते पहिले भारतीय शास्त्रज्ञ ठरले.

विज्ञानाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचावे आणि विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा या उद्देशाने भारत सरकारने १९८६ साली २८ फेब्रुवारी हा दिवस “राष्ट्रीय विज्ञान दिन” म्हणून घोषित केला. तेव्हापासून हा दिवस देशभर विविध उपक्रमांद्वारे उत्साहात साजरा केला जातो. यंदाच्या राष्ट्रीय विज्ञान दिनाची थीम “Women in Science: Catalysing Viksit Bharat (विज्ञानातील महिला – विकसित भारताची प्रेरक शक्ती)” अशी निश्चित करण्यात आली आहे. विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील महिलांच्या योगदान व नेतृत्वाचा गौरव हा या थीमचा केंद्रबिंदू आहे.

त्या अनुषंगाने श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नांदेड येथे २७ फेब्रुवारी २०२६ रोजी “राष्ट्रीय विज्ञान दिन” उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे व वक्ते म्हणून लेखक व समीक्षक शिवाजीराजे पाटील उपस्थित होते. तसेच संस्था व्यवस्थापन समितीचे सदस्य धिरज बीडवे, संस्थेचे प्राचार्य श्री कंदलवाड व्ही. डी., सर्व कर्मचारी व प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. संस्थेतील शिल्प निदेशिका सौ. हिसवनकर एम. आर. यांनी प्रास्ताविक करताना डॉ. सी. व्ही. रमण यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला व विज्ञानाचे महत्त्व अधोरेखित केले. प्रमुख वक्ते शिवाजीराजे पाटील यांनी दैनंदिन जीवनातील विज्ञानाचे स्थान स्पष्ट करत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून त्यांनी प्रशिक्षणार्थ्यांशी खेळीमेळीचा संवाद साधला. प्रशिक्षणार्थ्यांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोतदार डी. ए. (रा. से. योजना कार्यक्रमाधिकारी) यांनी केले. प्राचार्य श्री कंदलवाड व्ही. डी. यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

०००००




No comments:

Post a Comment

  नवी मुंबई हिंद दी चादर श्री गुरू तेगबहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम निमित्ताने खारघर येथील कार्यक्रम #हिंददीचादर #श्रीगुर...