Sunday, March 15, 2026

वृत्त क्रमांक 321

छत्रपती शिवराय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर अत्यंत संस्कारी महापुरुष – निळकंठ पाचंगे

नांदेड दि.१५ मार्च: छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अत्यंत संस्कारी महापुरुष होते. या दोन्ही महान व्यक्तिमत्त्वांचे चरित्र आपल्याला संयम आणि मूल्याधिष्ठित जीवन जगण्याची शिकवण देते. महामानव घडविण्यात माता जिजाऊ आणि माता भिमाई यांचे अमूल्य योगदान असल्याचे प्रतिपादन परिसंवादाचे अध्यक्ष तथा कोषागार अधिकारी निळकंठ पाचंगे यांनी केले.

नांदेड ग्रंथोत्सवाच्या निमित्ताने दि. १४ मार्च रोजी आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्वराज्य संकल्पना’ या विषयावरील परिसंवादाच्या अध्यक्षीय समारोप प्रसंगी ते बोलत होते.

परिसंवादात बोलताना प्रा. राजेंद्र गोणारकर म्हणाले की, मोठी माणसे सर्वांसाठी स्वप्ने पाहतात आणि ती प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करतात. छत्रपती शिवाजी महाराज हे लोकाना वाटणारे राजे होते. त्यांच्या राज्यात सर्वांना समानतेची वागणूक दिली जात होती.

दुसरे वक्ते प्रा. संतोष देवराये यांनी सांगितले की, शिवरायांच्या स्वराज्यात जात-वर्णभेद नव्हता. सतराव्या शतकातील राजेशाही व्यवस्थेत लोकशाही मूल्यांची स्थापना करणारे ते पहिले राजे होते. महामानव कोणत्याही एका जातीपुरते मर्यादित नसतात, ते सर्व समाजाचे असतात. शिवरायांचे विचार कृतीत आणणे हे आपले कर्तव्य आहे. शिवरायांच्या स्वराज्याचा विचार भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे नेला आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविण हंबर्डे यांनी केले, तर आभार जिल्हा ग्रंथालय अधिकारी अ. वा. सूर्यवंशी यांनी मानले.

00000



No comments:

Post a Comment

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना - २०२६’ ची अंमलबजावणी अंतिम टप्प्यात #शेतकरीकर्जमुक्ती #कर्जमुक्तीयोजना2026 #महाराष्...