Tuesday, July 9, 2024

लेख

 10 जुलै- राष्ट्रीय मत्स्यशेतकरी दिवस  

भारताच्या एकूण जीडीपीच्या 1टक्के व कृषी जीडीपीच्या 5 टक्के वाटा मत्स्योत्पादनामार्फत येतो आणि हे सर्व शक्य झाले आहे केवळ आणि केवळ एका व्यक्तीमुळे ज्यांना भारतातील नीलक्रांतीचे जनक म्हणजेच फादर ऑफ ब्लू रेवोल्युशन  डॉ. हिरालाल चौधरी. 

भारताचा पूर्व उत्तरी हिस्सा हा त्याच्या विशिष्ट संस्कृती व समुदायामुळे प्रसिद्ध आहे याच भागातील एक राज्य आसाम; खरंतर हे राज्य चहाच्या मळ्यांसाठी सुप्रसिद्ध आहे. आसाममधील एका ठिकाण शिलाटी येथे सन 1921 मध्ये डॉ.हिरालाल चौधरी यांचा जन्म झाला.शिलाटी हे ठिकाण सध्या बांगलादेशात श्रीहट्टा नावाने ओळखले जाते. श्रीहट्टामधील सुरमा घाटीला लागून असलेल्या कुबाजपुर या छोट्या गावात श्री गिरीश चंद्र चौधरी या सिविल इंजिनियरच्या घरात 21 नोव्हेंबर 1921 रोजी यांचा जन्म झाला.अत्यंत प्रतिभाशाली विद्यार्थी असलेले हिरालाल चौधरी यांनी सन 1941 मध्ये आपले बीएससी शिक्षण पूर्ण केले. सन 1943 मध्ये कलकत्ता विद्यापीठाच्या अंतर्गत त्यांनी झूलॉजी या विषयात एम एस सी पूर्ण केले. त्यानंतर सिलट येथील माणिकचंद महाविद्यालयात जैवविज्ञानिक विषयाचे प्राध्यापक म्हणून नोकरी केली.सन 1947 मध्ये भारत पाक फाळणीच्यादरम्यान त्यांना नोकरी गमवावी लागली. 

सध्याच्या बांग्लादेशात स्थीत असलेले श्रीहट्टा हे तत्कालीन पुर्व पाकिस्तानात येत असे.सन 1948 मध्ये ते सेंट्रल इन्लॅंड फिशरीज रिसर्च इंस्टीट्युट, बरकपुर येथे कनिष्ठ संशोधन सहाय्यक या पदावर रुजु झाले. एके दिवशी बरकपूर येथे रहात असताना गंगेच्या किनारी आढळणाऱ्या मासळीचे फुगलेले पोट दिसून आले ते पोट दाबताच त्यातुन पारदर्शी अंडे बाहेर आले. निरीक्षणाकरीता त्यांनी ही अंडी एका भांड्यात त्यांनी जमा केली आणि निरीक्षणादरम्यान डॉ.चौधरी यांना कार्प माशांच्या प्रेरित प्रजननाची संकल्पना सुचली. 

कार्प प्रजाती आशिया व युरोप खंडातील मूळ निवासी मत्स्य प्रजाती मानली जाते.तलावातील बंदिस्त प्रणाली कार्प प्रजातीच्या प्रजननासाठी प्रतिकुल असल्याने अशा वातावरणाचा परिणाम माशाच्या पियुषिका ग्रंथी व जननग्रंथीवर होत असे.या दोन्ही ग्रंथीच्या अपु-या स्त्रावामुळे माशाचे बंदिस्त प्रणालीत प्रजनन होत नसे.त्याकाळात कार्प प्रजातीच्या संवर्धनाकरीता संपुर्णपणे नैसर्गिक बिजावर अवलंबुन राहावे लागत असे. 

मत्स्यबीज उत्पादनाची समस्या सोडविण्याकरीता प्रेरीत प्रजननाच्या तंत्रज्ञानाचा शोध लागला.या शोधामुळे भारतात आज रोजी मोठ्याप्रमाणात भुजलाशयिन मत्स्योत्पादन घेतले जाते.भूजलाशयीन मत्स्यप्रजातीमध्ये कार्प मासळीला जागतिक बाजारपेठेत अनन्य साधारण महत्व आहे.

सर्वप्रथम हा प्रयोग ‘स्मॉल मड गोबी प्रजातीच्या मास्यंवर करण्यात डॉ. चौधरी यांना यश मिळाले.त्याच वेळी सन 1950 मध्ये त्यांची वरीष्ठ संशोधन साहाय्यक या पदावर ‘सेंट्रल इंनलॅंड फिशरीज रिसर्च इंस्टीट्युटच्या पॉंड कल्चर सेक्शन मध्ये पदोन्नतीने नियुक्ती झाली.जेथे ते डॉ. अलीकुन्ही यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत होते. डॉ.अलीकुन्ही यांनी डॉ.चौधरी यांना त्यांच्या प्रयोगाचे कार्य करण्याकरीता नेहमी प्रेरणा दिली त्याचबरोबर अमेरिकेतील अबुरान युनिव्हर्सिटीतील मत्स्य प्रेरीत प्रजनन या विषयात पारंगत असलेल्या जगभरात प्रख्यात डॉ.स्विंगल यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत त्यांना अमेरिकेत पाठवले. सन 1955 मध्ये ptutory gland extract (पियुषिका ग्रंथीच्या अर्क) चा मत्स्य प्रजननावर होणारा परिणाम या विषयाच्या शोधनिबंध लिहिला व या निबंधाच्या साहाय्याने अमेरिकेतील अबुरान युनिव्हर्सिटीमधून मत्स्यपालन व्यवस्थापन या विषयातून मास्टर ऑफ सायन्स ही पदवी मिळवली व त्यानंतर ते भारतात परतले.

 भारतात परतल्यानंतर सन 1955-56 मध्ये त्यांनी देशातील काही मुळनिवासी प्रजातींच्या मास्यांचे प्रेरीत प्रजनन यशस्वीरित्या  पुर्ण केले.  पुढे डॉक्टर आलीकुन्ही यांनी सेंट्रल इंनलॅंड फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट येथे प्रेरित प्रजानाद्वारे मत्स्यबीज निर्मिती या विषयावर ओरिसा या ठिकाणी एक मोठा प्रकल्प राबवला व 10 जुलै 1957 रोजी या दोन शास्त्रज्ञांना प्रेरीत मत्स्यप्रजजननाच्या प्रयोगात यश मिळाले व त्यानंतर भारतातील मत्स्य शेतीचा चेहरा मोहरा बदलला.डॉ.हिरालाल चौधरी यांना मिळालेले हे यश भारतातील नीलक्रांतीची सुरुवात ठरली.

प्रायोगिक तत्वावर करण्यात आलेल्या प्रेरीत प्रजननातून तयार झालेल्या मत्स्य जिऱ्यांना यशस्वीरित्या अर्ध बोटुकली व त्यानंतर बोटूकली आकारापर्यंत विकसित करण्यात आले.सन 1958 मध्ये डॉ.हिरालाल चौधरी यांनी जगात सर्वप्रथम लेबिओ, सि-हीनस व कटलासारख्या मत्स्य प्रजातींचे यशस्वीरित्या प्रजनन करून मोठ्या प्रमाणात मत्स्य बीज निर्मिती करण्याची संकल्पना जगापुढे मांडली. एवढेच नव्हे तर हे तंत्र मत्स्यकास्तकारांपर्यंत तातडीने पोहचवण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात तेथील स्थानिक मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिका-यांना या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले व त्यांचा मदतीने अत्यंत अल्प कालावधीत हे तंत्रज्ञान सर्वसामान्य मत्स्यकास्तकारांपर्यंत पोहविण्याचे कार्य केले.

डॉ.चौधरी यांच्या यशस्वी प्रयोगामुळे भारतातील भूजलाशयिन मत्स्य उत्पादनात मोठ्या प्रमाणात प्रगती झाली आहे.डॉ.हिरालाल चौधरी यांची पुढे पदोन्नती मत्स्य व्यवसाय विस्तार अधिकारी या पदावर 1959 मध्ये झाली.त्यांना कलकत्ता युनिव्हर्सिटीने 1961 मध्ये आचार्य पदवी प्रदान केली.या पदवी अभ्यासक्रमात त्यांनी ‘पियुषिका ग्रंथी अर्काचा मासळीच्या प्रजननावर होणारा परिणाम हा शोध निबंध लिहिला.त्यानंतर सन 1971 ते 1975 मध्ये त्यांनी भुवनेश्वरमध्ये स्थित सेन्ट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फ्रेश वॉटर एक्वाकल्चर येथे कार्य केले.

1975 मध्ये पॅसिफिक सायन्स काँग्रेस दरम्यान जपानचे प्रख्यात डॉ. कुरोनुमा यांनी त्यांना फादर ऑफ इंड्युस्ड ब्रीडिंग हा किताब बहाल केला.त्याचबरोबर डॉक्टर चौधरी यांना गॅमा-सिग्मा-डेल्टा पुरस्कार,चंद्रकला होरा मेमोरियल गोल्ड मेडल,रफी अहमद किदवाई,गोल्डन की,वर्ल्ड ॲक्वाकल्चर आवार्ड इत्यादी अनेक पुरस्काराने सन्मानित केले गेले.

1976 मध्ये स्वेच्छा निवृत्ती घेतल्यावर डॉ.चौधरी यांनी फूड अँड एग्रीकल्चर ऑर्गनायझेशन ऑफ युनायटेड नेशन (FAO), साउथ ईस्ट एशियन फिस्टीज डेव्ह डेव्हलपमेंट सेंटर (SEAFDEC) सारख्या अनेक महत्त्वपूर्ण संस्थान बरोबर काम केले.डॉ.हिरालाल चौधरी यांना मिळालेले यश भारतातील नीलक्रांतीची सुरुवातीस कारणीभुत ठरले.सन 2001 मध्ये डॉ.हिरालाल चौधरी यांच्या कार्यास सन्मानित करण्यासाठी भारत सरकारद्वारे 10 जुलै हा दिवस “राष्ट्रीय मत्स्य-शेतकरी दिवस” म्हणून घोषित करण्यात आला.अशा महान व्यक्तीचे कार्य मत्स्य व्यवसायाशी निगडित प्रत्येक व्यक्तीच्या चीरस्मरणी राहावे म्हणून आजचा दिवस साजरा केला जातो. 

    अमिता रा.जैन

सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, अमरावती







 वृत्त क्र. 570  

Monday, July 8, 2024

 वृत्त क्र. 569 

जिल्हाधिकारी कार्यालयात आज पेन्शन अदालत  

नांदेड, दि. 8 जुलै :- नांदेड जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणीचे निवारण करण्यासाठी जुलै 2024 महिन्याच्या दुसऱ्या मंगळवार 9 जुलै 2024 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. सेवानिवृत्त झालेले अधिकारी कर्मचारी यांनी अडचणी निवारण्यासाठी पेन्शन अदालतीच्या दिवशी उपस्थितीत राहून तक्रारीचे निवेदन द्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.

000000

 वृत्त क्र. 568 

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य, गळीतधान्य पिक स्पर्धा खरीप हंगाम 

नांदेड, दि. 8 जुलै :- खरीप हंगाम सन 2024 पिक स्पर्धेसाठी जास्तीतजास्त जिल्ह्यातील शेतकरी बांधवानी सहभाग घ्यावा. या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी जिल्ह्यातील शेतकरी बांधवाना केले आहे. 

राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्याकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते, अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव केल्यास, त्यांचे मनोबल वाढण्यास मदत होऊन अधिक उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेवून राज्यात कृषि विभागामार्फत पिकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. 

वंचित, दुर्लक्षित तसेच पौष्टीक तृणधान्य पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादन तंत्रज्ञान वाढ होण्याची आवश्यकता विचारात घेऊन तसेच जास्तीत जास्त शेतकरी पिक स्पर्धामध्ये सहभागी होतील या दृष्टीकोनातून खरीप हंगाम पीक स्पर्धा तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर राबविण्यात येत आहे. त्यानुसार कृषि विभागामार्फत खरीप हंगाम सन 2024 मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी मूग,उडीद,ज्वारी,बाजरी,तूर व सोयाबीन या  पिकासाठी पिक स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. 

मूग, उडीद, ज्वारी, बाजरी, तूर व सोयाबीन ही पिक स्पर्धेतील पिके आहे.  या स्पर्धेसाठी पात्रतेच निकष पुढीलप्रमाणे आहेत. स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावे जमीन असणे व जमीन तो स्वतः कसत असणे आवशक्य आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत भाग घेता येईल. पीकस्पर्धामध्ये सहभागी लाभार्थीच्या स्वतःच्या शेतावर त्या पिकाखाली किमान ४० आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. 

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र -अ). ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन. 7/12, 8-अ उतारा. जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास). पिकस्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबधित 7/12 वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा. बँक खाते चेक / पासबुक पहिल्या पानाची छायांकित प्रत ही आवश्यक कागदपत्रे आहेत.  

अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख

खरीप हंगामामध्ये पिकस्पर्धेची अर्ज दाखल करण्याची तारीख खालील प्रमाणे राहील. मूग,उडीद 31 जुलै. ज्वारी,बाजरी,तूर व सोयाबीन - 31 ऑगस्ट. अर्ज दाखल करण्याच्या तारखेच्या दिवशी शासकीय सुट्टी असल्यास त्यापुढील शासकीय सुट्टी नसलेली तारीख गृहीत धरण्यात यावी. तालुकास्तर, जिल्हास्तर व राज्यस्तरावरील पीक स्पर्धा निकाल – प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पीक स्पर्धा विजेते निवडण्यात येतील.

स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क

पीकनिहाय सर्वसाधारण गटासाठी रक्कम 300 रुपये राहील व आदीवासी गटासाठी रक्कम 150 रुपये राहील. 

बक्षिस स्वरूप

सर्वसाधारण व आदिवासी गट बक्षिसाठी रुपये पुढीलप्रमाणे आहेत. स्पर्धा पातळी तालुका पातळीवर पहिले 5 हजार रुपये, दुसरे 3 हजार रुपये, तिसरे 2 हजार रुपये. जिल्हा पातळीवर पहिले 10 हजार रुपये, दुसरे 7 हजार रुपये, तिसरे 5 हजार रुपये तर राज्य पातळीवर पहिले 50 हजार रुपये, दुसरे 40 हजार रुपये, तिसरे 30 हजार रुपये राहिल, असेही जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

00000

 वृत्त क्र. 567 

मुख्यमंत्री वयोश्री योजना ज्येष्ठांना आधार, अर्ज करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाचे अवाहन 

नांदेड, दि. 8 जुलै :- सामाजिक  न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्यात आलेली आहे. ज्येष्ठ नागरिकांना या योजनेसाठी लातूर विभागातील जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी अर्ज करावेत व योजनेचा लाभ घ्यावा, असे अवाहन लातूर विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार यांनी केले आहे. 

राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनदिन जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांना सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वाढत्या वयानुसार येणारे अपंगत्व, अशक्तपणा, व आजार यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक असलेले चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक, व्हिलचेअर, फोल्डींग वॉकर, कमोड खूर्ची, नि-ब्रेस, लंबर बेल्ट,सर्वाइकल कॉलर इ. सहाय्य साधने / उपकरणे खरेदी करण्यासाठी तसेच मन:स्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र इ. द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ आबाधित ठेवण्यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये डीबीटी प्रणाली द्वारे निधी वितरीत करण्यात येणार आहे. 

या योजनेच्या अधिक माहितीसाठी लातूर विभागातील लातूर, नांदेड, धाराशिव व हिंगोली जिल्ह्यातील समाज कल्याण, विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयांशी संपर्क साधण्याचे अवाहन लातूर विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार यांनी केले आहे.

0000

 वृत्त क्र. 566 

बिडी कामगारांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती योजना 

लाभासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन 

नांदेड, दि. 8 जुलै :- येत्या शैक्षणिक वर्षात 2024-25 साठी आर्थीक सहाय्य योजनेसाठी महाराष्ट्रातील चुनखडी, डोलोमाईट, बिडी, खनिज खान कामगारांच्या मुलांना मान्यता प्राप्त शैक्षणिक संस्थेमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुला, मुलींसाठी आर्थिक योजने अंतर्गत सहाय्य योजना भारत सरकारने शिष्यवृत्तीसाठी पहिली ते चौथी, पाचवी ते दहावी, अकरावी ते बारावी, तसेच आय.टी.आय, पॉलीटेक्निक, पदवी अभ्यासक्रम (बि.एस.सी, कृषीसह) बि.ई, एम.बी.बी.एस., एम.बी.ए यांना वार्षिक अर्थसहाय्य राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल https://scholaarship.gov.in वर शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 ऑगस्ट पर्यंत आहे. 

प्रिमॅट्रिकसाठी आहे. आणि पोष्ट मॅट्रिकसाठी 31 ऑक्टोबर पर्यंत आहे. ऑनलाईन अर्ज आणि पात्रता माहिती राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर प्रदर्शित केली आहे. अर्जाची पडताळणी करुन घेण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांची आहे, अशी माहिती वैद्य बिडी वर्कर वेलफेअर फंड डिस्पेंसरी नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

00000

 वृत्त क्र. 565 

सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी

आज व उद्या रोजगार मेळाव्याचे आयोजन 

नांदेड, दि. ८ जुलै :- जिल्ह्यातील सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड व ग्रामीण टेक्नीकल ॲड मॅनेजमेंट कॅम्पस विष्णुपूरी नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार 9 व बुधवार 10 जुलै 2024 रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

हा मेळावा ग्रामीण टेक्नीकल ॲड मॅनेजमेंट कॅम्पस विष्णुपूरी नांदेड येथे आयोजित करण्यात आला आहे.  या रोजगार मेळाव्यामध्ये नामांकित कंपन्याकडून मुलाखत घेण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी 910 जुलै रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत बायोडाटा, शैक्षणिक प्रमाणपत्र, झेरॉक्स पासपोर्ट आकाराचे छायाचित्र आदी कागदपत्रे सोबत आणावेत. या मेळाव्यास उपस्थित राहून संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्राच्या सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.

00000

  वृत्त क्र.100                                                                                                                       दि.06-...