Friday, February 9, 2024

विशेष लेख

 मा.मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त लेख

 

*मंत्री अतुल सावे*

 

संवेदनशील मनाचा नेता 

     राज्याच्या विकासाबाबत दूरदृष्टी, तत्पर निर्णयक्षमता, बदलत्या काळानुसार धोरण राबविणारा संवेदनशील नेता राज्याच्या सर्वोच्च स्थानी बसल्यास राज्याचा चेहरामोहरा बदलण्यास वेळ लागत नाही. राजकारणात सामान्य लोकांना आपला वाटेल असा राजकारणी सापडणे दुरापास्त. सामान्यातील सामान्य माणूस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद साधू शकतो. त्या संवाद साधणाऱ्या प्रत्येकाला हा माणूस आपलाच आहे, अस वाटत हे खरे मुख्यमंत्र्यांचे मोठेपण आहे. सामान्य शेतकरी कुटुंबातून पुढे आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना परिस्थितीची पुरेपूर जाणीव आहे. विशेषत: सामान्य नागरिकांबद्दल आणि त्यांच्या कामांबद्दल ते स्वतः लक्ष घालून तळमळीने सगळी कामे करून घेतात. सामान्य नागरिकाला समोर ठेवूनच राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्धतेने आमचे सरकार काम करीत आहे.   

      मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गृहनिर्माण व इतर मागास बहुजन कल्याण विभागात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी परदेशातील उच्च शिक्षणाच्या शिष्यवृत्ती विद्यार्थी संख्या 10 वरून 75 इतकी वाढ करण्यात आली आहे. उच्चशिक्षण घेणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू करण्यात आली आहे. इतर मागास व विशेष मागास प्रवर्गासाठी मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत तीन वर्षात दहा लाख घरे बांधण्यासाठी 12 हजार कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. राज्यातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागासवर्ग या प्रवर्गातील मॅट्रिकोत्तर व्यावसायिक शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी 100 विद्यार्थी क्षमतेचे मुलांसाठी एक व मुलींसाठी एक याप्रमाणे 36 जिल्ह्यांच्या ठिकाणी 72 शासकीय वसतिगृहे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याच्या इतिहासात ओबीसी विभागासाठी सर्वोच्य अशी 8252 कोटी रुपयांची विक्रमी तरतुद केली आहे.

        म्हाडाच्या  56 वसाहतीतील सहकारी गृहनिर्माण संस्थांकडील सन १९९८ ते २०१८ या कालावधीतील वाढीव सेवा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.यामुळे तब्बल 384 कोटींचा वाढीव सेवा शुल्क माफ होणार असून या निर्णयामुळे मुंबईतील लाखो रहिवाशांना दिलासा मिळाला आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणांतर्गत (एसआरए) पुनर्वसन करण्यात आलेली घरे यापुढे पाच वर्षांनी विकता येणार आहेत.राज्यातील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणांतर्गत पुनर्वसन करण्यात येणारी घरे यापूर्वी १० वर्षांनंतर विकता येण्याचा नियम होता. हा नियम बदलून ५ वर्ष करण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील रे नगर, कुंभारी येथील असंघटित क्षेत्रातील लाभार्थ्यांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ३० हजार घरकुलाचा प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील १५,०२४ घरांचे लोकार्पण दि.१९ जानेवारी २०२४ रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. हा गृह प्रकल्प देशातील सर्वात मोठा गृहप्रकल्प असून असंघटित क्षेत्रातील 30 हजार कामगारांच्या घरकुलाच स्वप्न यामुळे साकार झाले आहे. राज्यात मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मा.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी यापुढेही अशीच निर्णयाची वाटचाल असणार आहे. एक समृद्ध महाराष्ट्र घडवायचा आहे. 

 

     राज्याच्या हिताचे धडाकेबाज निर्णय आणि कृतीतून कायमच सर्वाच्या आदरस्थानी असलेले लाडके मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब यांचा आज वाढदिवस...। त्यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा...!

 

    ****

विशेष लेख

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संवदेनशील मनाचे कृतीवंत व्यक्त‍िमत्व

-   आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत

राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे.. अत्यंत कर्तबगार.. संवेदनशील मनाने भरलेले व्यक्तीमत्व. कुठलाही मुख्यमंत्री पदाचा बडेजाव न करता.. एक सामान्य कार्यकर्ता. त्यांच्यातील कार्यकर्ता इरशाळवाडी दुर्घटनेच्या वेळी महाराष्ट्राने पाहिला. असे हे महाराष्ट्रातील साडेबारा कोटी जनतेच्या सेवेत समर्पित असलेले व्यक्तीमत्व.. या कृतीवंत नेत्याचा आज वाढदिवस. त्यांना जनतेची सेवा करण्यासाठी तुळजा भवानी भरभरून आयुष्य देवो.. त्यांना सुदृढ, निरोगी शरीर लाभो .. अशी प्रार्थना मी त्यांच्या वाढदिवसा दिवशी व्यक्त करतो.

मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या संवेदनशील मनाचे मला नेहमी दर्शन घडले आहे. जनतेच्या सेवेप्रती कटीबद्ध असलेल्या या नेत्याने मला ईश्वरीय सेवा करण्याचे खाते दिले. रूग्ण कल्याण व त्यांची सेवा करण्याचे काम माझ्या हातून घडत आहे. ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळेच.. खात्याचा कारभार बघत असताना वेळोवेळी मला त्यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले. कुठेही अडचण आली, तर त्यांच्याकडून ती चुटकीसरशी सोडविल्या जाते, याचा प्रत्यय मला बऱ्याच वेळा आला. जनतेच्या आरोग्याप्रती एखादा निर्णय घेणे आवश्यक असल्याचे लक्षात आले, तेव्हा मला त्यांच्याकडून पाठींबा मिळतो. ‘बिनधास्त काम करा.. मी आहे.’ हे त्यांचे शब्द ऐकले की.. काम करण्याची नवीन ऊर्मी येते.

आरोग्य खात्याच्या माध्यमातून मला रूग्णसेवा करण्याची संधी मिळाली आहे. राज्यातील सर्व नागरिकांना विभागांतर्गत असलेल्या सर्व शासकीय रूग्णालयांमध्ये उपचार विनाशुल्क करण्याचा ऐतिहासिक निर्णय आपण घेतला. गरीबांसाठी संजीवनी ठरलेली महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा विस्तार  करण्यात आला. योजनेचे दीड लाखाचे विमा कवच पाच लाख रूपयापर्यंत वाढविण्यात  येत आहे. त्यामुळे पाच लाख रूपयापर्यंतचे उपचार राज्यातील रूग्णांना मिळणार आहे. एवढेच नव्हे, तर या योजनेच्या पॅनलमध्येही रूग्णालयांची संख्या वाढविण्यात  येत आहे.  किडनी, कर्करोग, हृदयरोग अशा दुर्धर आजारांनी बाधीत असणाऱ्या रूग्णांना या योजनेतून उपचाराचा लाभ मिळत आहे. त्यामुळे मृत्यूच्या दाढेतूनही बरेच रूग्ण परत येत आहे.  हे ईश्वरीय कार्यच आहे, हे कार्य माझ्या हातून मुख्यमंत्री शिंदे साहेबांमुळे घडत आहे.

आजार होण्यापूर्वीच निदान झाले पाहिजे, त्यासाठी आरोग्य विभागाने उपाय योजना केल्या पाहिजे, असा नेहमीच त्यांचा अट्टाहास असतो. आजार झाल्यावर उपचार केल्यापेक्षा आजार न होण्यासाठी काळजी घेणे,  आरोग्य सांभाळणे महत्वाचे आहे.  त्यामुळे  आरोग्य खात्याच्या माध्यमातून समाजातील सर्व वयोगटातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याचा महत्वपूर्ण निर्णय आपण घेतला. सर्वात आधी  घरातील महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यासाठी ‘माता सुरक्षित, तर घर सुरक्षित’ अभियान राबविण्यात आले. यामध्ये राज्यभरातील जवळपास 4 कोटी 39 लाख महिलांची संपूर्ण आरोग्य तपासणी करून गरजेनुसार आवश्यक असलेल्या महिलांवर उपचार करण्यात आले आहेत.

महिलांच्या तपासणीनंतर लहानापासून ते किशोरवयीन मुलांपर्यंत आरोग्य तपासणी ‘जागरूक पालक.. सुदृढ बालक..’ अभियान राबविण्यात आले. या अभियानाच्या माध्यमातून 0 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. भविष्यात होऊ शकणाऱ्या आजारांचा शोध घेवून आवश्यक उपचारही करण्यात आले. या दोन्ही अभियानातून समाजातील मोठ्या वर्गाची आरोग्य तपासणी पूर्ण झाली.

मात्र अजूनही कुटूंबाचा आधारस्तंभ असलेल्या समाजातील महत्वाच्या घटकाची आरोग्य तपासणी राहली असल्याची खंत होतीच.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ‘आजार होण्यापेक्षा न होण्यासाठी काळजी करणारा’ संवेदनशीलपणा आठवला.. आणि 18 वर्षावरील पुरूषांच्या आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘निरोगी आरोग्य तरूणाईचे.. वैभव महाराष्ट्राचे’ अभियान सुरू करण्यात आले. या अभियानातून पुरूषांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. राज्यातील सर्व वयोगटातील नागरिकांची आरोग्य तपासणी पूर्ण झाल्यानंतर खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आजार होण्यापूर्वीच निदान करण्यासाठी काम करण्याचे दिलेले निर्देश प्रत्यक्षात आल्याचे समाधान मिळेल.

मा. मुख्यमंत्री यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे भविष्यातही विभगाच्या माध्यमातून मोठे निर्णय घेण्याचे धाडस करणार आहे. कर्करोगाचे निदान लवकर होण्यासाठी कॅन्सर व्हॅन, कर्करोगावर केमोथेरपी उपचार मिळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात डे केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहे. जनतेच्या  मुख्यमंत्री शिंदे साहेबांचे काम म्हणजे.. जे मनात ते कर्तृत्वात.. त्यामुळे त्यांनी जे ठाणलं.. ते प्रत्यक्षात येणारच. ही त्यांची टॅगलाईनच बनली आहे. अशा या मोठ्या मनाच्या.. जनतेच्या सेवेप्रती समर्पित असणाऱ्या करारी व्यक्तीमत्वाला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा देतो. त्यांच्याकडून असेच जनतेची सेवा घडत राहण्यासाठी निरोगी, सुदृढ आरोग्य त्यांना लाभो, ही प्रार्थना व्यक्त करतो..

0000

विशेष लेख

 

(मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्या जन्मदिनानिमित्त मा. मंत्री, पाणी पुरवठा व स्वच्छता यांचा विशेष लेख) 

मार्गदर्शक व्यक्तिमत्व श्री. एकनाथ संभाजीराव शिंदे 

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे म्हणजे राज्याला लाभलेले एक खंबीर, संवेदनशील व दिलदार मनाचे नेतृत्व होय... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्याची वाटचाल ही प्रगतीशील राज्याच्या दिशेने होत आहे. मुख्यमंत्री शिंदे हे एक उत्कृष्ट प्रशासक, एक उत्कृष्ट टीम लिडर व दूरदृष्टी असणारे नेते आहेत. त्यांच्या खंबीर मार्गदर्शनाखाली राज्याची तसेच माझ्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाची कामगिरी सुधारत आहे.

गरीब परिस्थितीतही त्यांनी शिक्षण घेत सार्वजनिक जीवनात काम करण्यास सुरूवात केली. ठाण्यात धर्मवीर आनंद दिघे यांच्यासोबत कार्यकर्ता म्हणून काम करत त्यांनी सामाजिक व राजकीय जीवनात आपल्या कामाचा ठसा उमटवला. पदापेक्षा कामाला महत्व देत त्यांनी तळागाळातील नागरिकांपर्यंत शासनाच्या सोयीसवलती पोचविण्याचे काम अविरत सुरू ठेवले. यापूर्वीच्या काळात नगरविकास, सार्वजनिक बांधकाम या विभागाचे मंत्री,  त्यानंतर गेल्या दोन वर्षापूर्वी सत्ता बदल झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री पद मिळाल्यानंतरही श्री. एकनाथ शिंदे यांच्या स्वभावात अथवा वागण्यात कोणताही बदल घडलेला दिसत नाही. पूर्वी जसे ते प्रत्येक कार्यकर्त्यासोबत वागत होते आताही ते त्याच प्रमाणे प्रत्येक कार्यकर्त्याला वागविताना दिसतात. तळागाळातून आलेले हे नेतृत्व अजूनही स्वतःला कार्यकर्ता समजतात.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत पूर्वीपासून काम करत असताना सतत त्यांचे मार्गदर्शन मिळत आहे. विविध खात्याचे मंत्री पद सांभाळताना त्यांचे नेहमीच मोलाचे मार्गदर्शन मिळाले आहे. त्यामुळे मी ज्या ज्या खात्यात काम केले आहे तेथे एक वेगळा ठसा उमटविता आला आहे. सध्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचा मंत्री म्हणून काम करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सदैव सहकार्य मिळत आहे. राज्यातील जनतेला स्वच्छ व पुरेसा पाणी पुरवठा व्हावा, यासाठी विभागाच्या माध्यमातून सदैव वेगवेगळे निर्णय घेण्यात येत आहेत. केंद्र शासनाच्या हरघर नळ, हरघर जल या उद्देशानुसार राज्यात जलजीवन मिशनची मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. राज्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी पोचविण्यासाठी युद्धपातळीवर काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे जलजीवन मिशनच्या कामामध्ये राज्यातील काम हे देशपातळीवर अव्वल स्थानावर आहे. राज्यात जलजीवन मिशनअंतर्गत 43398 योजनांची कामे प्रगतीपथावर आहेत. 99 टक्के कामांचे कार्यादेश दिलेले आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ही कामे होत आहेत.

जलजीवन मिशनअंतर्गत राज्यातील 80 हजार 459 शाळांमध्ये (98%) नळजोडणी पूर्ण करण्यात आली आहे. तर 8847 अंगणवाड्यांमध्येही पाण्याचे नळ जोडणी देण्यात आले आहे. हरघर जल योजनेद्वारे राज्यातील 19 हजार 60 गावांना 100 टक्के घरगुती नळ जोडणी पूर्ण करण्यात आली आहे. तसेच 40 हजार 166 गावांचे कृती आराखड्यांची निर्मिती करण्यात आली आहेत.

पाणीपुरवठ्या बरोबरच स्वच्छ महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नेहमीच आग्रही राहिले आहेत. त्यासाठी ते स्वतः रस्त्यांवर उतरून स्वच्छता मोहिमा राबवित आहेत. सध्या स्थानिक स्वराज्य पातळीवर सुरू असलेली ही मोहिम राज्यभर चळवळ म्हणून वाढेल, अशी मला आशा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वच्छ महाराष्ट्र या उपक्रमात राज्याचा स्वच्छता विभागही सहभागी आहे. राज्यातील ग्रामीण भागातील स्वच्छतेसाठी हागणदारी मुक्त उपक्रम, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन/गोबरधन प्रकल्प, मैला गाळ व्यवस्थापन याबरोबरच सार्वजनिक/वैयक्तिक शौचालये निर्माण करणे हे उपक्रम राबविण्यात येत आहेत. आतापर्यंत राज्यातील सुमारे 70 टक्के गावे ही हागणदारीमुक्त अधिक (ओडीएफ प्लस) झाली आहेत. तसेच घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गत 32950 गावांचे आराखडे तयार करण्यात आली असून सुमारे 13 हजार गावांमध्ये घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गत विविध कामे पूर्ण करण्यात आली आहेत. स्वच्छ महाराष्ट्र करण्यासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी नेहमीच विभागास प्रोत्साहन दिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण महाराष्ट्रातील गावे स्वच्छ करण्याचा संकल्प माझ्या विभागाने केला आहे.

राज्यात जलजीवन मिशन राबविताना प्रत्येक टप्प्यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मार्गदर्शन केले. सर्वसामान्यांच्या घरापर्यंत पिण्याचे पाणी पोहचायला हवे. ज्या भागात नेहमी दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण होते, तेथे कायमस्वरुपी पाण्याची सोय व्हावी, यासाठी जलजीवन मिशनच्या अंतर्गत विविध योजना, जलयुक्त शिवार, पाण्याचे स्त्रोत बळकटीकरण, सोलर पंप आदी योजना राबविण्यासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी नेहमीच आम्हाला प्रोत्साहित केले व योग्य निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले. नागरिकांच्या भल्यासाठी योजना राबविण्यासाठी व त्याची अंमलबजावणी योग्यरित्या होण्यासाठी त्यांनी मंत्रीमंडळातील सर्वच सहकाऱ्यांना निर्णयाचे स्वातंत्र्य दिले. त्यामुळे माझ्यासह सर्वच सहकारी मंत्री हे राज्याच्या विकासासाठी नेहमीच अग्रेसर राहत आहेत.  

अहोरात्र राज्यातील जनतेच्या हितासाठी कार्यरत असणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रुपाने महाराष्ट्राला एक सक्षम नेतृत्व मिळाले आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील मंत्रीमंडळाने अनेक महत्त्वपूर्ण योजना, उपक्रम धडाडीने राबविले आहेत. शब्द पाळणारा व त्यासाठी सर्वस्वपणे झोकून देऊन काम करणाऱ्या अशा या नेत्यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... यापुढील काळातही त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची प्रगतीशील राज्याच्या दिशेने वाटचाल सुरूच राहिल, अशा सदिच्छा व्यक्त करतो.

 

श्री. गुलाबराव पाटील,

मंत्री, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग,

महाराष्ट्र शासन

(शब्दांकन - नंदकुमार बलभीम वाघमारे, सहाय्यक संचालक)

विशेष लेख

 

शासन आपल्या दारी

जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असलेल्या आपल्या भारत देशाने   लोककल्याणकारी शासन व्यवस्था स्विकारली आहे. लोकशाही मूल्यांचा आदर करुन आणि नागरिकांना केंद्रबिंदू मानून शासनाचे काम सुरु आहे. याच भूमिकेतून जनतेचे शासन थेट जनतेपर्यंत नेण्यात ‘शासन आपल्या दारी­’ हा उपक्रम यशस्वी झाला आहे.

शासन अनेक विकासाभिमुख आणि नागरिकांसाठी वैयक्तिक लाभाच्या योजना राबवित आहे. या सर्व योजनांचा लाभ नागरिकांना एकाच छताखाली मिळावा, त्यांच्या शासकीय कार्यालयातील कमी करणे व त्यांना सहज योजनेचा लाभ मिळावा तसेच योजनांचा लाभ सुलभपणे जनतेपर्यत पोहोचविण्यासाठी शासन आपल्या दारी हा लोकाभिमूख उपक्रम महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.

सातारा जिल्ह्यातील पाटण येथे १४ मे २०२३ रोजी शुभारंभ झालेल्या या अभियानामुळे आजपर्यंत राज्यातील सुमारे २ कोटी २० लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांना विविध लाभ मिळाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेलेशासन आपल्या दारीअभियान आता गतिमान शासनाचा महत्त्वाचा भाग बनले आहे. लाभार्थ्यांनी शासनाकडे येण्याच्याऐवजी आता शासनच जनतेच्या दारात पोहोचले आहे, पाटणनंतर सुरु झालेल्या या लोकहक्क प्रदानाच्या सोहळ्याने पाहता पाहता महाराष्ट्र व्यापला आहे. जिथे जिथे हे कार्यक्रम झाले तिथे जनतेचा लाभलेला उत्स्फुर्त प्रतिसाद आणि गरजू, सर्वसामान्य लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान अभियानाच्या यशस्वीतेची प्रचिती देते

लोककल्याणाचे ध्येय ठेवून शेवटच्या गरजू लाभार्थ्यांपर्यंत शासकीय योजना सहज, सुलभपणे (Ease of Access to Government Schemes) पोहोचविण्याचा निर्धार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. या निर्धाराला निमित्त लाभले स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे….त्यातून प्रत्येक जिल्ह्यात 75 हजार लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्याचा  महासंकल्पसरकारने केला आणि राज्यातशासन आपल्या दारीअभियानाची मुहुर्तमेढ रोवली गेली. सुरुवातीलाशासकीय योजनांची जत्रा : योजना कल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारीअशी संकल्पना असलेले हे अभियानशासन आपल्या दारीमध्ये रुपांतरित झाले आणि विकासाच्या योजनांच्या लाभाचा, वेगवान अंमलबजावणीचा एक नवा अध्याय महाराष्ट्रात सुरु झाला.

शासनाच्या सर्व विभागाचे अधिकारी-कर्मचारी एकाच छताखाली, एकाच ठिकाणी पूर्णवेळ उपस्थित राहून लाभार्थ्यांना फक्त शासकीय योजनांचा लाभ मिळवून देत आहेत, आवश्यक कागदपत्रे प्रमाणित करुन देण्यासह गरजूला त्याच्या गरजांशी निगडीत योजनांची माहिती देऊन त्या योजनांचा लाभ मिळण्यासाठीची प्रक्रिया केली जात आहे.

 शासन आपल्या दारीअभियानातून विविध शासकीय विभागातील योजना, रोजगार मेळावे, आरोग्य शिबिरे, रक्तदान व अवयवदान शिबिरे, चष्मे, दिव्यांगांना साहित्य वाटप, शिक्षण हक्क कायद्यानुसार २५ टक्के विद्यार्थ्यांना शाळा प्रवेश, कृषि प्रदर्शन, महिलांना सखी कीटचे वाटप, स्वयंरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन, शेतकरी ते ग्राहक थेट बाजार आणि बचतगटांचे स्टॉल्स, विविध सरकारी विभाग आणि महामंडळांच्या योजनांचे माहिती देणारे स्टॉल्स, सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) अंतर्गत गरजूंना वैयक्तिक लाभ, नव मतदार नोंदणी आदी कार्यक्रमांचा समावेश आहे.

शासन आपल्या दारीअभियानाच्या प्रभावी अंमलबजावणी तसेच समन्वयासाठी राज्यस्तरावर मुख्यमंत्री सचिवालयात खासगी सचिव डॉ. अमोल शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जनकल्याण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. त्याशिवाय जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा जनकल्याण कक्ष आणि प्रत्येक विभागप्रमुखांच्या नेतृत्वाखाली विशेष जनकल्याण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

 शासन आपल्या दारीअभियानाचा फायदा अधिकाधिक लोकांना व्हावा म्हणून आता माहिती तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येत आहे. ‘महालाभार्थीया पोर्टलवर नोंदणी करून आपण योजनांचा लाभ घेऊ शकता.

जिल्ह्या-जिल्ह्यांमध्ये शासन जनतेच्या दारी पोहोचलं आहे. सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना आवश्यक ते सर्व सहाय्य, मार्गदर्शन शासनस्तरावरुन मिळत आहे. शेतकरी, महिला, विद्यार्थी, कष्टकरी, कामगार, दिव्यांग यांच्यासह विविध घटकांना मिळणाऱ्या लाभामुळे त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची लकेर उमटली आहे, यातून शासन आणि जनता यांच्यातील अंतर दूर झालं आहे..

 

Thursday, February 8, 2024

वृत्त क्र. 115

 समाज कल्याण कार्यालया मार्फत विविध महामंडळांचा

एक दिवशीय जिल्हास्तरीय समन्वय मेळावा

 

नांदेड, (जिमाका) दि. 8 :-  समाज कल्याण कार्यालयाच्यावतीने महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोदयोग व चर्मकार विकास महामंडळ या महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने कर्ज मंजूरी देण्याबाबत एक दिवसीय समन्वय मेळावा डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवननांदेड येथील सांस्कृतिक सभागृहात संपन्न झाला.

 

या कार्यक्रमासाठी समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे व जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक ए.डी.गचके व तसेच लेखापाल महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे डी.एस. गायकवाड, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक टी.आर शिंदे, संत रोहिदास चर्मोदयोग व चर्मकार विकास महामंडळाच्या एस.व्ही श्रीमती कांबळे तसेच बँक आफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया, आयसी आयसी आयजिल्हा ग्रामीण बँक, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया बँकेचे जिल्हा समन्वय अधिकारी व महामंडळाचे बँक पेंडीग लाभार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमात महामंडळाच्या लाभार्थ्यांचे कर्ज मंजूरी प्रस्ताव बँकेकडून तात्काळ मंजूर करण्याच्या उद्देशाने जिल्हा अग्रणी बँक अधिकारीजिल्हा समन्वय अधिकारी यांनी पेंडींग बँक प्रकरणेमहामंडाळांचे वाटप केलेली सबसीडी वाटप न करणेरिर्टन प्रकरणे व कर्ज मंजूरीचे प्रकरणे, बँक पेंडीग प्रकरणे निकाली काढण्यात येतील, असे जिल्हा अग्रणी बँक अधिकारी ए.डी गचके यांनी सांगितले.

 

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोदयोग व चर्मकार विकास महामंडळ यांचेकडील पेंडीग प्रकरणाबाबत चर्चा करण्यात आली. तसेच स्टेट बँक इंडीया कडे जे कर्ज प्रकरणे प्रलंबित होती त्यांची यादी देण्यात आली. लवकरात लवकर कर्ज प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे स्टेट बँक ऑफ इंडीयाबँक ऑफ महाराष्ट्रबँक ऑफ इंडिया, आयसी आयसी आयजिल्हा ग्रामीण बॅक, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया बँकेचे जिल्हा समन्वय अधिकारी यांनी बँकेकडे प्रलंबित असलेली प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यात येतील असे उपस्थित लाभधारकांना सांगितले. या कार्यक्रमाचे सुत्र संचलन जिल्हा प्रकल्प अधिकारी श्रीमती सुजात पोहरे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती एस.व्ही.व्हडगीर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाज कल्याण निरिक्षक श्रीमती एस.व्ही.वडगीर व श्रीमती एस.टी. गच्चे व तसेच महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी परिश्रम घेतले. हा एक दिवसीय समन्वय मेळावा सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

0000



  

निरुपयोगी, वापरात नसलेल्या व कालबाहय वस्तूंच्या

खरेदीसाठी दरपत्रके सादर करण्याचे आवाहन

 

लातूर(विमाकादि.08:- विभागीय माहिती कार्यालयाच्या जडसंग्रह विभागातील काही वस्तू निरुपयोगी, वापरात नसलेल्या व कालबाह्यतुटलेल्या अशा आहेत. या वस्तूंची विक्री करावयाची आहे, त्यासाठी इच्छुक खरेदीदारांनी  खरेदीबाबतची दरपत्रके विभागीय माहिती कार्यालयमध्यवर्ती प्रशासकीय इमारत, उत्तरबाजू तळमजला, लातूर येथे कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी आणि कार्यालयीन वेळेत दिनांक  20/02/2024 पर्यंत सादर करावीतमुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या दरपत्रकांचा विचार केला जाणार नाही याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

        कार्यालयीन  कामकाजाच्या वेळेत या वस्तू पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. कार्यालयात येऊन या वस्तुंची पहाणी करावी तसेच अटी व शर्तीची माहिती करून घ्यावी, असे आवाहन विभागीय माहिती कार्यालयाच्यावतीने करण्यात येत आहे.

***** 

Wednesday, February 7, 2024

वृत्त क्र. 114

 तत्पर व युध्दपातळीवरील आरोग्य यंत्रणेच्या सतर्कतेमुळे विष बाधेतील बाधित रुग्णांची प्रकृती स्थिर

▪️जिल्हा प्रशासनाने आरोग्य विभागाशी समन्वय साधत तातडीने उपचाराचे केले नियोजन
▪️लोहा तालुक्यातील अन्न विषबाधित झालेले सर्व रुग्ण सुखरुप
  • कोणतीही जीवीतहानी नाही
नांदेड (जिमाका) दि. 7 :- लोहा तालुक्यातील कोष्ठवाडी येथे संत बाळूमामा यांच्या सप्ताह कार्यक्रमाच्या प्रसादातून सुमारे 2 हजार भाविकांना मंगळवारी 6 फेब्रुवारी रोजी अन्न विषबाधा झाली होती. जिल्हा प्रशासनाने तातडीने धाव घेवून आरोग्य विभाग, शासकीय वैद्यकीय रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, लोहा येथील उपजिल्हा रुग्णालय, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय येथे रुग्णांना तातडीने हलवून युध्द पातळीवर उपचार केले. मध्यरात्रीनंतर अचानक रुग्णांची संख्या लक्षात घेवून कुठेही न डळमळता आरोग्य विभागाने रुग्णांवर केलेले उपचाराचे व्यवस्थापन हे महत्वाचे ठरले. तात्काळ सर्व रुग्णांना रुग्णालयात हलविल्या मुळे कोणतीही जीवीत हानी न होता सर्व रुग्णांना या विषबाधेतून बाहेर काढण्यात आरोग्य विभागाला यश आल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले.
सद्यस्थितीत दि. 7 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वा. वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सुमारे 19 रुग्ण, जिल्हा रुग्णालय नांदेड येथे 60, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयात 50, लोहा येथील उपजिल्हा रुग्णालयात 70 व खाजगी रुग्णालयात सुमारे 150 रुग्ण असे सुमारे 500 रुग्ण उपचार घेत आहेत. उर्वरित सर्व रुग्णांवर उपचार होवून ते सुखरुप असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली. विष बाधा झाल्याचे तात्काळ प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्यानंतर सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने शीघ्र कृती पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या घटनेची शहानिशा करून आरोग्य विभागाला अहवाल सादर केला जाणार असल्याची माहिती डॉ. भोसीकर यांनी दिली.
कोष्ठवाडी येथे संत बाळूमामा यांच्या सप्ताह निमित्ताने भरवण्यात आलेल्या यात्रेमध्ये 6 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजेनंतर प्रसाद वाटप करण्यात आला. त्यानंतर सुमारे 2 हजार भाविकांना 7 फेब्रुवारी रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास अन्न विषबाधा झाल्याचे प्राथमिक अहवालात आढळलेले आहे. या रुग्णांना मळमळ, उलटी, संडास अशी लक्षणे दिसून आल्यानंतर काही रुग्णांना उपजिल्हा रुग्णालय, लोहा येथे दाखल करण्यात आले.
दिनांक 6 फेब्रुवारी च्या मध्यरात्रीनंतर म्हणजेच दि. 7 फेब्रुवारीच्या पहाटे डॉ. शंकराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे सुमारे 600 रुग्णांना, श्री गुरु गोबिंद सिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालयात 100 रुग्णांना, उपजिल्हा रुग्णालय लोहा येथे 150 रुग्णांना, प्राथमिक आरोग्य केंद्र, माळाकोळी येथे 20 रुग्णांना, डॉ. पवार रुग्णालय, लोहा खाजगी येथे 50 रुग्णांना तसेच डॉ. धनवडे रुग्णालय लोहा येथे 100 रुग्णांना औषधोपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याचबरोबर काही रुग्ण हे स्वत: खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. शासकीय आयुर्वेद महाविद्यालय नांदेड येथे आरोग्य विभागाने अतिरिक्त खाटांची पूर्वतयारी करुन सर्व यंत्रणा सज्ज ठेवली.
रुग्णांना कोष्ठवाडी, सावरगाव, पोस्ट वाडी, रिसनगाव, मस्की या गावातून रुग्णालयात उपचारासाठी आणण्यासाठी टोल फ्री 102 क्रमांकाच्या 8 रुग्णवाहिका आणि टोल फ्री 108 क्रमांकाच्या 6 रुग्णवाहिका, खासगी 3 बसेस, 1 महामंडळ बस तसेच गावातील इतर प्रवासी वाहतूक वाहनांचा वापर करण्यात आला. रुग्णांवर औषधोपचारासाठी मुबलक औषधाचा साठा उपलब्ध होता. याचबरोबर खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित रुग्णांलयाना अतिरिक्त औषध साठ्याची पूर्तता करण्यात आली.
रुग्णांच्या पुढील तपासणीसाठी अन्न, पाणी आणि उलटीचे नमुने घेण्यात आलेले आहेत. आरोग्य विभाग जिल्हा परिषद नांदेड यांच्या मार्फत सदर गावामध्ये 5 आरोग्य पथके हे औषधोपचार, सर्वेक्षण यासाठी कार्यरत करण्यात आलेली आहेत. तसेच या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी शीघ्र कृती पथक स्थापन करण्यात आलेले आहे. डॉ. संतोष सूर्यवंशी (पीएसएम) अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प. नांदेड (पथक प्रमुख), डॉ. नितीन अंभोरे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड, डॉ. बालाजी माने (बाल रोग तज्ञ) जिल्हा रुग्णालय नांदेड, डॉ. तज्जमुल पटेल (भिषक) जिल्हा रुग्णालय नांदेड यांचा या पथकात समावेश आहे. जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन, वैद्यकीय महाविद्यालय, सार्वजनिक आरोग्य विभाग हे समन्वयाने कार्यरत आहेत.
00000



पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ #शेतकरीकर्जमुक्ती #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #शेतकरी Maharashtra DGIPR ...