Wednesday, November 26, 2025

 वृत्त क्रमांक 1241

श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्थेत संविधान दिन साजरा

नांदेड दि. 26 नोव्हेंबर :- भारताचे संविधान अंगिकारण्यात आलेल्या दिवसाच्या  स्मरणार्थ दरवर्षी प्रमाणे आज 26 नोव्हेंबर 2025 रोजी श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्थेत संविधान दिन साजरा करण्यात आला. संविधान दिन साजरा करण्यामागील उददेश प्रशिक्षणार्थ्यांमध्ये सामाजिक व नागरी जबाबदारीची जाणीव निर्माण करणे, संविधानातील मुल्यांविषयी आदरभाव दृढ करणे आणि लोकशाहीप्रती कर्तव्यभाव जागृत करणे हा आहे. भारतीय संविधानास 75 वर्षे पुर्ण झाल्यानिमित्ताने संविधान अमृत महोत्सव "घर घर संविधान "या कार्यक्रमांतर्गत 26 नोव्हेंबर ते 26 जानेवारी 2026 या कालावधीत विविध स्पर्धा/कार्यक्रम/ उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

आज संविधान दिनाचे औचित्य साधून सकाळी संविधान सन्मान रॅली काढण्यात आली. संविधान दिनाचे महत्व विषद करणेसाठी श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्थेत कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. कार्यक्रमासाठी जिल्हा कौशल्य रोजगार, उदयोजकता विभागाचे सहायक आयुक्त डॉ. राजपाल कोल्हे, से.नि. प्राध्यापक डॉ. अनंत राउत, व्यवस्थापक सोल्युशन करीअर अकॅडमीचे प्रा. शंकर पुरी, से.नि. लेखाधिकारी असोरे व्ही.आर, सहा.प्रशिक्षणार्थी सल्लागार  अन्नपूर्णे पी. के. हे उपस्थित होते.  

राज्यातील औदयोगिक प्रशिक्षण संस्थामध्ये विदयार्थ्यांना तांत्रिक ज्ञान देउन उदयोगास आवश्यक असणारे प्रशिक्षित मनुष्यबळ पुरविण्यात येते.  बदलत्या काळात औदयोगिक प्रशिक्षण संस्थामधील प्रशिक्षणार्थ्यांना तांत्रिक ज्ञानाबरोबरच सामाजिक जबाबदारी त्यांचे अधिकार व कर्तव्य या संदर्भात मार्गदर्शन असणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने संचालनालयातर्फे राज्यातील सर्व शासकीय / खाजगी औदयोगिक प्रशिक्षण संस्थामध्ये महिन्यातून एकदा एक सामाजिक प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करणेबाबत सुचित केले  आहे.  

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे प्राचार्य तथा जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी विश्वंभर कंदलवाड  यांनी केले. प्रास्ताविकपर भाषणात त्यांनी संविधानाचे महत्व विषद करून सर्वांना शुभेच्छा दिल्या.  कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते  म्हणून डॉ. अनंत राऊत यांनी  मार्गदर्शनपर भाषणात संविधानाचे महत्व, संविधान उददेशिकांचा अर्थ  विषद केला. माणसाची श्रेष्ठता त्याच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. मनुष्याने आपल्या जीवनामध्ये बुध्दीवाद/विज्ञानवादाचा पुरस्कार केला पाहिजे.  आपल्या राष्ट्रीय प्रतिकांचा सन्मान केला पाहिजे.  सत्य, अहिंसा, धर्मनिरपेक्ष, बुध्दीवादी, विज्ञानवादी, समृध्द भारत घडवण्यासाठी संविधान अंगीकारणे गरजेचे आहे असे त्यांनी यावेळी नमूद केले. 

शंकर पुरी यांनी प्रशिक्षणार्थ्यांना करीअर विषयी मार्गदर्शन केले. स्पर्धा परीक्षेची तयारी कशाप्रकारे करावी तसेच यशस्वी होणेसाठी संयम, धैर्य, चिकाटी व सातत्य आवश्यक आहे असे सांगितले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संस्थेचे कार्यक्रमाधिकारी पोतदार डी. ए. यांनी तर आभार प्रदर्शन गटनिदेशक कलंबरकर एम. जी. यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.  कार्यक्रम यशस्वीकरणेसाठी संस्थेतील सर्व कर्मचा-यांनी सहकार्य केले.

000000



No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक   नांदेडमध्ये 13 ते 18 मार्च कालावधीत मिनी सरस रेणुका महोत्सवाचे आयोजन;  महिला बचत गटांच्या उत्पादनांचे भव्य प्रदर्शन व विक्री...