Friday, March 7, 2025

 आज आवश्यक

विशेष वृत्त क्रमांक 263

 जागतिक महिला दिनानिमित्त विशेष मुलाखत 

 महिलांनो ! न घाबरता मोठी स्वप्न बघा ; जिद्दीने पूर्ण करा ! 

 जागतिक महिला दिनाला सीईओ मीनल करनवाल यांचे महिला जगताला आवाहन 

नांदेड, दि. ७ मार्च : महिलांमध्ये प्रचंड क्षमता आहे. घर चालविण्यासाठी काही न करता महिला 50% वाटा उचलत असतात.या श्रमाची प्रतिष्ठा करायला शिका.आत्मसन्मानाला महत्त्व द्या. रूढी,परंपराच्या अडथळ्यांमधून बाहेर पडा, जिद्दीने पेटून उठा. न घाबरता मोठी स्वप्न बघा. यश तुमच्या हातात असेल, असा आशावादी संदेश नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ( सीईओ ) मीनल करनवाल यांनी जिल्ह्यातील महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देताना दिल्या आहेत.

जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आज जिल्ह्यातील तमाम महिलांना त्यांनी दिलेल्या शुभेच्छा संदेश त्यांच्या मुलाखतीत या ठिकाणी देत आहोत. महिलांनी रूढी परंपरांचे जोखड बाजूला ठेवून स्वतःच्या प्रगतीचा मार्ग स्वतः आखावा.आपल्या प्रगतीत आपली मानसिकता अडथळा बनता कामा नये, असा संदेशही त्यांनी या मुलाखतीतून दिला आहे.

प्रश्न : एक महिला अधिकारी म्हणून शासनामध्ये महिलांचा सहभाग अधिक वाढावा आपली इच्छा आहे. यासाठी महिलांनी नेमके काय केले पाहिजे ?

उत्तर : नांदेड सारख्या आदिवासीबहुल भागातील महिलांनी प्रशासनाच्या सेवेमध्ये अगदी आयएएस अधिकाऱ्यांपासून तर खालच्या टप्प्यातील सर्व नोकऱ्यांमध्ये सहभागी व्हावे, ही माझी मनापासून इच्छा आहे. कारण महिला सर्वंकष विचार करतात. सर्वांना घेऊन चालतात. त्यांच्या प्रत्येक विचाराला मानवी चेहरा असतो. शेवटच्या घटकावर काय परिणाम होईल याबाबतचा धोरणात्मक संस्कार त्यांच्या मनावर लहानपणापासून असतो. त्या संवेदनशील असतात.ज्या महिलांना अभ्यासात गोडी आहे. मनात जिद्द आहे. समाजासाठी काही करण्याची इच्छा आहे. त्या महिलांनी या परीक्षांकडे वळले पाहिजे, यश निश्चित भेटते थोडे पेशंस ठेवले पाहिजे.

प्रश्न : मुलींच्या स्पर्धा परीक्षांमध्ये बरेच वेळा परिवाराचा दबाव आणि लग्नाचा अडथळा येतो ? या संदर्भात आपण तरुणींना काय सांगाल ? 

उत्तर : यामध्ये दोन गोष्टी सांगेल. लग्नाचा तणाव घेण्यासारखं नाही. लग्न हे होऊन जातच असते. उलट माझे अशा हुशार मुलींच्या पालकांना सांगणे आहे की, तुम्ही मुलींच्या लग्नापेक्षा तिच्या पुढच्या चाळीस वर्षाच्या सुरक्षिततेचा आत्मनिर्भरतेचा विचार करावा. पुढची चाळीस वर्ष ती स्वतःच्या पायावर उभी राहील आणि तिचे आयुष्य सुकर होईल, हे लक्षात घ्यावे. लग्न हे तात्कालीक आहे. मात्र आयुष्य पुढेही असते. त्यामुळे मुलीचा कल, तिची हुशारी लक्षात घेऊन तिला स्पर्धा परीक्षांसाठी मदत करावी, अशी विनंती मी पालकांना करते. तसेच महिलांना मी सांगते जे माझ्या गुरूंनी मला सांगितलं होतं...स्पर्धा परीक्षा ये कोई पहाड़ नही है... करने वाली बात है...त्यामुळे एकदा जर निर्धार केला असेल तर तो पूर्ण करा. बाकी आयुष्य सगळं व्यवस्थित चालू राहणार आहे. डोक्यातून या परीक्षा कठीण असतात हे भूत काढून टाका. फक्त एक सिल्याबस असतो. तो पूर्ण करायचा असतो. विश्वास महत्वाचा आहे.कोचिंग, तुम्ही कुठे राहता. गरीब, श्रीमंत याला काहीच अर्थ नाही. ही क्षमता असल्यास कोणत्याही टप्प्यावर सर्व गोष्टी शक्य आहे.

प्रश्नः गेल्या दीड वर्षात जिल्हा परिषदेमार्फत महिलाविषयक कोणते प्रमुख कार्य केले जात आहे. कोणत्या योजनांना प्राधान्य दिले जात आहे. कोणत्या अभिनव योजना राबविण्यात आल्या आहे? 

उत्तर : 2019 पासून महिलांसाठी आरक्षण सुरू होणार आहे. त्यामुळे माझ्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुली -महिलांना एक्सपोजर भेटणे आहे. यामध्ये उल्लेखनीय उपक्रम म्हणजे या जिल्हा परिषदेने राबविलेला बालिका पंचायत ! गावागावात आम्ही बालिका पंचायत सुरू केली. त्यामुळे मुलींना बाहेरच जग बघायला मिळाले. एका मुलीची मी स्वतः राज्याच्या महिला व बालविकास मंत्र्यांची भेट घालून दिली. या मुलीने नांदेडचे एअरपोर्ट देखील बघितले नव्हते. मुलींना बाहेरच जग माहिती झालं तर त्यांच्या पंखात बळ येईल. या उपक्रमातून त्यांना ग्रामपंचायत कशी चालते, ग्रामपंचायतसाठी निधी कुठून येतो.तहसील कार्यालय काय असते, आपली जिल्हा परिषद कशी दिसते, तिची रचना काय असते. या सगळ्या गोष्टी माहिती झाल्या. किशोर वयात असणाऱ्या मुलींच्या किमान तीन-चार बॅचेस आता जिल्ह्यामध्ये अशा आहेत की त्यांच्या मनामध्ये पंचायत राज व्यवस्था, राज्य शासन शासन व्यवस्था, याबद्दलच्या भूमिका तयार झाल्या आहेत. या तुकड्या जश्या जशा पुढे जातील तशी तशी त्यांची याबाबतीतली जिज्ञासा वाढत जाईल. या उपक्रमाला नांदेडच्या पुरुष सरपंचांनी खूप छान प्रतिसाद दिला. प्रत्येक गावात महिला पंचायत पुढे मुलींना अधिक चांगले मोकळे आकाश झाले...

आयटी मुंबई सोबत आम्ही गरोदर महिलांचा एक प्रशिक्षण घेतला.या काळातल्या सकस आहाराबाबत महिलांना त्यामुळे मार्गदर्शन झाले. जंक फूड टाळणे,स्तनपान, याबाबत मार्गदर्शन झाले आहे.

प्रश्न : महिलांच्या सशक्तीकरणामध्ये सर्वाधिक अडथळा कोणता आहे ?आणि त्यावर उपाययोजना काय आहे ? 

उत्तर : महिलांच्या प्रगतीमध्ये जर कोणी अडथळा असेल तर त्या महिलाच आहे. हे माझे प्रामाणिक मत आहे...आणि मी अतिशय स्पष्टपणे हे मत मांडते. एक उदाहरण सांगायचं म्हणजे एक गाव सोडून तालुक्याच्या ठिकाणी जायला महिला सरपंच तयार होत नाही. आपलं गाव सोडून आपण प्रवास करू शकत नाही. आणि पदसिद्ध हक्क बजावू शकत नाही. हे काही योग्य नाही. आता नव्या मानसिकतेने काम करणे आवश्यक आहे. ज्या गावांमध्ये महिला सरपंच आहेत त्या गावातील महिलांनीच माझे स्वागत केले पाहिजे असा मी दंडक घातला आहे. 50% भागीदारी महिलांना आता प्रत्येक क्षेत्रात मिळणार आहे. त्यामुळे हा संकोच, ही भीती महिलांनीच दूर करून आपणही सर्व क्षेत्रातील 50 टक्क्यांचे वाटेकरी आहोत. हा आपला अधिकार आहे. हा आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे. यासाठी कोणीही पुढे येणार नाही. महिलांनाच पुढे यावे लागणार आहे.

दुसरे म्हणजे मला असे वाटते की आत्मसन्मान हा मनामध्ये तयार झाला पाहिजे. तुम्ही खूप चांगले काम करता तुम्ही घरातले 50% काम करतात. मात्र त्याचे क्रेडिट स्वतःकडे घ्यायला घाबरतात. म्हणजेच यामध्ये अडथळे कोण आहे तुम्ही स्वतःच आहात ना ? लखपती दीदी सारख्या उपक्रमामध्ये अनेक महिलांनी लाखो रुपयांचे भाग भांडवल उभारले आहे. या लाखो रुपयांतून एक आत्मविश्वास निर्माण होतो तो आत्मविश्वास प्रत्येक महिलेमध्ये निर्माण होणे काळाची गरज आहे.

प्रश्न : महिला बचत गटांना बळकटी आणण्यासाठी जिल्हा परिषदेने कोणते उपक्रम राबविले. त्यासाठी जिल्ह्यात काय काय उपाययोजना सुरू आहेत ? 

उत्तर : महिलांनी नैसर्गिक शेतीतून बनवलेले अनेक दर्जेदार उत्पादन आहेत. त्या उत्पादनांना चांगला बाजार मिळावा ,अशी माझी इच्छा होती आणि त्यातून आपण तालुक्याच्या ठिकाणी त्यांना मार्केट उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सुपर मार्केटमध्ये या उत्पादनांना आता जागा मिळत आहे. जिल्हा परिषदेच्या मोक्याच्या ठिकाणी ही आम्ही त्यांना गाळे मिळेल असे प्रयत्न करीत आहोत.

प्रश्न : आज जागतिक महिला दिन आपल्यासारख्या उच्च पदस्थ महिला अधिकाऱ्यांचा जिल्ह्यातील समस्त महिलांना काय संदेश असेल ? 

उत्तर : माझं सर्वांना सांगणं आहे की, 50% अशा महिला आहेत ज्यांनी आपल्या घराची 50% जबाबदारी घेतलेली आहे. तुमची ही जबाबदारी घेणे याचे मूल्य समजून घ्या.

 दुसरे असे की, लग्नाला उशीर होतोय.या कारणामुळे मुलींनी आपल्या भविष्याची तडजोड करू नये.लग्न दोन वर्षांनी उशिरा झाल्याने काहीही बिघडत नाही.

तिसरे म्हणजे, सर्व मुलींनी मोठी स्वप्न बघणे सुरू करावे.छोटी स्वप्न बघायचीच नाही. छोटी स्वप्न बघाल तर हाती काही लागणार नाही. मोठी स्वप्न बघा... आणि त्यासाठी सगळे दोर तोडून आपल्या उद्दिष्टांवर तुटून पडा.भारताचे माजी राष्ट्रपती ऐपीजी अब्दुल कलाम यांनी देखील हेच आवाहन केले होते की,तुमच्या स्वप्नांमध्ये बळ असायला हवे, मोठे स्वप्न यश तुमच्या मागे धावत येईल.

0000



No comments:

Post a Comment

बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन केंद्राचे अध्यक्ष हेमंत पाटील आमदार बाबुराव पाटील कोहळीकर, आनंद पाटील बोंढारकर यांनी यावेळी भाविकांना शुभेच्छ...