Tuesday, July 29, 2025

 वृत्त क्र. 776  

दहावी-बारावी पुरवणी परीक्षेच्या

निकालासह विविध तपशील जाहीर


नांदेड दि. 29 जुलै :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळामार्फत इयत्ता दहावी व बारावी पुरवणी परीक्षेचा ऑनलाईन निकाल 29 जुलै रोजी जाहीर करण्यात आला आहे. दहावीची पुरवणी परीक्षा 24 जून ते 8 जुलैबारावीची पुरवणी परीक्षा 24 जून ते 16 जुलै या कालावधीत घेण्यात आली होती. या परीक्षेच्या निकालाची कार्यपध्दती व त्याच्या कार्यवाहीचा तपशील पुढीलप्रमाणे दिला आहे. विद्यार्थ्यांना गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी बुधवार 30 जुलै ते शुक्रवार 8 ऑगस्ट 2025 पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येणार आहे.

 

या निकालानंतर दुसऱ्या दिवसापासून इ. 10 वी व 12 वी पुरवणी परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने https://www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना स्वतः अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी आवश्यक अटी-शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आल्या आहेत. गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी 30 जुलै ते 8 ऑगस्ट पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करतांना ऑनलाईन पध्दतीने शुल्क (Debit Card / Credit Card / UPI / Net Banking) याद्वारे भरता येईल.

 

जून-जुलै 2025 पुरवणी परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यासाठी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून त्यापुढील कार्यालयीन कामाच्या पाच दिवसात पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्दतीचा अवलंब करुन विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.

 

जून-जुलै 2025 च्या इ. 10 वी व इ. 12 वी परीक्षेमध्ये सर्व विषयांसह प्रथम प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांची संपादणूक सुधारण्यासाठी श्रेणी/गुणसुधार योजनेअंतर्गत परीक्षेस प्रविष्ट होण्यासाठी तरतुदींच्या अधीन राहून लगतच्या तीन संधी (फेब्रुवारी-मार्च 2026, जून-जुलै 2026 व फेब्रुवारी-मार्च 2027) उपलब्ध राहतील.

 

फेब्रुवारी-मार्च 2026 इ. 10 वी व 12 वी परीक्षेस ज्या विद्यार्थ्यांना प्रविष्ट व्हावयाचे आहे अशा नियमित, पुनर्परिक्षार्थी विद्यार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत प्रविष्ट होणारे व आटीआय (औद्योगिक प्रशिक्षण संस्था) द्वारे Transfer of Credit घेणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने स्विकारली जातील. त्याच्या तारखा मंडळामार्फत स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येतील, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे राज्य मंडळाचे सचिव यांनी दिली आहे.

0000

 वृत्त क्र. 777

सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन 

नांदेड दि. 29 जुलै :- सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी न्याय व तत्परतेने सोडविण्यासाठी  प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. जिल्हा प्रशासनाच्यावतीने लोकशाही दिन सोमवार 4 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे आयोजित केला आहे. 

 या दिवशी महसूल,  गृह,  मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद,  पाटबंधारे, बांधकाम, परिवहन, सहकार, कृषि विभाग व जिल्हा पाणी पुरवठा समन्वय अधिकारी इत्यादी जिल्हा स्तरावरील प्रमुख अधिकारी व ज्या कार्यालयाचे लोकशाही दिनात प्रलंबीत प्रकरणे आहेत असे अधिकारी बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उपस्थित राहतील. सकाळी 12 वाजेपासून निवेदनाची नोंदणी सुरु होणार आहे. त्यानंतर लगेचच प्राप्त झालेल्या अर्जावर, निवेदनावर म्हणणे ऐकून घेण्याच्या कामास सुरुवात करण्यात येईल.

लोकशाही दिनाच्या दिवशी प्राप्त होणाऱ्या जनतेच्या तक्रारी, अडचणी एकत्रीतरीत्या समजावून घेऊन त्या शक्य तितक्या लवकर सोडविण्यात येतील, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी दिली आहे.

00000

 वृत्त क्र. 778  

आयआयपीएच्या नांदेड शाखेची निवडणूक संपन्न

नांदेड दि. 29 जुलै :- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन नवी दिल्ली (आयआयपीए) ही भारत सरकारच्या कर्मचारी, लोकतक्रार व निवृत्तीवेतन मंत्रालयाअंतर्गत लोकप्रशासन विकास, प्रशिक्षण, संशोधन व प्रशासकीय सुधारणा या महत्वपूर्ण क्षेत्रात कार्य करणारी एक मूलभूत संशोधन व प्रशिक्षण संस्था आहे.

केंद्र शासनाच्या  भारतीय लोकप्रशासन संस्था ( आय.आय.पी. ए.)  नवी दिल्ली यांच्याकड़ून नांदेड येथे स्थानिक शाखेला स्थापन्यास मान्यता प्राप्त झाले असल्याची माहिती आयआयपीए नांदेड शाखेचे पदसिद्ध अध्यक्ष तथा नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी दिली आहे. या महत्वपूर्ण संस्थेच्या इतर पदाधिकारी यांची निवड करण्यासाठी नांदेड स्थानिक शाखेची सर्वसाधारण सभा व निवडणूक प्रक्रीया नुकतीच संपन्न झाली आहे.

आयआयपीए नांदेड संस्थेच्या शाखा उपाध्यक्षपदी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांची तर सचिवपदी देगलूर महाविद्यालयातील लोकप्रशासन विभाग व संशोधन केंद्रप्रमुख प्रा. डॉ. बी आर कतूरवार कोषाध्यक्षपदी प्रतिभा निकेतन महाविद्यालयातील लोकप्रशासन विभाग प्रमुख डॉ.दीपक सुभाष वाघमारे आणि कार्यकारी मंडळ सदस्य म्हणून महात्मा फुले महाविद्यालय, मुखेड येथील प्रा.डॉ. चांदोबा कहाळेकर व प्रा. डॉ. रवी बरडे यांची निवड करण्यात आली आहे. प्रस्तुत निवडणूक प्रक्रिया निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर आणि निवडणूक निर्णय अधिकारी योगेश कुमार बाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

नांदेड जिल्हा प्रशासनाच्यावतीने आयआयपीएच्या या शाखेद्वारे जिल्हा प्रशासनातील प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी वर्गाला प्रशिक्षण देण्यासाठी, प्रशासकीय  क्षमता बांधणी विकसित करण्यासाठी आणि प्रशासकीय सुधारणेच्या अनुषंगाने लोकप्रशासन विषयात लेखन, संशोधन व प्रशिक्षण इत्यादी विविध कार्य करण्यासाठी विशेष उपक्रम राबविन्यात येणार आहेत.

नांदेड जिल्ह्यामध्ये आयआयपीएची शाखा स्थापन झाल्यामुळे नांदेड जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविध लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करणे, माहिती व तंत्रज्ञानाच्या  मदतीने प्रशासकीय सेवा सुलभ, पारदर्शक व गतीशील बनविने, विविध  विकास कामांमध्ये लोकसहभाग वाढविणे,  प्रशासकीय अधिकारी वर्गांना वेळोवेळी प्रशिक्षण देऊन शारीरिक, मानसिक, बौद्धिक व नैतिक क्षमता विकसित करणे, लोककल्याणकारी, संवेदनशील  व लोकाभीमुख प्रशासन निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरनार आहे. जिल्हा प्रशासनातील प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी, लोकप्रशासन विषयाचे प्राध्यापक व संशोधक, नागरिक यांच्यात विचारमंथन करण्यासाठी आय आय पी ए ची नांदेड शाखा एक वरदान ठरणार आहे.


0000

वृत्त क्र. 779  
नांदेड जिल्ह्यास 15 मिनीमाती तपासणी प्रयोग शाळा मंजूर
 
प्रयोगशाळा उभारणीसाठी 8 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे कृषी विभागाचे आवाहन
 
नांदेड दि. 29 जुलै : राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत मृद आरोग्य व सुपीकता कार्यक्रम 2025-26 मध्ये नांदेड जिल्ह्यात 15 ग्रामस्तरीय मृद नमुने तपासणी प्रयोगशाळा स्थापन करण्यास मान्यता मिळाली आहे. प्रयोगशाळेसाठी शेतकरी उत्पादक कंपन्या व ईच्छूकांनी 8 ऑगस्टपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.
 
जिल्हा कृषी विभागाने पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज मागवले आहेत. राष्ट्रीय कृषी विकास योजना कॅफेटेरिया अंतर्गत मृद आरोग्य व सुपीकता कार्यक्रम सन 2025-26 साठी 2 लाख 22 हजार मृद नमुने ग्रामस्तरीय मृद नमुने तपासणी प्रयोगशाळेकडून तपासणी करण्याबाबत सन 2025-26 च्या राज्याच्या वार्षिक कृती आराखड्यामध्ये मान्यता दिली आहे. सन 2025-26 चे राज्यस्तरीय वार्षिक कृती आराखड्यामध्ये राज्यासाठी एकूण 444 नवीन ग्रामस्तरीय मृद नमुने तपासणी प्रयोगशाळा उभारण्यासाठी मंजुरी मिळालेली आहे.
 
कृषीसंचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण), कृषी आयुक्तालय, पुणे यांनी नांदेड जिल्ह्यात 15 ग्रामस्तरीय मृद नमुने तपासणी प्रयोगशाळा स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सदर प्रयोगशाळा उभारण्यासाठी अर्थसाहाय्य खासगी व्यक्ती, शेतकरी उत्पादक संस्था, कृषी चिकित्सालये आणि कृषी व्यावसायिक केंद्रे, माजी सैनिक बचतगट, शेतकरी सहकारी संस्था, कृषी आवश्यक सेवा, निविष्ठा किरकोळ विक्रेते तसेच शाळा, कॉलेज, युवक-युवती यांना दिले जाणार आहे. नांदेड जिल्ह्यासाठी लाभार्थ्यांकडून अर्ज मागवले जात असून इच्छुकांनी 8 ऑगस्ट, 2025 पर्यंत संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावेत. ग्रामस्तरीय मृद चाचणी प्रयोगशाळेसाठी अर्थसहाय्य रक्कम 1 लाख 50 हजार रुपये आहे. लक्षांकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास जिल्हास्तरीय निवड समितीकडून सोडत काढून लाभार्थ्यांची अंतिम निवड केली जाणार आहे. अधिक माहितीसाठी लाभार्थ्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

प्रयोगशाळेसाठी लाभार्थी पात्रता 
 
लाभार्थी पात्रता युवक, युवती 18 ते 27 वयोगटातील असावा. व्यक्ती, शेतकरी उत्पादक संस्था (FPOs), कृषी चिकित्सालय आणि कृषी-व्यवसाय केंद्रे, कृषी आवश्यक, माजी सैनिक, बचतगट, शेतकरी उत्पादक संस्था, गट, शेतकरी सहकारी संस्था, निविष्ठा किरकोळ विक्रेते आणि शाळा, कॉलेज युवक / युवती हे अर्ज करू शकतात. लाभार्थ्यांची शैक्षणिक अर्हता किमान 10 वी (विज्ञान विषयासह) उत्तीर्ण असावी. अर्जासोबत शैक्षणिक अर्हतेसोबत आधार कार्ड व पॅनकार्ड जोडणे आवश्यक आहे. अर्जदार/गटाची स्वतःची इमारत किंवा किमान 4 वर्षांचा भाडेकरार असलेली इमारत असणे आवश्यक आहे. 8 ऑगस्ट 2025 पर्यंत संबंधित कार्यालयात अर्ज सादर करता येणार आहेत. अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
00000

वृत्त

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून, मराठवाड्यात 3 हजार रुग्णांना 25 कोटींची मदत

·         आरोग्य शिबिरातून 12 हजार नागरिकांना दिलासा

 

छत्रपती संभाजीनगर, दि.29 : राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरीब रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष हा मोठा आधार बनला आहे. विशेषतः मराठवाडा विभागात जानेवारी ते जून 2025 या अवघ्या सहा महिन्यांत तब्बल 3 हजार 39 रुग्णांना 25 कोटी 58 लाख 31 हजार रुपयांची वैद्यकीय मदत करण्यात आली आहे.

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून नागरिकांचा विचार करून जिल्हा कक्ष स्थापन करण्यात आले. त्यातून लाभार्थी नागरिकांची संख्या वाढली. त्यासोबतच आरोग्य शिबिर व रक्तसंकलन आदी उपक्रम प्रभावीपणे राबविणे सहज शक्य होत आहे, असे मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले.

जिल्हानिहाय मदत :-

मागील सहा महिन्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 633 रुग्णांना 5 कोटी 33 लाख 38 हजारांची मदत करण्यात आली.  बीड -610 रुग्णांना 4 कोटी 89 लाख 6 हजार, परभणी 533 रूग्णांना 4 कोटी 67 लाख 82 हजार, लातूर- 385 रूग्णांना 3 कोटी  29 लाख 55 हजार, जालना-367 रूग्णांना 3 कोटी 11 लाख 45 हजार, नांदेड- 323 रूग्णांना 2 कोटी 80 लाख 20 हजार, धाराशिव-257 रूग्णांना 2 कोटी 21 लाख आणि हिंगोली-  132 रूग्णांना 1 कोटी 16 लाख रूपये प्रमाणे वैद्यकीय मदत करण्यात आली आहे.  

आरोग्य शिबिरे आणि रक्तदान  

            1 मे ते 25 जुलै दरम्यान जिल्हा कक्षाच्या मदतीने घेण्यात आलेल्या आरोग्य व रक्तदान शिबिरांमध्ये 12,409 नागरिकांची आरोग्य तपासणी तर 2,353 नागरिकांनी रक्तदान केले.

जिल्हा

लाभार्थी नागरिक

रक्तदाते

छत्रपती संभाजीनगर

3,058

161

बीड

1,100

75

परभणी

763

467

लातूर

2,522

852

जालना

373

64

नांदेड

226

639

धाराशिव

742

38

हिंगोली

3,625

57

 

 

 

20 गंभीर आजारांकरिता मदत

       मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून 20 गंभीर आजारांवर मदत केली जाते: त्यात, कॉक्लियर इम्प्लांट, हृदयविकार, किडनी/लिव्हर/बोन मॅरो प्रत्यारोपण, कर्करोग, अपघात, नवजात बालकांचे आजार, मेंदू विकार, डायालिसिस, भाजलेले रुग्ण, विद्युत अपघात आदींचा समावेश आहे. 

जिल्हा कक्षाच्या माध्यमातून मदत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेनुसार पेपरलेस आणि डिजिटल प्रणाली तसेच जिल्हा कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. ज्यामुळे रुग्णांना मंत्रालयात येण्याची गरज भासत नाही.

रुग्णांनी प्रथम महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, किंवा धर्मादाय रुग्णालयांच्या योजनांचा लाभ घ्यावा. जर या योजनांद्वारे उपचार शक्य नसतील, तर, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाकडे संलग्न असणाऱ्या रुग्णालयातून अर्ज करता येतो. यामुळे शासकीय योजनांचा सुयोग्य वापर होतो आणि निधीचा उपयोग खऱ्या गरजू रुग्णांपर्यंत पोहोचतो.

आवश्यक कागदपत्रे :-

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र (१.६० लाखांपेक्षा कमी)
  • वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र
  • रुग्णालयाची नोंद मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाच्या संगणक प्रणालीवर असावी
  • अपघात असल्यास एफआयआर किंवा एमएलसी
  • अवयव प्रत्यारोपण असल्यास झेडटीसीसी नोंदणी पावती

सर्व कागदपत्रे पीडीएफ स्वरूपात aao.cmrf-mh@gov.in या ईमेल वर पाठवावीत.  अधिक माहिती करिता टोल फ्री क्र. १८०० १२३ २२११ या क्रमांकावर कॉल करावा.

०००





 

Monday, July 28, 2025

जागतिक #निसर्गसंवर्धन दिन


 

वृत्त क्र. 775

शेतकऱ्यांनी हुमणी अळी या बहुभक्षीय किडींचे योग्य व्यवस्थापन व नियोजन करावे –जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी 

नांदेड दि. 28 जुलै :- हुमणी अळी (होलोट्रीचीया प्रजाती) ही एक बहुभक्षी कीड असून महाराष्ट्रामध्ये होलोट्रीचीया सेरेंटा या प्रजातीमुळे प्रामुख्याने सोयाबीन, कापूस, तूर या पिकाचे नुकसान होते. पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी हुमणी अळी या बहुभक्षीय किडींचे योग्य व्यवस्थापन व नियोजन करावे असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे. 

पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्यांनी सायंकाळच्या वेळी शेतातील कडुलिंब, बोर आणि बाभुळ या झाडांचे निरीक्षण करावे. त्यासाठी झाडाखाली प्रकाश सापळे लावावे. एक मादी भुंगा नष्ट झाल्यास त्यापासुन तयार होणाऱ्या ४० ते ५० अळयांचा नाश होतो. सातत्याने हि किड येणाऱ्या भागात बाभुळ, कडूनिंब आणि बोर हयासारख्या झाडावर किटकनाशकाची पहिली फवारणी करावी. भुंग्यांची संख्या प्रत्येक झाडावर सरासरी २० अगर त्यापेक्षा जास्त असेल तर नियंत्रणाची मोहीम राबवावी. किटकनाशकांचा वापर करतांना मजुरांना संरक्षण साधने पुरवावीत. गरज भासल्यास दुसरी फवारणी पहिल्या फवारणीनंतर ३ आठवडयांनी करावी. 

हुमणी अळीची प्रौढ मादी पाऊस पडल्यानंतर जमिनीत अंडी देते. हया किडींची अळी अवस्था नुकसान कारक असून ती विविध पिकांच्या मुळावर आपली उपजीवीका करते. उदा. ज्वारी, बाजरी, मका, भात, गहु, ऊस, मिरची, मुंग, करडई, वांगी, कापूस आणि सुर्यफुल ई. पिकाची मुळे खाल्यामुळे पिके उधळून जमिनीवर कोलमडून पडतात. 

या किडीचे जीवनचक्र एक वर्षाचे असून ती आपली उपजीविका जमिनीमधे करते. हि किड अळी अवस्थेत 6 ते 8 महिण्याची असून या अवस्थेत खरीप व रब्बी पिकांची मुळे खाऊन पिकाचे नुकसान करते. एक मादी दररोज एक अंडी घालते. एक मादी मे ते जुलै महिन्यात पोषक वातावरणानुसार 40 ते 50 अंडी घालते. अंडी 3 ते 5 दिवसात उबवून त्यातून बारीक पिवळसर अळया निघतात. त्या अळ्या गवताच्या कुंजलेल्या मुळ्या खाऊन जगतात. पूर्ण वाढ झालेली अळी 3 त 5 सेंमी रुंद, मांसळ पांढुरकी अथवा मळकट पणुढ-या रंगाची "C" आकाराची असते. 

शेतात निरिक्षण घेतेवेळी एकरी 20 ठिकाणचे मातीचे नमुने (1 फुट x 1 फुट x 6 इंच खोल) घेवून त्यात हुमनी अळया आहेत का ? ते शोधावे, तसेच पिकामधे विशिष्ट ओळीमधे प्रादूर्भावग्रस्त झाडाची पाने पिवळी पडून सुकतात. अशी झाडे आढळल्यास ती मुळासकट उपटुन मुळे कुरतडलेली आहेत का? हे पहावे.

सौम्य प्रादुर्भाव तुरकळ ठिकाणीच असल्यास जैविक मित्र बुरशी मेटॅरायझियम 4 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून पिकांच्या मुळाशी आळवणी करावी किंवा मेटॅरायझियम 1 किलो प्रति 100 किलो शेणखतात मिसळून प्रति हेक्टरी शेतात फेकावे. मित्र बुरशीचा वापर करतांना ओलावा असणे आवशक असते.

लक्षणीय प्रादुर्भाव असल्यास व्यवस्थापनाकरीता खालील पैकी एका रासायनिक किटकनाशकांचा वापर करावा. फिप्रोनिल 40 टक्के + इमिडॅक्लोप्रिड 40 टक्के दाणेदार 5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात घेऊन द्रावण खोडांजवळ टाकावे. किंवा कार्बोफ्यूरॉन 3 टक्के दानेदार ३३.३० किलो किंवा थायोमेथोक्झाम 0.4 टक्के + बायफेनथ्रिन 0.8 टक्के दानेदार 12 किलो प्रति हेक्टर किंवा थायोमेथोक्झाम 0.9 टक्के फिप्रोनिल 2 टक्के दानेदार 12 ते 15 किलो प्रति हेक्टर खोडांजवळ जमिनीत ओलावा असतांना मातीत मिसळून दयावे.

00000

वृत्त क्र. 774

महाराष्ट्र ऑटो आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी

मंडळाच्या सभासद नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड दि. 28 जुलै :- नांदेड जिल्हातील सर्व रिक्षाचालक आणि टॅक्सी चालक संघटना तसेच रिक्षाचालक आणि टॅक्सी चालक यांनी महाराष्ट्र ऑटो आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाच्या सभासद नोंदणीसाठी या लिंकवर https://ananddighekalyankarimandal.org ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावेत, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत ककरेज यांनी केले आहे.

महाराष्ट्र शासनाने धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ, मुंबई ची स्थापना केलेली आहे. या कल्याणकारी मंडळाचा उद्देश पुढीलप्रमाणे आहे. वय 65 वर्षावरील चालकासाठी सन्मान निधी योजना, जिवन विमा व अपंगत्व विमा योजना कर्तव्यावर असतांना, आरोग्य विषयक लाभ योजना, कामगार कौशल्य वृध्दी योजना, कर्तव्यावर असतांना दुखापत झाल्यास अर्थसहाय्य योजना, पाल्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृती योजना आहेत.

महाराष्ट्र ऑटो आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची https://ananddighekalyankarimandal.org ही अधिकृत लिंक आहे. या लिंकव्दारे रिक्षाचालक आणि टॅक्सी चालक सभासद नोंदणीसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करू शकतात, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविली आहे.

00000

वृत्त क्र. 773

एकाच अपिलार्थीचे 81 अपील राज्य माहिती आयोगाने फेटाळले

19 अपिलार्थींचे 7 हजार 567 व्दितीय अपील फेटाळले

नांदेड, 28 जुलै :- नांदेड येथील जनक रामराव गायकवाड या अपिलार्थीने राज्य माहिती आयोग, खंडपीठ छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे माहितीचा अधिकार अधिनियम अंतर्गत दाखल केलेले 81 द्वितीय अपील आयोगाने फेटाळले आहेत. यासोबतच 19 अपिलार्थींनी दाखल केलेले 7 हजार 567 व्दितीय अपील आयोगाने सुनावणी घेऊन फेटाळले आहेत.

अपिलार्थी यांनी विविध ग्रामपंचायत कार्यालयाकडे 81 माहितीचे अर्ज सादर केलेले आहेत. अशा मोठ्या प्रमाणावर माहिती अर्ज करणाऱ्या खालील नमूद अपिलार्थी यांची द्वितीय अपिले आयोगाने सुनावणी घेऊन फेटाळलेली आहेत. आयोगाकडील सदरील निर्णय आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत. 

बहुतांश अपिलार्थी कार्यालयाकडे वारंवार अर्ज सादर करतात. अपिलार्थी व्यक्तिशः माहितीची मागणी करुन त्याप्रमाणे माहिती प्राप्त करुन घेण्यासाठी कार्यालयात उपस्थित राहत नाहीत. अपिलार्थी यांनी जेवढ्या ग्रामपंचायत कार्यालयाकडे माहिती अर्ज सादर केले त्या सर्व ग्रामपंचायत कार्यालयात स्वतंत्र जन माहिती अधिकारी पदनिर्देशित आहेत. मात्र अशा सर्व जन माहिती अधिकारी यांचेसाठी केवळ एकच प्रथम अपिलीय अधिकारी पदनिर्देशित आहेत. बहुतांश वेळा अपिलार्थी जेवढे माहितीचे अर्ज दाखल करतात जवळजवळ तेवढेच प्रथम अपिले दाखल करतात. या परिस्थितीत दैनदिन कामकाज सांभाळून अपिलाची यांच्या दाखल प्रथम अपिलावर कार्यवाही करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. मोठ्या संख्येने प्राप्त झालेल्या अर्जाचा विपरित परिणाम दैनंदिन शासकीय कामकाजावरुन होऊन सर्वसामान्य नागरिकांना नैसर्गिक न्याय देता येणे शक्य होत नाही.

प्रस्तुत प्रकरणात, अपिलार्थी यांनी आयोगाकडे व्दितीय अपिले दाखल करताना प्रयोजनामध्ये, माहिती दिली नसल्यामुळे, असे कारण नमूद केलेले आहे. अपिलार्थी यांनी त्यांच्या माहिती अर्जाव्दारे मागणी केलेल्या माहितीचे अवलोकन केले असता, अपिलार्थी यांनी मागणी केलेली माहिती विस्तृत, व्यापक व मोघम स्वरुपाची आहे. अशी माहिती एकत्रित करण्याकरिता सार्वजनिक प्राधिकरणाकडील मनुष्यबळ व साधनसामग्री मोठ्या प्रमाणावर वळवावी लागते. ही बाब माहिती अधिकार अधिनियम, २००५ मधील कलम 7 (9) नुसार योग्य ठरत नाही. यामुळे अशा स्वरुपाचे माहिती अर्ज व्यवहार्य ठरत नाहीत. कारण माहिती अधिकारामागील भूमिका व उद्दिष्ट सफल होत नाहीत.

प्रस्तुत प्रकरणात, अपिलार्थी यांनी विविध ग्रामपंचायत कार्यालयाकडे 81 माहितीचे अर्ज सादर केलेले आहेत या अपिलार्थी यांची व्दितीय अपिले आयोगाने सुनावणी घेऊन फेटाळलेली आहेत. आयोगाकडील सदरील निर्णय आयोगाच्या www.sic.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेले आहेत. 

प्रस्तुत प्रकरणात संबंधितांनी आयोगासमोर केलेला युक्तिवाद तसेच मा. सर्वोच्च न्यायालय, मा.उच्च न्यायालय व मा.केंद्रीय माहिती आयोग आणि राज्य माहिती आयोग यांनी वेळोवेळी पारित केलेले निर्णय विचारात घेता, एकाच व्यक्तीने मोठ्या संख्येने माहिती अधिकार कायद्याखाली माहिती अर्ज अपिले करणे माहिती अधिकार कायद्यामध्ये अभिप्रेत अपेक्षित नाही. यावरुन अपिलार्थी हे माहिती अधिकार कायद्याचा मोठ्या प्रमाणावर दुरुपयोग करुन संबंधित शासकीय कार्यालयास / प्राधिकरणास वेठीस धरत आहेत. त्यांच्या या कृतीमुळे संबंधित शासकीय कार्यालये, प्राधिकरणांचे दैनंदिन कामकाज ठप्प होण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. अशा मोठ्या स्वरुपात अर्ज करण्याच्या सवयीमुळे संबंधित शासकीय कार्यालये / प्राधिकरणे यांचा बहुमुल्य वेळ व शक्ती अधिक प्रमाणात खर्ची पडुन सदर शासकीय कार्यालयांकडून सर्व सामान्य जनतेला ज्या सेवा देणे अभिप्रेत आहे, त्या महत्वाच्या शासकीय कामकाजावर गंभीर परिणाम होण्याचा धोका देखील निर्माण झालेला आहे. अपिलार्थी यांनी माहिती अर्थान्वये मागणी केलेल्या माहितीतून कोणतेही व्यापक जनहित साध्य होत असल्याचे स्पष्ट होत नाही. वारंवार मोठ्या प्रमाणात माहितीचे अर्ज करुन मागणी केलेल्या माहितीच्या मागणीमुळे शासकीय यंत्रणेतील मनुष्यबळ व साधन सामग्री यावर ताण येत आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन शासकीय कामे पूर्ण करण्याच्या शासकीय कार्यालयाच्या / प्राधिकरणाच्या क्षमतेवर विपरित परिणाम होऊन शासकीय कामकाजाचा खोळंबा होईल व असे माहिती अधिकार कायद्यास अभिप्रेत नाही, असे आयोगाचे स्पष्ट मत झालेले आहे.

पुढील अपीलार्थीची आयोगाने द्वितीय सुनावनी घेवून अपीले फेटाळली आहेत. केशवराव निंबाळकर यांची आयोगाकडे दाखल 2788 द्वितीय अपिले 26 जुन 2024 तर 842 द्वितीय अपिले 19 डिसेंबर, 2024 रोजी सुनावणी घेऊन फेटाळली आहेत. शरद दाभाडे यांची 159 द्वितीय अपिले 26 एप्रिल, 2024 तर 985 द्वितीय अपिले 27 सप्टेंबर, 2024 रोजी सुनावणी घेऊन फेटाळली आहेत. मोतीराम गयबु काळे यांची आयोगाकडे दाखल 463 द्वितीय अपिले 23 सप्टेंबर, 2024 रोजी सुनावणी घेऊन फेटाळली आहेत. बाळासाहेब भास्कर बनसोडे यांची आयोगाकडे दाखल 256 द्वितीय अपिले 20 डिसेंबर, 2024 रोजी सुनावणी घेऊन फेटाळली आहेत. श्रीमती अनिता नितीन वानखेडे यांची आयोगाकडे दाखल 116 द्वितीय अपिले 06 सप्टेंबर 2024 रोजी सुनावणी घेऊन फेटाळली आहेत. बाबुराव धोंडु चव्हाण यांची आयोगाकडे दाखल 198 द्वितीय अपिले 20 जानेवारी 2025 रोजी सुनावणी घेऊन फेटाळली आहेत. जयभीम नरसिंगराव सोनकांबळे यांची आयोगाकडे दाखल 176 द्वितीय अपिले 01 ऑक्टोबर 2024 रोजी सुनावणी घेऊन फेटाळली आहेत. हरि प्रताप गिरी यांची आयोगाकडे दाखल 296 द्वितीय अपिले 28 ऑगस्ट 2024 रोजी सुनावणी घेऊन फेटाळली आहेत. विनोदकुमार भारुका यांची आयोगाकडे दाखल 236 द्वितीय अपिले 28 ऑगस्ट 2024 रोजी सुनावणी घेऊन फेटाळली आहेत.  गिरीश म. यादव यांची आयोगाकडे दाखल 206 द्वितीय अपिले 23 ऑगस्ट 2024 रोजी सुनावणी घेऊन फेटाळली आहेत. संजय हाबु राठोड यांची आयोगाकडे दाखल 100 द्वितीय अपिले 30  ऑगस्ट 2024 रोजी सुनावणी घेऊन फेटाळली आहेत. रायभान किसन उघडे यांची आयोगाकडे दाखल 216 द्वितीय अपिले 30 सप्टेंबर 2024 रोजी सुनावणी घेऊन फेटाळली आहेत. बालाजी बळीराम बंडे यांची आयोगाकडे दाखल 156 द्वितीय अपिले 01 ऑक्टोबर 2024 रोजी सुनावणी घेऊन फेटाळली आहेत. भालचंद्र साळुंके यांची आयोगाकडे दाखल 103 द्वितीय अपिले 24 जानेवारी 2025 रोजी सुनावणी घेऊन फेटाळली आहेत.  मिलिंद दगडु मकासरे यांची आयोगाकडे दाखल 125 द्वितीय अपिले 30 ऑगस्ट 2024 रोजी सुनावणी घेऊन फेटाळली आहेत.  ज्ञानेश्वर धायगुडे यांची आयोगाकडे दाखल 86 द्वितीय अपिले 24 जानेवारी 2025 रोजी सुनावणी घेऊन फेटाळली आहेत. सुरज नंदकिशोर व्यास यांची आयोगाकडे दाखल 63 द्वितीय अपिले 24 जानेवारी 2025 रोजी सुनावणी घेऊन फेटाळली आहेत.

00000

 वृत्त क्र. 772

सीआरपीएफचा 87 वा स्थापना दिवस मुदखेड येथे उत्साहात साजरा 

नांदेड दि. 27 जुलै:- मुदखेड येथे सेंट्रल ट्रेंनिग महाविद्यालयात, केंद्रीय रिझर्व्ह पोलीस फोर्स (सीआरपीएफ) दलाचा 87 वा स्थापना दिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महानिरीक्षक आणि महाविद्यालयाचे प्राचार्य ख्वाजा सजनुद्दीन यांनी सर्व अधिकारी, जवान आणि त्यांच्या कुटूंबियांना शुभेच्छा देवून सीआरपीएफ दलाच्या गौरवशाली इतिहासावर प्रकाश टाकला. सीआरपीएफची स्थापना 27 जुलै 1939 रोजी नीमच मध्यप्रदेश येथे क्राऊन रिप्रेझेंटेटिव्हज पोलीस म्हणून झाली. स्वातंत्र्यानंतर त्याची पुनर्रचना केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणून करण्यात आली. तेव्हापासून दरवर्षी 27 जुलै हा दिवस स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो. 

यावेळी महानिरीक्षकांनी शहीद सैनिकांना श्रध्दांजली वाहिली. क्वार्टर गार्डमध्ये त्यांना मानवंदना देण्यात आली आणि विशेष सैनिक संमेलनाला संबोधित करताना त्यांनी देशसेवेतील सैन्याच्या शिस्त, वचनबद्धता आणि योगदानाचे कौतुक केले. 

स्थापना दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात मुदखेड शहरात भव्य सायकल रॅली, सामुहिक वृक्षारोपन आणि केंद्रीय विद्यालयातील मुलांसह संस्थेच्य कॅम्पमधील मुलांसाठी विविध श्रेणीमध्ये चित्रकला स्पर्धा यांचा समावेश होता. यासोबतच प्रशिक्षक आणि प्रशिक्षणार्थीमध्ये उत्साहाने क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. या विशेष दिनानिमित्त सर्वाना एकता आणि उत्सवाचा अनुभव देण्यासाठी संस्थेच्या सर्व कॅन्टीनमध्ये बडा खाना या विशेष सामूहिक मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते. 

कमांडंट कम चीफ ट्रेनिंग ऑफिसर वेद प्रकाश त्रिपाठी, डेप्युटी कमांडंट अरुण कुमार आणि मोहम्मद शाहनेवाज, असिस्टंट कमांडंट करणजीत सिंग आणि वासुदेव, वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश कुमार आणि संस्थेचे अधीनस्थ अधिकारी, सैनिक, प्रशिक्षक आणि प्रशिक्षणार्थी या प्रतिष्ठित कार्यक्रमास उपस्थित होते.

00000








  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच...