Tuesday, January 10, 2023

वृत्त क्रमांक 18

 शेतकऱ्यांनी गरजेनुसार युरिया खताचा वापर करावा

 

नांदेड (जिमाका) दि. 10 :- जिल्ह्यास जानेवारी महिण्यात युरिया खताची मागणी वाढत आहे. जिल्ह्यात 15 हजार मे. टन युरिया खताचे पुरवठा नियोजन प्राप्त झाले आहे. त्यानुसार आजच्या स्थितीला आयपीएल कंपनीचे 1800 मे. टन व नागार्जूना कंपनीच्या 2200 मे. टनच्या रॅक प्राप्त झाल्या आहेत. त्या दोन दिवसांत जिल्ह्यात वितरीत होतील. शेतकऱ्यांनी पिकाच्या गरजेनुसार व कृषि विद्यापीठ शिफारस मात्रेनुसारच युरिया खताचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या कृषि विभागाच्यावतीने करण्यात आले आहे .

आपल्या जिल्ह्यास युरिया खत आवश्यकतेनुसार उपलब्ध होणार आहे. तसेच शेतकऱ्यांनी दाळवर्गीय हरभरा पिकास युरिया खताचा वापर टाळावा जेणे करुन पिकाची अनावश्यक वाढ होणार नाही व खर्चात बचत होऊन उत्पादनात वाढ होईल. अमोनियम सल्फेट ज्यामध्ये नत्र 20.6 सल्फर 23 टक्के असणाऱ्या खताचा युरिया खतास पर्याय म्हणून वापर केल्यास पिकास हळूहळू अमोनियम सल्फेट मधील नत्र उपलब्ध होईल. पिकास सल्फरची कमतरता भासणार नाही. तसेच जिल्ह्यात नॅनो युरिया उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी युरिया खताचा पर्याय म्हणून नॅनो युरिया खताचा वापर केल्यास युरिया खतामुळे कमी होणारी जमीनीची पोत टाळता येईल व पिकांना त्वरीत वेळेवर नत्र उपलब्ध होईल.

0000

Monday, January 9, 2023

वृत्त क्रमांक 17

 दहावी-बारावी परीक्षेसाठी खाजगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या

विद्यार्थ्यांना अतिविलंब शुल्काने अर्ज करण्याची सुविधा

 

नांदेड (जिमाका) दि. 9 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना फॉर्म नंबर 17 भरुन खाजगी विद्यार्थी म्हणून नाव नोंदणी ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्यासाठी अतिविलंब शुल्काने गुरुवार 12 जानेवारी 2023 पर्यत मुदतवाढ देण्यात आली आहे.


फेब्रुवारी-मार्च
 2023 मध्ये होणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी व माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेस खाजगी रित्या प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव नोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीने अतिविलंब शुल्काने स्विकारण्याचा कालावधी 25 नोव्हेंबर 2022 मुदतवाढीने निश्चित करण्यात आला होता. खाजगीरित्या इयत्ता 10 वी इयत्ता 12 वी साठी प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांचे नावनोंदणी अर्ज अतिविलंब शुल्काने ऑनलाईन पध्दतीने स्विकारणाच्या अंतिम मुदतवाढीच्या तारखा पुढीलप्रमाणे आहेत.


अतिविलंब शुल्कासह निर्धारित अंतिम मुदत याप्रमाणे आहे. माध्यमिक शाळांनी/कनिष्ठ महाविद्यालयांनी अति विलंब शुल्क रु.
 20/- प्रती विद्यार्थी प्रतीदिन स्विकारुन विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने नाव नोंदणी अर्ज भरावयाच्या तारखा मंगळवार 10 जानेवारी 2023 ते गुरुवार 12 जानेवारी 2023 या कालावधीत भरावयाचा आहेत. खाजगी विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावी ते इयत्ता बारावीसाठी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीनेच भरावयाचे आहेत. त्यामुळे कोणाचाही ऑफलाईन अर्ज स्विकारला जाणार नाही याची नोंद घ्यावी. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील वेबसाईटचा वापर करावा. अर्ज भरण्यासाठीच्या सूचना संकेतस्थळावर मराठी / इंग्रजीमधून उपलब्ध आहेत. त्या वाचून अर्ज भरण्यास सुरुवात करावी. संकेतस्थळ इयत्ता दहावीसाठी http://form17.mh-ssc.ac.in , इयत्ता बारावीसाठी http://form17.mh-hsc.ac.in हे आहे.


विद्यार्थ्यांने अर्ज भरण्याकरिता शाळा सोडल्याचा दाखला (मूळ प्रत) नसल्यास द्वितीय प्रत व प्रतिज्ञापत्र,
 आधारकार्ड, स्वत:चा पासपोर्ट आकारातील फोटो स्वत:जवळ ठेवावा. ऑनलाईन अर्ज भरताना सदर कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावयाची आहेत. कागदपत्रे स्कॅन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्कॅनर/ मोबाईलद्वारे कागदपत्रांचे फोटो काढून ते अपलोड करावेत. विद्यार्थ्यांचा मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी पुढील संपर्कासाठी अनिवार्य आहे. संपूर्ण अर्ज भरुन झाल्यावर भरलेल्या अर्जाची प्रत विद्यार्थ्यांला त्याने अर्जात नमूद केलेल्या ई-मेल वर पाठविली जाणार आहे. तसेच या संपूर्ण भरलेल्या अर्जाची प्रिंटआऊट, शुल्क पावती व हमीपत्र यासह दोन प्रतीत काढून घ्यावी. विद्यार्थ्यांनी अर्ज, विहित शुल्काची पावती व मूळ कागदपत्रे नावनोदणी अर्जावर नमूद केलेल्या संपर्क शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामध्ये लगेच दुसऱ्या दिवशी जमा करावयाची आहेत. खाजगी विद्यार्थ्यांसाठी नाव नोंदणी शुल्काचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे. इयत्ता दहावीसाठी 1 हजार रुपये नोंदणी शुल्क + शंभर रुपये प्रक्रिया शुल्क +विलंब शुल्क/अतिविलंब शुल्क, इयत्ता बारावीसाठी पाचशे रुपये नोंदणी शुल्क + शंभर रुपये प्रक्रिया शुल्क + विलंब शुल्क/ अतिविलंब शुल्क राहील.(विलंब शुल्क व अतिविलंब शुल्क नमूद केल्याप्रमाणे शुल्क भरण्यात यावे. )

 

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खाजगी विद्यार्थ्यांची नावनोंदणी ऑनलाईन होणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यास त्यांच्या पत्त्यानुसार व त्याने निवडलेल्या माध्यम निहाय संपर्क केंद्राची यादी दिसेल. त्यापैकी एका संपर्क केंद्राची निवड विद्यार्थ्यांने करावयाची आहे. या संपर्क केंद्राने प्रकल्प, प्रात्यक्षिक परीक्षा, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन, श्रेणी विषयासंदर्भातील कामकाज करावयाचे आहे.


उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खाजगी विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी ऑनलाईन करावयाची आहे. नावनोंदणी करताना विद्यार्थ्यांचा पत्ता व त्यांने निवडलेली शाखा व माध्यम निहाय त्यास कनिष्ठ महाविद्यालयाची यादी दिसेल. त्यामधील एका कनिष्ठ महाविद्यालयाची निवड विद्यार्थ्यांने करावयाची आहे. या कनिष्ठ महाविद्यालयाद्वारे परीक्षा अर्ज,
 प्रकल्प, प्रात्यक्षिक / तोंडी श्रेणी परीक्षा द्यावयाच्या आहेत. याबाबत सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना विभागीय मंडळांनी मार्गदर्शन करावे.


इयत्ता दहावी व बारावी-
 2023 खाजगी विद्यार्थी फॉर्म नं. 17 ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क ऑनलाईन पध्दतीने जसे डेबिट कार्ड, क्रिडिट कार्ड, युपीआय, नेट बँकिंगद्वारे भरणे अनिवार्य राहील. ऑनलाईन पध्दतीने शुल्क जमा केल्यानंतर विद्यार्थ्याला पोचपावती प्राप्त होईल. ही पोचपावती स्वत:जवळ ठेवून त्याच्या दोन छायाप्रती संपर्क केंद्राला देण्यात याव्यात. तसेच एकदा नाव नोंदणी अर्ज सादर केल्यानंतर कोणत्याही कारणास्तव नाव नोंदणी शुल्क विद्यार्थ्यांला परत केले जाणार नाही. तसेच नाव नोंदणी अर्जात दुरुस्ती करावयाची ( उदा. माध्यम, शाखा, संपर्क केंद्र अथवा अन्य कारणास्तव) असल्यास विद्यार्थ्यास पुन:श्च नाव नोंदणी शुल्क जमा करावे लागेल याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.


दिव्यांग विद्यार्थ्यांना खाजगीरित्या प्रविष्ट व्हायचे असेल तर त्यांनी त्यांच्या दिव्यांगत्वाचे जिल्हा शल्य चिकित्सकांच्या / प्राधिकृत केलेल्या हॉस्पिटलच्या प्रमाणपत्राची छायाप्रत प्रमाणित करुन अर्जासोबत सादर करावी व आवश्यकतेनुसार विभागीय मंडळ,
 कनिष्ठ महाविद्यालय, संपर्क केंद्र यांच्याकडून माहिती प्राप्त करुन घ्यावी. ऑनलाईन अर्ज भरतांना कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास कार्यालयीन वेळेत दूरध्वनी क्र. 020-25705207/25705208/25705271 वर संपर्क साधावा. विद्यार्थ्यांना नावनोंदणी प्रमाणपत्र ऑनलाईन देण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी. तसेच विद्यार्थ्यांनी अर्जासोबत छाननीसाठी दिलेली मूळ कागदपत्रे संपर्क केंद्र, कनिष्ठ महाविद्यालयांकडून निर्धारित कालावधीनंतर परत घेवून जाण्याची दक्षता घ्यावी. पात्र विद्यार्थ्यांना नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर त्यांनी परीक्षेची आवेदनपत्रे मंडळाने विहीत केलेल्या कालावधीत परीक्षा शुल्कासह भरणे आवश्यक आहे, याची नोंद विद्यार्थ्यांनी घ्यावी. इय्यता दहावी व बारावी खाजगी विद्यार्थी नावनोंदणी ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी ही अंतिम मुदत आहे. यानंतर कोणत्याही कारणास्तव मुदतवाढ देण्यात येणार नाही याची सर्व विद्यार्थी, पालक, मुख्याध्यापक, प्राचार्य व संबंधित घटकांनी नोंद घेवून दिलेल्या कालावधीतच फॉर्म भरणे बंधनकारक राहील यांची नोंद घ्यावी, असे आवाहन लातूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

00000

वृत्त क्रमांक 16

 सण, उत्सवात ध्वनिक्षेपक वापराची सूट

 

नांदेड, (जिमाका) दि. 9 :- आगामी सण, उत्‍सवात  ध्‍वनी प्रदुषण (नियमन व नियंत्रण) नियमान्वये  ध्‍वनीक्षेपक व ध्‍वनिवर्धक इत्यादी वापराबाबत श्रोतेगृहे, सभागृहे सामुहिक सभागृहे आणि मेजवाणी कक्ष यासारख्‍या बंद जागाखेरीज इतर ठिकाणी जिल्‍ह्याच्‍या निकडीनुसार वर्षामध्ये 15 दिवस निश्चित करुन सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत सुट जाहिर करता येईल, असे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमित केले आहेत.

ध्वनीक्षेपकाचा वापरास शिवजयंती एक दिवसडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती 1 दिवस1 मे महाराष्ट्र दिन एक दिवसगणपती उत्सवात दोन दिवस (पहिला दिवस व अनंत चर्तुदशी), नवरात्री उत्सव तीन दिवस दिवस (पहिला दिवसअष्टमी व नवमी), दिवाळी लक्ष्मीपुजन एक दिवस, ईद ए मिलाद एक दिवस, ख्रिसमस एक दिवस, 31 डिसेंबर एक या दिवसासाठी सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत सुट राहील. तसेच उर्वरित तीन दिवस हे ध्‍वनी प्राधिकरण तथा जिल्‍हा पोलिस अधिक्षक नांदेड यांच्‍या शिफारसीनुसार जिल्‍हातील महत्‍वाच्‍या कार्यक्रमासाठी गरजेनसार जिल्‍हाधिकारी यांच्‍या परवानगीने दिले जाईल. 

 

या सण उत्‍सवासाठी ध्‍वनीवर्धक व ध्‍वनीक्षेपक वापरण्‍याबाबतची सुट जिल्‍हयातील शांतता क्षेत्रासाठी लागू नसून त्‍याची अंमलबजावणी करण्‍याची जाबाबदारी संबंधित महानगरपालिका आयुक्त, स्थानिक स्वराज्य संस्था व ध्वनी प्रदुषण नियंत्रण प्राधिकरण यांची राहील, असेही आदेशात म्हटले आहे. 

0000

Friday, January 6, 2023

 वृत्त क्रमांक 15 

मराठी पत्रकारितेचा पारदर्शी वारसा जपण्यासाठी कटिबद्ध होणे आवश्यक

-   जिल्हाधिकारी अभिजीत राऊत 

· सर्व पत्रकार संघटना व प्रशासनाच्यावतीने पत्रकार दिन साजरा 

नांदेड, (जिमाका) दि. 6 :- समाजातील विविध घटनांचे प्रतिबिंब माध्यमात उमटावे यासाठी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी आपल्या वृत्तपत्राला दर्पण हे नाव निश्चितच विचारपूर्वक दिलेले असेल. दर्पण म्हणजे प्रतिमा, दर्पण म्हणजे किरणांचे पृथ्थकरण, समाजात घडणाऱ्या घटनांविषयी अभ्यास करुन केलेले विवेचन असेही आपल्याला म्हणता येईल. वृत्तपत्राचा पारदर्शी वारसा आपल्याला आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दिला असून हा वारसा तेवढयाच समर्थपणे जपण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. 

दर्पण दिनानिमित्त आज डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवनात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्ह्यातील विविध पत्रकार संघटना, जिल्हा प्रशासन, महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या पत्रकार दिनाच्या कार्यक्रमास जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, जेष्ठ पत्रकार अनिकेत कुलकर्णी, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, संपादक केशव घोणसे पाटील, संतोष पांडागळे यांच्यासह विविध मुद्रीत, ईलेक्ट्रॉनिक, छायाचित्रकार माध्यम प्रतिनिधी यांची उपस्थिती होती. 

माध्यमातील तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आपण अनेक बदल अनुभवत आहोत. एखाद्या घटनेबद्दलचे भाष्य समाजाच्या तळागाळापर्यत काही मिनिटात पोहचविणे शक्य झाले आहे. याचाच अर्थ आपल्यावरची विश्वासाहर्ततेची जबाबदारी वाढली आहे. एका बाजूला अभिव्यक्तीमुळे आपल्याला स्वातंत्र्य असले तरी या स्वातंत्र्याचे मूल्य जपण्यासाठी माध्यमातील प्रतिनिधीनी आपली आचारसंहिता तयार करुन त्याचा सन्मान केला पाहिजे, असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले. 

पत्रकारितेच्या क्षेत्रात अभ्यासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. माध्यमात काम करणाऱ्या व्यक्तीचा ग्रंथालयाशी अधिक संपर्क असेल तर लिखानामध्ये अधिक परिपक्वता येवू शकते. नव्या पिढीतील पत्रकारांनी आपले चौफेर वाचन करणे आवश्यक असून नवीन ज्ञानाच्या लालसेत सदा आग्रही राहीले पाहिजे असे जेष्ठ पत्रकार अनिकेल कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतात सांगितले. 

वैचारिक मतभेद असणे हे जागरुकतेचे लक्षण आहे. तथापि असे मतभेद एका ठराविक मर्यादेपर्यंत असले पाहिजेत. माध्यमात काम करतांना परस्पर समन्वय व आपआपसातील सौहार्दता तेवढीच महत्त्वाची असते. ही सौहार्दता वाढण्यासाठी सर्व पत्रकार सर्वांशी योग्य समन्वय ठेवतील, असा विश्वास जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी व्यक्त केला. मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांनी पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या. 

सुरुवातीला दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने सर्व मान्यवर पत्रकारांना गुलाबपुष्प देवून स्वागत करण्यात आले. यावेळी दै. गोदातीर समाचारचे संपादक केशव घोणसे पाटील, दै. सामनाचे जिल्हा प्रतिनिधी विजय जोशी, दै. नांदेड टाइम्सचे संपादक मुन्तजोबोद्दीन मुनिरोद्दीन, इलेक्ट्रॉनिक मिडीयाचे योगेश लाठकर, प्रकाश काबंळे यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी प्रास्ताविक केले तर सर्व पत्रकार संघटनाच्यावतीने राम तरटे यांनी आभार मानले.

00000






सुधारित वृत्त क्रमांक 14

 उजवीकडून चाला हे अभियान

रस्ते अपघातात निष्पाप पादचाऱ्यांचे बळी रोखण्यास प्रभावी

- प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शशिकांत बांगर 

नांदेड, (जिमाका) दि. 6 :- रस्त्यावर होणाऱ्या अपघातात केवळ वाहन चालकांनाच दोष देऊन चालणार नाही. इतर असंख्य घटक अपघाताला कारणीभूत असतात. रस्त्यावरील पादचाऱ्यांना होणारे अपघात हे वाहनचालक आणि पादचारी या दोघांनी काळजी घेतली तर कमी होऊ शकतात हे आपण लक्षात घेतले पाहिजे. रस्त्याच्या उजव्या बाजुने चालल्यास समोरून येणाऱ्या वाहनाचा निश्चित अंदाज बांधून पादचाऱ्यांना आपली सुरक्षितता घेता येऊ शकते. यादृष्टिने वॉक ऑन राईट अर्थात रस्त्याच्या उजव्या बाजुने चाला ही मोहिम खूप महत्वाची असल्याचे प्रतिपादन प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शशिकांत बांगर यांनी केले. 

वॉक ऑन राईट अर्थात रस्त्याच्या उजव्या बाजुने चाला या अभिनव मोहिमेच्या शुभारंभानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात आयोजित केलेल्या या कार्यक्रमास जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव दलजीत कौर जज, प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत व मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती. 

वर्षांनुवर्षे आपल्यावर डाव्या बाजुने चालण्याचे संस्कार झाले आहेत. पूर्वीचा काळ वेगळा होता. आता वाहनांची वाढलेली प्रचंड संख्या, वाढलेले महानगरे, लोकसंख्या यांचा समन्वय साधत जर सेवासुविधांचा विचार केला तर रस्त्यावर चालतांना पदोपदी काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. त्या-त्या शहरातील उपलब्ध असलेली वाहने नेमकी कोणत्या मार्गाने ये-जा करतात, किती व्यक्तींकडे गाडीबाबतचे आवश्यक कागदपत्रे, वाहन चालक परवाना नुतनीकरणासह उपलब्ध आहे याबाबतचा डाटा असणे आवश्यक आहे. यावरुन त्या-त्या मार्गावरील वाहतुक वर्दळीचा एक निश्चित अंदाज घेता येऊन त्याबाबत नियोजन करता येईल, असे प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शशिकांत बांगर यांनी सांगितले. या डाटासाठी प्राथमिक पातळीवर प्रत्येक कार्यालयाने आपल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची अशी माहिती संकलित करण्याबाबत त्यांनी सूचना केल्या. 

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना रस्त्याच्या उजव्या बाजुने चालण्याबाबत शपथ दिली. कोणत्याही बदलाची सुरूवात ही आपण स्वत:पासून जर केली तर त्याचा व्यापक परिणाम आपल्याला दिसून येतो. यासाठी आपल्या वर्तणात बदल करून उजवीकडे चालण्याची सवय प्रत्येकांनी अंगी बिंबवण्याची अत्यावश्यकता आहे, असे त्यांनी सांगितले. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांनी यावेळी अभियानाला शुभेच्छा दिल्या. प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी आपल्या प्रास्ताविकात या अभियानाचा उद्देश स्पष्ट केला. तर आभार प्रदर्शन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी केले. 

उजव्या बाजूने चालत रॅलीद्वारे

विद्यार्थ्यांनी दिला कृतीशील संदेश

या अभियानाच्या निमित्ताने आयोजित रॅलीस एनसीसी, स्काउट आणि इतर विद्यार्थी-विद्यार्थींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जिल्हाधिकारी कार्यालय येथून दोन मार्गावर जाणाऱ्या रॅलीस जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शशिकांत बांगर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव दलजीत कौर जज व मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीला रवाना केले. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, कलामंदीर, एसपी ऑफीस चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर विद्यार्थी व मान्यवर उजव्या बाजुने चालून या अभियानाची सुरूवात केली. याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालय ते वजिराबाद पोलीस स्टेशन, महावीर चौक, वजिराबाद रोड, एसपी ऑफीस चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व जिल्हाधिकारी कार्यालय मार्गावरही विद्यार्थ्यांचा दुसरा गट उजव्या बाजुने चालून लोकांपर्यंत हा संदेश पोहचविला.

0000








                                     औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक

विभागीय आयुक्त कार्यालयात नियंत्रण कक्षाची स्थापना

 

                  औरंगाबाद, दि.5, (विमाका) : महाराष्ट्र विधान परिषदेच्या औरंगाबाद विभागातील शिक्षक मतदारसंघातील विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक-2022 कार्यक्रम घोषित केला आहे. निवडणुकीसंदर्भातील मतदारांच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी विभागीय स्तरावर 24 तास नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. नियत्रंण कक्षात 0240-2343164 या दुरध्वनी क्रमांक व deg.aurangabad@gmail.com या ई-मेल आयडीवर संपर्क करता येणार आहे.

 

                  नियंत्रण कक्षात नियुक्त अधिकारी, कर्मचारी  दुरध्वनीवर व व ई-मेलवर प्राप्त होणारे सर्व तक्रारी, संदेश स्वीकारतील व तात्काळ नोंदवहीत नोंद घेतील. महत्वाचे व तात्काळ कार्यवाही करणे अपेक्षित असणाऱ्या संदेशाची माहिती दूरध्वनीवरुन वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे. असे विभागीय आयुक्त कार्यालयातील सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. 1 जानेवारी, 2023 पासून स्थापन करण्यात आलेला नियंत्रण कक्ष निवडणुक प्रक्रिया संपेपर्यंत कार्यरत असणार आहे.

*****

 विभागस्तरावरील लोकशाही दिन

निवडणूक आचारसंहितेमुळे रद्द

 औरंगाबाद (विमाका) दि 5 :- महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीमुळे औरंगाबाद विभागामध्ये तात्काळ प्रभावाने निवडणूक आचार संहिता लागू करण्यात आली आहे. या निवडणूक आचार संहितेमुळे 9 जानेवारी रोजी विभागीय आयुक्त कार्यालय, औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आलेला विभागीय लोकशाही दिन रद्द करण्यात आल्याचे सामान्य प्रशासन विभागाचे उप आयुक्त जगदिश मिनियार यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

*****

  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच...