Thursday, August 11, 2022

 नांदेड जिल्हा पोलीस विभागातर्फे

महिला सुरक्षा जनजागृतीसाठी शक्ती रॅली

 

नांदेड (जिमाका), दि. 11 :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आज नांदेड जिल्हा  पोलीस विभागातर्फे महिलांच्या सुरक्षिततेबाबत जनजागृतीच्या उद्देशाने शक्ती रॅलीचे आयोजन करण्यात आले. अडचणीच्यावेळी तात्काळ मदत व्हावी यासाठी मुली व महिलांच्या सुरक्षितेच्यादृष्टिने पोलीस विभागातर्फे शक्ती मोबाईलची निर्मिती करण्यात आली आहे. नांदेड येथे शैक्षणिक केंद्र लक्षात घेता खासगी शिकविणी, महाविद्यालय, शाळा व इतर गर्दीच्या ठिकाणी शक्ती मोबाईल पथक तात्काळ मदतीसाठी तत्पर असेल, असे पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांनी सांगितले. त्यांच्या व पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्या संकल्पनेतून मोबाईल शक्ती पथक याची निर्मिती करण्यात आली आहे.

 

या पथकाबाबत व महिला सुरक्षेबाबत व्यापक जनजागृती साठी खास शक्ती रॅलीचे आज आयोजन आले होते. महापौर जयश्रीताई पावडे यांच्या हस्ते रॅलीचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, नांदेड मनपाचे आयुक्त डॉ. सुनिल लहाने, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, पोलीस उपअधीक्षक डॉ. अश्विनी जगताप यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

 

शक्ती रॅलीचे प्रतिनिधित्व पोलीस उपनिरीक्षक प्रियंका अघाव, गंगुताई नरतावार, रंजना शेळके, क्रांती बंदखडके, शुभांगी जाधव, रेखा चक्रधर, पडगीलवाड, पद्मीन जाधव, सुशिला जानगेवार, सुनिता मलचापुरे, सुनिता मैलवाड, वंदना घुले, बालिका कंधारे, बालिका बरडे, ज्योती गायकवाड, उज्ज्वला सदावर्ते आदी महिला पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी भाग घेतला

 

यावेळी श्री कोठारे, द्वारकादास चिखलीकर, प्रशांत देशपांडे, माणिक बेद्रे, विजय धोंडगे, अनिल चोरमले, शिवाजी लष्करे, श्रीमती एस. एम. कलेटवाड, कमल शिंदे, प्रियंका अघाव, स्नेहा पिंपरखेडे, शेरखान पठाण, विठ्ठल कत्ते यांची परिश्रम घेतले.

00000






 जीवन गाण्यातील संवेदना जेंव्हा कारागृहातील कैदी जपण्यासाठी कटिबद्ध होतात

माणुस म्हणून जगण्यासाठी कटिबद्ध होऊ

- न्यायाधीश श्रीमती डी. एम. जज
· जिल्हा मध्यवर्ती कारागृहात ‘जीवन गाणे गातच जावे’ कार्यक्रम

नांदेड (जिमाका), दि. 11 :- जन्मताच कोणताही व्यक्ती हा गुन्हेगार असत नाही. माणसाची वृत्ती ही गुन्हेगारीच्या पातळीवर कोणालाही घेऊन जाऊ शकते. आपल्याकडून काही तरी गंभीर चुका या झालेल्या आहेत म्हणून तुम्ही आज या कारागृहाच्या भिंतीत बंदिस्त आहात. छोट्या-छोट्या कारणांमुळे माणसाची हिंसक वृत्ती वाढत आहे. याला जर टाळायचे असेल तर आपल्या रागावर नियंत्रण ठेवून सदैव परिवार आणि समाजाचा विचार कराल तेंव्हा तुम्ही गुन्हेगारी वृत्ती पासून प्रवृत्त व्हाल असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तथा न्यायाधीश श्रीमती डी. एम. जज यांनी केले.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वातंत्र्याचे मूल्य व परस्परांवरील विश्वास अधिक दृढ व्हावा, मानवतेचे मूल्य सर्वांपर्यंत पोहचावे या उद्देशाने आज येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांसाठी "जीवन गाणे गातच जावे..." या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, जिल्हा कारागृह अधीक्षक सुभाष सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे हा उपक्रम राज्यातील सर्व कारागृहात घेण्यात आला.

आपण कोणाचे तरी भाऊ आहोत. आपण कोणाचा तरी मुलगा आहोत. आपल्या आई-वडिलांना आपल्या कडून मोठ्या अपेक्षा आहेत. आपण ज्या समाजात राहतो त्या सर्वांचे हित जपण्याचे कर्तव्य एक नागरिक म्हणून आपल्याकडून अभिप्रेत आहे. ज्या चुका आपल्याकडून आयुष्यात घडल्या त्याला इथेच विसरून आपण या बंदिगृहातून बाहेर या. नागरिक म्हणून आपल्या कर्तव्याच्या पालनासह समाजासाठी ही मोठे योगदान भविष्यात आपण द्याल, असा विश्वास जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी व्यक्त केला. कोणताही व्यक्ती जन्मताच गुन्हेगार असत नाही. यावर नितांत विश्वास ठेवा. तुमच्यातही मानवी संवेदना जीवंत आहेत. एक नागरिक म्हणून आपली देशाला गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.

जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांना; स्वातंत्र्य, देशभक्ती, योगाचे महत्त्व पटावे, त्यांचे प्रबोधन व समुपदेशन व्हावे या उद्देशाने शासनाच्या निर्देशानुसार हा उपक्रम घेत असल्याची माहिती जिल्हा कारागृह अधीक्षक सुभाष सोनवणे यांनी दिली. यावेळी जिल्ह्यातील स्थानिक कलावंत प्रा. कैलास पपुलवाड, प्रजापती भिसे, अभिजित वाघमारे, विजय गजभारे, चंद्रकांत तोरणे, अनिल दुधाटे, सिद्धांत दिग्रसकर, वैष्णवी इंगळे, अंजली आदींनी देशभक्तीपर गिते सादर केली.
0000


Wednesday, August 10, 2022

 रानभाजी महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद 

नांदेड (जिमाका) दि. 10 :- जागतिक आदिवासी दिनाचे व  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे  औचित्य साधून येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात रानभाजी महोत्सवाचे आयोजन आज करण्यात आले. या महोत्सवास शेतकऱ्यांचा व नांदेड शहरातील नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी नांदेड डॉ. विपीन इटनकरअपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशीनिवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी  यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. या कार्यक्रमासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा रविशंकर चलवदेप्रकल्प उपसंचालक एम.आर. सोनवणे,  उपविभागीय कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारीतालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

याप्रसंगी आदिवासी महिला शेतकऱ्यांचा सन्मान भाजीपाला बियाणाचे मिनिट देऊन करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या संकल्पनेतून रानभाजी महोत्सवाचे आयोजन मागील दोन  वर्षांपासून आयोजीत करण्यात येत आहे. या महोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे करटुलेवाघाटेआघाडाअळू कुंजरकुर्डूलाल माठघोळचुकाकरवंदतरोटासुरकंदतांदुळजानाय भाजीगुळवेल,गुलगुसा इत्यादी रानमेवा विक्रीसाठी उपलब्ध होता.  याच बरोबर सेंद्रिय भाजीपालागुळमोसंबीलोणचे पापडनाचणीचे पापडशेवया बिस्कीटबिब्याची  गोडंबीहळदमिरची पावडरविविध मसालेडाळीज्वारीगायीचे  तूपगौरी चिप्सचे केळीबटाटा चिप्स व इतर उत्पादने,  मशरूम आदी विक्रीसाठी उपलब्ध होते. 

 

जिल्ह्यातील विविध भागातून शेतकरीमहिला गटशेतकरी गट  यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. तसेच त्यांनी मोठ्या प्रमाणावर उत्पादने विक्रीसाठी आणली होती. या संपूर्ण उत्पादनाला मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची मागणी होती आणि या दिवसभरात साधारणतः 4 ते 5 लाखांची उलाढाल झाली आहे. या रानभाज्या महोत्सवातून शेतकऱ्यांना विक्रीसाठी नवे दालन उपलब्ध झाले असून राज्य शासनाच्या संकल्पनेतून हा अतिशय स्तुत्य उपक्रम यशस्वी झाला आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा रविशंकर चलवदे यांनी दिली.

00000




 किनवटचे आदिवासी जेंव्हा फेर धरून अस्मिता दिन साजरा करतात


▪️एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयामार्फत विविध कार्यक्रम
▪️आमदार भीमराव केराम यांच्याकडून पुजार यांचा गौरव

नांदेड (जिमाका) दि. 10 :- महाराष्ट्राच्या सिमेवर असलेल्या किनवट सारख्या आदिवासी तालुक्यात विकासाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्पाने गौरवास्पद काम केले आहे. किनवट तालुक्याला पेसामध्ये घेण्यासाठी इथल्या आदिवासी बांधवांनी दिलेला लढा हा जागरुकतेच्या दृष्टिने तेवढाच महत्वाचा आहे. शासनातर्फे मिळणाऱ्या योजनांबाबत लाभधारक जर जागरूक असेल तर त्याला मिळालेल्या योजनांचे उद्दीष्ट खऱ्या अर्थाने साध्य होते. किर्तीकिरण एच. पुजार यांनी आपल्या कारकिर्दीत योजनांच्या साक्षरतेवर दिलेला भर हा त्यादृष्टिने अत्यंत लाख मोलाचा आहे. त्यांच्या कार्यदक्षतेमुळेच आदिवासींच्या नावे विकास कामांसाठी आलेला निधी हा त्या-त्या विकास कामांवर प्रभावीपणे वापरला गेला या शब्दात आमदार भीमराव केराम यांनी पुजार यांचा गौरव केला.

जागतिक आदिवासी अस्मिता दिनानिमित्त किनवट येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. गोकुंदा येथील गोपीकिशन मंगल कार्यालय येथे आयोजित या कार्यक्रमास सहायक जिल्हाधिकारी किर्तीकिरण पुजार, किनवटचे नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, राजश्रीताई हेमंत पाटील, तहसिलदार मृणाल जाधव, गटविकास अधिकारी धनवे, अनिल तिरमणवार, नारायणराव सिडाम, प्रा. विजय खुपसे, प्रा. किशन मिरासे, प्रकाश गेडाम, संतोष मरसकोल्हे, साजिद खान आदी उपस्थित होते.

आदिवासी विकासाच्या दृष्टीने शासनाने अनेक नाविन्यपूर्ण योजना हाती घेतल्या आहेत. या योजना लाभार्थ्यांपर्यंत प्रामाणिकपणे पोहचविण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. लाभधारकांनीही मिळालेल्या योजनांचा अधिकाधिक चांगल्या पद्धतीने उपयोग करून विकासाची कास धरावी, असे आवाहन किर्तीकिरण एच पुजार यांनी आपल्या प्रास्ताविकात केले.

जागतिक आदिवासी अस्मिता दिनानिमित्त सप्ताहभर आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. यात क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात आल्या. आदिवासी बांधवांनी आपल्या पारंपारिक नृत्याला जपत बदलत्या संदर्भानुसार आपल्या न्याय हक्का संदर्भात नाटीका सादर केल्या. मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले
0000







 नांदेड जिल्ह्यात 7 व्यक्ती कोरोना बाधित

 

नांदेड (जिमाका) दि. 10 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 63 अहवालापैकी आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 3नांदेड ग्रामीण 2, देगलूर 1, बिलोली 1  एकूण 7 अहवाल कोरोना बाधित आढळले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 3 हजार 318 एवढी झाली असून यातील 1 लाख 568 रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 58 रुग्ण उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे. नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरणात 3  व नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गंत गृह विलगीकरणातील 30, खाजगी रुग्णालय 1 असे एकूण 34 रुग्णाला उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण 40, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरणातील 13, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 4खाजगी रुग्णालय 1 असे एकुण 58 व्यक्ती उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत सहभाग घ्यावा. याचबरोबर मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 9 लाख 14 हजार 635
एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 93 हजार 917
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 3 हजार 318
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 लाख 568
एकुण मृत्यू संख्या-2 हजार 692
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.33 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-00
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 04
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-58
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-00
0000

 कारागृहातील कैद्यांकरीता; प्रबोधनात्मक, सांस्कृतिक व समुपदेशनात्मक कार्यक्रमांचे आयोजन 

एकाच दिवशी एकाच वेळी, संपूर्ण राज्यातील ३६ प्रमुख "जिल्हा मध्यवर्ती कारागृहात" संपन्न होणार "जीवन गाणे गातच जावे..." हा कार्यक्रम

मुंबई, दि. (९ ऑगस्ट): राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील प्रमुख "जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील" कैद्यांसाठी; दिनांक ११ ऑगस्ट रोजी, "जीवन गाणे गातच जावे..." या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्य विभागाने दिली आहे. समुपदेशन, प्रबोधन व सांस्कृतिक कार्यक्रमातून सदर कार्यक्रम सादर होणार आहे.

देशात सध्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. महाराष्ट्रात ही विविध कार्यक्रम/उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या अंतर्गतच "स्वराज्य महोत्सव" निमीत्त, महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालया मार्फत विविध सांस्कृतिक, देशभक्तीपर, थोर संत, जेष्ठ साहित्यीक व कवी, थोर महापुरुष  यांच्या जीवनकार्यावर आधारीत विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन संपुर्ण राज्यभर करण्यात येत आहे.

जिल्हा मध्यवर्ती कारागृहात असलेल्या कैदयांना; स्वातंत्र्य, देशभक्ती, योगाचे महत्व, प्रबोधन व समुपदेशन करणाऱ्या या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उदघाटन दिनांक ११ ऑगस्ट, रोजी सकाळी ११.०० वाजता संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे. 

कैदयांकरीता आयोजित या कार्यक्रमात, महाराष्ट्रच्या लोककले सोबतच, कैदयांचे प्रबोधन, योगा चे महत्व, देशभक्ती भावना जागृत करणाऱ्या विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्याचा सांस्कृतिक विभाग व गृह विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम राज्यभर आयोजित करण्यात आलेला आहे. 

या कार्यक्रमात जिल्हा मध्यवर्ती कारागृहात असणाऱ्या कैदयांनाही त्यांचे कलागुण सादर करण्याची संधी मिळणार आहे. जिल्हा मध्यवर्ती कारागृहात आयोजित  आजपर्यत एकाच वेळी ३६ जिल्हा मध्यवर्ती कारागृहात कैदयाकरीता कार्यक्रम करण्याचा महाराष्ट्र तसेच देशातील  हा पहिलाच अभिनव असा उपक्रम आहे.

0000

 देश का सिपाही हू चा नारा देत

6 लाख विद्यार्थ्यांनी दिला घरोघरी तिरंगाचा संदेश

 

जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम,

जिल्ह्यातील सर्व शाळा सहभागी,

अवघ्या 2 दिवसात केले नियोजन,

 

नांदेड (जिमाका) दि. 10 :- जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा आज नव्या आत्मविश्वासाने गलबलून गेल्या. निमित्त होते भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व घरोघरी तिरंगा उपक्रम. जिल्ह्यातील सुमारे 6 लाख विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर सामुहिक गीत गायनाच्या माध्यमातून देशाप्रती कृतज्ञता वृद्धिंगत व्हावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी अत्यंत कल्पकतेतून सर्व अधिकारी, मुख्याध्यापकांच्या समन्वयातून हा उपक्रम यशस्वी करून दाखविला. जिल्ह्यातील खासगी शाळांसह एकुण 3 हजार 739 शाळा या अभिनव उपक्रमात सहभागी झाल्या. सुमारे 6 लाख 80 हजार विद्यार्थ्यांनी आपली कृतज्ञता या उपक्रमातून दृढ केली तर 24 हजार 400 शिक्षकांनी यात उर्त्स्फूत समन्वय साधत शाळांच्या क्रीडांगणांना देशभक्तीने सजवले.   

 

मी याच शाळेत शिक्षण घेऊन लोकप्रतिनिधी झालो. या अभिनव उपक्रमात सहभागी होतांना मला विशेष आनंद होत असून प्रत्येक नागरिकांनी देशाप्रती कृतज्ञता बाळगून घरोघरी तिरंगासाठी पुढे सरसावे, असे आवाहन आमदार मोहनअण्णा हंबर्डे यांनी केले. या उपक्रमाच्या प्रातिनिधीक शुभारंभाच्या निमित्ताने ते बोलत होते. येत्या 13 ते 15 ऑगस्ट कालावधीत आपण घरोघरी तिरंगा हे अभियान राबवित आहोत. त्यात लोकांनी अधिकाधिक सहभाग घ्यावा, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले.

 

शाळेचे विद्यार्थी हे देशाची संपत्ती आहे. निर्मळ भावना घेऊन विद्यार्थी देशाप्रती सदैव तत्पर असतात. घरोघरी तिरंगा हे अभियान संपूर्ण जिल्हाभर यशस्वी करण्यात जिल्ह्यातील विविध शाळांचे सुमारे 6 लाख 80 हजार विद्यार्थी आपल्या घरावर तिरंगा फडकवून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाला कृतज्ञतेने साक्षीदार होतील असा विश्वास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी व्यक्त केला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलासराव हंबर्डे, सरपंच संध्याताई देशमुख, जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी सविता बिरगे, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर व मान्यवर उपस्थित होते.

 

या विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाला बळ देण्यासाठी जिल्हा पोलीस विभागाने आपले बँड पथक खास सादरीकरणासाठी नियुक्त केले होते. या पथकाने विजयकुमार धोंडगे व श्री. वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रगीताची धून व देशभक्तीपर गीत सादर केले. विद्यार्थ्यांनी एक लय व ताल सुरात देशभक्तीपर दहा गाणे सादर केली. यात वंदे मातरम, जयोस्तुते श्री मह्ममंगले, नन्ना मुन्ना राही हू, आओ बच्चो तुम्हे दिखाये, छोडो कल की बाते, हम होंगे कामयाब, सारे जहाँ से अच्छा, विजयी विश्व तिरंगा प्यारा, बलसागर भारत होवो व ये देश है वीर जवानों का.. या देशभक्‍तीपर गीतांचा  समावेश होता.

0000






  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच...