Saturday, July 7, 2018

राज्य शासनाची संवाद वारी पंढरीच्या दारी
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा उपक्रम:शासनांच्या विविध योजना,उपक्रमांचे प्रसारण

पुणे दि. 6 : अवघा महाराष्ट्र आता भक्तीमय झाला आहे. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकारामच्या जयघोषात, टाळ-मृदुंगाच्या गजरात आषाढी वारीला सुरुवात झाली आहे. दिंड्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाल्या आहेत. मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या भक्तगणांमुळे महाराष्ट्र वारीमय झाला आहे. या भक्त मेळ्यात यंदा महाराष्ट्र शासनाचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालय संवाद वारीहा अभिनव उपक्रम घेऊन सहभागी झाले आहे. यातून शासनाच्या अनेकविध योजना, उपक्रम विविध घटकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आहे.
संवाद वारीद्वारे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा व श्री संत तुकाराम पालखी सोहळा या दोन्ही मार्गावर पालखीच्या मुक्कामाच्या ठिकाणी प्रदर्शन, पथनाट्य, कलापथक उपक्रम आयोजित केले आहेत. शासनाच्या शेती आणि ग्राम विकासाशी निगडीत विविध योजना, उपक्रमांची माहिती या संवाद वारीतून दिली जाणार आहे. गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, अखंड वीजपुरवठा,गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, मुख्यमंत्री सहाय्यता निधी, बाजार समित्यामध्ये सुधारणा, डिजिटल सात-बारा,उन्नत शेती - समृद्ध शेतकरी, महात्मा फुले जन आरोग्य योजना अशा विविध योजनांच्या माहितीचा यात समावेश असेल.
पंढरपूर येथे आयोजित केल्या जाणाऱ्या पाच दिवसांकरिताच्या भव्य प्रदर्शनात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या संवाद वारीचे दालन असणार आहे. श्री संत तुकाराम महाराज पालखी आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर या संवाद वारीचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा प्रारंभ पुण्यातून झाला आहे.
कार्यक्रमाचे ठिकाण व तारीख :
श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्ग - 

पुणे येथे दि. ७, ८ व ९ जुलै, 
लोणी काळभोर - दि. ९,
 
यवत - दि. ९, १० व ११,
 
बारामती- दि. ११, १२, १३ व १४,
 
निमगाव केतकी - दि. १४ व १५,
 
बेलवंडी- दि. १५,
 
इंदापूर- दि. १५, १६, १७,
 
अकलूज- दि. १७, १८, १९,
 
वाखरी- दि. १९, २०, २१, २२,
 
पंढरपूर- दि. २२ ते २५ जुलै.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग -

सासवड- दि. ९ व १० जुलै, 
जेजुरी- दि. १०, ११, १२, 
लोणंद-दि. १२ व १३,
 
तरडगाव- दि. १३ व १४,
 
फलटण- दि. १४, १५, १६,
 
नातेपुते- दि. १६ व १७,
 
माळशिरस- दि. १७, १८,
 
वेळापूर- दि. १८ व १९,
 
भंडीशेगाव- दि. २०,
 
बाजीराव विहीर- दि. २० व २१,
 
पंढरपूर- २१ ते २५ जुलै.

दोन्ही पालखी मार्गावर विशेष चित्ररथ देखील सहभागी होणार आहे. शासनाची महसूल यंत्रणा, महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत, मंदिर व संस्थान यांच्या सहकार्याने संवाद वारीचे आयोजन करण्यात आले आहे.
*****

मुखेड येथे 38 तंबाखू विक्रेत्यांवर कार्यवाही2017       /
            नांदेड, दि. 7 :- तंबाखू नियंत्रण कायदा म्हणजेच कोटपा कायदा २००३ चे उल्लंघन करणे हा दंडनीय गुन्हा आहे. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्ष जिल्हा रुग्णालय नांदेड यांना प्राप्त माहितीनुसार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एच.आर.गुंटूरकर व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकाने मुखेड येथे 6 जुलै रोजी अचानक धाडी टाकण्यात आल्या. या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याने कायदतील तरतुदीनुसार या पथकामार्फत 38 तंबाखू विक्रेते यांचेकडून 17 हजार 300 रुपये दंड आकारण्यात आला.
पथकात जिल्हा सल्लागार डॉ. साईप्रसाद शिंदे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. अर्चना तिवारी, समन्वयक डॉ. प्रदीप बोरसे तथा सामाजिक कार्यकर्ता बालाजी गायकवाड तसेच मुखेड उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. शंकपाळे, डॉ. शेख समीर तथा शहनवाझ शेख व स्थानिक पोलीस सुभाष राठोड तथा चातरवाड, पांडागळे आदी होते.
जिल्ह्यात कोटपा कायदाचे उल्लंघन करणारे तसेच शैक्षणिक अथवा शासकीय कार्यालयाच्या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री होत असल्यास जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष जिल्हा रुग्णालय नांदेड येथे तक्रार नोंदवून नांदेड जिल्हा तंबाखू मुक्त करण्याच्या अभियानास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक यांनी केले आहे.
00000


भारतीय डाक विभागाच्यावतीने
"प्रिय मेरे देश के नाम खत" या विषयावर
राष्ट्रीय पत्र लेखन स्पर्धा
नांदेड, दि. 7 :-  भारतीय डाक विभागाच्यावतीने राष्ट्रीय स्तरावर पत्र लेख स्पर्धा "ढाई आखर"  आयोजीत केली आहे. पत्राचा विषय "प्रिय मेरे देश के नाम खत" हा असून पत्र कोणत्याही भाषेत लिहिता येईल. पत्र मुख्य पोस्ट मास्तर जनरल मुंबई यांच्या नावे लिहून डाक घरामार्फत लावलेल्या विशेष टपाल पेटीत सोमवार 30 सप्टेंबर 2018 पर्यंत टाकावयाचे आहे. 
पत्र लेखन स्पर्धा 18 वर्षापर्यंत एक गट व 18 वर्षावरील दुसरा गटात विभागलेली आहे. स्पर्धकांनी 1 जानेवारी 2018 रोजी स्वत:चे वय 18 वर्षापेक्षा कमी किंवा जास्त आहे याबाबत उल्लेख करावा. तसेच नाव पत्त्यासोबत वयाचा उल्लेख आवश्यक आहे. पाकिटातून पत्र पाठविण्यासाठी 1 हजार शब्द मर्यादा तर अंतर्देशीय पत्रासाठी 500 शब्द मर्यादा राहील. मुदतीनंतर पाठवलेल्या पत्राचा पत्र लेखन स्पर्धेत समावेश होणार नाही.
राज्यस्तर उत्कृष्ट पत्रासाठी अनुक्रमे 25 हजार रुपये, 10 हजार रुपये व 5 हजार रुपये पारितोषीक राहील. राज्यस्तरातून प्रत्येक गटातून निवडलेल्या तीन उत्कृष्ट पत्राचा राष्ट्रीय स्तरावर पाठविण्यात येईल. राष्ट्रीय स्तरावर निवडलेल्या उत्कृष्ट पत्रासाठी अनुक्रमे 50 हजार रुपये, 25 हजार रुपये, 10 हजार रुपये पारितोषीत देण्यात येईल. जास्तीत जास्त नागरिकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन नांदेड विभागाचे अधीक्षक डाकघर एस. बी. लिंगायत यांनी केले आहे.  
00000

Friday, July 6, 2018


शासकीय अध्यापक महाविद्यालय
परिसरात विविध वृक्षांचे रोपण
नांदेड, दि. 7 :- येथील शासकीय अध्यापक महाविद्यालय परिसरात माजी मुख्यमंत्री व हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची जयंती दिनी प्राचार्य डॉ. सुनंदा रोडगे यांच्या हस्ते विविध जातीच्या वृक्षांचे रोपण करण्यात आले. पर्यावरण जागृतीसाठी निबंध स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, द्वितीय वर्षाचे प्रशिक्षणार्थी, कर्मचाऱ्यांनी वृक्षारोपण केले.
000000


जिल्ह्यात गत 24 तासात
सरासरी 16.49 मि. मी. पाऊस
नांदेड, दि. 7 :- जिल्ह्यात शनिवार 7 जुलै 2018 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 16.49 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून दिवसभरात एकूण 263.80 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 293.03 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 31.15 टक्के एवढा पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात 7 जुलै 2018 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुका निहाय पुढील प्रमाणे कंसात एकूण पाऊस : नांदेड- 14.50 (363.54), मुदखेड- 15.33 (479.68), अर्धापूर- 16.67 (323.68), भोकर- 24.50 (423.50), उमरी- 20.33 (309.64), कंधार- 4.67 (298.83), लोहा-4.83 (309.98), किनवट- 26.00 (222.28), माहूर-22.75 (312.25), हदगाव- 33.29 (370.72), हिमायतनगर- 52.00 (362.35), देगलूर- 3.17 (120.17), बिलोली- 6.60 (191.00), धर्माबाद- 8.67 (221.32), नायगाव- 7.20 (234.80), मुखेड- 3.29 (144.70). आज अखेर पावसाची सरासरी 293.03 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 4688.44) मिलीमीटर आहे.
00000


सैन्यदलात अधिकारी पदाच्या
भरतीसाठी मोफत पूर्व प्रशिक्षण
नांदेड, दि. 6 :-  भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये  अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (SSB) या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेणेसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड नाशिक येथे राज्य शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतीसाठी बुधवार 18 जुलै ते शुक्रवार 27 जुलै 2018 या कालावधीत एसएसबी कोर्स क्र. 47 चे आयोजन करण्यात येत आहे. या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थीची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची नि:शुल्क सोय करण्यात आली आहे.
नांदेड जिल्ह्यातील इच्छूक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नांदेड येथे शुक्रवार 13 जुलै 2018 रोजी मुलाखतीस उपस्थित रहावे. मुलाखतीस येण्याआधी PCTC Training च्या Google Plus पेज वरती किंवा सैनिक कल्याण विभाग पुणे यांच्या संकेतस्थळावर www.mahasainik.com वरील Recruitment Tab ला क्लीक करुन त्यामधील उपलब्ध Cheek List आणि महत्वाच्या तारखा यांचे अवलोकन करुन त्याची दोन प्रतीमध्ये प्रिंट काढून तसेच त्यामध्ये दिलेले सर्व परिशिष्ट डाऊलोड करुन त्यांचीही दोन प्रतीमध्ये प्रिंट काढून ते पूर्ण भरुन आणावे.
केंद्रामध्ये एस.एस.बी. कोर्समध्ये प्रवेश मिळण्यासाठी पुढील नमूद कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे व त्यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र कोर्सला येताना घेऊन येणे आवश्यक आहे. कंम्बाईड डिफेन्स सर्व्हीसेस एक्झामिनेशन (सीडीएसई-युपीएससी) अथवा नॅशनल डिफेंस ॲकेडमी एक्झामिनेशन (एनडीए-युपीएससी) पास झालेली असावी व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. एनसीसी सी  प्रमाणपत्र किंवा बी ग्रेडमध्ये पास झालेले असावे व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी. टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस.एस.बी. मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. University Entry Scheme साठी एसएसबी कॉल लेटर असावे किंवा एसएसबीसाठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.
अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड नाशिक यांचा दूरध्वनी नंबर 0253-2451031 आणि 2451032 असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा, असे आवाहन मेजर सुभाष  सासने, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, नांदेड यांनी केले आहे.  
00000


जिल्ह्यात गत 24 तासात
सरासरी 17.73 मि. मी. पाऊस
नांदेड, दि. 6 :- जिल्ह्यात शुक्रवार 6 जुलै 2018 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 17.73 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून दिवसभरात एकूण 283.65 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 276.54 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 29.48 टक्के एवढा पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात 6 जुलै 2018 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुका निहाय पुढील प्रमाणे कंसात एकूण पाऊस : नांदेड- 27.13 (349.04), मुदखेड- 25.67 (464.35), अर्धापूर- 34.00 (307.01), भोकर- 28.75 (399.00), उमरी- 23.00 (289.31), कंधार- 12.33 (294.16), लोहा- 22.17 (305.15), किनवट- 16.43 (196.28), माहूर-25.75 (289.50), हदगाव- 13.71 (337.43), हिमायतनगर- 12.00 (310.35), देगलूर- 14.00 (117.00), बिलोली- 6.80 (184.40), धर्माबाद- 6.00 (212.65), नायगाव- 8.20 (227.60), मुखेड- 7.71 (141.41). आज अखेर पावसाची सरासरी 276.54 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 4424.64) मिलीमीटर आहे.
00000


  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच...