फायदेशीर शेतीसाठी उच्च कृषि तंत्रज्ञान अत्यावश्यक
- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत
· शेतकऱ्यांनी नवतंत्रज्ञान अवगत करुन कृषी उद्योजक व्हावे
नांदेड (जिमाका) दि. 1 :- शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीचा अवलंब करुन शेती करावी. शेती करतांना नवतंत्रज्ञान अवगत करुन कृषी उद्योजक होण्यावर भर द्यावा. बाजारात कोणत्या उत्पादनाची मागणी आहे याचा विचार करुन विकेल ते पिकेल या धोरणानुसार उत्पादन घ्यावे. फायदेशीर शेतीसाठी शेतकऱ्यांकडे उच्च कृषि तंत्रज्ञान अत्यावश्यक असल्याचे, प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. कृषि महोत्सव व माविमच्या बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तुचे प्रदर्शन व विक्री मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
कृषि विभाग व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) नांदेड, महिला आर्थिक विकास महामंडळ, महिला व बालविकास विभाग नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने कृषि महोत्सवाचे आयोजन कृषी उत्पन्न बाजार समिती मैदान नवा मोंढा नांदेड येथे करण्यात आले. यावेळी विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव दलजित कौर जज, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे, प्रकल्प उपसंचालक, आत्मा सौ. एम. आर. सोनवणे, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी चंदनसिंग राठोड, शास्त्रज्ञ डॉ. देविकांत
शेतकऱ्यांनी शेतीबरोबरच शेतमालावर आधारित उद्योग उभारावेत. उत्पादन वाढून उत्पादनाच्या विक्रीवरही भर द्यावा यातून शेतकऱ्यांना जास्त लाभ होईल. कोरोना कालावधीत शेती व शेती व्यवसायाने साथ दिल्यामुळे बाजारपेठ सुरू राहिली हे विसरता येणार नाही. शेतीची उन्नती झाल्याशिवाय आपली प्रगती नाही. नैराश्यग्रस्त शेतकऱ्यांची मानसिकता बदलण्यासाठी प्रगतीशील शेतकऱ्यांनी सर्वोतोपरी सहकार्य करुन त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.
नवीन तंत्रज्ञान, उत्पादने, सर्व योजना, शेतकऱ्यांच्या यशोगाथा तसेच जिल्ह्यातील प्रगतीशील शेतकऱ्यांनी केलेली प्रगती यासह शेतकऱ्यांसाठी अनेक उपयुक्त बाबींची माहिती या मेळाव्यात होईल. शेतीसाठी लागणारे यंत्र, अवजारे यांच्या योजनेची माहिती कृषि विभागाच्या स्टॉलवर मिळेल. तसेच नागरीकांनी आपल्या आरोग्यासाठी आहारात तृणधान्याचा वापर करावा, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांनी प्रास्ताविकात सांगितले. पुढील चार दिवस चालणाऱ्या या कृषि महोत्सवातील स्टॉलला नागरिकांनी भेट देवून शेतकरी व बचत गटातील महिलांनी तयार केलेली उत्पादने खरेदी करावेत, असेही आवाहन श्री. चलवदे यांनी केले.
महिलांच्या आर्थिक प्रगतीसाठी
बचतगटाची चळवळ मोलाची
- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत
या कृषी महोत्सवात महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत बचत गटांतील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तुचे प्रदर्शन व मेळाव्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षम होत आहेत. बचत गटांमुळे त्यांना आर्थिक उन्नतीचा मार्ग मिळाला असून त्या स्वत: चे उत्पादन तयार करीत आहेत, ही अभिमानाची बाब आहे. महिलांच्या आर्थिक प्रगतीसाठी बचत गटाची चळवळ मोलाची असल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले.
माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी चंदनसिंग राठोड यांनी प्रास्ताविक करुन बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या वस्तुचे उत्पादन, विक्री याबाबत माहिती दिली. यावेळी न्यायाधीश दलजित कौर जज, शास्त्रज्ञ देविकांत देशमुख, डॉ. शिवाजी शिंदे, प्रल्हाद इंगोले आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
0000




No comments:
Post a Comment