Monday, June 6, 2022

 छत्रपती शिवरायांचा लोक कल्याणकारी

समृद्व वारसा जपण्यासाठी कटिबध्द होवू

-         पालकमंत्री अशोक चव्हाण

शिवस्वराज दिन उत्साहात साजरा

 

नांदेड, (जिमाका) दि. 6 :- छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य हे सर्वार्थाने सुराज्य होते. प्रजेच्या कल्याणाचा वसा त्यांनी आयुष्यभर जपला. बहुजन हिताय, बहुजन सुखाय याची प्रचिती रयतेने अनुभवली. लोक कल्याणाचा, शेतकरी, कष्टकरी, बहुजनाच्या हिताचा समृद्व वारसा ग्रामीण भागापर्यत या शिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने पोहचवित आहोत. या दिनाच्या निमित्ताने सर्वानी प्रेरणा घेत लोककल्याणाप्रती कटिबध्द होण्याचे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या शुभ संदेशात केले.


 

जिल्हा परिषदेच्या प्रांगणात आज शिवस्वराज दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे व मान्यवरांच्या हस्ते भगव्या स्वराज्य ध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारून अभिवादन करण्यात आले. यानंतर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या शुभेच्छा संदेशाचे वाचन जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे यांनी केले.


जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकरमनपाचे आयुक्त डॉ. सुनील लहानेअतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबाकलेसामान्य प्रशान विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरेमुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रकाश चन्नाजिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नामदेव केंद्रेउप मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही.आर. पाटीलउप मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम-कदममाध्यमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकरकृषी अधिकारी टि.जी. चिमनशेट्टेजिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. भुपेंद्र बोधनकरउप शिक्षणाधिकारी बंडू आमदूरकर यांच्यासह जिल्हा परिषदेचे खाते प्रमुखअधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती. 


छत्रपती शिवाजी महाराज हे अवघ्या महाराष्ट्राचे प्रेरणा स्त्रोत आहेत. आई जीजाऊच्या मार्गदर्शनाखाली बालपणापासूनच त्यांनी शौर्याचे धडे गिरवत स्वराज्याचे तोरण बांधले. हे राज्य सुखी व्हावे, हे राज्य रयतेचे व्हावे यासाठी त्यांनी आजच्या दिवशी म्हणजे 6 जून 1674 रोजी स्वराज्याचे तोरण बांधले. एका समृध्द्व नितीचा, जनकल्याणाचा वारसा त्यांनी आपल्याला दिला आहे. हा वारसा प्रत्येक ग्रामपंचायती मार्फत, पंचायत समिती मार्फत, जिल्हा परिषदेमार्फत आपण आज सर्वांपर्यत अप्रत्यक्षरित्या पोहचवित आहोत. या दिनापासून आपण सर्वजण प्रेरणा घेवू या शब्दात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी शुभेच्छा दिल्या.    

याप्रसंगी शाहीर रमेश गिरी व संचानी महाराष्ट्र गीत सादर केले. फत्तेपुर येथील जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्यांनी केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व्यंकटेश चौधरी यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

000000

Sunday, June 5, 2022

 विशेष लेख : 

गावोगावी पोहचावी

शिवस्वराज्य दिना” ची प्रेरणा

 

6 जून 1674 शिवराज्याभिषेक दिन

जच्या पवित्र दिवशी म्हणजेच 6 जून 1674 ला छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर स्वराज्याभिषेक झाला. हा स्वराज्याभिषेक केवळ रायगड किल्ल्या पुरता मर्यादित नव्हता. हा स्वराज्याभिषेक महाराष्ट्राच्या दऱ्या-कोपऱ्यात सर्वसामान्यांच्या मनात, प्रजेच्या मनात असलेल्या आवडत्या राज्याचा स्वराज्यभिषेक होता. हा राजा प्रत्येक रयतेला आपला वाटत होता. तो त्यांच्या नि:पक्ष भूमिकेमुळे. हा राजा प्रत्येकाला आपला वाटत होता तो त्यांच्या लोकल्याणकारी दूरदृष्टीमुळे.

 

लोककल्याणकारी राज्यासाठी कटिबद्धता

रयतेला, प्रजेला, बहुजनांना हे राज्य आपले आहे, अशी विश्वासर्हता छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येकाच्या मनात निर्माण केली. महाराष्ट्राचा हा समृद्ध वारसा असलेली लोककल्याणकारी राज्याची भूमिका व प्रेरणा राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला, पंचायत समितीला, जिल्हा परिषदेला घेता यावी यासाठी महाराष्ट्र शासनाने आजचा दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. या दिनाच्या निमित्ताने राज्यातील सर्व ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद सर्व एकत्र जमून आज स्वराज्याची संकल्पना अधिक दृढ करण्यासाठी कटिबद्ध होत आहेत.

 

दुग्धशर्करा योग !

यावर्षी हा शिवस्वराज्य दिन साजरा करतांना आणखी योगायोग जुळून आलेला आहे. जिल्हा परिषदेच्या स्थापनेचे हे हिरक महोत्सवी वर्षे आहे. याचबरोबर मराठवाडा मुक्तीचेही हे अमृत महोत्सवी वर्षे आहे. ग्रामीण स्वायत्ततेच्या दृष्टीने आपण सत्तेच्या विकेंद्रीकरणाच्यादृष्टीने त्रीस्तरीय पंचायत राज व्यवस्था स्वीकारली. आजवरच्या हीरक महोत्सवी वाटचालीत आपल्या पंचायतराज व्यवस्थेने एक मैलाचा टप्पा गाठला आहे. लोकसहभागासाठी, प्रत्येक गावातील लोकांना आपली ग्रामपंचायत वाटावी, प्रत्येकाच्या विकासाचे प्रतिबिंब त्या ग्रामपंचायतीमध्ये उमटावे यासाठी शासनाने प्रत्येक ग्रामपंचायतींना अधिकार बहाल केले.

 

लोकसहभागातून विकास आराखडा

या अधिकारातूनच प्रत्येक ग्रामपंचायतीला विशेष महत्व आले आहे. गावच्या विकासाचा आराखडा हा लोकसहभागातून, गावातील सर्वांच्या चर्चेतून जर आखला गेला तर त्या गावात होणारे परिवर्तन हे दिर्घकाळ टिकणारे असते याचा प्रत्यय आपण घेतला आहे. कोणत्याही विकास योजनांमध्ये जो पर्यंत लोकसहभागाचे प्रतिबिंब पडत नाही तो पर्यंत त्या विकास योजनेला खरा अर्थ प्राप्त होत नाही. ही योजना माझी आहे, ही योजना माझ्या गावाच्या विकासासाठी आहे असे ज्या गावात वाटते त्या गावांमध्ये विकासाच्या योजना या अधिक जबाबदारीने पूर्ण होतात. जबाबदार लोकशाहीचे, कार्यपद्धतीचे हे द्योतक आहे.

 

प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्था

राज्यातील प्रत्येक भागात, प्रत्येक गावात विकासाची गंगा पोहचावी, सर्वसामान्यांना विकासाच्या योजना मिळाव्यात यासाठी शासन धडपडत असते. ज्या उद्देशाने योजना साकारतात तोच उद्देश घेऊन शेवटच्या पातळीवर, गावपातळीवर त्याची अंमलबजावणी होणे हे सशक्त लोकशाहीचे लक्षण मानले जाते. आजच्या घडीला अनेक गावात लोकसहभागातून जलसंधारणाची, पाणलोटाची चळवळ रूजू पाहते आहे, हे त्या-त्या गावातील लोकांच्या प्रगल्भतेचे आणि जाणिवजागृतीचे प्रतिक आहे. शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी ही त्या जाणिव जागृतीने झाली तर त्यातील नेमका आशय ही लोकांपर्यंत पोहचतो. हा आशय पोहचविण्याची जबाबदारी शासकीय यंत्रणांची आहे. येथील प्रशासकीय यंत्रणा आणि स्थानिक प्रशासन, पंचायत राज व्यवस्था यासाठी कटिबद्ध आहे.

 

नांदेड जिल्ह्यातील गण आणि गट

नांदेड जिल्ह्यात सन 2017 नुसार या त्रीस्तरीय पंचायत राज व्यवस्थेमध्ये जिल्हा परिषद अंतर्गत 63 गटांची संख्या आहे. पंचायत समितीचे 126 गण आहेत तर 1 हजार 310 या ग्रामपंचायती आहेत. हीच गट आणि गण संख्या 1962 मध्ये 45 आणि 90 वर होती. लोकसंख्या वाढीप्रमाणे जिल्हा परिषदेच्या गटसंख्येत वाढ झाली. पंचायत समितीच्या गणात वाढ झाली. सन 1980 साली नांदेड जिल्ह्यात 1 हजार 185 ग्रामपंचायती होत्या. त्यात भर पडून आजच्या घडीला ही संख्या 1 हजार 310 एवढी आहे. लोकशाहीच्या सशक्तीकरणासाठी आवश्यक असलेली ही संख्या जिल्ह्याच्या पंचायतराज व्यवस्थेचे आपण वैभव समजले पाहिजे.

 

असा साजरा व्हावा दिन

या वैभवाच्या माध्यमातून प्रत्येक गावातील नागरिकांपर्यंत शिवस्वराज्य दिनाच्यानिमित्ताने सकारात्मक लोकसहभागाची मूल्य रुजावी यादृष्टीने शासनातर्फे 6 जून हा दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा केला जात आहे. हा दिवस साजरा करतांना महाराष्ट्र शासनाने भगवा स्वराज्य ध्वज संहिता, शिवशक राजदंड स्वराज्य गुढी संहिता याबाबतची माहिती प्रत्येक ग्रामपंचायतींना पाठविण्यात आली आहे. ध्वज हा उच्च प्रतीचे सॅटीन असलेले भगवी जरी पताका असावी. हा ध्वज तीन फूट रूंद आणि सहा फूट लांब या प्रमाणात असावा. म्हणजे लांबी ही रूंदीपेक्षा दुप्पट असावी. ध्वज हा जिरेटोप, सुवर्णहोन, जगदंब तलवार, शिवमुद्रा, वाघनखे या शिवरायांच्या पंच शुभचिन्हांनी अलंकृत असावा.

 

शिवशक राजदंडाचे प्रतीक म्हणून कमीतकमी 15 फुट उंचीचा वासा किंवा बांबु असावा. त्यावर सुवर्ण आणि लाल कापडाची गुंडाळी असावी. राजदंड सरळ उभा करण्यासाठी त्याला किमान 5 ते 6 फुटाचा आधार द्यावा, असे निर्देश शासनाने दिले आहेत. शिवशक राजदंडावर हा स्वराज ध्वज बांधून तो सकाळी 9 वा. उभारून राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत म्हणून याची सांगता करावी. त्याच दिवशी सूर्यास्ताला शिवशक राजदंड स्वराज्य गुढी खाली घेऊन भगवा स्वराज ध्वज सन्मानाने व्यवस्थीत घडी करून ठेवून द्यावा, असेही शासनाच्या निर्देशात स्पष्ट केले आहे.

 

-        विनोद रापतवार, जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड 

Saturday, June 4, 2022

 नांदेड जिल्ह्यात दोन व्यक्ती कोरोना बाधित 

तर एक कोरोना बाधित झाला बरा

 

नांदेड (जिमाका) दि. 4 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 176 अहवालापैकी आरटीपीसीआर तपासणीद्वारे  2 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 2 हजार 803 एवढी झाली असून यातील 1 लाख 109 रुग्णांना उपचारा नंतर बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आजच्या घडीला 2 रुग्ण उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत सहभाग घ्यावा. याचबरोबर मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 1, देगलूर 1 असे एकुण 2 कोरोना बाधित आढळले आहे. आज नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरणातील एका कोरोना बाधिताला औषधोपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण 1, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरणात 1 असे एकुण 2 व्यक्ती उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

 

एकुण घेतलेले स्वॅब- 9 लाख 3 हजार 443

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 83 हजार 359

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 2 हजार 803

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 लाख 109

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 692

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.37 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-2

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-2

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-निरंक.

 

कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. मिशन कवच कुंडल अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

0000

 भोकर येथील रेल्‍वे भुयारी पुलावरील

कामांमुळे वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग

 

नांदेड (जिमाका) दि. 4 :- भोकर येथील रेल्‍वेच्या भुयारी पुलाच्या काम करण्‍यासाठी आंबेडकर चौक (भोकर) -प्रफुल्‍ल नगर (मुदखेड रोड) दरम्‍यानचा रेल्‍वे गेट नं. 3 मधुन जाणारा रस्‍ता सर्व प्रकारच्‍या वाहतूकीस प्रतिबंधीत केला आहे. यासाठी पर्यायी मार्ग (जाण्या-येण्यासाठी) आंबेडकर चौक (भोकर)- प्रफुल्‍लनगर (मुदखेड रोड) दरम्‍यानच्‍या नव्‍याने तयार झालेल्‍या उड्डान पुलावरुन वळविण्यात आला आहे.

 

मोटार वाहन  कायदा 1988  चे कलम 115 मधील  तरतुदीनुसार जिल्‍हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी  दिनांक 4  ते 13 जून 2022 या कालावधी पर्यंत वर नमुद केलेल्‍या पर्यायी मार्गाने सर्व प्रकारची वाहने वळविण्‍यास मान्‍यता दिली आहे. संबधीत विभागाने पुढील उपाययोजना कराव्यात. पोलीस निरीक्षक भोकर यांनी कायदा व  सुव्‍यवस्‍थेच्‍या अनुषंगाने आवश्‍यक ती उपाययोजना करावी. उपमुख्‍य  अभियंता, दक्षिण मध्‍य रेल्‍वे नांदेड यांनी रस्‍ता वाहतूक प्रतिबंध व पर्यायी रस्‍त्‍यासाठी आवश्‍यक असलेले बोर्ड चिन्‍ह लावणे इत्‍यादी बाबतची कार्यवाही करावी, असे अधिसूचनेत स्पष्ट केले आहे.

000000

 जेंव्हा गोलंदाज फलंदाज व यष्टिरक्षकाला विचारून चेंडू टाकतो !

 

श्री गुरूगोबिंद सिंघजी स्टेडियम येथे विभागीय अंधांच्या क्रिकेट स्पर्धांना प्रारंभ

 

नांदेड (जिमाका) दि. 4 :- येथील श्री गुरूगोबिंद सिंघजी स्टेडियमला अपरिचित नसणारी पाऊले आज पडली आहेत. प्रत्येक स्पर्धक हा टिमच्यापलीकडे जाऊन विचार करीत प्रतीस्पर्धी संघातील खेळाडुंच्या हाता-हात घालून मैदानाचा अंदाज घेत आहेत. प्रत्येक पाऊले त्यांचे जमिनीत कुठे चढउतार आहेत का याचा अंदाज घेत आहेत. मैदानाचा संपूर्ण आवाका लक्षात घेऊन आता ते आप-आपल्या संघाच्या लाइनमध्ये शिस्तीत उभे झाले आहेत. बॉलमधील छऱ्यांचा आवाज त्यांना खुणावतो आहे. हे सारे खेळाडू अंध आहेत याची उद्घाटनासाठी आलेल्या अपरिचितांना त्यांच्या जवळ गेल्याशिवाय जराशीही कल्पनाही बांधता येत नाही.

 

अशा खेळाडुंच्या माध्यमातून कोणालाही प्रेरणा व आत्मविश्वास देणाऱ्या मराठवाडा विभागीय पातळीवरील अंध क्रिकेट स्पर्धेचे आज येथील श्री गुरूगोबिंद सिंघजी स्टेडियम येथे शुभारंभ झाला. जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांच्या हस्ते झालेल्या उद्घाटन समारंभास प्रमुख अतिथी म्हणून मनपाचे उपायुक्त कदमसामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण संगेवारक्रिकेट प्रशिक्षक राजू किवळेकरनांदेड जिल्ह्याचे भूमिपूत्र अंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख निर्माण करणारा अंध क्रिकेटपटू दिलीप मुंडेकोषाध्यक्ष दादाभाऊ कुटेप्रशिक्षक मंगेश कामठेकर, सीएबीएमचे माजी अध्यक्ष रवी वाघगणेश काळे, डॉ. माधव गोरे, स्टेडियम व्यवस्थापक चवरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. या स्पर्धेसाठी एकुण 4 संघ सहभागी झाले आहेत.

 

आंतरराष्ट्रीय पातळीवर सन 2010 पर्यंत महाराष्ट्रातला एकही अंध क्रिकेटपटू पोहचवू शकला नाही. ही खंत मनात घेऊन क्रिकेट असोसिएशन फॉर ब्लाइंड ऑफ महाराष्ट्राने निर्धारपूर्वक यात उतरायचे ठरविले. आणि पहिल्याच वर्षी सन 2011 मध्ये नांदेड जिल्ह्यातील किनवटचा दिलीप मुंडे हा अंध खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचला. त्याच्या पाठोपाठ इतर खेळाडूंनी आपला आत्मविश्वास वाढवित ही संख्या 10 खेळाडूंवर नेऊन  पोहोचविली. नांदेड येथे आयोजित या स्पर्धेतूनही आता आणखी चांगल्या खेळाडूंची भर पडेल असा आत्मविश्वास क्रिकेट असोसिएशन फॉर ब्लाइंडचे माजी अध्यक्ष रवी वाघ यांनी व्यक्त केला. या स्पर्धेसाठी नांदेड वाघाळा महानगरपालिकेने क्रिडांगण मोफत उपलब्ध करून दिल्यामुळे या स्पर्धा नांदेड येथे घेणे शक्य झाल्याची माहिती उपाध्यक्ष गणेश काळे यांनी सांगितले.

 

स्पर्धकांची बी-1 ते बी-3 असते वर्गवारी

आपल्या क्रिकेट स्पर्धे सारखेच अंधांच्या क्रिकेट स्पर्धाचे नियम असतात. फक्त फरक एवढाच असतो तो म्हणजे चेंडू जमिनीलाच टाकून फेकायचा. फलंदाजांना दृष्टि नसल्यामुळे त्यांना चेंडू नेमका कुठे आहे याचा अंदाज येण्यासाठी त्यात छर्रे टाकले जातात. प्रत्येक संघात 11 खेळाडू असतात. सर्व अंध. परंतू यात वर्गवारी केली गेली आहे. पूर्णत: दृष्टि नसणारे चार खेळाडू यांना बी-1 म्हटले जाते. तीन मीटर पर्यंत ज्यांना अंधूक दृष्टि आहे त्यांना बी-2 म्हटले जाते.  बी-2 वर्गवारीतील तीन खेळाडू असतात तर ज्यांना 6 मीटर पर्यंतच दृष्टि आहे असा खेळाडूंना बी-3 वर्गवारीत गणल्या जातेअसे 4 खेळाडू संघात असतात. बी-1 (पूर्णत: अंध) फलंदाजासाठी धावपटू दिले जातात. एकुण 14 खेळाडूंपैकी प्रत्यक्ष 11 खेळाडूंना खेळविले जाते.

00000












 6 जून रोजी नांदेड जिल्ह्यात "शिवस्वराज्य दिन" होणार साजरा

 

पालकमंत्री अशोक चव्हाण साधणार दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद

 

नांदेड (जिमाका) दि. 4 :- छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी रायगडावर झाला होता. या महापुरुषांनी महाराष्ट्राला लोककल्याणकारी राज्याचा समृद्ध वारसा दिला. स्वराज्यातील महत्वाचा दिवस म्हणजेच शिवस्वराज्यभिषेक दिन म्हणून 6 जून हा दिवस कायम स्मरणात रहावा व या दिवसापासून प्रत्येक ग्रामपंचायतीला प्रेरणा घेता यावी या उद्देशाने 6 जून हा शिवराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्राने घेतला आहे. या निर्णयानुसार संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये "शिवस्वराज्य दिन" येत्या सोमवारी साजरा केला जाणार आहे. यादृष्टिने नांदेड जिल्हा परिषदेतर्फे जय्यत तयारी सुरू करण्यात आली असून पालकमंत्री अशोक चव्हाण यानिमित्ताने दूरदृश्य प्रणालीद्वारे सर्वांशी संवाद साधणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे यांनी दिली.

 

सोमवार 6 जून रोजी जिल्हा परिषदेतर्फे शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार सर्व ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये सकाळी सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारुन त्यास अभिवादन केले जाईल. यानंतर राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताचे गायन करण्यात येईल. सर्वांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

Friday, June 3, 2022

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विशेष लेख

संकल्प करू या पर्यावरण रक्षणाचा !

संयुक्त राष्ट्र संघटनेतर्फे 1972 साली पर्यावरण दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. यानुसार 1973 मध्ये 5 जून रोजी पहिल्यांदा पर्यावरण दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. जागतिक तापमान वाढीची समस्या लक्षात घेत पर्यावरणाच्या संरक्षणासाठी सर्व स्तरावरून प्रयत्न सुरु आहेत. पृथ्वीवरील नैसर्गिक वातावरणामुळे मानवी जीवन अस्तित्वात आहे. वातावरण आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. निर्सग आपल्याला श्वासोच्छवासासाठी हवेपासून खाण्या-पिण्यापर्यंत सर्व काही पुरवते आणि पृथ्वीवर राहण्यासाठी अनुकूल वातावरण देते. ही सर्व निसर्गाची देणगी आहे. निसर्ग आणि पर्यावरणामुळेच हे जग सुरळीतपणे सुरू आहे. निसर्ग आपल्याला जगण्यासाठी खूप काही देतो पण त्या बदल्यात मानवाने फक्त निसर्गाचे शोषण केले मानवाच्या या कृत्यामुळे निसर्गाची हानी होत असूनजीवसृष्टीचे अस्तित्वही धोक्यात आले आहे.

 

अशा परिस्थितीत पर्यावरण सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करणे हे प्रत्येक मानवाचे कर्तव्य आहे. ग्लोबल वार्मिंगसागरी प्रदूषण आणि वाढती लोकसंख्या यांचा वाढता धोका नियंत्रित करणे हे एक आव्हान आहे. जेणेकरून पर्यावरणाचे संरक्षण करता येईल. यासाठी दरवर्षी 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो.या निमित्ताने आपण सर्व जण पर्यावरण संवर्धनासाठी पुढील संकल्प करू शकतो.


पर्यावरण दिनाचा पहिला संकल्प

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त घरातून निर्माण होणारा कचरा योग्य ठिकाणी पोहचवण्याचा पहिला संकल्प घ्या. आपल्या घरातून दररोज खूप कचरा बाहेर पडतो.काही लोक कचरा इकडे तिकडे फेकतात. तो फेकलेला कचरा एकतर जनावरांच्या पोटात जातो किंवा नद्यांमध्ये वाहून जातो. त्यामुळे आपल्या नद्याही प्रदुषित झाल्या आहेत. कचरा इकडे-तिकडे न टाकता तो डस्टबीनमध्ये टाकावा. सुका व ओला कचरा वेगळा करून फेकून द्या जेणेकरून त्याचा योग्य वापर करता येईल.


पर्यावरण दिनाचा दुसरा संकल्प

माणसाचे जीवन श्वासोच्छवासाने चालते आणि श्वास घेण्यासाठी शुद्ध हवा लागते.त्यामुळे जागतिक पर्यावरण दिनी श्वास घेण्यासाठी शुद्ध हवा सर्वत्र पसरवण्याचा प्रयत्नकरूत्यासाठी पेट्रोल-डिझेलऐवजी ई-वाहन वापरू. अधिकाधिक सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा.


पर्यावरण दिनाचा तिसरा संकल्प

निसर्ग हा झाडे आणि वनस्पतींवर अवलंबून आहे. मात्र आजकाल कोणीही कधीही झाडे तोडत आहे. झाडे तोडल्याने ऑक्सिजनच्या कमतरता बरोबर हवामानाचे चक्रही बिघडत आहे. त्यामुळे अनेकदा भीषण नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत वृक्षतोड थांबवून आपण अधिकाधिक रोपे लावूजेणेकरून निसर्गाची आतापर्यंत झालेली हानी भरून काढता येईलअशी प्रतिज्ञा घ्या.

 
पर्यावरण संरक्षणाचा चौथा संकल्प

झाडेरोपेमाती, , प्राणीपाणी इत्यादींचा पर्यावरण स्वच्छ व सुरक्षित ठेवण्यात महत्त्वाचा वाटा आहे. त्यामुळे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करत पर्यावरणाचा समतोल सदैव राखला जावाअशी प्रार्थना करा आणि पर्यावरणाचा समतोल व सुरक्षित ठेवण्यासाठी जे काही करावे लागेल. ते सर्व काही आम्ही करू अशी शपथ घ्या.


पर्यावरण संरक्षणाचा पाचवा संकल्प

पर्यावरण दिनीपाचवा आणि शेवटचा संकल्प घ्या की आम्ही पॉलिथिन किंवा प्लास्टिकच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्याचा प्रयत्न करू. पॉलिथिन आणि प्लास्टिक हे निसर्गाचे सर्वात मोठे शत्रू आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही स्वतः त्यांचा वापर करणार नाहीत्याचप्रमाणे तुम्ही इतर कोणी पॉलिथिन किंवा प्लास्टिक वापरताना दिसले तर त्यांनाही पर्यावरणाबाबत जागरूक करेल अशी प्रतिज्ञा घ्या. कारण पर्यावरणाचे संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.

 

-         श्वेता पोटुडे

माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, नांदेड

0000

  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच...