Saturday, September 27, 2025

  वृत्त क्रमांक 1020

नागरीकांनी #पूर परिस्थितीत घ्यावयाची काळजी व खबरदारी ; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा #इशारा


#नांदेड दि. 27 सप्टेंबर: मागील २४ तासात नांदेड जिल्ह्यातील ७ तालुक्यांमधील २५ मंडळात #अतिवृष्टी झालेली असून जिल्ह्यातील सर्व मोठे, मध्यम व लघु सिंचन प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेले असून सर्व धरणांमधून मोठ्या #प्रमाणावर पाण्याचा #विसर्ग चालू आहे. जिल्ह्यातील सर्व #नद्या दुथडी भरून #वाहत आहेत. सद्यस्थितीत विष्णुपुरी धरणाचे १६ दरवाजे उघडले असून प्रकल्पातून २,१९,२२९ क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात चालू आहे. गोदावरी नदीने इशारा पातळी ओलांडली असून नदीची #पाणीपातळी सध्या ३५३.९० मी. एवढी आहे. सद्यस्थितीत नांदेड जिल्ह्यास प्रादेशिक #हवामानशास्त्र विभागाने रेड अलर्ट दिला आहे. जिल्ह्यात आज संध्याकाळपासून पुढील २४ तास पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वाढली असून नदी, नाले, ओढे काठच्या गावांना तसेच जेथे पुरस्थिती उद्भवू शकते अशा गावातील नागरिकांनी खालीलप्रमाणे उपाययोजना व खबरदारी घेण्याबाबतचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

काय करावे:
गावात पूरस्थिती निर्माण झाल्यास अथवा पूराबाबत पूर्व कल्पना मिळाल्यास घरातील उपयुक्त सामान, महत्त्वाची कागदपत्रे, जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवा, विजेवर चालणाऱ्या उपकरणांचा वीज पुरवठा बंद करावा. गावात अचानक पूरस्थिती निर्माण झाल्यास तात्काळ प्रशासनास कळवावे. गावात, घरात जंतुनाशक असतील तर ते पाण्यात विरघळणार नाहीत याची दक्षता घ्या. पूरस्थितीत उंच ठिकाणी जावे तसेच जातेवेळी सोबत रेडिओ, टॉर्च, सुके खाण्याचे पदार्थ, पिण्याचे पाणी सोबत ठेवावे. शक्य असल्यास घरातील वाहने उंच ठिकाणी हलवा. घर सोडून जाताना दारे, खिडक्या सर्व घट्ट बंद करून जा. कुटुंबातील सर्व व्यक्तींकडे ओळखपत्र न भिजता राहील याची काळजी घ्या.

पूरामध्ये अडचणीत सापडला असाल तर आजूबाजूच्या साधनांचा वापर करा. (उदा. पाण्यावर तरंगणारे मोठे लाकूड, प्लास्टिकचे ड्रम याचा वापर करा), कोणी व्यक्ती वाहत जात असेल तर दोरीच्या सहाय्याने त्याला वाचवण्याचा प्रयत्न करा. पूर स्थितीत घाबरून जाऊ नका, सरकारी सूचनांचे पालन करा.

मदत आवश्यक असल्यास तात्काळ स्थानिक तहसील कार्यालयास किंवा जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्रास क्र.(0२४६२) २३५०७७ किंवा १०७७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. आपले पशुधन व अन्य पाळीव प्राणी यांना बांधले असेल तर त्यांना खुले करून सुरक्षितस्थळी हलवावे व स्वतः सुरक्षित स्थळाचा आसरा घ्यावा. कोणत्याही परिस्थितीत प्राण्यांना बांधून ठेवू नये त्यांना खुले सोडावे. प्राणी खुले सोडल्याने ते स्वतःचा बचाव स्वतः करू शकतील. सोबत रेडीओ, बॅटरी, मोबाईल इ. संपर्काची साधने ठेवण्याचा प्रयत्न करावा. हे साहित्य भिजणार नाही व सुरक्षित राहील याची योग्य खबरदारी घ्यावी.

काय करू नये
पूर असलेल्या भागात, नंदीच्या पूलावर विनाकारण भटकू नका. पूराच्या पाण्यात चुकूनही जावू नका, तसेच पूर ओसरल्यानंतर प्रशासनानाने परवानगी दिल्याशिवाय पूलावरुन गाडी घालण्याचा, अथवा पूल ओलांडण्याचा प्रयत्न करू नका. दूषित / उघड्यावरील अन्न व पाणी टाळा. (शक्यतो उकळलेले पाणी व सुरक्षित अन्न सेवन करा.) सुरक्षित ठिकाणी रहा व विद्युत् तारांना स्पर्श करू नका. पोहता येत असेल तरच बुडणाऱ्या व्यक्तींना वाचवा परंतू अपरीचीत व खोल पाण्यात जाऊ नका. जलसाठ्याजवळ / नदीजवळ जाऊ नये. आपल्या मुलांना जलसाठ्यावर, नदीवर पोहण्यासाठी पाठवू नये. मच्छिमार व अन्य व्यक्तींनी पाण्यामध्ये जाऊ नये, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सचिव किरण अंबेकर यांनी केले आहे.
0000

 वृत्त क्रमांक 1019 

नांदेड जिल्ह्यातील 25 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद   

 

नदीकाठच्या सखोल भागातील लोकांना, जनावरांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याच्या सूचना

 

नांदेड दि. 27 सप्टेंबर: नांदेड जिल्ह्यात शुक्रवार २६ सप्टेंबर २०२५ रोजी नांदेड तालुक्यातील ५, बिलोली तालुक्यातील ३, मुखेड तालुक्यातील ५, कंधार तालुक्यातील ४, लोहा तालुक्यातील ५, मुदखेड तालुक्यातील २, नायगाव तालुक्यातील १ अशा एकूण २५ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली आहे. नदीकाठच्या सखोल भागातील लोकांना व जनावरांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतरितकरण्याच्या सूचना मनपा नांदेड तसेच सर्व संबंधित तहसिलदार यांना दिलेल्या आहेत, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिली आहे.

 

नांदेड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट असल्याने अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. त्यामुळे विष्णुपुरी प्रकल्पामध्ये सध्या १६०००० लक्ष क्युसेक्सची आवक सुरू असून पुढील ६-७ तासात आवक ३ लक्ष पर्यंत जाण्याचा अंदाज आहे. सध्या विष्णुपुरी धरणातून १६०००० क्युसेक्स विसर्ग सोडण्यात आला आहे व येत्या ५-६ तासात विसर्ग वाढवून २.५ लक्ष ते ३.० लक्ष क्युसेक्स करण्याची शक्यता असल्याने नांदेड शहरालगत नदीची पातळी इशारा पातळी ३५९.०० मी च्या वर जाण्याची शक्यता आहे.

 

धर्माबाद तालुक्यातील बेल्लूरपुलावरून अजून पाणी चालू आहे. अर्धापूर तालुक्यातील मौजे रोडगी येथील संतोष धोंडीबा काकडे यांच्या मालकीची एक म्हैस वीज पडून मृत पावली आहे. शेलगाव येथील पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे गावाचा संपर्क तुटला आहे.

 

मुखेड तालुक्यातील मौजे शिकारा येथे राहत्या घरावर पिंपळाचे झाड पडून घराचे नुकसान झाले आहे. जीवित हानी झालेली नाही. मौजे देगाव येथील पुलावरून पाणी वाहत आहे त्यामुळे मार्ग बंद आहे. बाऱ्हाळी- मुक्रामाबाद-निवळी पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे हा रस्ता बंद करण्यात आला आहे.बेरळी रस्ता बंद करण्यात आलेला आहे.

 

लोहा तालुक्यातील उमरा येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने उमरा ते रूपसिंग तांडा परसराम तांडाकडे जाणारा पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद आहे. उमरा गावापासून पुराचा प्रवाह अंदाजे २०० मीटर लांब आहे. आतापर्यंत घरात पाणी शिरलेले नाही, जीवित हानी झाली नाही. देऊळगाव व चितळी येथे ओढ्यास पूर आल्यामुळे रस्ता बंद आहे. धनज खुर्द येथील पुलावरून पाणी जात असल्याने धनज खु. गावचा संपर्क तुटला आहे. सोनखेड हद्दीतील निळा, डेरला या गावचा संपर्क तुटलेला आहे. लोंढेसांगवी आणि उस्माननगर पोस्ट हद्दीतील जोशी सांगवी यांच्यामधील पुलावरून पाणी जात आहे. डोंगरगाव येथील घोटका जाणारा पुल पाण्याखाली असून दोन मंदिरात पाणी घुसले असून शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत पाणी आले आहे. मंदिराजवळील एका घरातील कुटुंबाने सुरक्षित ठिकाणी आसरा घेतला आहे. तसेच चोंडी येथील बंधारा पाण्याखाली गेला आहे.

दोन्ही ठिकाणांहून वाहतूक बंद आहे. धानोरा-खांबेगाव येथे पुलावरून पाणी वाहत आहे. भेंडेगाव येथे पुराच्या पाण्यात झाडावर अडकून पडलेल्या एका व्यक्तीस स्थानिक शोध व बचाव पथकामार्फत बाहेर काढण्यात आले आहे. कंधार तालुक्यातील बहादरपुरा येथील पुलावरून पाणी वाहत आहे त्यामुळे रस्ता दोन्ही बाजूने बंद करण्यात आला आहे. देगलूर तालुक्यामध्ये सध्या पाऊस थांबला आहे. जवळपास आठ गावांमध्ये पुलावरून पाणी जात असल्याने तात्पुरत्या स्वरूपात संपर्क तुटलेला आहे.

 

नांदेड तालुक्यात रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळेपुलावरून पाणी जात असल्यामुळे राहेगाव गावाचा संपर्क तुटलेला आहे. वनेगाव ते वरखेड अंतर्गत पुलावरून पाणी जात असल्याने हा रस्ता बंद आहे. पर्यायी मार्ग चालू आहे. कासारखेडा मार्गे एकदरा जाणारा नाला भरल्यामुळे रस्ता बंद झाला आहे. त्यामुळे एकदरा गावचा संपर्क तुटला आहे. तसेच निळा एकदरा पुलाच्या बाजूच्या रस्त्याने पाणी वाहत असल्याने तोही मार्ग बंद झाला आहे. तळणी ते रेगाव रस्ता पुराच्या पाण्यामुळे बंद झाला आहे. मौजे पिंपळगाव कोरका येथे कॅनॉल फूटल्यामुळे १ ते २ घरात पाणी आले आहे. नांदेड शहरातील मोमीनपुरा, कालापूल, बाळगीर महाराज मठ, शनी मंदिर हमालपुरा, दत्तनगर, गोकुळनगर येथे रस्त्यावर भरपूर पाणी आहे. हदगाव तालुक्यातील शेंबाळपिंपरी ते तळणी रोड बंद आहे. नायगाव तालुक्यात रात्रीपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे. गोदावरी आणि मन्याड नदीकाठाच्या गावांमध्ये सर्व यंत्रणा सतर्क आहे. पाणी पातळी वाढली आहे परंतु अजून कुठेही गावात पाणी शिरल्याची अथवा गावांचा संपर्क तुटण्याची परिस्थिती नाही.

 

विष्णुपुरी पुर सद्यस्थितीत 27 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वा.

जायकवाडी विसर्ग - 38000 क्युसेक.

माजलगाव विसर्ग - 80000 क्युसेक्स.

दिग्रस बंधारा - 200000 क्युसेक्स.

पूर्णा नदी (सिध्देश्वर + खडकपूर्णा + निम्न दुधना)- 45000 क्युसेक्स.

विष्णुपुरी - 156000 क्युसेक.

नांदेड ओल्ड ब्रिज पातळी - 348.34 मी (117000 क्युसेक).

बाळेगांव- 200000 क्युसेक.

 

विष्णुपुरी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातील जायकवाडी प्रकल्प, माजलगाव प्रकल्प, सिद्धेध्वर प्रकल्प, निम्न दुधना व खडकपूर्णाप्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले असल्याने सर्व धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे.

00000

Friday, September 26, 2025

इसापूर प्रकल्पातून रात्री 9 वाजता पुन्हा विसर्ग वाढ 

हवामान विभागाकडून आजपासून पुढील 5 दिवसांच्या कालावधीत यवतमाळ, बुलढाणा जिल्ह्यास अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तो लक्षात घेऊन इसापूर धरण पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याच्या दृष्टीने व पाणी पातळीमध्ये घट करण्याच्या दृष्टीने आज 26 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 9 वाजता चालू असलेल्या विसर्गात आणखी दोन गेट उघडून वाढ करण्यात येणार आहे. तरी पैनगंगा नदीच्या दोन्ही तिरावरील नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहण्याचे आवाहन पूर नियंत्रण कक्ष इसापूर प्रकल्प यांनी केले आहे. 

इसापूर धरणातून विसर्ग वाढ ; उर्ध्व पैनगंगा प्रकल्प इसापूर धरण 

ROS नुसार धरण पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने आज 26 सप्टेंबर 2025 रोजी 8 वाजता आणखी 4 गेट  0.50 मीटरने उघडण्यात आले आहेत. सद्यस्थितीत इसापूर धरणाच्या सांडव्याचे 9 गेट 0.50 मीटर ने चालू असून  एकूण 9 गेटद्वारे पैनगंगा नदीपात्रात 15273 क्युसेक्स (432.491 क्युमेक्स) इतका विसर्ग  सुरू आहे. धरणामध्ये येणारी पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढवणे/कमी करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. नदी काठावरील/ पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी. - इसापूर धरण पूरनियंत्रण कक्ष

00000

वृत्त क्रमांक 1018 

शेतकऱ्यांनो महाविस्तार एआय ॲपचा वापर करा

आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा मिळवा : कृषि विभाग 

नांदेड दि. 26 सप्टेंबर : शेतकऱ्यांना हवामान बदल बाजारपेठेतील अस्थिरता आणि माहितीच्या अभावामुळे अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. यावर उपाय म्हणून महाविस्तार एआय AI हे अँप लाँच केले आहे. हे कृषी विभागाने विकसित केलेले एक अत्याधुनिक ॲप आहे. कृत्रिम बुद्धिमतेच्या सहाय्याने हे अँप शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीशी संबंधित सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी एकाच ठिकाणी माहिती उपलब्ध करून देते. मराठी भाषेत उपलब्ध असलेले हे अँप शेतकऱ्यांना रिअल टाइम माहिती, तज्ज्ञांचा सल्ला आणि आधुनिक शेती पद्धतीचे मार्गदर्शन करते. 

महाविस्तार एआय AI अँपमधील AI चॅटबॉट शेतकऱ्यांच्या प्रश्नांना त्वरित उत्तरे देते. रिअल-टाइम हवामान अंदाज, स्थानिक पातळीवरील हवामान अंदाजामुळे शेतकरी पिकांची पेरणी, कापणी आणि खतांचा वापर यांचे नियोजन करू शकतात. स्थानिक आणि राष्ट्रीय बाजारपेठेतील पिकांचे भाव रिअल टाइममध्ये दाखवते. कृषि विभागाच्या विविध कृषी योजनांची माहिती, अनुदान, आणि विमा योजनांचे तपशील एकाच ठिकाणी मिळू शकतील. ॲपमध्ये मराठीत व्हिडिओ उपलब्ध आहेत. ज्यात पिकांची लागवड, खतांचा वापर, कापणी, आणि जैविक शेती  याबाबत तपशीलवार मार्गदर्शन मिळेल. अँपमधील AI तंत्रज्ञान मध्ये शेतकरी पिकांचे फोटो अपलोड करून पिकांवरील रोग आणि किडींचे निदान करुन उपाय मिळवू शकतात. 

महाविस्तार AI ॲप शेतकऱ्यांचे जीवन सुसह्य बनवण्यासाठी अनेक फायदे घेऊन आले आहे . चुकीच्या खतांचा किंवा कीटकनाशकांचा वापर टाळून शेतकरी उत्पादन खर्च कमी करू शकतात. बाजारभाव माहिती आणि हवामान अंदाजामुळे शेतकरी योग्य वेळी पिकांची विक्री आणि नियोजन करू शकतात. यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते.तसेच महाविस्तार AI ॲपचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहन योजना देखील आहे.महाविस्तार AI ॲपचा सर्वाधिक वापर करणाऱ्या,प्रत्येक तालुक्यातील पहिल्या 3 शेतकऱ्यांना ॲप मधील लीडरबोर्डवर स्थान देण्यात येणार असून प्रत्येक जिल्ह्यातील जास्तीत जास्त ॲप वापरणाऱ्या 3 शेतकऱ्यांना मा. जिल्हाधिकारी यांच्याकडून प्रशंसा पत्र देण्यात येणार आहे तसेच राज्यस्तरावर सर्वाधिक ॲप वापरणाऱ्या 10 शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून प्रशंसा पत्र/प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. गुगल प्ले स्टोअरवर जाऊन आजच महाविस्तार AI ॲप डाउनलोड करा आणि शेतीत डिजिटल क्रांतीचा भाग व्हा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

00000

 

 वृत्त क्रमांक 1017 

महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा  

28 सप्टेंबर ऐवजी 9 नोव्हेंबर रोजी होणार   

नांदेड दि. 26 सप्टेंबर : महाराष्ट्र राज्यात तसेच नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी व सततच्या पाऊस होत आहे. त्यामुळे सामान्य प्रशासन विभागाने महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परिक्षा-2025 ही 28 सप्टेंबर ऐवजी सुधारित दिनांकास म्हणजे रविवार 9 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला आहे. सर्व परिक्षार्थी उमेदवारांनी या परीक्षेच्या तारखेत झालेल्या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. 

महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-2025 रविवार 28 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 व दुपारी 3 ते सायंकाळी 5 वा. पर्यंत दोन सत्रात घेण्यात येणार होती. परंतू महाराष्ट्र राज्यात तसेच नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी, सततच्या पावसामुळे रस्ते मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्यामुळे काही परिक्षार्थी यांना या परिक्षेस बसता आले नसते व परिक्षेस मुकावे लागले असते. 

याबाबत नांदेड जिल्ह्यातील, जिल्ह्याबाहेरुन नांदेडला ही परीक्षा देण्यासाठी येत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी, असेही आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. त्याबाबत शुध्दीपत्रक 26 सप्टेंबर 2025 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

00000

 वृत्त क्रमांक 1016 

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश   

नांदेड दि. 26 सप्टेंबर: नांदेड जिल्ह्यात 29 सप्टेंबर सकाळी 6 वाजेपासून ते 13 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.  

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये हा शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.  

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

0000

वृत्त क्रमांक 1015 

नांदेड जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना शनिवार 27 सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर   

नांदेड, दि. 26 सप्टेंबर :- जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका शाळा, अनुदानित व विनाअनुदानि शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालय, खाजगी शिकवणी तसेच आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्थांना शनिवार 27 सप्टेंबर 2025 रोजी सुट्टी जाहीर केली आहे. याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष राहुल कर्डिले यांनी आज निर्गमीत केला आहे. 

मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने दिलेल्या पूर्व सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यास शनिवार 27 सप्टेंबर 2025 रोजी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत नांदेड जिल्ह्यातील सर्व सिंचन प्रकल्प पूर्णपणे भरलेले असून सर्व नद्यांमध्ये पाण्याचा विसर्ग चालू आहे. जिल्ह्यातील प्रमुख नद्यांनी इशारा पातळी गाठलेली असल्याने नांदेड जिल्ह्यात अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते. 

नांदेड जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये याकरिता जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालये (अंगणवाडी, पूर्व प्राथमिक व प्राथमिक, माध्यमिक महाविद्यालय) मधील विद्यार्थ्यांना शनिवार 27 सप्टेंबर 2025 रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

00000

वृत्त क्रमांक   BH सिरीज वाहनधारकांनी थकीत कर तातडीने भरावा ;  अन्यथा विशेष तपासणी मोहिमेत कारवाई प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आवाहन नांदेड,...