Wednesday, March 26, 2025

  वृत्त क्रमांक 329

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात 

जिल्हाधिकारी कर्डिले यांच्या ई -ऑफिस प्रणालीला दुसरा क्रमांक

6 लक्ष रुपयांचे राज्यस्तरीय पारितोषिक जाहीर

नांदेड दि. 26 मार्च  :- वर्धा येथे जिल्हाधिकारी असताना राहुल कर्डिले यांनी संपूर्ण वर्धा जिल्ह्यातील महसूल विभागात राबविलेल्या ई - ऑफिस प्रणालीची दखल राज्य शासनाने घेतली आहे. २०२४-२५ च्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात या उल्लेखनीय कार्याला पुरस्कृत करण्यात आले असून राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार त्यांना मिळाला आहे.

नवीन तंत्रज्ञानामुळे प्रशासनाच्या कामात नवनवीन बदल करणे आवश्यक ठरते. वर्ध्याचे तत्कालिन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्हाधिकारी वर्धा कार्यालयात ई-ऑफिस प्रणाली सन 2023-24 मध्ये यशस्वीरित्या राबविली. यामुळे प्रशासकीय कामकाजात सुलभता आली. या उल्लेखनिय कार्याची दखल घेवून राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता प्रगती अभियान 2023-24 स्पर्धेत वर्ध्याचे तत्कालिन जिल्हाधिकारी व आताचे नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या कार्य कर्तृत्वाला द्वितीय पारितोषिक जाहिर झाले आहे. विभागीय स्तरावरील निवड समित्यांकडून प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांच्या गटामध्ये ही निवड करण्यात आली आहे. वर्धा जिल्ह्याच्या तालुकास्तरावर देखील त्यांनी ई -ऑफिस प्रणाली सुरू केली होती. त्यामुळे फायलींचा पसारा कमी करण्यात मदत झाली. नांदेडमध्येही त्यांनी या अभियानाला सुरुवात केली आहे.

संपूर्ण वर्धा जिल्ह्यातील महसूल विभागात ई-ऑफिस प्रणाली राबविण्याबाबत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना 6 लक्ष रुपयांचे द्वितीय राज्यस्तरीय पारितोषिक शासनाच्यावतीने जाहीर झाले आहे. महसूली विभागातील बदलत्या नवीन तंत्रज्ञानामुळे व जागतिकरणामुळे प्रशासनाच्यामध्ये मोठया प्रमाणात बदल करणे आवश्यक असते. त्यानुसार प्रशासनातील सेवांच्या गुणवत्तेत वाढ, लोकाभिमुखता व निर्णयशिलता आणण्यासाठी तसेच सर्वाच्या सहकार्यातून उत्तम प्रशासन कार्यान्वित करण्यासाठी राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता प्रगती अभियान व स्पर्धा आयोजित केली जाते. 

या गटात अवैध गौन खनिज उत्पादन आणि वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याकरिता केलेल्या प्रयोगासाठी अहिल्यानगरला प्रथम पुरस्कार. तर नगर परिषद कार्यालयाकरिता सोलार प्रकल्प कार्यान्वित केल्या प्रकरणी लातूर जिल्ह्यातील निलंगा नगर परिषदेला तृतीय पुरस्कार मिळाला आहे.

0000



Tuesday, March 25, 2025

 वृत्त क्रमांक 328

माळी कामासाठी 31 मार्चपर्यत अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड दि. 25 मार्च  :- सैनिकी मुलांचे वसतिगृह, विष्णुपूरी नांदेड येथील परिसरात सुंदर फुलांची व शोभनीय झाडे व बगीचा रखरखाव कामासाठी अशासकीय माळी कर्मचारी  कंत्राटी पध्दतीने निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात रोजंदारीच्या कामावर नियुक्त करणे आहे. इच्छूक आणि अनुभवी व्यक्तीने 31 मार्च 2025 पर्यत जिल्हा सैनिक कार्यालय, नांदेड येथे अर्ज करावेत, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी  तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी महेश वडदकर यांनी केले आहे. 

00000

  वृत्त क्रमांक 327

जिल्हा मध्यवर्ती कारागृहात देशभक्तीपर कार्यक्रमाची रंगत 

 'जीवन गाणे ',गृह विभाग व सांस्कृतिक विभागाचा कार्यक्रम 

नांदेड दि.२५ मार्च :  नांदेड जिल्हा कारागृहामध्ये जीवन गाणे गातच जावे या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बंदिवानांमधील काही कलाकारांनी देखील या कार्यक्रमात भाग घेऊन देशभक्ती, सामाजिक एकोपा आणि राष्ट्रभक्तांवर आधारित गायन स्पर्धेमध्ये भाग घेऊन कार्यक्रमाची रंगत वाढवली.

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व गृह विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारणे सेवा यांच्या विशेष सहकार्याने 25 मार्चला नांदेड जिल्हा कारागृहामध्ये हा कार्यक्रम रंगला. राज्याच्या सांस्कृतिक विभागामार्फत निर्धारित केल्याप्रमाणे एकाच दिवशी 36 कारागृहात एकाच वेळी या कार्यक्रमाला सुरुवात झाली.

नांदेड जिल्हा कारागृहामध्ये अधीक्षक एस. एच.आढे, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, कारागृहाचे तुरुंग अधिकारी विजय मेश्राम, रूकमे, तसेच गायक रंजीत भद्रे व त्यांच्या संचाच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमांमध्ये देशभक्तीपर कार्यक्रम गीतांसोबतच, महापुरुषांच्या संदर्भातील गीते तसेच अनेक लोकप्रिय गाण्यांचे गायन सांस्कृतिक विभागामार्फत पाठविण्यात आलेल्या संचाने केले.

मात्र प्रमुख आकर्षण ठरले ते बंदीवानांपैकी अनेकांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन रॅप पासून तर भजनापर्यंत आणि कविता वाचनापासून तबलावादनापर्यंत कार्यक्रमात भाग घेऊन आपल्या नियमित रोजच्या बंदीवानाच्या जीवनातून काही निवांत क्षण घालवले. यावेळी अशा कार्यक्रमाचा आनंद झाल्याचे बंदीवानानी यावेळी आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितले.

00000






मुलींच्या स्वप्नांना बळ सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
महाराष्ट्रातील मुलींना #मोफतशिक्षण







 

Monday, March 24, 2025

 वृत्त क्रमांक 326

बोगस रेशन कार्ड देणाऱ्या सेतू चालकावर गुन्हा दाखल

नागरिकांनी सावध राहण्याचा इशारा 

नांदेड दि. २४ मार्च : नांदेड ग्रामीण परिसरात बोगस रेशन कार्ड काढून देणाऱ्या सेतू चालकावर आज गुन्हा दाखल करण्यात आला. नागरिकांनी पात्रता नसताना रेशन कार्ड काढण्याचा प्रयत्न करू नये व कोणाच्याही खोट्या दाव्याला बळी पडू नये, असे आवाहन तहसीलदार नांदेड संजय वारकड यांनी केले आहे.

आज तहसील कार्यालय नांदेड येथील पुरवठा विभागामध्ये एक व्यक्ती त्यांच्या रेशन कार्ड ऑनलाइन झाले आहे. परंतु धान्य मिळत नाही म्हणून तक्रार करायला आला होता, कर्मचाऱ्यांनी अधिक तपासणी केली असता असे निदर्शनास आले की त्यांचे रेशन कार्ड हेच फसवे आहे.

संबंधित व्यक्तीला फक्त ऑनलाइन एक पेज देण्यात आले होते. तर रेशन कार्ड हे बोगस असल्याचे निष्पन्न आहे.

या प्रकार लक्षात येता तात्काळ पोलीस निरीक्षक वजीराबाद पोलीस स्टेशन यांना बोलावून त्या व्यक्तीला त्यांच्या ताब्यात देण्यात आले.पुरवठा निरीक्षण अधिकारी श्री.रवींद्र राठोड  यांना प्राधिकृत करून संबंधित सेतू चालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांनी दिलेले सहा रेशन कार्ड असे बनावट सापडले आहेत. संबंधीत सेतू चालक ऋषिकेश पेदेवाड राहणार सिडको नांदेड यांच्यावर या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे, तहसील कार्यालयातील कोणत्याही दस्तऐवज काढून देण्यासाठी किंवा सुविधा देण्यासाठी स्थानिक कर्मचाऱ्यांशी चर्चा करावी. एजंट व अनोळखी लोकांच्या तोतयेगिरीला बळी पडू नये, असे आवाहन तहसीलदार संजय वारकड यांनी केले आहे.

वृत्त क्रमांक 325

जागतिक क्षयरोग दिन आणि टीबी मुक्त 

ग्रामपंचायत गौरव सोहळा उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न

नांदेड दि. 24 मार्च  :- जागतिक क्षयरोग दिनानिमित्त 24 मार्च 2025 रोजी वर्षभरात, निकषाच्या आधारावर टीबी मुक्त ग्रामपंचायत करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या 16 तालुक्यातील 248 पैकी 67 ग्रामपंचायती रौप्य पदक स्मृतीचिन्हास पात्र ठरल्या आहेत. या ग्रामपंचायतचे सरपंच, ग्रामसेवक, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांचा गौरव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या हस्ते महात्मा गांधी स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र पुष्पगुच्छ देवून गौरव करण्यात आला. 

यावेळी अप्पर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( पंचायत ) मंजुषा कापसे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हिरानी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजाभाऊ  बुट्टे, अर्धापूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विद्या झिने , जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. बदीउद्दीन, जागतिक आरोग्य संघटनेच्या सल्लागार डॉ. सम्यक खैरे यांची उपस्थिती होती. 

या ग्रामपंचायती मागील वर्षीही ब्राँझ स्मृती चिन्हाने गौरविल्या गेल्या होत्या. मागच्या वर्षातील 86 ग्रामपंचायतीपैकी 67 ग्रामपंचायती पुन्हा टीबी मुक्त ठरल्याने या ग्रामपंचायतींना सिल्वर स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात आले.

जनसामान्यांमध्ये क्षयरोगाविषयी जनजागृती करून , क्षयरुग्ण शोधून यांना नियमित औषधोपचार देत लवकरात लवकर क्षयमुक्त करावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी केले. यानंतर अप्पर जिल्हाधिकारी राम बोरगावकर यांनी क्षयरुग्णांनी नियमित औषधोपचार घेऊन रोगमुक्त व्हावे असे आवाहन केले. यासोबतच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड आदींची समयोचित भाषणे झाली. 

00000





वृत्त क्रमांक 324


चित्रपट कथा व पटकथाकार वसंत सबनीस यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाची सांस्कृतिक मानवंदना

कुसुम नाट्यगृहात २२ मार्च २०२५ रोजी वसंत सबनीस यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त वसंत बहार सांस्कृतिक कार्यक्रम                                                                                                                                      

नांदेड दि. 23 मार्च:-    चित्रपट कथा व पटकथाकार वसंत सबनीस यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त  सांस्कृतिक कार्य विभागाने सांगितिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन 22 मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता केले होते.  चित्रपट कथा व पटकथाकार वसंत सबनीस यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त वसंत बहार या सांस्कृतिक कार्यक्रमाची संकल्पना सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांची असून मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा अपर मुख्य सचिव सांस्कृतिक कार्य विभाग विकास खारगे यांच्या मार्गदर्शनातून कार्यक्रमाची निर्मिती झाली आहे.  

                                                                                                                                                                          या कार्यक्रमात ख्यातनाम कलावंत सहभाग घेतला.  संगीत संयोजन आनंदी विकास तर  संवाद निरजा आपटे, देविदास फुलारी यांचा होता. ख्यातनाम गायक गायिका सागर जाधव, शेफाली कुलकर्णी, विश्वास अंबेकर, मीना सोलापूरे, आसावरी रवंदे या कलाकारांच्या कला सादरीकरणातून  तसेच मुर्तिकार व्यंकट पाटील यांच्या सादरीकरणातून चित्रपट कथा व पटकथाकार वसंत सबनीस यांच्या स्मृतीला उजाळा देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहसंचालक श्रीराम पांडे यांनी केले.

00000











वृत्त क्रमांक 323





  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच...