Sunday, February 9, 2025

  वृत्त क्रमांक 164

कुतूहलातून विविध विषयांवरील साहित्याची निर्मिती

राज्यस्तरीय साहित्य संमेलनात डॉ. अच्युत गोडबोले यांचे प्रतिपादन 

 मंत्री उदय सामंत यांनी दृकश्राव्य माध्यमाव्दारे संमेलनाला शुभेच्छा 

सगरोळी (नांदेड ) दि.९ फेब्रुवारी : विश्व, मनुष्य व निसर्ग निर्मितीचे लहानपणापासूनच मला प्रचंड कुतूहल होते. कुतूहलापोटी वाचनाची आवड निर्माण झाली. पुढे लेखणीतून प्रगट होत गेलो व  माझ्या हातून विविध विषयांवर ५६ पुस्तकांची निर्मिती झाली असल्याचे जेष्ठ साहित्यिक डो. अच्युत गोडबोले यांनी सांगितले. सगरोळी (ता.बिलोली) येथे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते.

 यावेळी  व्यासपीठावर देगलूर-बिलोली विधानसभेचे आमदार जितेश अंतापुरकर, संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा संस्कृती संवर्धन मंडळाचे चेअरमन प्रमोद देशमुख, माजी आमदार गंगाधर पटणे, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य डॉ. मार्तंड कुलकर्णी साहित्यिक देविदास फुलारी आदींची उपस्थिती होती. उद्योग तथा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दृकश्राव्य माध्यमाव्दारे या संमेलनाला शुभेच्छा दिल्या.

   रविवार (ता.९) रोजी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई व येथील संस्कृति संवर्धन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते. 

'मुसाफिर' या पुस्तकाने अनेकांच्या आत्महत्या रोखल्या, बोर्डरूम हे पुस्तक वाचून अनेकांनी उद्योग उभारले. समाजास याचा लाभ होत असल्याने समाधान वाटते. उद्याचे जग हे तंत्रज्ञानावर आधारित असून हे सर्वांना समजावे म्हणून मराठीतून पुस्तके लिहिली. तंत्रज्ञानाबाबत अद्ययावत राहावे.  प्रचंड वाचन, गाणी, चर्चा यासह त्यातील  मुख्य शिलेदार, माणसे, त्याची थेरी, मूलतत्त्वे याचा अभ्यास केला. लोकांचा विश्वास व  माझाही आत्मविश्वास वाढला, माझ्यामुळे सहलेखक तयार झाले. येथील संस्थेचे काम पाहून प्रभावित झालो असल्याचे ते म्हणाले.  

माझ्या मतदारसंघात हा कार्यक्रम होत असल्याने अभिमानास्पद आहे. येथे अनेक कार्यक्रमातून नागरिकांची जडणघडण होत असल्याचे आमदार जितेश अन्तापुरकर म्हणाले. 

सगरोळी येथील कर्मयोग्याच्या भूमीत   हे संमेलन व्हावे अशी मनापासून इच्छा होती. यापुढे सगरोळी येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरावे अशी इच्छा मार्तंड कुळकर्णी यांनी व्यक्त केली. प्रमोद देशमुख यांनी सर्व मान्यवर व सारस्वतांचे शब्दसुमनांनी स्वागत केले. परिसरास कर्मयोगी बाबासाहेब देशमुख साहित्य नगरी तर सभा मंडपास मराठवाड्याचे भूमिपुत्र कविवर्य दे.ल. महाजन यांचे नाव दिले होते. यावेळी साहित्यिक व श्रोते मोठ्या संखेने उपस्थित होते.

 संमेलनाच्या  उद्घाटनासाठी  मराठी भाषामंत्री उदय सामंत उपस्थित राहणार होते,  परंतु त्यांनी आभासी पद्धतीने श्रोत्यांशी संवाद साधला. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी राज्यशासन कटिबद्ध असून सर्वतोपरी मदत केली जाईल अशी ग्वाही देऊन संमेलनास शुभेच्छा दिल्या.

0000










 वृत्त क्रमांक 163

जिल्हा सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीमुळे न्यायालयात येणाऱ्या सर्वाना न्याय मिळेल

- न्यायमूर्ती नितीन सुर्यवंशी 

·  कार्यक्रमास माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण व खासदार रविंद्र चव्हाण, आमदार श्रीजया चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती

·  न्यायालय परिसर स्वच्छ व सुंदर राहील यासाठी सर्वाचे प्रयत्न आवश्यक

·  भोकर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारतीचे उदघाटन व लोकार्पण

नांदेड, दि. 9 :- लोकशाही सशक्त बनविण्यासाठी न्याय व्यवस्था आहे. न्याय व्यवस्थेत मुलभूत सुविधा प्राप्त करुन देणे आवश्यक आहे, यामुळे न्यायव्यवस्था अधिक कार्यक्षम होईल व यातून एक नवीन पर्व सुरु होईल. भोकर येथील जिल्हा सत्र न्यायालयाच्या या नूतन विस्तारीत इमारतीमुळे सर्वाना पोषक वातावरण मिळून न्यायालयात येणाऱ्यांना न्याय मिळेल, असा विश्वास मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा नांदेड जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती नितीन भगवंतराव सुर्यवंशी यांनी व्यक्त केला. 

भोकर येथे सुमारे 14 कोटी 51 लाख 65 हजार रुपये खर्च करून बांधलेल्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन विस्तारीत न्यायालयीन इमारतीचा उद्घाटन सोहळा न्यायमूर्ती नितीन भगवंतराव सुर्यवंशी यांच्या हस्ते आज पार पडला. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. पी. ब्रम्हे, राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण,  खासदार रविंद्र चव्हाण, आमदार श्रीजया चव्हाण, प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुरेखा कोसमकर, बार कॉन्सिल ऑफ  महाराष्ट्र ॲण्ड गोवाचे सदस्य ॲड. व्ही.डी. सांळुखे, ॲड. सतिश देशमुख, बार कॉन्सिल ऑफ  इंडिया ॲण्ड गोवाचे सदस्य ॲड. आशिष देशमुख, जिल्हा न्यायालय भोकरचे युनुस खान खरादी, सहायक जिल्हाधिकारी मेघना कावली, रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक निती सरकार, अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव तसेच न्यायालयीन अधिकारी, कर्मचारी, जेष्ठ विधीज्ञ आदीची उपस्थिती होती.   

माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते यापूर्वी भोकर येथील जिल्हा सत्र न्यायालयाच्या इमारतीचे भूमिपूजन झाले होते. आज त्यांच्याच उपस्थितीत या नूतन इमारतीचे उद्घाटन व लोकार्पण होत आहे. त्यांच्या प्रयत्नामुळेच ही इमारत पूर्णत्वास गेली असल्याचे न्यायमूर्ती नितीन भगवंतराव सुर्यवंशी यांनी सांगितले. न्यायालयात परिसरात काम करणाऱ्यांनी आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहून न्यायालयीन प्रक्रीया अधिक सक्षम बनविण्यावर भर द्यावा. तसेच ही इमारत स्वच्छ व सुंदर राहील यासाठी प्रयत्न करावेत असेही त्यांनी सांगितले. 

कुठलीही वास्तू उभी राहण्यासाठी अनेक संर्घषाचा सामना करावा लागतो. अनेक कष्टकऱ्यांचे योगदान या इमारतीच्या बांधकामासाठी लाभले आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नातून ही इमारती उभी राहीली असल्याचे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस.पी. ब्रम्हे यांनी केले. नवीन इमारतीसोबत इतर सोयी-सुविधाही हळूहळू सुरु करता होतील. विधीज्ञ व न्यायालयीन अधिकारी कर्मचाऱ्यांनी तळागाळातील पक्षकार हा केंद्रबिंदु ठरवून कामकाज करावे. तसेच बदलत्या परिस्थितीत वकीलांनी अन्यायापासून वंचित असणाऱ्या लोकासाठी काम करावे, असेही त्यांनी सांगितले. 

भोकर येथील न्यायालयाची नूतन व जुनी इमारत तीन ठिकाणी जोडली असून सदर इमारत एकूण 27 हजार चौरस फुटाची आहे. तीन मजल्यावर ही इमारत उभी आहे.  या इमारतीत बिजनेस सेंटर, फ्रंट ऑफिस, मीडिया सेंटर, रेकार्ड रुम, बार रुम, स्त्री व पुरुष विटनेस रुम, शासकीय अभियोक्ता कार्यालय, स्त्री व पुरुषासाठी स्टाफ रुम, कन्सुलेशन रुम इत्यादी केले आहे. तसेच पार्कीग, कोर्ट हॉल, जज चेंबर, ॲन्टी चेंबर, कोर्ट ऑफिससह  प्रस्तावित केले आहे. 

वृक्ष संवर्धन काळाजी गरज असून या कार्यक्रमाची सुरवात मान्यवरांच्या हस्ते रोपाला पाणी देवून करण्यात आली. यावेळी बार कॉन्सिल ऑफ  महाराष्ट्र ॲण्ड गोवाचे सदस्य ॲड. व्ही.डी. साळुंखे, ॲड. सतिश देशमुख, बार कॉन्सिल ऑफ  इंडिया ॲण्ड गोवाचे सदस्य ॲड. आशिष देशमुख, प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुरेखा कोसमकर यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भोकर अभिवक्ता संघाचे अध्यक्ष ॲड. संदिप भिमराव कुंभेकर यांनी तर आभार जिल्हा न्यायालय भोकरचे युनुस खान खरादी यांनी मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर के.पी. जैन देसरडा तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर भोकरचे ए. पी. कराड यांनी केले.

00000












 विशेष लेख -  कृपया प्रसिद्धीसाठी 

संकटातील मुलांसाठी जीवनरेखा...1098 चाइल्ड हेल्पलाइन... 

 भारतामध्ये लाखो मुले दररोज वेगवेगळ्या प्रकारच्या शोषण, अत्याचार आणि दुर्लक्षाला सामोरे जातात. त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्वरित मदतीसाठी भारत सरकारने 1098 चाइल्ड हेल्पलाइन सुरू केली आहे. हा एक टोल-फ्री क्रमांक असून, संकटात असलेल्या मुलांना मदत करण्यासाठी 24/7 कार्यरत असतो. चला जाणून घेऊया या हेल्पलाइनचे महत्त्व, कार्यपद्धती... 

1098 चाइल्ड हेल्पलाइन: काय आहे आणि कशी कार्य करते ?

1098 चाइल्ड हेल्पलाइन ही एक राष्ट्रीय आपत्कालीन सेवा आहे, जी 0 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी कार्यरत आहे. संकटात सापडलेल्या किंवा असुरक्षित स्थितीत असलेल्या मुलांना संरक्षण, समुपदेशन, पुनर्वसन आणि अन्य गरजेच्या सेवा पुरवण्याचे काम ही हेल्पलाइन करते. देशभरातील कोणत्याही फोनवरून 1098 हा क्रमांक डायल करून त्वरित मदत मिळू शकते. 

या हेल्पलाइनच्या माध्यमातून तज्ज्ञ समुपदेशक आणि सामाजिक कार्यकर्ते मुलांना मानसिक आधार, कायदेशीर मदत, पुनर्वसन सुविधा आणि गरजेनुसार इतर सेवांसाठी मार्गदर्शन करतात. 

1098 हेल्पलाइन कोणत्या परिस्थितीत मदत करू शकते?

ही सेवा संकटात असलेल्या मुलांसाठी अनेक प्रकारे मदत करू शकते. खालील परिस्थितींमध्ये 1098 वर संपर्क साधला जाऊ शकतो. 

·         हरवलेले किंवा पालकांशिवाय असलेले मुले: जर एखादे बालक हरवले, मुलगा मुलगी हरवली असेल असेल किंवा कोणत्याही पालकाविना आढळले तर 1098 च्या माध्यमातून त्याला सुरक्षित ठिकाणी पोहोचवले जाते.

·         शोषण किंवा अत्याचार होत असेल: शारीरिक, मानसिक, लैंगिक किंवा आर्थिक शोषणाला बळी पडलेल्या मुलांना संरक्षण आणि कायदेशीर मदत पुरवली जाते.

·         बाल विवाह आणि बालकामगार: मुलांच्या हक्कांचे उल्लंघन करणारे बाल विवाह आणि बालमजुरी रोखण्यासाठी 1098 वर तक्रार नोंदवता येते.

·         भिक्षा मागणारी मुले किंवा व्यसनाधीनता: बालक जर भिक्षा मागताना दिसला किंवा व्यसनाच्या आहारी गेला असेल तर त्याला योग्य मदत मिळवण्यासाठी 1098 वर कॉल करता येतो.

·         शिक्षण आणि आरोग्याशी संबंधित समस्या: शिक्षणापासून वंचित असलेल्या किंवा वैद्यकीय मदतीची गरज असलेल्या मुलांना आवश्यक सेवा पुरवण्याचे काम हेल्पलाइन करते.

·         अनाथ, समर्पित किंवा दत्तक घेण्यास पात्र मुले: पालकविना राहणाऱ्या किंवा पुनर्वसन आवश्यक असलेल्या मुलांसाठी या हेल्पलाइनच्या माध्यमातून आवश्यक ती मदत मिळते.

 1098 चाइल्ड हेल्पलाइनद्वारे दिल्या जाणाऱ्या सेवा

ही हेल्पलाइन फक्त तक्रारींचे नोंदणी केंद्र नसून, संकटात सापडलेल्या मुलांना संपूर्ण मदत करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा पुरवते: 

समुपदेशन

मुलांना त्यांच्या मानसिक आणि भावनिक समस्यांवर मार्गदर्शन करण्यासाठी प्रशिक्षित समुपदेशक उपलब्ध असतात. हे समुपदेशन बालकांना त्यांच्या परिस्थितीतून सावरायला मदत करते.

त्वरित हस्तक्षेप

जर एखाद्या मुलाला तातडीने मदतीची गरज असेल, जसे की अत्याचार किंवा बालमजुरीच्या स्थितीत असेल, तर स्थानिक प्रशासन आणि कायदा अंमलबजावणी यंत्रणांच्या सहकार्याने त्वरित कारवाई केली जाते.

रेफरल सेवा

जर एखाद्या मुलाला पुनर्वसन, शिक्षण, वैद्यकीय मदत किंवा पुनर्स्थापनेसाठी विशेष सेवांची गरज असेल, तर हेल्पलाइन त्या संबंधित संस्थांकडे त्याचा तपशील पाठवते.

माहिती आणि मार्गदर्शन

1098 च्या माध्यमातून बालकांच्या हक्कांबाबत जागरूकता पसरवली जाते. पालक, शिक्षक आणि नागरिकांसाठीही ही सेवा मार्गदर्शन करते, जेणेकरून मुलांचे संरक्षण योग्य प्रकारे होऊ शकेल.

1098 चाइल्ड हेल्पलाइनचा प्रभाव

ही हेल्पलाइन सुरू झाल्यापासून लाखो मुलांना मदत मिळाली आहे. खालील महत्त्वाचे परिणाम यामुळे दिसून आले आहेत: 10 दशलक्षाहून अधिक कॉल्स: हेल्पलाइनला दरमहा सरासरी 50,000 हून अधिक कॉल्स प्राप्त होतात. 5 दशलक्षाहून अधिक मुलांना मदत: दुर्लक्ष, शोषण, बालमजुरी आणि बालविवाह यांसारख्या समस्यांवर वेळेत कारवाई करण्यात आली आहे. 1 लाखांहून अधिक मुलांची सुटका: संकटात सापडलेल्या मुलांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यात आणि त्यांच्या संरक्षणासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. 

1098 हेल्पलाइनसाठी नागरिकांची जबाबदारी

कोणत्याही समाजाचे भविष्य हे त्याच्या मुलांच्या सुरक्षिततेवर आणि विकासावर अवलंबून असते. म्हणूनच, प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे की, संकटात सापडलेल्या मुलांची मदत करण्यासाठी योग्य ती तक्रार 1098 वर नोंदवावी.

आपण काय करू शकतो ?

·         सतर्क राहा: जर आपल्या आजूबाजूला बालकांचे शोषण, दुर्लक्ष किंवा अत्याचार होत असल्याचे आढळले, तर 1098 वर कॉल करा.

·         जागरूकता वाढवा: 1098 चा प्रचार करून अधिकाधिक लोकांना या सेवेबद्दल माहिती द्या.

·         सहकार्य करा: प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांसोबत काम करून संकटात असलेल्या मुलांना मदत करा. 

1098 चाइल्ड हेल्पलाइन ही भारतातील असंख्य संकटग्रस्त मुलांसाठी जीवनरेखा ठरली आहे. ही सेवा केवळ मदतीचा एक मार्ग नसून, बालकांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक मोठे पाऊल आहे. 

मुलांचे संरक्षण हे केवळ सरकारचे काम नसून, समाजातील प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे. आपण सर्वजण एकत्र येऊन 1098 चा योग्य वापर केल्यास, अनेक निरपराध बालकांचे जीवन सुरक्षित आणि आनंदी बनवू शकतो. चला नांदेड जिल्ह्यातील या कामात मदत करूया ! वंचित शोषित असाह्य मुले कुठे आढळल्यास एक शून्य नऊ आठ चा उपयोग करूया!

प्रवीण टाके

जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड



Saturday, February 8, 2025

 वृत्त क्रमांक 162

वाघाळा येथील आश्रमशाळेतील सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर 

नांदेड दि. 8 फेब्रुवारी : जिल्हयातील वाघाळा येथील माताजी शिक्षण संस्था संचालित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील बाधित विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी कळविले आहे.यासंदर्भात प्रशासन पूर्ण लक्ष ठेवून असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त समाज कल्याण शिवानंद मिनगिरे यांनी दिली आहे. 

जिल्हयातील वाघाळा येथील माताजी शिक्षण संस्था संचालित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील  निवासी 8-10 विद्यार्थ्यांना आज सकाळी 9 वा. जेवण केल्यानंतर उलटी व मळमळ होत असल्याचे जाणवले.या विद्यार्थ्यांवर लगेच नांदेड येथील शासकीय वैद्यकिय रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याची माहिती तेथील डॉक्टरांनी दिली आहे. 

आश्रमशाळेतील शिक्षकांनी सर्व 59 विद्यार्थ्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालय विष्णपुरी नांदेड येथे दाखल केले आहे. या विद्यार्थ्यांची इतर मागास बहुजन कल्याणचे सहायक संचालक शिवानंद मिनगीरे यांनी भेट घेऊन प्रकृतीबाबत संबंधित डॉक्टरांची प्रत्यक्ष चर्चा केली. विद्यार्थ्यांची प्रकृती सुस्थितीत असून त्यांना वैद्यकीय निगराणीखाली ठेवण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली दिली असल्याचे श्री. मिनगिरे यांनी स्पष्ट केले आहे.

0000

 वृत्त क्रमांक 161

गोदावरी नदी काठावरील अवैध वाळू जप्तीची कारवाई सुरू

महसूल खात्याची धडक कारवाई 

नांदेड दि. 8 फेब्रुवारी : गोदावरी काठावर बिहारी मजुराच्या मदतीने अनेक वाळू तस्करांनी, नदी काठावरील शेतकऱ्यांनी अवैधरित्या आपली शेतजमीन वाळूचा अनधिकृत साठा साठवण्यासाठी तसेच बिहारीला वास्तव्य करण्यासाठी भाड्याने जमीन देऊन वाळू तस्करांना मदत केली आहे. या सर्वांची महसूल खात्याने गंभीर दखल घेतली आहे. गोदावरी नदीकाठावरील अवैध वाळू जप्तीची कारवाई सुरू आहे. वाळू तस्करावर एमपीडीए 1981 नुसार गुन्हा नोंदवून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महसूल विभागाने दिली आहे.  

महसूल खात्याच्या पथकाने 4 फेब्रुवारी रोजी तीन मोठे इंजिन जप्त करून संबंधितावर लिमगाव पोलीस स्टेशन येथे  गुन्हा गुन्हा रजिस्टर क्रमांक 8/2025 अन्वये दाखल केला आहे. नदीकाठावरील भनगी, वाहेगाव, गंगावेट, विष्णुपुरी, थूगाव, कल्याळ, लोहा तालुक्यातील बेट सांगवी, इत्यादी गावांमधील अवैध वाळू साठा मागच्या तीन दिवसापासून जप्त करून पुढील कारवाई सुरू आहे. 

आज पर्यंत तीनशे ब्रास वाळू जप्त केली आहे. हे काम अजून पुढे दोन-तीन दिवस चालणार आहे. यापुढे सुद्धा ही अविरत कार्यवाही सुरू राहणार आहे. या कारवाईनंतर वाळू तस्करानी गोदावरी नदीमध्ये तराफे, इंजिन टाकून वाळू उपसा केल्यास, नदीकाठच्या शेतकऱ्यांनी आपली जमीन वाळू उपसा करणारे बिहारी मजूर यांना अनधिकृतपणे झोपड्या टाकण्यासाठी दिल्यास अथवा अनधिकृतपणे अवैध वाळू वाहतूक करणारे हायवा यांना शेतकऱ्यांनी अनधिकृत रस्ता दिल्यास अथवा वाळू तस्करांना बेकायदेशीररित्या मदत करणाऱ्या व्यक्तीवर, संबंधितावर MPDA 1981 नुसार गुन्हा नोंदवून कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे याची गांभीर्याने नोंद घ्यावी असे जिल्हा प्रशासनातर्फे व तालुका प्रशासनातर्फे इशारा देण्यात आला आहे. 

ही मोहीम जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडतकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, कंधारच्या उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार यांच्या सनियंत्रणाखाली नांदेड तहसीलदार संजय वारकड व लोहा तहसीलदार विठ्ठल परळीकर यांच्या नेतृत्वाखाली स्वप्निल दिगलवार नायब तहसीलदार नांदेड पथक प्रमुख, नन्हणू कानगुले मंडळ अधिकारी, कुणाल जगताप मंडळाधिकारी, तलाठी रमेश गिरी, संताजी देवापुरकर, माधव भिसे, सरपे, रणवीरकर, खेडकर, जाधव, कदम, पोलीस पाटील शिवाजी सोनटक्के, कोतवाल बालाजी सोनटक्के इत्यादी करत आहेत.

0000







  वृत्त क्रमांक 160

शासनाच्या योजना आपल्या संपर्कातील प्रत्येकापर्यंत पोहोचवा : न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी

किनवट येथील शासकीय सेवा व योजनांच्या महाशिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
#किनवट (जि. नांदेड ) दि. ८ फेबुवारी : आज किनवट येथे आपल्याला ज्या काही योजना माहिती झालेल्या आहेत. त्या योजनांचा तुम्ही स्वतः लाभ घ्या. सोबतच या योजना आपल्या संपर्कातील अनेकांपर्यंत पोहोचवा, असे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी यांनी आज येथे केले.
किनवट येथील तालुका क्रीडा संकुलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शासकीय सेवा व योजनांच्या महाशिबिरामध्ये ते बोलत होते. या महाशिबिराचे आयोजन महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांचे आदेशान्वये नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा प्रशासन नांदेड, किनवट तालुका विधी सेवासमिती व तालुका प्रशासन किनवट यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
या शिबिरामध्ये अनेक लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते विविध शासकीय योजनातील प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. आरोग्य, शिक्षण, कृषी, महिला व बालकल्याण, व्यक्तिगत लाभाच्या अनेक योजना व सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचे अनेक स्टॉल या ठिकाणी उभारण्यात आले होते. या प्रत्येक स्टॉलला मान्यवरांनी भेट देऊन पाहणी केली.
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी, न्यायमूर्ती शैलेश ब्रह्म्हे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुरेखा कोसमकर, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अप्पर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मेघना कावली, जिल्हा विधी प्राधिकरणच्या सचिव दलजीत कौर जज, तहसीलदार श्रीमती शारदा चोंडेकर, मुख्याधिकारी अजय कुरवाडे यांची यावेळी उपस्थिती होती.
शासनाच्या विविध विभागाच्या ४६ स्टॉलची उभारणी या ठिकाणी करण्यात आली होती. या ठिकाणावरून प्रत्येक योजनेची माहिती दिल्या जात होती. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने हे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी आपल्या संक्षिप्त संदेशामध्ये न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी यांनी या आयोजनामागचा उद्देश हा केवळ लोकांपर्यंत माहिती पोहोचविणे आहे. शासन कायम चांगल्या योजना निर्माण करते. पण बहुतेक वेळा ही माहिती जनतेपर्यंत जात नसल्याचे दिसून आले. न्यायालयीन कामकाज करताना देखील अनेक बाबी नागरिकांना माहिती नसते. त्यामुळे मदतीसाठीच राज्य व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाची निर्मिती झाली. न्यायाबद्दल, आपल्या सोयी सुविधांबद्दल, माहिती व्हावी हा यामागील उद्देश आहे. आज इथे उपस्थित नागरिकांच्या संख्येवरून हा उद्देश सफल होताना दिसतो आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
न्यायमूर्ती शैलेश ब्रम्हे यांनी देखील यावेळी संबोधित केले. ते म्हणाले, शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचू शकत नाही त्यामुळे अनेक लोक शासकीय योजनांपासून वंचित राहतात. त्यांना त्याचा फायदा होत नाही एका छताखाली सर्व योजना उपलब्ध व्हाव्यात व लाभार्थ्यांना त्याचा लाभ व्हावा ही या आयोजनामागची भूमिका आहे. मला आनंद आहे की. ४६ स्टॉल आज लावण्यात आले आहे. कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्याकरिता या ठिकाणी अनेक यंत्रणांनी जिल्हा विधी प्राधिकरणाला मदत केली. त्यासाठी आम्ही त्यांचे आभारी आहे. तसेच यावेळी त्यांनी उपस्थित मोठ्या महिलांच्या संख्येची देखील नोंद घेतली ते म्हणाले महिला सक्षमीकरणाकडे आपले पाऊल पडत असल्याचे आजची उपस्थिती द्योतक आहे.
यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुरेखा कोसमकर यांनीही संबोधित केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा विधी प्राधिकरणच्या सचिव दलजीत कौर जज यांनी केले. सर्व शासकीय यंत्रणांनी घेतलेल्या सहभागाबद्दलही त्यांनी सर्वांचे आभार मानले.
सदरच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन 4 थे सह दिवानी न्यायाधीश व. स्तरचे महेश सोवनी यांनी केले तर दिवाणी न्यायाधीश क. स्तर पी. एम. माने यांनी सर्वांचे आभार मानले. प्रारंभी बोधडी बु. येथील अंध विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले तर समारोप सामुहिक राष्ट्रगीताने झाला.
0000















#मुख्यमंत्रीलाडकीबहीणयोजना #नांदेड



  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच...