Saturday, December 10, 2022

9.12.2022

 जिल्हा जात पडताळणी कार्यालयात

संत जगनाडे महाराज जयंती साजरी

नांदेड (जिमाका) दि. 9 :- संत जगनाडे महाराज यांचा जन्म इ. स. 8 डिसेंबर 1624 रोजी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील सुदुंबरे या गावी झाला. विठोबा जगनाडे व आई माथाबाई हे विठ्ठलभक्त होते. कीर्तनाची आवड त्यांच्यात बालपणीच निर्माण झाली. ते संत तुकाराम महाराजांच्या टाळकऱ्या पैकी होते. अशा महापुरुषांची जयंती जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात नुकतीच साजरी करण्यात आली.

यावेळी जात पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य अनिल शेंदारकर यांच्या हस्ते संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी एस. जे. रणभीरकरव्ही. बी. आडेसंजय पाटीलसाजिद हासमीशिवाजी देशमुखवैजनाथ मुंडेबाबू कांबळेसोनू दरेगावकरमनोज वाघमारेओमशिवा चिंचोलकरशंकर होनवडजकरसुनील पतंगे, अनिकेत वाघमारेमोशीन शेखसंजय मंत्रे लहानकर यांची उपस्थिती होती.

संताजींवर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार होते. मुलांला हिशोब करता येणे आवश्यक असल्यामूळे संताजी महाराजांना लिहिता वाचता आणि हिशोब करता येईल एवढे शिक्षण त्यांना मिळाले होते. घरची परिस्थिती चांगली होती. त्यामुळे संताजी महाराजांना कसली कमी पडली नाही. संताजींवर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार झाले होते. त्यामूळे त्यांना कीर्तनालाभजनाला जाण्याची सवय लागली.

0000

9.12.2022.

 लेख                                                     दि. 9 डिसेंबर 2022                                                                                                         

लम्पी नियंत्रणासाठी माझा गोठा स्वच्छ गोठा !

 

लम्पी चर्मरोग हा संसर्गजन्य आजार असून तो विषाणू पासून पसरतो. प्रामुख्याने गायी व म्हशींमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. देशात सुरवातीला हा आजार गुजरातराजस्थान या राज्यामध्ये आढळून आला. त्यानंतर हा संसर्ग महाराष्ट्र राज्यातील गायवर्ग जनावरामध्ये दिसून आला. या रोगाने लक्षणे असलेल्या जनावरांना सुरवातीला ताप येतो. त्यांचे वजन कमी होते. जनावरांच्या डोळ्यातून चिकट पाणी टपकते. तोंडातून लाळ पडतेशरीरावर छोटया गाठी येतात. अशी लक्षणे पशुधनात आढळल्यास पशुपालकांनी आपल्या नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी जनावरांना तात्काळ उपचारासाठी दाखल करणे आवश्यक आहे. तसेच रोग प्रादुर्भाव झाल्यास त्याबाबतची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त अथवा पशुसंवर्धन विभागाचा टोल फ्री क्रमांक 1800-2330-418 अथवा राज्यस्तरीय कॉल सेंटरमधील पशुसेवेचा टोल फ्री क्रमांक 1962 वर द्यावी . शासनाच्यावतीने पशुपालकांना याबाबत सर्व ते सहकार्य करण्यात येत आहे.  

 

लम्पी चर्मरोगाचा प्रसार हा गोचिडडास आणि माशा यांच्या माध्यमातून पसरतो. बाधित जनावरांच्या सानिध्यात आलेल्या जनावरांना हा आजार होतो. त्यामुळे लम्पी चर्म रोग नियंत्रणासाठी जनावरांचे लसीकरण व जनावरे बांधण्याच्या ठिकाणाची म्हणजेच गोठ्याची स्वच्छता अत्यंत आवश्यक बाब आहे. या रोगाचा समूळ उच्चाटनासाठी व नियंत्रणासाठी पशुपालकांनी बाधित जनावरे विलगीकरण करणेजनावराच्या गोठ्यातील गोचिडडास आणि माशा हे समूळ नष्ट करणे, गोठयाला किटकनाशकऔषधाची फवारणी करणे. या सर्व बाबी अंमलात आणल्यास लम्पी चर्मरोगाचे नक्कीच उच्चाटन होण्यास मदत होईल.

 

शासनाने गोवंशीय पशुधनास लम्पी आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सुरवातीलाच जनावरांचे लसीकरण करण्यावर भर दिला आहे. जिल्ह्यात 30 ऑक्टोंबरपर्यत 98 टक्के लसीकरण करण्याची कार्यवाही केली आहे. लसीकरणाबरोबर जनावरांचे गोठ्याची स्वच्छतागायी-म्हशींचा बाजार भरवण्यास मनाईबाधित जनावरांना स्वतंत्र बांधण्याची व्यवस्था करण्याबाबत वेळोवेळी पशुपालकांना मार्गदर्शक सूचना निर्गमीत केलेल्या आहेत. जिल्हातालुका पातळीवर याबाबीची अंमलबजावणी होण्यासाठी मोठया प्रमाणात सर्व माध्यमाद्वारे जनजागृती करण्यात आली आहे.  

 

शासनाने माहे नोव्हेंबर 2022 मध्ये लम्पी चर्मरोग आटोक्यात येण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून संपूर्ण राज्यात माझा गोठा स्वच्छ गोठा ही मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाचे सर्व अधिकारी-कर्मचारी गावोगावी गोठा भेटी देत आहेत. या मोहिमे दरम्यान पशुपालकांना गोठा स्वच्छ करणे, गोठयात औषधोपचाराची फवारणी करणे, पशुपालकांना मार्गदर्शन करणे, जनावरांमध्ये रोगाची लक्षणे आढळल्यास उपचारासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनाची माहिती दिली जाते. गावात स्थानिक ग्रामपंचायतीद्वारे नियुक्त व्यक्तीमार्फत गोठा व सभोवतालच्या परिसरात किटकनाशक तथा जंतूनाशकांची फवारणी केली जाते.

 

पशुपालकांचे पशुधन रोग प्रादुर्भावग्रस्त होवू नये यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून रोग प्रादुर्भाव भागात नियंत्रणासाठी मोफत औषधोपचार तसेच लसीकरणाच्या सुविधा पशुपालकांच्या दारात उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच बाधित जनावरे आढळल्यास त्याबाबत पशुपालकांनी रोग प्रादुर्भावाची माहिती नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थेला तात्काळ कळवावी व उपचाराच्या सुविधा प्राप्त करुन घ्यावी याबाबत घरोघरी जावून मार्गदर्शन केले. कोणत्याही परिस्थितीत जनावरांना औषधोपचार किंवा लसीकरणासाठी तात्काळ करुन त्वरीत उपचार सुरु केल्यास हा रोग निश्चित बरा होतो या मोहिमेद्वारे सांगण्यात आले. लम्पी आजाराचे तात्पुरते नव्हे तर कायमचे उच्चाटन करण्याचे सर्वाचे उद्दिष्ट आहे.  लसीकरणाच्या माध्यमातून या रोगावर नियंत्रण मिळविणे शक्य आहे. पशुपालकांनी जास्तीत-जास्त प्रमाणात आपल्या गुरांना लसीकरण करुन घ्यावे.

 

अलका पाटील, 

उपसंपादक,

जिल्हा माहिती कार्यालय नांदेड

 

00000

 विशेष लेख  :

 

राज्याच्या वैभवाची नांदी :

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग

 

सन 1995 पर्यंत राज्यातील महामार्गांची स्थिती एका आव्हानात्मक पातळीवर पोहचलेली होती. ती या अर्थाने, ज्या गतीने वाहनांची नोंदणी राज्यामध्ये होती त्या वाहनांची संख्या व उपलब्ध असलेल्या राज्य व राष्ट्रीय महामार्गाची स्थिती रस्ते सुरक्षिततेच्या दृष्टिकोणातून परीपूर्ण असणे अत्यंत गरजेची होती. राज्यातील मुंबई-पुणे, पुणे-कोल्हापूर, मुंबई-नाशिक, मुंबई-गोवा, मुंबई-नागपूर, मुंबई-सोलापूर व राज्याच्या इतर भागाला जोडणारे महामार्ग विकसीत होणे आवश्यक असल्याचे त्या काळातील सर्वच रस्ते वाहतूक तज्ज्ञांनी आग्रहाने सांगितले होते. एकाबाजुला मर्यादीत रस्ते, दुसऱ्या बाजुला या मार्गांवर वाढलेल्या वाहतुकीची संख्या हे गणित वाहतूक कोंडीला जागोजागी निमंत्रण देणारे होते.

 

मुंबई-पुणे, मुंबई-नाशिक या महामार्गावरील वाहतुक कोंडी ही महिन्यातील अनेक दिवस पाच-पाच तासांच्या पुढे असायची. ही स्थिती नवीन एक्सप्रेसवे होईपर्यंतची होती. दोन तासात पुण्यावरून मुंबईला पोहचू हे तेंव्हा दिवास्वप्न होते. कालांतराने अभियंत्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा करून हा मार्ग विकसित केला. वाहनाच्या गतीच्या तुलनेत ज्या प्रमाणात जिथे कुठे आवश्यक असेल तेवढ्या रुंद आकाराचे वळण यात ठेवण्यात आले. वाहनाच्या गतीप्रमाणे चालकाच्या लक्षात येईल अशा पद्धतीने काही कि.मी. अगोदर पासून रस्त्याला दिशादर्शक असणारे साईनबोर्डस् यामुळे चालकांना कमालीची सुविधा झाली. अपघाताचे प्रमाण रस्त्यांमुळे न होता केवळ मानवी चुकांपुरते मर्यादीत व्हायला वेळ लागला नाही.

 

सन 2000 पर्यंत म्हणजेच 22 वर्षाखाली मुंबई-सोलापूर, मुंबई-कोल्हापूर, नागपूर-अमरावती अशा चारपदरी, सहापदरी मार्गांनी महाराष्ट्रातील रस्ते वाहतुकीचे जाळे भक्कम व्हायला सुरूवात झाली. महाराष्ट्राच्या रस्ते वाहतुकीतील एक आदर्श मापदंड ठरणारा नवा अध्याय आता नागपूर-मुंबई या समृद्धी महामार्गाच्या रुपाने निर्माण होत आहे. या महामार्गाच्या माध्यमातून हजारो गावांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत. ज्या शिवारातून हा रस्ता धावत आहे त्या शिवारातील भाजीपाल्यापासून ते अनेक वैविध्यपूर्ण असलेल्या फळ उत्पादक शेतकऱ्यांना विक्रीचे नवी बाजारपेठ यातून साकारत आहे. ही बाजारपेठ, विक्री केंद्र टोल नाक्याच्या आजूबाजूला, हॉटेल्स व विसाव्याच्या ठिकाणी उपलब्ध होत आहे.

 

विकासाचा मार्ग हा दळण-वळणाच्या, वाहतुकीच्या भक्कम सुविधेतूनच विकसित होत असतो. हा मार्ग कृषि क्षेत्रापासून, ग्रामीण उद्योगापासून सर्वांना प्रवाहित करतो. ती सुविधा आता उपलब्ध होऊ घातली आहे. महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा म्हणून या महामार्गाकडे पाहिले जात आहे. याचबरोबर महाराष्ट्रातील पहिल्या मुंबई-पुणे एक्सप्रेसवेला संपूर्ण समर्थन देऊन हा प्रकल्प साकारण्यात ज्यांनी महत्वपूर्ण पाठराखण केली, योगदान दिले असे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव या महामार्गाला दिले गेले आहे. ही भाग्यरेषा आता हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग या  नावाने पिढ्यानपिढ्या जपली जाईल.

 

राज्याच्या विकासाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच या महामार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून उद्घाटन सोहळ्याच्या पूर्व तयारीला एक दिशा दिली. रविवार दिनांक 11 डिसेंबर 2022 पासून हा महामार्ग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण केला जात आहे. राज्य सरकारने उभारलेला देशातील सर्वाधिक लांबीचा वेगवान असा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा ठरणार असून राज्याच्या सर्वांगिण विकासात हा महामार्ग गेमचेंजर ठरणार आहे. विदर्भ, मराठवाडा भागात औद्योगिक क्रांतीचे नवे मार्ग यातून भक्कम होतील. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणारा हा लोकार्पण सोहळा राज्यासाठी मोठा आनंदाचा क्षण असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

 

-         विनोद रापतवार,

जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड

 

समृद्धी महामार्गाविषयी :

नागपूर मुंबई शिघ्रसंचार द्रुतगती मार्ग हा महत्वाचा प्रकल्प म्हणुन अधिसुचित करण्यात आला आहे. सदर महामार्गास दिनांक 22 डिसेंबर, 2019 रोजीच्या शासननिर्णयाव्दारे "हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग" असे नाव देण्यात आले आहे.

• पुर्ण प्रकल्पाला पर्यावरण विषयक, वन विभाग आणि वन्यजीव संरक्षण विभाग यांची मंजूरी प्राप्त झाली आहे. 

• सद्यस्थितीत प्रकल्पासाठी लागणारी 8861.02 हेक्टर जमीन (रस्त्याची रुंदी + इंटरचेंज) संपादित करण्यात आली आहे.

• सदर प्रकल्प 16 पॅकेजमध्ये विभागण्यात आला आहे. संपूर्ण प्रकल्प माहे जुलै 2023 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. 

• प्रकल्पामध्ये वन्यजीव संरक्षणासाठी एकुण 84 बांधकामे प्रस्तावित होती तथापि गरजेनुसार ही बांधकामे 100 पर्यंत वाढविण्यात आली आहेत, त्यांची रचना वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आली आहे. 

सद्यस्थितीत 1 ते 11 (शिर्डी पर्यंत) पॅकेजेसचे काम पुर्ण झाले आहे.

पहिला टप्पा म्हणून, नागपूर ते शिर्डी 701 किमी पैकी 520 किमी लांबीचा रस्ता, वाहतुकीसाठी तयार आहे त्याचे लोकार्पण होत आहे. जुलै 2023 पर्यंत उर्वरित महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन आहे.

0000

Friday, December 9, 2022

 समृद्धी महामार्गाचे रविवारी पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण


पंतप्रधानांच्या उपस्थितीत नागपूरला विविध लोकाभिमुख उपक्रमांचा शुभारंभ

मुख्यमंत्र्यांनी घेतला लोकार्पण सोहळ्याच्या तयारीचा आढावा

समृद्धी महामार्ग राज्याच्या समृद्धीची भाग्यरेषा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. ९: महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे रविवारी दि. ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. या सोहळ्याच्या तयारीचा आढावा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. नागपूर दौऱ्यावर येत असलेले पंतप्रधान श्री. मोदी हे मेट्रो ट्रेनमधून प्रवास करणार असून समृद्धी महामार्गावरून देखील प्रवास करणार आहेत. पंतप्रधानांच्या उपस्थित होणाऱ्या लोकार्पण सोहळ्यात विविध कार्यक्रम होणार आहेत. 

दरम्यान, काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत नागपूर मेट्रो टप्पा दोन आणि नाग नदी प्रदुषण नियंत्रण प्रकल्पाला मंजूरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी पंतप्रधानांचे आभार मानले.

वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी समृद्धी महामार्गाच्या लोकार्पण सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर हे यावेळी उपस्थित होते. तर नागपूरच्या विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी प्रसन्ना बिदरी, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, नागपूरचे जिल्हाधिकारी विपीन इटनकर, पोलिस आयुक्त अमितेशकुमार, महामेट्रोचे ब्रिजेश दिक्षित आदी यावेळी दूरदृष्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते. 

मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, राज्य सरकारने उभारलेला देशातील सर्वाधिक लांबीचा वेगवान असा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा ठरणार असून राज्याच्या सर्वांगिण विकासात हा महामार्ग गेमचेंजर ठरणार आहे. विदर्भ, मराठवाडा भागात औद्योगिक क्रांती करणारा ठरेल असे सांगत  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा होत असून  आपल्या राज्यासाठी मोठा आनंदाचा क्षण असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या सोहळ्यासाठी उपस्थित राहणाऱ्या नागरिकांची कुठलीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी मुख्य सचिवांनी दि. ११ डिसेंबरला पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती दिली. नागपूर विमानतळावर पंतप्रधानांचे आगमन होणार असून त्यानंतर खापरी मेट्रो स्टेशन, नागपूर फेज १ चे उद्घाटन, वंदे मातरम ट्रेनला हिरवा झेंडा दाखविणे, मिहान एम्सचे लोकार्पण त्यानंतर वायफळ टोल नाका येथून समृद्धी महामार्गाचे लोकार्पण होणार आहे.  झीरो माईल्स ते वायफळ टोलनाका असा प्रवास देखील करणार आहेत. टेम्पल मैदानावर पंतप्रधानांची सभा होणार आहे. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री सर्वश्री नितीन गडकरी, अश्विनी वैष्णव, हरदीप पुरी,  केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार, रावसाहेब दानवे आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. 

पंतप्रधानांच्या दौऱ्याची तयारी यावेळी होणाऱ्या विविध उपक्रमांचे कोनशिला अनावरण आदी बाबत नागपूर जिल्हा प्रशासन, एमएसआरडीसी, मेट्रो यांच्या मार्फत करण्यात येत असलेल्या तयारीची माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली.

समृद्धी महामार्गाविषयी:
नागपूर मुंबई शिघ्रसंचार द्रुतगती मार्ग हा महत्वाचा प्रकल्प म्हणुन अधिसुचित करण्यात आला आहे.

 सदर महामार्गास दिनांक २२ डिसेंबर, २०१९ रोजीच्या शासननिर्णयाव्दारे "हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग" असे नाव देण्यात आले आहे.

• पुर्ण प्रकल्पाला पर्यावरण विषयक, वन विभाग आणि वन्यजीव संरक्षण विभाग यांची मंजूरी प्राप्त झाली आहे. 

• सद्यस्थितीत प्रकल्पासाठी लागणारी ८८६१.०२ हेक्टर जमीन (रस्त्याची रुंदी + इंटरचेंज) संपादित करण्यात आली आहे.

• सदर प्रकल्प १६ पॅकेजमध्ये विभागण्यात आला आहे. संपूर्ण प्रकल्प माहे जुलै २०२३ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. 

• प्रकल्पामध्ये वन्यजीव संरक्षणासाठी एकुण ८४ बांधकामे प्रस्तावित होती तथापि गरजेनुसार हि बांधकामे १०० पर्यंत वाढविण्यात आली आहेत, त्यांची रचना वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आली आहे. 

सद्यस्थितीत १ ते ११ (शिर्डी पर्यंत) पॅकेजेसचे काम पुर्ण झाले आहे.
पहिला टप्पा म्हणून, नागपूर ते शिर्डी ७०१ किमी पैकी ५२० किमी लांबीचा रस्ता, वाहतुकीसाठी तयार आहे त्याचे लोकार्पण होत आहे. जुलै २०२३ पर्यंत उर्वरित महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन आहे.

०००००



 नांदेड जिल्ह्यातील युपीएससी मुख्य परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी जिल्हाप्रशासनाचा पुढाकार

▪️मुलाखतीत सरस ठरण्यासाठी जिल्ह्यासंदर्भात विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षण
नांदेड (जिमाका) दि. 9 :- जिल्ह्यातील शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी स्पर्धात्मक परीक्षेची तयारी पूर्ण करून यशाच्या शिखरापर्यंत पोहचले आहेत. केवळ जिल्ह्याचे भूमिपुत्र म्हणून नव्हे तर या जिल्ह्यातील शैक्षणिक सुविधा लक्षात घेऊन इथे शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी युपीएससी सारखी मेन परीक्षा उत्तीर्ण होऊन मुलाखातीच्या तयारीत आहेत. यातील अनेक विद्यार्थ्यांनी संपर्क साधून जिल्ह्यातील सामाजिक, ऐतिहासिक व विकासाचा आलेख कसा जाणून घेता येईल याची विचारणा केली. त्यांच्या प्रयत्नांना यश यावे यादृष्टिने लवकरच अशा मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी दृकश्राव्य माध्यमाद्वारे मार्गदर्शन सुरू करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली.
जिल्ह्यातील त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञ यांच्या उपलब्ध वेळेनुसार त्यांचाही सहभाग यात करून घेण्यात येईल. याचबरोबर जिल्ह्यात नवनियुक्त झालेले आयएएस व आयपीएस अधिकारी, इतर अधिकारी हेही या उपक्रमात योगदान देतील. झुम व इतर माध्यमाद्वारे या विद्यार्थ्यांना निश्चित तारीख ठरवून दिलेल्या वेळेवर हा उपक्रम कृतज्ञतेपोटी सुरू करीत असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली. या विद्यार्थ्यांना आपली परीपूर्ण माहिती ज्यात मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा परीक्षा क्रमांक व इतर माहिती collectornanded1@gmail.com यावर पाठविण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
00000

 सुधारित वृत्त

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश  लागू 

नांदेड (जिमाका) दि. 9  :- नांदेड जिल्ह्यात शनिवार 10 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते शनिवार 24 डिसेंबर 2022 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

 

 जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 10 डिसेंबर 2022  रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 24 डिसेंबर 2022 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहील. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अत्यंयात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही. 


अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

0000

 क्षेत्रिय महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्‍न 

 

नांदेड (जिमाका) दि. 9  :- महसूल जमीन महसूल अधिनियम 1966 मधील  विविध कलमांमध्‍ये  नवीन सुधारणा झालेल्‍या आहेत. या सुधारणांची क्षेत्रिय स्‍तरावरील  महसूल अधिकारी व कर्मचारी यांना परिपूर्ण  माहिती असणे आवश्‍यक आहे. महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील विविध तरतुदींची तसेच शासनाच्‍या  विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्‍यासाठी  कार्यरत महसूल अधिकारी व कर्मचारी प्रशिक्षीत असणे आवश्‍यक आहे. त्या अनुषंगाने जिल्‍हाधिकरी अभिजीत राऊत व अपर जिल्‍हाधिकारी पी. एस. बोरगावकर यांच्या संकल्पनेतुन  8 डिसेंबर 2022 रोजी नियोजन भवन नांदेड येथे क्षेत्रिय महसूल अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण आयोजित करण्‍यात आले  होते.

 

महसूल अधिकारी / कर्मचारी  यांना कायदयाचे सखोल ज्ञान, माहिती  असेल  तर कायदयाची प्रभावी पणे अंमलबजावणी करणे सोपे होते. महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 42 मध्‍ये 42 अ, 42 ब, 42 क, 42 ड  नव्‍याने समाविष्‍ट करण्‍यात आलेले आहेत.  तसेच  या नियमान्‍वये केलेल्‍या सुधारणा Ease of Doing Business व शासनाच्‍या उत्‍पन्‍नाच्‍या अनुषंगाने महत्‍वाचे असल्‍याने नियमाची तात्‍काळ प्रभावीपणे अंमलबजावणी होणे आवश्‍यक असल्याने हे प्रशिक्षण आयोजित करण्‍यात आले  होते.

 

या प्रशिक्षणात  उपविभागीय अधिकारी धर्माबाद राजेंद्र शेळके यांनी महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम  42-ब, 42-क व 42-ड  मधील तरतुदीची परिपूर्ण माहिती दिली. बिलोलीचे उपविभागीय अधिकारी सचिन गिरी यांनी  पोटखराब क्षेत्र लागवडी योग्‍य क्षेत्रात  आणणे बाबतची कार्यपध्‍दती, संगणकीकृत सातबारा वरील कालबाहय नोंदी कमी करणे.  तसेच अकृषिक  सातबारा वेगळा करणे बाबतची पध्‍दती याविषयी सखोल मार्गदर्शन केले. उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी  डिजिटल  इंडिया  भूमि अभिलेख  आधुनिकीकरण  कार्यक्रम व (DILRMP) व ई-चावडी याविषयी  उपस्थितांना मार्गदर्शन केले.

 

अपर जिल्‍हाधिकारी पी.एस.बोरगावकर यांनी  वर्ग- 2 जमीनीचे व्‍यवस्‍थापन (इनाम, अतियात, कुळ, सिलींग जमीन ) इत्‍यादी बाबतच्‍या कायदयाची  सविस्‍तर माहिती दिली. उपजिल्‍हाधिकारी (रोहयो) अनुराधा ढालकरी यांनी  महाराष्‍ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने बाबतचे सविस्‍तर प्रशिक्षण दिले.

 

जिल्‍हा अधिक्षक भूमी अभिलेख श्रीमती सुरेखा सेठीया यांनी  नगर भूमापन झालेल्‍या भागातील दुहेरी नोंद पध्‍दत बंद करणे बाबतचे सादरीकरण सादर करुन उपस्थितांना याविषयी सखोल मार्गदर्शन केले. जिल्‍हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आपल्‍या मनोगतात प्रशिक्षणाचे महत्‍व विषद करुन  शासनाच्‍या योजनांची परिपूर्ण माहिती कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांना असली पाहिजे. जेणेकरुन  सदर योजना शेवटच्‍या घटकापर्यंत प्रभावीपणे राबविणे सोपे होते. अधिकारी, कर्मचारी यांनी विकासात्‍मक दृष्टिकोन बाळगुन जनतेचे विविध  प्रश्‍न, अडचणी सोडविण्‍याचा प्रयत्‍न करावा. कार्यालयीन कामकाज शिस्‍तबध्‍द व चाकोरीने करावे.  कार्यालयीन कामकाजात सुलभता असावी.  कार्यालय नेहमी स्‍वच्छ असावे  अशी अपेक्षा व्‍यक्‍ती केली.

 

या प्रशिक्षणास  सहायक जिल्‍हाधिकारी किनवट नेहा भोसलेअपर जिल्‍हाधिकारी पी. एस. बोरगावकर, जिल्‍हा अधिक्षक भूमी अभिलेख श्रीमती सुरेखा सेठीया, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार,  उप‍ अधिक्षक भूमी अभिलेख, नायब तहसिलदार,  मंडळाधिकारी,  अव्‍वल कारकुन, महसूल सहायक तलाठी इत्‍यादी  अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. हे प्रशिक्षण यशस्‍वी होणेसाठी  अपर जिल्‍हाधिकारी पी.एस. बोरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी उपजिल्‍हाधिकारी लतिफ पठाण, तहसिलदार (महसूल)  विजय अवधाने, अव्‍वल कारकुन गोपाळ धसकनवार यांनी परिश्रम घेतले.  कार्यक्रमाचे सुत्रसंचालन, आभार अव्‍वल कारकुन प्रसाद शिरपुरकर यांनी मानले.

00000

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ #शेतकरीकर्जमुक्ती #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #शेतकरी Maharashtra DGIPR ...