Tuesday, May 1, 2018


महाराष्ट्र दिन ध्वजवंदनाचा शानदार समारंभ संपन्न
मतभेद विसरुन एकतेची भावना जपली पाहिजे
- पालकमंत्री रामदास कदम
नांदेड दि. 1 :- आपसातील मतभेद विसरुन आपण एका कुटुंबातील भारत मातेची लेकरं आहोत अशी एकतेची भावना जपली पाहिजे, असे आवाहन राज्याचे पर्यावरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी केले. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 58 व्या वर्धापनदिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजवंदन पालकमंत्री श्री. कदम यांच्या हस्ते झाले. ध्वजवंदनानंतर ते संदेशपर भाषणात बोलत होते. पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर शानदार संचलन आणि उत्साहात समारंभ संपन्न झाला. या समारंभासाठी ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती शांताबाई पवार, महापौर श्रीमती शिलाताई भवरे, आमदार डी. पी. सावंत, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, विशेष पोलीस महानिरिक्षक चिरंजीव प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मिना, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष समाधान जाधव, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती शिलाताई निखाते, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, आदींसह विविध विभागांचे वरीष्ठ अधिकारी, आदींची उपस्थिती होती.   
आपल्या शुभेच्छापर संदेशात पालकमंत्री श्री कदम म्हणाले की, आजचा दिवस महाराष्ट्राच्या स्थापनेचा दिवस असून संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती 105 हुतात्म्यांच्या बलिदानातून झाली आहे. सर्वधर्म समभावाचा संदेश देऊन सर्व समाजाला सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी कार्य केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना दिली म्हणून सर्वांना न्याय मिळाला आहे, याची जाणीव ठेवली पाहिजे. भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरु यांनी 1 मे 1960 रोजी यशवंतराव चव्हाण यांच्या हातामध्ये महाराष्ट्र स्थापनेचा मुहुर्त कळस दिला आणि पहिले राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. भाषावाद प्रांतानुसार कर्नाटक-महाराष्ट्र सिमेवरील 40 लाख मराठी बांधव महाराष्ट्रात येण्यास इच्छूक आहेत. या मराठी बांधवाचा महाराष्ट्रात समावेश होईल त्यादिवशी संपुर्ण महाराष्ट्र असेल अशी भावना त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र दिन हा आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून ओळखला जातो. आजच्या दिवशी कामगारांना न्याय मिळाला. कामगार दिन 1923 ला पहिल्यांदा मद्रासला साजरा झाला. कामगारांच्या संघटना झाल्या, नौकऱ्या मिळाल्या व खऱ्या अर्थाने आठ तास कामाचा अधिकार कामगारांना मिळाला. कामगार दिन जवळपास ऐंशी देशात साजरा केला जातो. "दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा" असे सांगून राज्यातील जनतेच्या सामर्थ्याचा, श्रमाचा गौरव करुन पालकमंत्री श्री. कदम यांनी महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 58 वा वर्धापन दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.   
समारंभात सुरवातीला पालकमंत्री श्री कदम यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले, तसेच राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. पालकमंत्री कदम यांनी संचलन पथकांचे निरीक्षणही केले. परेड कमांडर पोलीस उपअधिक्षक प्रशांत ढोले आणि सेकंड परेड कमांडर राखीव पोलीस उपनिरीक्षक एस. डी. राठोड यांच्या नेतृत्वात सशस्त्र पोलीस पथकाच्या तीन प्लाटूनसह, महिला पोलीसांचे पथक, जलद कृती दल, शहर वाहतूक शाखा, गृहरक्षक दलाच्या पुरूष व महिलांचे पथक, अग्नीशमन दल, पोलीस वाद्यवृंद, श्वान पथक, बॅाम्ब शोधक व नाशक पथक, मार्क्स मॅन, वज्र वाहन, अग्नीशमन दल, बुलेट रायडर संचलनात सहभागी झाले. पालकमंत्री कदम यांनी उपस्थित स्वातंत्र्यसेनानी यांच्याशीही संवाद साधला, तसेच त्यांची आस्थेवाईक विचारपूस करून, त्यांना शुभेच्छाही दिल्या. प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत रस्ता सुरक्षा अभियानाच्या चित्ररथास पालकमंत्री कदम यांनी हिरवी झेंडी दाखवून रस्ता सुरक्षा उपक्रमाचा शुभारंभ केला. व्यंकटेश चौधरी यांनी सुत्रसंचालन केले.

पालकमंत्री कदम यांच्या हस्ते
प्रवास पास, पुरस्काराचे वितरण  
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शहिद सन्मान योजनेंतर्गत पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते राज्य परिवहन महामंडळातर्फे देण्यात येणारा अजीवन मोफत प्रवास पास वीर पत्नी श्रीमती अरुणाताई टर्के ( शहिद ज्ञानोबा गोविंदराव टर्के, मराठा लाइट इन्फ्रर्टी  शहिद दि. 2 मार्च 2003 ऑपरेशन मोहिम ओ.पी. रक्षक जम्मु आणि काश्मिर ) यांना देण्यात आला. आदर्श तलाठी पुरस्कार- आर. एस. वागतकर पांडुर्णा ता. भोकर, पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र- भगवान कापकर, अनिलकुमार आदोडे, संभाजी होनराव, शेख हैदर महमद इस्माईल. दि. 15 फेब्रुवारी 2018 रोजी नांदेड व कृष्णुर पाणीपुरवठा योजनेच्या व जलशुद्धीकरण केंद्रातील बंदीस्त कोरड्या पाण्याच्या टँकमध्ये पेटींग काम करत असताना क्लोरीनेटेड रबर पेटंच्या गॅसमुळे बेशुद्ध पडलेल्या चार कामगारांना बाहेर काढून त्यांचा जीव वाचवल्याबद्दल अग्नीशमन अधिकारी अतुल मांगलकर व सहकारी, सन 2016-17 मध्ये कंधार तालुक्यातील डोंगरगाव येथील लिंबोटी धरणाच्या पुरात 16 नागरिकांना व नांदेड शहरातील ड्रेनेजमध्ये पडलेले माणसे, नाल्यामध्ये आडकलेल्या गाई वाचवणे, अपत्तीच्यावेळी विविध ठिकाणी प्रसंगी जिवाची परवा न करता नांदेड, उस्मानाबाद, परभणी व इतर जिल्ह्यात जाऊन उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल मनपाचे अग्नीशमन अधिकारी शेख रईस पाशा व सहकारी. जिल्हा क्रीडा पुरस्कार : गुणवंत खेळाडू- सुनिल प्रधान, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक- लक्ष्मण फुलारी, क्रीडा संघटक- सय्यद अजगर अली पटेल. जिल्हा युवा पुरस्कार- नागोराव भांगे, महेश्वरी तादलापूरकर. शुभंकरोती फाऊंडेशन नांदेड. या सर्व पुरस्कार व पारितोषीक विजेत्यांना पालकमंत्री कदम यांनी प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह तसेच रोख स्वरुपातील पारितोषीके प्रदान करुन शुभेच्छाही दिल्या.
रोजगार दिनदर्शिकेचे
पालकमंत्री कदम यांच्या हस्ते प्रकाशन
राज्य शासनाने 1 ऑक्‍टोंबर 2016 पासून प्रमुख 11 कामे मोहिम स्‍वरुपात घेण्‍यासाठी महात्‍मा गांधी राष्‍ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंर्गत "समृध्‍द महाराष्‍ट्र जनकल्‍याण" योजना सुरू केली आहे. क्षेत्रिय स्‍तरावर या योजनेचा प्रचार होण्यासाठी जिल्‍हा प्रशासनाच्‍यावतीने तयार करण्यात आलेल्या रोजगार दिनदर्शिकेचे प्रकाशन पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते करण्यात आले. 
  या दिनदर्शिके प्रमुख 11 कामांसह रेशीउद्योग विकास योजना, गाळमुक्‍त धरण व गाळयुक्‍त शिवार योजनेची सविस्‍तर माहिती देण्‍यात आली आहे. ही रोजगार दिनदर्शिका नांदेड जिल्‍हयातील सर्व जिल्‍हास्‍तरावरील तसेच तालुकास्‍तरावरील कार्यालये व ग्रामपंचायत कार्यालया प्रदर्शित करण्‍यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली.
000000

Monday, April 30, 2018


स्काऊट गाईड चळवळीतून देशसेवेची प्रेरणा
- पालकमंत्री रामदास कदम
नांदेड, दि. 30 :- स्काऊट गाईड चळवळ ही जागतिक स्वरुपाची असून यातून देशसेवेची प्रेरणा मिळते, असे प्रतिपादन राज्याचे  पर्यावरण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी केले. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून तयार करण्यात आलेल्या मल्टीपर्पज हायस्कूल परिसरातील नांदेड भारत स्काऊटस्‍ आणि गाईडस् जिल्हा कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन श्री. कदम यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती शांताबाई पवार, आ. अमर राजूरकर, आ. डी. पी. सावंत, आ. सुभाष साबणे, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, स्काऊट गाईडेचे अध्यक्ष ज्ञानोबा मुंडे, माजी आमदार गंगाधर पटणे यांची प्रमुख उपस्थिती होती.  
श्री कदम म्हणाले, स्काऊट गाईडमुळे मनात देशभक्ती बरोबर विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, शारिरीक, मानसिक विकासाचा प्रयत्न केला जातो. येथील स्काऊट गाईडचे भवन उत्कृष्ट बांधण्यात आले आहे. या इमारतीच्या वरच्या मजल्यासाठी आवश्यक ती मदत केली जाईल, असेही सांगितले.   
प्रास्ताविकात अध्यक्ष डॉ. पी. डी. जोशी पाटोदेकर यांनी स्काऊट गाईड चळवळीचे स्वरुप सांगितले. यावेळी  भारत स्काऊट गाईडचे राज्य उपाध्यक्ष एल. एन. कोंडावार, जिल्हा आयुक्त गाईड श्रीमती बी. एम. बच्चेवार, सचिव बी. पी. कुदाळे, कोषाध्यक्ष एन. एम. तिप्पलवाड, जिल्हा मुख्यालय आयुक्त स्काऊट पी. एम. कुलकर्णी, जिल्हा संघटन आयुक्त गाईड रुपाली मुधोळकर, जिल्हा संघटन आयुक्त स्काऊट दिगंबर करंडे, पदाधिकारी, अधिकारी व सदस्य, विद्यार्थी, शिक्षक आदी उपस्थित होते.
000000


कर्करोग रुग्णांची संख्या कमी करण्यात
जिल्ह्याचे काम कौतुकास्पद  - पालकमंत्री रामदास कदम
नांदेड, दि. 30 :- कर्करुग्णांची संख्या वाढत असून या रुग्णांचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्ह्याचे काम कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन राज्याचे पर्यावरण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी केले. नांदेड जिल्ह्यातील महिलांसाठी जिल्हा कर्करोग नियंत्रण कार्यक्रमाची जनजागृती व जिल्हा कर्करोग नियंत्रण समारंभ कार्यक्रम डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.  
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्षा श्रीमती शांताबाई पवार, आ. सुभाष साबणे, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष समाधान जाधव, जिल्हा परिषदेचे कृषि सभापती दत्तात्रय रेड्डी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. पी. कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. व्ही. आर. मेकाने यांची प्रमुख उपस्थिती होती. 
पालकमंत्री श्री. कदम पुढे म्हणाले, कर्करोगाचे प्रमाण वाढत असून कर्करोग निदानावर आरोग्य विभागामार्फत चांगले काम होत आहे. या आजारावरील निदानासाठी आरोग्य विभागाला आवश्यक ती मदत केली जाईल. नागरिकांनी मुख कॅन्सर, स्तन कॅन्सर, गर्भ कॅन्सर या आजारावर योग्य वेळीच तपासणी करुन उपचार करावा, असेही आवाहन त्यांनी केले.
यानंतर श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय वजिराबाद येथील जिल्हा नियंत्रण कक्षाचे उद्घाटन पालकमंत्री श्री कदम यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी, आदींची  उपस्थित होते.
000000

खरीप हंगाम जिल्हास्तरीय आढावा बैठक संपन्न
खते-बियाणे खरेदीतून
शेतकऱ्यांची फसवणूक थांबवावी  
- पालकमंत्री रामदास कदम
नांदेड, दि. 30 :- खते-बियाणे खरेदीतून शेतकऱ्यांची फसवणूक थांबवावी. यासाठी कृषि खात्याने विशेष लक्ष देऊन बोगस कंपन्याच्या मालकांविरुद्ध कडक कारवाई करावी, असे निर्देश राज्याचे पर्यावरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी दिले. खरीप हंगाम 2018 जिल्हास्तरीय आढावा बैठक डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे पालकमंत्री श्री कदम यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते .
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्षा श्रीमती शांताबाई पवार, आमदार अमर राजूरकर, आ. डी. पी. सावंत, आ. सुभाष साबणे, आ. वसंत चव्हाण, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष समाधान जाधव, जिल्हा परिषदेचे कृषि सभापती दत्तात्रय रेड्डी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डॉ. तुकाराम मोटे यांची प्रमुख उपस्थिती होती.   
पालकमंत्री श्री कदम म्हणाले, शेतकऱ्यांना संकटातून दूर करण्याची जबाबदारी आता सर्वांची असून त्यांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे. यातून शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे प्रमाण कमी होईल. औषधी फवारणीतून विषबाधा होऊन शेतकऱ्यांचे मृत्यू झाले आहेत. याबाबत किटकनाशके औषधांची तपासणी करुन फवारणी करतांना काळजी घेण्याबाबत त्यांना माहिती दयावी. कर्जमुक्ती पासून वंचीत राहिलेल्या शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज भरुन घेण्यास संबंधीत विभागाने सहकार्य करावे. स्थानिक स्तरावर शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रामाणिकपणे अधिकाऱ्यांनी प्रयत्न करवीत. तसेच शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.  
यावेळी खरीप हंगाम 2017 अनुपालन अहवाल सादर करण्यात आला. तसेच नांदेड जिल्ह्याची सर्वसाधारण माहिती, मागील पाच वर्षाचे पर्जन्यमान, खरीप हंगाम 2017 पेरणी व 2018 प्रस्तावीत क्षेत्र, खरीप 2018 निविष्ठा उपलब्धता, खते व बियाणे मागणी, गुण नियंत्रण अंतर्गत नमुणे काढण्याचे लक्ष व साध्य करण्यात आलेली कारवाई, रासायनिक खत विक्रीसाठी थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी प्रकल्प), कृषि निविष्ठा व्यवस्थापन सन 2018, सर्व समावेशक पीक कर्ज वितरणाचे शासनाचे धोरण, पिक कर्ज माफी, तुर, मुग, उडीद, सोयाबीन व हरभरा खरेदी सन 2017-18, कृषि पंपाकरीता महाराष्ट्र विज वितरण कंपनीकडून विज कनेक्शनबाबत कार्यक्रम सन 2017-18 ची प्रगती व 2018-19 चे नियोजन व आवश्यक निधी, सिंचन व्यवस्थापन, प्रधानमंत्री पिक विमा योजना, हवामान आधारीत फळपिक विमा योजना, महावेध स्वयंचलीत हवामान केंद्र उभारणी, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सन 2016-17 व 2017-18, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषि विकास योजना (फलोत्पादन) मार्च 2017 खर्च व 2018-19 आराखडा, जमीन आरोग्य पत्रिका अभियान, प्रकल्प आधारीत विस्तार कार्यक्रम, उन्नत शेती समृद्ध शेतकरी मोहिम अंतर्गत कृषि यांत्रिकीकरण अभियान, मागेल त्याला शेततळे, जलयुक्त शिवार अभियान, जिल्हा कृषि महोत्सव योजना, प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजना सन 2017-18, नानाजी देशमुख कृषि संजिवनी प्रकल्प, ई-गर्व्हनस विकसीत केलेल्या आज्ञावली आदी विषयांवर चर्चा करुन उपयुक्त सुचना पालकमंत्री रामदास कदम यांनी दिल्या.
सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2018 चे भित्तीपत्रक, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, किटकनाशक फवारणी करतांना घ्यावयाची काळजी, कपाशीवरील गुलाबी बोंडआळीचे एकात्मिक व्यवस्थापन घडीपत्रिकेचे विमोचन करण्यात आले. बैठकीस उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, तालुका कृषि अधिकारी, संबंधित विभागाचे विविध अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डॉ. मोटे यांनी केले.
प्लॅस्टिक मुक्तीसाठी
कापडी पिशव्यांचा वापर करावा
- पालकमंत्री रामदास कदम  
       
प्लॅस्टिकचे विघटन लवकर होत नाही, यातून प्लॉस्टिक कचऱ्याचे प्रमाण वाढल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे प्लॅस्टिक बंदीचा ऐतिहासिक निर्णय शासनाने घेतला आहे. कापडी पिशव्याचा वापर नागरिकांनी करावा, असे आवाहन राज्याचे पर्यावरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी केले. नांदेड शहर प्लास्टीक मुक्त करण्यासाठी कापडी पिशव्यांचे वाटप श्री कदम यांचे हस्ते डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालयाच्या सहभागाने बचत गटातील महिलांकडून जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने कापडी पिशव्याचे काम सामाजिक बांधिलकी मधून उपलब्ध करुन देण्यात आले. या प्रकल्पांतर्गत 190 महिला काम करीत असून या कार्यक्रमासाठी उद्योजक अजयकुमार बाहेती यांनी आर्थिक सहकार्य केले आहे. यातून स्थानीक स्तरावर रोजगार निर्मिती होत असल्याचे सांगण्यात आले. नागरिकांचे प्रबोधन होण्यासाठी यावेळी भाजीपाला, फळ विक्रेते, पत्रकार, अधिकाऱ्यांना प्राथमिक स्वरुपात कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी गरीब परिस्थितीवर मात करुन बचत गटाच्या सहाय्याचे झाडू व्यवसाय, बाबू वस्तु तयार करुन विक्री करणे, अगरबत्ती उद्योग, खनावळ, शिलाई काम करणाऱ्या महिलांचा पालकमंत्री श्री कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  
0000000




Sunday, April 29, 2018



महाराष्ट्र दिनानिमित्त
पालकमंत्री कदम यांच्या हस्ते ध्वजवंदन
वजिराबाद पोलीस कवायत मैदानावर मुख्य शासकीय समारंभ
नांदेड, दि. 30 :- महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 58 व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त मंगळवार 1 मे 2018 रोजी वजिराबाद परिसरातील पोलीस मुख्यालय कवायत मैदान येथे सकाळी 8 वा. राष्ट्रध्वज वंदनाचा मुख्य शासकीय समारंभ होणार आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे. या समारंभास उपस्थित राहावे, असे आवाहन नांदेड जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
समारंभासाठी निमंत्रीतांनी समारंभ सुरु होण्यापुर्वी 20 मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे, सुरक्षिततेच्या दृष्टिने सोबत बँग किंवा तत्सम वस्तू आणू नयेत. या मुख्य शासकीय कार्यक्रमास सर्वांना उपस्थित राहता यावे यासाठी इतर सर्व कार्यालय, संस्था, आदींनी त्यांचे ध्वजवंदनाचे समारंभ सकाळी 7.15 पुर्वी किंवा 9 वाजेनंतर आयोजित करावेत, असेही आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या दिनानिमित्त विविध कार्यक्रम, समारंभ आदी ठिकाणी राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पध्दतीबाबत शासन परिपत्रक तसेच ध्वजसंहितेतील सूचनेचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. गृहविभागाच्या राष्ट्रध्वजाच्या उचित सन्मानाबाबतच्या परिपत्रकात नमुद केलेल्या निर्देशनानुसार राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकचा वापर होणार नाही याची दक्षता संबंधितानी घ्यावी, असेही आवाहनही राष्ट्रध्वज वापराबाबतच्या जिल्हास्तरीय जनजागरण समितीने केले आहे.
000000


Saturday, April 28, 2018


प्रधानमंत्री राष्ट्रीय स्वास्थ सुरक्षा मिशन योजना
ग्रामसभेत उपस्थित राहून माहिती संकलीत
करण्यास सहाय्य करण्याचे जिल्हाधिऱ्यांचे आवाहन 
नांदेड, दि. 28 :- प्रधानमंत्री राष्ट्रीय स्वास्थ सुरक्षा मिशन योजनेचा लाभासाठी सोमवार 30 एप्रिल 2018 रोजी ग्रामसभेत उपस्थित राहून माहिती संकलीत करण्यास सहाय्य करावे. या योजनेतील पात्र लाभार्थ्यांना देशभरात कोणत्याही अंगिकृत रुग्णालयात 5 लाख रुपयापर्यंत विनामुल्य शस्त्रक्रिया व उपचाराच्या माध्यमातून लाभ मिळणार आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे. 
जिल्ह्यात प्रधानमंत्री राष्ट्रीय स्वास्थ सुरक्षा मिशन राबविण्यात येत आहे. देशातील 10 कोटी कुंटुंबाना (50 कोटी लाभार्थी ) आरोग्य संरक्षण पुरविण्याचा भारत सरकारच्या नियोजनांतर्गत आरोग्य हे देशातील धोरण व राजकीय परिसंवादाचा मुख्य टप्पा बनला आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी लाभार्थ्यापर्यंत परिणामकारकरितीने पोहचणे आणि त्यांना योजनेचा तपशीलाविषयी माहिती देणे अत्यावश्यक आहे. याशिवाय योजना परिणामकारक राबविण्यासाठी प्रत्येक लाभार्थ्यांची काही अतिरिक्त माहिती जमा करणे आवश्यक आहे.  त्याकरीता पहिली पायरी म्हणून आयुष्यमान भारत दिवस देशभरात 30 एप्रिल 2018 रोजी आयोजित होत असलेल्या ग्राम स्वराज्य अभियानादरम्यान लाभार्थी पडताळणी, अतिरिक्त माहिती जमा मोहिम सुरु करण्यात येत आहे.
या मोहिमेची दोन उद्दीष्टे असून पहिले उद्दीष्टे कार्यक्रमाविषयी त्याच्या लाभाबद्दल पात्र लाभार्थ्यांना माहिती देणे, दुसरे उद्दीष्टे विद्यमान लाभार्थ्यांच्या यादीचे प्रमाणीकरण आणि जेथे ग्रामसेवक, आशा आणि एएनएम यांच्या माध्यमातून अतिरिक्त माहिती जमा करणे. या योजनेंतर्गत ग्रामीण लाभार्थी पडताळणी व अतिरिक्त माहिती संकलन मोहिम 15 एप्रिल ते 21 मे 2018 या कालावधीत जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.
अतिरिक्त माहिती संकलन मोहिमेमध्ये लाभार्थ्यांची पुढील बाबीवरील माहिती घेण्यात येणार आहे. मोबाईल व शिधापत्रिका क्रमांक, कुटुंबाच्या सदस्य स्थितीमधील बदल. या ग्रामसभेमध्ये याद्यांचे वाचन करुन अतिरिक्त माहिती संकलन करण्यात येणार आहे. ग्रामसभेमध्ये उपस्थित न राहणाऱ्या कुटुंबाची माहिती आशा, आरोग्य सेविकाद्वारे गृहभेटी देऊन 1 ते 8 मे 2018 या कालावधीत संकलीत केली जाणार आहे. ही माहिती संकलीत करण्यासाठी प्रत्येक तालुक्याला ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेविका, आशा कार्यकर्ती यांची प्रशिक्षण घेण्यात येत आहे.
संकलित केलेली माहिती 8 ते 21 मे 2018 या कालावधीत वेबसाईटवर अपलोड केली जाणार आहे. लाभार्थी यादीत समाविष्ट असलेल्या प्रत्येक कुटुंबास प्रती वर्षे 5 लाख रुपये इतके आरोग्य विमा संरक्षण दिले जाणार आहे. नागरिकांनी सोमवार 30 एप्रिल 2018 रोजी ग्रामसभेला उपस्थित राहून माहिती संकलित करण्यास सहाय्य करावे. त्यामुळे जास्तीतजास्त कुटुंबाना प्रधानमंत्री राष्ट्रीय स्वास्थ सुरक्षा मिशन योजनेचा लाभ घेता येईल. या योजनेत पात्र लाभार्थ्यांना देशभरात कोणत्याही अंगिकृत रुग्णालयात 5 लाख रुपयापर्यंत विनामुल्य शस्त्रक्रिया व उपचाराच्या माध्यमातून लाभ मिळणार आहे, असेही आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे.
00000


  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच...