Saturday, February 8, 2025

 वृत्त क्रमांक 162

वाघाळा येथील आश्रमशाळेतील सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर 

नांदेड दि. 8 फेब्रुवारी : जिल्हयातील वाघाळा येथील माताजी शिक्षण संस्था संचालित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील बाधित विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी कळविले आहे.यासंदर्भात प्रशासन पूर्ण लक्ष ठेवून असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त समाज कल्याण शिवानंद मिनगिरे यांनी दिली आहे. 

जिल्हयातील वाघाळा येथील माताजी शिक्षण संस्था संचालित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील  निवासी 8-10 विद्यार्थ्यांना आज सकाळी 9 वा. जेवण केल्यानंतर उलटी व मळमळ होत असल्याचे जाणवले.या विद्यार्थ्यांवर लगेच नांदेड येथील शासकीय वैद्यकिय रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याची माहिती तेथील डॉक्टरांनी दिली आहे. 

आश्रमशाळेतील शिक्षकांनी सर्व 59 विद्यार्थ्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालय विष्णपुरी नांदेड येथे दाखल केले आहे. या विद्यार्थ्यांची इतर मागास बहुजन कल्याणचे सहायक संचालक शिवानंद मिनगीरे यांनी भेट घेऊन प्रकृतीबाबत संबंधित डॉक्टरांची प्रत्यक्ष चर्चा केली. विद्यार्थ्यांची प्रकृती सुस्थितीत असून त्यांना वैद्यकीय निगराणीखाली ठेवण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली दिली असल्याचे श्री. मिनगिरे यांनी स्पष्ट केले आहे.

0000

 वृत्त क्रमांक 161

गोदावरी नदी काठावरील अवैध वाळू जप्तीची कारवाई सुरू

महसूल खात्याची धडक कारवाई 

नांदेड दि. 8 फेब्रुवारी : गोदावरी काठावर बिहारी मजुराच्या मदतीने अनेक वाळू तस्करांनी, नदी काठावरील शेतकऱ्यांनी अवैधरित्या आपली शेतजमीन वाळूचा अनधिकृत साठा साठवण्यासाठी तसेच बिहारीला वास्तव्य करण्यासाठी भाड्याने जमीन देऊन वाळू तस्करांना मदत केली आहे. या सर्वांची महसूल खात्याने गंभीर दखल घेतली आहे. गोदावरी नदीकाठावरील अवैध वाळू जप्तीची कारवाई सुरू आहे. वाळू तस्करावर एमपीडीए 1981 नुसार गुन्हा नोंदवून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महसूल विभागाने दिली आहे.  

महसूल खात्याच्या पथकाने 4 फेब्रुवारी रोजी तीन मोठे इंजिन जप्त करून संबंधितावर लिमगाव पोलीस स्टेशन येथे  गुन्हा गुन्हा रजिस्टर क्रमांक 8/2025 अन्वये दाखल केला आहे. नदीकाठावरील भनगी, वाहेगाव, गंगावेट, विष्णुपुरी, थूगाव, कल्याळ, लोहा तालुक्यातील बेट सांगवी, इत्यादी गावांमधील अवैध वाळू साठा मागच्या तीन दिवसापासून जप्त करून पुढील कारवाई सुरू आहे. 

आज पर्यंत तीनशे ब्रास वाळू जप्त केली आहे. हे काम अजून पुढे दोन-तीन दिवस चालणार आहे. यापुढे सुद्धा ही अविरत कार्यवाही सुरू राहणार आहे. या कारवाईनंतर वाळू तस्करानी गोदावरी नदीमध्ये तराफे, इंजिन टाकून वाळू उपसा केल्यास, नदीकाठच्या शेतकऱ्यांनी आपली जमीन वाळू उपसा करणारे बिहारी मजूर यांना अनधिकृतपणे झोपड्या टाकण्यासाठी दिल्यास अथवा अनधिकृतपणे अवैध वाळू वाहतूक करणारे हायवा यांना शेतकऱ्यांनी अनधिकृत रस्ता दिल्यास अथवा वाळू तस्करांना बेकायदेशीररित्या मदत करणाऱ्या व्यक्तीवर, संबंधितावर MPDA 1981 नुसार गुन्हा नोंदवून कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे याची गांभीर्याने नोंद घ्यावी असे जिल्हा प्रशासनातर्फे व तालुका प्रशासनातर्फे इशारा देण्यात आला आहे. 

ही मोहीम जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडतकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, कंधारच्या उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार यांच्या सनियंत्रणाखाली नांदेड तहसीलदार संजय वारकड व लोहा तहसीलदार विठ्ठल परळीकर यांच्या नेतृत्वाखाली स्वप्निल दिगलवार नायब तहसीलदार नांदेड पथक प्रमुख, नन्हणू कानगुले मंडळ अधिकारी, कुणाल जगताप मंडळाधिकारी, तलाठी रमेश गिरी, संताजी देवापुरकर, माधव भिसे, सरपे, रणवीरकर, खेडकर, जाधव, कदम, पोलीस पाटील शिवाजी सोनटक्के, कोतवाल बालाजी सोनटक्के इत्यादी करत आहेत.

0000







  वृत्त क्रमांक 160

शासनाच्या योजना आपल्या संपर्कातील प्रत्येकापर्यंत पोहोचवा : न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी

किनवट येथील शासकीय सेवा व योजनांच्या महाशिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
#किनवट (जि. नांदेड ) दि. ८ फेबुवारी : आज किनवट येथे आपल्याला ज्या काही योजना माहिती झालेल्या आहेत. त्या योजनांचा तुम्ही स्वतः लाभ घ्या. सोबतच या योजना आपल्या संपर्कातील अनेकांपर्यंत पोहोचवा, असे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी यांनी आज येथे केले.
किनवट येथील तालुका क्रीडा संकुलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शासकीय सेवा व योजनांच्या महाशिबिरामध्ये ते बोलत होते. या महाशिबिराचे आयोजन महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांचे आदेशान्वये नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा प्रशासन नांदेड, किनवट तालुका विधी सेवासमिती व तालुका प्रशासन किनवट यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
या शिबिरामध्ये अनेक लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते विविध शासकीय योजनातील प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. आरोग्य, शिक्षण, कृषी, महिला व बालकल्याण, व्यक्तिगत लाभाच्या अनेक योजना व सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचे अनेक स्टॉल या ठिकाणी उभारण्यात आले होते. या प्रत्येक स्टॉलला मान्यवरांनी भेट देऊन पाहणी केली.
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी, न्यायमूर्ती शैलेश ब्रह्म्हे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुरेखा कोसमकर, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अप्पर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मेघना कावली, जिल्हा विधी प्राधिकरणच्या सचिव दलजीत कौर जज, तहसीलदार श्रीमती शारदा चोंडेकर, मुख्याधिकारी अजय कुरवाडे यांची यावेळी उपस्थिती होती.
शासनाच्या विविध विभागाच्या ४६ स्टॉलची उभारणी या ठिकाणी करण्यात आली होती. या ठिकाणावरून प्रत्येक योजनेची माहिती दिल्या जात होती. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने हे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी आपल्या संक्षिप्त संदेशामध्ये न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी यांनी या आयोजनामागचा उद्देश हा केवळ लोकांपर्यंत माहिती पोहोचविणे आहे. शासन कायम चांगल्या योजना निर्माण करते. पण बहुतेक वेळा ही माहिती जनतेपर्यंत जात नसल्याचे दिसून आले. न्यायालयीन कामकाज करताना देखील अनेक बाबी नागरिकांना माहिती नसते. त्यामुळे मदतीसाठीच राज्य व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाची निर्मिती झाली. न्यायाबद्दल, आपल्या सोयी सुविधांबद्दल, माहिती व्हावी हा यामागील उद्देश आहे. आज इथे उपस्थित नागरिकांच्या संख्येवरून हा उद्देश सफल होताना दिसतो आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
न्यायमूर्ती शैलेश ब्रम्हे यांनी देखील यावेळी संबोधित केले. ते म्हणाले, शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचू शकत नाही त्यामुळे अनेक लोक शासकीय योजनांपासून वंचित राहतात. त्यांना त्याचा फायदा होत नाही एका छताखाली सर्व योजना उपलब्ध व्हाव्यात व लाभार्थ्यांना त्याचा लाभ व्हावा ही या आयोजनामागची भूमिका आहे. मला आनंद आहे की. ४६ स्टॉल आज लावण्यात आले आहे. कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्याकरिता या ठिकाणी अनेक यंत्रणांनी जिल्हा विधी प्राधिकरणाला मदत केली. त्यासाठी आम्ही त्यांचे आभारी आहे. तसेच यावेळी त्यांनी उपस्थित मोठ्या महिलांच्या संख्येची देखील नोंद घेतली ते म्हणाले महिला सक्षमीकरणाकडे आपले पाऊल पडत असल्याचे आजची उपस्थिती द्योतक आहे.
यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुरेखा कोसमकर यांनीही संबोधित केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा विधी प्राधिकरणच्या सचिव दलजीत कौर जज यांनी केले. सर्व शासकीय यंत्रणांनी घेतलेल्या सहभागाबद्दलही त्यांनी सर्वांचे आभार मानले.
सदरच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन 4 थे सह दिवानी न्यायाधीश व. स्तरचे महेश सोवनी यांनी केले तर दिवाणी न्यायाधीश क. स्तर पी. एम. माने यांनी सर्वांचे आभार मानले. प्रारंभी बोधडी बु. येथील अंध विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले तर समारोप सामुहिक राष्ट्रगीताने झाला.
0000















#मुख्यमंत्रीलाडकीबहीणयोजना #नांदेड



Friday, February 7, 2025

 वृत्त क्रमांक 159 

हाय सिक्युरीटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट वेळेत बसवा आणि दंड टाळा !

प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आवाहन 

नांदेड दि. 7 फेब्रुवारी : केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 50 नुसार वाहनांस एचएसआरपी HSRP बसविण्याची तरतूद आहे. रस्ते व महामार्ग मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या यांच्या सुचनेनुसार 1 एप्रिल 2019 पासून उत्पादित होणाऱ्या सर्व नवीन वाहनांना हाय सिक्युरीटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याची तरतूद करण्यात आली आहे. याबाबत वाहनांना एचएसआरपी बसविण्याची अंतिम 31 मार्च 2025 अशी आहे. 

वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे व तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व वाहनांना मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून 1 एप्रिल 2019 पूर्वी उत्पादीत वाहनांना HSRP बसविण्याकरिता शासनाने 3 संस्था, उत्पादकांची निवड राज्य शासनाने अधिसुचनेद्वारे केली आहे. राज्यातील सर्व क्षेत्रीय कार्यालयांचे 3 झोन मध्ये विभागणी करुन मे. रोजमर्टा सेफ्टी सिस्टम लिमीटेड, मे. रिअल मेझन इंडीया लिमीटेड व FTA HSRP Solution Pvt.Ltd या 3 संस्था, उत्पादकांची निवड करण्यात आली आहे. 

हाय सिक्युरीटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याकरिता Appointment पध्दत सुरु करण्यात आली असून त्यासाठी वाहन प्रकारानुसार दरआकारणी केली जाईल. झोन 1 करिता मे रोजमर्टा सेफ्टी सिस्टम लिमीटेड या संस्थेची/उत्पादकाची निवड करण्यात आली असून वाहनांना हाय सिक्युरीटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्यासाठी ऑनलाईन अपॉईंटमेंटकरिता https://mhhsrp.com या संकेतस्थळावर भेट द्यावी. याव्यतिरीक्त कुठल्याही इतर संकेतस्थळावर नोंदणी करणे टाळावे. मोटार सायकल व ट्रक्टरकरिता दर 450 रुपये, तीन चाकी वाहनांकरिता 500 रुपये व सर्व प्रकारचे चारचाकी वाहनांकरिता 745 रुपये इतका दर आकारला जाणार असुन या व्यतिरीक्त जीएसटीचा दर भरावा लागणार आहे व सदर शुल्क हे ऑनलाईन स्वरुपातच भरावे लागणार आहे. 

1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना हाय सिक्युरीटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याबाबत शासनाद्वारे नियुक्त करण्यात आलेले अधिकृत एचएसआरपी फिटमेंट सेंटरर्स येथे HSRP बसविण्याकरिता Appointment घेण्याची कार्यपध्दती व इतर सर्वप्रकारची माहिती विभागाच्या https://www.transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीत, नियुक्त केलेले अधिकृत HSRP फिटमेंट केंद्रावर वाहन मालकांना एचएसआरपी बसविण्याची सेवा नाकारता येणार नाही. 

करिता नांदेड जिल्हयातील वाहनमालक ज्यांची वाहने वाहनधारकांनी 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झ गालेल्या ज्या वाहनांना हाय सिक्युरीटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट नाही अशा सर्व वाहनचालकांना आवाहन करण्यात येत आहे की, त्यांनी वर नमूद केलेल्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पध्दतीने शुल्क भरुन 31 मार्च 2025 पूर्वी बसवून घ्यावी असे आवाहन कार्यालयातर्फे करण्यात येत आहे. तसे न केल्यास मोटार वाहन कायद्यानुसार एचएसआरपी नंबर प्लेट विहित वेळेत न बसविण्यासाठी दंड आकारणी परिवहन विभागातर्फे करण्यात येईल. करिता सदर प्रकारे दंड टाळण्यासाठी 31 मार्च 2025 पूर्वी एचएसआरपी नंबर प्लेट बसवून घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

0000

 वृत्त क्रमांक 158 

रब्बी हंगाम पीक स्पर्धेत नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्यस्तरावर निवड 

नांदेड दि. 7 फेब्रुवारी : नुकताच राज्यस्तरीय पिकस्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून स्पर्धेत रब्बी ज्वारी व करडई या पिकाचे उत्पन्न व उत्पादन बाबतीत योग्य नियोजन करून भरघोस पिक घेऊन नांदेड जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांनी राज्यस्तरावर क्रमांक पटकावले आहेत. 

राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्याकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते, अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव केल्यास, त्यांचे मनोबल वाढण्यास मदत होऊन अधिक उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेवून राज्यात कृषि विभागामार्फत पिकस्पर्धा योजना राबविण्यात येते. 

या पिकस्पर्धेत लोहा तालुक्यातील सायाळ येथील कृषीनिष्ठ शेतकरी म्हणून ओळखले जाणारे तसेच खंडीभर लाल कंधारी गाई जनावरे सांभाळून शेती करणारे शेतकरी रत्नाकर पाटील ढगे सायाळकर यांनी जिल्ह्यातून रब्बी ज्वारीमध्ये राज्यस्तरावर तृतीय क्रमांक मिळवून रुपये 30,000 चे पारितोषिक मिळवीले  आहे. त्यांनी सांगितले की, यश मिळवताना जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास या त्रीसूत्रीचा वापर करून एक आदर्श उत्पादन घेण्यास मी यशस्वी झालो आहे. पारंपारिक शेतीला आधुनिकतेची जोड देऊन त्यांनी आपल्या शेतीत सतत सुधारणा घडवून आणल्या आहेत. विपरीत परिस्थितीत चांगले उत्पादन घेऊन त्यांनी पंचक्रोशीत आपली छाप सर्वसामान्य शेतकरी वर्गात निर्माण  केल्यामुळे आज हजारो शेतकरी त्यांच्या मार्गदर्शनाखाली शेतीचे धडे गिरवीताना पाहावयास मिळत आहेत. त्यांनी चालवत असलेल्या अन्नदाता सुखी भव या ग्रुपवर ते अनेक शेतकरी बांधवांना विनामुल्य शेती पिक मशागत व एकात्मिक कीड व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करत असतात तसेच लाल कंधारी जातीचे त्यांच्याजवळ वीस जनावरे आहेत.   

तसेच करडई या पिकामध्ये देगलूर तालुक्यातून माधव शंकरराव पाटील रा.चैनपूर यांनी राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळवून रोख रक्कम 50,000 चे पारितोषिक  व सुनील नामदेव चिमणपाडे रा. कुडली यांनी द्वितीय क्रमांक मिळवून रोख रक्कम 40,000 चे पारितोषिक मिळवण्याचा बहुमान मिळविला आहे. यांनी आपल्या शेतीमध्ये आधुनिक पिकपद्धतीचा अवलंब केला. योग्य वाण, योग्य वेळी मशागत, शेंद्रीय खताचा मुबलक वापर करून जमिनीचा कस वाढवून जमिनीचा पोत सुधारून व योग्य खताचा ताळमेळ घालून शेती क्षेत्रात अधिक उत्पादन घेऊन राज्यस्तरावर अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक येण्याचा बहुमान मिळविला. 

राज्यस्तरावर करडई या पिकात प्रथम व द्वितीय क्रमांक व रब्बी ज्वारी या पिकात तृतीय क्रमांक आल्याबद्दल दत्तकुमार कळसाईत, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी विजेते शेतकऱ्यांचे विशेष अभिनंदन केले. व पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादनात वाढ व्हावी याकरीता जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पिकस्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन यांनी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना केले आहे.

000

 वृत्त क्र. 157

शासकीय सेवा व योजनांचे आज किनवट येथे महाशिबीर 

भोकर येथील न्यायालयाच्या विस्तारीत इमारतीचे  9 फेब्रुवारीला उद्घाटन   

नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा प्रशासन नांदेड, किनवट तालुका विधी सेवा समिती व तालुका प्रशासन किनवट आयोजक 

नांदेड दि. 7 फेब्रुवारी : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांचे आदेशान्वये नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा प्रशासन नांदेड, किनवट तालुका विधी सेवासमिती व तालुका प्रशासन किनवट यांच्या संयुक्त विद्यमाने 8 फेब्रुवारी रोजी तालुका क्रिडा संकुल, किनवट जिल्हा नांदेड येथे शासकीय सेवा व योजनांचे महाशिबीर आयोजित करण्यात आले आहे. तसेच 9 फेब्रुवारीला भोकर येथील न्यायालयाच्या विस्तारीत इमारतीचे उद्घाटन न्यायमूर्ती नितीन सुर्यवंशी व न्यायमूर्ती शैलेश ब्रम्हे यांच्या हस्ते होणार आहे. 

समाजातील गरजू, आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या व्यक्तीला योग्य तो न्याय मिळण्याच्या उद्येशाने राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणामार्फत राबविल्या जाणा-या योजना व मोफत विधी सेवा, त्याचप्रमाणे शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती आणि योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळावा तसेच समाजातील अगदी तळागाळातील व्यक्ती सुध्दा या योजनांपासून वंचित राहू नये यासाठी जनजागृती होण्यासाठी या महाशिबीराचे आयोजन करण्यात येत आहे.

 तालुका क्रिडा संकुल किनवट या ठिकाणी दिनांक 8 फेब्रुवारी, 2025 रोजी सकाळी 11 वा. या महाशिबिराचे उद्घाटन समारंभ होत असून महाशिबीरामध्ये विविध शासकीय सेवा व योजनांचे स्टॉल लावण्यात येणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील नागरीकांनी या महाशिबीराचा मोठ्या संख्येत उपस्थित राहून जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन सुरेखा कोसमकर प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्षा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले,  नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव श्रीमती दलजीत कौर जज यांनी केले आहे. तसेच 9 फेब्रुवारीला भोकरी येथील न्यायालयाच्या विस्तरीत इमारतीचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. दोन्ही कार्यक्रमाला न्यायमुर्ती शैलेश ब्रम्हे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. 

00000

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ #शेतकरीकर्जमुक्ती #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #शेतकरी Maharashtra DGIPR ...