Wednesday, November 27, 2024

 वृत्त क्र. 1143 

नांदेडमधील 33 केंद्रांवर 1 डिसेंबरला एमपीएससी परीक्षा 

नांदेड दि. 27 नोव्हेंबर : राज्य शासनाने नोकर भरती मोठ्याप्रमाणात सुरू केली असून याअंतर्गत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2024 ही येत्या 1 डिसेंबरला होणार आहे. नांदेडमधील सर्व प्रमुख शाळा व महाविद्यालयांमध्ये या परीक्षेचे केंद्र असून परीक्षेसंदर्भात असणारी नाकाबंदी व शंभर मिटर पर्यंत प्रवेश बंदी केली जाणार आहे. नागरिकांनी विद्यार्थ्यांच्या या महत्त्वपूर्ण परीक्षेला लक्षात घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.    

सकाळी 10 ते दुपारी 12 व दुपारी 3 ते 5 याकालावधीमध्ये दोन सत्रात ही परीक्षा होणार आहे. त्यामुळे रविवारी सेंटर असलेल्या शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात कोलाहल असणार नाही. कुठेही डिजे वाजणार नाही. किंवा शंभर मिटर पर्यंत मोबाईलपासून सर्व प्रकारच्या साहित्याला परिक्षा केंद्राच्या परिसरात वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. भारतीय नागरीक सुरक्षा संहिता कलम 163 अन्वये सर्व निर्बंध लादण्यात आले असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

0000

 वृत्त क्र. 1142 

4 डिसेंबरपासून होणाऱ्या जंतनाशक अभियानात सहभागी व्हा 

जंतनाशक गोळी घेण्यासाठी घाबरू नका 

नांदेड दि. 27 नोव्हेंबर : राज्यात 4 डिसेंबर रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिन राबविण्यात येत असून याअंतर्गत 1 ते 19 वयोगटातील सर्व मुला-मुलींना जंतनाशक गोळी दिली जाणार आहे. ही गोळी चावून खाणे गरजेचे आहे किंवा पाण्यात घेता येईल. या उपक्रमाला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगिता देशमुख यांनी केले आहे. 

जिल्ह्यातील अर्धापूर, धर्माबाद, लोहा, मुदखेड, नांदेड व उमरी या तालुक्यांमध्ये ही मोहिम राबविली जाणार आहे. सर्व शाळांमधून अल्बेडॅझोलची गोळी देण्यात येणार असून लहान मुलांना पाण्यातून तर 6 ते 19 वयोगटातील मुलांना चावून खाण्यासाठी सांगण्यात येणार आहे. 4 डिसेंबरला जे वंचित राहिले त्यांना 10 डिसेंबरला ही गोळी दिली जाणार आहे. चांगल्या आरोग्यासाठी ही गोळी अतिशय आवश्यक असून शिक्षक, पालक यांनी या मोहिमेला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

000

वृत्त क्र. 1141 

राष्ट्रीय युवा महोत्सवात सहभागी होण्यासाठी सज्ज व्हा 

·  प्रधानमंत्र्यांसोबत भेटण्याची संधी   

नांदेड दि. 27 नोव्हेंबर : तुमच्यामध्ये नेतृत्व गुण असेल उद्याचे नेतृत्व करण्याची इच्छा असेल तर केंद्र सरकारने सुरू केलेल्या उपक्रमामध्ये अर्थात विकसित भारत युवा नेते संवाद म्हणजेच राष्ट्रीय युवा महोत्सव 2025 मध्ये सहभागी होण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा युवा अधिकारी नेहरू युवा केंद्र नांदेड यांनी केले आहे. 

भारत सरकारने हा उपक्रम जाहीर केला असून देशभरातील 2 हजार तरुण तरुणींनी 12 ते 13 जानेवारीला भारत मंडपम येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत विकसित भारताचे व्हिजन मांडणार आहेत. ही सुवर्ण संधी असून त्यासाठी वेगवेगळ्या पात्रता फेरीला 15 ते 29 वयोगटातील तरुणांना तोंड द्यावे लागणार आहे. नांदेड जिल्ह्यातील युवापिढीने यामध्ये सहभागी व्हावे. त्यासाठी व्किज2डॉटमायजिओव्हीडॉटइन (quiz2.mygov.in) या लिंकवरून सहभाग नोंदवता येतो. ही ऑनलाईन नोंदणी करून नोंदणी प्रक्रिया समजून घ्यावी किंवा नांदेड जिल्ह्याच्या नेहरू युवा केंद्र राज निवास शिवरायनगर मालेगाव रोड नांदेड येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा युवा अधिकारी चंदा रावळकर यांनी केले आहे.

0000


 वृत्त क्र. 1140 

उर्ध्व पैनगंगा कालव्यातून 1 डिसेंबर पासून सिंचनाखाली 

नांदेड दि. 27 नोव्हेंबर : उर्ध्व पेनगंगा प्रकल्पांतर्गत इसापूर डावा कालवा व इसापूर उजवा कालवा तसेच त्याअंतर्गत असलेल्या वितरण व्यवस्थेद्वारे प्रत्येक पाणीपाळीच्या कालवा संचलनाच्या प्रस्तावित कार्यक्रमानुसार प्राप्त मागणीनुसार सिंचनासाठी पाणी सोडण्यात येणार आहे. सिंचनासाठी पाण्याची गरज तसेच विहीत नमुन्यात प्राप्त मागणी अर्ज संख्या विचारात घेऊनच प्रत्यक्ष सिंचनासाठी पहिली पाणीपाळी 1 डिसेंबर 2024 रोजी सुरू करून पुढील पाणीपाळ्या सुरू करण्याचे नियोजन आहे. प्रकल्प क्षेत्रातील सर्व जनतेनी / लाभधारकांनी पाणी मागणी अर्ज विहीत कालावधीत सादर करावेत, असे आवाहन उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र. 1 चे कार्यकारी अभियंता अ. बा. जगताप यांनी केले आहे. 

दरवर्षी उर्ध्व पेनगंगा प्रकल्पावरील कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये प्रकल्पावरील सिंचनासाठी पाण्याचे नियोजन करण्यात येते. यावर्षी महाराष्ट्र विधानसभा निवडणुका-2024 ची आचारसंहिता लागू झाल्याने प्रकल्पावरील कालवा सल्लागार समितीची बैठक विभागीय आयुक्त, विभागीय आयुक्त कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांच्या अध्यक्षतेखाली 25 नोव्हेंबर 2024 रोजी संपन्न झाली. या बैठकीमध्ये आगामी होणाऱ्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीतील निर्णयाच्या अधीन राहून 15 ऑक्टोबर 2024 रोजीच्या धरणातील (964.10 दलघमी) शंभर टक्के इतक्या जिवंत पाणीसाठ्यावर आधारीत रब्बी हंगामात तीन (3) पाणीपाळ्या व उन्हाळी हंगामात चार (4) पाणीपाळ्या देण्याच्या नियोजनास मान्यता मिळालेली आहे. 

प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील लाभधारकांना व धरण जलाशय, अधिसुचित नदी-नाल्यावरील तसेच मुख्य कालव्यावरील प्रवाही व मंजूर उपसा सिंचन योजना धारकांनी रब्बी हंगामातील हंगामी, दुहंगामी सेच दुहंगामातील इतर उभी पिके या पिकांसाठी कालव्याचे प्रवाही/कालव्यावरील उपसा, नदी-नाल्यावरील मंजूर उपसा सिंचन योजनेद्वारे सिंचनासाठी पाणी घ्यायचे असल्यास मागणी अर्ज नमुना 7, 7-अ मध्ये भरून संबंधित शाखा कार्यालयात सादर  करणे बंधनकारक राहील. हंगामी व दुहंगामी पिकांसाठी स्वतंत्र अर्ज सादर करावेत. सिंचनासाठी पाण्याची गरज तसेच विहीत नमुन्यात प्राप्त मागणी अर्ज संख्या विचारात घेऊनच प्रत्यक्ष सिंचनासाठी पहिली पाणीपाळी दिनांक 1 डिसेंबर 2024 रोजी सुरू करून पुढील पाणीपाळ्या पुढीलप्रमाणे सुरू करण्याचे अपेक्षित नियोजन आहे. 

सन 2024-25 चा रब्बी सिंचन कार्यक्रम आवर्तन कार्यक्रम क्र. 1 इसापूर उजवा कालवा इसापूर डावा कालव्यातून 1 ते 22 डिसेंबर पर्यंत 22 दिवस, आवर्तन कार्यक्रम क्र. 2 साठी कालावधी 1 ते 22 जानेवारी तर आवर्तन कार्यक्रम क्र. 3 साठी 1 ते 22 फेब्रुवारी 2024 पर्यंत 22 दिवसांसाठी राहील. पाऊस किंवा आकस्मि घटनांमुळे आवर्तनाच्या दिनांका बदल होऊ शकतो. 

नमुना नं.7,7-अ प्राप्त झालेल्या पाणी अर्जास खालील अटी व शर्तींचे अधीन राहुन मंजुरी देण्यात येईल. लाभधारकांना त्यांच्याकडील संपुर्ण थकबाकी पाणीपट्टी भरावी लागेल. पिकांचे मागणी क्षेत्र 20 आर च्या पटीत असावे.रब्बी हंगामी, दुहंगामी  व इतर बारमाही पिकांसाठी कालव्याचे प्रवाही/मंजूर उपसा/मंजूर जलाशय उपसा व मंजूर नदि/नाले उपसा सिंचनासाठी ज्यांना पाणी घ्यावयाचे आहे त्यांनी आपले पाणी मागणी अर्ज विहीत नमुन्यात सादर करावे व अर्जासोबत उपसा सिंचन परवानगीची प्रत जोडावी. तसेच पाणी अर्जासोबत अपत्याबाबतचे प्रमाणपत्र व अल्प अत्यल्प भुधारक असल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करावे. 

कालव्याचे पाणी शेतात नेण्यासाठी असलेली शेतचारी स्वच्छ व व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी संबंधित लाभधारकाची आहे. काही अपरिहार्य कारणास्तव किंवा तांत्रीक कारणास्तव पाणी पुरवठा करणे शक्य न झाल्यास होणा-या नुकसानीस हे कार्यालय जबाबदार राहणार नाही. तसेच महाराष्ट्र पाटबंधारे प्रचलित नियमांचे लाभधारकांकडून उल्लंघन झाल्यास, कोणतीही आगाऊ सुचना न देता दिलेली मंजुरी रद्द करण्यात येईल व पाणीपुरवठा रद्द करण्यात येईल. सिंचन पाणीपाळी दरम्यान कालव्याची काही तुटफूट झाल्यास, त्याची दुरूस्ती झाल्यानंतरच कालव्यात पाणी सोडण्यात येईल. 

महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम 1976, कालवे नियम 1934, म. सिं. प. शे. व्य. कायदा 2005 तसेच महाराष्ट्र जलसंपदा विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या तरतुदीनुसार सर्व शर्ती व अटी बंधनकारक राहतील याची सर्व लाभधारकांनी नोंद घ्यावी.कालवा संचलन कार्यक्रमानुसारच पाणी घेणे बंधनकारक राहील. पाणीपट्टी न भरणा-या व पाणी अर्ज नामंजुर असलेल्या लाभधारकास सिंचनासाठी पाणी देणे या कार्यालयास बंधनकारक राहणार नाही.लाभधारकांनी दिवस व रात्रीच्या वेळेस पाणी घेणे  बंधनकारक आहे. रात्रीच्या वेळेस पाणी न घेतल्यामुळे पाणी नदीनाल्यास वाया जावून ठराविक मुदतीत पाणी न मिळाल्यास या कार्यालयाची जबाबदारी राहणार नाही.शासन निर्णयातील प्रचलित दरानुसार पाणीपट्टीचे दर आकरण्यात येतील. उडाप्याच्या/अंतिम क्षेत्रास पाणी पुरवठा करणे बंधनकारक राहणार नाही. पाणी पाळी सुरू असताना जबरदस्तीने अथवा विनापरवानगी विद्युत मोटारी, ट्रॅक्टर द्वारे पाणी उपसा करणे अथवा गेट उघडल्यास नियमानुसार दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. जे लाभक्षेत्र पाणी वापर संस्थेस हस्तांतरीत करण्यात आले आहे त्या लाभक्षेत्रावर नियमानुसार पाणी  मागणी, वसुली आणि सिंचनाचे नियंत्रण पाणी वापर संस्थेने करावे, अन्यथा पाणी पुरवठा केला जाणार नाही. सबंधीत प्रकल्पाच्या विभागामार्फत सर्व लाभधारकांना पाणी मिळेल या दृष्टीने पुरेपूर प्रयत्न करण्यात येत आहेत. याची संबंधित लाभधारकांनी नोंद घ्यावी, असेही आवाहन उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र. 1 चे कार्यकारी अभियंता अ. बा. जगताप यांनी केले आहे.

00000

 वृत्त क्र. 1139 

मुबलक पाणीपुरवठा, योग्य वातावरणाचा

शेतकऱ्यांना रब्बीमध्ये फायदा व्हावा  

जिल्हाधिकाऱ्यांचा थेट बांधावर दौरा 

नांदेड दि. 27 नोव्हेंबर : यावर्षी झालेला मुबलक पाऊस, जलसाठ्यांमधील विपूल प्रमाणातील सिंचनाचे पाणी व पाऊसासोबतच योग्य प्रमाणातील थंडीचे वातावरण यामुळे रब्बीसाठी आवश्यक असणारे नैसर्गिक वातावरण आहे. त्यामुळे हा रब्बीचा हंगाम शेतकऱ्यांना चांगला जाईल यासाठी सर्व पूरक उपाययोजना करा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. 

जिल्ह्यातील विविध गावांचा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दौरा करून रब्बी हंगामाच्या पीक परिस्थितीची पाहणी गेली दोन दिवस केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना उत्तमपूरक उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी एलेचपूर येथील प्रशांत दुर्गादास तीर्थे यांच्या शेतावर दौऱ्या दरम्यान भेट दिली. यावेळी त्यांनी हरभरा, ज्वारी व हळद पिकांची पाहणी केली. हरभरा पिकांमध्ये जास्तीत जास्त जैविक कीड नियंत्रण करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी तालुका कृषि अधिकारी संजय चातरमल, मंडळ कृषि अधिकारी सुनिल सानप, कृषि पर्यवेक्षक चिंचूवाड, कृषि सहायक श्रीमती शिंदे उपस्थित होत्या. नांदेड तालुक्यामध्ये यावेळी हरभरा, ज्वारी व गहू पिकाखाली शेकडो हेक्टर जमीन आहे. त्यामुळे व्यवस्थापनाच्या सूचना वरचेवर करण्याचे त्यांनी सांगितले.  

00000




Tuesday, November 26, 2024

वृत्त क्र. 1137

समाजकल्याण कार्यालयामार्फत संविधान अमृत महोत्सव दिनानिमित्त संविधान रॅली 

 शेकडो नागरिकांचे संविधान प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन 

नांदेड,दि २६ नोव्हेंबर :महाराष्ट्र शासनाचे सामजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय नांदेड यांच्यावतीने 26 नोव्हेंबर रोजी संविधान अमृत महोत्सव दिनानिमित्त घर-घर संविधान रॅली आयोजित करण्यात आली. शेकडो नागरिकांनी संविधान प्रस्ताविकेचे केलेले सामूहिक वाचन लक्षवेधी ठरले.

यानिमित्ताने  गिरीष कदम , अतिरिक्त आयुक्त, मनपा नांदेड व  संजय जाधव उपायुक्त, मनपा, श्रीमती सुप्रीया टवलारे, उपायुक्त मनपा,शिवानंद मिनगीरे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नांदेड, सतेंद्र आऊलवार जिल्हा समाज कल्याण अधिकारी, डी.वाय पतंगे ,सहय्यक लेखाधिकारी तसेच अशोक गोडबोले, माधव जमदाडे व भिमराव हटकर,सामाजिक कार्यकर्ते नांदेड यांनी महात्मा ज्योतीबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

तद्नंतर गिरीष कदम , अतिरिक्त आयुक्त, शिवानंद मिनगीरे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नांदेड यांनी हिरवी झेंडी दाखवून  संविधान रॅलीची सुरुवात केली.  

 सदर संविधान रॅलीचा मार्ग महात्मा ज्योतीबा फुले पुतळा ते शिवाजी नगर, कलामंदिर. मुथा चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ संविधान प्रस्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात येवून राष्ट्र गीताने संविधान रॅलीची सांगता करण्यात आली. 

यावेळी मा.श्री शिवानंद मिनगीरे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नांदेड यांनी भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वश्रेष्ठ राज्य घटना असून जिल्हयातील सर्व नागरिकांनी त्याचा अभ्यास करावा व घटनेने दिलेल्या अधिकार व कर्तव्य त्यांचे पालन करावे असे मनोगत व्यक्त्‍ केले.

सदर कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त,समाजकल्याण नांदेड कार्यालयातील अधिकारी कर्मचारी ,जात पडताळणी कार्यालय अधिकारी कर्मचारी , जिल्हा समाज कल्याण जिल्हा परिषद नांदेडचे अधिकारी कर्मचारी तसेच इतर मगासव बहुजन कल्याण विभागाचे अधिकारी ,कर्मचारी, नांदेड जिल्हयतील विविध्‍ महमंडळचे व्यवस्थापक व कर्मचारी तसेच  शालेय विद्यार्थी, सामजिक कार्यकर्ते तसेच बार्टीचे प्रकल्प अधिकारी व समतादूत यांची उपस्थिती होती.

सदर संविधान रॅलीमध्ये पोलिस अधिक्षक कार्यालीयातील पोलिस बँड पथक ,कर्मचारी बँड पथक संच यांनी  देशभक्ती गिते सादर केले तसेच  सदर संविधान रॅली मध्ये, नांदेड जिल्हयातील एन.एस.बी महाविद्यालय नांदेड , सायन्स कॉलेज नांदेड ,नेहरु युवा केंद्र , विद्यार्थी सहभागी झाले होते व वसंतरावनाईक महाविद्यालय, जवाहरलाल नेहरु समाजकार्य महाविद्यालय, सायन्स कॉलेज मधील राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थी यांनी सहभाग नोंदविला सदर शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी शिक्षक ,कर्मचारी तसेच इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या आश्रमशाळेतील कर्मचारी हे संविधान अमृत महोत्सव घर-घर संविधान रॅलीत सहभागी झाले होते. तसेच नांदेड जिल्हयातील नागरीकांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती. सदर रॅलीची सांगता सविंधानाचे प्रस्ताविकाचे सामुहिक वाचन करुन करण्यात आली.

00000



पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ #शेतकरीकर्जमुक्ती #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #शेतकरी Maharashtra DGIPR ...