वृत्त क्रमांक
नांदेड जिल्ह्यात आरोग्य सेवा अधिक सक्षम व लोकाभिमुख करणार : आरोग्य विभाग
'एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती'ची स्थापना आणि 'मुख्यमंत्री जन आरोग्य शिबिरांचे' आयोजन
नांदेड दि. 15 जुलै:- नांदेड जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक गतिमान, लोकाभिमुख आणि बळकट करण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी यांनी आज जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला बळकटी देण्यासाठी दोन अत्यंत महत्त्वाच्या मोहिम सुरु केल्या आहे.
या अंतर्गत जिल्ह्यात विधानसभा मतदारसंघनिहाय 'एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती' स्थापन करण्यात येत असून, गरिबांसाठी 'मुख्यमंत्री जन आरोग्य शिबिरांचे' भव्य आयोजन करण्यात आले आहे.
'एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती'द्वारे आरोग्य व्यवस्था होणार लोकप्रतिनिधींच्या दारी
राज्यातील आरोग्य सेवांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी व आरोग्यविषयक उपक्रमांना गती देण्यासाठी जिल्ह्यात 'एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती' कार्यान्वित करण्यात येत आहे.
आमदारांच्या अध्यक्षतेखाली बैठका: ही समिती स्थानिक माननीय विधानसभा सदस्य (आमदार) यांच्या अध्यक्षतेखाली काम करेल.
स्थानिक लोकप्रतिनिधींचा सहभाग: या समितीच्या माध्यमातून स्थानिक ग्रामपंचायत सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरपरिषद व महानगरपालिका सदस्य तसेच स्थानिक नगरसेवक यांना थेट प्रक्रियेत सामावून घेतले जाईल.
दर तीन महिन्याला आढावा: तालुक्याच्या आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी दर तीन महिन्यांनी या समितीची बैठक आयोजित करण्याचे निर्देश तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
'मुख्यमंत्री जन आरोग्य शिबीर' (१६ जुलै ते २२ जुलै २०२६)
जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार आणि मोफत आरोग्य उपचार एकाच छताखाली मिळावेत यासाठी १६ जुलै ते २२ जुलै २०२६ या कालावधीत सर्व तालुक्यांमध्ये विशेष 'मुख्यमंत्री जन आरोग्य शिबिरांचे' आयोजन करण्यात आले आहे.
मोफत तपासणी व उपचार : शिबिरात रक्तदाब (BP), मधुमेह (Blood Sugar), ई.सी.जी (ECG) यांसारख्या आवश्यक चाचण्या मोफत केल्या जातील.
तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन: स्त्रीरोग, बालरोग, नेत्ररोग, दंतरोग आणि इतर तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाद्वारे रुग्णांची तपासणी व मोफत औषधोपचार करण्यात येतील.
शासकीय योजनांचा थेट लाभ : या शिबिरांमध्ये 'महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना' (MJPJAY), 'आयुष्मान भारत कार्ड' आणि 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी' (CMRF) या योजनांतर्गत पात्र रुग्णांवर पुढील उपचारांचे नियोजन केले जाईल.
जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आरोग्य सेवा मिळवून देणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. 'एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती'च्या माध्यमातून आम्ही स्थानिक लोकप्रतिनिधींसोबत मिळून आरोग्य यंत्रणा अधिक मजबूत करू. तसेच १६ ते २२ जुलै दरम्यान होणाऱ्या 'मुख्यमंत्री जन आरोग्य शिबिरांचा' जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी, विशेषतः ग्रामीण भागातील गरजूंनी लाभ घ्यावा." असे आव्हान डॉ. संतोष सूर्यवंशी जिल्हा आरोग्य अधिकारी, यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment