वृत्त क्रमांक
नांदेडमध्ये जलसंधारण कामांना वेग 379 पैकी 177 कामे पूर्ण ;
भूजल वाढीसह शेतकऱ्यांना मोठा दिलासा
नांदेड, दि. 11 मे : एल निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांना मोठ्या प्रमाणात गती देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली मृद व जलसंधारण विभागामार्फत सन 2025-26 या आर्थिक वर्षात नाला खोलीकरण व रुंदीकरणाच्या एकूण 379 कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी 177 कामे पूर्ण झाली असून 202 कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. आतापर्यंत 1 लाख 78 हजार 668 मीटर खोलीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे.
उर्वरित कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन प्रशासनाने केले असून आणखी 86 हजार 583 मीटर खोलीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या कामांमुळे पावसाळ्यात शेतांमध्ये पाणी साचून होणारे नुकसान कमी होणार असून भूजल पातळीत वाढ होण्यास मदत मिळणार आहे. परिणामी पाणीटंचाई निवारण, सिंचन सुविधा आणि शेती उत्पादन वाढीस चालना मिळणार आहे.
याशिवाय, जलसंधारण कामांच्या परिसरात एक लाख बांबू लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. बांबू लागवडीमुळे जमिनीची धूप रोखण्यास मदत होणार असून पर्यावरण संवर्धनालाही हातभार लागणार आहे. कमी खर्चात अधिक उत्पादन मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठीही हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे.
दरम्यान, ‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार’ अभियानांतर्गत सन 2025-26 मध्ये आतापर्यंत 54 तलावांमधून गाळ काढण्यात आला आहे. 584 शेतकऱ्यांनी 9 लाख 63 हजार 243 घनमीटर गाळ शेतात टाकला आहे. त्यामुळे संबंधित भागातील पीकपद्धतीत बदल होऊन गहू, हळद आणि कापूस यांसारख्या नगदी पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन रोजगारासाठी होणारे स्थलांतरही कमी होण्यास मदत होत आहे.
सन 2026-27 साठी या अभियानांतर्गत 28 कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून अंदाजे 8 लाख 58 हजार 135 घनमीटर गाळ काढण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या उपक्रमाचा लाभ 488 शेतकऱ्यांना होणार असल्याची माहिती जलसंधारण विभागाने दिली.
00000
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment