Thursday, April 23, 2026

वृत्त क्रमांक

दिशा समितीच्या  बैठकीत जलजीवन मिशन, महावितरण, रस्ते विकासासह विविध महत्वाच्या विकास कामांचा आढावा व सूचना 

नांदेड दि. 23 एप्रिल : जिल्ह्यातील विविध विकास योजना तसेच विकास कामांबाबत जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) बैठकीत सर्वंकष आढावा घेण्यात आला. विकास योजना, उद्दीष्टांच्या अंमलबजावणीसाठी विविध विभागांकडून काटेकोर नियोजन करण्यात यावेत, असे निर्देश दिशा समितीचे अध्यक्ष तथा खासदार रविंद्र चव्हाण यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे आज दिशा समितीच्या बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. 

यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, खासदार नागेश पाटील आष्टीकर, खासदार शिवाजी काळगे, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार बाबुराव कोहळीकर, आमदार आनंदराव तिडके, आमदार श्रीजया चव्हाण, महापौर कविता मुळे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, लोहा व भोकर नगराध्यक्ष यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी आदींची उपस्थिती होती. 

या बैठकीत सुरवातीला 24 एप्रिल 2025 रोजी झालेल्या सभेच्या इतिवृत्ताचे वाचन करण्यात आले व त्यास मान्यता देण्यात आली. जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीच्या विविध योजनेच्या कामाचा विस्तृत आढावा घेण्यात आला. 

प्रत्येक विभागाने बैठक झाल्यानंतर अनुपालन अहवाल समितीला सादर केला पाहिजे अशा सूचना खासदार रविंद्र चव्हाण यांनी सुरवातीला सर्व विभागांना केल्या. त्यानंतर जिल्ह्यातील जलजीवन मिशनच्या पुर्ण, अपूर्ण कामाबाबतची यादी सादर करणे, स्त्रोत नाही तिथे काम झाले का, निधीचा प्रश्न, आतापर्यत किती कामे पूर्ण झाली याबाबत खासदार अशोक चव्हाण यांनी विचारणा केली. याबाबत जलजीवन मिशन योजनेबाबतचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबतच्या सूचनाही त्यांनी संबंधित विभागाला दिल्या. 

जिल्ह्यात व शहरात सध्या महावितरणच्या अनेक समस्याबाबत सर्वच लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे लक्ष वेधले. लोडशेडींगसह अचानक विज गायब होण्याच्या घटनेने नागरिक त्रस्त असून याबाबत महावितरणने कायमस्वरुपी समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना कराव्यात. तसेच येत्या 5 वर्षाच्या कालावधीत शहरात सर्व केबल अंडरग्राऊड करण्याचे काम पूर्ण व्हावे अशा सूचना खासदार रविंद्र चव्हाण यांनी दिल्या. 

विजेच्या समस्या सोडविण्याबाबत तरोडा भागात 8 नवे ट्रान्सफार्मर बसविले असून इतर भागातही  ट्रान्सफार्मर बसविण्याची कार्यवाही सुरु असल्याचे महावितरण विभागाकडून सांगण्यात आले. यासह इतरही समस्या लवकरच सोडविण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात येईल व सर्व समस्यांवर उपाययोजना करण्यात येईल, असे महावितरणचे अधिक्षक अभियंता यांनी सांगितले. 

यावर्षी नांदेड जिल्ह्याला प्रधानमंत्री पीक विमा योजनेत 813 कोटी रुपयांचा पिकविमा परतावा मंजूर झाला आहे. याबाबत जिल्हाधिकारी व कृषी विभागाचे यावेळी अभिनंदन केले. खताचे लिंकीग, भरारी पथके, खताचा तुटवडा होवू नये यासाठी खबरदारी, खताचा पुरेसा साठा, युरियाचा पुरवठा, मागणी प्रमाणे उपलब्धता, विक्री या विविध विषयांचा यावेळी आढावा घेण्यात आला. लिंकीगमुळे शेतकऱ्यांना खताच्या बाबतीत त्रास होवू नये याबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना कृषी विभागाला दिल्या. 

शहराला दैनंदिन पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, अमृत मिशन 2 यासह विविध विषयांचा आढावा घेण्यात आला. नुकतेच इस्लामपुरा भागात चार शाळकरी मुलांचा खड्डयात पडून मृत्यू झाला याबाबत केलेल्या कार्यवाहीची माहिती खासदार रविंद्र चव्हाण यांनी महापालिकेकडून घेतली. या मृत्त मुलांना योग्य ती मदत मिळेल याची काळजी घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.  

महामार्गाच्या पायाभुत सुविधा, दूरसंचार पायाभूत सुविधा कार्यक्रम, राष्ट्रीय महामार्ग, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, अमृत मिशन 2.0, पाटबंधारे, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, पीएम सुर्यघर योजना, रेल्वे विभाग यासह सर्व योजनांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. अध्यक्ष खासदार रविंद्र चव्हाण यांनी नागरिकांची कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी व विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावाणीसाठी संबंधित यंत्रणेने त्वरीत कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले. या शिवाय आवश्यकतेनुसार महत्वाच्या विभागांचा आढावा स्वतंत्र बैठक घेवून घेण्यात येईल अशाही सूचना त्यांनी यावेळी दिल्या. 

बारूळ धरण सिमेंट कॅनल बांधकाम सुरु असून संबंधित बांधकाम करत असताना नवीन मुरूम ऐवजी बाजूच्या शेतातील माती काढून कॅनल बांधकाम चालू आहे. भविष्यात शेतीचे नुकसान होऊ नये या करिता धानोरा, कांडाळा, होटाळा येथील शेतकऱ्याची उखरलेली जमीन भरून देण्यात यावी असे खासदार डॉ. काळगे यांनी सांगितले. 

यावेळी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी रस्ते विकास, वीज समस्या, रस्ते अपघात, खताचा तुटवडा, खत लिंकींग याबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.  

यावेळी खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ. शिवाजी काळगे, खासदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार आनंदराव तिडके, आमदार बाबुराव कोहळीकर, आमदार श्रीजया चव्हाण यांनी त्यांच्या मतदारसंघातील विविध समस्या सोडविण्यासाठी विविध विभागामार्फत करण्यात येणार कामे व सुरु असलेल्या विकास कामांबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा करुन उपाययोजनाबाबत आवश्यक त्या सूचना दिल्या. 

00000










No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक   इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्यावतीने कर्ज वाटप, स्वयंरोजगार मेळाव्याचे 30 एप्रिल रोजी आयोजन   नांदेड दि. 23 एप्रिल :...