वृत्त क्रमांक 481
बारावी परीक्षेच्या निकालानंतरही
विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन सेवा सुरू
नांदेड दि. 7 मे :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इ. 12 वी परीक्षेच्या निकालानंतर राज्यमंडळ स्तरावर नियुक्त केलेल्या समुपदेशकांची समुपदेशन सेवा सुरू ठेवण्यात आली आहे.
समुपदेशकांचे भ्रमणध्वनी क्रमांक
9011302997, 8263876896, 9960644411, 7208775115, 8329230022, 9552982115, 8767753069, 7387400970, 8169202214, 9834084593 या भ्रमणध्वनी क्रमांक दिलेले समुपदेशक परीक्षेच्या निकालाच्या दिवसापासून 8 दिवस सकाळी 8 ते रात्री 8 यावेळेत विद्यार्थ्यांना भ्रमणध्वनीद्वारे निशुल्क आवश्यक ते समुपदेशन करतील याची विद्यार्थी, पालकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन राज्य मंडळ सचिव देविदास कुलाळ यांनी केले आहे.
या परीक्षेचा निकाल 5 मे 2025 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे. निकालानंतर काही विद्यार्थी नकारात्मक विचाराने मानसिक दडपणाखाली येण्याची शक्यता असते. त्यामुळे राज्यमंडळ स्तरावरुन अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी ऑनलाईन समुपदेशन सेवा सुरू ठेवण्यात येत आहे.
फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेली उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इ. 12 वीची लेखी परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 या कालावधीत पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या विभागीय मंडळांमार्फत आयोजित करण्यात आली होती.
00000
No comments:
Post a Comment