वृत्त क्रमांक 836
सण, उत्सव शांततेत साजरे करा : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर भर
गणेश विसर्जन कृत्रिम तलावात करा
नांदेड दि. 12 ऑगस्ट :- गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद व दहीहंडी हे सण येत्या काळात एकत्रित येत आहेत. जिल्ह्यात हे सण साजरे करतांना सर्व धर्मियांनी एकमेकात परस्पर सौहार्द व शांतता ठेवून साजरे करावेत. पर्यावरण संरक्षणासाठी नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर भर द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे आज शांतता समितीची बैठक संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते.
बैठकीस जिल्हा पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर तसेच विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी यासह शांतता समितीचे सदस्य व इतर सदस्यांची उपस्थिती होती.
डिजेचा आवाजामुळे उत्सव काळात ध्वनी प्रदूषण मोठे होते. नागरिकांनी डीजे न लावता सण उत्सव साजरा करण्यावर भर द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. गणेशोत्सव साजरा करतांना पर्यावरण पूरक गणेशोत्सव करण्यावर भर द्यावा. नदीच्या वाहत्या प्रवाहात श्री गणेश मुर्तीचे विसर्जन न करता कृत्रिम तलावात करून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. सण उत्सवाच्या काळात नागरिक- मंडळाच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रशासनाकडून व्हॉटसअपग्रुप तयार करण्यात येणार आहे. यात नागरिकांनी त्यांच्या अडचणी थोडक्यात मांडाव्यात अशा सूचना त्यांनी बैठकीत दिल्या.
नागरिकांनी कायदा हातात घेवू नये : पोलीस अधिक्षक
उत्सव काळात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी नागरिकांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे. पोलीस प्रशासन नेहमी दक्ष असून नागरिकांनी योग्य माहिती द्यावी. उत्सव काळात येणाऱ्या अडचणी व्हॉटसअप ग्रुपच्या माध्यमातून तात्काळ सोडविण्यावर भर दिला जाईल. कोणत्याही नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये. उत्सव काळात गुन्हेगारीला आळा बसविण्यासाठी प्रशासनाच्यावतीने प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात येत आहे. यासाठी चांगले नियोजन केले असून नागरिकांना कोणतीही अडचण होणार नाही याची काळजी प्रशानाकडून घेण्यात येत असल्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी सांगितले.
महापालिकेच्यावतीने विसर्जनाची तयारी पूर्ण: मनपा आयुक्त
गणेशोत्सवाचे सुयोग्य नियोजन महापालिकेच्यावतीने केले आहे. मिरवणूक मार्गात कोणत्याही समस्या निर्माण होणार नाहीत याची काळजी घेण्यात येणार आहे. यावर्षी तीन ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. गोदावरी नदीत श्री गणेशाचे विसर्जन होणार नाही याची काळजी गणेश भक्तांनी घ्यावी. गोदावरी नदी शुद्ध ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन मनपा आयुक्त महेशकुमार डोईफोडे यांनी केले.
शांतता समितीच्या सदस्यांनी गणेशोत्सव, दहीहंडी व ईद ए मिलाद या सणामध्ये येणाऱ्या अडचणी मांडल्या. त्या निवारण्यासाठी योग्य नियोजन करण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनाच्यावतीने सांगितले. सण उत्सवाच्या काळात शांतता समितीचे सदस्य, सर्व सामाजिक नेत्यांनी आपापल्या गावात, नगरात शांतता राहील यासाठी स्वतः प्रयत्न करावे. तसेच प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
00000
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment