Thursday, February 20, 2025

 विशेष लेख /

 बोलीभाषांनी समृद्ध झालेली मायमराठी 

मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून ती एक संस्कृती आहे.तिच्या मातीत असंख्य उपभाषांचे,बोलींचे रोप बहरलेले आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात बोलीभाषांचे वैविध्य आढळते. जशी गंगा अनेक उपनद्यांना सामावून घेत समुद्राला जाऊन मिळते, तशीच मराठी भाषा विविध बोलीभाषांना आपल्या प्रवाहात सामावून घेत समृद्ध झाली आहे.या बोली भाषेतील विविधतेमुळे मराठी भाषेची ताकद वाढली असून तिचे सौंदर्य अधिक खुलले आहे.

 बोलीभाषांचे वैविध्य आणि त्यांचे योगदान 

महाराष्ट्रात अनेक बोलीभाषा प्रचलित आहेत. वऱ्हाडी, अहिराणी, कोकणी, कोल्हापुरी, मराठवाडी, झाडीबोली, खानदेशी, नागपुरी याशिवाय गोंडी, बंजारा, कोलामी या बोलीभाषांनी मराठी भाषेला बळ दिले आहे. म्हणतात, "दर बारा कोसांवर भाषा बदलते," हे महाराष्ट्राच्या भाषिक वैशिष्ट्यांवर अगदी तंतोतंत लागू होते. या बोलीभाषांमधील साहित्य, लोकसंस्कृती, गाणी, नाटकं, प्रवचनं यांनी मराठीला अधिक व्यापक आणि जिवंत बनवले आहे. या बोलीभाषा मधील काही शब्दांना अर्थ आहे. हजारो उखाणे या बोली भाषांमध्ये आहे. शेकडो वाक्प्रचार या भाषेत आढळतात, विविध शब्दांसाठी एक शब्द म्हणून आशयघनता असणारे अनेक शब्द बोली भाषेत आहे. प्रेम, राग, व्देष, आनंद व्यक्त करणारे वैशिष्ट्यपूर्ण शब्द या बोलीभाषांचे महत्व सांगते.

 वऱ्हाडी बोलीभाषेचे वैशिष्ट्य 

वऱ्हाडी ही मराठीची अत्यंत महत्त्वाची आणि लोकप्रिय बोली आहे. विदर्भात बोलली जाणारी ही बोली आपल्या सहज संवादशैलीमुळे प्रसिद्ध आहे. वऱ्हाडी भाषेचा विनोदी बाज हा तिचा खास गुणधर्म आहे. वऱ्हाडी बोलीत बोलताना एक वेगळीच गंमत असते. शब्दांच्या उच्चारांतील लयबद्धता आणि लहेजा मराठीला एक वेगळेच सौंदर्य प्रदान करतो.

 वऱ्हाडी भाषेचे महत्त्व

 मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देताना वऱ्हाडी भाषेतील लिखाण अलिकडच्या काळात विशेष अधोरेखित झाले आहे. लीळाचरित्र या महानुभव पंथाच्या ग्रंथात वऱ्हाडीचा प्रभाव आढळतो. आद्य मराठी कवी मुकुंदराज यांच्या लेखनातही वऱ्हाडीचा वापर दिसतो. संत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता ग्रंथात वऱ्हाडीचा प्रभावी वापर केला आहे. कर्मयोगी गाडगेबाबांचे प्रवचनदेखील अस्सल वऱ्हाडी भाषेत असायचे. पुरुषोत्तम बोरकर यांची मेड इन इंडिया, उद्धव शेळके यांची धग कादंबरी त्यातील वऱ्हाडी भाषा यांनी अनेक पिढ्यांना वेड लावले आहे. अनेक अशा अशा कादंबऱ्या, कथा मान्यवर लेखकांनी मराठी वाचकांना दिल्या आहेत.

 वऱ्हाडीतील साहित्यिक योगदान 

वऱ्हाडी भाषेत विपुल प्रमाणात साहित्यनिर्मिती झाली आहे. कथा, कादंबऱ्या, कविता, आत्मचरित्र, नाटके, सिनेमा अशा विविध माध्यमांद्वारे ही भाषा आपल्या भाषिक परंपरेत एक ठसा उमटवत आहे. अनेक लेखक आणि साहित्यिकांनी वऱ्हाडी भाषेत उत्कृष्ट लेखन केले आहे. वेगवेगळ्या टीव्ही सिरीयल,कॉमेडी शो आणि चित्रपटात या बोली भाषेचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. हिंदी भाषेनंतर हास्य कवी संमेलनाची संस्कृती वऱ्हाडी भाषेने सर्वाधिक जोपासली आहे. माध्यमांमुळे या बोलीभाषा आता आपल्या सीमा भेदून सार्वत्रिक होत आहे.

प्रा. देविदास सोटे, पुरुषोत्तम बोरकर, उद्धव शेळके, मनोहर तल्हार, बाजीराव पाटील, गो. नी. दांडेकर, महेश दारव्हेकर, पांडुरंग गोरे, विठ्ठल वाघ, डॉ. मिर्झा रफी अहमद बेग,शंकर बडे, मधुकर केचे, ज्ञानेश वाकुडकर,शाम पेठकर, नाना ढाकूलकर, मनोहर कवीश्वर, मधुकर वाकोडे, गौतम गुडदे, डॉ. प्रतिमा इंगोले, शरदचंद्र सिन्हा, जगन वंजारी, राजा धर्माधिकारी, बापुराव झटाले, अॅड. अनंत खेळकर, किशोर बळी, रमेश ठाकरे, बापुराव मुसळे, रावसाहेब काळे,सदानंद देशमुख, नरेंद्र लाजेवार, नरेंद्र इंगळे,आदी मान्यवरांसह शेकडो लेखकांनी वऱ्हाडी भाषेतील साहित्य समृद्ध केले आहे.

वऱ्हाडी भाषेतील नाटक आणि गझलसुद्धा विशेष प्रसिद्ध आहेत. कविवर्य सुरेश भट यांनी मराठीत गझल लेखन केले, पण खासगी संभाषणात ते अस्सल वऱ्हाडीच वापरत. वऱ्हाडी भाषेतील सहज संवाद साधण्याची शैली, विनोदी प्रकृती, आणि लयदार उच्चार हा एक वेगळाच अनुभव देतात.

 विदर्भाच्या 11 जिल्ह्यांमध्ये, मराठवाड्याच्या सीमावरती भागात, तसेच मध्य प्रदेशातील तेलंगाना व आंध्र प्रदेशातील अनेक भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वऱ्हाडी भाषा बोलली जाते. अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वेगळ्या पद्धतीने तर अकोला, वाशिम, बुलढाणा या जिल्ह्यामध्ये त्यामध्ये थोडा बदल होऊन भाषा बोलली जाते. नागपूर शहरातील बोलली जाणारी भाषा ही देखील एक वेगळी वऱ्हाडी शैली आहे. नागपूर मेट्रोने तर खास नागपुरी शब्दांच्या जाहिराती केल्या आहेत. विशेष म्हणजे त्या त्या भागातील नागरिक एकमेकांना भेटल्यानंतर या शब्दांचा भरपूर वापर करतात. भाषिक जवळीकता साधण्यासाठी हे शब्द ओळखीचे काम करते. पुढे हीच भाषा भंडारा, गोंदिया, गडचिरोली या भागामध्ये वेगळा हेल घेते. तिचे उच्चार वेगळ्या पद्धतीने केले जाते. मात्र हजारोंनी या भाषेचे संवर्धन केले आहे. मराठी भाषेच्या समृद्धीचा विचार करताना मोठ्या संख्येने बोलल्या जाणाऱ्या बोलीभाषा, त्यांचे संवर्धन आणि त्याचा अभ्यास करण्याचे व्यासपीठ अशी मोठी संमेलन असतात. दिल्लीच्या व्यासपीठावर अभिजात भाषेचा गुणगौरव होताना बोलीभाषेच्या सुप्त प्रवाहावरही चर्चा करावी लागणार आहे. बोलीचे वैभव,भाषेची संपन्नता वाढवणारे आहे. 

मराठीची अस्मिता आणि बोलीभाषांचे स्थान 

पु. ल. देशपांडे यांना वऱ्हाडी भाषेच्या विनोदी बाजाचे फार आकर्षण होते. सुरेश भट लतादीदी ,आशा भोसले आणि मंगेशकर घराण्यातील व्यक्तीशी वऱ्हाडी भाषेतून संवाद साधायचे. त्यांच्या वऱ्हाडी संवादाचे मैफिलीमध्ये खास आकर्षण असायचे. खरे तर भाषा केवळ संवादाचे साधन नसून ती तिच्या संस्कृतीचा, अस्मितेचा अभिव्यक्त होण्याचा मार्ग असते. उर्दूची अदब, गुजरातीची गोडी, आणि वऱ्हाडीची मिश्किलता, विनोदी शैली हे वैशीष्टय आहे.

म्हणूनच बोलीभाषांचे अस्तित्व टिकवणे आणि त्यांना जपणे हे मराठी भाषेच्या समृद्धीसाठी आवश्यक आहे. महाराष्ट्रात बोलीभाषांनी जो भाषिक गोतावळा तयार केला आहे, त्याने मराठीला अधिक समृद्ध केले आहे. मराठीने आपल्या अंगाखांद्यावर या उपभाषांना वाढवले, संगोपन केले आणि त्यांना भाषिक अस्मिता बहाल केली.

आजच्या काळातही बोलीभाषांचे संवर्धन हे मराठीच्या भविष्यासाठी महत्त्वाचे आहे. कारण मातृभाषा ही आपल्या संस्कृतीची ओळख असते. आई जी भाषा बोलते तीच मुलाची भाषा होते आणि तीच त्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनते.

मराठी भाषा ही केवळ एक संवादमाध्यम नसून एक संस्कृती आहे. बोलीभाषा ही तिच्या समृद्धीचा गाभा आहेत. वऱ्हाडी, अहिराणी, कोकणी, कोल्हापुरी यासारख्या अनेक उपभाषांनी मराठीच्या प्रवाहाला अधिक खोल आणि विस्तारलेले स्वरूप दिले आहे.

आजही मराठी भाषेच्या जडणघडणीत या बोलीभाषांचा मोलाचा वाटा आहे. बोलीभाषांचे संवर्धन आणि त्यांचे लेखन-साहित्यिक योगदान पुढे नेणे, हे मराठी भाषेच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे मराठी भाषा ही केवळ बोलीभाषांच्या आधाराने अधिकाधिक समृद्ध होत राहील. नवी दिल्ली येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये मायमराठीच्या या उपभाषांच्या संवर्धनासंदर्भातही वैचारिक मंथन अपेक्षित आहे.मराठी भाषा ही समुद्र आहेत तर तिच्यात मिसळणाऱ्या बोलीभाषा या विविध नदयांप्रमाणे आपले भाषिक सौंदर्य तिच्यामध्ये कायम मिसळत राहते. हा ओघ असाच कायम असणे खूप गरजेचे आहे. शब्दांचे वैशिष्ट्य, शब्दांचा गोडवा, शब्दांचे अर्थ, त्याची आशयघनता, काळाच्या गतीमध्ये लुप्त होऊ नये. थोडक्यात वऱ्हाडी शब्दांचा वापर करून सांगायचे झाल्यास असा 'बैताडपणा, छपरीपणा, इचकपणा, नंबरीपणा, उपटपणा, घरावर गोटे आणण्याचे धंदे अन् ' जांगडबुत्ता ' मराठी भाषेवर चिंतन करताना होऊ नये ,एवढीच अपेक्षा आहे.

प्रवीण टाके

जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड

९७०२८५८७७७



No comments:

Post a Comment

वृत्त क्र.  77 9 मराठी भाषेकडून राष्ट्राच्या सांस्कृतिक निर्माणाचे महान कार्य -प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राजधानीत अखिल भारतीय मराठी साहित्य ...