Saturday, February 28, 2026

 📍नवी मुंबई

हिंद दी चादर श्री गुरू तेगबहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम निमित्ताने खारघर येथील कार्यक्रम #हिंददीचादर #श्रीगुरुतेगबहादुर



 📍नवी मुंबई


हिंद दी चादर श्री गुरू तेगबहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम निमित्ताने खारघर येथील कार्यक्रम

#हिंददीचादर #श्रीगुरुतेगबहादुर



 📍नवी मुंबई

हिंद दी चादर श्री गुरू तेगबहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम निमित्ताने खारघर येथील कार्यक्रम

#हिंददीचादर
#श्रीगुरुतेगबहादुर


 

📍
नवी मुंबई
हिंद दी चादर श्री गुरू तेगबहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम निमित्ताने खारघर येथील कार्यक्रमस्थळी मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या सौजन्याने भव्य जनकल्याण चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमास देशभरातून आलेल्या भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

 समता, बंधुता आणि मानवतेचा संदेश देणारी भव्य लंगर परंपरा...


#हिंददीचादर
#श्रीगुरुतेगबहादुर



वृत्त क्रमांक  255

महाशिबिर व योजनांच्या महामेळाव्यातून कायद्याची माहिती व शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवा – न्यायमूर्ती निरज धोटे

महाशिबिरात विविध विभागांचे 50 स्टॉल; मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन

नांदेड, दि. 28 फेब्रुवारी :- संविधानानुसार समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळणे हा त्यांचा हक्क आहे. वंचित घटक मोफत न्याय व शासकीय योजनांपासून वंचित राहू नयेत, यासाठी विधी सेवा प्राधिकरणामार्फत सातत्याने शिबिरे आयोजित केली जातात. या महाशिबिराच्या माध्यमातून अधिकाधिक नागरिकांपर्यंत कायद्याची माहिती व विविध शासकीय योजना पोहोचवाव्यात, असे आवाहन मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती निरज पी. धोटे यांनी केले.

विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा प्रशासन, तालुका विधी सेवा समिती भोकर व अभिवक्ता संघ भोकर यांच्या संयुक्त विद्यमाने भोकर येथील हनुमान नगर, किनवट रोडवरील खुले मैदान येथे विधी सेवा महाशिबिर व शासकीय सेवांचा महामेळावा आयोजित करण्यात आला होता. न्यायमूर्ती नीरज धोटे यांच्या हस्ते वृक्षांना पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष नरेंद्र ब्रम्हे, तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष मोहम्मद नासिर मोहम्मद सलीम, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव शरद देशपांडे, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी, अभिवक्ता संघ भोकरचे अध्यक्ष पी. आर. त्रेपतवार यांच्यासह न्यायाधीश, विविध विभागांचे अधिकारी, विधीज्ञ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांनी बंजारा नृत्याचे सादरीकरण केले.

न्यायमूर्ती नीरज धोटे म्हणाले, शासन विविध कल्याणकारी योजना राबवित असले तरी अनेकांना त्यांची माहिती नसते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने या मेळाव्यातील सर्व स्टॉलना भेट देऊन योजनांची माहिती घ्यावी व त्यांचा लाभ घ्यावा. येत्या 14 मार्च रोजी आयोजित लोकअदालतीत प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी पक्षकार व विधीज्ञांनी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.

समान न्याय व आर्थिक समानता हा प्रत्येकाचा हक्क – प्रमुख जिल्हा न्यायाधीश नरेंद्र ब्रम्हे

प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष नरेंद्र ब्रम्हे यांनी संविधानातील कलम 39 (अ) नुसार समान न्याय व आर्थिक समानता हा प्रत्येकाचा हक्क असल्याचे सांगितले. न्याय मागण्याची संधी प्रत्येकाला समान आहे. विधी सेवा प्राधिकरणाच्या विविध समित्यांमार्फत कायदेविषयक जनजागृती केली जाते. या महाशिबिराचा उद्देश वंचित घटकांना कायद्याची माहिती व शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देणे हा आहे. आपण या माध्यमातून कायदेशीर साक्षरते कडून कायदेशीर सक्षमते कडे वाटचाल करीत आहोत असे त्यांनी सांगितले.

यावेळी तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष मोहम्मद नासिर, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार व अभिवक्ता संघ भोकरचे अध्यक्ष पी. आर. त्रेपतवार यांनीही मनोगत व्यक्त केले.

मान्यवरांच्या हस्ते लाभांचे वितरण

महामेळाव्यात विविध योजनांच्या लाभार्थ्यांना मदत व आदेशपत्रांचे वितरण करण्यात आले. तहसील कार्यालयामार्फत शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील वारसांना प्रत्येकी एक लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले. तसेच संजय गांधी निराधार योजना, प्रधानमंत्री आवास योजना, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत बेबी केअर किट, कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टर वितरण, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत प्रत्येकी दोन लाख रुपयांचे अनुदान आदींचे वितरण करण्यात आले. आरोग्य, शिक्षण व विद्युत विभागाकडूनही विविध प्रमाणपत्रे व लाभ देण्यात आले.

महामेळाव्यात विविध विभागांचे एकूण 50 स्टॉल उभारण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तदर्थ जिल्हा न्यायाधीश बी. यू. चौधरी व वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश ए. पी. कराड यांनी केले, तर आभार प्रदर्शन सचिव शरद देशपांडे यांनी केले. कार्यक्रमानंतर मान्यवरांनी सर्व स्टॉलना भेट देऊन पाहणी केली.

०००००
























वृत्त क्रमांक  254

हमीभावने चणा खरेदीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी सुरू

नांदेड दि. 28 फेब्रुवारी :- केंद्र शासनाचे किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत एनसीसीएफच्यावतीने नांदेड जिल्ह्यात खरीप हंगाम 2025-26 मध्ये हमीभावाने चणा खरेदीसाठी 1 ते 31 मार्च 2026 पर्यंत ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी पुढीलप्रमाणे एकूण 23 खरेदी केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. शेतकरी बांधवांनी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी चालू हंगामातील चणा या पिकांचा ऑनलाईन नोंद असलेला 7/12 उतारा, आधारकार्ड व राष्ट्रीयकृत बँकपासबूक आदी कागदपत्रके संबंधित तालुक्यातील खरेदी केंद्रावर देऊन नोंदणी करावी.

• तालुका खरेदी विक्री संघ मुखेड, हदगाव, बिलोली (कासराळी), लोहा.
• कुंडलवाडी विविध कार्यकारी से.सह.सो. कुंडलवाडी ता.बिलोली.
• नांदेड जिल्हा फळे व भाजीपाला सह.संस्था (अर्धापुर).
• पंडित दीनदयाल उपाध्याय अभिनव सह. संस्था देगलूर, ता.देगलुर.
• बळीराम पाटील फळे व भाजीपाला सह.ख.वि.संस्था (बेरळी) ता.मुखेड.
• मुखेड फळे व भाजीपाला सह.ख.वि.संस्था (उमरदरी) ता.मुखेड.
• किनवट तालुका कृषिमाल प्रक्रिया  सह. संस्था गणेशपूर (ता. किनवट).
• जय महाराष्ट्र शेतीमाल खरेदी विक्री सह.संस्था (कौठा) ता.कंधार.
• स्वामी विवेकानंद अभिनव सह.संस्था (शेळगाव थडी) ता. धर्माबाद.
• अष्टविनायक शेतीमाल खरेदी विक्री सह. संस्था मानवाडी फाटा (ता. हदगाव).
• महात्मा बसवेश्वर ग्रामीण विकास मंडळ बापशेटवाडी (मुक्रामाबाद) ता.मुखेड.
• राधामाई फार्मर प्रोडयुसर कंपनी रातोळी  ता.नायगाव.
• पांडुरंग फळे व भाजीपाला सहकारी संस्था धामनगाव ता.मुखेड.
• बळीराजा पणन अभिनव सहकारी संस्था कोठारी ता.किनवट.
• श्रीराम जाणकी अभिनव शिक्षण प्रसारक मंडळ सगरोळी ता. बिलोली.
• चक्रधर फळे व भाजीपाला सहकारी संस्था बिल्लाळी ता.मुखेड.
• स्वामी विवेकानंद अभिनव नाविन्यपुर्ण सहकारी संस्था चाकुर ता.देगलूर.
• स्व. प्रमोद महाजन अभिनव नाविन्यपुर्ण सहकारी संस्था पाळा ता. मुखेड.
• जगदंबा विद्या प्रसारक मंडळ बाऱ्हाळी ता. मुखेड.
• सिद्राम फार्मर प्रोडयुसर कंपनी बेटमोगरा ता.मुखेड.

या ठिकाणी मार्केटिंग फेडरेशनमार्फत चणा खरेदीसाठी ऑनलाईन शेतकरी नोंदणी सुरु होणार आहे. सदरील नोंदणी ही ऑनलाईन पध्दतीने पीओएस मशीनद्वारे करण्यात येणार असल्याने नोंदणीकरीता प्रत्यक्ष खरेदी  केंद्रावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे. जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी हमीभाव योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नांदेडचे जिल्हा पणन अधिकारी राजेश गव्हाणे   यांनी केले आहे.
0000

Friday, February 27, 2026

  वृत्त क्रमांक  253

दहावीचा इंग्रजीचा पेपर जिल्ह्यातील सर्व 178 केंद्रांवर सुरळीत  - जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

नांदेड, दि.२७ फेब्रुवारी:- आज इयत्ता 10 वीची परीक्षा जिल्ह्यातील 178 केंद्रांवर सुरळीत पार पडली. इंग्रजी विषयाच्या पेपरसाठी एकूण 48,832 परीक्षार्थ्यांपैकी 47,725 परीक्षार्थी उपस्थित होते. उपस्थितीची टक्केवारी 97.73 इतकी नोंदविण्यात आली.

प्रत्येक केंद्रावर बैठे पथकांमार्फत झूम वेबकास्टद्वारे तसेच ड्रोन आणि व्हिडिओ कॅमेराच्या सहाय्याने पूर्णवेळ नियंत्रण ठेवण्यात आले. त्यामुळे सर्व 178 परीक्षा केंद्रांवर परीक्षा सुरळीत व कॉपीमुक्त वातावरणात पार पडली.

आजच्या इंग्रजीच्या पेपरसाठी जिल्हास्तरावरील सुमारे 66 अधिकारी 66 परीक्षा केंद्रांवर पूर्णवेळ उपस्थित होते. तसेच शिक्षण विभागाचे 7 अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख व तालुकास्तरावरील अधिकारी अशा एकूण 112 अधिकाऱ्यांनी भरारी पथकांमार्फत सर्व 178 केंद्रांना भेट देऊन उपस्थिती नोंदविली. त्यामुळे परीक्षा प्रक्रिया काटेकोरपणे राबविण्यात आली.

दरम्यान, जिल्हा परिषद हायस्कूल, बेटमोगरा ता. मुखेड येथील केंद्रावर एका परीक्षार्थ्याच्या जागी तोतया परीक्षार्थी उपस्थित असल्याचे भरारी पथक प्रमुख जिल्हा नियोजन अधिकारी अर्जुन झाडे यांच्या निदर्शनास आले. संबंधिताविरुद्ध मंडळ नियमावली तसेच भारतीय न्यायसंहिता कलम 163 आणि महाराष्ट्र गैरप्रकार अधिनियम 1982 अन्वये कारवाई करण्यात येत आहे.

इयत्ता 10 वी व 12 वीच्या सर्व परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. यासाठी विद्यार्थी व पालकांनी सकारात्मक सहकार्य करावे. तसेच यापुढील सर्व परीक्षांमध्ये तोतया परीक्षार्थी आढळू नयेत यासाठी परीक्षा प्रक्रियेशी संबंधित सर्व घटकांनी विशेष दक्षता घ्यावी आणि प्रत्येक परीक्षार्थ्याची ओळख पडताळूनच परीक्षा दालनात प्रवेश द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

०००००

 वृत्त क्रमांक  252

मागासवर्गीयांसाठी व्यवसाय अनुदान योजना; 

10 मार्चपर्यत अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड, दि. 27 फेब्रुवारी:- जिल्हा परिषद, नांदेड अंतर्गत समाज कल्याण विभागामार्फत मागासवर्गीय बांधवांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये जिल्हा परिषद २०टक्के सेस अंतर्गत खालील अर्थसहाय्याच्या योजना कार्यान्वित आहेत.

योजना प्रकार :

मागासवर्गीयांना व्यवसायासाठी अनुदान, मागासवर्गीय महिलांना व्यवसायासाठी अनुदान, प्रती लाभार्थी कमाल 40 हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. प्रत्यक्ष खर्च कमी झाल्यास पावतीनुसार अनुदान देय राहील.

अटी व शर्ती :

योजना ग्रामीण भागातील (अ.जा./अ.ज./विजाभज) प्रवर्गातील पुरुष व महिलांसाठी स्वतःचा व्यवसाय उभारण्यासाठी आहे. लाभार्थी ग्रामीण भागातील असावा. वय 18 ते 50 वर्षे दरम्यान असावे. वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. सक्षम प्राधिकाऱ्यांनी निर्गमित केलेले मूळ जात प्रमाणपत्र आवश्यक आहे. रहिवासी प्रमाणपत्र बंधनकारक आहे. उद्योगासाठी ग्रामपंचायतीचे नाहरकत प्रमाणपत्र (NOC) आवश्यक आहे. व्यवसायासाठी स्वतःची जागा असावी. भाड्याची जागा असल्यास भाडेकरार व पावती आवश्यक. अंतिम निवडीचे अधिकार विषय समिती/प्रशासनाकडे राहतील. लाभार्थ्याने जिल्हा परिषदेच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. व्यवसाय सुरू केल्याचे प्रमाणपत्र ग्रामसेवक/ग्रामपंचायत अधिकारी/विस्तार अधिकारी (पंचायत समिती) यांचेकडून घेणे आवश्यक राहील.

अर्ज प्रक्रिया :

पात्र लाभार्थ्यांनी Website : mhdivyang.com संकेतस्थळावर नोंदणी करावी, त्यानंतर परिपूर्ण अर्ज पंचायत समितीमार्फत जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, नांदेड यांच्या कार्यालयात 10 मार्च 2026 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत. विहित मुदतीनंतर प्राप्त अर्जांचा विचार केला जाणार नाही, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र वीरेंद्र आऊलवार यांनी केले आहे.

00000

  वृत्त क्रमांक  251

श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत “राष्ट्रीय विज्ञान दिन” उत्साहात साजरा

नांदेड,दि. २७ फेब्रुवारी:- भारताचे महान भौतिकशास्त्रज्ञ सी. व्ही. रमण यांनी २८ फेब्रुवारी १९२८ रोजी ‘रमण परिणाम’ हा महत्त्वपूर्ण शोध लावला. 

प्रकाशकिरणांचा पदार्थांशी होणारा परस्परसंवाद आणि त्यातून निर्माण होणाऱ्या विकिरणाचा अभ्यास हा या शोधाचा गाभा होता. या अद्वितीय संशोधनासाठी त्यांना १९३० मध्ये भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले. विज्ञान क्षेत्रात नोबेल पारितोषिक मिळवणारे ते पहिले भारतीय शास्त्रज्ञ ठरले.

विज्ञानाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचावे आणि विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा या उद्देशाने भारत सरकारने १९८६ साली २८ फेब्रुवारी हा दिवस “राष्ट्रीय विज्ञान दिन” म्हणून घोषित केला. तेव्हापासून हा दिवस देशभर विविध उपक्रमांद्वारे उत्साहात साजरा केला जातो. यंदाच्या राष्ट्रीय विज्ञान दिनाची थीम “Women in Science: Catalysing Viksit Bharat (विज्ञानातील महिला – विकसित भारताची प्रेरक शक्ती)” अशी निश्चित करण्यात आली आहे. विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील महिलांच्या योगदान व नेतृत्वाचा गौरव हा या थीमचा केंद्रबिंदू आहे.

त्या अनुषंगाने श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नांदेड येथे २७ फेब्रुवारी २०२६ रोजी “राष्ट्रीय विज्ञान दिन” उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे व वक्ते म्हणून लेखक व समीक्षक शिवाजीराजे पाटील उपस्थित होते. तसेच संस्था व्यवस्थापन समितीचे सदस्य धिरज बीडवे, संस्थेचे प्राचार्य श्री कंदलवाड व्ही. डी., सर्व कर्मचारी व प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. संस्थेतील शिल्प निदेशिका सौ. हिसवनकर एम. आर. यांनी प्रास्ताविक करताना डॉ. सी. व्ही. रमण यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला व विज्ञानाचे महत्त्व अधोरेखित केले. प्रमुख वक्ते शिवाजीराजे पाटील यांनी दैनंदिन जीवनातील विज्ञानाचे स्थान स्पष्ट करत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून त्यांनी प्रशिक्षणार्थ्यांशी खेळीमेळीचा संवाद साधला. प्रशिक्षणार्थ्यांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोतदार डी. ए. (रा. से. योजना कार्यक्रमाधिकारी) यांनी केले. प्राचार्य श्री कंदलवाड व्ही. डी. यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

०००००




वृत्त क्रमांक 338   नांदेड ग्रंथोत्सव -2025 आयोजित वाचकांनी केली विक्रमी खरेदी ; दहा लाख रुपयांची ग्रंथविक्री   नांदेड दि. 18 मार्च :-...