Friday, December 8, 2017

बिटी कापसाच्या जागी
हरभरा ठरतोय फायद्याचा

नांदेड दि. 8 :- कापूस पिकावर शेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने बिलोली तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी मात्र शेंदरी बोंड अळीने ग्रासीत कापुस उपटुन तिथे रब्बीमध्ये हरभऱ्याची लागवड केली आहे. बिलोली तालुक्यात फिरुन जर पाहिले तर तेथे जिकडे-तिकडे हरभराच दिसुन येत आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी दिली आहे.  
            बिलोली तालुक्यात यावर्षी साडेसात हजार हेक्टर क्षेत्रावर कापूस घेतला होता. परंतु शेंदरी बोंड अळीचा प्रकोप वाढल्याने 2 हजार 500 ते 3 हजार  हेक्टर वरील बि.टी. कापूस शेतकऱ्यांनी उपटून फेकुन त्या जागी हरभऱ्याचे पिक घेतल आहे. शेतकऱ्यांशी चर्चा केली असता त्यांनी असे सांगितले , दोन वेचण्यानंतर शेंदरी बोंड अळी वाढु लागल्याचे दिसु लागले त्यामुळे कापसाचे उत्पादन यापुढे घटेल असे वाटु लागले. कापूस उपटून हरभरा केला तर चार पैसे जास्त मिळतील असे शेतकऱ्यांनी आर्थिक गणित केल्यामुळे आता ते फायदेशीर राहीले आहेत. हरभऱ्याचे पिक उत्तम असुन एकरी 6 ते 8 क्विंटल उत्पादन येण्याची शक्यता आहे. बरेच शेतकरी स्प्रिंक्लरने पाणी देत आहेत.
            ज्याठिकाणी बि.टी. कापसावर शेंदरी बोंड अळी मोठ्या प्रमाणात आली आहे तेथील पऱ्हाट्या उपटुन नष्ट करव्यात. बि.टी. कापसाच्या बाजुने बिगर बि.टी. कापसाचे बियाणे लावल्यामुळे कापसाचा हंगाम संपल्यानंतरही फरदड कापूस घेतल्यामुळे शेंदरी बोंड अळीमध्ये बि.टी. कापसातील विष पचवायची ताकद निर्माण झाली आहे. भविष्यात ही शेंदरी बोंड अळी कापसावर येवु नये म्हणुन या दोन्ही बाबींचा विचार शेतकऱ्यांनी करावा, असे कृषि शास्त्रज्ञ सांगतात.
000000


No comments:

Post a Comment

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ #शेतकरीकर्जमुक्ती #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #शेतकरी Maharashtra DGIPR ...