वृत्त क्र. 644
विविध विकासकामे वेळेत पूर्ण करण्यावर भर : पालकमंत्री अतुल सावे
· सन 2025-26 साठी 815 कोटी 20 लाख 20 हजार मंजूर तरतूद
· सन 2024-25 साठी 748 कोटी 99 लाख 95 हजार रुपये खर्चास मान्यता
· पालकमंत्री अतुल सावे यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधीची उपस्थिती
· जिल्ह्यातील स्मशानभुमीसाठी प्रत्येक आमदारांना 1 कोटी रुपये निधी
· सर्व शासकीय कार्यालयावर सोलर पॅनल उभारणार
· नुकसानग्रस्त फळपिक शेतकऱ्यांना लवकरच मदतीसाठी पाठपुरावा सुरू
· महावितरण, परिवहन विभागाच्या कामाबाबत बैठका घेऊन प्रश्न मार्गी लावू
नांदेड, दि. 20 जून :- जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध विकास कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी भर देणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी केले. आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील नियोजन भवनाच्या सभागृहात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, खासदार रविंद्र चव्हाण, खासदार नागेश पाटील आष्टीकर, खासदार डॉ. शिवाजीराव काळगे, हरिद्रा संशोधन प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष तथा आमदार हेमंत पाटील, आमदार विक्रम काळे, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार भिमराव केराम, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार आनंद बोंढारकर, आमदार राजेश पवार, आमदार जितेश अंतापूरकर, आमदार बाबुराव कोहळीकर, आमदार श्रीजया चव्हाण, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा नियोजन अधिकारी अर्जून झाडे तसेच जिल्ह्यातील सर्व विभागाचे अधिकारी आदींची उपस्थिती होती.
सुरवातीला 30 जानेवारी 2025 रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या अनुपालनास मान्यता देण्यात आली. तसेच गेल्या वर्षी म्हणजेच सन 2024-25 मध्ये झालेल्या 748 कोटी 99 लाख 95 हजार रुपये खर्चास मान्यता खर्चास मंजूरी देण्यात आली. जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना अशा एकत्रित जिल्हा वार्षिक योजनेच्या 2025-26 साठी आर्थिक तरतुदीच्या विनियोजनाबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.
सन 2025-26 साठी सर्वसाधारणसाठी 587 कोटी, अनुसूचित जाती उपयोजना 164 कोटी, आदिवासी उपयोजनेसाठी 64 कोटी 20 लाख 20 हजार रुपये याप्रमाणे एकुण 815 कोटी 20 लाख 20 हजार रुपये मंजूर तरतूद आहे. याबाबत आढावा घेण्यात आला.
महावितरण-परिवहन विभागाची कामे लवकरच मार्गी
जिल्ह्यात सध्या महावितरणच्या कामाबाबत येणाऱ्या तक्रारी लक्षात घेऊन याबाबत लवकरच महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात येईल. यात सर्व अडचणी सोडविण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री अतुल सावे यांनी दिली. यासोबतच परिवहन विभागाबाबत ज्या काही लोकांच्या समस्या आहेत त्याबाबतही लवकरच बैठक घेवून हा प्रश्न निकाल काढण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
स्मशानभुमीसाठी प्रत्येक आमदारांना 1 कोटी रुपये निधी
जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींनी त्यांच्या मतदारसंघातील निधी अभावी प्रलंबित व प्रगतीपथावर असलेल्या कामांबाबतची माहिती पालकमंत्री अतुल सावे यांना दिली. यावेळी लोकप्रतिनिधींनी काही गावांमध्ये स्मशानभूमीबाबत मागणी केली. त्यावर प्रत्येक आमदारांना स्मशानभूमीसाठी 1 कोटी रुपये निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे पालकमंत्री अतुल सावे यांनी स्पष्ट केले.
शासकीय कार्यालयावर सोलार पॅनल
येत्या डिसेंबरपर्यत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयावर सोलर पॅनल उभारणार असल्याची माहिती पालकमंत्री अतुल सावे यांनी यावेळी दिली. यामध्ये कार्यालयाच्या वीज बिलाची बचत होवून विजेच्या बिलापासून मुक्ती मिळणार आहे.
शेतकऱ्यांना मदतीसाठी पाठपुरावा
जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या पावसामुळे केळी आणि पपई पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे होऊन त्याबाबतचा अहवाल शासनास सादर केला आहे. याबाबत शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाईची रक्कम मिळण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी या बैठकीत सांगितले.
डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयास ईटपी म्हणजेच प्रयोगशाळेत जे रसायने वापरले जातात त्यांना शुद्धीकरण करुन ते नाल्यात सोडणे कामासाठी 75 लाख रुपये मंजूर केले आहे. दिव्यांगाचा जो निधी आहे तो निधी खर्च करण्यावर भर देऊ असेही त्यांनी सांगितले. जलजीवन मिशन कामांचा आढावा घेऊन त्यांनी संबंधितांना उपयुक्त सूचना दिल्या.
यावेळी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधीनी आपआपल्या मतदार संघातील कामाचा माहिती, प्रश्न, अडचणी पालकमंत्री अतुल सावे यांच्यासमोर मांडल्या. या सर्व समस्यांची सोडवणूक करण्यासाठी संबंधित विभागांनी आवश्यक ती कार्यवाही करावी, असे पालकमंत्री अतुल सावे यांनी यावेळी यंत्रणाना सांगितले. तसेच जिल्ह्यातील काही भागात ड्रग्जस, अवैध धंदे, अंमली पदार्थाची वाहतुकीच्या तक्रारी आहेत. पोलिसांनी याकडे लक्ष वेधण्याचे त्यांनी सांगितले.
0000
No comments:
Post a Comment