Thursday, May 29, 2025

 वृत्त क्रमांक 555

विकसित कृषी संकल्प अभियानाची 

कृषी विज्ञान केंद्र सगरोळीतुन उत्साहात सुरुवात

नांदेड दि. 29 मे :- कृषी विज्ञान केंद्र सगरोळीतर्फे विकसित कृषी संकल्प अभियानाची आज उत्साहात सुरुवात झाली. या अभियानाचा उद्देश शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक संशोधन यांची माहिती देणे आहे.

अभियानाचा व्यापक विस्तार

या अभियानाद्वारे शेतीतील सुधारित तंत्रज्ञान, उत्पादन खर्च कमी करण्याचे उपाय, सेंद्रिय शेती आणि पिकांची विविधता वाढवणे यावर भर दिला जात आहे. भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) च्या मार्गदर्शनाखाली हे अभियान ७२३ जिल्ह्यांमध्ये राबवले जात असून ७३१ कृषी विज्ञान केंद्रे आणि ११३ संशोधन संस्थांचे शास्त्रज्ञ यात सक्रिय सहभाग घेत आहेत.

विशेष कार्यक्रम

कृषी विज्ञान केंद्र सगरोळीतर्फे आयोजित शिंपाला, सगरोळी, बोळेगाव, आदमपूर, खतगाव, अटकली या गावांतील कार्यक्रमात शेतकऱ्यांना थेट मार्गदर्शन करण्यात आले. प्रगत तंत्रज्ञान, मृदा आरोग्य व्यवस्थापन, जलसंधारण, विविध शासकीय योजना आणि बियाण्यांची उगवणक्षमता यासंदर्भात तज्ज्ञांनी माहिती दिली. 

तज्ज्ञांचे मार्गदर्शन 

या कार्यक्रमात राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. श्रीगुरे, श्री. दमाले, कृषी विज्ञान केंद्राच्या प्रमुख डॉ. माधुरी रेवनवर, डॉ. प्रवीण चव्हाण, डॉ. संतोष चव्हाण, डॉ. कृष्णा अंभूरे, डॉ. निहाल मुल्ला, भारतीय ऊस संशोधन संस्था प्रवरानगरचे शास्त्रज्ञ डॉ. योगेश थोरात, डॉ. बोरसे आणि तालुका कृषी अधिकारी बिलोली श्री. तिडके यांनी मार्गदर्शन केले.

उद्घाटन सोहळा आणि पुढील दिशा

या अभियानाच्या सगरोळी येथील उद्घाटन प्रसंगी श्री. सुनील देशमुख, विश्वस्त, संस्कृति संवर्धन मंडळ उपस्थित होते. शेतकऱ्यांनी या अभियानाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले. 

शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी

या अभियानाद्वारे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळणार असून, उत्पादन खर्च कमी करण्याच्या उपाययोजना, सेंद्रिय शेतीचे फायदे आणि विविध सरकारी योजनांचा लाभ घेता येईल.

0000

 वृत्त क्रमांक 554

जिल्हा रुग्णालयात “मासिक पाळी स्वच्छता दिवस" साजरा 

नांदेड दि. 29 मे :- जिल्हा रुग्णालय येथे “मासिक पाळी स्वच्छता दिवस" आज साजरा करण्यात आला. यावेळी मासिकपाळी संदर्भात समाजामध्ये असणारे गैरसमज याविषयी माहिती देण्यात आली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. आय. भोसीकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस. एम पेरके, निवासी वैद्यकीय अधिकारी (बा.सं) डॉ. आर.एस.बुट्टे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एच. के. साखरे, श्रीमती डॉ.पुष्पा गायकवाड, तसेच बाह्यरुग्ण विभागाच्या मेट्रन सहाय्यक अधिसेविका श्रीमती सुनिता राठोड नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्य श्रीमती सुनिता बोथिकार तसेच आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट चा उजास उपक्रमाचे जिल्हा समन्वयक स्वाती महानंदा सुरेश व संवादक सुकेशनी टालमाणी हे यावेळी उपस्थित होते.  

निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. साखरे, डॉ. पुष्पा गायकवाड व श्रीमती धनश्री अर्जुनराव गुंडाळे राष्ट्रीय किशोर स्वास्थ कार्यक्रम समुपदेशक यांनी मासिकपाळी संदर्भात माहिती देऊन मासिक पाळी स्वच्छता दिवस का साजरा केला जातो, मासिक पाळी विषयी समाजात असलेले समज गैरसमज बद्दल मार्गदर्शन केले. मासिक पाळी म्हणजे काय ? व सॅनेटरीपॅडचा उपयोग याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच मासिक पाळी मध्ये काय काळजी घेतली पाहिजे, आहार कसा घ्यावा, योगा आरोग्यासाठी किती महत्वाचा आहे याविषयी माहिती दिली, तसेच कवितेतुन व "का का कुमारी" ह्या नाटिकेच्या माध्यमातून मासिक पाळी विषयी समाजामध्ये असणारे गैरसमज याविषयी खूप छान प्रकारे संदेश दिला आहे. या विषयीवर नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी, रुग्ण, नातेवाईक यांना माहिती सांगितली.

000000




 वृत्त क्रमांक 553

संभाव्य पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी ‘एसडीआरएफ’ची तुकडी नांदेडात तैनात 

आपत्ती उद्भवल्यास कमीत कमी वेळेत घटनास्थळी जाऊन मदत कार्य करा : जिल्हाधिकारी कर्डिले

नांदेड दि. 29 मे :- नांदेड जिल्ह्यात पावसाळ्यात पूरपरिस्थिती निर्माण होऊन अनेक संकटे उद्भवतात. आगामी पूरपरिस्थितीचा धोका लक्षात घेऊन मराठवाडा क्षेत्रासाठी एसडीआरएफची धुळे येथील एक तुकडी नांदेड येथे तैनात करण्यात आलेली आहे. 28 मे रोजी सकाळी 6.30 वा. या तुकडीचे नांदेड येथे आगमन झाले आहे. 28 मे ते 30 सप्टेंबर 2025 या कालावधीसाठी ही तुकडी नांदेड येथे तैनात राहणार आहे. या तुकडीमध्ये एकूण 39 जणांचा समावेश असून त्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे तीन अधिकारी व बाकी 35 जवान आहेत.

नांदेड जिल्ह्यात गोदावरी, पैनगंगा, मांजरा, आसना, लेंडी, कयाधू, मन्याड या प्रमुख नद्या असून जिल्ह्यातील 337 गावे पूरप्रवण आहेत. राज्य शासनाने ‘एनडीआरएफ’ च्या धर्तीवर राज्यात येणाऱ्या विविध आपत्तींचा सामना करण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची (एसडीआरएफ) ची स्थापना केली आहे. या टीमने आज जिल्हाधिकारी व निवासी उपजिल्हाधिकारी यांची भेट घेऊन मराठवाडा विभागातील पूरप्रवण भागाची माहिती घेतली. 

कोणतीही आपत्ती उद्भवल्यास पिडीत व्यक्तीला पहिल्या एका तासात (गोल्डन अवर) मध्ये मदत मिळाली तर पिडीताचे प्राण आपण वाचवू शकतो. त्यामुळे विभागात कोणतीही आपत्ती उद्भवल्यास योग्य समन्वय साधून कमीत कमी वेळेत घटनास्थळी जाऊन मदतकार्य करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी यावेळी या टीमला दिल्या.  

या तुकडीचे नेतृत्व पोलीस निरीक्षक राजुक्रिष्ण सुदाम कोल्हे हे करीत आहेत तर पोलीस उपनिरीक्षक दिलीप सडया चौरे, रोहित भीमराव पानपाटील व दिनेश मधुकर तायडे हे त्यांना सहाय्य करीत आहेत. या दलाची राहण्याची व्यवस्था जिल्हा क्रीडा संकुल नांदेड येथे करण्यात आली आहे. ही तुकडीजिल्हाधिकारी राहुल कर्डिले व निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत असून समन्वय अधिकारी म्हणून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कुऱ्हे हे काम पाहत असून ९४२२८७५८०८ हा त्यांचा मोबाईल क्रमांक आहे. 

0000

 वृत्त क्रमांक 552

जिल्ह्यात एकही बालविवाह होणार नाही याची दक्षता घ्या : जिल्हाधिकारी कर्डिले           

नांदेड दि. 29 मे :- जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी सर्वांनी समन्वय साधून एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे. बालविवाह निर्मूलन ही चळवळ अधिक सक्रिय करण्यासाठी सर्वांचे योगदान महत्त्वाचे असून जिल्ह्यात एकही बालविवाह होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. 

बालविवाह निर्मूलन जिल्हा कृती दलाच्या माध्यमातुन बालविवाह निर्मूलन करण्यासाठी महिला व बालविकास विभाग, पंचायत, आरोग्य, शिक्षण, महिला व बाल कल्याण विभाग (जि.प.), उमेद या सर्व विभागांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेला “बालविवाह मुक्त नांदेड जिल्हा” हा कृती आराखडा प्रभावीपणे राबविण्यासाठी संबंधित सर्व विभागांनी “बालविवाह निर्मूलन चॅम्पियन्स” ची नियुक्ती केली आहे. या सर्व विभागाच्या चॅम्पियन्ससाठी एकदिवसीय प्रशिक्षण जिल्हाधिकारी कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली नुकतेचे 28 मे रोजी हॉटेल सिटी सिंफोनी नांदेड येथे संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते.   

यावेळी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मंजुषा कापसे, शिक्षणाधिकारी प्रा. श्रीमती सविता बिरगे, महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात, उपशिक्षणाधिकारी रामचंद्र पाचंगे, परिवीक्षा अधिकारी गजानन जिंदमवार, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विद्या आळणे यांची प्रमुख उपस्थिती होती.  

बालविवाहाच्या कोणत्याही प्रकरणात दिरंगाई होणार नाही याबाबत सर्वांनी कटाक्षाने कायद्याचे पालन करावे. बालविवाहात कोणतेही बालक ओढले जाणार नाही यासाठी सर्वांनी सतर्क राहून कार्य करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिल्या. बालविवाह निर्मूलन जिल्हा कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत सूचना देऊन प्रशिक्षणार्थ्यांशी जिल्हाधिकारी कर्डिले यांनी मनमोकळा संवाद साधला.  

या प्रशिक्षणात  आराखडयाची अंमलबजावणी, पाठपुरावा, नियोजन, माहिती विश्लेषण, समन्वय, मूल्यमापन आणि संनियंत्रण संदर्भातील गुगल फार्मवर देखरेख  तालुका निहाय, बालविवाहाची कारणे व विभाग निहाय उपाय व हॉटस्पॉट गावाची ओळख, महाराष्ट्रातील बालविवाहाचे प्रमाण परिणाम, सक्षम कार्यक्रम आढावा, बालहक्क, बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006, असुरक्षित बालकांची ओळख, बालविवाह प्रकरण हाताळणे हेतु कार्यवाही व पाठपुरावा, किशोरवयीन मातांसाठी सहाय्य करण्यासाठी यंत्रणांचे बळकटीकरण विभागांचा दृष्टिकोण व समन्वय, बालविवाह निर्मूलन चॅम्पियन्सची भुमिका आणि जबाबदारी, कम्युनिकेशन किट, युनिसेफचे-बालविवाह समाप्त करण्यासाठी जागतिक कार्यक्रम, बालविवाह निर्मूलन जिल्हा कृती आराखडा कार्यान्वयन योजना तयार करणे, साप्ताहिक देखरेखीचे फॉरमेट तयार करणे, जिल्हा कृती दल बैठकीसाठी अहवाल तयार करणे, जिल्हा कृती आराखड्यासाठी सहाय्य व नियोजन, महिती संकलन आणि विश्लेषण, प्रेरणादायी व सकारात्मक प्रकरणांचे दस्तऐवजीकरण आदी विषयांवर हे प्रशिक्षण घेण्यात आले.  

या प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातील पंचायत विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, महिला व बाल कल्याण विभाग (जि.प.), जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयांतर्गत जिल्हा बाल संरक्षण अधिकारी कार्यालय कर्मचारी, चाईल्ड लाईन 1098 कर्मचारी, राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम (RKSK), महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद अभियान) यांनी नियुक्त केलेल्या एकूण “बालविवाह निर्मूलन चॅम्पियन्स” यांना प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणास साधन व्यक्ती म्हणून एसबीसीथ्रीचे बालविवाह निर्मूलन प्रकल्पाचे प्रकल्प अंमलबजावनी प्रमुख नंदू जाधव, वरिष्ठ प्रकल्प समन्वयक कृपाली बढिये, प्रकल्प समन्वयक रुचिका अहिरे, मोनाली धुर्वे उपस्थित होते. सदर प्रशिक्षणात संबंधित सर्व विभागातील बालविवाह निर्मूलन चॅम्पियन्स यांचा उत्कृष्ट सहभाग होता.

0000




28.5.2025

 वृत्त क्रमांक 551

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नांदेड विमानतळावर आगमन 

                                                                                                                                                                        नांदेड दि. 29 मे :- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज सकाळी येथील श्री गुरुगोबिंदसिंघजी नांदेड विमानतळावर आगमन झाले. यावेळी त्यांच्यासोबत वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲङ आशिष जयस्वाल यांचेही आगमन झाले.

जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली,  पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी  त्यांचे स्वागत केले.   

यावेळी आमदार आनंदराव तिडके व विविध पदाधिकारी यांची उपस्थिती होती. त्यानंतर  परभणी येथील नियोजित कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हेलिकॉप्टरने परभणी कडे प्रयाण केले.

000000









Wednesday, May 28, 2025

 वृत्त क्रमांक 550

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नांदेड दौरा

नांदेड दि. 28 मे : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 29 मे 2025 रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

गुरुवार 29 मे 2025 रोजी सकाळी 9.55 वा.मुंबई येथून विमानाने नांदेडकडे प्रयाण. सकाळी 10.55 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन. सकाळी 11 वा. हेलिकॉप्टरने परभणी कडे प्रयाण. दु. 4.15 वा.हिंगोली येथून हेलिकॉप्टरने नांदेड विमानतळ येथे आगमन. दु. 4.20 वा. विमानाने ते मुंबईकडे प्रयाण करतील.
00000

  वृत्त 

तुळजापूरच्या श्रीक्षेत्र तुळजाभवानी देवी मंदिर विकास आराखड्यासाठी

नियोजन विभागाकडून 1 हजार 865  कोटी खर्चास प्रशासकीय मान्यता

--अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील नियोजन विभागाचा शासननिर्णय जारी

मुंबई, दि.२८ : - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील  नियोजन विभागाने तुळजापूर येथील श्रीक्षेत्र तुळजाभवानी देवी मंदिर विकासासाठी १ हजार ८६५ कोटी रुपयांच्या आराखड्यास प्रशासकीय मान्यता दिली असून त्या संदर्भातील शासननिर्णय आज जारी करण्यात आला आहे. या आराखड्याच्या संनियंत्रण व अंमलबजावणीची जबाबदारी धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात सातत्याने यासंबंधीच्या बैठका घेऊन पाठपुरावा केला होता. 

महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून श्रीतुळजाभवानी देवीला महत्वं आहे. देवीच्या साडेतीन शक्तीपिठांपैकी आदिशक्तीचे मूळ स्थान तुळजापूर येथे आहे. देवीच्या दर्शनासाठी वर्षभर भाविक मोठ्या संख्येने येत असतात. नवरात्रीच्या काळात मंदिरात मोठा उत्सव, भक्तांची गर्दी असते. ऐतिहासिक, आध्यात्मिक, सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या तुळजाभवानी देवस्थानच्या विकासाच्या दृष्टीने आजचा हा शासन निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणात नमूद केलेल्या राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय दर्जाची महत्त्वाची स्थळे, तीर्थक्षेत्र परिसर विकास आराखडे यांची व्याप्ती आणि स्वरूप लक्षात घेऊन संबंधित आराखडे नियोजन विभागामार्फत राबवण्यात येतात.

 स्थानिक पातळीवरील सर्व संबंधितांशी चर्चा करून श्रीक्षेत्र तुळजाभवानी देवी मंदिर विकास आराखडा व लागणारा निधी याचा आराखडा धाराशिवचे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीने तयार केला आणि मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीच्या माध्यमातून ६ मे २०२५ रोजी चौंडी येथे झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यास मान्यता धेण्यात आली. त्यानंतर दोन आठवड्यातच या आराखड्यास प्रशासकीय मान्यतेचा शासन निर्णय नियोजन विभागाने जारी केला आहे. या शासन निर्णयानुसार विकास आराखड्यातील कामे करताना ऐतिहासिक वास्तूंची मूळ शैली जपण्याचे तसेच पुरातत्वीय जाण असलेल्या संस्थांकडून ही कामे करून घ्यावीत, असे निर्देश देण्यात आले आहेत. नियोजन विभागाने तत्परतेने जारी केलेल्या या शासननिर्णयाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे देवीभक्तांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

---000000----

 वृत्त क्रमांक 549

राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण व राष्ट्रीय खाद्यतेल अभियानातर्गंत तुर, मुग, उडीद व सोयाबीन पिकांच्या अनुदानावरील बियाणे व पिक प्रात्यक्षिकासाठी अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड, दि. 28 मे :- राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियानअंतर्गत पिकांच्या उत्पादकता वाढीसाठी व बियाणे बदलाचे महत्व विचारात घेता सुधारित, संकरीत वाणांचे प्रसाराच्या दृष्टीने प्रमाणित बियाणे वितरणाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. प्रमाणित बियाणे वितरण याघटकांतर्गत आर्थिक सहाय्य प्रति शेतकरी किमान 0.20 हे. ते कमाल 1 हेक्टर पर्यंत मर्यादित आहे. शेतकऱ्यास महाबीज या बियाणे पुरवठादार संस्थेच्या वितरकामार्फत सातबारा उताऱ्याच्या आधारे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (एफसीएफएस) तत्त्वावर प्रमाणित बियाणे वितरण करण्यात येणार आहे. तुर, मुग, उडीद 10 वर्षाच्या आतील सुधारित प्रमाणित बियाणे वाणास 50 रु. किलोप्रमाणे अनुदान आहे. 10 वर्षाच्या वरील सुधारित प्रमाणित बियाणे वाणास 25 रु. किलोप्रमाणे अनुदान देय राहील.

तुर, मुग, उडीद यापिकांच्या अनुदानावरील बियाणांसाठी अर्जकरण्याची आवश्यकता नाही. तसेच राष्ट्रीय खाद्यतेल अभियान अंतर्गत सोयाबीन बियाणे 5 वर्षाच्या आतील वाण (फुले किमया) 100 टक्के अनुदानावर उपलब्ध केले जाणार आहे. यासाठी महाडीबीटी पोर्टलवर 29 मे 2025 पर्यंत अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ज्या शेतकऱ्यांची निवड झालेली आहे त्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर संदेश जातील व यादी प्रसिध्द होईल. अनुदानावरील बियाणेसाठी निवड झालेल्या लाभार्थी शेतकऱ्यांने त्याच्या मोबाईलवरील निवड झालेला संदेश व स्वतःआधारकार्ड घेवून आपल्या तालुक्यातील महाबीजच्या वितरकामार्फत बियाणे उचल करावे. तालुकानिहाय महाबीजच्या वितरकांच्या याद्या प्रसिद्ध केल्या जातील.

त्याचप्रमाणे राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान व राष्ट्रीय खाद्यतेल अभियानअंतर्गत पिक प्रात्यक्षिक बाब राबविण्यात येणार आहे.  पिक प्रात्यक्षिक ही बाब शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषि क्षेत्रात काम करणारी सहकारी संस्था इ.व्दारे राबविण्यात येणार आहे. शेतकरी गट हा 31 मार्च 2024 पुर्वी नोंदणीकृत असावा. पिक प्रात्यक्षिकासाठी महाडिबीटी पोर्टलव्दारे नोंदणीकृत शेतकरी गट / कंपनी / संस्था निवडही प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य (एफसीएफएस ) या तत्वावर निवड करण्यात येणार आहे. एका गावातून फक्त एकाच शेतकरी गटाची निवड करण्यात येणार असून गटातील शेतकऱ्याच्या संख्या जास्त असल्यास त्यापैकी फक्त 25 शेतकऱ्यांची या लाभासाठी निवड करावयाची आहे. तथापि शेतकरी गटातील एका कुटुंबातील एकच शेतकऱ्यास लाभ देण्यात येणार आहे. शेतकरीगट/कंपनी/ संस्था यामधील शेतकऱ्यांना पिक प्रात्यक्षिकाचा लाभ देताना ॲग्रिस्टॅक वर नोंदणी असणे व फार्मर आयडी असणे बंधनकारक आहे.

तरी वरील सर्व बाबींचा लाभ घेणेसाठी जिल्हयातील जास्तीत जास्त शेतकरी/ शेतकरीगट/ कंपनी आणि संस्था यांनी mahadbt.maharashtra.gov.in संकेतस्थळावर 29 मे 2025 पर्यत  अर्ज सादर करावेत व अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले.

00000

 वृत्त क्रमांक 548

शेतकऱ्यांनी एचटीबीटी कापूस बियाणे खरेदी व पेरणी करु नये

नांदेड, दि. 28 मे :- शेतकऱ्यांनी एचटीबीटी कापसाचे बियाणे विकत घेवू नये किंवा पेरणी करू नये. अधिकृत व प्रमाणित कंपन्यांचेच बी.टी. बियाणे खरेदी करावे. शंकास्पद बियाणे विक्रेत्यांची माहिती तात्काळ नजिकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयास कळवावी व शासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

सध्या खरीप हंगाम 2025 ची लगबग सुरु आहे.  ग्रामीण भागात कपाशी लागवडीसाठी बियाणे खरेदीची लगबग सुरु आहे. एचटीबीटी ही एक अनधिकृत जैवतंत्रज्ञान आधारित कापसाची जात आहे. जी अद्याप भारत सरकारकडून अधिकृतपणे मान्यता प्राप्त नाही. एचटीबीटी बियाण्यांचे उत्पादन, विक्री व पेरणी ही अनधिकृत व बेकायदेशीर आहे, असे केल्यास बी.टी. बीज कायदा, पर्यावरण संरक्षण कायदा, व अन्य संबंधित कायद्यानुसार गुन्हा ठरतो.

एचटीबीटी बियाण्यांची उत्पत्ती, कार्यक्षमता व परिणाम याबाबत कोणतीही खात्री नाही. रोगप्रतिकारक शक्ती, उत्पादन क्षमता आणि बाजारातील मागणी यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. बोगस व बनावट बियाणे मिळण्याची शक्यता वाढते. राज्य शासन व कृषी विभाग यांच्याकडून याबाबत सातत्याने कारवाई सुरू आहे. अनधिकृत बियाणे विक्री करणाऱ्यां विरोधात कठोर पावले उचलण्यात येत आहेत, अशी माहिती कृषी विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

0000

 वृत्त क्रमांक 547

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर 300 व्या जयंती वर्षानिमित्त

 सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे सांस्कृतिक कार्य विभागाचा मानाचा मुजरा

31 मे 2025 रोजी सायं. 5 वाजता, कुसुम सभागृह, नांदेड या ठिकाणी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर 300 व्या जयंती वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम

नांदेड, दि. 28 मे :- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंती वर्षानिमित्त  शनिवार 31 मे 2025 रोजी सायं. 5 वा. कुसुम सभागृह, नांदेड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यावर आधारित भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तरी नागरिकांनी या  सांस्कृतिक कार्यक्रमासाठी  मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर 300 व्या जयंतीवर्षा निमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाची संकल्पना सांस्कृतीक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांची असून या कार्यक्रमास मार्गदर्शन मुख्यमंत्र्याचे अपर मुख्य सचिव तथा अपर मुख्य सचिव सांस्कृतिक कार्य विभाग विकास खारगे यांचे लाभले आहे. 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ह्या केवळ राज्यकर्त्या नव्हत्या तर प्रजाहित दक्ष होत्या. त्यांनी अनेक घाट, मंदिरे जीर्णोद्धार, पाणपोई, धर्मशाळा इ. कामे केली आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर 300 व्या जयंती वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन 31 मे रोजी नांदेड येथील कुसूम सभागृहात करण्यात आले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर 300 व्या जयंती वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये लोककलाकार आपली कला सादर करणार आहेत. तसेच या सांस्कृतिक  कार्यक्रमात विविध लोककलाकार असतील. 

००००००



Tuesday, May 27, 2025


हवामान विभागाच्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन नियंत्रण कक्ष सक्रिय केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्रीद्वय एकनाथ शिंदे, अजित पवार परिस्थितीचा सातत्याने आढावा घेत आहेत. संबंधित सर्व यंत्रणांना २४ तास अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.




राज्यातील अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आढावा घेण्यात आला. शेती आणि घरांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावेत आणि नुकसान भरपाई देण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.


यावेळी झालेल्या चर्चेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आपत्ती व्यवस्थापन मंत्री मंत्री गिरीश महाजन, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, मंत्री दत्तात्रय भरणे, मंत्री भरत गोगावले, मंत्री नितेश राणे यांनी भाग घेतला.


बैठकीच्या सुरवातीलाच राज्यातील अतिवृष्टी, धरणातील पाणी साठे, पिक-परिस्थिती याबाबतचा आढावा घेण्यात आला. विविध विभागांच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापनाशी निगडीत विविध यंत्रणांच्या सज्जतेची माहिती सादर केली.

#मंत्रिमंडळबैठक
#अतिवृष्टी
 

  वृत्त क्रमांक 546

विकसित कृषी संकल्प अभियान : शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी  

नांदेड दि. 27 मे :- कृषि मंत्रालय भारत सरकार व भारतीय कृषी अनुसंधान परिषद अंतर्गत विकसित कृषी संकल्प अभियान 29 मे ते 12 जून 2025 दरम्यान देशभरात राबवले जात आहे. या अभियानाचा उद्देश शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान, सुधारित पिके, पशुपालन, मत्स्यपालन तसेच विविध सरकारी योजना आणि धोरणांची माहिती देणे हा आहे. 

जिल्ह्यातील विशेष उपक्रम

नांदेड जिल्ह्यातील कृषि विज्ञान केंद्र सगरोळी हे या अभियानाचा भाग म्हणून 8 तालुक्यांतील (बिलोली, देगलूर, नायगाव, उमरी, धर्माबाद, मुखेड, लोहा व कंधार) 90 गावांमध्ये विशेष उपक्रम राबविणार आहे. या अभियानाद्वारे शेतकऱ्यांना सुधारित कृषी तंत्रज्ञान, बाजारपेठ नियोजन, शासकीय योजनांचे फायदे, नव्या तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष वापर याविषयी मार्गदर्शन मिळणार आहे. 

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे लाभ

·  तज्ज्ञांशी थेट संवाद आणि मार्गदर्शन

· सुधारित तंत्रज्ञान आणि नव्या जातींबाबत सविस्तर माहिती

·  सरकारी योजनांची अंमलबजावणी आणि लाभांविषयी संपूर्ण माहिती

·  प्रगतशील शेतकऱ्यांच्या नवकल्पना व नव्या प्रयोगांचे दस्तऐवजीकरण अभियानाचा नियंत्रण आणि समन्वय 

अभियान प्रभावीपणे पार पाडण्यासाठी कृषि विज्ञान केंद्र सगरोळी विशेष समिती स्थापन करणार असून राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय अधिकारी, संशोधक आणि प्रगतशील शेतकरी यात सहभागी होतील. व्हॉटसॲप WhatsApp गट आणि दैनिक अहवाल संप्रेषणाच्या माध्यमातून नियंत्रण कक्ष कार्यरत राहील. 

शेतकऱ्यांना आवाहन

या अभियानाद्वारे नांदेड जिल्ह्यातील कृषी क्षेत्राचा विकास निश्चितच होणार आहे. शेतकऱ्यांनी या अभियानात जास्तीतजास्त सहभाग घेऊन नवे ज्ञान मिळवावे आणि आपल्या उत्पादनक्षमतेत वाढ करावी, असे आवाहन कृषि विज्ञान केंद्र सगरोळी तर्फे करण्यात आले आहे.

00000

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना


प्रधानमंत्री पीक विमा योजना


मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना 


 

 वृत्त क्रमांक 545

मान्सून स्थिर होईपर्यंत शेतकऱ्यांनी 

पेरणीची घाई करु नये : जिल्हाधिकारी

नांदेड दि. 27 मे :- यावर्षी मराठवाड्यात आणि नांदेड जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस खूप मोठया प्रमाणात आलेला आहे. हा पाऊस पुढच्या काही दिवसात स्थिर राहणार असला तरी हा अनियमित आणि अस्थिर स्वरुपाचा पाऊस आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये, असे आवाहन जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी शेतकरी बांधवांना केले आहे. 

शेतकऱ्यांनी मान्सून स्थिर झाल्यावरच कृषी विभागाच्या सल्ल्यानुसारच पेरणी करावी. पेरणीची घाई करु नये. आता पेरणी केल्यास पीकावर किड रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तसेच मान्सून स्थिर होण्यापूर्वी पेरणी केल्यास दुबार पेरणीची शक्यता नाकारता येत नाही. आताच्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी मशागतीची कामे करावीत व मान्सून स्थिर होण्याची वाट पाहावी, असेही आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे. 

00000



वृत्त क्रमांक 544

आदर्श आदिवासी गाव योजनेसाठी सेवाभावी संस्थांना 6 जूनपर्यत अर्ज करण्याचे आवाहन   

नांदेड दि. 27 मे :- अनुसूचित क्षेत्रातील आदिवासी बहुल गावांच्या सर्वांगीण विकासासाठी आदर्श आदिवासी गाव योजना राबविण्याबाबत शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. ही योजना राबविण्यासाठी सेवाभावी संस्था यांच्याकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. दिलेल्या अटी व शर्तीनुसार सेवाभावी संस्थानी प्रस्ताव शुक्रवार 6 जून 2025 पर्यंत सादर करावेत. त्यानंतर आलेल्या प्रस्तावांचा विचार केला जाणार नाही, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी जेनित चन्द्रा दोन्तुला यांनी केले आहे. 

 कामाचे स्वरूप

सदर सेवाभावी संस्था (एनजीओ) योजना अंमलबजावणीसाठी ग्रामस्थांना एकत्रित करणे, त्यांच्यामध्ये जाणीव जागृती करणे, त्यांना आवश्यक प्रशिक्षण देणे, योजना अंमलबजावणीचे संनियंत्रण करणे, अंमलबजावणी सद्यस्थिती राज्य, सुकाणू समिती व जिल्हास्तरीय समितीस नियमित अवगत करणे, विषयतज्ज्ञ म्हणून कामकाजात सहभागी होणे, नाविण्यपूर्ण उपक्रम प्रस्तावित करणे, योजनापूर्ती नंतर मूल्यमापन करणे इत्यादी भुमिका सेवाभावी संस्था पार पाडील व आदिवासी विकास विभागाचा शासन निर्णय 28 मार्च 2025 नुसार कामकाज करतील. 

आवश्यक कागदपत्रे

संस्थेची नोंदणी प्रमाणपत्र (संस्था तीन वर्षापासून नोंदणीकृत व पंजीकृत असावी), संस्था चालु असल्याबाबत प्रमाणपत्र (धर्मादाय यांच्याकडून संस्था चालू असल्याबाबत परिशिष्ट एकची नकल सादर करावी), संस्थेचे मागील तीन वर्षाचे लेखापरीक्षण अहवाल (सन 2021-22, 2022-23, 2023-24), सन 2023-24 या वर्षाचे आयकर प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य आहे. संस्थेकडे पॅनकार्ड, बँक खात्याचा सविस्तर तपशील जोडावा, संस्थेकडे जीएसटी प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे, संस्थेकडे पाच लक्षचे राष्ट्रीयकृत बँकेची सॉलवन्सी अनिवार्य आहे. निवड झालेल्या संस्थेस योजना अंमलबजावणी संदर्भात वेळोवेळी निर्गमित झालेल्या व होणाऱ्या अटी व शर्ती मान्य असल्यास करारनामा करुन द्यावा लागेल.  

योजनेचे प्रस्ताव नाकारणे व स्विकारण्याचा अधिकार जिल्हास्तरीय समितीने राखून ठेवलेला आहे. सदर संस्थेचा  प्रस्ताव दोन प्रतीत प्रकल्प कार्यालयास सादर करण्यात यावा. संस्थेकडे प्रस्तावित कार्यक्रम राबविण्यासाठी पुरेशा प्रशिक्षक, कर्मचारी वर्ग यांची यादी जोडण्यात यावी. सदर शासन निर्णयामध्ये संस्थेस प्रशिक्षण, कामकाज करण्यासाठी मानधन अदा करण्याबाबत तरतुद नाही, असेही आवाहन किनवट एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प कार्यालयाकडून करण्यात आले आहे. 

00000

 वृत्त क्रमांक 543

अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना लाभ कृषी विभागाचे आवाहन

नांदेड दि. 27 मे :- गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह विमा योजनेअंतर्गत अर्धापूर तालुक्यातील अपघातात मृत्यु पावलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना व अपघातात एक, दोन अवयव निकामी झालेल्या शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी अर्धापूर तालुकास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. समितीचे अध्यक्ष तहसिलदार अर्धापूर, सदस्य सचिव तालुका कृषी अधिकारी व इतर सदस्य गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, पोलीस निरीक्षक व प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे प्रतिनिधी आहेत. 

तहसिलदार अर्धापूर यांच्या अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालय, अर्धापूर येथे तालुकास्तरीय समितीची बैठक घेऊन त्यात पात्र लाभार्थ्यांना अपघातात मृत्यू पावलेले यांच्या वारसांना दोन लाख व अपघातात एक अवयव निकामी होणे यांना एक लाख असे लाभ देण्यात येत असून आजपर्यत सन 2023 मध्ये 6 प्रस्ताव व 2024 मध्ये 17 प्रस्ताव समितीसमोर मंजूर, नामंजूरीसाठी ठेवण्यात आले होते. यापैकी 16 प्रस्ताव मंजूर झाले आहेत. पात्र लाभार्थ्यांना जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, नांदेड कार्यालयामार्फत वारसांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा करण्यात येत आहे. 

तरी या योजनेचा लाभ जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन तालुकास्तरीय समितीचे अध्यक्ष तहसिलदार रेणुकादास देवणीकर व सचिव तालुका कृषि अधिकारी विशाल बिऱ्हाडे यांनी केले आहे. 

0000

वृत्त क्रमांक 542

माजी सैनिकांना नागरी संरक्षण स्वयंसेवक म्हणून नोंदणी करण्याचे आवाहन                                                               

नांदेड दि. 27 मे :-भारत सरकारच्या उपमहासंचालक, सिव्हिल डिफेन्स यांच्या नेत्वृत्वाखाली मॉक ड्रिल सराव आयोजित करण्याबाबत राष्ट्रीय स्तरावर नागरी संरक्षण स्वयंसेवक म्हणून सिव्हिल डिफेन्स रेग्युलेशन 1968 नुसार ईएसएम माजी सैनिक यांची भरती करावयाची आहे. तरी नांदेड जिल्ह्यातील सर्व माजी सैनिकांनी नागरी संरक्षण स्वयंसेवक साठी आपले नाव तात्काळ जिल्हा सैनिक कार्यालयास नोंदणी करावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी महेश वडदकर यांनी केले आहे. 

00000

 वृत्त क्रमांक 541

एचएसआरपी नंबर प्लेट वेळेत बसवा आणि दंड टाळा

नांदेड दि. 27 मे :- ज्या वाहनांची 01 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेली आहे. त्या वाहनांना हाय सिक्युरीटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट नाही. अशा वाहनधारकांनी अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने शुल्क भरुन 30 जून 2025 पूर्वी एचएसआरपी नंबर प्लेट बसवून घ्यावी, असे आवाहन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी समीर याकुब शेख यांनी केले आहे.

केंद्रीय मोटार वाहन नियम,1989 च्या नियम 50 नुसार वाहनांस एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्याची तरतूद आहे. तसेच रस्ते व महामार्ग मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या G.S.R. 1162 (E) 04 डिसेंबर 2018 व S.O. 6052(E) दि.06.12.2018 नुसार 01 एप्रिल 2019 पासून उत्पादित होणाऱ्या सर्व नवीन वाहनांना हाय सिक्युरीटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याची तरतूद करण्यात आली आहे. एचएसआरपी नंबर प्लेट विहित वेळेत न बसविल्यास मोटार वाहन कायद्यानुसार परिवहन विभागातर्फे दंड आकारणी करण्यात येणार आहे. वाहनधारकांनी दंड टाळण्यासाठी 30 जूल 2025 पूर्वी एचएसआरपी नंबर प्लेट बसवून घ्यावी.

वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे व तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व वाहनांना मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून 01.04.2019 पूर्वी उत्पादीत वाहनांना एचएसआरपी बसविण्याकरिता मे. रोजमर्टा सेफ्टी सिस्टम लिमीटेड या संस्थेची/उत्पादकाची निवड करण्यात आली आहे. वाहनधाकारंनी वाहनांना हाय सिक्युरीटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्यासाठी ऑनलाईन अपॉईंटमेंटसाठी https://mhhsrp.com या संकेतस्थळावर भेट द्यावी. या व्यतिरीक्त कुठल्याही इतर संकेतस्थळावर नोंदणी करणे टाळावे. मोटार सायकल व ट्रॅक्टरसाठी दर रु.450/-, तीन चाकी वाहनांसाठी रु.500/- व सर्व प्रकारचे चारचाकी वाहनांसाठी रु. 745/- इतका दर आकारला जाणार आहे. या व्यतिरीक्त जीएसटी चा दर भरावा लागणार आहे व हे शुल्क हे ऑनलाईन स्वरुपातच भरावे लागणार आहे.

सद्यस्थितीत नांदेड जिल्ह्यामध्ये 26 मे 2025 रोजी पर्यत 21 हजार 658 वाहनांची नोंदणी ऑनलाईन पध्दतीने एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यासाठी करण्यात आली असून अद्याप ९ हजार ३८३ वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यात आली आहे. वाहनधारकांच्या अत्यल्प प्रतिसादामुळे व वाहनधारकांना अत्यल्प प्रतिसादामुळे व वाहनधारकांना येणारा दंड टाळण्यासाठी वाहनांना एचएसआरपी बसविण्याची अंतिम ३० जून २०२५ रोजी पर्यत मुदतवाढ देण्यात आली आहे.

01.04.2019 पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना हाय सिक्युरीटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याबाबत शासनाद्वारे नियुक्त करण्यात आलेले अधिकृत एचएसआरपी फिटमेंट सेंटरर्स येथे एचएसआरपी बसविण्याकरिता ॲपाईटमेंट घेण्याची कार्यपध्दती व इतर सर्वप्रकारची माहिती विभागाच्या https://www.transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे असे प्रादेशिक परिवहन विभागाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

Monday, May 26, 2025

वृत्त क्रमांक 540

बियाण्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू 

नोंदणीकृत शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषि क्षेत्रात काम करणाऱ्या सहकारी संस्था करता येतील अर्ज 

नांदेड दि. 26 मे : खरीप हंगाम सन 2025 मध्ये शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषिक्षेत्रात काम करणाऱ्या सहकारी संस्थानी पिक प्रात्यक्षिकाच्या लाभासाठी महाडीबीटीवर अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जास्तीत जास्त शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषि क्षेत्रात काम करणारी सहकारी संस्था यांनी बियाण्यांसाठी आजच महाडीबीटीवर अर्ज करावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे. 

खरीप हंगाम सन 2025 मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान अंतर्गत तुर, मुग व उडिद पिकांसाठी (10 वर्षाच्या आतील अधिसुचित वाण) व राष्ट्रीय खा‌द्यतेल अभियान-तेलबिया अंतर्गत सोयाबीन पिकासाठी (5 वर्षाच्या आतील अधिसुचित वाण) योजनेअंतर्गत पिक प्रात्यक्षीकांसाठी 31 मार्च 2024 च्या पुर्वी नोंदणीकृत असलेल्या शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषि क्षेत्रात काम करणारी सहकारी संस्था यांनी बियाण्यासाठी महाडीबीटीवर https://mahadbt.maharashtra. gov.in/Farmer/AgriLogin अर्ज करण्याची प्रक्रिया 26 ते 29 मे 2025 पर्यंत चालु आहे. 

प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर गटांची निवड करण्यात येणार आहे. सदर पिक प्रात्यक्षिके ही सुधारीत लागवड तंत्रज्ञान आधारीत राबविण्यात येणार असुन त्यामध्ये बियाणे व इतर कृषि निविष्ठा अर्थसहाय्यीत दराने उपलब्ध करण्यात येणार आहेत. या योजनेबाबत अधिक माहितीसाठी कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य, संकेतस्थळ-www.krishi.maharashtra.gov.in किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी सपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.  

00000

वृत्त क्रमांक 539 

हरित क्रांतीचे जनक कै. वसंतराव नाईक यांच्या

पुतळ्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते लोकार्पण

 

·  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती 

 

नांदेड दि. 26 मे :- हरित क्रांतीचे जनक तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा पुर्णाकृती पुतळा व परिसर सुशोभिकरण कामाचा लोकार्पण सोहळा आज केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते संपन्न झाला. या सोहळ्या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते.

 

नांदेड शहरातील कै. वसंतराव नाईक चौक येथे पार पडलेल्या या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून इतर मागास बहुजन कल्याणदुग्धविकासअपारंपारिक ऊर्जा तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्यासह महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेपशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडेमहिला व बालकल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकरखासदार अशोक चव्हाणबाळासाहेब ठाकरे हरिद्रा  (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष तथा विधान परिषद सदस्य आमदार हेमंत पाटीलआमदार बालाजी कल्याणकरआमदार बाबुसिंग महाराज राठोडआमदार बाबुराव कदमआमदार श्रीजया चव्हाणजिल्हाधिकारी राहुल कर्डिलेपोलीस अधिक्षक अबिनाश कुमारजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावलीमनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे आदी उपस्थित होते.  

 

प्रारंभी मंचावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन झाल्यानंतर त्यांनी कै. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर श्री. शाह यांनी कळ दाबुन पुतळ्याचे अनावरण केले. तसेच त्यांच्या हस्ते नामफलकाचेही अनावरण करण्यात आले. याप्रसंगी बंजारा समाजाच्यावतीने श्री. शाह व श्री. फडणवीस यांचा पारंपारिक पद्धतीने सत्कार करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने बंजारा समाजाचे नागरिक उपस्थित होते.  

 

हरितक्रांतीचे जनक कै. वसंतराव नाईक यांचा पूर्णाकृती पुतळा नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेने नांदेड शहरातील कै. वसंतराव नाईक चौक परिसरात उभारला आहे. नऊ फूट उंचीच्या या पुतळ्याचे वजन सुमारे 700 किलो आहे. पुतळ्याच्या उभारणीसाठी रुपये 13 लक्ष 99 हजार एवढा खर्च आला आहे. 232.60 चौ.मी. जागेत या पुतळ्याची उभारणी करण्यात आलेली आहे. सुशोभिकरणाचे अंदाजे 69 लाख रुपयांची कामे आहेत.

00000


























वृत्त क्रमांक 566 किनवट, इस्लापूर भागाकडे अधिक लक्ष देऊ  -अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ नांदेड दि. 2 जून : महाराष्ट्र शासनाचा प्रति...