मराठी भाषा : अभिजाततेचा सन्मान, जागतिक विस्तार
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे, ही महाराष्ट्रासाठी आणि मराठी भाषिकांसाठी अभिमानाची बाब आहे. या निमित्ताने 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे आयोजित करण्यात आले आहे. त्यामुळे दिल्ली पासून गल्लीपर्यंत एक मंतरलेले वातावरण महाराष्ट्रात तयार झाले आहे. मराठी भाषा तिचा विस्तार घराघरातील मराठी मराठीच्या अन्य भाषिक भगिनी मराठीचा विस्तार सात समुद्रापलिकडे गेलेली मराठी अशा अनेक विषयांवर चर्चा रंगत आहे ऊर भरून यावा असे वातावरण तयार होत आहे. या पार्श्वभूमीवर मराठी भाषेचा ऐतिहासिक वारसा, तिची प्राचीनता, शासनाच्या योजना आणि जागतिक स्तरावरील आपल्या माय मराठीची नोंद या सर्व घटनाक्रमाचा उहापोह करणे औचित्यपूर्ण आहे.
मराठी भाषेचे प्राचीन संदर्भ
मराठी ही इंडो-आर्यन भाषाकुटुंबातील महत्त्वाची भाषा आहे. तिचा उगम संस्कृत भाषेतून झाल्याचे भाषाशास्त्रज्ञ मानतात. मराठीत प्राचीनतम लिखित संदर्भ १०-११ व्या शतकातील 'शिलाहार ताम्रपटां'मध्ये आढळतात. महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी यांनी लिहिलेले लीळाचरित्र हे मराठीत उपलब्ध असलेले सर्वात प्राचीन गद्य स्वरूपातील साहित्य आहे. मुकुंदराजांनी रचलेला विवेकसिंधू हा ग्रंथ मराठी भाषेतील पहिला ग्रंथ आहे. तसेच ज्ञानेश्वरांनी रचलेली भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी) ही मराठीत लिहिलेली पहिली मोठी साहित्यकृती मानली जाते. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये सापडलेल्या जुन्या पांडू लिपी, शिलालेख, यामध्ये देखील मराठी भाषेची नोंद सापडते.
मराठी भाषेचा अभिजात दर्जा
भारत सरकारकडून अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी काही निकष ठरवलेले होते. यामध्ये
1. भाषेला १५०० वर्षांपेक्षा अधिक प्राचीन लिखित साहित्य परंपरा असावी.
2. स्वतंत्र व्याकरण आणि समृद्ध साहित्य असावे.
3. संस्कृतीवर महत्त्वपूर्ण प्रभाव असावा.
लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, तुकयांचे अभंग, दासबोध, पंडितराज जगन्नाथांची संस्कृत-मराठी लेखन परंपरा आणि पुढे येणाऱ्या संत साहित्यामुळे मराठी भाषा या निकषांमध्ये बसते. या संदर्भात पुरावा देण्यासाठी शासनाने शर्थीचे प्रयत्न केले होते. विविध स्तरावरून यासाठी पाठपुरावा केला जात होता. 3 ऑक्टोबर 2024 ला मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. त्यानंतर दिल्ली येथील अखिल भारतीय साहित्य संमेलन येत असल्यामुळे सध्या तमाम मराठी मुलुखामध्ये आनंद व्यक्त केल्या जात आहे. मंतरलेल्या आणि भारावलेल्या वातावरणातच दिल्लीत होणाऱ्या सारस्वतांच्या मेळामध्ये अनेकांनी कुच करायचे ठरविले आहे.
शासनाचे भाषा संवर्धनाचे उपाय
मराठी भाषा टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अनेक उपाययोजना केल्या आहेत.
मराठी भाषा विभागाची स्थापना राज्य शासनाने 2011 मध्ये केली. शासनाने स्वतंत्र मराठी भाषा विभाग स्थापन केला असून, तो जतन आणि संवर्धनाचे विविध धोरण आखतो.
मराठी भाषा धोरण: २०१३ मध्ये राज्य शासनाने मराठी भाषा संवर्धन आणि प्रसारासाठी धोरण आखले.
मराठी भाषेच्या संरक्षणासाठी कायदा: २०२२ मध्ये 'महाराष्ट्र मराठी भाषा अधिनियम' संमत करण्यात आला, ज्यामुळे शासकीय कामकाजात मराठी अनिवार्य करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात प्रत्येक शाळेमध्ये मराठी भाषा अनिवार्य करण्यात आली आहे.
माय मराठीच्या संवर्धनाचा विचार व्हावा यासाठी मराठी भाषा भवन मुंबई येथे होणार आहे
शासकीय कार्यालयामध्ये मराठी भाषेमध्ये कामकाज करण्याचे निर्देशित करण्यात आले आहे.
मराठी भाषा दिवस (२७ फेब्रुवारी): कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा दिवस साजरा केला जातो.
मराठी शाळांसाठी अनुदाने: इंग्रजी माध्यमाकडे झुकणाऱ्या प्रवृत्तीला आवर घालण्यासाठी मराठी शाळांना अनुदाने दिली जातात.
४) बृहन्महाराष्ट्र मंडळ आणि जागतिक पातळीवरील मराठी भाषा
महाराष्ट्राबाहेर मराठी भाषेचा प्रचार आणि संवर्धन करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य बृहन्महाराष्ट्र मंडळ करते. अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, दुबई, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांमध्ये बृहन महाराष्ट्र मंडळ कार्यरत आहे. या ठिकाणी मराठी सण उत्सव व भाषा संदर्भातील कार्यक्रम नियमितपणे घेतली जातात. महाराष्ट्रात केवळ चांदा ते बांदा मराठी आहेत अशी धारणात चुकीची ठरते मध्यप्रदेश, तेलंगाना, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोवा ,गुजरात एवढेच नव्हे तर सीमा लगत नसतानाही दिल्लीमध्ये जवळपास पाच लाख मराठी नागरिक रहिवासी आहेत. एकट्या दिल्लीमध्ये शेकडो मराठी मंडळे कार्यरत असून स्वातंत्र्यपूर्व काळापासून त्यांनी आपले मराठी सण उत्सव परंपरा राजधानी दिल्लीमध्ये सुरू ठेवली आहे नवी दिल्लीमध्ये दोन मराठी शाळा व अनेक मराठी मंडळे मराठी भाषेची सेवा कसोशीने करत आहे.
भारताबाहेर मराठी भाषा:
कविवर्य डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांनी आपल्या कवितेमध्ये ....
भाषेचे आणि जातीचे काय असते नाते
भाषा म्हणजे धान्य धर्म म्हणजे जाते
जो जिथे जन्मला तेच त्याची भाषा
पऱ्हाटीकडून बोंडाचीच कराल ना आशा
असे भाषा आणि धर्माचे वर्णन करतात. त्यामुळे महाराष्ट्रात राहणारे हिंदू, मुस्लिम, शीख, जैन सर्व जाती धर्माची मंडळी मराठीमध्ये बोलतात. देवनागरी लिपी आणि अनेक भाषांमधले शब्द स्वतःमध्ये सामावून घेण्याची वृत्ती यामुळे ही भाषा लोकप्रिय आणि अधिक बोलल्या जाते जगामध्ये दहाव्या क्रमांकावर मराठी भाषा बोलली जाते जवळपास दहा कोटी जनता ही भाषा बोलते. काही ठिकाणचे मराठी मंडळ तर भारतातील भाषिक उपक्रमांना लाजवेल अशा प्रकारे कार्यक्रमांचे आयोजन करते. यामध्ये उल्लेखनीय नोंदी म्हणजे लंडनमध्ये मराठी भाषेचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे.अमेरिकेच्या अनेक विद्यापीठांत मराठी भाषा शिकवली जाते.ऑस्ट्रेलिया आणि कॅनडात मराठी सण-उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरे होतात. कराचीतील मराठी मंडळी अजूनही गणेशोत्सवाला विसरली नाही.
दुबई आणि सिंगापूरमध्ये मराठी भाषिक मोठ्या संख्येने वास्तव्य करतात. जगाच्या पाठीवर जाई ठिकाणी मराठी माणूस गेला त्या ठिकाणी तो तीन गोष्टी करतो एक म्हणजे मराठी मंडळ स्थापन करतो, दुसरा म्हणजे गणेशोत्सवात गणपतीला विसरत नाही आणि तिसरा म्हणजे महाराष्ट्राने देशाला दिलेल्या आदर्शांना त्याला विसरणे शक्य नसते. त्यामुळे शिवजयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व महापरिनिर्वाण दिन, दिवाळी,दसरा, रक्षाबंधन अशा अनेक सणांना मराठी भाषा मराठी उत्सव आणि मराठी अस्मितेचा मुलामा चढलेला असतो त्यामुळे भाषेसोबत संस्कृती हे देखील मराठी भाषा संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे.
जागतिक स्तरावर मराठी भाषेचे स्थान
मराठी ही जगभरातील प्रमुख भाषांपैकी एक आहे. काही महत्त्वाचे आकडेवारी दाखले –
जगातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये १०व्या क्रमांकावर मराठी भाषा आहे.भारतात हिंदीनंतर दुसऱ्या क्रमांकाची मातृभाषा असलेली भाषा.९ते १० कोटीहून अधिक लोकांची मातृभाषा मराठी आहे.
दिल्लीतील महोत्सव
दिल्लीमध्ये मराठी साहित्य संमेलन होणे, ही एक ऐतिहासिक बाब आहे. महाराष्ट्राबाहेर हे संमेलन होत असून, ते मराठी भाषेच्या जागतिक पातळीवरील महत्त्वाचे स्थान दर्शवते. यावेळी साहित्य, भाषा आणि संस्कृती यांचे चिंतन होणार असून, विविध चर्चासत्रे, परिसंवाद आणि ग्रंथप्रदर्शन आयोजित केले जात आहेत. दिल्लीच्या विज्ञान भवनातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या संमेलनाचे उद्घाटन करणार आहे 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीच्या अभ्यासक असलेल्या तारा भवाळकर भूषवित आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. महाराष्ट्रातील शेकडो प्रकाशक आपल्या प्रकाशनासह दिल्लीत डेरे दाखल होत आहे. महाराष्ट्राच्या जिल्ह्यात जिल्ह्यात घट्ट पाळीमुळे असणाऱ्या ग्रंथ चळवळीतील अनेक मान्यवर प्रकाशक साहित्यिक कवी लेखक समीक्षक दिल्लीकडे कूच करणार आहेत त्यानिमित्ताने संपूर्ण देशात भारावलेले वातावरण निर्माण होत आहे. मराठी सारस्वतांमध्ये तर या संमेलनाचे प्रचंड आकर्षण असून विविध उपक्रम संमेलनाची पूर्वतयारी म्हणून गावागावात सुरू झाले आहे.
खरे म्हणजे आमची माय मराठी कधीच लोकल नव्हती ती कायम अटकेपार ग्लोबलच होती. मराठी ही केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नसून ती आता आंतरराष्ट्रीयस्तरावर पोहोचली आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने मराठीला अधिक महत्त्व प्राप्त झाले असून, तिच्या संवर्धनासाठी शासन आणि बृहन्महाराष्ट्र मंडळे योगदान देत आहेत. अशा साहित्य संमेलनांच्या माध्यमातून मराठीचा जागतिक प्रसार अधिक व्यापक होईल, यात शंका नाही. त्यामुळेच 21, 22, 23 फेब्रुवारी मराठी भाषकांच्या कॅलेंडरवर राखीव तारीख ठरली आहे... तेव्हा चलो दिल्ली !
प्रवीण टाके
जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड
97O2858777
No comments:
Post a Comment