Saturday, April 5, 2025

राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी आज संध्याकाळी साडेसात वाजता माहूर गडावरील रेणुका देवीचे दर्शन घेतले. माहूर येथून ते पुन्हा यवतमाळ जिल्ह्यातील पुसद या गावी रवाना झालेत.














  वृत्त क्रमांक 356

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली कृष्णा राऊतच्या शिक्षणाची जबाबदारी

 मृतांच्या कुटुंबियांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी गुंज येथे रविवारी विशेष सहायता शिबीर 

 नांदेड जिल्ह्यातील आलेगाव येथील घटनाक्रमानंतर शासनाकडून कुटुंबांचे सांत्वन 

 नांदेड व हिंगोली जिल्हाधिकाऱ्यांकडून दुसऱ्या दिवशीही आढावा 

 नांदेड /हिंगोली, दि.५ एप्रिल: वसमत तालुक्यातील गुंज येथील शेतमजुरांना घेऊन जाणारी ट्रैक्टर ट्रॉली विहिरीत पडून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा मुलगा कृष्णा राऊत याच्या शिक्षणाची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. तर मृताच्या कुटुंबियांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून रविवारी (दि.६) गुंज येथे विशेष सहायता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 

शुक्रवारच्या दुर्घटनेची दखल प्रधानमंत्री कार्यालय तसेच मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली आहे. घटनेतील कुटुंबांच्या पाठीशी शासन उभे राहिले असून आज नांदेड व हिंगोली येथील जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांमार्फत पुन्हा या घटनाक्रमाचा आढावा घेतला.

 नांदेड जिल्ह्यातील आलेगाव येथे शुक्रवारी ४ एप्रिल रोजी सकाळी ७.३० वाजता ही दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत वसमत तालुक्यातील गुंज त.आसेगाव येथील ९ महिला व एक पुरुष शेतमजूर आलेगाव शिवारातील शेत गट क्र.२०१ मध्ये शेती कामासाठी जात होते. सदरील शेताजवळ आले असता पाण्याने भरलेल्या विहिरीत हे शेतमजूर ट्रॅक्टरसह पडल्यामुळे त्यातील ७ महिलांचा मृत्यू झाला.

त्यातील एका मयत महिलेचा मुलगा कृष्णा तुकाराम राऊत याचा समाज माध्यमांवरील व्हिडीओ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहिला असता, त्यांनी व्हिडीओची तात्काळ दखल घेतली. त्या व्हिडीओमधील लहान मुलाची वेदना व भावना समजून घेत मुख्यमंत्र्यांनी कृष्णाच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी स्वतः घेत असल्याचे जाहीर केले. तसेच मयतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लक्ष रुपयाची आर्थिक मदतही जाहीर केली आहे.

तसेच आज शनिवारी (दि.५) रोजी जिल्हाधिकारी अभिनव गोयल व नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी दिलेल्या निर्देशानुसार वसमतचे उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार शारदा दळवी यांनी मौजे गुंज त. आसेगाव येथील मयतांच्या वारस, नातेवाईकांना प्रत्यक्ष भेटून त्यांचे सांत्वन केले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहचवल्या. त्यांना संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, घरकुल योजने अंतर्गत घरकुल योजनेचे लाभ, पुरवठा विभागातील शिधापत्रिका व स्वस्त धान्याबाबतचे लाभ, शिक्षणाशी संबंधित विविध प्रमाणपत्रांचे लाभ, व इतर अनुषंगीक प्राथमिक गरजा पूर्ण करणारे लाभ मिळवून देण्याबाबतची सर्व माहिती मयतांच्या वारसांना अथवा नातेवाईकांना जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिका-यांकडून देण्यात आली.

तहसीलदार श्रीमती दळवी यांच्याकडून दुर्घटनेतील मयतांच्या वारसांना शासकीय योजनेचे लाभ देण्याच्या उद्देशाने उद्या रविवार (दि.६) रोजी गुंज त. आसेगाव येथे विशेष सहाय्य योजनेच्या शिबाराचे आयोजन ही करण्यात आलेले आहे. त्यामध्ये निवासी नायब तहसीलदार वसमत, मंडळ अधिकारी, विभाग गिरगाव व ग्राम महसूल अधिकारी, पळसगाव त. माळवटा यांना आदेश देण्यात आले असल्याचे उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी कळविले आहे. 

***







 वृत्त क्रमांक 355

नांदेडचे बसस्थानक 12 एप्रिल पासून कौठा मैदानावर स्थलांतरीत होणार  

 नागरिकांनी, ऑटोचालकांनी नोंद घेण्याचे आवाहन  

नांदेड, दि. ५ एप्रिल :- नांदेडच्या बस स्थानकाला रेल्वे स्टेशन पासून जोडणारा मुख्य रस्ता दुरुस्त करण्यासाठी मर्यादित कालावधी करिता नांदेड बस स्टॅन्ड बंद करण्यात येत आहे. ते कौठा मैदानावर स्थानांतरीत करण्यात येत आहे,याची नागरिकांनी नोंद घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

या नव्या निर्णयानुसार 12 एप्रिल पासून जुने बसस्थानक रस्त्यासाठी बंद करण्यात येणार आहे. नागरिकांनी या निर्णयासाठी सहकार्य करावे व संबंधित यंत्रणेने ठरलेल्या वेळेच्या आधी रस्त्याचे काम पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. 

नांदेड रेल्वेस्थानक ते मध्यवर्ती बसस्थानक हा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. बराच काळाचा निर्णय प्रलंबित होता. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात दोन वेळा बैठका घेतल्या होत्या. 12 मार्च रोजी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी बसस्थानकाला प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर तातडीने हा निर्णय घेण्यात आलेला आहे.

यामुळे प्रवाशांना काही प्रमाणात असुविधा होऊ शकते. ऑटो चालकांनी या काळात प्रवाशांना मदत करावी. तसेच ऑटो चालक व अन्य प्रवासी वाहतुकीला आवश्यक पूरक व्यवस्था कौठा मैदान येथे निर्माण करण्यात येत आहे.

विशिष्ट कालमर्यादेत हे काम पूर्ण व्हावे, यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही लक्ष देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 मुख्य बसस्थानक येथील रस्त्यांच्या दुरूस्तीच्यावेळी ड्रेनेजलाईन, पाईपलाईन, फायबर केबल यासंदर्भातील सर्व अडथळे तातडीने दुरूस्त करण्याबाबत बैठकीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. 

 याशिवाय नव्या बसस्थानकाची तात्पुरती व्यवस्था होताना प्रवाशांची सुरक्षितता, तात्पुरते शौचालय, स्वच्छता गृहे व अन्य अनुषंगिक व्यवस्था तसेच वाहतुकीमध्ये होणाऱ्या बदलामुळे कि.मी. अंतरातील नवे टप्पे निश्चित करण्याचे काम सर्व संबंधित विभागाने वेळेच्या आत करावे, अशी सूचना त्यांनी दिली आहे. यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी, नांदेड तहसिलदार, आगार व्यवस्थापक, पोलीस वाहतुक शाखा, प्रादेशिक परिवहन विभाग व महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी आढावा घेऊन विक्रमी वेळेत हा रस्ता पूर्ण करावा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

0000

Friday, April 4, 2025

 वृत्त क्रमांक 354

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना

इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत प्रवेश 

नांदेड, दि. 4 एप्रिल :- अनुसुचित जमातीच्या (आदिवासी) विद्यार्थांना इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये सन 2025-2026 या वर्षात इयत्ता पहिली व दुसरी मध्ये प्रवेश देण्यासाठी अर्ज करण्याचा कालावधी 20 एप्रिल ते 10 मे 2025 पर्यंत राहिल. त्यानंतर येणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अटीची पुर्तता करत असलेल्या पालकांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवटचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी जेनित चन्द्रा दोन्तुला यांनी केले आहे. 

प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट जिल्हा नांदेड कार्यक्षेत्रातील अनुसुचित जमातीच्या (आदिवासी) विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळेत सन 2025-26 मध्ये इयत्ता पहिली व दुसरीमध्ये प्रवेश देण्यासाठी इच्छुक पालकांकडुन इंग्रजी माध्यम नामांकित निवासी शाळेत प्रवेश इयत्ता पहिली व दुसरीसाठी दिनांक 20 एप्रिल 2025 पासुन विद्यार्थ्यांचे अर्ज प्रकल्प कार्यालय किनवट (माहिती सेतु सुविधा केंद्र) व या कार्यालयातंर्गत असलेल्या सर्व शासकीय आश्रमशाळांवर विनामुल्य उपलब्ध आहेत. येथुन अर्ज प्राप्त करुन घ्यावे. अर्जासोबत पुढील कागदपत्राच्या अटी व शर्ती पुर्ण करुन परिपूर्ण अर्जच सादर करावेत. तसेच वरीष्ठ कार्यालयाकडुन मंजुरी दिलेल्या शाळांना व मंजुर संख्येनुसारच विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल. 

अर्जासोबत पुढील कागदपत्राच्या अटी व शर्ती पूर्ण करुन परिपूर्ण अर्ज सादर करावेत. सदर योजनेचा लाभ घेवू इच्छिणारा विद्यार्थी अनुसूचित जमातीच्या असावा. विद्यार्थ्याच्या पालकाचे/विद्यार्थ्याचे नावे सक्षम अधिकाऱ्याने दिलेल्या अनुसूचित जमातीच्या सांक्षांकित दाखल्याची प्रत जोडणे आवश्यक आहे. प्रवेश अर्जासोबत विद्यार्थ्यांचे जन्मतारखेचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. जर विद्यार्थी दारिद्ररेषेखालील असेल तर यादीतील अनु.क्रमांकासह मुळप्रमाणपत्राचे प्रत सादर करणे आवश्यक आहे. अन्यथा दारिद्र रेषेसाठी विचार केला जाणार नाही. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याच्या पालकाचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लक्ष इतके राहील. (तहसिलदार यांचे चालु वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र सोबत जोडावे). 

इयत्ता 1 ली मध्ये प्रवेश घेवु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याचे वय 6 वर्ष पुर्ण असावे. पालकाचे संमतीपत्र व विद्यार्थ्याचे दोन पासपोर्ट फोटो व जन्मतारखेचा दाखला (अंगणवाडी, ग्रामसेवक) यांच्या शिक्का व स्वाक्षरीसह जोडावा. विद्यार्थ्याचे वैद्यकीय पात्रता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. आदिम जमातीच्या विद्यार्थ्याची तसेच विधवा, घटस्फोट, निराधार, परितक्त्या व दारिद्र रेषेखालील अनुसूचित जमातीच्या पालकाचे विद्यार्थ्यांना प्राधान्याने प्रवेश दिले जाईल. घटस्फोटीत यांनी कार्यालयीन निवाडयाची प्रत सोबत जोडावी. 

विद्यार्थ्यांचे पालक शासकीय व निमशासकीय नोकरदार नसावेत. (नोकरदार नसल्याचे पालकांनी लेखी लिहुन द्यावी लागेल.) विद्यार्थ्याना वर्ग दुसरी प्रवेशासाठी शिक्षण घेत असलेल्या शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र सादर करावे. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याचे आधार कार्ड जोडणे आवश्यक आहे. अर्ज सादर करावयाचा दिनांक 20 एप्रिल 2025 ते अर्ज स्विकारण्याचा शेवट दिनांक 10 मे 2025 पर्यतच राहील त्यानंतर येणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. 

आवश्यक कागदपत्रे

अर्जदार विद्यार्थ्याचे नजिकच्या काळातील दोन पासपोर्ट साईज फोटो. पालकाचे रहिवासी प्रमाणपत्र. पालकाचे जातीचे प्रमाणपत्र. उत्पन्नाचा दाखला. अंगणवाडीचा दाखला (पहिली इयत्तेसाठी) / ग्रामसेवकाचा दाखला. इयत्ता दुसरी प्रवेशासाठी बोनाफाईड दाखला जोडणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याचा आधारकार्ड. विद्यार्थ्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र दारिद्ररेषेखालील असल्यासबाबतचा दाखला/ग्रामसेवक दाखला. महिला पालक विधवा/घटस्फोटीत/निराधार/परितक्त्या असल्यास ग्रामपंचायतीचा दाखला. ज्या शाळेमध्ये विद्यार्थ्याला प्रवेश मिळाले आहे त्याच शाळेमध्ये इयत्ता पहिली ते बारावी पर्यत शिक्षण घेत असल्याबाबत हमीपत्र.

याप्रमाणे प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट जिल्हा नांदेड या कार्यालयात व या कार्यालयातंर्गत असलेल्या सर्व शासकीय कार्यालयास अचुक माहिती भरुन अर्ज दिनांक 10 मे 2025 पर्यंत या कार्यालयात (माहिती सेतु सुविधा केंद्र) येथे सादर करण्यात यावे. 

या निकषामध्ये बसणाऱ्या अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्याना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण घेण्याकरिता या कार्यालयाकडुन अर्ज मागवुन विद्यार्थ्यांची निवड करुन, वरीष्ठ कार्यालयाकडुन प्रवेश देण्याबाबत शाळा नावाचे यादीसह आदेश प्राप्त होताच नामांकित निवासी शाळेत विद्यार्थ्याना प्रवेश देण्यात येईल, असेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवटचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी जेनित चन्द्रा दोन्तुला यांनी कळविले आहे.

00000

वृत्त क्रमांक 353

रायझिंग लाईफ इंटरप्राईजेस प्रा. लि. नांदेड विरूद्ध गुन्हा दाखल

गुंतवणूकदारांनी भाग्यनगर पोलीस स्टेशनला संपर्क साधण्याचे आवाहन 

नांदेड, दि. 4 एप्रिल :- येथील भाग्यनगर पोलीस स्टेशनमध्ये रायझिंग लाईफ इंटरप्राईजेस प्रा. लि. नांदेड विरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात या कंपनीमध्ये गुंतवणूक केलेल्या नागरीकांनी व साक्षीदारांनी तातडीने भाग्यनगर पोलीस स्टेशन नांदेड येथे संपर्क साधावा व आवश्यक ती माहिती उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक एम. एस. माळी यांनी केले आहे. 

हा गुन्हा गु.र.न 438/2024 कलम 420, 34 भा.द.वी सह कलम 3, 4, Maharastra Protection of Interest of Depositore act (MPID) प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस स्टेशन भाग्यनगर नांदेड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. 

0000

 वृत्त क्रमांक 352

रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नांदेडचे बसस्थानक

12 एप्रिल पासून कौठा मैदानावर स्थलांतरीत होणार   

नांदेड, दि. 4 एप्रिल :- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नांदेड मध्यवर्ती बसस्थानकाच्या रस्त्याच्या मार्ग निकाली काढला असून आता रस्त्याचे काम करण्यासाठी बसस्थानक तात्पुरत्या स्वरुपात कौठा मैदानावर स्थलांतरीत होणार आहे. या नव्या निर्णयानुसार 12 एप्रिल पासून जुने बसस्थानक रस्त्यासाठी बंद करण्यात येणार आहे. नागरिकांनी या निर्णयासाठी सहकार्य करावे व संबंधित यंत्रणेने ठरलेल्या वेळेच्या आधी रस्त्याचे काम पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. 

नांदेड रेल्वेस्थानक ते मध्यवर्ती बसस्थानक हा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील अनेक बैठकांमध्ये वेगवेगळ्या स्तरातील शिष्टमंडळाने याबाबत तक्रारी केल्या होत्या. हा निर्णय बराच काळाचा प्रलंबित होता. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात दोन वेळा बैठका घेतल्या होत्या. 12 मार्च रोजी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी बसस्थानकाला प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर तातडीने हा निर्णय घेण्यात आलेला आहे. 

यामुळे प्रवाशांना काही प्रमाणात असुविधा होऊ शकते. मात्र हा रस्ता तातडीने दुरूस्त करण्याचेही निर्देश त्यांनी दिलेले आहेत. विशिष्ट कालमर्यादेत हे काम पूर्ण व्हावे यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही लक्ष देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुख्य बसस्थानक येथील रस्त्यांच्या दुरूस्तीच्यावेळी ड्रेनेजलाईन, पाईपलाईन, फायबर केबल यासंदर्भातील सर्व अडथळे तातडीने दुरूस्त करण्याबाबत बैठकीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. 

महानगरपालिका आयुक्तांकडे या बदलामुळे अनेक जबाबदाऱ्या येणार असून त्यांनी तातडीने नागरिकांना पूर्ववत बसस्थानकातील सुविधा मिळावी यासाठी जातीने लक्ष वेधण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय नव्या बसस्थानकाची तात्पुरती व्यवस्था होताना प्रवाशांची सुरक्षितता, तात्पुरते शौचालय, स्वच्छता गृहे व अन्य अनुषंगिक व्यवस्था तसेच वाहतुकीमध्ये होणाऱ्या बदलामुळे कि.मी. अंतरातील नवे टप्पे निश्चित करण्याचे काम सर्व संबंधित विभागाने वेळेच्या आत करावे, अशी सूचना त्यांनी दिली आहे. यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी, नांदेड तहसिलदार, आगार व्यवस्थापक, पोलीस वाहतुक शाखा, प्रादेशिक परिवहन विभाग व महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी आढावा घेऊन विक्रमी वेळेत हा रस्ता पूर्ण करावा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

0000

वृत्त क्रमांक 351

आलेगाव येथे ट्रॅक्टर ट्रॉली विहिरीत पडल्याने

7 शेतमजूर महिलांचा मृत्यू तर 3 जखमी 

 •  प्रशासनाकडून तातडीचे मदत कार्य

•  प्रधानमंत्री व मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर  

नांदेड, दि. 4 एप्रिल :- नांदेड तालुक्यातील आलेगाव येथे आज सकाळी महिला मजुरांना घेऊन जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली विहिरीत पडून झालेल्या दुर्घटनेत 7 शेतमजुर महिलांचा मृत्यू झाला तर 3 शेतमजुर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेची प्रधानमंत्री व मुख्यमंत्री कार्यालयाने तातडीने नोंद घेतली आहे. प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. तसेच या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपयांचे अर्थसाहाय्य जाहीर करण्यात आले आहे.  

वसमत तालुक्यातील गुंज या गावातील 10 शेतमजुर नांदेड तालुक्यातील आलेगाव शिवारात शेत गट क्र 201 मध्ये भुईमुग निंदनीच्या कामासाठी ट्रॅक्टरने जात होते. या शेतात कडघरा नसलेल्या दगडोजी लक्ष्मण शिंदे यांच्या शेतात पाण्याने भरलेल्या विहिरीत ट्रॅक्टर हेड व ट्रॉली सहीत 10 मजुर आज सकाळी 7.30 वाजेच्या दरम्यान पडल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले आहे.  

या दुर्घटनेत जिवंत सुखरुप बाहेर काढण्यात आलेल्यामध्ये श्रीमती पार्वतीबाई रामा भुरड (वय 35), श्रीमती पुरभाबाई संतोष कांबळे (वय 40), सटवाजी जाधव (वय 55) या शेतमजुरांचा समावेश आहे. तर मृत्तांमध्ये श्रीमती ताराबाई सटवाजी जाधव (वय 35), धुरपता सटवाजी जाधव (वय 18), सिमरण संतोष कांबळे (वय 18), सरस्वती लखन भुरड (वय 25), श्रीमती चऊत्राबाई माधव पारधे (वय 45), श्रीमती सपना/मिना राजु राऊत (वय 25), श्रीमती ज्योती इरबाजी सरोदे (वय 30) या महिलांचा समावेश आहे.   

यावेळी पोलीस प्रशासन व नांदेड वाघाळा मनपाचे शोध व बचाव पथकाचे कर्मचारी, स्थानिक कर्मचारी व ग्रामस्थांच्या सहकार्याने सदर शोध व बचाव कार्य संपन्न झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताचे वृत्त ऐकूण तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला. तातडीच्या मदतीची घोषणा केली. मृत व्यक्तींच्या कुटुंबीयास मुख्यमंत्री सहायता निधीतून रुपये पाच लक्ष एवढे अर्थसहाय जाहीर केले. प्रधानमंत्री कार्यालयाने देखील या दुर्घटनेची त्वरेने दखल घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. सोबतच प्रधानमंत्री कार्यालयामार्फत प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृत्तांच्या कुटुंबियांना 2 लक्ष रुपये तर जखमींना 50 हजाराची मदत जाहीर करण्यात आली आहे. या घटनेने समाज मन हेलावून गेले आहे. मृत्त सात जणांमध्ये पाच महिला व दोन मुलींचा समावेश आहे. घटनाक्रम यासंदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत. 

सकाळी प्रशासनाला माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांच्या मार्गदर्शनानुसार नांदेड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, अतिरिक्त पोलीस अधिक्षक सुरज गुरव यांचे विशेष पथक, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, तहसिलदार संजय वारकड, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कुऱ्हे यांच्यासह महसूल विभागाचे क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी दुर्घटनेत शोध व बचाव कामासाठी तातडीने उपस्थित झाले होते.

 जिल्ह्याभरातील कठडे नसलेल्या विहिरींची नोंद करण्याचे आदेश 

आजच्या अपघातामध्ये सात निष्पाप जीवांचे बळी गेल्यामुळे अशा अपघात प्रवण किती विहिरी जिल्ह्यामध्ये आहेत त्यांचा शोध घेण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व संबंधित यंत्रणेला सूचना दिली आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली तसेच निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडतकर यांना या संदर्भात सर्व यंत्रणेकडून याबाबतचा अहवाल मागितला आहे. नागरिकांनी अशा धोकादायक रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरींबाबत सतर्कता बाळगावी व विहिरीचे मालक असणाऱ्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी अशा पद्धतीने दुर्घटना होणार नाही यासंदर्भात अडथळे उभारावेत अशी सूचनाही त्यांनी दिली आहे.

00000






 वृत्त क्रमांक 350

जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी पेन्शन अदालत 

नांदेड दि. 4 एप्रिल :- नांदेड जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणीचे निवारण करण्यासाठी एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी 8 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11 ते 1.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. सेवानिवृत्त झालेले अधिकारी कर्मचारी यांनी अडचणी निवारण्यासाठी पेन्शन अदालतीच्या दिवशी उपस्थितीत राहून तक्रारीचे निवेदन द्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.

0000

 वृत्त क्रमांक 349

उप अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयात 

भू-प्रणाम केंद्राचे महसूलमंत्र्याचे हस्ते उद्घाटन

नांदेड दि. 4 एप्रिल  :-  उप अधीक्षक भूमि अभिलेख नांदेड कार्यालयात भू-प्रणाम केंद्राचे उदघाटन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे हस्ते आज दुरदृश्यप्रणाली द्वारे करण्यात आले करण्यात आले. 

या भू- प्रणाम केंद्रात भूमि अभिलेख विभागाचे सर्व प्रकारचे नक्कला नागरिकांना वेळेत मिळतील. तसेच मोजणी अर्ज भरता येतील, त्यामुळे नागरिकांचा वेळ कमी होईल. अशा अनेक सुविधा या भु-मापन केंद्राद्वारे मिळतील. 

उदघाटन प्रसंगी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख श्रीमती सिमा देशमुख नांदेड, उप अधीक्षक भूमी अभिलेख बी व्ही मस्के व कार्यालयातील कर्मचारी  व इतर अधिकारी उपस्थित होते.

00000



Thursday, April 3, 2025

वृत्त क्रमांक 348

१०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिम नांदेड तहसीलचे नाविन्यपूर्ण उपक्रम 

 जिल्हाधिकाऱ्यांच्याहस्ते उद्घाटन ;अन्य कार्यलयांनाही सुधारणांचे आवाहन 

नांदेड दि. ३ एप्रिल : मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा उपक्रमामध्ये नांदेड जिल्ह्यातील नांदेड शहर तहसील कार्यालयाने नाविन्यपूर्ण उपक्रमात अनेक सुविधा डिजिटल केल्या आहेत. विविध ऑनलाईन प्रशासकीय सुविधा, ई -लायब्ररी, सायबर वॉल, तहसिल अॅप, प्रमाणपत्र सेवांचा आज जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याहस्ते शुभारंभ झाला.

 नांदेड शहरचे तहसीलदार संजय वारकड यांनी कल्पकतेने आपल्या टिमच्या मदतीने हा नाविन्यपूर्ण उपक्रम नांदेड तहसिल कार्यालयात साकारला आहे. नांदेडकर नागरिकांना आता या नव्या सुविधांचा वापर करता येणार असून या सुविधांचे लोकार्पण आज जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

आज शुभारंभ झालेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये .ई लायब्ररी . सायबर वॉल व सुकर जीवनमानमध्ये डिजिटल नांदेड तहसील ॲप, विविध प्रमाणपत्रासाठी लागणारे कागदपत्र व ऑनलाईन लिंक एका क्लिकवर जलद विनामूल्य प्रमाणपत्र सेवाचे उद्घाटन संपन्न झाले आहे. 

 ई लायब्ररीमध्ये तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर सुंदर पद्धतीने बॉक्स तयार करून त्यावर महसूल विषयक कायदे , वर्तमानपत्र स्थानिक वर्तमानपत्रासह मराठी, हिंदी ,इंग्रजी एकूण 46 वर्तमानपत्रे विनामूल्य वाचता येणार आहे. स्पर्धा परीक्षासाठी विविध पुस्तके, इतर कथा कादंबरी नाटके अशी 5000 पेक्षा जास्त पुस्तके विनामूल्य नागरिकांना वाचता तसेच ई-सरकारी नोकरीची जाहिरात व ऑनलाईन फॉर्म सुद्धा भरता येणार. हे सर्व आपल्या मोबाईलद्वारे क्यू आर कोड स्कॅन करून उपलब्ध होणार आहेत. 

तसेच आपण इंटरनेट वापरतो बँकिंग व्यवहार करतो परंतु, यामध्ये बऱ्याच नागरिकांची फसवणूक होते.त्यामध्ये आपण काय काळजी घ्यायला पाहिजे यासाठी तहसील कार्यालय नांदेड यांनी सायबर वॉलच्या माध्यमातून इंटरनेट सुरक्षेवरील मार्गदर्शन क्यू आर कोड द्वारे खालील बाबतीत उपलब्ध करून दिले आहे. यामध्ये प्रामुख्याने वायफाय सुरक्षा ,सिम क्लोनिंग, ई-मेल सुरक्षा, एटीएम सुरक्षा, आधार सक्षम पेमेंट इत्यादीचा समावेश आहे. 

तसेच नागरिकांची जीवन हे सुकर व्हावे यासाठी नांदेड तहसील कार्यालयाने डिजिटल नांदेड तहसील ॲप नागरिकांसाठी उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये क्यू आर कोड उपलब्ध करून दिला आहे. या किंवा पोर्टल द्वारे विविध शासकीय योजनांची माहिती आपल्याला मिळणार आहे. त्यामध्येच लिंक द्वारे आपल्याला फॉर्म सुद्धा भरता येणार आहे.

यामध्ये प्रामुख्याने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ,नमो शेतकरी सन्मान निधी योजना ,स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात योजना , ॲग्री स्टॅक, योजना ,जलयुक्त शिवार अभियान योजना ,सामाजिक सुरक्षाच्या योजना, जिवंत सातबारा योजना  इत्यादी योजनेचा समावेश आहे. 

तसेच विविध प्रमाणपत्रासाठी लागणारे कागदपत्रे व त्याच ठिकाणी ऑनलाइन अर्जदाराला फॉर्म भरण्यासाठी लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. हे सुद्धा क्यू आर कोडद्वारे सर्व जनतेस उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामध्ये उत्पन्न प्रमाणपत्र ,रहिवासी प्रमाणपत्र ,राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र ,जातीचे प्रमाणपत्र ,नॉन क्रिमिलियरचे प्रमाणपत्र इत्यादी प्रमाणपत्रांसाठी जनतेला उपयोग होणार आहे. काही अर्जदारांना तातडीने प्रमाणपत्र पाहिजे असते, परंतु आता आपल्याला तातडीने जरी प्रमाणपत्र पाहिजे असेल तर तहसील कार्यालयामध्ये येण्याची आवश्यकता राहणार नाही. अर्जदाराने फक्त किंवा क्यूआर कोड द्वारे जलद विनामूल्य प्रमाणपत्र सेवा अंतर्गत एक छोटासा क्यू आर कोड द्वारे फॉर्म भरायचा. अशा अर्जदाराला एक दिवसात प्रमाणपत्र दिले जाणार आहे. या सर्व नाविन्यपूर्ण उपक्रमाची दखल जिल्हाधिकारी महोदय यांनी घेऊन तहसीलदार नांदेड श्री. संजय वारकड व त्यांच्या टीमचे अभिनंदन केले आहे. 

मा.जिल्हाधिकारी महोदय यांनी तहसील कार्यालयामधील दिशादर्शक फलक, नागरिकांची सनद, अभिलेख शाखा, महसूल शाखा ,पुरवठा विभाग इत्यादी ठिकाणी भेट देऊन कर्मचाऱ्यांच्या जॉब चार्ट व बसण्याची व्यवस्था इत्यादीची पाहणी केली.  याप्रसंगी जिवंत सातबारा योजनेअंतर्गत प्राथमिक स्वरूपामध्ये पाच शेतकऱ्यांना नमुना नंबर 9ची नोटीस देण्यात आली, ॲग्री स्टॅकच्या पाच खातेदारांना फार्मर आयडी प्रमाणपत्र, जलद विनामूल्य प्रमाणपत्र सेवा अंतर्गत पाच प्रमाणपत्र, सायबर सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त झालेल्यां पाच कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र वाटप तसेच igot कर्मयोगी मधील कोर्स पूर्ण करणाऱ्या प्राथमिक स्वरूपात दोन कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र वाटप जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.

 यावेळी PPT द्वारे नांदेड तहसीलच्या वतीने 100 दिवसांमध्ये आज पर्यंत केलेल्या कामाचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमास गटविकास अधिकारी अमित राठोड, तालुका कृषी अधिकारी  चातरमल, स्वप्निल दिगलवार, इंद्रजीत गरड, काशिनाथ डांगे, संजय नागमवाड, सर्व नायब तसीलदार, देविदास जाधव, लक्ष्मण नरमवार,  सहाय्यक महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी नहनू कानगुले, स्वामी, रणवीरकर, सर्व कार्यालयीन कर्मचारी,मंडळ अधिकारी ,तलाठी, कोतवाल, नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन

 स्वप्निल दिगलवार  नायब तहसीलदार यांनी केले. आभार प्रदर्शन संजय वारकड तहसीलदार नांदेड यांनी केली.

00000









 वृत्त क्रमांक 347 

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू  

नांदेड दि. 3 एप्रिल : नांदेड जिल्ह्यात 2 एप्रिल सकाळी 6 वाजेपासून ते 16 एप्रिलच्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 2 एप्रिल सकाळी 6 वाजेपासून ते 16 एप्रिल 2025 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल.  

त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही. 

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

0000

 वृत्त क्रमांक 346 

महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित 

नांदेड दि. 3 एप्रिल : वीरशैव लिंगायत समाजातील सामाजिक, कलात्मक, समाज संघटनात्मक, अध्यात्मिक प्रबोधन व साहित्यिक क्षेत्रात काम करीत असणाऱ्या व्यक्ती व संस्थांनी महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिवा पुरस्कारासाठी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. 

इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे नांदेड येथील सहाय्यक संचालक शिवानंद मिनगिरे यांनी आज यासंदर्भात जारी केलेल्या पत्रकामध्ये महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिवा पुरस्कारासाठी नियमावली बाबतचा शासन निर्णय 8 मार्च 2019 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. या शासन निर्णयान्वये समाजातील वेगळ्या काम करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना हा पुरस्कार दिला जातो. त्यासाठी अर्ज करणे मात्र अनिवार्य असल्याचे स्पष्ट केले आहे. 

त्यामुळे या समाजातील जागरूक नागरिकांनी या समाजात वावरणाऱ्या अशा व्यक्तिमत्त्वाची व संस्थांची सन 2024-25 अशा रितसर अर्ज पुरस्कारासाठी सहायक संचालक  इतर मागास बहुजन कल्याण विभाग नांदेड यांच्याकडे बुधवार 9 एप्रिल 2025 पर्यंत विहित केलेल्या नमुन्यामध्ये कार्यालयीन वेळेत सादर करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. 

दि. 8 मार्च 2019 शासन निर्णयामध्ये सर्व माहिती उपलब्ध आहे. शासनाच्या वेबसाईटवर हा शासन निर्णय उपलब्ध आहे. ही माहिती शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. त्यामुळे समाजातील व्यक्ती व संस्थांनी मुदतीत 9 एप्रिल पर्यंत शासन पत्र 22 जुलै 2019 अन्वये विहित केलेल्या नमुन्यात रितसर अर्ज करावा. अर्जासोबत नियमाप्रमाणे आवश्यक व योग्य ती माहिती जोडावी, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

0000000

 

 

 वृत्त क्रमांक 345 

नांदेड शहरातील मोर्चे-रॅलीच्या मार्गात बदल

 

नांदेड दि. 3 एप्रिल :- नांदेड शहरात होणाऱ्या रॅली-मोर्चेच्या मार्गात जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 115, 116, 117 तसेच महाराष्‍ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33 मधील तरतुदीनुसार बदल केला आहे.

 

नांदेड शहरातील रॅलीमोर्चे इत्यादीसाठी महात्‍मा फुले चौक ते अण्‍णाभाऊ साठे चौक-हिंगोलीगेट ओव्‍हरब्रिज-गुरुगोविंदसिंहजी म्‍युझियमची उजवीबाजू-गर्ल्‍स हायस्‍कूल-जिल्‍हा न्‍यायालयाचे पाठीमागील बाजूने-शिवाजी महाराज पुतळा ते जिल्‍हाधिकारी कार्यालय हा पर्यायी मार्ग राहील.  

 

नांदेड शहरातील रॅलीमोर्चे इत्यादीसाठी प्रतिबंधीत करण्यात आलेला मार्ग महात्‍मा फुले पुतळाआय.टी.आय.चौक-फुले मार्केट चौक-कुसुमताई चौक-एस.टी.ओव्‍हरब्रिज-कलामंदीर-वजिराबाद चौक-शिवाजी महाराज पुतळा हा आहे.

00000

 वृत्त क्रमांक 344 

जिल्हा उद्योग केंद्रात निरुपयोगी सामानाची विक्री 

नांदेड दि. 3 एप्रिल :- जिल्हा उद्योग केंद्र नांदेड कार्यालयात जुने, निरुपयोगी व कालबाहय झालेली उपकरणे इत्यादी भंगार झालेल्या सामानांची विल्हेवाट लावण्यात येणार आहे. विल्हेवाट करावयाचे सामान हे कार्यालयात पडून असून सामानांची विक्री करण्यात येणार आहे. इच्छुकांनी कार्यालयात प्रत्यक्ष येवून सामानांची पाहणी करावी. 

विक्री करण्यात येणाऱ्या सदरच्या सामानाच्या पाहणीसाठी प्रत्यक्ष कार्यालयात सकाळी 11 ते सायं 5 वाजेपर्यंत हे निवेदन प्रसिद्ध झाल्यापासून सात दिवसाच्या मुदतीपर्यंत पाहता येईल. कार्यालयाचा पत्ता जिल्हा उद्योग केंद्र, पहिला मजला उद्योग भवन शिवाजीनगर नांदेड-431602 आहे. सदरील वेळेत येणाऱ्यांचा विचार केला जाईल तद्नंतर निविदा पद्धतीने सदर साहित्याची विक्री करण्यात येईल. सदरचे साहित्य जसे आहे तसे खरेदी करावे, उपकरणे हस्तांतरीत केल्यानंतर, उपकरणात काही दोष आढळल्यास हे कार्यालय त्यास जबाबदार राहणार नाही. वाहतूक, जकात इ. खर्च संबंधीतास करावा लागेल, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केले आहे.

00000

Wednesday, April 2, 2025

 वृत्त क्रमांक 343

मुख्यमंत्री 100 दिवस कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमांतर्गत  

AI चा प्रशासनात प्रभावीपणे वापर व सायबर सिक्युरिटी अवेअरनेसचे प्रशिक्षण संपन्न 

नांदेड, दि. २ एप्रिल :– तहसील कार्यालय नांदेड येथे  मुख्यमंत्री शंभर दिवस शासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रशासनामध्ये प्रभावीपणे वापर कसा करावा व कार्यालयीन काम सुकर करून जनतेची अधिकाधिक सेवा कशी करावी याबाबत सर्व तहसील कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले. 

यावेळी सर्व उपस्थित अधिकारी कर्मचारी यांना आपली ऑनलाइन फसवणूक होऊ नये यासाठी "Stay Safe Online / Cyber Hygiene" सायबर सुरक्षा जनजागृती आणि प्रशिक्षण देण्यात आले. या वेळी MyGov Campus Ambassador तथा महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान विभागाच्या तज्ज्ञांकडून सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटन तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी संजय वारकड यांच्या हस्ते झाले. मास्टर ट्रेनर दीपक सलगर यांनी सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण, डेटा सुरक्षा, ऑनलाईन फसवणूक आणि डिजिटल व्यवहारांसाठी आवश्यक उपाययोजनांवर महत्त्वपूर्ण माहिती दिली.

कार्यशाळेत Wi-Fi Security, Online Security, ATM Security, SIM Cloning, Aadhaar Payment Security, Cyber Bullying Protection यासारख्या विषयांवर सखोल चर्चा झाली.

तहसील कार्यालय नांदेड आता सायबर सिक्युरिटी अवेअर आणि सायबर हायजिन प्रमाणित कार्यालय बनले असून, हा उपक्रम सरकारी कार्यालयांसाठी आदर्श ठरेल. या प्रशिक्षणास स्वप्निल दिगलवार, काशिनाथ डांगे, इंद्रजीत गरुड, रवींद्र राठोड सर्व नायब तहसीलदार, देविदास जाधव इत्यादी सह सर्व कर्मचारी हजर होते.

0000





वृत्त क्रमांक 342 

कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष

ॲड निलेश हेलोंडे पाटील यांचा नांदेड दौरा  

नांदेड, दि. 2 एप्रिल :- कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) ॲड निलेश हेलोंडे पाटील हे नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.  

बुधवार 2 एप्रिल 2025 रोजी कळमनुरी येथून सायंकाळी 7.30 वा. विश्रामगृह नांदेड येथे आगमन व मुक्काम. गुरुवार 3 एप्रिल 2025 रोजी सकाळी 9.30 वा. लोहा येथे तहसिलदार लोहा यांनी निश्चित केलेल्या शेतकरी आत्महत्या प्रकरणात कुटूंबियास भेट. सकाळी 11 वा. कंधार ता. जि. नांदेड येथे तहसिलदार कंधार यांनी निश्चित केलेल्या शेतकरी आत्महत्या प्रकरणात कुटूंबियास भेट. दुपारी 12 वा. विश्रामभवन कंधार जि. नांदेड येथे आगमन व राखीव. दुपारी 12.45 वा. कंधार येथून यवतमाळकडे प्रयाण करतील.

00000

 वृत्त क्रमांक 341

नांदेडच्या सामाजिक सलोख्याच्या आदर्शला सण उत्सवाच्या काळात कायम ठेवा 

शांतता समितीमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांचे आवाहन 

नांदेड दि.२ एप्रिल : विविध सामाजिक उपक्रम, व धार्मिक उत्सवासाठी नांदेड शहर हे नावाजलेले आहे. सोबतच गेल्या काही वर्षात अन्य ठिकाणी काही घटना घडल्या तरी नांदेड शहराने आपला सामाजिक सलोखा कायम ठेवला आहे .एप्रिल महिन्यातील सर्व सण उत्सवामध्ये पुन्हा एकदा सर्व समाज बांधवांनी नांदेडचा नावलौकिक कायम ठेवावा,असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी आज येथे केले.

नांदेड येथे आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये श्री राम नवमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महावीर जयंती, हनुमान जयंती, गुड फ्रायडे, ईस्टर संडे व विविध सण उत्सवाच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्यासह महानगरपालिका पोलीस प्रशासन महसूल प्रशासन यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख तसेच शांतता समितीचे सदस्य तसेच विविध आयोजन समितीचे मान्यवर उपस्थित होते.

प्रामुख्याने सण उत्सवाच्या काळात महानगरपालिकेकडून स्वच्छता,दिवाबत्ती या संदर्भात पूर्तता व्हावी, रस्त्यांची डागडुजी करण्यात यावी, पाणीपुरवठा वेळेत व्हावा आदी मागण्या करण्यात आल्या.

जिल्हा पोलीस अधीक्षक तथा निवासी उपजिल्हाधिकारी यांनी शांतता समितीच्या बैठकीमध्ये मांडण्यात आलेल्या सर्व मागण्यांसंदर्भात सकारात्मक प्रयत्न करण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच यावेळी सामाजिक सलोखा कायम ठेवण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले.

00000





 


 


 





 

 वृत्त क्रमांक 340

मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांचा मुदखेड तालुक्यात दौरा

पंचायत समितीसह बारड, नागेली व डोंगरगावला भेट 

नांदेड, दि. १ एप्रिल : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी आज मुदखेड तालुक्यातील बारड, नागेली व डोंगरगाव येथे दौरा करुन ग्रामस्‍थाशी संवाद साधला. बारड येथे त्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रगतीचा आढावा घेतला सतेच घरकुल बांधकामाला गती देण्याच्या सूचना केल्या. यावेळी जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर विहीर तसेच 4 लाख 20 हजार लिटर क्षमतेच्या जलकुंभाची पाहणी केली. सध्या जुन्या योजनेतून पाणीपुरवठा होत असून, नव्याने सुरू झालेल्या योजनेव्‍दारे पाणीपुरवठा करण्याच्या सूचनाही मुख्‍य कार्यकारी अधिकारी मेघना कावली त्यांनी दिल्या.

ग्रामस्तरावर ओला व सुका कचरा विलगीकरणासाठी सेग्रीगेशन शेड उभारण्याचे तसेच गावातील स्वच्छता व्यवस्थापनासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्याचे निर्देशही मुख्‍य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी दिल्‍या. गावात स्‍वच्‍छतेसाठी जनजागृती वाढविण्यासाठी विशेष मोहिमा राबवाव्यात, असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी बारडच्या सरपंच मंगलताई बुरडे, उपसरपंच बाळासाहेब देशमुख बारडकर, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आर. डी. रावसाहेब, उप कार्यकारी अभियंता वाडीकर, वेरूळकर, ग्राम पंचायत अधिकारी अनुप श्रीवास्तव, कंत्राटदार काझी, दिगंबर टिप्परसे, भगवान पुयड आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वीयसहाय्यक शुभम तेलेवार उपस्थित होते.

पंचायत समितीला आकस्मिक भेट

मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी मुदखेड पंचायत समितीला अचानक भेट देऊन तेथील अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती व कामकाजाचा आढावा घेतला. प्रधानमंत्री आवास योजना तसेच अन्य योजनांच्या अंमलबजावणीची पाहणी करत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. यावेळी गटविकास अधिकारी एस. एच. बळदे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

00000






राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी आज संध्याकाळी साडेसात वाजता माहूर गडावरील रेणुका देवीचे दर्शन घेतले. माहूर येथून ते पुन्हा यवतमाळ जिल्ह्याती...