Monday, September 29, 2025

वृत्त क्रमांक 1030

एसडीआरएफच्या  सहाय्याने राहेगावात विद्युत, आरोग्य सुविधा उपलब्ध 

महसूल विभागाची मदत , ग्रामस्थ समाधानी 

नांदेड दि.२९ सप्टेंबर:- नांदेड  तालुक्यातील राहेगाव येथील पुलावर पाणी आल्यामुळे राहेगावचा संपर्क तुटला होता. एसडीआरएफच्या मदतीने दिनांक २८ सप्टेंबर रोजी गावात विद्युत व वैद्यकीय उपचाराची व्यवस्था महसूल विभागाने तातडीने उपलब्ध करून दिली. आमदार आनंदराव बोंढारकर,  नांदेडचे  उपविभागीय  अधिकारी डॉ.सचिन खल्लाळ , तहसीलदार संजय वारकड  यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या  मदत कार्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. 

 राहेगावच्या पुलावर पाणी आल्यामुळे एक दोन दिवस वगळता मागील दहा दिवसापासून संपर्क तुटला आहे. तसेच मागील तीन दिवसापासून गावात विद्युत व्यवस्था खोळंबली होती. तसेच गावातील लोकांना वैद्यकीय उपचाराचीही बाब विचारात घेऊन तहसीलदार संजय वारकड यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले , उपविभागीय  अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य आपत्ती प्रतिसाद दल (धुळे) यांचे पोलीस निरीक्षक प्रशांत राठोड व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रविण मुंडे यांच्याशी संपर्क साधून तात्काळ आवश्यक सूचना दिल्या. 

त्यानुसार एसडीआरएफच्या पथकाच्या साह्याने बोटीने विद्युत विभाग, वैद्यकीय पथक राहेगाव येथे पोहोचले. विद्युत विभागाच्या कर्मचारी यांनी गावात तीन दिवसापासून बंद असलेल्या विद्युत पुरवठा सुरू केला. तसेच वैद्यकीय पथकाने 102 रुग्णाची तपासणी करून औषधोपचार केले. महावितरणचे सहाय्यक अभियंता पी.पी. साखरे, वरिष्ठ तंत्रज्ञ तिरमले,  पतंगे यांनी विद्युत पुरवठा सुरळीत केला. वैद्यकीय विभागाचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. विवेक पदमने, डॉ. शेख हसन , आरोग्य सेविका शैख मुमताज, आरोग्य सेवक शैलेश वाघमारे, आरोग्य कर्मचारी बाळू घोडजकर यांनी वैद्यकीय सेवा दिली. सदरील मोहीम यशस्वी करण्यासाठी वाजेगाव व तुप्पा  महसूल मंडळाचे मंडळ अधिकारी प्रमोद बडवणे, ग्राम महसूल  अधिकारी गौतम पांढरे, राहेगावचे सरपंच विलास पाटील इंगळे, पोलीस पाटील प्रतिनिधी संजय पाटील इंगळे, किकीचे पोलीस पाटील गोविंद तेलंगे, आशाताई सुमित्रा इंगळे यांनी योगदान दिले.

0000












वृत्त क्रमांक 1029

धर्माबाद तालुक्यात एसडीआरएफ मार्फत पुरग्रस्तांचा यशस्वी बचाव

नांदेड,दि.२९ सप्टेंबर:- धर्माबाद तालुक्यातील गोदावरी नदी काठावरील अनेक गावांमध्ये बॅकवॉटरमुळे शेती पाण्याखाली गेली असून दिग्रस व चौंडी या गावांतील नागरिक पुराच्या पाण्यात अडकले होते. या परिस्थितीची तात्काळ दखल घेत  जिल्हाधिकारी राहुल कर्डिले साहेब यांनी राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF), धुळे यांना तत्काळ धर्माबादकडे रवाना होण्याचे आदेश दिले. आदेशानुसार एसडीआरएफ बचाव पथक आज सकाळपासून धर्माबाद येथे उपस्थित राहून कार्यवाही करत आहे.

दिग्रस गावात पुरात अडकलेल्या दिव्यांग, वृद्ध तसेच केवळ दोन महिन्यांच्या बाळासह आई व इतर नागरिक मिळून सुमारे 16 पुरपीडितांचा यशस्वी बचाव करण्यात आला. हे कार्य कमांडर प्रशांत राठोड, पोलीस निरीक्षक, राज्य आपत्ती प्रतिसाद दल तुकडी क्र. 3 यांच्या नेतृत्वाखाली, उपविभागीय अधिकारी धर्माबाद स्वाती दाभाडे व तहसीलदार सुरेखा स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष उपस्थितीत पार पडले.

यासोबतच चौंडी गावातील पाच पुरपीडित नागरिकांनाही शोध व बचाव कार्य करून सुरक्षित बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले आहे.

दरम्यान, गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी आणखी वाढण्याची शक्यता लक्षात घेता तालुक्यातील सर्व नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.

००००










वृत्त क्रमांक 1028 

अतिवृष्टी-पुरामुळे बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी मंजूर निधी वाटपास सुरुवात

शेतकऱ्यांनी नजिकच्या सेतू केंद्रावर ई-केवायसी पूर्ण करुन घ्यावी 

नांदेड, दि. 29 सप्टेंबर :- जिल्ह्यात ऑगस्ट 2025 या महिन्यात अतिवृष्टी, पुरामुळे पिक नुकसान झालेल्या व V.K. नंबर भेटलेल्या शेतकऱ्यांनी नजिकच्या सेतू सुविधा केंद्र, आपले सरकार केंद्रावर जाऊन ई-केवायसी पूर्ण करुन घ्यावी. जेणे करुन त्यांच्या खात्यावर शासनामार्फत डिबीटी पद्धतीने मदतीची रक्कम थेट जमा होईल, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

नांदेड जिल्ह्यात माहे ऑगस्ट 2025 मध्ये अतिवृष्टी व पुरामुळे 7 लाख 74 हजार 313 इतक्या शेतकऱ्यांचे ६,४८,५३३.२१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. त्याअनुषंगाने जिल्हा प्रशासनाने तातडीने पंचनामे करुन शासनास एकूण 553.34 कोटी रुपये मदत निधीची मागणी केली होती. ज्यानुसार शासनाने 18 सप्टेंबर 2025 रोजी जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी सदर निधी मंजुर केला आहे. 

ही मंजुर रक्कम बाधित शेतकरी यांना ऑनलाईन प्रणालीद्वारे वाटप करण्यात येणार असुन आता पर्यंत जिल्हयातील 3 लाख 10 हजार 126 इतक्या शेतकऱ्यांना 230 कोटी 46 लक्ष इतक्या रकमेचे वाटप करण्यासाठीची माहिती ऑनलाईन प्रणालीवर तहसील कार्यालयातून भरण्यात आली आहे. माहिती भरण्यात आलेल्या शेतकरी यांचे V.K. नंबर त्या गावचे तलाठी यांच्यामार्फत गावात प्रसिध्द करण्यात आली आहे व येत आहे. सदर V.K. नंबरद्वारे सेतू सुविधा केंद्रावर जाऊन ई-केवायसी पूर्ण करणाऱ्या शेतकरी यांचे खात्यावर थेट मदतीची रक्कम डिबीटी पद्धतीने जमा होणार आहे. उर्वरीत शेतकऱ्यांची माहिती पुढील 4 ते 5 दिवसात भरण्यात येणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिली आहे.

0000

 


वृत्त क्रमांक 1027

जिल्हाधिकारी कार्यालयात माहिती अधिकार दिन मोठ्या उत्साहात साजरा

नांदेड, दि. २९ सप्टेंबर:- महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक केमाअ-2008/प्र.क्र.378/08/सहा, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई दि. 20.09.2008 अन्वये माहिती अधिकार अधिनियम 2005 या कायद्याची व्यापक प्रसारप्रसिद्धी व प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी दरवर्षी 28 सप्टेंबर हा दिवस राज्यस्तरावर “माहिती अधिकार दिन” म्हणून साजरा करण्यात येतो.

आंतरराष्ट्रीय माहितीचा अधिकार दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित प्रशिक्षण कार्यशाळेत माहिती अधिकार कायदा अभ्यासक व अधिवक्ता डॉ. भीमराव हाटकर यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या प्रतिपादनात अधोरेखित केले की, माहिती अधिकार अधिनियमांतर्गत प्राप्त अर्जांची कार्यवाही अधिकारी व कर्मचारी यांनी संवेदनशीलता, पारदर्शकता व तत्परतेने करणे अत्यावश्यक आहे.

माहिती अधिकार कायद्याच्या माध्यमातून सामान्य नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर दरवर्षी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. यावर्षी 28 सप्टेंबर रोजी शासकीय सुट्टी असल्याने शासन निर्देशानुसार सोमवार, दि. 29 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात माहिती अधिकार दिन साजरा करण्यात आला.

डॉ. हाटकर यांनी माहिती अधिकार कायद्याची निर्मिती, वेळोवेळी झालेले दुरुस्त्या, तसेच त्यानुषंगाने समाजमन व प्रशासकीय घटकांच्या मानसिकतेतील बदल याविषयी सविस्तर माहिती दिली. माहितीचा अधिकार हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार असून, त्याचा सन्मान राखत अधिकारी-कर्मचारी यांनी कर्तव्यभावनेने अर्ज हाताळावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

कार्यशाळेनंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी अजय शिंदे, तहसीलदार शंकर लाड, तहसीलदार विकास बिरादार, नायब तहसीलदार जया अन्नमवार, विधी अधिकारी आनंद माळाकोळीकर यांच्यासह विविध संवर्गातील अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000





वृत्त क्रमांक 1026

शासनमान्य ग्रंथांच्या यादीत समावेशासाठी  15 ऑक्टोबरपर्यत प्रथम आवृत्ती पाठविण्याचे आवाहन                                                                                                                                                                                            नांदेड दि. 29 सप्टेंबर :- शासनमान्य ग्रंथाची यादीसाठी सन 2024 यावर्षासाठी कॅलेडर वर्ष 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2024 मध्ये प्रकाशित झालेल्या मराठी भाषेतील ग्रंथाची निवड करण्यासाठी आणि शासनमान्य ग्रंथांच्या यादीत समावेश होण्याच्या दृष्टीने प्रथम आवृत्ती असलेल्या ग्रंथाची प्रत्येकी एक प्रत विनामुल्य ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, नगर भवन, टाऊन हॉल, मुंबई-400 001 यांच्याकडे 15 ऑक्टोबर 2025 पर्यत पाठविण्यात यावी असे आवाहन ग्रंथालय संचालक अशोक मा. गाडेकर यांनी केले आहे.

तसेच सन 2024 या वर्षात प्रकाशित झालेले ग्रंथ जर यापूर्वी संचालनालयास पाठविले असल्यास पुन्हा पाठविण्याची आवश्यकता नाही. सदर निवेदन महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in व ग्रंथालय संचालनालयाच्या www.dol.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ठेवण्यात आले आहे. 

00000

पत्रकार परिषद निमंत्रण 

ई-मेल संदेश दि. 29 सप्टेंबर, 2025 

प्रति ,

मा. संपादक / प्रतिनिधी

दैनिक वृत्त पत्र / दूरचित्रवाणी / इलेक्ट्रॉनिक मिडीया    

नांदेड जिल्हा 

महोदय, 

05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ मतदार नोंदणी कार्यक्रमाच्या अनुषंगाने मा. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची उद्या मंगळवार 30.09.2025 रोजी दु. ४ वा.जिल्हाधिकारी कार्यालय येथील बैठक कक्षात पत्रकार परिषद आयोजित केली आहे.  

तरी कृपया, आपण या पत्रकार परिषदेस उपस्थित रहावे, ही विनंती.   

पत्रकार परिषद दिनांक :-    30.09.2025(मंगळवार)

वेळ                          :-   दुपारी 4.00 वा.

स्थळ                        :- जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड 

   

प्र. जिल्हा माहिती अधिकारी,

            नांदेड

एक हात मदतीचा पूरग्रस्त महाराष्ट्रासाठी

भारतातील शेती ही प्रामुख्याने पावसावर अवलंबून आहे. पावसाळा हा शेतकऱ्यांसाठी आशेचा ऋतू असतो, पण त्याच पावसाचे रौद्ररूप धरणीमातेवर संकट कोसळवते. राज्यात यावर्षी अनेक जिल्ह्यांमध्ये नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत, खेडी पाण्याखाली गेलीत, शेतमाल व जनावरांचे प्रचंड नुकसान झाले. या आपत्तीमुळे शेतकरी आणि त्यांची कुटुंबे मानसिक, आर्थिक व सामाजिक अडचणीत सापडली आहेत.

पूरस्थितीत शेतकऱ्यांची स्थिती

1. शेतीचे नुकसान – पिके पाण्याखाली गेल्याने हंगामभराचे श्रम वाया गेलेत.

2. जनावरांचा बळी – गायी, म्हशी, बकऱ्या, बैल यांचे जीवित वाचवणे कठीण झालेले आहे.

3. घरांची पडझड – मातीची घरे, झोपड्या वाहून गेलीत, अनेक कुटुंब बेघर झालेत. 

4. आरोग्य धोक्यात – पूरपाण्यामुळे, दूषित पाणी यामुळे साथीचे रोग पसरण्याची संभावना नाकारता येत नाही.

5. मानसिक ताण – उदरनिर्वाहाचे साधन नष्ट झाल्यामुळे शेतकरी नैराश्यच्या विळख्यात सापडण्याची  शक्यता नाकारता येत नाही.  

वृत्त क्रमांक 1025

मुख्यमंत्री सहायता निधी — आशेचा किरण

नांदेड, २९ सप्टेंबर:- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांनी  आपत्तीग्रस्तांना तसेच दुर्बल घटकांना तातडीची मदत देण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीची व्याप्ती वाढवलेली आहे. 

महाराष्ट्र राज्यातील आपत्तीग्रस्तांना तातडीने सहाय्यता देणे, हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे उद्दिष्ट आहे. पूर, दुष्काळ, आगीमुळे होणारे अपघात अशा मोठ्या नैसर्गिक आपत्तींमुळे बाधीत नागरिकांना “मुख्यमंत्री सहाय्यता निधी” मार्फत अर्थसहाय्य पुरविले जाते. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दुर्धर आजारांवर उपचार करण्यासाठीही या निधीतून अर्थसहाय्य पुरविले जाते.

समाजाची सामूहिक जबाबदारी:

फक्त शासनाची मदत पुरेशी ठरत नाही. पूरस्थिती हा संपूर्ण समाजाचा प्रश्न आहे.

सामान्य नागरिक – आपल्याला शक्य तितक्या प्रमाणात आर्थिक मदत करावी.

उद्योगपती व व्यापारी वर्ग – यांनी  मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून द्यावा.

सामाजिक संस्था व स्वयंसेवी संघटना – पूरग्रस्त भागात जाऊन प्रत्यक्ष मदत करावी.

विद्यार्थी व युवक मंडळे – कपडे, औषधे, अन्नधान्य संकलन मोहिमा राबवावी.

योगदान कसे द्यावे?

1. ऑनलाईन योगदान – मुख्यमंत्री सहायता निधीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन योगदान द्यावे.  www.cmrf.maharashtra.gov.in 

2. धनादेश – Chief Ministers Relief Fund

 Account No 10972433751 IFSC Code SBIN0000300 

3. वस्तुरूपात मदत – अन्नधान्य, औषधे, कपडे, चारा इत्यादी.

4. स्वयंसेवा – बचाव व पुनर्वसन कार्यात प्रत्यक्ष सहभाग.

मदत का आवश्यक आहे?

शेतकरी व कुटुंबियांच्या जगण्याला आधार देण्यासाठी. 

पिके, घरे व जनावरांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी. 

गावोगावी शिक्षण व आरोग्यसेवा पुन्हा उभारण्यासाठी. 

पूरबाधित नागरिकांचा मानसिक आधार व आत्मविश्वास वाढविण्यासाठी. 

     पूरग्रस्त शेतकरी आज अडचणीत आहे. आपल्या कष्टाने तोच समाजाला अन्नधान्य पुरवतो, पण आपत्तीच्या वेळी त्याच्या घरात उपासमारीची वेळ येते. म्हणूनच मुख्यमंत्री सहायता निधी हा केवळ सरकारी उपक्रम नसून समाजाच्या सहभागाचा आधारस्तंभ आहे.

“शेतकऱ्यांचे दुःख कमी करण्यासाठी दिलेली मदत ही केवळ देणगी नसून भविष्यातील समाजाला उभारण्याचे कार्य आहे.” आपण सर्वांनी या कार्यात हातभार लावणे हीच खरी देशसेवा आहे.

अधिक माहितीसाठी जिल्हास्तरीय कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे किंवा टोल फ्री क्रमांक 18001232211 येथे संपर्क साधावा..

 गजानन वानखेडे

समाजसेवा अधीक्षक (वै) मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड

मो.न. ९९२१९८६०४७





वृत्त क्रमांक 1024 २८ सप्टेंबर 2025

पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक दिवसांचे वेतन

महसूल व जिल्हा परिषद अधिकारी- कर्मचारी यांचा निर्णय

नांदेड, २८ सप्टेंबर:- ऑगस्ट व सप्टेंबर २०२५ महिन्यातील भीषण पुरामुळे नांदेड जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे व शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या संकटाच्या काळात शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी वर्गाला केले होते.

या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत नांदेड जिल्ह्यातील महसूल विभागातील महाराष्ट्र राज्य तहसिलदार, नायब तहसिलदार संघटना (जिल्हा नांदेड), महाराष्ट्र राज्य तलाठी संघ (राज्यस्तरावरून) तसेच महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना (जिल्हा) यांचे अधिकारी व कर्मचारी यांनी आपला एक दिवसाचा वेतन शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.

तसेच जिल्हा परिषद, नांदेड येथील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनीही जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मेघना कावली यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत बाधितांना मदत म्हणून एक दिवसाचे वेतन शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.

सदर जमा होणारा निधी मा. मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये जमा करण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी दिली आहे.



 

वृत्त क्रमांक 1023 २८ सप्टेंबर 2025

भालकी येथे २४ नागरिकांचा थरारक बचाव

नांदेड, दि.२८ सप्टेंबर:- : नांदेड तालुक्यातील भालकी परिसरात सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे आसना नदी व नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला. या पुराच्या पाण्यामुळे मौजे भालकी शिवारातील शेतांमधील आखाड्यावर तब्बल २४ नागरिक अडकून पडले होते. त्यामध्ये ३ लहान मुले, ८ महिला आणि १३ पुरुष यांचा समावेश होता.

घटनेची माहिती प्रशासनाला मिळताच माननीय उपविभागीय अधिकारी सचिन खल्लाळ व  तहसीलदार संजय वारकड यांनी प्रसंगावधान दाखवत तातडीने एसडीआरएफ (State Disaster Response Force) पथकाला संपर्क केला. तात्काळ दोन बोटींसह एसडीआरएफचे जवान घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक प्रशासन व ग्रामस्थांच्या मदतीने रात्री उशिरा अंधारात तब्बल दहा वाजेपर्यंत चाललेल्या थरारक रेस्क्यू ऑपरेशननंतर सर्व २४ नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. या प्रसंगी आमदार बालाजी कल्याणकर हे देखील घटनास्थळी उपस्थित होते.

बचावकार्य संपल्यानंतर सर्व नागरिकांना सुरक्षित निवारा केंद्रावर नेण्यात आले. तेथे त्यांच्यासाठी जेवण व झोपण्याची योग्य सोय प्रशासनाच्यावतीने करण्यात आली.

या धाडसी बचावकार्यात एसडीआरएफ पथकासोबत स्थानिक अधिकारी व ग्रामस्थांनीही सक्रिय सहभाग नोंदविला. यामध्ये मंडळ अधिकारी तरोडा शिवानंद स्वामी, मंडळ अधिकारी कुणाल जगताप, तलाठी गोपीनाथ कल्याणकर, अविनाश करंदीकर, कृषी सहाय्यक वसंत जारिकोटे, तसेच प्रभाकर शेजुळे (सरपंच चिखली बुद्रुक), राजू धाडवे (सरपंच भालकी), गणेश धाडवे, लक्ष्मण कल्याणकर व समस्त गावकऱ्यांनी मोठी मदत केली.

प्रशासनाच्या तात्काळ प्रतिसादामुळे आणि ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे मोठा अनर्थ टळला आहे.

०००००



मौजे बोंढार तर्फे नेरली (ता. नांदेड) येथे मागील आठ दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसाने आसना नदीला आलेल्या पुरामुळे रामराव गोपाळराव शिंदे (हळदेकर) यांच्या शेतातील फार्मवर सहा नागरिक अडकून पडले होते. स्थानिक प्रशासन व ग्रामस्थांनी दाखवलेल्या धाडसामुळे अखेर सर्वांचा थरारक बचाव करण्यात यश आले.

अडकलेल्यांमध्ये व्यंकट दत्ता वरपडे (40), छाया व्यंकट वरपडे (35), संस्कृती व्यंकट वरपडे (13), दिगंबर बाजीराव पाथरपल्ले (55), सुमनबाई दिगंबर पाथरपल्ले (40) व बाजीराव दिगंबर पाथरपल्ले (21) यांचा समावेश होता.

बचावासाठी तलाठी डी. एम. पाटील व रामराव गोपाळराव शिंदे (हळदेकर) यांनी स्वतः पाण्यात उतरून रसीच्या सहाय्याने, तसेच गावकऱ्यांच्या मदतीने प्रयत्न केले. ग्रामस्थांनी दाखवलेल्या एकजुटीमुळे अखेर सर्व नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेमुळे स्थानिक प्रशासन व ग्रामस्थांचे धाडस तसेच तत्परता अधोरेखित झाली आहे.


वृत्त क्रमांक 1022 २८ सप्टेंबर 2025

 प्रशासन व स्थानिक नागरिकांच्या मदतीने मौजे बोंढार तर्फे नेरली येथील सहा नागरिकांचा बचाव 

नांदेड, दि. २८ सप्टेंबर:- नांदेड तालुक्यातील मौजे बोंढार तर्फे नेरली येथे मागील आठ दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसाने आसना नदीला आलेल्या पुरामुळे रामराव गोपाळराव शिंदे (हळदेकर) यांच्या शेतातील फार्मवर सहा नागरिक अडकून पडले होते. स्थानिक प्रशासन व ग्रामस्थांनी दाखवलेल्या धाडसामुळे अखेर सर्वांचा थरारक बचाव करण्यात यश आले.

अडकलेल्यांमध्ये व्यंकट दत्ता वरपडे (40), छाया व्यंकट वरपडे (35), संस्कृती व्यंकट वरपडे (13), दिगंबर बाजीराव पाथरपल्ले (55), सुमनबाई दिगंबर पाथरपल्ले (40) व बाजीराव दिगंबर पाथरपल्ले (21) यांचा समावेश होता.

बचावासाठी तलाठी डी. एम. पाटील व रामराव गोपाळराव शिंदे (हळदेकर) यांनी स्वतः पाण्यात उतरून रसीच्या सहाय्याने, तसेच गावकऱ्यांच्या मदतीने प्रयत्न केले. ग्रामस्थांनी दाखवलेल्या एकजुटीमुळे अखेर सर्व नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेमुळे स्थानिक प्रशासन व ग्रामस्थांचे धाडस तसेच तत्परता अधोरेखित झाली आहे.

0000

वृत्त क्रमांक 1021 २८ सप्टेंबर 2025

२८ व ३० सप्टेंबर व १ व २ ऑक्टोबर रोजी यलो अलर्ट जारी 

नांदेड, २८ सप्टेंबर:- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी  २८ सप्टेंबर रोजी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी २८ व ३० सप्टेंबर तसेच ०१ व ०२ ऑक्टोबर २०२५ या चार दिवसांसाठी यलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे. २८ सप्टेंबर २०२५ या दिवशी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार स्वरूपाचा व ३० सप्टेंबर २०२५ तसेच ०१ व ०२ ऑक्टोबर २०२५ हे तीन दिवस जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी. असे आवाहन जिल्हाप्रशासनाने केले आहे.

या गोष्टी करा :

१) विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा.

२) आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका.

३) आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा.

४) तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा.

५) पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.

या गोष्टी करु नका: 

१) आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका.

२) विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका.

३) उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका.

४) धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका.

५) जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.

000

 प्रेस-नोट

दिनांक :- २८.०९.२०२५

महापालिका आयुक्तांनी दिल्या पुरग्रस्त भागांना व निवारा केंद्रांना भेटी

मागील दोन दिवसात महपालिकने केले ९७० पुरग्रस्तांचे स्थलांतर

शोध व बचाव कार्यामध्ये अग्निशमन अधिकारी के.जी.दासरे व त्यांच्या टीमचे धाड़सी कार्य

नांदेड,२८ :- नांदेड शहरात सुरु असलेल्या मुसळधार पावसाने शहरातील जनजिवन विस्कळीत झाले असुन नागरीकांच्या मदतीला मनपा प्रशासन धावुन जाऊन मागील दोन दिवसापासुन मतदकार्य करीत आहे. याच पार्श्वभुमीवर मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी दिनांक २८.०९.२०२५ रोजी शहरातील सखल भागातील विविध पुरग्रस्त भागांना व महापालिकेने स्थापित केलेल्या निवारा केंद्रांना भेटी देऊन व्यवस्थेची पाहणी केली आहे.

यावेळी आयुक्तांनी शहरातील नदीपात्रालगत व सखल भागात पाणी शिरल्याने महानगरपालिकेच्या वतीने पाण्याचा निचरा करण्याची प्रक्रिया व नागरीकांच्या स्थलांतरीत प्रक्रियेची पाहणी केली. याचबरोबर आयुक्तांनी महापालिकेने स्थापित केलेल्या तात्पुरत्या निवारण केंद्रास भेट देऊन नागरीकांची विचारपुस केली. मागील दोन दिवसांत महापालिका प्रशासनामार्फत एकुण ९७० नागरीकांना स्थलांतरीत करुन सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. शोध व बचाव कार्यामध्ये महापालिकेच्या अग्निशमन विभागातील अधिकारी के.जी.दासरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष कार्य पार पाडले आहे. निवारा केंद्रात आश्रय घेतलेल्या नागरीकांना महापालिकेतर्फे जेवण, पिण्याचे पाणी इत्यादी जिवणावश्यक वस्तु पुरविण्यात येत असुन सदरील ठिकाणी आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छता, फवारणी, प्राथमिक आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. याचाच आढावा आयुक्तांनी प्रत्यक्ष निवारा केंद्रास भेट देऊन घेतला आहे. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त स.अजितपालसिंघ संधु, नितीन गाढवे, निलेश सुंकेवार, शहर अभियंता सुमंत पाटील, क्षेत्रिय अधिकारी गौतम कवडे यांची उपस्थित होते.

या भेटीदरम्यान मनपा आयुक्तांनी एनटीसी मिलएरिया, पाकीजा फंक्शन हॉल, लिबर्टी फंक्शन हॉल, आणि नंदगिरी किल्ला या निवारा केंद्रांना भेट दिली. महापालिकेच्या निवारा केंद्रावर आश्रय घेतलेल्या आयुक्तांनी पुरग्रस्त भागातील नागरीकांशी संवाद साधुन महापालिका प्रशासन आपणास हवी ती मदत करण्यास तत्पर असल्याचे आश्वासन देऊन आयुक्तांनी नागरीकांना धीर देण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे पुराचे पाणी ओसरेपर्यंत निवारा केंद्र कोणत्याही परिस्थितीत न सोडण्याचे आवाहन यावेळी आयुक्तांनी केले तसेच निवरा केंद्र परिसरामध्ये प्रकाश व्यवस्था, साफ-सफाई, फवारणी, इत्यादी बाबींची चोख व्यवस्था ठेवून या सर्व बाबींचे वेळापत्रक काटेकोरपणे पाळले जाईल याची दक्षता घेण्याबाबत सर्व क्षेत्रिय अधिकाऱ्यांना आदेशित केले. यावेळी नागरिकांनी महापालिकेमार्फत पुरविन्यात येणाऱ्या सुविधे बाबत समाधान व्यक्त केले आहे.

याप्रसंगी पत्रकारांशी संवाद साधताना आयुक्तांनी नदीने 351 मीटरची इशारा पातळीवर ओलांडून 354.89 मीटर ही पातळी सध्या गाठली असून पुढील 24 तास हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता असल्याने नदी लगतच्या नागरिकांनी कुठलाही विलंब न करता तात्काळ जवळच्या निवारा केंद्रात स्थलांतरित व्हावे असे आवाहन यावेळी मनपा आयुक्तांनी केले आहे. त्याचप्रमाणे नागरीकांनी शहरात उदभवलेल्या पुरजन्य परिस्थितीत घाबरुन न जाता मदतीसाठी महानगरपालिकेच्या आपत्ती शाखेला किंवा जवळच्या क्षेत्रिय कार्यालयास संपर्क साधण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

000

जनसंपर्क विभाग,

नां.वा.श.म.न.पा.नांदेड









28.9.2025

नांदेड : 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नांदेड जिल्हाधिकार्‍यांकडून नांदेड जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला.

- नांदेड जिल्ह्यात 27 सप्टेंबर रोजी 23, तर 28 सप्टेंबर रोजी 13 मंडळात अतिवृष्टी झाली. गोदावरी, मांजरा, मन्याड नद्यांच्या लाभक्षेत्रात पूरस्थिती निर्माण झाली. 67 लोकांना सुरक्षित वाचवण्यात आले आहे.

- नांदेडमध्ये 304 आणि लोहामध्ये 120 लोकांना मदत शिबिरात ठेवण्यात आले असून, त्यांना सर्व सुविधा पुरविण्यात येत आहेत. एकूण 16 मदत शिबिरे तयार करण्यात आली आहेत. 56 घरांची पडझड झाली असून, त्यांना तातडीने मदत देण्याची कार्यवाही सुरु आहे.

#Maharashtra #Marathwada #Nanded

https://x.com/cmomaharashtra/status/1972234529793520113?s=46&t=S0m9fgIBggcpst3bZGqn1g

28.9.2025

 



27.9.2025

 https://whatsapp.com/channel/0029VbBE21fK5cDNHN4yjv2C/1221

नांदेड येथे पाऊस, पुर पर‍िस्‍थ‍िती बाबत अदयावत व अध‍िकृत माहिती करीता सदर व्‍हॉट्स अप चॅनेलला फॉलो करावे व सर्वाना चॅनेलला फॉलो करण्‍यास कळवावे..... कोणत्‍याही अफवावर व‍िश्‍वासु ठेवू नये.



 प्रेस-नोट

दिनांक २७.०९.२०२५

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शहरात उद्भवलेल्या पूर परिस्थितीसाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज

क्षेत्रिय कार्यालय निहाय उपायुक्त संवर्गातील अधिकाऱ्यांची नियंत्रण अधिकारी म्हणुन नियुक्ती

१५ निवारा केंद्रात ३०४ नागरिक स्थलांतरित तर २१ नागरिकांचा पुराच्या पाण्यातुन केला बचाव

अग्निशमन विभागामार्फत नागरिकांचे बचाव व शोध कार्य युद्ध पातळीवर सुरू

नांदेड, २७ :- हवामान खात्याने दि. २७.०९.२०२५ रोजी नांदेड जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिला होता. तथापी काल दिनांक २६.०९.२०२५ रोजी रात्रीपासून शहरात व परिसरात सतत मुसळधार पाऊस होत आहे. गोदावरी नदीच्या वरच्या भागातून सुद्धा पावसाचे पाणी विष्णुपुरी धरणामध्ये येत असल्यामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात होत असल्याने नांदेड शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली या पार्श्वभूमीवर महापालिकेचे यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून नागरिकांना पूर परिस्थितीमध्ये उद्भवणाऱ्या परिस्थितीवर महापालिका प्रशासन लक्ष ठेवून आहे.

सद्यस्थितीत विष्णुपुरी धरणाचे 16 दरवाजे उघडे असून सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत 2,50,000 क्युसेक च्या प्रवाहाने पाणी नदीपात्रात सोडण्यात येत असुन नदीची पाणी पातळी सद्यस्थितीत 352.53 मिटर इतकी आहे. तथापी धरणात पाण्याची आवक व मुसळधार पाऊस पाहता आज रात्री पर्यंत 3,00,000 क्यूसेक इतक्या प्रवाहाने धरणातून पाणी सोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोदावरी नदी 351 मीटर इशारा पातळी ओलांडल्यानंतर 354 मीटर धोका पातळी ओलांडण्याची दाट शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी परिस्थितीचा तात्काळ आढावा घेऊन मनपा सर्व यंत्रणांना सजग आणि सुसज्ज राहण्यासाठी आदेशित केले आहे. त्याचप्रमाणे सर्व संबंधित क्षेत्रिय अधिकारी यांना आपण व सर्व टीम सतर्क ठेवण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.

महापालिका आयुक्तांनी परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर बाधित क्षेत्रामध्ये नागरिकांना सतर्कतेबाबत तात्काळ आवाहन करून, नदीकाठी असलेल्या मनपा हद्दीतील खडकपुरा, दुल्हेशाह रहेमान नगर, जी.एम.कॉलनी, गाडीपुरा कालापुल परीसर, गंगाचाळ, भिमघाट, नावघाट मल्ली परीसर, बिलाल नगर, पाकीजा नगर, शंकर नगर, वसरणी इत्यादी सखल भागातील नाल्याकाठच्या वस्त्यांमध्ये परत नदीचे पाणी शिरत असल्याकारणाने बाधित नागरिकांना स्थलांतरित करण्यासाठी कार्यान्वित केलेली  निवारा केंद्र सुरू ठेवण्याच्या व आवश्यकतेनुसार केंद्रांच्या संख्येत वाढ करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. निवारा केंद्रांवर अन्न,पाणी व इतर आवश्यक बाबी,वैद्यकीय सुविधा तसेच प्रकाश व्यवस्था करण्यासाठी संबंधित विभागांना आदेशित करण्यात आले आहे.

काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार व संततधार पावसामुळे श्रावस्ती नगर,चुनाल नाला, तेहरा नगर, MR कॉलोनी, भिमसंदेश कॉलोनी, पंचशील नगर, व आजू बाजूच्या परीसात मोठ्या प्रमाणात पाणी गेले असून परिस्थिती अजून बिकट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदर ठिकाणी शोध व बचाव कार्य करण्याची आवश्यकता पडू शकते. त्यामुळे अग्निशमन विभागासोबत ( DRF पथक) शोध व बचाव कार्य करणेसाठी 20 जीवरक्षकांची टीम सज्ज ठेवण्यात आली आहे. तसेच नावघाट पूल परत पाण्याखाली गेल्यामुळे दोन्ही बाजूने बॅरिकेटिंग लाऊन वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे. व सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सदर ठिकाणी जीवरक्षक तैनात ठेवण्यात आलेले आहेत.

महापालिकेने स्थापित केलेल्या तात्पुरत्या निवारा केंद्रामध्ये आतापर्यंत एकूण 304 नागरिक स्थलांतरित करण्यात आलेले असुन त्यांना जेवण , पाणी विद्युत व्यवस्था, चटई इत्यादींची सोय करण्यात आलेली आहे. तसेच उक्त सर्व निवारा केंद्रावर मनपाच्या आरोग्य विभागातर्फे वैद्यकीय अधिकाऱ्यांची पथके स्थापन केली असुन सदर ठिकाणी नागरीकांची वैद्यकीय तपासणी देखील सुरु आहे. 

शोध व बचाव कार्य

श्रावस्ती नगर व समीराबाग येथील नगरामध्ये 12 ते 15 फूटा पर्यंत पाणी विसर्ग होत होते. सदरील ठिकाणी अग्निशमन विभागाची एक बचाव पथक रबर बोट आउट बोट मशीन सहित श्रावस्ती नगर येथील 15 नागरीकांना पाण्यातील प्रवाहापासून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. येथील सर्व लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवल्यानंतर लागलीच समीराभाग खडकपुरा कडे ही रेस्क्यू टीम रवाना झाली समीराभाग मधील पाण्याच्या प्रवाहात अडकलेल्या सहा 06 लोकांना अशा प्रकारे एकुण 21 नागरीकांचा बचाव (Rescue) करुन सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे. 

चौकट

* नावघाट पुलावरील पालिकेची पाणी पुरवठा राइजिंग मेन लाईन पुराच्या पाण्यामुळे क्षतिग्रस्त झाली असल्याने जुन्या नांदेड शहरास पाणी पुरवठा करणे शक्य नसून सदर जलवाहिनीची दुरुस्ती पुराचे पाणी ओसरल्याबरोबर हाती घेण्यात येईल.

* बाधित क्षेत्रातील नागरिकांना आवश्यकतेनुसार निवारा केंद्रामध्ये स्थलांतरित करणेसाठी तसेच सखल भागांत साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी यांत्रिकी विभागातर्फे 08 जेसीबी, 02 ब्रेकर मशीन, 02 गॅस कटर, 04 बसेस, 04 आयशर गाडया, 04 पाण्याचे टँकर हि यंत्रसामुग्री उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच स्वच्छता विभाग व इतर विभाग प्रमुख यांनी सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

* विष्णुपुरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये होणाऱ्या पावसामुळे पाण्याचा विसर्ग वाढत असुन परिणामी विष्णुपुरी धरणातुन अजुन जास्त पाण्याचा विसर्ग सोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मनपाच्या सर्व क्षेत्रिय अधिकाऱ्यांना तसेच वाहनांकरीता यांत्रिकी विभाग, स्वच्छता विभाग व इतर विभाग प्रमुख यांना सदैव सतर्क राहण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी दिले असुन मनपाच्या अग्निशमन विभाग व विशेष बचाव पथकास सुध्दा आवश्यकतेनुसार बचाव कार्याकरीता सदैव सतर्क रहाण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.

शहरातील कोणत्याही प्रकारच्या आपत्कालीन ‍परिस्थितीला तोंड देण्याकरिता महानगरपालिका सदैव सज्ज असुन शहरातील नागरिकांनी नदीकाठी जाऊ नये, तथापि आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरीकांनी घाबरुन न जाता तात्काळ महानगरपालिकेच्या अहोरात्र सुरु असलेल्या नियंत्रण कक्षातील 02462-262626, 230721 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन महापालिका प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.

जनसपंर्क विभाग,

नां.वा.श.म.न.पा.नांदेड






Saturday, September 27, 2025

  वृत्त क्रमांक 1020

नागरीकांनी #पूर परिस्थितीत घ्यावयाची काळजी व खबरदारी ; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा #इशारा


#नांदेड दि. 27 सप्टेंबर: मागील २४ तासात नांदेड जिल्ह्यातील ७ तालुक्यांमधील २५ मंडळात #अतिवृष्टी झालेली असून जिल्ह्यातील सर्व मोठे, मध्यम व लघु सिंचन प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेले असून सर्व धरणांमधून मोठ्या #प्रमाणावर पाण्याचा #विसर्ग चालू आहे. जिल्ह्यातील सर्व #नद्या दुथडी भरून #वाहत आहेत. सद्यस्थितीत विष्णुपुरी धरणाचे १६ दरवाजे उघडले असून प्रकल्पातून २,१९,२२९ क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात चालू आहे. गोदावरी नदीने इशारा पातळी ओलांडली असून नदीची #पाणीपातळी सध्या ३५३.९० मी. एवढी आहे. सद्यस्थितीत नांदेड जिल्ह्यास प्रादेशिक #हवामानशास्त्र विभागाने रेड अलर्ट दिला आहे. जिल्ह्यात आज संध्याकाळपासून पुढील २४ तास पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वाढली असून नदी, नाले, ओढे काठच्या गावांना तसेच जेथे पुरस्थिती उद्भवू शकते अशा गावातील नागरिकांनी खालीलप्रमाणे उपाययोजना व खबरदारी घेण्याबाबतचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

काय करावे:
गावात पूरस्थिती निर्माण झाल्यास अथवा पूराबाबत पूर्व कल्पना मिळाल्यास घरातील उपयुक्त सामान, महत्त्वाची कागदपत्रे, जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवा, विजेवर चालणाऱ्या उपकरणांचा वीज पुरवठा बंद करावा. गावात अचानक पूरस्थिती निर्माण झाल्यास तात्काळ प्रशासनास कळवावे. गावात, घरात जंतुनाशक असतील तर ते पाण्यात विरघळणार नाहीत याची दक्षता घ्या. पूरस्थितीत उंच ठिकाणी जावे तसेच जातेवेळी सोबत रेडिओ, टॉर्च, सुके खाण्याचे पदार्थ, पिण्याचे पाणी सोबत ठेवावे. शक्य असल्यास घरातील वाहने उंच ठिकाणी हलवा. घर सोडून जाताना दारे, खिडक्या सर्व घट्ट बंद करून जा. कुटुंबातील सर्व व्यक्तींकडे ओळखपत्र न भिजता राहील याची काळजी घ्या.

पूरामध्ये अडचणीत सापडला असाल तर आजूबाजूच्या साधनांचा वापर करा. (उदा. पाण्यावर तरंगणारे मोठे लाकूड, प्लास्टिकचे ड्रम याचा वापर करा), कोणी व्यक्ती वाहत जात असेल तर दोरीच्या सहाय्याने त्याला वाचवण्याचा प्रयत्न करा. पूर स्थितीत घाबरून जाऊ नका, सरकारी सूचनांचे पालन करा.

मदत आवश्यक असल्यास तात्काळ स्थानिक तहसील कार्यालयास किंवा जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्रास क्र.(0२४६२) २३५०७७ किंवा १०७७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. आपले पशुधन व अन्य पाळीव प्राणी यांना बांधले असेल तर त्यांना खुले करून सुरक्षितस्थळी हलवावे व स्वतः सुरक्षित स्थळाचा आसरा घ्यावा. कोणत्याही परिस्थितीत प्राण्यांना बांधून ठेवू नये त्यांना खुले सोडावे. प्राणी खुले सोडल्याने ते स्वतःचा बचाव स्वतः करू शकतील. सोबत रेडीओ, बॅटरी, मोबाईल इ. संपर्काची साधने ठेवण्याचा प्रयत्न करावा. हे साहित्य भिजणार नाही व सुरक्षित राहील याची योग्य खबरदारी घ्यावी.

काय करू नये
पूर असलेल्या भागात, नंदीच्या पूलावर विनाकारण भटकू नका. पूराच्या पाण्यात चुकूनही जावू नका, तसेच पूर ओसरल्यानंतर प्रशासनानाने परवानगी दिल्याशिवाय पूलावरुन गाडी घालण्याचा, अथवा पूल ओलांडण्याचा प्रयत्न करू नका. दूषित / उघड्यावरील अन्न व पाणी टाळा. (शक्यतो उकळलेले पाणी व सुरक्षित अन्न सेवन करा.) सुरक्षित ठिकाणी रहा व विद्युत् तारांना स्पर्श करू नका. पोहता येत असेल तरच बुडणाऱ्या व्यक्तींना वाचवा परंतू अपरीचीत व खोल पाण्यात जाऊ नका. जलसाठ्याजवळ / नदीजवळ जाऊ नये. आपल्या मुलांना जलसाठ्यावर, नदीवर पोहण्यासाठी पाठवू नये. मच्छिमार व अन्य व्यक्तींनी पाण्यामध्ये जाऊ नये, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सचिव किरण अंबेकर यांनी केले आहे.
0000

 वृत्त क्रमांक 1019 

नांदेड जिल्ह्यातील 25 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद   

 

नदीकाठच्या सखोल भागातील लोकांना, जनावरांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याच्या सूचना

 

नांदेड दि. 27 सप्टेंबर: नांदेड जिल्ह्यात शुक्रवार २६ सप्टेंबर २०२५ रोजी नांदेड तालुक्यातील ५, बिलोली तालुक्यातील ३, मुखेड तालुक्यातील ५, कंधार तालुक्यातील ४, लोहा तालुक्यातील ५, मुदखेड तालुक्यातील २, नायगाव तालुक्यातील १ अशा एकूण २५ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली आहे. नदीकाठच्या सखोल भागातील लोकांना व जनावरांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतरितकरण्याच्या सूचना मनपा नांदेड तसेच सर्व संबंधित तहसिलदार यांना दिलेल्या आहेत, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिली आहे.

 

नांदेड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट असल्याने अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. त्यामुळे विष्णुपुरी प्रकल्पामध्ये सध्या १६०००० लक्ष क्युसेक्सची आवक सुरू असून पुढील ६-७ तासात आवक ३ लक्ष पर्यंत जाण्याचा अंदाज आहे. सध्या विष्णुपुरी धरणातून १६०००० क्युसेक्स विसर्ग सोडण्यात आला आहे व येत्या ५-६ तासात विसर्ग वाढवून २.५ लक्ष ते ३.० लक्ष क्युसेक्स करण्याची शक्यता असल्याने नांदेड शहरालगत नदीची पातळी इशारा पातळी ३५९.०० मी च्या वर जाण्याची शक्यता आहे.

 

धर्माबाद तालुक्यातील बेल्लूरपुलावरून अजून पाणी चालू आहे. अर्धापूर तालुक्यातील मौजे रोडगी येथील संतोष धोंडीबा काकडे यांच्या मालकीची एक म्हैस वीज पडून मृत पावली आहे. शेलगाव येथील पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे गावाचा संपर्क तुटला आहे.

 

मुखेड तालुक्यातील मौजे शिकारा येथे राहत्या घरावर पिंपळाचे झाड पडून घराचे नुकसान झाले आहे. जीवित हानी झालेली नाही. मौजे देगाव येथील पुलावरून पाणी वाहत आहे त्यामुळे मार्ग बंद आहे. बाऱ्हाळी- मुक्रामाबाद-निवळी पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे हा रस्ता बंद करण्यात आला आहे.बेरळी रस्ता बंद करण्यात आलेला आहे.

 

लोहा तालुक्यातील उमरा येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने उमरा ते रूपसिंग तांडा परसराम तांडाकडे जाणारा पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद आहे. उमरा गावापासून पुराचा प्रवाह अंदाजे २०० मीटर लांब आहे. आतापर्यंत घरात पाणी शिरलेले नाही, जीवित हानी झाली नाही. देऊळगाव व चितळी येथे ओढ्यास पूर आल्यामुळे रस्ता बंद आहे. धनज खुर्द येथील पुलावरून पाणी जात असल्याने धनज खु. गावचा संपर्क तुटला आहे. सोनखेड हद्दीतील निळा, डेरला या गावचा संपर्क तुटलेला आहे. लोंढेसांगवी आणि उस्माननगर पोस्ट हद्दीतील जोशी सांगवी यांच्यामधील पुलावरून पाणी जात आहे. डोंगरगाव येथील घोटका जाणारा पुल पाण्याखाली असून दोन मंदिरात पाणी घुसले असून शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत पाणी आले आहे. मंदिराजवळील एका घरातील कुटुंबाने सुरक्षित ठिकाणी आसरा घेतला आहे. तसेच चोंडी येथील बंधारा पाण्याखाली गेला आहे.

दोन्ही ठिकाणांहून वाहतूक बंद आहे. धानोरा-खांबेगाव येथे पुलावरून पाणी वाहत आहे. भेंडेगाव येथे पुराच्या पाण्यात झाडावर अडकून पडलेल्या एका व्यक्तीस स्थानिक शोध व बचाव पथकामार्फत बाहेर काढण्यात आले आहे. कंधार तालुक्यातील बहादरपुरा येथील पुलावरून पाणी वाहत आहे त्यामुळे रस्ता दोन्ही बाजूने बंद करण्यात आला आहे. देगलूर तालुक्यामध्ये सध्या पाऊस थांबला आहे. जवळपास आठ गावांमध्ये पुलावरून पाणी जात असल्याने तात्पुरत्या स्वरूपात संपर्क तुटलेला आहे.

 

नांदेड तालुक्यात रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळेपुलावरून पाणी जात असल्यामुळे राहेगाव गावाचा संपर्क तुटलेला आहे. वनेगाव ते वरखेड अंतर्गत पुलावरून पाणी जात असल्याने हा रस्ता बंद आहे. पर्यायी मार्ग चालू आहे. कासारखेडा मार्गे एकदरा जाणारा नाला भरल्यामुळे रस्ता बंद झाला आहे. त्यामुळे एकदरा गावचा संपर्क तुटला आहे. तसेच निळा एकदरा पुलाच्या बाजूच्या रस्त्याने पाणी वाहत असल्याने तोही मार्ग बंद झाला आहे. तळणी ते रेगाव रस्ता पुराच्या पाण्यामुळे बंद झाला आहे. मौजे पिंपळगाव कोरका येथे कॅनॉल फूटल्यामुळे १ ते २ घरात पाणी आले आहे. नांदेड शहरातील मोमीनपुरा, कालापूल, बाळगीर महाराज मठ, शनी मंदिर हमालपुरा, दत्तनगर, गोकुळनगर येथे रस्त्यावर भरपूर पाणी आहे. हदगाव तालुक्यातील शेंबाळपिंपरी ते तळणी रोड बंद आहे. नायगाव तालुक्यात रात्रीपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे. गोदावरी आणि मन्याड नदीकाठाच्या गावांमध्ये सर्व यंत्रणा सतर्क आहे. पाणी पातळी वाढली आहे परंतु अजून कुठेही गावात पाणी शिरल्याची अथवा गावांचा संपर्क तुटण्याची परिस्थिती नाही.

 

विष्णुपुरी पुर सद्यस्थितीत 27 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वा.

जायकवाडी विसर्ग - 38000 क्युसेक.

माजलगाव विसर्ग - 80000 क्युसेक्स.

दिग्रस बंधारा - 200000 क्युसेक्स.

पूर्णा नदी (सिध्देश्वर + खडकपूर्णा + निम्न दुधना)- 45000 क्युसेक्स.

विष्णुपुरी - 156000 क्युसेक.

नांदेड ओल्ड ब्रिज पातळी - 348.34 मी (117000 क्युसेक).

बाळेगांव- 200000 क्युसेक.

 

विष्णुपुरी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातील जायकवाडी प्रकल्प, माजलगाव प्रकल्प, सिद्धेध्वर प्रकल्प, निम्न दुधना व खडकपूर्णाप्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले असल्याने सर्व धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे.

00000

Friday, September 26, 2025

इसापूर प्रकल्पातून रात्री 9 वाजता पुन्हा विसर्ग वाढ 

हवामान विभागाकडून आजपासून पुढील 5 दिवसांच्या कालावधीत यवतमाळ, बुलढाणा जिल्ह्यास अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तो लक्षात घेऊन इसापूर धरण पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याच्या दृष्टीने व पाणी पातळीमध्ये घट करण्याच्या दृष्टीने आज 26 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 9 वाजता चालू असलेल्या विसर्गात आणखी दोन गेट उघडून वाढ करण्यात येणार आहे. तरी पैनगंगा नदीच्या दोन्ही तिरावरील नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहण्याचे आवाहन पूर नियंत्रण कक्ष इसापूर प्रकल्प यांनी केले आहे. 

इसापूर धरणातून विसर्ग वाढ ; उर्ध्व पैनगंगा प्रकल्प इसापूर धरण 

ROS नुसार धरण पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने आज 26 सप्टेंबर 2025 रोजी 8 वाजता आणखी 4 गेट  0.50 मीटरने उघडण्यात आले आहेत. सद्यस्थितीत इसापूर धरणाच्या सांडव्याचे 9 गेट 0.50 मीटर ने चालू असून  एकूण 9 गेटद्वारे पैनगंगा नदीपात्रात 15273 क्युसेक्स (432.491 क्युमेक्स) इतका विसर्ग  सुरू आहे. धरणामध्ये येणारी पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढवणे/कमी करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. नदी काठावरील/ पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी. - इसापूर धरण पूरनियंत्रण कक्ष

00000

वृत्त क्रमांक 1018 

शेतकऱ्यांनो महाविस्तार एआय ॲपचा वापर करा

आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा मिळवा : कृषि विभाग 

नांदेड दि. 26 सप्टेंबर : शेतकऱ्यांना हवामान बदल बाजारपेठेतील अस्थिरता आणि माहितीच्या अभावामुळे अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. यावर उपाय म्हणून महाविस्तार एआय AI हे अँप लाँच केले आहे. हे कृषी विभागाने विकसित केलेले एक अत्याधुनिक ॲप आहे. कृत्रिम बुद्धिमतेच्या सहाय्याने हे अँप शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीशी संबंधित सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी एकाच ठिकाणी माहिती उपलब्ध करून देते. मराठी भाषेत उपलब्ध असलेले हे अँप शेतकऱ्यांना रिअल टाइम माहिती, तज्ज्ञांचा सल्ला आणि आधुनिक शेती पद्धतीचे मार्गदर्शन करते. 

महाविस्तार एआय AI अँपमधील AI चॅटबॉट शेतकऱ्यांच्या प्रश्नांना त्वरित उत्तरे देते. रिअल-टाइम हवामान अंदाज, स्थानिक पातळीवरील हवामान अंदाजामुळे शेतकरी पिकांची पेरणी, कापणी आणि खतांचा वापर यांचे नियोजन करू शकतात. स्थानिक आणि राष्ट्रीय बाजारपेठेतील पिकांचे भाव रिअल टाइममध्ये दाखवते. कृषि विभागाच्या विविध कृषी योजनांची माहिती, अनुदान, आणि विमा योजनांचे तपशील एकाच ठिकाणी मिळू शकतील. ॲपमध्ये मराठीत व्हिडिओ उपलब्ध आहेत. ज्यात पिकांची लागवड, खतांचा वापर, कापणी, आणि जैविक शेती  याबाबत तपशीलवार मार्गदर्शन मिळेल. अँपमधील AI तंत्रज्ञान मध्ये शेतकरी पिकांचे फोटो अपलोड करून पिकांवरील रोग आणि किडींचे निदान करुन उपाय मिळवू शकतात. 

महाविस्तार AI ॲप शेतकऱ्यांचे जीवन सुसह्य बनवण्यासाठी अनेक फायदे घेऊन आले आहे . चुकीच्या खतांचा किंवा कीटकनाशकांचा वापर टाळून शेतकरी उत्पादन खर्च कमी करू शकतात. बाजारभाव माहिती आणि हवामान अंदाजामुळे शेतकरी योग्य वेळी पिकांची विक्री आणि नियोजन करू शकतात. यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते.तसेच महाविस्तार AI ॲपचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहन योजना देखील आहे.महाविस्तार AI ॲपचा सर्वाधिक वापर करणाऱ्या,प्रत्येक तालुक्यातील पहिल्या 3 शेतकऱ्यांना ॲप मधील लीडरबोर्डवर स्थान देण्यात येणार असून प्रत्येक जिल्ह्यातील जास्तीत जास्त ॲप वापरणाऱ्या 3 शेतकऱ्यांना मा. जिल्हाधिकारी यांच्याकडून प्रशंसा पत्र देण्यात येणार आहे तसेच राज्यस्तरावर सर्वाधिक ॲप वापरणाऱ्या 10 शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून प्रशंसा पत्र/प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. गुगल प्ले स्टोअरवर जाऊन आजच महाविस्तार AI ॲप डाउनलोड करा आणि शेतीत डिजिटल क्रांतीचा भाग व्हा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

00000

 

 वृत्त क्रमांक 1017 

महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा  

28 सप्टेंबर ऐवजी 9 नोव्हेंबर रोजी होणार   

नांदेड दि. 26 सप्टेंबर : महाराष्ट्र राज्यात तसेच नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी व सततच्या पाऊस होत आहे. त्यामुळे सामान्य प्रशासन विभागाने महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परिक्षा-2025 ही 28 सप्टेंबर ऐवजी सुधारित दिनांकास म्हणजे रविवार 9 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला आहे. सर्व परिक्षार्थी उमेदवारांनी या परीक्षेच्या तारखेत झालेल्या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. 

महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-2025 रविवार 28 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 व दुपारी 3 ते सायंकाळी 5 वा. पर्यंत दोन सत्रात घेण्यात येणार होती. परंतू महाराष्ट्र राज्यात तसेच नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी, सततच्या पावसामुळे रस्ते मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्यामुळे काही परिक्षार्थी यांना या परिक्षेस बसता आले नसते व परिक्षेस मुकावे लागले असते. 

याबाबत नांदेड जिल्ह्यातील, जिल्ह्याबाहेरुन नांदेडला ही परीक्षा देण्यासाठी येत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी, असेही आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. त्याबाबत शुध्दीपत्रक 26 सप्टेंबर 2025 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

00000

    वृत्त हिंद की चादर समागम कार्यक्रमातून आज लाखो भाविक घेणार प्रेरणा  ▪️उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री देवेंद्र फडण...