Monday, March 3, 2025

 ‘जीडीसीए’ परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली

अकोला, दि. ३ : जी. डी. सी. अँड ए आणि सीएचएम परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत दि. ७ मार्चपर्यंत  वाढविण्यात आली आहे.

शासकीय सहकार व लेखा पदविका (जीडीसी अँड ए), तसेच सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र (सीएचएम)  परीक्षा दि. २३, २४ व २५ मे रोजी होणार आहेत. परीक्षेसाठी gdea.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज दि. ७ मार्च रोजी रा. ८ वाजेपर्यंत भरता येईल. बँकेत चलनाने भरणा करण्याची मुदत दि. १३ मार्च रोजी बँकेच्या कामकाजाच्या वेळेपर्यंत करण्यात आली आहे. अकोला येथील परीक्षा केंद्रावर अकोला, वाशिम, बुलडाणा हे तीन जिल्हे संलग्न आहेत.

०००

वृत्त क्रमांक 252

स्वतःच्या मुलांप्रमाणे वसतीगृहातील मुलांची काळजी घ्या : गोरक्ष लोखंडे यांचे आवाहन

 १७ जिल्हयातील मागासवर्गीयांच्या वसतीगृहांची पाहणी

नांदेड दि.३ मार्च : स्वतःच्या मुलांप्रमाणे वसतीगृहातील मुलांची काळजी घेणे. संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. जिल्ह्यातील वसतीगृहांमध्ये सुधारणेस वाव असून विद्यादानाच्या या कामांमध्ये संवेदनशीलता ठेवून काम करावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य गोरक्ष लोखंडे यांनी आज येथे केले.

सोमवारी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. गोरक्ष लोखंडे यांनी आयोगाचे सदस्य म्हणून आत्तापर्यंत 17 जिल्ह्यांना भेट दिली आहे. समाज कल्याण विभागामार्फत चालवण्यात येणाऱ्या वसतीगृहात शिकूनच आम्ही देखील मोठे झालो आहे.त्यामुळे या वसतीगृहाची माणसाच्या व्यक्तिगत आयुष्यात वाढ होण्यात काय महत्त्व असते, याची पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे राज्य शासनाने मागासवर्गीय वसतीगृहाच्या संदर्भात अतिशय संवेदनशील धोरण ठरवले असून विद्यार्थ्यांच्या तासिका, त्यांच्या शिकवण्या, त्यांचे प्रशिक्षण सर्व लक्षात घेऊन भोजन व निवाऱ्याची सुविधा संवेदनशीलतेने पुरवावी, असे आवाहन त्यांनी केले.

समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या अनेक वसतीगृहांची त्यांनी गेल्या दोन दिवसात पाहणी केली. यावेळी त्यांनी मुदखेड येथील वसतीगृहातील सुविधा व शिस्तीचे कौतुक केले. महाराष्ट्राला मोठमोठे अधिकारी या वसतीगृहाने दिले आहे. त्यामुळे वंचित समाजाने आपली मुले वसतीगृहात मोठ्या संख्येने दाखल होतील यासाठी प्रवेश प्रक्रिया व अन्य बाबी समजून घ्याव्यात, तसेच समाज कल्याण विभागाने या प्रक्रिया अतिशय सोप्या व सर्वांना माहिती होईल, या पद्धतीने प्रचार प्रसिद्धी करावी असे आवाहनही त्यांनी केले.
 
  संविधानाचे हे अमृत महोत्सवी वर्ष असून या काळामध्ये आयोजित कार्यक्रमातून सोप्या शब्दात संविधान जनतेला माहिती होईल. तसेच या संदर्भातील अफवा पसरणार नाही. त्याला कोणी बळी पडणार नाही, यासाठीचे कार्यक्रम राबविण्यात येत असल्याचे यावेळी सांगितले.

 परस्परांच्या जात,धर्म व परंपरांचा सन्मान करताना मनातली भावना देखील स्वच्छ असली पाहिजे. कुणाच्या जाती बद्दल, कुणाच्या प्रगती बद्दल, असूया असू नये. द्वेष असू नये. ही परिस्थिती समाजात निर्माण झाल्यानंतर ॲट्रॉसिटीच्या घटनांमध्येही कमी येईल, असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला.

गेल्या तीन दिवसांपासून ते नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून या काळात त्यांनी विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र अहुलवार, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण शिवानंद मीनगिरे आदींशी चर्चा करून जिल्ह्यातील समाज कल्याण विभागाच्या कामाचा आढावा घेतला. या दरम्यान त्यांनी विविध सामाजिक संघटनांच्या कार्यक्रमांमध्ये ही सहभाग घेतला.
000




 वृत्त क्रमांक 251

शेतकऱ्यांना पाच लाखापर्यंत पीक कर्ज व्याजात सवलत

केंद्राचा निर्णय ; आता विना तारण दोन लाखांचे कर्ज

नांदेड दि.३ मार्च : केंद्र शासनाने किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) धारक शेतकऱ्यांना पीक कर्ज व्याजात पाच लाख रुपये पर्यंतची सवलत मंजूर केली आहे. हे पीक कर्ज फलोत्पादन,पशुसंवर्धन तसेच मत्स्यव्यवसाय करणाऱ्यांना लागू आहे.त्याचप्रमाणे विनातारण  कर्जाची मर्यादा सुद्धा आता दोन लाखापर्यंत करण्यात आली आहे.

या संदर्भाचे आदेश शनिवारी कृषी आणि ग्रामीण समृद्धीवर बजेट नंतर वेबिनार मध्ये देण्यात आले.

केंद्र सरकारने बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी पीककर्ज व इतर विषयावर तरतुदी केल्या आहेत. या संदर्भात माहिती देण्याच्या दृष्टीने कृषी मंत्रालयाने शनिवारी देशात विविध ठिकाणी कृषी आणि ग्रामीण समृद्धीवर बजेटनंतर वेबिनारचे आयोजन केले होते.

नांदेड जिल्ह्यामध्ये SBI RSETI नांदेड येथे वेबिनार पार पडला. जिल्ह्यातील विविध भागातील शेतकऱ्यांनी हजेरी लावली. यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेबिनारच्या माध्यमातून शेतकऱ्यांची ऑनलाइन संवाद साधला.

 विविध योजनेची माहिती दिली. दरम्यान, केंद्र सरकार द्वारा २०२५-२६ पासून पात्र केसीसी धारकांना कर्ज व्याज सवलत योजना वाढीव मर्यादा देण्यात आल्याचे सांगितले. पूर्वी व्याज सवलत तीन लाख रुपये मिळत होती. आता पाच लाख रुपये करण्यात आली आहे. या योजनेमुळे लहान व मध्यम शेतकऱ्यावरील वित्तीय ताण कमी होईल. ही योजना पीक कर्ज फलोत्पादन, पशुसंवर्धन तसेच मस्त्यव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना लागू आहे.

विशेष म्हणजे भारतीय रिझर्व बँकेद्वारे शेती कर्जासाठी आता विनाकारण कर्ज मर्यादा दोन लाखापर्यंत करण्यात आलेली आहे. या कार्यक्रमासाठी SBI RSETI  संचालक श्री. अशोकनाथ शर्मा यांचे सहकार्य लाभले व  जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक श्री. अनिल गचके यांचे मार्गदर्शन लाभले तसेच त्यांनी सर्वांचे आभार मानले.
000

 वृत्त क्रमांक 250

जात प्रमाणपत्र पडताळणीचे ऑनलाईन भरलेले अर्ज स्विकारण्यासाठी विशेष मोहिम

 ३१ मार्च पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड दि.३ मार्च : बारावी विज्ञानच्या विद्यार्थ्यांची घाई लक्षात घेता, जात पडताळणीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन भरलेले अर्ज 31 तारखेपर्यंत दाखल करावे,असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नांदेड यांच्या वतीने विशेष मोहिम राबवण्यात येत आहे. सदर विशेष मोहिमेच्या अनुषंगाने व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राखीव प्रवर्गात लाभ घेण्याकरिता संबंधित अर्जदारास अर्ज करतेवेळेस जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate-CVC) प्रवेश प्रक्रिया नोंदणी अर्जासोबत अपलोड करणे अत्यावश्यक आहे. इ. ११ वी व १२ वी विज्ञान शाखा तसेच अभियांत्रिकी, वैद्यकीय, औषधोपचार, स्थापत्य, पशुवैद्यकिय, मत्स्य, विधी शाखा, बॅचलर ऑफ फाईन आर्ट अशा प्रकारे बारावीच्या आधारे ज्या जेईई, नीट, सीईटी इत्यादी व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावयाचा आहे. अशा अर्जदारांनी विहीत नमुन्यातील जात प्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज त्यांच्या शैक्षणिक संस्थेच्या शिफारशीसह विशेष मोहिम निमित्ताने दिनांक 31 मार्च, 2025 पर्यंत ऑनलाईन भरलेले परिपूर्ण अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.

अर्जदारांनी मुदतीत जात प्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज सादर न केल्यामुळे समितीस अर्जावर मुदतीत प्रक्रिया पूर्ण करुन वैधता प्रमाणपत्र निर्गमित करणे समिती निर्णय देणे अशक्य झाल्यास व त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास अथवा त्रुटी असलेली प्रकरणे विहीत मुदतीत निकाली न निघाल्यास व त्यामुळे अर्जदारास प्रवेशापासून वंचित रहावे लागल्यास यास समिती जबाबदार राहणार नाही.

 त्यामुळे अर्जदार/पालकांनी उपरोक्त विशेष मोहिमेच्या अनुषंगाने अर्ज सादर करण्याची दक्षता घ्यावी. शैक्षणिक संस्था व्यवस्थापनाने या बाबी आरक्षणातून प्रवेश घेतलेल्या/घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून द्याव्यात,

माहे फेब्रुवारी, 2025 मध्ये समितीने अर्जावर मुदतीत प्रक्रिया पूर्ण करुन 1750 डिजिटल जात वैधता प्रमाणपत्र अर्जदाराने ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या ई-मेलवरती  वितरीत करण्यात आले आहेत. अर्जदारांनी ऑनलाईन अर्ज भरतेवेळेस आपला स्वत:चा ईमेल व भ्रमणध्वणी क्रमांक नमूद करावा, इतर कोणत्याही त्रयस्थ व्यक्तीचा ईमेल व भ्रमणध्वणी क्रमांक नमूद करण्यात येऊ नये. अर्जदाराच्या प्रकरणात समितीने घेतलेला निर्णय अर्जदाराने ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या ई-मेलवर वरती कळवीण्यात येतो.

 अर्जदारांनी ऑनलाईन भरलेला अर्ज समिती कार्यालयातील  खीडकी क्र. 1 वर स्वत: किंवा सखे भाऊ, वडील यांच्या मार्फत दाखल करावे, इतर कोणत्याही त्रयस्थ व्यक्तीस कार्यालयास पाठवण्यात येऊ नये.

अर्जदारांनी कोणतेही दलाल/मध्यस्थ किंवा इतर व्यक्तींशी / समाजकंटकांशी संपर्क साधू नये व त्यांच्या दुष्कृत्यास बळी पडू नये. आपले प्रकरण लवकर निकाली काढण्यासाठी किंवा जात वैधता प्रमाणपत्र लवकर देण्यासाठी अशा प्रकारच्या कोणत्याही व्यक्तीकडून आपल्याला आश्वासन दिले गेल्यास व पैशाची/मेहरबानगीची (favour) मागणी केली गेल्यास आपण सजग,  चरित्रवान व देशभक्त नागरिक आहात, याची जाणीव ठेवून लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे (दूरध्वनी क्र. 02462-255811, टोल फ्री क्रमांक: १०६४) गुप्तरित्या तक्रार नोंदवून, अशा व्यक्तीविरुध्द कायद्यानुसार रितसर कार्यवाही होण्यासाठी शासनास मदत करावी. असे आवाहन जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, नांदेड यांच्या वतीने करण्यात येत आहे.
***

 पत्रकार परिषद निमंत्रण 

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य श्री. गोरक्ष लोखंडे हे दि.३ मार्च सोमवारी बारा वाजता शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. कृपया आपण किंवा आपल्या प्रतिनिधीने या पत्रकार परिषदेला उपस्थित राहावे ही नम्र विनंती.

 दिनांक : 3 मार्च 2025 

 स्थळ : शासकीय विश्रामगृह नांदेड 

 वेळ : दुपारी १२ वाजता

 जिल्हा माहिती अधिकारी नांदेड

दि. 2 मार्च 2025

वृत्त क्रमांक 249

एस.एम.पटेल यांना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची श्रद्धांजली 

नांदेड दि. २ मार्च :  श्री. सय्यद महमद हुसेन सय्यद मदार पटेल (एस.एम.पटेल), कबडडी, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारार्थी हे दि. 01 मार्च,2025 रोजी अनंतात विलीन झाले. त्यांच्या निधनाप्रती शोक व्यक्त करताना राहुल कर्डिले यांनी क्रीडा क्षेत्रातील मार्गदर्शक हरवल्याची श्रद्धांजली अर्पण केली आहे.

आज खऱ्या अर्थाने नांदेड कबड्डीचा श्वास थांबला. एस. एम. पटेल सर यांच्या रूपाने नांदेड मध्ये कबड्डीचे वृक्ष फुललेलं होत. त्यांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली ती कधीच भरून निघणार नाही. त्यांच्या परिवाराला या दुःखातून सांभाळण्याची शक्ती ईश्वर देवो, ही प्रार्थना, अशा शब्दात त्यांनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत.

मागील महिन्यात नांदेड येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धेत कबडडी या खेळाचे आयोजन-नियोजन एस. एम. पटेल सर यांच्या मार्गदर्शनात संपन्न झाले. त्यांच्या उल्लेखनीय मार्गदर्शनामुळे सदरच्या स्पर्धा यशस्वी झाल्या असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.

जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनीही शोक व्यक्त केला आहे.त्यांच्या शोक संदेशात कबड्डी क्षेत्रामध्ये अत्यंत प्रामाणिकपणे रोखठोक भूमिकेने आपले स्थान उमटणारे नांदेड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे माजी सचिव, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अनेक जणांचे प्रेरणास्थान आदरणीय एस. एम. पटेल सर काळाच्या पर्दा आड गेल्याची बातमी धक्कादायक आहे.पटेल सरांचे कार्य कबड्डी क्षेत्र आपले धोरण म्हणून नेहमी आठवण ठेवेल असे म्हटले आहे.

एस. एम. पाटेल सर यांनी कबडडी या खेळात उल्लेखनीय कार्य केल्यामुळे त्यांच्या कार्याचा गौरव व सन्मान व्हावा याकरीता महाराष्ट्र शासनाने सन 2008-09 या वर्षात त्यांना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार (संघटक/ कार्यकर्ता) म्हणुन देवून त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.

एस. एम. पाटेल सर हे एकविध खेळ संघटनेमध्ये राज्यस्तरावर संघ व्यवस्थापक, शासकीय सदस्य, कार्यकारी मंडळ सदस्य, संचालन समिती अधिक्षक, निवड समिती सदस्य, राष्ट्रीय कबडडी पंच सदस्य, कबडडी पंच मंडळ अधिक्षक, निवड समिती, वेळ अधिकारी, तांत्रीक अधिकारी राज्य, विभाग, जिल्हा पंच म्हणून उल्लेखनिय कार्य केले आहे. तसेच क्रीडा प्रचार व प्रसार यामध्ये पुस्तक प्रकाशन, क्रीडा लेख लिहीलेले आहेत. महाराष्ट्र राज्याचे नांव देशात व आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावण्यास संस्मरणीय अशी विशेष कार्य केले असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी श्री.जयकुमार टेंभरे यांनी कळविले आहे.

0000



दि. 1 मार्च 2025

वृत्त क्रमांक 248

"राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत बालकांची विशेष तपासणी मोहीम सुरु”

नांदेड, दि. १ मार्च :- राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत बालकांची विशेष तपासणी मोहीमेचे आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबीटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे येथे उद्घाटन सोहळा पार पडला. 

राज्यातील सर्व जिल्हे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSKआरबीएसीके) उद्घाटन सोहळ्यास व्हिडिओ कॉन्फरन्स (VC) च्या माध्यमातून उद्घाटन सोहळ्यास उपस्थित होते.  

त्यानुसार आज 1 मार्च 2025 रोजी नांदेड जिल्हास्तरीय उद्घाटन प्राथमिक व माध्यमिक शाळा जंगमवाडी महानगरपालिका नांदेड येथे आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, डॉ. निळकंठ भोसीकर (जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय नांदेड), डॉ. संजय पेरके अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक नांदेड, डॉ. संतोष सूर्यवंशी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद नांदेड, डॉ. राजाभाऊ बुट्टे निवासी वैद्यकीय अधिकारी  (बा.सं) नांदेड, श्री अनिल कांबळे आर बी एस के जिल्हा समन्वयक, श्री विठ्ठल तावडे डी आय सी व्यवस्थापक हे  उपस्थित होते.

शालेय विद्यार्थ्यांची विशेष आरोग्य तपासणी मोहिमेची सुरुवात आर बी एस के पथकातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यामार्फत करण्यात आली असून या शाळेतील उपस्थित विद्यार्थ्यांचे सर्वांगीण आरोग्य तपासणी करण्यात आली, नेत्रदोष, रक्तक्षय चाचणी करण्यात आली. किरकोळ आजारी विद्यार्थ्यांना औषधोपचार देण्यात आले तसेच  संदर्भसेवेसाठी पात्र विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले. तसेच तालुका स्तरावरील शारदा भवन हायस्कूल अर्धापूर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा थेरबन भोकर, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय बिलोली, मौलाना अबुल कलाम आझाद हायस्कूल देगलूर, ग्रीन फील्ड नॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज धर्माबाद, अनुसुचित जाती मुलाची शाळा हादगाव, जिल्हा परिषद नेहरू नगर हिमायत नगर, मनोविकास प्राथमिक शाळा, कंधार, सरस्वती विद्या मंदिर किनवट, जिल्हा परिषद शाळा लोहा, अनुसुचित जाती व नवबौद्ध  मुलींची शासकिय शाळा माहूर, श्री सरस्वती विद्या मंदिर मुदखेड, जिल्हा परिषद हायस्कूल मुखेड, लिटिल स्टेप इंग्लिश स्कूल नायगाव, व कस्तुरबा गांधी बालिका वि‌द्यालय उमरी इत्यादी शाळांत स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्या शुभहस्ते पार पडला.

“जिल्ह्यातील सर्व 0 ते १८ वयोगटातील बालकांमधील जन्मतः दोष, पोषण अभाव, व्याधी, विकासाला उशीर इत्यादी विकारासंबंधी मोफत तपासणी आणि सुरुवातीचे औषधोपचार या विशेष मोहिमेंतर्गत करण्यात येणार असून गरजेनुसार शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या मनोगतात व्यक्त केले आहे. तसेच आमदार महोदयांनी शासनाच्या या महत्वाकांक्षी उपक्रमास शुभेच्छा देऊन सदर तपासणी मोहिमेत प्रत्येक बालकाची तपासणी केली जाणार असल्याने बालकांच्या पालकांनी तपासणी पथकास योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.”  

आरोग्य तपासणी दरम्यान मनपा जंगमवाडी शाळेचे मुख्याध्यापक श्रामराव पांडुरंग साबळे, म.न.पा.गणेश नगर शाळेचे मुख्याध्यापक श्रीमती आल्लमवाड, मनपा आंबेडकर नगर मुख्याध्यापिका श्रीमती अशाबाई घूले मनपा लेबर कॉलनी येथील शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती रेश्मा बेगम म व त्यांचे सहशिक्षक सहकाय लाभले

००००००

दि. 1 मार्च 2025

वृत्त क्रमांक 247

ग्रंथ जीवनावर प्रभाव पाडणारे मोलाचे साधन -  माजी खासदार डॉ व्यंकटेश काब्दे 

 दोन दिवसीय ग्रंथ महोत्सवाचा समारोप 

नांदेड दि.01 मार्च2025 -ग्रंथ वाचनामुळे मनुष्याचा सर्वा‍गिण विकास होतो.  जीवनावर प्रभाव पाडणारे उत्कृष्ट साधन म्हणजे ग्रंथ आहेत. यासाठी  सर्वांनी वाचन संस्कृती वाढविण्यासाठी सहभागी होण्याचे आवाहन डॉ.व्यंकटेश काब्दे यांनी केले. 

ग्रंथालय संचालनालय व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय नांदेड यांच्यावतीने बहुउद्देशिय सांस्कृतिक संकुल, श्री.गुरुगोबिंदसिंगजी स्टेडीयम परिसर, नांदेड येथे दोन दिवसीय नांदेड ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा समारोप डॉ. काब्दे यांच्या हस्ते झाला यावेळी ते बोलत होते.

या समारोपास माजी आमदार तथा जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष ॲड गंगाधर पटने, निर्मल प्रकाशनचे निर्मलकुमार सुर्यवंशी, ज्ञानेश्वर वडगांवकर, निवृत्त  जिल्हा माहिती अधिकारी सुरेश काचावार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

डॉ.काब्दे पुढे म्हणाले की, आपणास माता पिता जन्म देतात जीवन घडवितात ते शिक्षक व ग्रंथ यांनीच माझे जीवन घडवीले आहे.बालपणापासूनच इयत्ता तिसरी चौथीत असल्यापासून मी छोटे वाचनालय चालवायचो. मान्यवरांच्या लेखांचे टिपण काढून ते संकलित करायचो. साहित्य क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटी घेऊन त्यांचे  मार्गदर्शन घ्यायचो. वाचक चळवळ ही मोलाची आहे पुस्तकापेक्षा मोबाईलचे आकर्षण सध्या जास्त्‍ आहे. पुस्तकामध्ये सर्व काही अर्थपूर्ण असते. म्हणून ग्रंथालय चळवळ महत्वाची आहे. वाचनालयात युवकांना वाचनाची आवड वाढवा.मोबाईलसुध्दा हितकारक असून मोजके जे पाहिजे ते मुलांना बघु द्या असे त्यांनी सांगितले.  

यावेळी माजी आ.ॲड.गंगाधर पटने म्हणाले की,व्यस्त जीवनशैली असतानाही सर्वजण ग्रंथालय चळवळ समृध्द करणारेंचे अभिनंदन केले. यावेळी त्यांनी एक कविता सादर केली. 

निर्मलकुमार सुर्यवंशी म्हणाले आपण सर्वांनी ज्ञानदानाचे व्रत घेतले आहे.ग्रंथाचा प्रचार प्रसार करा वाचनाची‍ गोडी लावा.ग्रंथालय चळवळीची ज्योत विझू देवू नका. आपण  या चळवळीचे खरे शिल्पकार आहोत. ग्रंथालय हे ज्ञानाचे व महापुरुष घडविणारे मंदिर आहे . ग्रंथालय चळवळीची ही पालखी आपल्या खाद्यांवर आहे यासाठी सर्वांनी वाचनसंस्कृती समृध्द करण्यासाठी सहभागी होण्याचे आवाहन केले.

यावेळी डॉ.काब्दे यांच्या हस्ते ग्रंथालय चळवळीस मोलाचे सहकार्य करणारे उत्कृष्ट ग्रंथपाल,तालुका ग्रंथालयाचे प्रतिनिधी कर्मचारी माधवराव जाधव,गोविंद  फाजगे,भगवान बनसोड,शिल्पा पाठक,कैलाशचंद्र गायकवाड, संजय पाटील,अजय  वट्टमवार, उत्तम घोरपडे, कुमार देशमुख ,चंपतराव डाकोरे आदींचा यावेळी प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला. 

प्रारंभी जिल्हा ग्रंथालय अधिकारी अ.वा.सुर्यवंशी,कैलाशचंद्र गायकवाड,अजय वट्टमवार,संजय पाटील आदीनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. सूत्रसंचालन बालाजी नार्लेवाड यांनी केले. या समारंभास जिल्हयातील वाचनालयातील पदाधिकारी व ग्रंथपाल उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जिल्हा ग्रंथालय अधिकारी अ.वा.सुर्यवंशी यांनी केले.

0000





दि. 1 मार्च 2025

 वृत्त क्रमांक 246

घराघरात बोलल्या जाणाऱ्या बोली भाषेचा प्रत्येकाला अभिमान वाटला पाहिजे - डॉ.पृथ्वीराज तौर

नांदेड, दि. १ मार्च:- उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचनालय महाराष्ट्र राज्य मुंबई, जिल्हा ग्रंथालय कार्यालय नांदेड आयोजित नांदेड ग्रंथोत्सव 2024 दुसऱ्या दिवशी परिसंवाद या कार्यक्रमात" मराठी भाषा संवर्धन आणि घराघरातील प्रयत्न" या विषयावर परिसंवाद संपन्न झाला.

मराठी भाषा संवर्धन आणि घराघरातील प्रयत्न या विषयावर माननीय डॉ. पृथ्वीराज तौर (स्वा.रा.ति.म.विद्यापीठ नांदेड,)हे या विषयावर परिसंवाद या कार्यक्रमात बोलत असताना घराघरात बोलल्या जाणाऱ्या बोली भाषेचा प्रत्येकाला अभिमान वाटला पाहिजे सध्याच्या काळात मराठी भाषा गुदमरते आहे ही दुर्दैवाची बाब असून आपण आपली बोलीभाषा बोलली पाहिजे. 

कोणतीही भाषा सामान्य माणसावर तग धरून जिवंत राहते. चांगली मराठी भाषा बोलण्यासाठी एम.ए. मराठी होण्याची गरज नाही सामान्य माणूसही चांगली भाषा बोलू शकतो . आपला मराठी भाषेवर विश्वास राहिला पाहिजे पण आज दुर्दैवाची बाब ही आहे की, आपण आपली मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून शिकवीत आहोत त्यामुळे आम्ही आम्हाला फसवत आहोत.

 प्रख्यात जयंत नारळीकर,अच्युत गोडबोले असे अनेक विद्वान माणसे मराठी भाषा हे ज्ञान भाषा व्हावी म्हणुन त्यांनी ऑटोकाठ प्रयत्न करून आपले सर्व साहित्य मराठीतून लिहिले सर्वांच्या सामूहिक प्रयत्नातून एखादी भाषा ज्ञान भाषा बनते तेव्हा सर्वांनी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्य केले पाहिजे. सर्वांनी या दृष्टीने प्रयत्न केला तो दिन सोनियाचा असेल असे विचार डॉ. पृथ्वीराज तौर यांनी प्रकट केले.

 या परिसंवादात शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमतीसुचिता खल्लाळ यांनी सांगितले की, आज मराठी भाषेची अस्मिता कमी होत आहे काय. याचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर मराठी भाषेची प्रतिष्ठा व अस्मिता कमी होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. डॉ. प्रा. शारदा कदम 

 बहिर्जी महाविद्यालय वसमत यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की, मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त करून देण्यासाठी अनेक साधुसंतांनी व महापुरुषांनी मोलाचे योगदान दिले आहे. घरात दोन तास मोबाईल शिवाय, एक तास वाचन करणे गरजेचे आहे. वाचन संस्कृती वाढण्यासाठी वाचकांना बळ द्या त्याचे कौतुक करा व पुरस्कार देऊन गौरव करा. वाचनाला प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. हजारो वर्षाची परंपरा आहे ती भाषा उन्नत कशी राहील याचा सर्वांनी विचार केला पाहिजे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महंत  प्रभाकर बाबा कपाटे नांदेड यांनी तर जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल  सूर्यवंशी यांनी सर्वांचे आभार मानले मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कैलास चंद्र गायकवाड,अजय वट्टमवार, संजय पाटील, गोविंद फाजगे, संतोष इंगळे पाटील, शिवाजी हंबीरे, माधवराव जाधव, निर्मल कुमार सूर्यवंशी, उत्तम घोरपडे इत्यादींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

०००००





दि. 1 मार्च 2025

विशेष लेख 

 नांदेड ; न्यू स्पोर्ट हब... 

नांदेड येथे 21, 22 व 23 फेब्रुवारी २०२५ ला झालेल्या राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धेने नांदेडच्या क्रीडा जगताला नवी उभारी दिली आहे. क्रीडा क्षेत्रात एक नवा अध्याय लिहिला गेला आहे.या स्पर्धेने क्रीडाप्रेमींच्या मनात अविस्मरणीय ठसा उमटवला. उत्कृष्ट आयोजन, उच्च दर्जाची व्यवस्था आणि स्पर्धामधील चुरस यामुळे ही स्पर्धा एक व्यावसायिक आयोजन ठरली. दुसरीकडे यानिमित्ताने नांदेडने स्वतःला एक प्रमुख क्रीडा हब म्हणून सिद्ध केले आहे.

 व्यावसायिक आयोजन 

स्पर्धेचे आयोजन हे केवळ व्यावसायिक पातळीवरच नव्हे, तर अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आले.यामध्ये स्पर्धकांच्या सोयीसाठी प्रत्येक गोष्टीचा विचार करण्यात आला. स्पर्धेचे मैदान, पंचाची नियुक्ती, तांत्रिक सुविधा, खेळ साहित्य, मैदाने यांचे आधुनिक व्यवस्था,आणि स्पर्धेच्या वेळापत्रकाचे काटेकोर पालन यामुळे हा सोहळा अधिक भव्यदिव्य तर  ठरलाच. पण गुणवत्तेच्या पातळीवर व्यावसायिक आयोजनही ठरले.या स्पर्धेचे नियोजन देशातील मोठ्या क्रीडा स्पर्धांना लाजवेल असे होते. महानगरपालिका आयुक्त डॉ. महेश डोईफोडे यांनी देखील यावेळी क्रीडा स्पर्धा असलेली ठिकाणे आणि ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणी स्वच्छता व मैदान तयार करण्यासाठी केलेली मदत लक्षवेधी ठरली. प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करून केलेली योजना स्पर्धेच्या यशाचा मुख्य आधार होती.

 निवास आणि भोजन –सर्वोत्तम 

असे म्हणतात आनंद आणि समाधानाचा मार्ग पोटातून जातो. त्यामुळेच सहभागी खेळाडूंना आणि अधिकाऱ्यांना दिलेल्या निवास आणि भोजन व्यवस्थेने आयोजकांनी सर्वांचे मन जिंकले. खेळाडूंसाठी अत्यंत स्वच्छ आणि आरामदायी निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली होती. या व्यवस्थेमुळे स्पर्धकांना कोणत्याही त्रासाविना आपला खेळ सादर करता आला.

भोजन व्यवस्थाही वाखाणण्याजोगी होती. पौष्टिक आणि आरोग्यदायी आहार खेळाडूंना मिळावा याची विशेष काळजी घेतली गेली. खेळाडूंसाठी संतुलित आहार उपलब्ध करून देण्याचे नियोजन हे अत्यंत प्रभावी होते, ज्याचा सकारात्मक परिणाम खेळाडूंच्या ऊर्जेवर आणि कामगिरीवर दिसून आला.

 नांदेड स्पोर्ट्स बेस्ट डेस्टिनेशन 

या भव्य स्पर्धेच्या आयोजनामुळे नांदेड आता क्रीडा जगतात एका महत्त्वाच्या स्थळी रूपांतरित होत आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांच्या धडपडीत शहराने अशा  २४ दर्जेदार राष्ट्रीय व राज्य स्पर्धांचे वर्षभरात आयोजन करून भविष्यातील क्रीडा स्पर्धांसाठी स्वतःला आदर्श स्थळ म्हणून सिध्द केले आहे. यामध्ये १८ राज्य व राष्ट्रीय स्पर्धाचे आयोजन एका कॅलेंडर वर्षातील आहे.नांदेडमध्ये असलेली क्रीडा संरचना, उत्तम सुविधा आणि खेळाडूंसाठी पोषक वातावरण यामुळे येत्या काळात नांदेड महाराष्ट्रातील एक प्रमुख क्रीडा हब बनण्याच्या मार्गावर आहे.

 क्रीडा प्रेमींसाठी पोषक वातावरण 

या स्पर्धेने स्थानिक क्रीडाप्रेमींसाठी प्रेरणादायी वातावरण निर्माण केले आहे. महसूल विभागाच्या दर्जेदार खेळाडूंनी यामध्ये वर्णी लावली. स्वतः खो -खो च्या राष्ट्रीय कर्णधार असणाऱ्या प्रियंका इंगळे यांनी आयोजनाचे, मैदानाच्या तयारीचे कौतुक केले. या स्पर्धेमुळे भविष्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी नांदेड एक उत्कृष्ट केंद्र म्हणून विकसित होईल, अशी आशा आहे.

 भवीष्यातील नांदेडचा क्रीडा विकास 

या स्पर्धेच्या यशानंतर नांदेडमध्ये भविष्यात आणखी मोठ्या प्रमाणावर क्रीडा स्पर्धांचे आयोजन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाने क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी अधिक योजना आखण्याची गरज आहे.

यामध्ये आधुनिक क्रीडा संकुल उभारणे, प्रशिक्षकांची संख्या वाढवणे आणि खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळवून देण्याची पावले उचलली तर नांदेड महाराष्ट्राच्या क्रीडा नकाशावर एक महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयास येईल.

 आठवणींचा अमूल्य ठेवा 

"आयुष्यभराच्या आठवणी" या स्पर्धेने केवळ खेळाडूंना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले नाही, तर ती नांदेडच्या क्रीडा परंपरेला चालना देणारी स्पर्धा ठरली. उत्तम आयोजन, उत्कृष्ट व्यवस्था आणि संस्मरणीय क्षण यामुळे ही स्पर्धा सर्वांच्या मनात कायमची कोरली गेली.

ही स्पर्धा यशस्वी झाल्यामुळे भविष्यात नांदेडमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धा भरवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे नांदेड महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात नव्या उंचीवर पोहोचेल, यात शंका नाही!

 राज्यस्तरीय स्पर्धांमुळे  मैदानांचे अद्यावतीकरण 

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय इनडोअर हॉलमध्ये बॅडमिंटन आणि टेबल टेनिस, तसेच बुद्धिबळाचे प्रशिक्षण केंद्र कार्यरत आहे. तसेच आउटडोरला बास्केटबॉलची दोन मैदाने आणि स्केटिंग रिंग अंतर्गत दोन्ही प्रशिक्षण केंद्र कार्यरत आहे, ही सुविधा अद्यावत झाली.

  श्री.गुरुगोविंद सिंघ जी स्टेडियममध्ये क्रिकेटचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान तयार आहे. या मैदानावरील स्टेडियम वरील रंगरंगोटी करण्यात आली तसेच आऊटफिल्ड अद्यावत करण्यात आले. या राज्यस्तरीय स्पर्धेतील खेळाडूंना या मैदानावर खेळताना आंतरराष्ट्रीय स्पर्धेत शैल्याचा फील होता. या खेळाडूच्या माध्यमातून राज्याला या मैदानाची क्षमता कळली. दर्जेदार स्पर्धेसाठी या मैदानाची शिफारस कानोकानी झाली.

इंदिरा गांधी मैदान, मनपा,या ठिकाणी खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉल, थ्रो बॉलचे मैदान तयार झाले.

सायन्स कॉलेजच्या अथलेटिक्स सिंथेटीक ट्रॅक, व्हॉलीबॉलचे मैदान, खो -खो चे मैदान,इन्डोअर व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, टेबल टेनिस,त्याचबरोबर आऊटडोरला लॉन टेनिसचे मैदान अद्यावत झाले. 

पीपल्स कॉलेजचे फुटबॉल मैदान, बास्केटबॉल कोर्ट तयार आहेत.

नांदेड क्लबच्या ठिकाणी लॉन टेनिसचे मैदान उपलब्ध आहेत.

खालसा स्कूल या ठिकाणी हॉकीचे मैदान उपलब्ध आहे.

दशमेश स्कूल या ठिकाणी हॉकीचे टर्फचे मैदान उपलब्ध आहे. ही अद्यावत झालेली मैदाने या पुढेही अशाच पद्धतीने खेळाडूंना उपलब्ध होईल. यासाठी सर्व स्थानिक प्रशासनांनी त्याची निगा राखावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे. 

 महसूलचे टीमवर्क ठरले विजेते... 

या संपूर्ण स्पर्धेच्या मध्यवर्ती एक नेतृत्व होते. एक कोअर टीम होती. या कोअर टीमच्या डोक्यामध्ये अगदी पहिल्याच दिवशी स्पर्धा यशस्वी कशी करायची याचा रोड मॅप होता. प्रचंड आत्मविश्वासाने ही टीम कार्यरत होती. या टीमची ऊर्जा होती तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आणि आताचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले. या टीमची पहिली तपासून अतिरिक्त जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांच्या थर्मामीटरने व्हायची... आणि मग सूत्रधार निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर व त्यांची कोअर टीम गडावरचे दोर कापल्याप्रमाणे समस्येचे समाधान काढूनच शांत व्हायचे.या टीम मध्ये प्रत्येकाने आपले काम चोख बजावले. सांस्कृतिक स्पर्धा तर दर्जेदार रंगमंचावरील कार्यक्रमाची साखर पेरणी होती या साठी टीमने केलेली धडपड ७० एमएमच्या पडद्यासारखी नजरेत भरणारी होती. ही अविरत मेहनत, धडपड महिन्याभराची होती. यामध्ये प्रत्येक गोष्टीची बारकाईने उपाययोजना करण्यात आली होती. हिमालयासारखे टीम वर्क एखादी स्पर्धा शंभर टक्के यशस्वी करण्यास कारणीभूत ठरले ! हॅट्स ऑफ टू टीम रेव्हेन्यू !!

प्रवीण टाके

 जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड

९७०२८५८७७७




















  ‘जीडीसीए’ परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली अकोला, दि. ३ : जी. डी. सी. अँड ए आणि सीएचएम परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत दि. ७ मा...