Wednesday, March 5, 2025

विशेष लेख                                                                                                                                                

दि. 5 मार्च 2025 

पर्यावरण जपणे – आपले कर्तव्य

पर्यावरण म्हणजे पृथ्वीवरील प्रत्येक जिवाच्या अस्तित्वाचा मूलभूत आधार. हवा, पाणी, सुपीक जमीन आणि नैसर्गिक साधनसंपत्ती यांचा समतोल टिकवून पर्यावरण आपल्याला जगण्यासाठी आवश्यक सर्व गोष्टी प्रदान करते. मात्र, मानवी हस्तक्षेप, औद्योगिकीकरण, वाढती लोकसंख्या आणि जंगलतोड यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे. मात्र हा समतोल बिघडण्याची कारणे शोधून मानवाने यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे.

जागतिक तापमानवाढ, जलप्रदूषण, हवामान बदल, जैवविविधतेचा ऱ्हास, आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे अतिवापर यामुळे पर्यावरण संकटात आहे. महाराष्ट्रातील मराठवाडा हा दुष्काळप्रवण प्रदेश असल्याने येथे पाण्याची कमतरता, भूजल पातळी घटणे, आणि शेतीला होणारे नुकसान या समस्या अधिक गंभीर झाल्या आहेत. त्यामुळे जलसंधारण आणि वृक्षसंवर्धन हे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे.

मराठवाड्यातील अवर्षण 

मराठवाडा हा पावसाच्या कमी प्रमाणामुळे कायमच दुष्काळाच्या सावटाखाली असतो. औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये वारंवार दुष्काळ पडतो.

कमी आणि अनियमित पाऊस यामुळे येथील शेतकरी भूजलावर अवलंबून असतात. अतिरेकी पाण्याचा उपसा आणि जंगलतोड यामुळे भूजल पातळी दिवसेंदिवस खालावत आहे. पाण्याअभावी पिके सुकतात, उत्पन्न घटते आणि शेतकऱ्यांवर कर्जाचा बोजा वाढतो.

यावर उपाय म्हणजे पाणी व्यवस्थापन, जलसंधारण आणि वृक्षारोपण. याच उद्देशाने राज्य सरकारने ‘जलयुक्त शिवार’ योजना सुरू केली आहे.

जलयुक्त शिवार, महत्त्वाचा प्रकल्प

महाराष्ट्र सरकारने 2016 साली ‘जलयुक्त शिवार अभियान’ सुरू केले. याचा मुख्य उद्देश राज्यातील गावे दुष्काळमुक्त करणे आणि भूजल पातळी वाढवणे हा आहे.

या योजनेअंतर्गत होणाऱ्या प्रमुख उपाययोजना:

1. नाले आणि ओढे खोदून रुंद करणे – पावसाचे पाणी साठवून जमिनीत मुरवण्यासाठी.

2. तलाव आणि विहिरींचे पुनरुज्जीवन – जलसाठा वाढवण्यासाठी गाळ काढणे.

3. शेतीच्या बांधावर झाडे लावणे – मृदा धूप रोखणे आणि जमिनीत आर्द्रता टिकवणे.

4. ठिबक व फवारणी सिंचनाचा प्रसार – पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आधुनिक सिंचन पद्धतींचा अवलंब.

5. सिंचन व्यवस्थापन सुधारणा – गाव पातळीवर पाण्याचे योग्य नियोजन करणे.

ही योजना योग्यप्रकारे राबवली गेल्यास मराठवाड्यातील पाणीटंचाई दूर होऊ शकते आणि शेतकऱ्यांना शेतीसाठी पुरेसे पाणी मिळू शकते. मात्र, स्थानिक लोकांचा सक्रिय सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे.

मानव आणि वन्यजीव संघर्ष

वनतोड आणि शहरीकरणामुळे वन्यप्राण्यांचे नैसर्गिक अधिवास कमी होत आहेत. यामुळे जंगलातील प्राणी अन्न आणि पाण्याच्या शोधात मानवी वस्त्यांमध्ये आणि शेतात घुसतात.

विशेषतः नांदेड जिल्ह्यातील किनवट परिसर, जो घनदाट जंगलांनी व्यापलेला आहे, येथे वाघ, बिबटे, अस्वल, हरिण आणि नीलगाय मोठ्या प्रमाणात आढळतात. जंगलतोड झाल्यामुळे हे प्राणी शेतांमध्ये शिरून पिकांचे नुकसान करतात. काही वेळा मानव आणि वन्यजीव संघर्षामुळे जीवितहानीही होते.

एप्रिल - मे जलसंधारणाचे महिने

एप्रिल आणि मे महिना हा जलसंधारणाच्या कामासाठी अतिशय उपयुक्त असा महिना असतो, त्यामुळे या दोन महिन्यात तलावाचे, नाल्याचे, जलसाठ्याचे खोलीकरण ,रुंदीकरण अतिशय आवश्यक असते. केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची या काळामध्ये मोठ्या प्रमाणात अंमलबजावणी होते. याला प्रतिसाद देणे आवश्यक आहे. पाणी पातळी कमी झाल्यामुळे अनेक तलावातील गाळ काढून शेतीमध्ये टाकल्या जाऊ शकतो. तसेच धरणातील गाळ काढून शेतीमध्ये टाकला जाऊ शकतो. छोटे बंधारे. कोल्हापुरी बंधारे. विहिरी लगतच्या नाल्यांचे खोलीकरण, विहिरींचा उपसा, विहिरींचे खोलीकरण, याकडे देखील या महिन्यात लक्ष देणे आवश्यक आहे. एप्रिल, मे व जून चा पंधरवाडयात या सर्व कामांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असतो. त्यामुळे पर्यावरण प्रेमींनी याकडे लक्ष वेधणे आवश्यक आहे.

जून, जुलै, वृक्षारोपणाचे महिने

आपला निसर्ग स्वतःच बऱ्याच गोष्टी करून घेतो. मात्र निसर्गाची अपरिमित हानी आपण केली आहे. त्यामुळे या निसर्गाला फुलण्यात, फळण्यात, मदत करणे आवश्यक आहे. उन्हाळा जसा जलसंधारणाच्या कामासाठीचा आवश्यक कालावधी असतो. तसाच जून जुलै हा महिना सृष्टीला देण्याचा महिना असतो. पावसाळ्याच्या सुरुवातीला जमिनीत जे पेराल ते नक्की उगवते. निसर्ग तशी तुमची वाट पाहत नसते. ती सृजनशीलता निसर्गामध्ये उपजतच आहे. कोट्यवधी वर्षापासून हा क्रम सुरू आहे. मात्र आमच्या अतिक्रमणाने निसर्गातील क्रम बदलायला लागले आहे. त्यामुळे यंदाचा जून जुलै महिना मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाचा ठरेल याची काळजी घेणे गरजेचे आहे. विशेषत : मराठवाडा, विदर्भातील काही जिल्हे, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे,ज्या ठिकाणी दुष्काळाच्या झळा कायम लागतात त्या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबविणे अतिशय आवश्यक आहे. यापूर्वी महाराष्ट्रामध्ये 50 कोटी वृक्ष लागवडीचा अभिनव उपक्रम राबवल्या गेला होता. यावर्षी देखील आपल्या प्रत्येकाच्या हाताने किमान एक वृक्ष लावला गेला पाहिजे,अशी शपथ आपण प्रत्येकाने जरी घेतली तरी जलसंधारणाचे मोठे काम आपल्या हातून होणार आहे. त्यामुळे यावर्षीच्या पावसाळ्यात आपल्या घरातील मुलाबाळांपासून तर परिवारातील सर्व सदस्यांपर्यंत प्रत्येकाने एक झाड लावण्याचा संकल्प या उन्हाळ्यातच करणे आवश्यक आहे.

काही सोपे उपाय...

1. शेतीच्या बांधावर मोठी झाडे लावणे – यामुळे जंगल आणि शेती यामधील सीमारेषा ठरवता येईल. उत्पन्नाचे स्त्रोतही वाढेल ज्या परिसरात जशी आवश्यकता आहे त्याप्रमाणे ही वृक्ष लागवड आपले शिवार सुशोभित करण्यापासून तर भविष्यातील कमाईचे साधन म्हणूनही करता येईल.

2. वन्यजीव संरक्षण आणि जनजागृती – शेतकऱ्यांना योग्य माहिती देऊन पर्यावरणपूरक उपाययोजना शिकवणे. म्हणजे जसे की वानर येतात म्हणून शेतामध्ये झाडेच ठेवू नये हे चुकीचे आहे. वन्य जीवन पासून संरक्षण ही बाब वेगळी मात्र त्यांच्याही अधिवासाचा सन्मान करण्याची मानसिकता तयार करणे गरजेचे आहे.

3. पाणथळ भाग व जलाशय निर्माण करणे – जंगलातच प्राण्यांसाठी पाणी उपलब्ध करून त्यांना शेतीत जाण्यापासून रोखणे. आपल्या भागातील जंगलांची अनावश्यक वृक्षतोड झाली नाही तर जंगलातील प्राणी शेताकडे येणार नाही.त्यामुळे वृक्षतोड होणार नाही.ज्या परिसरात वृक्षतोड झाली आहे. त्या परिसरातील वृक्षारोपण मोठ्या प्रमाणे व्हावे. जंगले संरक्षित व्हावी. त्या ठिकाणी पाणथळे निर्माण व्हावी. उन्हाळ्यात सौर ऊर्जेवरील मोटर पंप मार्फत जंगली जनावरांसाठी पाणी उपलब्ध व्हावे, अशा उपायोजना आवश्यक आहे.

मृदासंवर्धन आणि धूप रोखणे

शेतीसाठी सर्वात मोठा धोका म्हणजे जमिनीची धूप. मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाल्यामुळे मातीचा कस कमी होतो आणि सुपीक माती वाहून जाते.पावसाळ्यात जास्त प्रमाणात मृदा धूप होते आणि शेतीसाठी उपयुक्त जमीन कमी होते.यावर उपाय म्हणजे मृदासंवर्धन. गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार, नाला खोलीकरण रुंदीकरण, आडवे उभे चर तयार करणे आधी उपायोजनातून मृदा संवर्धन आणि धूप रोखण्याचे काम होणे खूप आवश्यक आहे.

वृक्षारोपण:

1. शेतीच्या बांधावर आणि डोंगराळ भागात झाडे लावणे.

2. पावसाचे पाणी अडवण्यासाठी गटार बंधारे आणि लहान जलाशय बांधणे.

3. सेंद्रिय खतांचा वापर वाढवणे आणि रासायनिक खतांचा वापर कमी करणे.

4. शाळांमधून वृक्षारोपणाची शपथ घेणे

5. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वृक्षारोपण तसेच जंगलातील तात्पुरत्या बंधार्‍यांसाठी प्रेरित करणे

6. गाव पातळीवर महानगर पातळीवर विविध उपक्रम राबविणे

7. वृक्ष लागवडीची चळवळ निर्माण करणे आवश्यक आहे

सार्वजनिक सहभाग

पर्यावरण संरक्षण ही केवळ सरकारची जबाबदारी नाही. तर प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. राज्य सरकारने जलयुक्त शिवार, माझी वसुंधरा अभियान, वृक्षारोपण मोहीम आणि जलसंधारण योजना अशा अनेक योजना सुरू केल्या आहेत. मात्र लोकांमधून या योजना लोक चळवळीत रूपांतरित झाल्या पाहिजे केवळ ही कामे सरकारी ठरू नये लोकांची याबाबतची मानसिकता बदलीने व या कामांमध्ये सार्वजनिक सहभाग वाढविणे असा प्रचार प्रसार करणे आवश्यक आहे. विदेशामध्ये सीड बॉल सारख्या मोहिमेतून वृक्ष लागवडीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 140 कोटीच्या देशातील प्रत्येक हाताने एक वृक्ष जरी लावला तर किती मोठे जंगल तयार होईल. फिरायला गेल्यानंतर सीडबॉल फेकल्या गेले तर जंगलातील विविधता वाढायला मदत होईल. आपल्यासाठी,आपल्या ओळखीचे चिरंतर आठवण देणारे एक झाड जरी आपण लावू शकलो तर किती आनंद होईल..?

आपण काय करू शकतो ?

१. झाडे लावा आणि त्यांचे संरक्षण करा – जास्तीत जास्त वृक्षारोपण करा.

२. पाण्याचा अपव्यय टाळा – जलसंधारणासाठी कृती करा.

३. वन्यजीव आणि जंगलांचे रक्षण करा – जंगलतोड थांबवा आणि नैसर्गिक अधिवास वाचवा.

४. कचरा व्यवस्थापन सुधारावा – प्लास्टिकचा वापर कमी करावा 

५. शासनाच्या पर्यावरणपूरक योजनांमध्ये सहभागी व्हा – जलसंधारण, वृक्षारोपण आणि जैवविविधता संवर्धनासाठी प्रयत्न करा.

अशा छोट्या छोट्या उपाययोजनामधून देखील आपण मोठे करू शकतो. मराठवाड्यासारख्या भागात दुष्काळ का याचा विचार घराघरात जर झाला आणि त्यावर प्रत्येक घरात उपाय योजना सुचवल्या गेली प्रत्यक्षात अमलात आली गेली तर ती एक मोठी क्रांती ठरेल.जर आपण आजच सकारात्मक पाऊल उचलले, तर भविष्यातील पिढ्यांसाठी एक समृद्ध आणि पर्यावरणपूरक महाराष्ट्र घडवू शकतो. चला, एकत्र येऊन पर्यावरण वाचवण्यासाठी प्रयत्न करूया!

तन्मयप्रसाद टाके , 

पर्यावरण स्नेही, नागपूर




 वृत्त क्रमांक 259

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेत

अर्ज करण्यासाठी 15 मार्चपर्यंत मुदतवाढ


·         बँक तपशील भरण्यासाठी टॅब उपलब्ध

 

नांदेड दि. मार्च  :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन 2024-25 साठी पात्र विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी  15 मार्च 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.  तरी विद्यार्थ्यानी http://hmas.mahait.org या पोर्टलवर बँक तपशील तात्काळ भरुन घ्यावा. जे विद्यार्थी बँक तपशील भरणार नाहीत ते लाभापासून वंचित राहिल्यास ते स्वत: जबाबदार राहतील. अद्याप ज्या विद्यार्थ्यांनी स्वाधार योजनेचा अर्ज भरला नाही त्यांनी 15 मार्च 2025 पर्यत ऑनलाईन पोर्टलवर भरुन प्रिंट काढून महाविद्यालयातील समान संधी केंद्रात 7  दिवसांच्या आत सादर करावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त, शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

 

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडुन अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील जे विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेशास पात्र असुन प्रवेश मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येत आहे. यात भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्वत: उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबंधीत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये 13 जुन 2018 रोजीच्या शासन निर्णयानुसार थेट वितरीत करण्यात येते.

दिनांक 26 डिसेंबर 2024 च्या शासन निर्णयान्वये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची व्याप्ती तालुकास्तरापर्यत वाढविण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांचे उशिरा सुरु होणार शैक्षणिक सत्र व नव्याने  सुरुवात करण्यात आलेल्या ऑनलाईन प्रणालीत येणाऱ्या अडचणी संदर्भात विविध विद्यार्थी संघटनाच्या मुदतवाढीच्या मागणी निवेदनाच्या अनुषंगाने आयुक्तालयाचे 4 मार्च 2025 च्या परिपत्रकानुसार स्वाधारसाठी पात्र विद्यार्थ्यांस अर्ज करण्यासाठी 15 मार्च 2025 अखेर मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच यापुर्वी स्वाधार योजनेचा अर्ज केलेल्या सर्व विद्यार्थ्यासाठी बँक तपशील भरण्याबाबतचा ऑनलाईन पोर्टलवर टॅब उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे.

00000

 वृत्त क्रमांक 258

नांदेड ग्रंथोत्सवात ग्रंथ खरेदीस उत्स्फूर्त प्रतिसादअ.वा. सूर्यवंशी

नांदेड दि. मार्च  नांदेड येथील गुरुगोविंद सिंघजी स्टेडियम येथे आयोजित नांदेड ग्रंथोत्सवास ग्रंथसाहित्य  स्पर्धा परिक्षा ग्रंथ खरेदीस वाचकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याची माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी .वा.सुर्यवंशी यांनी दिली.

उच्च  तंत्रशिक्षण विभागग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई  जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने श्री गुरुगोविंद सिंघजी स्टेडियम येथे 28 फेब्रु ते 1 मार्च 2025 पर्यंत दोन दिवसीय नांदेड ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले होतेया ग्रंथोत्सवात वाचकांनी, ग्रंथप्रेमीनी ग्रंथ खरेदीस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.

या ग्रंथोत्सवासाठी राज्यभरातून विविध प्रकाशनांची 20 स्टॉल लावण्यात आले होतेयात प्रमुख आकर्षण शासकीय प्रकाशन विक्री केंद्र होतेअधिकृत माहितीशिवाय माफक दरात शासकीय प्रकाशने असल्यामुळे वाचकांनी गर्दी केली होतीजिल्हाभरातील अनुदानीत, विना अनुदानीत वाचनालयांनी मोठ्या  प्रमाणावर ग्रंथ खरेदी केली जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी तसेच संशोधक  वाचक प्रेमीसाठी लागणाऱ्या स्पर्धा  परीक्षेसाठीचे ग्रंथ या आलेल्या स्टॉलमधून खरेदी करण्यात आली.

ग्रंथोत्सवात प्रामुख्याने निर्मल प्रकाशन, नांदेडशांती पब्लिकेशन, पुणेप्रगती बुक डेपो, हिंगोलीसंदेश बुक डेपोपरभणीप्रितम प्रकाशन,जळगावपूजा बुक स्टॉल, अबंडआलवी बौध्द साहित्य भांडार, नांदेडमांडणीकर बुक स्टॉलसुशील बुक डेपो आदी प्रकाशकांनी विविध प्रकारचे ग्रंथसाहित्य  स्पर्धा परिक्षा ग्रंथ विक्रीस ठेवण्यात आले होते. ग्रंथोत्सवात मार्गदर्शन केलेले वक्ते सर्वश्री डॉ.व्यंकटेश काब्देमाजी आमदार गंगाधर पटनेसाहित्यिक श्रीकांत देशमुखप्रा.भगवंत क्षिरसागरपृथ्वीराज तौरसुचिता खल्लाळशारदा कदम आदिनी शुभेच्छा देऊन तसेच प्रत्येक स्टॉलला भेट देऊन त्यांच्या आवडीनुसार मोठया प्रमाणात ग्रंथ खरेदी केली.

महाराष्ट्र शासनाचा स्तुत्य उपक्रम

महाराष्ट्र शासनाने‍ ग्रंथालय चळवळ वाढीस लागावी तसेच नवसाहित्यिकांना प्रेात्साहन मिळावेवाचन संस्कृती वाढावी यासाठी सन 2010 पासून राज्यभरात प्रत्येक जिल्हयात ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येतेराज्यातील संपूर्ण प्रकाशकांना यात सहभागी होण्यासाठी निमंत्रीत करण्यात येतेवाचकांना एकाच ठिकाणी विविध प्रकाशकांची पुस्तके मिळत असल्यामूळे मोठा प्रतिसाद मिळत आहे.

 

नवसाहित्यचित्रकलाउजळणीबाराखडीमुलांच्या गोष्टीरंगकलाचित्रकलाअभ्यासाची पुस्तके, स्पर्धा परिक्षा  साहित्यपर पुस्तके यांची मोठया प्रमाणात विक्री झाल्याचे विविध प्रकाशकांनी   जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुर्यवंशी यांनी सांगितले.

00000

 वृत्त क्रमांक 257

क्रीडा गुणांसाठी 5 एप्रिलपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन 

नांदेड दि. मार्च  :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेडच्यावतीने इयत्ता 10 वी व 12 वीच्या परिक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या खेळाडू विदयार्थ्यांना शासन निर्णयानुसार सवलतीचे वाढीव गुण देण्यात येतात. यासाठीचे ऑनलाईन प्रस्ताव 5 एप्रिल, 2025 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.

 

शासन निर्णयानुसार जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या कडुन क्रीडा प्रस्ताव दरवर्षी विभागीय शिक्षण मंडळाकडे 30 एप्रिलपर्यंत सादर केले जातात. तथापी, शैक्षणीक वर्षे सन 2024-25 या वर्षात माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा (इयत्ता 10 वी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता 12 वी) या परीक्षा नेहमीपेक्षा 10 दिवस अगोदर आयोजित करण्यात आले आहेत. या परिक्षेचा निकाल 15 मे, 2025 पर्यंत जाहीर करावयाचा आहे. त्यामुळे क्रीडा गुण सवलतीचे प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड यांच्यामार्फत विभागीय शिक्षण मंडळाकडे 15 एप्रिल,2025 पर्यत ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे.

 

तरी जिल्हयातील सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य, क्रीडा शिक्षण व विदयार्थी यांनी त्यानुषंगाने 5 एप्रिल, 2025 पर्यंत आपले सरकार या पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन प्रस्ताव भरून घ्यावेत. त्यानंतर कोणत्याही प्रकारचे क्रीडा गुणांचे प्रस्ताव क्रीडा कार्यालयामार्फत स्विकारले जाणार नाहीत. खेळाडूं विदयार्थ्यांच्या होणाऱ्या संभाव्य नुकसानीस संस्था/ शाळा सर्वस्वी जबाबदार राहील, याची संबधीतांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.

00000

वृत्त क्रमांक 256

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेतील लाभार्थ्यांची

पहिली रेल्वे नांदेड येथून 8 मार्च रोजी होणार रवाना

 

नांदेड दि. मार्च  :- मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेत नांदेड येथून अध्योध्या धाम येथे जाण्यासाठी पहिली रेल्वे  शनिवार 8 मार्च 2025 रोजी रवाना होणार आहे.  या योजनेतील पात्र लाभार्थ्यानी आपले नाव पात्र यादीत आहे किंवा कसे याची खात्री  7 मार्च 2025 पर्यत कार्यालयीन वेळेत करुन घ्यावी. तसेच अयोध्या धामला जाण्यासाठी तयार रहावे, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.  

 

राज्यातील नागरिकांना देशातील मोठया तीर्थ स्थळांना जावून , मनशांती तसेच आध्यामिक पातळी गाठणे सुकर व्हावे यासाठी राज्यातील सर्व धर्मातील जेष्ठ नागरिक, जे 60 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत. त्यांना राज्य आणि भारतातील तीर्थ क्षेत्राना मोफत दर्शनाची संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना 14 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये कार्यान्वीत झाली आहे. या योजनेत नांदेड येथील अध्योध्या धाम तीर्थ क्षेत्रासाठी अर्ज केलेल्या पात्र लाभार्थ्यांची निवड यादी समाज कल्याण कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात आलेली आहे. तर तसेच संबंधिताना मोबाईलद्वारे संपर्क करण्यात येत आहे, तरी सर्व पात्र जेष्ठ लाभार्थी नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असेही समाज कल्याण कार्यालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.   

00000

Tuesday, March 4, 2025

 गुरुवार ६ मार्च रोजी होणाऱ्या बायोगॅस व सहकारी दूध संस्था नोंदणी कार्यशाळेला सर्व माध्यम प्रतिनिधी सादर आमंत्रित आहेत या कार्यशाळेला प्रसिद्धी द्यावी ही नम्र विनंती.



 वृत्त क्रमांक 255

वाहनावरील  प्रलंबित ई-चलन भरणा करण्याचे आवाहन 

नांदेड दि. 4 मार्च  :- प्रादेशिक परिवहन कार्यालयातून वाहन धारकांना देण्यात आलेले प्रतिवेदन हे मोठया प्रमाणात प्रलंबित आहे. प्रलंबित प्रतिवेदन, ई-चलन हे तीन महिण्यानंतर कोर्टात पाठविणे आवश्यक आहे. त्यानुसार या कार्यालयाकडून प्रलंबित प्रकरणे न्यायालयात दाखल करण्यात आले आहे.   

न्यायालयाकडून वाहनमालक, चालक यांना या संदर्भात जामीनपात्र व अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व वाहनचालक- मालक यांनी त्यांच्या वाहनावरील प्रलंबित ई-चलनचा भरणा या कार्यालयात येवून किंवा ऑनलाईन पध्दतीने करावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, नांदेड यांनी केले आहे.

00000

 वृत्त क्रमांक 254

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 

 नांदेड दि. 4 मार्च  :- नांदेड जिल्ह्यात 17 मार्च 2025 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 17 मार्च 2025 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहील. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

00000

 वृत्त क्रमांक 253

मोटर सायकल वाहनासाठी नवी मालिका सुरु 

नांदेड, दि. 4 मार्च :- परिवहनेत्तर संवर्गातील मोटार सायकल वाहनांसाठी एमएच 26 –सीटी ही नवीन मालिका लवकरच सुरु होणार आहे. ज्या अर्जदारांना पसंती क्रमांक घ्यावयाचा आहे त्यांनी आधार कार्ड, पॅनकार्ड, मोबाईल नंबर व ईमलसह अर्ज बुधवार 5 मार्च 2025 रोजी दुपारी 2.30 पर्यत स्विकारण्यात येणार आहेत. त्यानंतर पसंती क्रमांकासाठी अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. 

ज्या पसंतीक्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास 5 मार्च 2025 रोजी दुपारी 4 वाजता टेक्स्ट मॅसेज दुरध्वनीद्वारे संबंधित अर्जदारास कळविण्यात येईल. तरी सर्वानी याबाबतची नोंद घ्यावी असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000

Monday, March 3, 2025

 ‘जीडीसीए’ परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली

अकोला, दि. ३ : जी. डी. सी. अँड ए आणि सीएचएम परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत दि. ७ मार्चपर्यंत  वाढविण्यात आली आहे.

शासकीय सहकार व लेखा पदविका (जीडीसी अँड ए), तसेच सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र (सीएचएम)  परीक्षा दि. २३, २४ व २५ मे रोजी होणार आहेत. परीक्षेसाठी gdea.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज दि. ७ मार्च रोजी रा. ८ वाजेपर्यंत भरता येईल. बँकेत चलनाने भरणा करण्याची मुदत दि. १३ मार्च रोजी बँकेच्या कामकाजाच्या वेळेपर्यंत करण्यात आली आहे. अकोला येथील परीक्षा केंद्रावर अकोला, वाशिम, बुलडाणा हे तीन जिल्हे संलग्न आहेत.

०००

विशेष लेख                                                                                                                                  ...