राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी आज संध्याकाळी साडेसात वाजता माहूर गडावरील रेणुका देवीचे दर्शन घेतले. माहूर येथून ते पुन्हा यवतमाळ जिल्ह्यातील पुसद या गावी रवाना झालेत.
जिल्हा माहिती कार्यालय, नांदेड
महाराष्ट् शासन, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
Saturday, April 5, 2025
वृत्त क्रमांक 356
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली कृष्णा राऊतच्या शिक्षणाची जबाबदारी
मृतांच्या कुटुंबियांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी गुंज येथे रविवारी विशेष सहायता शिबीर
नांदेड जिल्ह्यातील आलेगाव येथील घटनाक्रमानंतर शासनाकडून कुटुंबांचे सांत्वन
नांदेड व हिंगोली जिल्हाधिकाऱ्यांकडून दुसऱ्या दिवशीही आढावा
नांदेड /हिंगोली, दि.५ एप्रिल: वसमत तालुक्यातील गुंज येथील शेतमजुरांना घेऊन जाणारी ट्रैक्टर ट्रॉली विहिरीत पडून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा मुलगा कृष्णा राऊत याच्या शिक्षणाची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. तर मृताच्या कुटुंबियांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून रविवारी (दि.६) गुंज येथे विशेष सहायता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवारच्या दुर्घटनेची दखल प्रधानमंत्री कार्यालय तसेच मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली आहे. घटनेतील कुटुंबांच्या पाठीशी शासन उभे राहिले असून आज नांदेड व हिंगोली येथील जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांमार्फत पुन्हा या घटनाक्रमाचा आढावा घेतला.
नांदेड जिल्ह्यातील आलेगाव येथे शुक्रवारी ४ एप्रिल रोजी सकाळी ७.३० वाजता ही दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत वसमत तालुक्यातील गुंज त.आसेगाव येथील ९ महिला व एक पुरुष शेतमजूर आलेगाव शिवारातील शेत गट क्र.२०१ मध्ये शेती कामासाठी जात होते. सदरील शेताजवळ आले असता पाण्याने भरलेल्या विहिरीत हे शेतमजूर ट्रॅक्टरसह पडल्यामुळे त्यातील ७ महिलांचा मृत्यू झाला.
त्यातील एका मयत महिलेचा मुलगा कृष्णा तुकाराम राऊत याचा समाज माध्यमांवरील व्हिडीओ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहिला असता, त्यांनी व्हिडीओची तात्काळ दखल घेतली. त्या व्हिडीओमधील लहान मुलाची वेदना व भावना समजून घेत मुख्यमंत्र्यांनी कृष्णाच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी स्वतः घेत असल्याचे जाहीर केले. तसेच मयतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लक्ष रुपयाची आर्थिक मदतही जाहीर केली आहे.
तसेच आज शनिवारी (दि.५) रोजी जिल्हाधिकारी अभिनव गोयल व नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी दिलेल्या निर्देशानुसार वसमतचे उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार शारदा दळवी यांनी मौजे गुंज त. आसेगाव येथील मयतांच्या वारस, नातेवाईकांना प्रत्यक्ष भेटून त्यांचे सांत्वन केले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहचवल्या. त्यांना संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, घरकुल योजने अंतर्गत घरकुल योजनेचे लाभ, पुरवठा विभागातील शिधापत्रिका व स्वस्त धान्याबाबतचे लाभ, शिक्षणाशी संबंधित विविध प्रमाणपत्रांचे लाभ, व इतर अनुषंगीक प्राथमिक गरजा पूर्ण करणारे लाभ मिळवून देण्याबाबतची सर्व माहिती मयतांच्या वारसांना अथवा नातेवाईकांना जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिका-यांकडून देण्यात आली.
तहसीलदार श्रीमती दळवी यांच्याकडून दुर्घटनेतील मयतांच्या वारसांना शासकीय योजनेचे लाभ देण्याच्या उद्देशाने उद्या रविवार (दि.६) रोजी गुंज त. आसेगाव येथे विशेष सहाय्य योजनेच्या शिबाराचे आयोजन ही करण्यात आलेले आहे. त्यामध्ये निवासी नायब तहसीलदार वसमत, मंडळ अधिकारी, विभाग गिरगाव व ग्राम महसूल अधिकारी, पळसगाव त. माळवटा यांना आदेश देण्यात आले असल्याचे उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी कळविले आहे.
***
वृत्त क्रमांक 355
नांदेडचे बसस्थानक 12 एप्रिल पासून कौठा मैदानावर स्थलांतरीत होणार
नागरिकांनी, ऑटोचालकांनी नोंद घेण्याचे आवाहन
नांदेड, दि. ५ एप्रिल :- नांदेडच्या बस स्थानकाला रेल्वे स्टेशन पासून जोडणारा मुख्य रस्ता दुरुस्त करण्यासाठी मर्यादित कालावधी करिता नांदेड बस स्टॅन्ड बंद करण्यात येत आहे. ते कौठा मैदानावर स्थानांतरीत करण्यात येत आहे,याची नागरिकांनी नोंद घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
या नव्या निर्णयानुसार 12 एप्रिल पासून जुने बसस्थानक रस्त्यासाठी बंद करण्यात येणार आहे. नागरिकांनी या निर्णयासाठी सहकार्य करावे व संबंधित यंत्रणेने ठरलेल्या वेळेच्या आधी रस्त्याचे काम पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
नांदेड रेल्वेस्थानक ते मध्यवर्ती बसस्थानक हा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. बराच काळाचा निर्णय प्रलंबित होता. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात दोन वेळा बैठका घेतल्या होत्या. 12 मार्च रोजी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी बसस्थानकाला प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर तातडीने हा निर्णय घेण्यात आलेला आहे.
यामुळे प्रवाशांना काही प्रमाणात असुविधा होऊ शकते. ऑटो चालकांनी या काळात प्रवाशांना मदत करावी. तसेच ऑटो चालक व अन्य प्रवासी वाहतुकीला आवश्यक पूरक व्यवस्था कौठा मैदान येथे निर्माण करण्यात येत आहे.
विशिष्ट कालमर्यादेत हे काम पूर्ण व्हावे, यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही लक्ष देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मुख्य बसस्थानक येथील रस्त्यांच्या दुरूस्तीच्यावेळी ड्रेनेजलाईन, पाईपलाईन, फायबर केबल यासंदर्भातील सर्व अडथळे तातडीने दुरूस्त करण्याबाबत बैठकीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
याशिवाय नव्या बसस्थानकाची तात्पुरती व्यवस्था होताना प्रवाशांची सुरक्षितता, तात्पुरते शौचालय, स्वच्छता गृहे व अन्य अनुषंगिक व्यवस्था तसेच वाहतुकीमध्ये होणाऱ्या बदलामुळे कि.मी. अंतरातील नवे टप्पे निश्चित करण्याचे काम सर्व संबंधित विभागाने वेळेच्या आत करावे, अशी सूचना त्यांनी दिली आहे. यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी, नांदेड तहसिलदार, आगार व्यवस्थापक, पोलीस वाहतुक शाखा, प्रादेशिक परिवहन विभाग व महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी आढावा घेऊन विक्रमी वेळेत हा रस्ता पूर्ण करावा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
0000
Friday, April 4, 2025
वृत्त क्रमांक 354
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना
इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत प्रवेश
नांदेड, दि. 4 एप्रिल :- अनुसुचित जमातीच्या (आदिवासी) विद्यार्थांना इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये सन 2025-2026 या वर्षात इयत्ता पहिली व दुसरी मध्ये प्रवेश देण्यासाठी अर्ज करण्याचा कालावधी 20 एप्रिल ते 10 मे 2025 पर्यंत राहिल. त्यानंतर येणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अटीची पुर्तता करत असलेल्या पालकांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवटचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी जेनित चन्द्रा दोन्तुला यांनी केले आहे.
प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट जिल्हा नांदेड कार्यक्षेत्रातील अनुसुचित जमातीच्या (आदिवासी) विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळेत सन 2025-26 मध्ये इयत्ता पहिली व दुसरीमध्ये प्रवेश देण्यासाठी इच्छुक पालकांकडुन इंग्रजी माध्यम नामांकित निवासी शाळेत प्रवेश इयत्ता पहिली व दुसरीसाठी दिनांक 20 एप्रिल 2025 पासुन विद्यार्थ्यांचे अर्ज प्रकल्प कार्यालय किनवट (माहिती सेतु सुविधा केंद्र) व या कार्यालयातंर्गत असलेल्या सर्व शासकीय आश्रमशाळांवर विनामुल्य उपलब्ध आहेत. येथुन अर्ज प्राप्त करुन घ्यावे. अर्जासोबत पुढील कागदपत्राच्या अटी व शर्ती पुर्ण करुन परिपूर्ण अर्जच सादर करावेत. तसेच वरीष्ठ कार्यालयाकडुन मंजुरी दिलेल्या शाळांना व मंजुर संख्येनुसारच विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल.
अर्जासोबत पुढील कागदपत्राच्या अटी व शर्ती पूर्ण करुन परिपूर्ण अर्ज सादर करावेत. सदर योजनेचा लाभ घेवू इच्छिणारा विद्यार्थी अनुसूचित जमातीच्या असावा. विद्यार्थ्याच्या पालकाचे/विद्यार्थ्याचे नावे सक्षम अधिकाऱ्याने दिलेल्या अनुसूचित जमातीच्या सांक्षांकित दाखल्याची प्रत जोडणे आवश्यक आहे. प्रवेश अर्जासोबत विद्यार्थ्यांचे जन्मतारखेचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. जर विद्यार्थी दारिद्ररेषेखालील असेल तर यादीतील अनु.क्रमांकासह मुळप्रमाणपत्राचे प्रत सादर करणे आवश्यक आहे. अन्यथा दारिद्र रेषेसाठी विचार केला जाणार नाही. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याच्या पालकाचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लक्ष इतके राहील. (तहसिलदार यांचे चालु वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र सोबत जोडावे).
इयत्ता 1 ली मध्ये प्रवेश घेवु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याचे वय 6 वर्ष पुर्ण असावे. पालकाचे संमतीपत्र व विद्यार्थ्याचे दोन पासपोर्ट फोटो व जन्मतारखेचा दाखला (अंगणवाडी, ग्रामसेवक) यांच्या शिक्का व स्वाक्षरीसह जोडावा. विद्यार्थ्याचे वैद्यकीय पात्रता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. आदिम जमातीच्या विद्यार्थ्याची तसेच विधवा, घटस्फोट, निराधार, परितक्त्या व दारिद्र रेषेखालील अनुसूचित जमातीच्या पालकाचे विद्यार्थ्यांना प्राधान्याने प्रवेश दिले जाईल. घटस्फोटीत यांनी कार्यालयीन निवाडयाची प्रत सोबत जोडावी.
विद्यार्थ्यांचे पालक शासकीय व निमशासकीय नोकरदार नसावेत. (नोकरदार नसल्याचे पालकांनी लेखी लिहुन द्यावी लागेल.) विद्यार्थ्याना वर्ग दुसरी प्रवेशासाठी शिक्षण घेत असलेल्या शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र सादर करावे. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याचे आधार कार्ड जोडणे आवश्यक आहे. अर्ज सादर करावयाचा दिनांक 20 एप्रिल 2025 ते अर्ज स्विकारण्याचा शेवट दिनांक 10 मे 2025 पर्यतच राहील त्यानंतर येणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
आवश्यक कागदपत्रे
अर्जदार विद्यार्थ्याचे नजिकच्या काळातील दोन पासपोर्ट साईज फोटो. पालकाचे रहिवासी प्रमाणपत्र. पालकाचे जातीचे प्रमाणपत्र. उत्पन्नाचा दाखला. अंगणवाडीचा दाखला (पहिली इयत्तेसाठी) / ग्रामसेवकाचा दाखला. इयत्ता दुसरी प्रवेशासाठी बोनाफाईड दाखला जोडणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याचा आधारकार्ड. विद्यार्थ्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र दारिद्ररेषेखालील असल्यासबाबतचा दाखला/ग्रामसेवक दाखला. महिला पालक विधवा/घटस्फोटीत/निराधार/परितक्त्या असल्यास ग्रामपंचायतीचा दाखला. ज्या शाळेमध्ये विद्यार्थ्याला प्रवेश मिळाले आहे त्याच शाळेमध्ये इयत्ता पहिली ते बारावी पर्यत शिक्षण घेत असल्याबाबत हमीपत्र.
याप्रमाणे प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट जिल्हा नांदेड या कार्यालयात व या कार्यालयातंर्गत असलेल्या सर्व शासकीय कार्यालयास अचुक माहिती भरुन अर्ज दिनांक 10 मे 2025 पर्यंत या कार्यालयात (माहिती सेतु सुविधा केंद्र) येथे सादर करण्यात यावे.
या निकषामध्ये बसणाऱ्या अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्याना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण घेण्याकरिता या कार्यालयाकडुन अर्ज मागवुन विद्यार्थ्यांची निवड करुन, वरीष्ठ कार्यालयाकडुन प्रवेश देण्याबाबत शाळा नावाचे यादीसह आदेश प्राप्त होताच नामांकित निवासी शाळेत विद्यार्थ्याना प्रवेश देण्यात येईल, असेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवटचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी जेनित चन्द्रा दोन्तुला यांनी कळविले आहे.
00000
वृत्त क्रमांक 353
रायझिंग लाईफ इंटरप्राईजेस प्रा. लि. नांदेड विरूद्ध गुन्हा दाखल
गुंतवणूकदारांनी भाग्यनगर पोलीस स्टेशनला संपर्क साधण्याचे आवाहन
नांदेड, दि. 4 एप्रिल :- येथील भाग्यनगर पोलीस स्टेशनमध्ये रायझिंग लाईफ इंटरप्राईजेस प्रा. लि. नांदेड विरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात या कंपनीमध्ये गुंतवणूक केलेल्या नागरीकांनी व साक्षीदारांनी तातडीने भाग्यनगर पोलीस स्टेशन नांदेड येथे संपर्क साधावा व आवश्यक ती माहिती उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक एम. एस. माळी यांनी केले आहे.
हा गुन्हा गु.र.न 438/2024 कलम 420, 34 भा.द.वी सह कलम 3, 4, Maharastra Protection of Interest of Depositore act (MPID) प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस स्टेशन भाग्यनगर नांदेड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
0000
वृत्त क्रमांक 352
रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नांदेडचे बसस्थानक
12 एप्रिल पासून कौठा मैदानावर स्थलांतरीत होणार
नांदेड, दि. 4 एप्रिल :- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नांदेड मध्यवर्ती बसस्थानकाच्या रस्त्याच्या मार्ग निकाली काढला असून आता रस्त्याचे काम करण्यासाठी बसस्थानक तात्पुरत्या स्वरुपात कौठा मैदानावर स्थलांतरीत होणार आहे. या नव्या निर्णयानुसार 12 एप्रिल पासून जुने बसस्थानक रस्त्यासाठी बंद करण्यात येणार आहे. नागरिकांनी या निर्णयासाठी सहकार्य करावे व संबंधित यंत्रणेने ठरलेल्या वेळेच्या आधी रस्त्याचे काम पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
नांदेड रेल्वेस्थानक ते मध्यवर्ती बसस्थानक हा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील अनेक बैठकांमध्ये वेगवेगळ्या स्तरातील शिष्टमंडळाने याबाबत तक्रारी केल्या होत्या. हा निर्णय बराच काळाचा प्रलंबित होता. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात दोन वेळा बैठका घेतल्या होत्या. 12 मार्च रोजी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी बसस्थानकाला प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर तातडीने हा निर्णय घेण्यात आलेला आहे.
यामुळे प्रवाशांना काही प्रमाणात असुविधा होऊ शकते. मात्र हा रस्ता तातडीने दुरूस्त करण्याचेही निर्देश त्यांनी दिलेले आहेत. विशिष्ट कालमर्यादेत हे काम पूर्ण व्हावे यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही लक्ष देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुख्य बसस्थानक येथील रस्त्यांच्या दुरूस्तीच्यावेळी ड्रेनेजलाईन, पाईपलाईन, फायबर केबल यासंदर्भातील सर्व अडथळे तातडीने दुरूस्त करण्याबाबत बैठकीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
महानगरपालिका आयुक्तांकडे या बदलामुळे अनेक जबाबदाऱ्या येणार असून त्यांनी तातडीने नागरिकांना पूर्ववत बसस्थानकातील सुविधा मिळावी यासाठी जातीने लक्ष वेधण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय नव्या बसस्थानकाची तात्पुरती व्यवस्था होताना प्रवाशांची सुरक्षितता, तात्पुरते शौचालय, स्वच्छता गृहे व अन्य अनुषंगिक व्यवस्था तसेच वाहतुकीमध्ये होणाऱ्या बदलामुळे कि.मी. अंतरातील नवे टप्पे निश्चित करण्याचे काम सर्व संबंधित विभागाने वेळेच्या आत करावे, अशी सूचना त्यांनी दिली आहे. यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी, नांदेड तहसिलदार, आगार व्यवस्थापक, पोलीस वाहतुक शाखा, प्रादेशिक परिवहन विभाग व महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी आढावा घेऊन विक्रमी वेळेत हा रस्ता पूर्ण करावा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
0000
वृत्त क्रमांक 351
आलेगाव येथे ट्रॅक्टर ट्रॉली विहिरीत पडल्याने
7 शेतमजूर महिलांचा मृत्यू तर 3 जखमी
• प्रशासनाकडून तातडीचे मदत कार्य
• प्रधानमंत्री व मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
नांदेड, दि. 4 एप्रिल :- नांदेड तालुक्यातील आलेगाव येथे आज सकाळी महिला मजुरांना घेऊन जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली विहिरीत पडून झालेल्या दुर्घटनेत 7 शेतमजुर महिलांचा मृत्यू झाला तर 3 शेतमजुर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेची प्रधानमंत्री व मुख्यमंत्री कार्यालयाने तातडीने नोंद घेतली आहे. प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. तसेच या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपयांचे अर्थसाहाय्य जाहीर करण्यात आले आहे.
वसमत तालुक्यातील गुंज या गावातील 10 शेतमजुर नांदेड तालुक्यातील आलेगाव शिवारात शेत गट क्र 201 मध्ये भुईमुग निंदनीच्या कामासाठी ट्रॅक्टरने जात होते. या शेतात कडघरा नसलेल्या दगडोजी लक्ष्मण शिंदे यांच्या शेतात पाण्याने भरलेल्या विहिरीत ट्रॅक्टर हेड व ट्रॉली सहीत 10 मजुर आज सकाळी 7.30 वाजेच्या दरम्यान पडल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले आहे.
या दुर्घटनेत जिवंत सुखरुप बाहेर काढण्यात आलेल्यामध्ये श्रीमती पार्वतीबाई रामा भुरड (वय 35), श्रीमती पुरभाबाई संतोष कांबळे (वय 40), सटवाजी जाधव (वय 55) या शेतमजुरांचा समावेश आहे. तर मृत्तांमध्ये श्रीमती ताराबाई सटवाजी जाधव (वय 35), धुरपता सटवाजी जाधव (वय 18), सिमरण संतोष कांबळे (वय 18), सरस्वती लखन भुरड (वय 25), श्रीमती चऊत्राबाई माधव पारधे (वय 45), श्रीमती सपना/मिना राजु राऊत (वय 25), श्रीमती ज्योती इरबाजी सरोदे (वय 30) या महिलांचा समावेश आहे.
यावेळी पोलीस प्रशासन व नांदेड वाघाळा मनपाचे शोध व बचाव पथकाचे कर्मचारी, स्थानिक कर्मचारी व ग्रामस्थांच्या सहकार्याने सदर शोध व बचाव कार्य संपन्न झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताचे वृत्त ऐकूण तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला. तातडीच्या मदतीची घोषणा केली. मृत व्यक्तींच्या कुटुंबीयास मुख्यमंत्री सहायता निधीतून रुपये पाच लक्ष एवढे अर्थसहाय जाहीर केले. प्रधानमंत्री कार्यालयाने देखील या दुर्घटनेची त्वरेने दखल घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. सोबतच प्रधानमंत्री कार्यालयामार्फत प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृत्तांच्या कुटुंबियांना 2 लक्ष रुपये तर जखमींना 50 हजाराची मदत जाहीर करण्यात आली आहे. या घटनेने समाज मन हेलावून गेले आहे. मृत्त सात जणांमध्ये पाच महिला व दोन मुलींचा समावेश आहे. घटनाक्रम यासंदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत.
सकाळी प्रशासनाला माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांच्या मार्गदर्शनानुसार नांदेड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, अतिरिक्त पोलीस अधिक्षक सुरज गुरव यांचे विशेष पथक, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, तहसिलदार संजय वारकड, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कुऱ्हे यांच्यासह महसूल विभागाचे क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी दुर्घटनेत शोध व बचाव कामासाठी तातडीने उपस्थित झाले होते.
जिल्ह्याभरातील कठडे नसलेल्या विहिरींची नोंद करण्याचे आदेश
आजच्या अपघातामध्ये सात निष्पाप जीवांचे बळी गेल्यामुळे अशा अपघात प्रवण किती विहिरी जिल्ह्यामध्ये आहेत त्यांचा शोध घेण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व संबंधित यंत्रणेला सूचना दिली आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली तसेच निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडतकर यांना या संदर्भात सर्व यंत्रणेकडून याबाबतचा अहवाल मागितला आहे. नागरिकांनी अशा धोकादायक रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरींबाबत सतर्कता बाळगावी व विहिरीचे मालक असणाऱ्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी अशा पद्धतीने दुर्घटना होणार नाही यासंदर्भात अडथळे उभारावेत अशी सूचनाही त्यांनी दिली आहे.
00000
राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी आज संध्याकाळी साडेसात वाजता माहूर गडावरील रेणुका देवीचे दर्शन घेतले. माहूर येथून ते पुन्हा यवतमाळ जिल्ह्याती...
.jpeg)
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
वृत्त क्रमांक 114 संजय गांधी निराधार योजनेतील २ हजार लाभार्थी अजूनही आधार कार्डशी 'अनलिंक ' ७ दिवसात कारवाई न केल्यास लाभापास...
-
विशेष लेख ॲग्रीस्टॅक योजना – शेतीतील डिजिटल क्रांती ! शेतीच्या आधुनिकतेसाठी आणि शेतकऱ्यांना अधिक सोयीसुविधा मिळाव्यात म्हणून केंद्र व रा...