Monday, February 10, 2025


विशेष लेख                                                                                                                                     परीक्षेला जाताना....

प्रियविद्यार्थी मित्र मैत्रिणींनो परीक्षासुरु होणार तुमचीखूप खूप शुभेच्छा प्रथम तुम्हा सर्वांना. बारावीचे वर्षबारावीची परीक्षा सगळं वातावरण वेगळ असत. परीक्षाही काही वेळापुरती, काही प्रश्नापुरती असली तरी त्यामागे वर्षभर केलेली मेहनतअभ्यास असतो.

परीक्षेला जाताना..

*परीक्षा* कोणतीही परीक्षा आपल्या आयुष्यातील एक महत्वाचा भाग असते. त्यातल्या त्यात 12 वीची परीक्षा सर्वांनाच महत्वाची असते. पालक व विदयार्थी यासाठी तयारी करत असतात. 1. नियोजन परीक्षेचे नियोजन अभ्यासाचे सातत्यनियोजन पूर्वक केलेला अभ्यास, प्रत्येकाची समजून घेण्याची विषयानुसार आवड, ग्रहणशक्तीवातावरण इ. यात येतात.

टाईम टेबल.. वेळापत्रक आल्यापासूनच नियोजन करायला हवे. हॉल तिकीट जपून ठेवणे परीक्षा केंद्र व घर,हॉस्टेल,रूम यातील अंतर यानुसार परीक्षा केंद्रावर वेळेआधी पोहचण्याचे नियोजन करणे . त्यासाठी योग्य वाहनाचे नियोजन करने किंवा कशाप्रकारे जायचे ते ठरवणे परीक्षेला घरून निघताना प्रोटोकॉल नियमां नुसार ड्रेसिंग -कपडे परिधान करणे इतरही नियम पाळणे. हॉल टिकिट सोबत ठेवणे पानीघड्याळ नियमानुसार असणे वेळे आधी परीक्षा केंद्रावर आल्याने घाई गडबड होत नाही.

महत्वाचे म्हणजे रात्रीची झोप शांत होणे आवश्यक आहे. जास्त जागरण करू नये. सकाळी जेवण करावे काहीतरी पोषक खावेपरीक्षेला जाताना उपाशी राहू नये पाणी व्यवस्थित प्यावे. परीक्षा काळात साधेपण पोषक आहार घ्यावे, अतितिखटमसालेआंबवलेलेबाहेरचे पॉकेटमधील अन्न खाऊ नये. परीक्षा काळात आहार साधापोषक, सहज पचणारे असावा. परीक्षा केंद्रावर आल्यानंतर वातावरण हलकफुलक असाव . उगाचच टेंशन घेऊ नये, आपण अभ्यास केलेला आहे, त्यामुळे कोणताही प्रश्न आपण सोडवू शकतो हा आत्मविश्वास असावा.

परीक्षा केंद्रावर आल्यानंतर तसेच समोर पेपर पाहून नविन वातावरण पाहून घाबरु नये. शांत रहावे. जर घबराहट वाटलेधडधड वाटली थरथर वाटली तर मनाला स्वतः सांगावे. शांत रहा सर्व छान होईल घाबरु नका रिलॅक्स रहा, रडू नका. या वेळी फक्त श्वासावर लक्ष्य द्यावे. थोडा वेळ श्वास घ्या श्वास सोडा असे दीर्घश्वसन करावे. श्वास मोकळा घ्यावा. साधारणतः आत घेताना, श्वास 4 सेकंद व श्वास सोडताना सहा सेकंद असे प्रमाण असावे. असे 2 ते 5 वेळा करावे. किंवा मोकळा श्वास आत घेऊन सोडताना मेणबत्ती फुंकल्यासारखे फू करून श्वास सोडावा असे श्वासावर लक्ष्य दिल्याने ताण कमी होतो व परीक्षेवर लक्ष्य केंद्रित करावे. पेपर हाती आल्यानंतर उत्तरपत्रिका यावर आपला नंबर इ. व्यवस्थित लिहावे उपस्थित शिक्षकांचे मार्गदर्शन घ्यावेचुका करू नयेत. त्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन काटेकोरपणे करावे. प्रश्न स्वतःला जसे येतात तसे सोडवावे इतरांना काही विचारून डिस्टर्ब करू नयेशंका असल्यास गारडींगला असलेल्या सर मॅडमशी संपर्क साधावा.

*कॉपी करू नये*

स्वतःच्या हिंमतीने अभ्यास करून मिळवलेले मार्कस - आयुष्यभर उपयोगी पडतातत्यामुळे आपला पेपर सोडवताना शांत राहून मन एकाग्र करून उत्तरे लिहावीत. अस्वस्थता कोणताही प्रश्न वाचून अस्वस्थ होऊ नये. घाबरु नयेवाटल्यास थोडा वेळ दीर्घ श्वसन करावे, आपणास जे प्रश्न सोपे वाटतात ते आधी सोडवावे नंतर कठिण प्रश्न सोडवावेमन आनंदी ठेवावे. वेळेचे नियोजन प्रश्नांच्या मार्कानुसार उत्तरे लिहिताना वेळेचे नियोजन असावे त्यामुळे वेळ पुरतो अन्यथा एकाच प्रश्नात वेळ जास्त गेल्याने वेळेचे गणित बिघडू शकते म्हणून वेळेकडे लक्ष्य असावे. हस्ताक्षर हस्ताक्षर सुवाच्य सुंदर वाचता येण्या सारखे असावे. घाईघाईत खराब अक्षर असू नये. सुटसुटीत ,मुद्देसूद लिहावे. एक पेपर झाल्यावर परीक्षा काळात ज्या दिवशी जो पेपर असेल त्या पेपर झाल्यानंतर उगाचच त्याबद्दल चर्चा करत वेळ वाया घालवू नयेदुसरा पेपरची लगेच तयारी सुरु करावी सगळ्यात शेवटी संपूर्ण विषयांचे पेपर्स झाल्यानंतर त्यावर चर्चा करावी. यशस्वी व्हा आनंदी वातावरणातहसत खेळत परीक्षा द्यावी, काळजी, चिंता करू नये. पालकांनी घरातील वातावरण शांत व उत्साही असावे उगाचच परीक्षेचा बाऊ करू नयेअवास्तव अपेक्षांचे ओझे देऊ नये, घाबरू‌न जाऊ नये. स्ट्रेस न घेता शांत चित्ताने पेपर सोडवावा व यशस्वी व्हावेसर्वांना खूप खूप शुभेच्छा यशस्वी भव.

डॉ. पुष्पा गायकवाड,

 वैद्यकीय अधिकारी

 जिल्हा रुग्णालय नांदेड

 मो- 9422862625

 टीप- परीक्षा काळात काही अडचण आल्यास विद्यार्थी विद्यार्थिनी पालक कधी ही फोन करू शकतात.

 

  वृत्त क्रमांक 165

बारावीच्या विद्यार्थ्यांनी तणावमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान राबविणार

दोषी आढळणाऱ्याची गय केली जाणार नाही

#नांदेड , दि. 9 :- केवळ बारावीच नव्हे तर आयुष्यात अनेक परीक्षांना आपल्याला सामोरे जावे लागते. त्यामुळे परीक्षेचा ताण घेऊ नका. तणाव मुक्त व निर्भय वातावरणात परीक्षा द्या,असा शुभेच्छा संदेश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिला आहे. सोबतच प्रशासनाने काटेकोर कॉफी मुक्ती अभियान राबविण्याचे निर्देशही दिली आहे.

जिल्ह्यात यावर्षी एकूण 107 परीक्षा केंद्रावर बारावीच्या परिक्षा घेण्यात येणार आहे. इयत्ता दहावीसाठी 172 परीक्षा केंद्राचे नियोजन आहे. यंदाच्या दहावी व बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात सुरळीत पार पाडण्यासाठी कॉपीमुक्त अभियान राबविणार असल्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी केले आहे.

उद्यापासून बारावीची परीक्षा सुरु होणार आहे. जिल्ह्यात बारावीसाठी एकूण 24 तर दहावीसाठी 32 परीक्षा केंद्र संवेदनशील आहेत. या संवेदनशील परिक्षा केंद्रावर केंद्रसंचालक व पर्यवेक्षक बदलण्यात येणार आहेत.

बारावीच्या परिक्षेसाठी जिल्ह्यात एकूण 10 भरारी पथक नेमण्यात आली आहेत. या पथकात उपजिल्हाधिकारी, उपआयुक्त दर्जाचे अधिकारी नेमण्यात आले आहेत. त्यांच्याकडे प्रत्येकी २ तालुके दिले आहेत. प्रत्येक तालुक्यातून तहसिलदार व गटविकास अधिकाऱ्यांना त्यांचा तालुका क्षेत्रात भरारी पथक प्रमुख म्हणून कार्य करतील. याशिवाय 24 संवेदनशिल विशेष भरारी पथक म्हणून 5 पेपरसाठी 7 अधिकाऱ्यांचे जिल्हास्तरावरुन नियोजन करण्यात आले आहे. यात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, समाज कल्याण अधिकारी, कृषि विकास अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे भरारी पथक अचानक भेटी देवून परीक्षा सुरळीत पार पडत आहेत की नाही याची पाहणी करतील. 

याशिवाय सर्वच 107 केंद्रावर तालुकास्तरावर पूर्णवेळ उपस्थित राहण्यासाठी बैठे पथकाचे नियोजन तहसिलदार यांचे अधिकारात करण्यात आलेले आहे. यामध्ये तालुकास्तरावरील वर्ग-२ एक अधिकारी पथक प्रमुख म्हणून राहतील, त्यांना सहाय्य करण्यासाठी ग्रामसेवक, तलाठी, केंद्रप्रमुख, कृषि सहाय्यक यांचे पैकी २ इतर अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तरी विद्यार्थ्यांनी कोणत्याही ताणतणाव न घेता परीक्षेला सामोरे जावे असे आवाहन जिल्हाधिकारी राहून कर्डिले यांनी केले आहे. 

00000



Sunday, February 9, 2025

  वृत्त क्रमांक 164

कुतूहलातून विविध विषयांवरील साहित्याची निर्मिती

राज्यस्तरीय साहित्य संमेलनात डॉ. अच्युत गोडबोले यांचे प्रतिपादन 

 मंत्री उदय सामंत यांनी दृकश्राव्य माध्यमाव्दारे संमेलनाला शुभेच्छा 

सगरोळी (नांदेड ) दि.९ फेब्रुवारी : विश्व, मनुष्य व निसर्ग निर्मितीचे लहानपणापासूनच मला प्रचंड कुतूहल होते. कुतूहलापोटी वाचनाची आवड निर्माण झाली. पुढे लेखणीतून प्रगट होत गेलो व  माझ्या हातून विविध विषयांवर ५६ पुस्तकांची निर्मिती झाली असल्याचे जेष्ठ साहित्यिक डो. अच्युत गोडबोले यांनी सांगितले. सगरोळी (ता.बिलोली) येथे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते.

 यावेळी  व्यासपीठावर देगलूर-बिलोली विधानसभेचे आमदार जितेश अंतापुरकर, संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा संस्कृती संवर्धन मंडळाचे चेअरमन प्रमोद देशमुख, माजी आमदार गंगाधर पटणे, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य डॉ. मार्तंड कुलकर्णी साहित्यिक देविदास फुलारी आदींची उपस्थिती होती. उद्योग तथा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दृकश्राव्य माध्यमाव्दारे या संमेलनाला शुभेच्छा दिल्या.

   रविवार (ता.९) रोजी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई व येथील संस्कृति संवर्धन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते. 

'मुसाफिर' या पुस्तकाने अनेकांच्या आत्महत्या रोखल्या, बोर्डरूम हे पुस्तक वाचून अनेकांनी उद्योग उभारले. समाजास याचा लाभ होत असल्याने समाधान वाटते. उद्याचे जग हे तंत्रज्ञानावर आधारित असून हे सर्वांना समजावे म्हणून मराठीतून पुस्तके लिहिली. तंत्रज्ञानाबाबत अद्ययावत राहावे.  प्रचंड वाचन, गाणी, चर्चा यासह त्यातील  मुख्य शिलेदार, माणसे, त्याची थेरी, मूलतत्त्वे याचा अभ्यास केला. लोकांचा विश्वास व  माझाही आत्मविश्वास वाढला, माझ्यामुळे सहलेखक तयार झाले. येथील संस्थेचे काम पाहून प्रभावित झालो असल्याचे ते म्हणाले.  

माझ्या मतदारसंघात हा कार्यक्रम होत असल्याने अभिमानास्पद आहे. येथे अनेक कार्यक्रमातून नागरिकांची जडणघडण होत असल्याचे आमदार जितेश अन्तापुरकर म्हणाले. 

सगरोळी येथील कर्मयोग्याच्या भूमीत   हे संमेलन व्हावे अशी मनापासून इच्छा होती. यापुढे सगरोळी येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरावे अशी इच्छा मार्तंड कुळकर्णी यांनी व्यक्त केली. प्रमोद देशमुख यांनी सर्व मान्यवर व सारस्वतांचे शब्दसुमनांनी स्वागत केले. परिसरास कर्मयोगी बाबासाहेब देशमुख साहित्य नगरी तर सभा मंडपास मराठवाड्याचे भूमिपुत्र कविवर्य दे.ल. महाजन यांचे नाव दिले होते. यावेळी साहित्यिक व श्रोते मोठ्या संखेने उपस्थित होते.

 संमेलनाच्या  उद्घाटनासाठी  मराठी भाषामंत्री उदय सामंत उपस्थित राहणार होते,  परंतु त्यांनी आभासी पद्धतीने श्रोत्यांशी संवाद साधला. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी राज्यशासन कटिबद्ध असून सर्वतोपरी मदत केली जाईल अशी ग्वाही देऊन संमेलनास शुभेच्छा दिल्या.

0000










 वृत्त क्रमांक 163

जिल्हा सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीमुळे न्यायालयात येणाऱ्या सर्वाना न्याय मिळेल

- न्यायमूर्ती नितीन सुर्यवंशी 

·  कार्यक्रमास माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण व खासदार रविंद्र चव्हाण, आमदार श्रीजया चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती

·  न्यायालय परिसर स्वच्छ व सुंदर राहील यासाठी सर्वाचे प्रयत्न आवश्यक

·  भोकर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारतीचे उदघाटन व लोकार्पण

नांदेड, दि. 9 :- लोकशाही सशक्त बनविण्यासाठी न्याय व्यवस्था आहे. न्याय व्यवस्थेत मुलभूत सुविधा प्राप्त करुन देणे आवश्यक आहे, यामुळे न्यायव्यवस्था अधिक कार्यक्षम होईल व यातून एक नवीन पर्व सुरु होईल. भोकर येथील जिल्हा सत्र न्यायालयाच्या या नूतन विस्तारीत इमारतीमुळे सर्वाना पोषक वातावरण मिळून न्यायालयात येणाऱ्यांना न्याय मिळेल, असा विश्वास मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा नांदेड जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती नितीन भगवंतराव सुर्यवंशी यांनी व्यक्त केला. 

भोकर येथे सुमारे 14 कोटी 51 लाख 65 हजार रुपये खर्च करून बांधलेल्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन विस्तारीत न्यायालयीन इमारतीचा उद्घाटन सोहळा न्यायमूर्ती नितीन भगवंतराव सुर्यवंशी यांच्या हस्ते आज पार पडला. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. पी. ब्रम्हे, राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण,  खासदार रविंद्र चव्हाण, आमदार श्रीजया चव्हाण, प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुरेखा कोसमकर, बार कॉन्सिल ऑफ  महाराष्ट्र ॲण्ड गोवाचे सदस्य ॲड. व्ही.डी. सांळुखे, ॲड. सतिश देशमुख, बार कॉन्सिल ऑफ  इंडिया ॲण्ड गोवाचे सदस्य ॲड. आशिष देशमुख, जिल्हा न्यायालय भोकरचे युनुस खान खरादी, सहायक जिल्हाधिकारी मेघना कावली, रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक निती सरकार, अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव तसेच न्यायालयीन अधिकारी, कर्मचारी, जेष्ठ विधीज्ञ आदीची उपस्थिती होती.   

माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते यापूर्वी भोकर येथील जिल्हा सत्र न्यायालयाच्या इमारतीचे भूमिपूजन झाले होते. आज त्यांच्याच उपस्थितीत या नूतन इमारतीचे उद्घाटन व लोकार्पण होत आहे. त्यांच्या प्रयत्नामुळेच ही इमारत पूर्णत्वास गेली असल्याचे न्यायमूर्ती नितीन भगवंतराव सुर्यवंशी यांनी सांगितले. न्यायालयात परिसरात काम करणाऱ्यांनी आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहून न्यायालयीन प्रक्रीया अधिक सक्षम बनविण्यावर भर द्यावा. तसेच ही इमारत स्वच्छ व सुंदर राहील यासाठी प्रयत्न करावेत असेही त्यांनी सांगितले. 

कुठलीही वास्तू उभी राहण्यासाठी अनेक संर्घषाचा सामना करावा लागतो. अनेक कष्टकऱ्यांचे योगदान या इमारतीच्या बांधकामासाठी लाभले आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नातून ही इमारती उभी राहीली असल्याचे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस.पी. ब्रम्हे यांनी केले. नवीन इमारतीसोबत इतर सोयी-सुविधाही हळूहळू सुरु करता होतील. विधीज्ञ व न्यायालयीन अधिकारी कर्मचाऱ्यांनी तळागाळातील पक्षकार हा केंद्रबिंदु ठरवून कामकाज करावे. तसेच बदलत्या परिस्थितीत वकीलांनी अन्यायापासून वंचित असणाऱ्या लोकासाठी काम करावे, असेही त्यांनी सांगितले. 

भोकर येथील न्यायालयाची नूतन व जुनी इमारत तीन ठिकाणी जोडली असून सदर इमारत एकूण 27 हजार चौरस फुटाची आहे. तीन मजल्यावर ही इमारत उभी आहे.  या इमारतीत बिजनेस सेंटर, फ्रंट ऑफिस, मीडिया सेंटर, रेकार्ड रुम, बार रुम, स्त्री व पुरुष विटनेस रुम, शासकीय अभियोक्ता कार्यालय, स्त्री व पुरुषासाठी स्टाफ रुम, कन्सुलेशन रुम इत्यादी केले आहे. तसेच पार्कीग, कोर्ट हॉल, जज चेंबर, ॲन्टी चेंबर, कोर्ट ऑफिससह  प्रस्तावित केले आहे. 

वृक्ष संवर्धन काळाजी गरज असून या कार्यक्रमाची सुरवात मान्यवरांच्या हस्ते रोपाला पाणी देवून करण्यात आली. यावेळी बार कॉन्सिल ऑफ  महाराष्ट्र ॲण्ड गोवाचे सदस्य ॲड. व्ही.डी. साळुंखे, ॲड. सतिश देशमुख, बार कॉन्सिल ऑफ  इंडिया ॲण्ड गोवाचे सदस्य ॲड. आशिष देशमुख, प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुरेखा कोसमकर यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भोकर अभिवक्ता संघाचे अध्यक्ष ॲड. संदिप भिमराव कुंभेकर यांनी तर आभार जिल्हा न्यायालय भोकरचे युनुस खान खरादी यांनी मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर के.पी. जैन देसरडा तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर भोकरचे ए. पी. कराड यांनी केले.

00000












 विशेष लेख -  कृपया प्रसिद्धीसाठी 

संकटातील मुलांसाठी जीवनरेखा...1098 चाइल्ड हेल्पलाइन... 

 भारतामध्ये लाखो मुले दररोज वेगवेगळ्या प्रकारच्या शोषण, अत्याचार आणि दुर्लक्षाला सामोरे जातात. त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्वरित मदतीसाठी भारत सरकारने 1098 चाइल्ड हेल्पलाइन सुरू केली आहे. हा एक टोल-फ्री क्रमांक असून, संकटात असलेल्या मुलांना मदत करण्यासाठी 24/7 कार्यरत असतो. चला जाणून घेऊया या हेल्पलाइनचे महत्त्व, कार्यपद्धती... 

1098 चाइल्ड हेल्पलाइन: काय आहे आणि कशी कार्य करते ?

1098 चाइल्ड हेल्पलाइन ही एक राष्ट्रीय आपत्कालीन सेवा आहे, जी 0 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी कार्यरत आहे. संकटात सापडलेल्या किंवा असुरक्षित स्थितीत असलेल्या मुलांना संरक्षण, समुपदेशन, पुनर्वसन आणि अन्य गरजेच्या सेवा पुरवण्याचे काम ही हेल्पलाइन करते. देशभरातील कोणत्याही फोनवरून 1098 हा क्रमांक डायल करून त्वरित मदत मिळू शकते. 

या हेल्पलाइनच्या माध्यमातून तज्ज्ञ समुपदेशक आणि सामाजिक कार्यकर्ते मुलांना मानसिक आधार, कायदेशीर मदत, पुनर्वसन सुविधा आणि गरजेनुसार इतर सेवांसाठी मार्गदर्शन करतात. 

1098 हेल्पलाइन कोणत्या परिस्थितीत मदत करू शकते?

ही सेवा संकटात असलेल्या मुलांसाठी अनेक प्रकारे मदत करू शकते. खालील परिस्थितींमध्ये 1098 वर संपर्क साधला जाऊ शकतो. 

·         हरवलेले किंवा पालकांशिवाय असलेले मुले: जर एखादे बालक हरवले, मुलगा मुलगी हरवली असेल असेल किंवा कोणत्याही पालकाविना आढळले तर 1098 च्या माध्यमातून त्याला सुरक्षित ठिकाणी पोहोचवले जाते.

·         शोषण किंवा अत्याचार होत असेल: शारीरिक, मानसिक, लैंगिक किंवा आर्थिक शोषणाला बळी पडलेल्या मुलांना संरक्षण आणि कायदेशीर मदत पुरवली जाते.

·         बाल विवाह आणि बालकामगार: मुलांच्या हक्कांचे उल्लंघन करणारे बाल विवाह आणि बालमजुरी रोखण्यासाठी 1098 वर तक्रार नोंदवता येते.

·         भिक्षा मागणारी मुले किंवा व्यसनाधीनता: बालक जर भिक्षा मागताना दिसला किंवा व्यसनाच्या आहारी गेला असेल तर त्याला योग्य मदत मिळवण्यासाठी 1098 वर कॉल करता येतो.

·         शिक्षण आणि आरोग्याशी संबंधित समस्या: शिक्षणापासून वंचित असलेल्या किंवा वैद्यकीय मदतीची गरज असलेल्या मुलांना आवश्यक सेवा पुरवण्याचे काम हेल्पलाइन करते.

·         अनाथ, समर्पित किंवा दत्तक घेण्यास पात्र मुले: पालकविना राहणाऱ्या किंवा पुनर्वसन आवश्यक असलेल्या मुलांसाठी या हेल्पलाइनच्या माध्यमातून आवश्यक ती मदत मिळते.

 1098 चाइल्ड हेल्पलाइनद्वारे दिल्या जाणाऱ्या सेवा

ही हेल्पलाइन फक्त तक्रारींचे नोंदणी केंद्र नसून, संकटात सापडलेल्या मुलांना संपूर्ण मदत करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा पुरवते: 

समुपदेशन

मुलांना त्यांच्या मानसिक आणि भावनिक समस्यांवर मार्गदर्शन करण्यासाठी प्रशिक्षित समुपदेशक उपलब्ध असतात. हे समुपदेशन बालकांना त्यांच्या परिस्थितीतून सावरायला मदत करते.

त्वरित हस्तक्षेप

जर एखाद्या मुलाला तातडीने मदतीची गरज असेल, जसे की अत्याचार किंवा बालमजुरीच्या स्थितीत असेल, तर स्थानिक प्रशासन आणि कायदा अंमलबजावणी यंत्रणांच्या सहकार्याने त्वरित कारवाई केली जाते.

रेफरल सेवा

जर एखाद्या मुलाला पुनर्वसन, शिक्षण, वैद्यकीय मदत किंवा पुनर्स्थापनेसाठी विशेष सेवांची गरज असेल, तर हेल्पलाइन त्या संबंधित संस्थांकडे त्याचा तपशील पाठवते.

माहिती आणि मार्गदर्शन

1098 च्या माध्यमातून बालकांच्या हक्कांबाबत जागरूकता पसरवली जाते. पालक, शिक्षक आणि नागरिकांसाठीही ही सेवा मार्गदर्शन करते, जेणेकरून मुलांचे संरक्षण योग्य प्रकारे होऊ शकेल.

1098 चाइल्ड हेल्पलाइनचा प्रभाव

ही हेल्पलाइन सुरू झाल्यापासून लाखो मुलांना मदत मिळाली आहे. खालील महत्त्वाचे परिणाम यामुळे दिसून आले आहेत: 10 दशलक्षाहून अधिक कॉल्स: हेल्पलाइनला दरमहा सरासरी 50,000 हून अधिक कॉल्स प्राप्त होतात. 5 दशलक्षाहून अधिक मुलांना मदत: दुर्लक्ष, शोषण, बालमजुरी आणि बालविवाह यांसारख्या समस्यांवर वेळेत कारवाई करण्यात आली आहे. 1 लाखांहून अधिक मुलांची सुटका: संकटात सापडलेल्या मुलांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यात आणि त्यांच्या संरक्षणासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. 

1098 हेल्पलाइनसाठी नागरिकांची जबाबदारी

कोणत्याही समाजाचे भविष्य हे त्याच्या मुलांच्या सुरक्षिततेवर आणि विकासावर अवलंबून असते. म्हणूनच, प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे की, संकटात सापडलेल्या मुलांची मदत करण्यासाठी योग्य ती तक्रार 1098 वर नोंदवावी.

आपण काय करू शकतो ?

·         सतर्क राहा: जर आपल्या आजूबाजूला बालकांचे शोषण, दुर्लक्ष किंवा अत्याचार होत असल्याचे आढळले, तर 1098 वर कॉल करा.

·         जागरूकता वाढवा: 1098 चा प्रचार करून अधिकाधिक लोकांना या सेवेबद्दल माहिती द्या.

·         सहकार्य करा: प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांसोबत काम करून संकटात असलेल्या मुलांना मदत करा. 

1098 चाइल्ड हेल्पलाइन ही भारतातील असंख्य संकटग्रस्त मुलांसाठी जीवनरेखा ठरली आहे. ही सेवा केवळ मदतीचा एक मार्ग नसून, बालकांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक मोठे पाऊल आहे. 

मुलांचे संरक्षण हे केवळ सरकारचे काम नसून, समाजातील प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे. आपण सर्वजण एकत्र येऊन 1098 चा योग्य वापर केल्यास, अनेक निरपराध बालकांचे जीवन सुरक्षित आणि आनंदी बनवू शकतो. चला नांदेड जिल्ह्यातील या कामात मदत करूया ! वंचित शोषित असाह्य मुले कुठे आढळल्यास एक शून्य नऊ आठ चा उपयोग करूया!

प्रवीण टाके

जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड



Saturday, February 8, 2025

 वृत्त क्रमांक 162

वाघाळा येथील आश्रमशाळेतील सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर 

नांदेड दि. 8 फेब्रुवारी : जिल्हयातील वाघाळा येथील माताजी शिक्षण संस्था संचालित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील बाधित विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी कळविले आहे.यासंदर्भात प्रशासन पूर्ण लक्ष ठेवून असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त समाज कल्याण शिवानंद मिनगिरे यांनी दिली आहे. 

जिल्हयातील वाघाळा येथील माताजी शिक्षण संस्था संचालित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील  निवासी 8-10 विद्यार्थ्यांना आज सकाळी 9 वा. जेवण केल्यानंतर उलटी व मळमळ होत असल्याचे जाणवले.या विद्यार्थ्यांवर लगेच नांदेड येथील शासकीय वैद्यकिय रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याची माहिती तेथील डॉक्टरांनी दिली आहे. 

आश्रमशाळेतील शिक्षकांनी सर्व 59 विद्यार्थ्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालय विष्णपुरी नांदेड येथे दाखल केले आहे. या विद्यार्थ्यांची इतर मागास बहुजन कल्याणचे सहायक संचालक शिवानंद मिनगीरे यांनी भेट घेऊन प्रकृतीबाबत संबंधित डॉक्टरांची प्रत्यक्ष चर्चा केली. विद्यार्थ्यांची प्रकृती सुस्थितीत असून त्यांना वैद्यकीय निगराणीखाली ठेवण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली दिली असल्याचे श्री. मिनगिरे यांनी स्पष्ट केले आहे.

0000

 वृत्त क्रमांक 161

गोदावरी नदी काठावरील अवैध वाळू जप्तीची कारवाई सुरू

महसूल खात्याची धडक कारवाई 

नांदेड दि. 8 फेब्रुवारी : गोदावरी काठावर बिहारी मजुराच्या मदतीने अनेक वाळू तस्करांनी, नदी काठावरील शेतकऱ्यांनी अवैधरित्या आपली शेतजमीन वाळूचा अनधिकृत साठा साठवण्यासाठी तसेच बिहारीला वास्तव्य करण्यासाठी भाड्याने जमीन देऊन वाळू तस्करांना मदत केली आहे. या सर्वांची महसूल खात्याने गंभीर दखल घेतली आहे. गोदावरी नदीकाठावरील अवैध वाळू जप्तीची कारवाई सुरू आहे. वाळू तस्करावर एमपीडीए 1981 नुसार गुन्हा नोंदवून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महसूल विभागाने दिली आहे.  

महसूल खात्याच्या पथकाने 4 फेब्रुवारी रोजी तीन मोठे इंजिन जप्त करून संबंधितावर लिमगाव पोलीस स्टेशन येथे  गुन्हा गुन्हा रजिस्टर क्रमांक 8/2025 अन्वये दाखल केला आहे. नदीकाठावरील भनगी, वाहेगाव, गंगावेट, विष्णुपुरी, थूगाव, कल्याळ, लोहा तालुक्यातील बेट सांगवी, इत्यादी गावांमधील अवैध वाळू साठा मागच्या तीन दिवसापासून जप्त करून पुढील कारवाई सुरू आहे. 

आज पर्यंत तीनशे ब्रास वाळू जप्त केली आहे. हे काम अजून पुढे दोन-तीन दिवस चालणार आहे. यापुढे सुद्धा ही अविरत कार्यवाही सुरू राहणार आहे. या कारवाईनंतर वाळू तस्करानी गोदावरी नदीमध्ये तराफे, इंजिन टाकून वाळू उपसा केल्यास, नदीकाठच्या शेतकऱ्यांनी आपली जमीन वाळू उपसा करणारे बिहारी मजूर यांना अनधिकृतपणे झोपड्या टाकण्यासाठी दिल्यास अथवा अनधिकृतपणे अवैध वाळू वाहतूक करणारे हायवा यांना शेतकऱ्यांनी अनधिकृत रस्ता दिल्यास अथवा वाळू तस्करांना बेकायदेशीररित्या मदत करणाऱ्या व्यक्तीवर, संबंधितावर MPDA 1981 नुसार गुन्हा नोंदवून कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे याची गांभीर्याने नोंद घ्यावी असे जिल्हा प्रशासनातर्फे व तालुका प्रशासनातर्फे इशारा देण्यात आला आहे. 

ही मोहीम जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडतकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, कंधारच्या उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार यांच्या सनियंत्रणाखाली नांदेड तहसीलदार संजय वारकड व लोहा तहसीलदार विठ्ठल परळीकर यांच्या नेतृत्वाखाली स्वप्निल दिगलवार नायब तहसीलदार नांदेड पथक प्रमुख, नन्हणू कानगुले मंडळ अधिकारी, कुणाल जगताप मंडळाधिकारी, तलाठी रमेश गिरी, संताजी देवापुरकर, माधव भिसे, सरपे, रणवीरकर, खेडकर, जाधव, कदम, पोलीस पाटील शिवाजी सोनटक्के, कोतवाल बालाजी सोनटक्के इत्यादी करत आहेत.

0000







#बारावीपरीक्षा विशेष लेख                                                                                                                    ...