Friday, June 30, 2017

वीज ग्राहकांच्या अडीअडचणी समजावून घेऊन
त्यांच्या तक्रारींचे तात्काळ निराकरण करावे  
- ऊर्जा मंत्री बावनकुळे
नांदेड दि. 30 :- वीज ग्राहकांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या तक्रारी व अडीअडचणी समजावून घेऊन संबंधीत अधिकाऱ्यांनी त्यांचे तात्काळ निराकरण केले पाहिजे , असे निर्देश राज्याचे ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा, राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे दिले.   
नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीच्या समवेत महावितरण व महापारेषणचे अधिकाऱ्यांच्या बैठकीत श्री. बावनकुळे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती शांताबाई पवार, आमदार सुभाष साबणे, आमदार डॉ. तुषार राठोड, भाजपचे जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर, शहराध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे, श्रीमती शोभाताई वाघमारे, महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया, मुख्य अभियंता अविनाश पाटोळे, अधीक्षक अभियंता रामदास कांबळे आदी अधिकारी उपस्थित होते.  
वीज ग्राहकांशी सातत्याने संवाद साधला तर तक्रारी कमी होवून त्यांचे प्रश्न सुटले जातात. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आपल्या परिक्षेत्रात संवाद मेळावे घ्यावेत. त्यांच्या अडीअडचणी प्रश्न समजून घेवून ते तात्काळ सोडवावीत. शाखा अभियंता यांनी प्रत्येक घराशी मुक्त संवाद साधला पाहिजे, असेही ऊर्जामंत्री श्री. बावनकुळे यांनी सांगितले.
नांदेड शहरासाठी 41 कोटीचा निधी देण्यात आला आहे. या निधीतून विजेची भुमीगत केबल टाकली जाणार आहे. त्याचबरोबर वीज अपघाताचे ठिकाणे शोधुन तेथील लोबंकाळणाऱ्या तारा, रोहित्रे हटवुन ग्राहकांना सुरक्षीत व सुरळीत वीज सेवा देण्यासंदर्भातही अधिकाऱ्यांना त्यांनी सुचित केले.
यावेळी आमदार सुभाष साबणे व डॉ. तुषार राठोड यांनी आपल्या भागातील विजेचे प्रश्न मांडून त्याबाबत त्वरीत कार्यवाहीची अपेक्षा व्यक्त केली.

0000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   401 लोकसभा निवडणुकीतील सहभागी कर्मचाऱ्यांचे यावर्षी विक्रमी मतदान   10 हजारावर  कर्मचाऱ्यांनी बजावला मताधिकार   नांदेड दि. 2 ...