Monday, November 6, 2017

ग्रंथालयांना सहाय्य       
                  अनिल आलुरकर
                                                                              जिल्हा माहिती अधिकारी,  
                                                                                 नांदेड

         सार्वजनिक ग्रंथालयांचे सुनियोजित व्यवस्थापन आणि विकास घडवून आणण्यासाठी राज्य शासनाच्या ग्रंथालय संचालनालयामार्फत विविध प्रकारे प्रयत्न केले जात आहेत. वाचक चळवळ निर्माण व्हावी, यासाठी ग्रंथालय संचालनालयाने पुढाकार घेतला असून त्याचा थोडक्यात हा आढावा..

महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियम, 1967 ची अंमलबजावणी करण्यासाठी या अधिनियमातील तरतुदीनुसार ग्रंथालय संचालनालय या स्वतंत्र विभागाची स्थापना 2 मे 1968 रोजी करण्यात आली. 1967 च्या अधिनियमातील तरतुदीनुसार सार्वजनिक ग्रंथालय पद्धती प्रस्थापित करण्यासाठी सार्वजनिक ग्रंथालयाची स्थापना, परिरक्षण, संघटन, नियोजन आणि विकास यांची जबाबदारी ग्रंथालय संचालनालयाकडे सोपविण्यात आली.
राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालय कार्यरत आहे. राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयांचे सुनियोजित व्यवस्थापन आणि विकास घडवून आणण्यासाठी ग्रंथालय संचालनालयांतर्गत सहा महसूली विभागामध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे 6 सहाय्यक ग्रंथालय कार्यालये स्थापन करण्यात आलेली आहेत. या कार्यालयांच्या माध्यमातून संबंधित विभातील जिल्ह्यामधील ग्रंथालयावर देखरेख व नियंत्रण ठेवण्याचे काम केले जाते. राज्य आणि केंद्र शासनाच्या ग्रंथालयांच्या विकासाठीच्या विविध योजनांची अंमलबजावणी ग्रंथालय संचालनालयाकडून केली जाते. ग्रंथालय संचालनालयांतर्गत प्रत्येक जिल्ह्यात शासकीय ग्रंथालय आहे. सार्वजनिक ग्रंथालयांना याद्वारे अनुदान दिले जाते.
रॉय प्रतिष्ठानची निर्मिती
राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या स्थापनेचे 1972 हे वर्ष, भारतीय स्वातंत्र्याच्या रौप्य महोत्सवाचे हे वर्ष. सर्वासाठी ग्रंथ (Book for all) हे या आंतरराष्ट्रीय ग्रंथ वर्षाच्या निमित्ताने प्रसिद्ध झालेल्या ग्रंथ सनदेचे उद्घोषाचे वाक्य होते. आधुनिक भारताचे शिल्पकार थोर समाजसुधारक राजा राममोहन रॉय याच्या द्वितीय जन्म शताब्दीचे हे वर्ष होते. या सर्व पर्वणीचे निमित्त लक्षात घेऊन राष्ट्रीय समितीच्या दि. 28 मार्च, 1972 रोजी झालेल्या बैठकीत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान स्थापन ठरले. भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या (सध्याचे नाव मनुष्यबळ विकास मंत्रालय ) संस्कृती विभागांतर्गत 6 मे 1972 रोजी प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली.
दिनांक 20 मे 1972 रोजी प्रतिष्ठानचे औपचारिक उद्घाटन राष्ट्रीय ग्रंथालय, कोलकात्ता येथे करण्यात आले. पश्चिम बंगाल सार्वजनिक विश्वस्त नोंदणी कायद्यान्वये नोंदणी झालेले हे प्रतिष्ठान पूर्णपणे स्वायत्त आहे. यामार्फत संपूर्ण देशभर विविध योजनांची अंमलबजावणी केली जाते.
प्रतिष्ठानच्या विविध योजना
प्रतिष्ठानच्या उद्दिष्टपूर्तीसाठी वेगवेगळ्या अर्थसहाय्याच्या योजना तयार करण्यात आल्या आहेत. या योजना दोन प्रकारच्या साधनावर आधारित आहेत. या योजनासाठी अर्ज करणाऱ्या ग्रंथालयाने त्यापूर्वी घेतलेल्या अर्थसहाय्याचा खर्च केल्याबाबतची सर्व कागदपत्रे विहित नमुन्यातील उपयोगिता प्रमाणपत्रांसह सादर केली असतील तरच दुसरा नवीन अर्ज विचारात घेतला जातो.
समान निधी योजनेअंतर्गत राज्य आणि केंद्र शासन 50 टक्के अनुदान यासाठी देतात. समान निधी योजनेमार्फत बांधकाम आणि ग्रंथालयाचे बळकटीकरण यासाठी अनुदान उपलब्ध करुन दिले जाते. उत्कृष्ट ग्रंथालयासाठी पुरस्कार योजनाही राज्य सरकारमार्फत राबविली जात आहे. भारतातील 54 हजार सार्वजनिक ग्रंथालये राष्ट्रीय ज्ञान आयोगाशी जोडले गेले आहेत. त्यानुसार आधुनिकीकरणाचे विविध उपाय योजले जात आहेत.
एकूणच वाचक चळवळ निर्माण व्हावी, यासाठी ग्रंथालय संचालनालय अग्रेसर वाटचाल करीत आहे. अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्याच्या जिल्हा ग्रंथालयाशी संपर्क साधता येईल.
0000000


"निवडणूक ज्ञान स्पर्धेत"
विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा

नांदेड, दि. 6 :-  भारत निवडणूक आयोगाकडून निवडणूक ज्ञान स्पर्धा 2017-18 साठी आंतर शालेय फेरी 1 ते 10 नोव्हेंबर, जिल्हास्तर फेरी 11 ते 17 नोव्हेंबर, राज्यस्तर फेरी 20 ते 25 नोव्हेंबर, उपांत्य व अतिंम फेरी 11 ते 17 डिसेंबर 2017 या कालावधीत होणार आहेत. जिल्ह्यात ही स्पर्धा प्रत्येक तालुक्यात शालेय स्तरावर घेण्यात येणार आहे. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन नांदेड जिल्हा प्रशासनाने केले आहे.  
अखिल भारतीयस्तरावर 14 ते 17 या वयोगटातील 9 वी ते 12 वीतील व भविष्यात नव मतदार म्हणून नोंदणी होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा निवडणूक प्रक्रिया या विषयाबाबत होणार असून स्पर्धेच्या 5 फेऱ्या होणार आहेत.
प्रथम फेरी शालेयस्तरावर घेण्यात येणार असून या फेरीमध्ये भाग घेतलेल्या सर्व शाळांमधील पात्र ठरलेले प्रत्येक दोन विद्यार्थी जिल्हा स्तरावरील फेरीसाठी पात्र ठरणार आहे. शालेय स्तरावर स्पर्धेचे आयोजन करताना मुलींचा सहभाग असेल याची पुरेशी दक्षता घेण्यात येणार आहे.
दुसरी फेरी जिल्हास्तरावर होणार असून जिल्हा निवडणूक अधिकारी जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी या स्पर्धेचे आयोजन करणार आहेत.
जिल्हा स्तरावरील फेरीमध्ये जिंकणाऱ्या शालेय चमूला राज्य स्तरीय तिसऱ्या फेरीसाठी पात्र ठरविण्यात येईल. चौथी व पाचवी फेरी ही राष्ट्रीय स्तरावर नवी दिल्ली येथे भारत निवडणूक आयोग आयोजित करणार आहे.
शालेय फेरीसाठी आदर्श प्रश्नपत्रिका व जिल्हा स्तरीय फेरीसाठी प्रश्नावली भारत निवडणूक आयोगाकडून प्राप्त होणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाच्यावतीने समितीची स्थापना केली असून जिल्ह्यातील शाळांना या स्पर्धेत भाग घेण्यासाठी निमंत्रित करण्यात येणार आहे. शालेय फेरीसाठी आदर्श प्रश्नपत्रिका तसेच जिल्हास्तरीय फेरीसाठी प्रत्येक शाळेकडून ठरवून दिलेल्या चमुची यादी स्विकृत करणे. भारत निवडणूक आयोगाकडून पुरविण्यात येणाऱ्या प्रश्नोत्तर त्यांचे मुल्यमापन करण्यासाठी तज्ज्ञांचा एक संघ तयार करणे, जिल्हास्तरीय फेरीचे आयोजन, अध्यक्षपद स्विकारणे, मुल्यमापन करणे व त्याच दिवशी स्पर्धेतील विजेता घोषित करण्याची कार्यवाही करणे, जिल्हास्तरीय फेरीचे ऑडिओ / व्हिडीओ करुन तज्ज्ञ संस्थेला पाठविण्यात येणार आहे.  
जिल्हास्तरीय फेरीत विजेता असलेल्या चमुची नावे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाला पुढील फेरीसाठी कळविण्यात येणार आहेत. राज्यस्तरीय फेरीसाठी पात्र ठरलेल्या व भाग घेणाऱ्यांना प्रवास व इतर सवलती उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना टी-शर्ट तयार करुन पुरवठा करण्यात येणार आहे. जिल्हा मुख्यालयात राष्ट्रीय मतदार दिवशी कार्यक्रमात जिल्हास्तरीय विजेता पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.  
तालुकास्तरीय समितीकडून प्राप्त होणारे विजेत्यातून जिल्हास्तरावर 11 ते 17 नोव्हेंबर, 2017 या कालावधीत स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. स्पर्धेचे नियोजन, तसेच स्पर्धेतील विद्यार्थ्यांचे मुल्यमापन करणे व त्याच दिवशी स्पर्धेतील विजेता घोषित करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.

 000000  
प्रेरणादायी यशकथांचा लोकराज्य प्रकाशित
 नांदेड, दि. 6 : राज्य शासनाने गेल्या तीन वर्षांच्या कालावधीमध्ये राबविलेल्या विविध योजनांचा लाभ घेऊन सामाजिक व आर्थिक स्तर उंचावलेले नागरिक, उद्योजक , गाव यांच्या यशोगाथा सांगणारा लोकराज्यचा नोव्हेंबर 2017 चा होय, हे माझं सरकार हा विशेषांक नुकताच प्रकाशित झाला आहे. हा अंक स्टॉलवर सर्वत्र उपलब्ध आहे.
शासनाच्या योजनांचा लाभ घेत तसेच विविध मोहिमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होत नागरिकांनी  गावागावांमध्ये शौचालय उभारले, गाव स्वच्छ आणि काही गावे टँकरमुक्त झाली. बेरोजगार तरुण-तरुणींनी मुद्रा बँक योजनेतून उद्योग स्थापन केला. प्रशासनाने अनेक सेवा ऑनलाइन देऊन नागरिकांच्या वेळेची बचत केली.
जलयुक्त शिवार योजनेंर्गत अवर्षणग्रस्त भागातील अनेक गावे टँकरमुक्त व जलयुक्त झाली. या अंकात समावेश केलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील खामखेडा, खांडवा या गावांनी केलेली जलक्रांती आणि स्मार्ट, सुंदर आणि स्वच्छ गाव म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या अवनखेड या गावाची यशकथा  प्रेरणादायी आहे. अशा प्रातिनिधिक यशकथांचा या अंकात समावेश करण्यात आला आहे. या अंकाची किंमत 10 रुपये आहे.

000000
सर्व शाळा, महाविद्यालयात आज
"विद्यार्थी दिवस" साजरा करण्याचे निर्देश    
नांदेड, दि. 6 :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिनानिमित्त 7 नोव्हेंबर 2017 रोजी राज्यातील सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात "विद्यार्थी दिवस" म्हणून साजरा करण्यात येणार आहे. याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे 27 ऑक्टोंबर 2017 च्या परिपत्रकातील सुचनानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधीतांना जिल्हाधिकारी नांदेड यांनी दिले आहेत.  
प्रत्येक विद्यार्थी हा या देशाचे भविष्य आहे. त्यामुळे आदर्श विद्यार्थी निर्माण होणे काळाची गरज आहे. शिक्षण हेच उन्नतीचे एकमेव साधन आहे आणि त्यासाठी आवश्यक असलेलया कठोर परिश्रमांची जाण सर्व विद्यार्थ्यांना होण्यासाठी 7 नोव्हेंबर हा दिवस दरवर्षी "विद्यार्थी दिवस" म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत सर्व शाळांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारीत विविध पैलुंवर निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, काव्यवाचन, इत्यादी उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे, असे शासन परिपत्रकात नमुद केले आहे.

0000000
कृषि प्रदर्शनाचे माळेगाव येथे आयोजन ,  
फळे, भाजीपाला नमुना आणण्याचे आवाहन
नांदेड, दि. 6 :- श्रीक्षेत्र खंडोबा यात्रा माळेगाव येथे जिल्हास्तरीय कृषि प्रदर्शनाचे आयोजन डिसेंबर 2017 मध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, कृषि पशुसंवर्धन समितीचे सभापती दत्तात्रय रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे. जिल्हयातील शेतकऱ्यांन या प्रदर्शनात मोठया प्रमाणात फळे भाजीपाल्याचे नमुने घेऊन यावीत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषि पशुसंवर्धन सभापती दत्तात्रय रेड्डी यांनी केले आहे.
या प्रदर्शनामध्ये बियाणे, रासायनिक खते, किटकनाशक औषधी, सुधारीत कृषि औजारे, विविध बँका, ट्रॅक्टर कंपन्या, महाबीज, कृषि उद्योग विकास महामंडळ, कृषि विज्ञान केंद्र, राज्य कृषि विभाग तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी यांचे स्टॉल उभारण्यात येणार आहे. त्याद्वारे शेतकऱ्यास मार्गदर्शन माहिती प्राप्त होणार आहे. प्रदर्शनाच्या आयोजनाबाबत विविध कंपन्यास कृषि विभागामार्फत माहिती घेऊन संपर्क साधून कृषि प्रदर्शनाच्या आयोजनाबाबतची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.
यावर्षी नव्यानेच जिल्हयातील कृषि क्षेत्रात उल्लेखन कामगीरी करणाऱ्या शेतकऱ्यास कृषिनिष्ठ शेतकरी म्हणून श्रीक्षेत्र खंडोबा यात्रा माळेगाव येथे पुरस्कार देण्यात येणार आहेत त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात येणार आहे. तसेच भव्य कृषि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार असून त्यामध्ये किटकनाशक औषधी फवारणी करताना घ्यावयाची काळजी याबाबत स्टॉल उभारुन किटकनाशक औषधी कंपनी मार्फत जागृती माहिती देण्यात येणार आहे.
जिल्हास्तरीय कृषि प्रदर्शनामध्ये फळ-फळावळ भाजीपाला पिकाचे नमुन्याचे प्रदर्शन आयोजित करुन उत्कृष्ट नमुन्यास प्रथम, द्वितीय तृतिय बक्षिस जिल्हयातील प्रत्येक वाणाच्या एका फळ भाजीपाला नमुन्यास देण्यात येणार आहे. ज्याद्वारे शेतकऱ्यांना फळे भाजीपाला लागवड करण्याबाबत प्रोत्साहीत करण्यात येणार आहे. कृषि समिती बैठकी जिल्हा परिषद सर्वसाधारण सभे याबाबत जिल्हा कृषि विकास अधिकारी पंडित मोरे यांनी सविस्तर माहिती  दिली आहे. तसेच जिल्हास्तरावर सर्व बियाणे, रायायनिक खते, किटकनाशक औषधी विक्रेते तसेच सर्व संबंधीत यांची प्रदर्शनाबाबत बैठक आयोजित करण्यात येणार आहे अशीही माहिती श्री. मोरे यांनी दिली.

000000
"राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क"
शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 6 :- आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज https://mahadbt.gov.in करण्याचे आवाहन डॉ. शैला सारंग सहसंचालक उच्च शिक्षण नांदेड यांनी केले आहे.  
राज्य शासनाकडून सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी https://mahadbt.gov.in हे संकेतस्थळ संचालक, माहिती व तंत्रज्ञान (DIT) यांचेमार्फत विकसीत करण्यात आले आहे. या संकेतस्थळामध्ये शिक्षण संचालक, उच्च शिक्षण, विभागाच्यावतीने शिष्यवृत्ती योजनेचा समावेश करण्यात आला आहे. देय होणाऱ्या वित्तीय लाभाची सर्व रक्कम लाभार्थी विद्यार्थ्याच्या आधार संलग्नीत बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्याने शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळण्यासाठी स्वत:ची नोंदणी करणे, अर्ज भरणे, अर्ज भरण्यापासून ते रक्कम लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा करण्याची सर्व प्रक्रिया आता राजर्षी DBT पोर्टल मार्फत करणे अनिवार्य करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर ही लाभाची रक्कम जमा केल्याबाबची सुचना DBT पोर्टलद्वारे प्रत्येक महाविद्यालयात दिली जाईल. त्यामुळे संबंधित विद्यापीठ, शैक्षणिक संस्था, महाविद्यालयांनी कोणत्याही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांकडून प्रवेशाच्या वेळी शिक्षण शुल्काची रक्कम घेवू नये. तसेच कोणत्याही आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांची पीळवणूक होणार नाही याची योग्य ती काळजी घेण्याची जबाबदारी संबंधित शैक्षणिक संस्थेची असेल.
उच्च शिक्षण, नांदेड विभाग, नांदेड विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती (ईबीसी), अहिंदी भाषीक विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती, एकलव्य आर्थिक सहाय्य योजना, गुणवान विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य योजना, राज्य शासनाची खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना, शासकीय विद्यानिकेतन शिष्यवृत्ती योजना, स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांना आर्थिक सहाय्य योजना, माजी सैनिकांच्या पाल्यांना आर्थिक सहाय्य योजना, गणित व भौतिक विषयातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती योजना ऑनलाईन करण्यात आल्या आहेत.
ऑनलाईन नोंदणीची पुर्वतयारी करताना विद्यार्थ्याने आपला आधार क्रमांक काढणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याने कोअर बँकींग सुविधा असलेल्या बँकेच्या शाखेमध्ये खाते काढणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याने आपला मागील परीक्षा उत्तीर्ण झालेला दाखला व गुणपत्रक, जन्मतारखेचा पुरावा, रहिवाशी दाखला, उत्पन्न दाखला, प्रवेशित महाविद्यालयाची माहिती आभ्यासक्रमाचा कालावधी, बँकेच्या पासबुकाची झेरॉक्स, आधारकार्ड इत्यादी कागदपत्रे तयार ठेवावीत.
नोंदणी कशी करावी- आपण कोणत्याही ब्राऊजरचा वार करुन (उदा. Internet Explorer (I.E.)/Google Chrome/ Mozilla firefox etc.), https://mahadbt.gov.in या वेबसाईटवर जाऊन "नविन नोंदणी" या बटणावर क्लिक करावे. प्रत्येक विद्यार्थ्याने Maha-DBT पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. "आधारकार्ड आहे" असेल तर "होय" व नसेल तर "नाही" वर क्लिक करा. त्यानंतर "OTP" हा पर्याय निवडा. वैध आधार क्रमांक टाकल्यानंतर OTP पाठवा बटन क्लिक करा. मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेला OTP (One Time Password) टाकून "पडताळणी करा" हे बटन क्लिक करा. उपलब्ध विंडोमध्ये नांव, जन्मदिनांक, फोन नंबर, पत्ता, आधार संलग्न बँक खाते नंबद इ. आधार कार्ड वरील माहिती आपोआप दिसेल. आधार क्रमांक नसल्यास "आधार कार्ड नाही" हा पर्याय निवडा आणि आवश्यक ती माहिती भरावी व कागदपत्रे अपलोड करावे. नोंदणी अर्जाच्या विंडो मधील सर्व माहिती भरावी. स्वत:चा युजर नेम व पासवर्ड तयार करावा.
अर्ज कसा भरावा - महाडीबीटी पोर्टलवर लॉगइन करण्यासाठी "सिलेक्ट युजर मध्ये जावून" विद्यार्थी हा पर्याय निवडा. युजरनेम व पासवर्ड टाकून लॉगइन व्हा. लॉगइन झाल्यानंतर विंडोज मधील "योजना तपशिल" यावर क्लिक करा. यानंतर विभागवार योजना आपण पाहून निवडू शकता. आपण ज्या योजनेसाठी अर्ज करावयाचा आहे त्या योजनेच्या नांवासमोर "पहा" क्लिक केले असता योजनेची सर्व माहिती दिसू शकेल. त्यानंतर कोणत्या योजना (मॅट्रिक पुर्व/ मॅट्रिकोत्तर साठी आपण पात्र आहात त्याची खात्री करा व पर्याय क्लिक करा. (उदा. शालेय विद्यार्थ्यांनी "मॅट्रिकपुर्व व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी "मॅट्रिकोत्तर" हा पर्याय निवडावा.) आवश्यक ती सर्व माहिती उदा. जात, प्रवर्ग, महाराष्ट्राचे रहिवाशी, अपंगत्व, कौटुंबिक उत्पन्न इ. सॉफ्टवेअरमध्ये काळजीपुर्वक भरावी. आवश्यक ते कागदपत्रे, पालकांची माहिती, शाळा व महाविद्यालयाचा तपशिल नमुद करावा.आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावी. (रहिवाशी दाखला, उत्पन्नाचा दाखला, एसएससी प्रमाणपत्र, बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक इ.) अभ्यासक्रमाचा तपशिल, मागील परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा तपशिल इ. सर्व माहिती अर्जदाराने भरावयाची आहे आणि सबमिशन पेज मधील सादर या बटनवर क्लिक करावयाचे आहे. विद्यार्थी/ पालकांना काही आडचण असल्यास त्यांनी 18001025311 या टोल फ्री क्रमांकावर किंवा helpdesk@mahadbt.gov.in या मेल आयडीवर संपर्क करावा.

महाविद्यालयासाठी सुचना :- महाडीबीटी पोर्टलवर विद्यार्थ्यांना ऑनलाईन करणे व अर्ज भरण्यासाठी सहकार्य करावे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्याकडून प्रवेशाच्या वेळी कोणतेही शुल्क स्वीकारु नये. विद्यार्थ्यांना आधार क्रमांक काढणे, कोअर बँकींग सुविधा असलेल्या बँकेच्या शाखेमध्ये खाते उघडण्यासाठी सुचना द्याव्यात. आपल्या महाविद्यालयाचे नांव, महाविद्यालयास मान्य असलेल्या अभ्यासक्रमाची नांवे, अभ्यासक्रमाचा कालावधी, अभ्यासक्रमनिहाय प्रवेश क्षमता महाविद्यालयाच्या व अभ्यासक्रमाच्या मान्यतेचे विविध आदेश याबाबतची माहिती पोर्टलवर मॅप करण्यासाठी संचालनालयास सादर करुन ती मॅप करुन घेण्याची कार्यवाही करावी. महाविद्यालय, त्यांचा अभ्यासक्रम, त्यांची प्रवेश क्षमता, अभ्यासक्रमाचा कलावधी, शुल्क रचना इ. माहिती पोर्टलमध्ये समावेश (मॅप) करण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयाची असेल त्यासाठी ज्या प्राधिकाऱ्यांनी (Authority) मान्यता दिली आहे त्यांच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन नांदेड उच्च शिक्षण विभागीचे सहसंचालक डॉ. शैला सारंग यांनी केले आहे.
000000 

  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...