Tuesday, August 29, 2017

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा दौरा रद्द   
नांदेड दि. 29 :- मुंबईमध्ये सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे वाहतुक व्यवस्थेअभावी राज्याचे कृषी व फलोत्पादन, पणन आणि पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा दि. 29 व 30 ऑगस्ट 2017 रोजीचा पुर्वनियोजित नांदेड जिल्हा दौरा रद्द झालेला आहे.    

00000
कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा सुधारीत दौरा
नांदेड दि. 29 :- राज्याचे कृषी व फलोत्पादन, पणन आणि पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सुधारीत दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
बुधवार 30 ऑगस्ट 2017 रोजी मुंबई येथुन देवगिरी एक्सप्रेसने सकाळी 8.40 वा. नांदेड रेल्वे स्टेशन येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सकाळी 9 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. सकाळी 9.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथुन मोटारीने सगरोळी ता. बिलोलीकडे प्रयाण. सकाळी 11 वा. शेतकरी कंपनीच्या बीज प्रक्रिया केंद्राचे उद्घाटन स्थळ कृषि विज्ञान केंद्र शारदानगर सगरोळी. सकाळी 11.30 वा. "संकल्प ते सिद्धी" कार्यक्रम व शेतकरी कर्जमाफी अर्ज भरणे मेळावा. स्थळ कृषि विज्ञान केंद्र शारदानगर सगरोळी. दुपारी 2 वा. श्रमदानातून शौचालय बांधणी कार्यक्रम. स्थळ- कासराळी ता. बिलोली. दुपारी 2.30 वा. सगरोळी येथुन मोटारीने नायगावकडे प्रयाण. दुपारी 3 वा. शेतकरी कर्जमाफी अर्ज भरणे मेळावा व पीक परिस्थिती आढावा बैठक (कृषि, पणन व पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग) स्थळ- तहसिल कार्यालय नायगाव बा. दुपारी 4.30 वा. नायगाव बा. येथुन मोटारीने नांदेड रेल्वे स्टेशनकडे प्रयाण. सायं. 6 वा. देवगिरी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करतील.

00000
 जिल्ह्यात गत 24 तासात
 सरासरी 13.11 मि.मी. पाऊस
जिल्ह्यात आतापर्यंत 52.45 टक्के पाऊस
           नांदेड, दि. 29 :- जिल्ह्यात मंगळवार 29 ऑगस्ट 2017 रोजी  सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 13.11 मिलीमीटर  पावसाची  नोंद  झाली  आहे. जिल्‍ह्यात  दिवसभरात एकुण 209.83  मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 501.19 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात वार्षिक सरासरी नुसार आतापर्यंत 52.45 टक्के एवढा पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात मंगळवार 29 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये  तालुकानिहाय पुढील प्रमाणे असून  कंसात  एकूण  पाऊस : नांदेड- 12.25 (755.02), मुदखेड- 20.33 (705.84), अर्धापूर- 26.67 (613.00), भोकर- 12.75 (516.25), उमरी- 13.67 (503.67), कंधार- 10.67 (488.85), लोहा- 5.00 (511.16), किनवट- 20.00 (473.43), माहूर- 18.50 (396.40), हदगाव- 9.86 (525.61), हिमायतनगर- 6.00 (373.49), देगलूर- 9.67 (312.32), बिलोली- 13.40 (453.00), धर्माबाद- 9.00 (461.33), नायगाव- 15.20 (466.06), मुखेड- 6.86 (463.57) आज अखेर पावसाची सरासरी 501.19 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 8019.00) मिलीमीटर आहे.

00000 
नोंदणीकृत मदरसांना पायाभुत सुविधा,
विषय शिक्षकांच्‍या वेतनासाठी अनुदान  
अर्ज करण्याची 18 सप्टेंबर पर्यंत मुदत   
नांदेड, दि. 29 :-  डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेंतर्गत नोंदणीकृत मदरसांना पायाभूत सुविधा आणि विषय शिक्षकांच्‍या वेतनासाठी सहाय्यक अनुदान 2017-18 साठी ज्‍या मदरशांमध्‍ये फक्‍त पारंपारिक धार्मिक शिक्षण देण्‍यात येत आहे आणि ज्‍यांना आधुनिक शिक्षणासाठी  शास‍कीय अनुदान घेण्‍याची इच्‍छा आहे अशा मदरशांकडून राज्य अल्‍पसंख्‍याक विकास विभागाने अर्ज मागविले आहेत. इच्‍छुक मदरशांनी विहित नमुन्‍यातील परिपुर्ण अर्ज आवश्‍यक कागदपत्रासह सोमवार 18 सप्टेंबर 2017 पर्यंत जिल्‍हा नियोजन समिती, जिल्‍हाधिकारी कार्यालय नांदेड येथे सादर करावेत, असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा अध्‍यक्ष उच्‍चस्‍तरीय निवड समिती नांदेड यांनी केले आहे.  
मदरसाची धर्मदाय आयुक्‍त अथवा महाराष्‍ट्र राज्‍य वक्‍फ बोर्डाकडे नोंदणी आवश्यक आहे. अर्जाचा नमुना, आवश्‍यक कागदपत्रांची यादी http://mdd.maharashtra.gov.in या संकेतस्‍थळावर उपलब्‍ध आहेत. शासन निर्णयाच्‍या तरतुदीनुसार पुढील बाबींसाठी विहित नमुन्‍यात अर्ज करता येतील. विज्ञान, गणित, समाजशास्‍त्र, हिंदी, मराठी, इंग्रजी व उर्दू हे विषय शिकविण्‍यासाठी शिक्षकांना मानधन देणे. पायाभूत सुविधासाठी व ग्रंथालयासाठी अनुदान आणि मदरशांमध्‍ये शिकणा-या विद्यार्थ्‍यांसाठी शिष्‍यवृत्ती. शासन निर्णय 11 ऑक्टोंबर 2013 च्‍या तरतुदीनुसार जास्‍तीतजास्‍त तीन डी. एड / बी. एड शिक्षकांना मानधन देण्‍यात येईल. शिक्षणासाठी हिंदी, इंग्रजी, मराठी, उर्दू यापैकी एका माध्‍यमाची निवड करून त्‍यानुसार शिक्षकांची नेमणूक करणे आवश्‍यक आहे. ग्रंथालयासाठी तसेच शैक्षणिक साहित्‍यासाठी एकदाच 50 हजार रुपये अनुदान देय आहे. पायाभूत सुविधासाठी 2 लाख रुपये अनुदान देय आहे. यामध्‍ये मदरशांच्‍या इमारतीचे नुतनीकरण व डागडुजी, पेय जलाची व्यवस्था करणे, प्रसाधन गृह उभारणे व त्‍याची डागडुजी करणे, विद्यार्थ्‍यांसाठी आवश्‍यक फर्निचर, मदरसाच्‍या निवासस्‍थानात इन्‍वहर्टरची सुविधा उपलब्‍ध करणे, मदारसांच्‍या निवासी इमारतीचे नुतनीकरण व डागडुजी, संगणक, हार्डवेअर, सॉफटवेअर, प्रिंटर्स इत्यादी व प्रयोगशाळेचे साहित्‍य. यासाठी किमान 3 वर्षापूर्वी नोंदणी केलेल्‍या व अल्‍पसंख्‍याक बहुल मदरशांना प्राधान्‍य देण्‍यात येईल. ज्‍या मदरशांना Scheme for Providing Quality Education in Madarsa (SPQEM) या केंद्र पुरस्‍कृत योजनेंतर्गत लाभ मिळाला आहे अशा मदरसांना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही. विहित मुदतीनंतर प्राप्‍त झालेले प्रस्‍ताव ग्राहय धरले जाणार नाहीत, असेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.  

00000
अल्‍पसंख्‍याक बहुल शासनमान्‍य खाजगी शाळा, कनिष्‍ठ महाविद्यालय,
औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था, अपंग शाळेसाठी पायाभुत सोयी सुविधा अनुदान योजना
नांदेड दि. 29 :- जिल्‍ह्यातील धार्मिक अल्‍पसंख्‍याक विद्यार्थी बहुल शासनमान्‍य खाजगी शाळा, कनिष्‍ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था व अपंग शाळा  यांच्यासाठी पायाभूत सोयी सुविधा योजनेकरीता परिपुर्ण अर्ज जिल्‍हा नियोजन समिती, जिल्‍हाधिकारी कार्यालय नांदेड येथे सोमवार 18 सप्टेंबर 2017 पर्यंत सादर  करावेत, असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा अध्‍यक्ष उच्‍चस्‍तरीय निवड समिती नांदेड यांनी केले आहे. 
शासन निर्णय 7 ऑक्टोंबर 2015 व अर्जाचा नमुना https://mdd.maharashtra.gov.in या संकेतस्‍थळावर उपलब्‍ध आहे. जिल्‍ह्यातील धार्मिक अल्‍पसंख्‍याक विद्यार्थी बहुल शासनमान्‍य खाजगी शाळा, कनिष्‍ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था, नगरपालिका, नगरपरिषद शाळा व अपंग शाळा यांच्‍याकडून शासनमान्‍य खाजगी शाळा, कनिष्‍ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था व नगरपालिका, नगरपरिषद शाळामध्‍ये अल्‍पसंख्‍याक समाजाचे (मुस्लिम, बौध्‍द, ख्रिश्चन, जैन, शिख, व पारसी मिळून) किमान 70 टक्के विद्यार्थी शिकत असणे आवश्‍यक आहे. पायाभूत सोयी सुविधा अनुदान योजनेंतर्गत कमाल 2 लाख रुपये अनुदानाचा लाभ घेण्‍यासाठी विहीत नमुन्‍यात अर्ज मागविण्‍यात येत आहे.
शासन मान्‍यताप्राप्‍त अपंगाच्‍या शाळांमध्‍ये किमान 50 टक्के अल्‍पसंख्‍यांक विद्यार्थी शिकत असणे आवश्‍यक आहे. या योजनेंतर्गत पुढील पायाभूत सुविधांसाठी अनुदान देय आहे. शाळेच्‍या इमारतींचे नुतनीकरण व डागडूजी. ग्रंथालय अद्ययावत करणे. संगणक कक्ष उभारणे/अद्यावत करणे. शैक्षणिक कार्यासाठी आवश्‍यक फिर्निचर. इन्‍व्‍हर्टरची सुविधा निर्माण करणे. अध्‍ययनाची साधने (Learning Material)/ एल.सी.डी.प्रोजेक्‍टर अध्‍ययनासाठी लागणारे विविध  सॉफटवेअर, इत्‍यादी. इंग्रजी लॅग्‍वेज लॅब. शुध्‍द पेयजलाची व्‍यवस्‍था करणे. प्रयोगशाळा उभारणे / अद्यावत करणे. प्रसाधनगृह / स्‍वच्‍छतागृह उभारणे / डागडूजी करणे. झेरॉक्‍स मशीन. संगणक हार्डवेअर / सॉफटवेअर. या योजनेंतर्गत यापूर्वी 5 वेळा अनुदान घेतलेल्‍या शाळा, संस्‍था यावर्षी अनुदानासाठी पात्र  असणार नाहीत. विहित मुदतीनंतर प्राप्‍त झालेले प्रस्‍ताव ग्राह धरले जाणार नाहीत.

0000000
दहावी परीक्षेचा निकाल जाहीर  
नांदेड, दि. 29 :- राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या लातूर विभागीय मंडळामार्फत 18 जुलै ते 2 ऑगस्ट 2017 या कालावधीत घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे, असे विभागीय सचिव लातूर विभागीय मंडळ लातूर यांनी कळविले आहे.

निकालाची कार्यपद्धती व कार्यवाहीचा तपशील पुढीलप्रमाणे दिला आहे. विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर विषयनिहाय गुण उपलब्ध करुन दिला असून त्याची प्रिंट घेता येईल. परीक्षार्थ्यांना गुणपत्रिकेचे वाटप संबंधीत माध्यमिक शाळेमार्फत करण्यात येणार आहे. त्याची तारीख स्वतंत्रपणे कळविण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना गुणांची पडताळणी करावयाची आहे त्यांनी विहित नमुन्यात व शुल्कासह 8 सप्टेंबर 2017 पर्यंत विभागीय मंडळाकडे अर्ज करावीत. अर्जासोबत ऑनलाईन निकालाचे गुणपत्रक जोडणे अनिवार्य राहील. अर्जाचा नमुना मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. परीक्षेमधील उत्तरपत्रिकांचे पुनर्मुल्यांकन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. छायाप्रत मिळाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून पाच दिवसात पुनर्मुल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करुन विहित नमुन्यात, विहित शुल्क भरुन संबंधीत विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांना अर्ज करणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मुल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधीक महितीसाठी संबंधीत माध्यमिक शाळा, विभागीय मंडळाकडे संपर्क करावा. मार्च 2018 मधील दहावी परीक्षेस ज्या विद्यार्थ्यांना प्रविष्ठ व्हावयाचे आहे अशा पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेंतर्गत प्रविष्ठ होणारे, अन्य विद्यार्थ्यांची अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्विकारली जातील. त्याचा तारखा स्वतंत्रपणे कळविण्यात येतील. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची संपादणूक सुधारण्यासाठी श्रेणी, गुणसुधार योजनेंतर्गत परीक्षेस पुन:श्च प्रविष्ठ होण्याची संधी सन 2008 पासून लागू करण्यात आली आहे. त्यानुसार जुलै-ऑगस्ट 2017 च्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेस सर्व विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी तरतुदीच्या अधीन देय संधी उपलब्ध राहील, असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. 
शहरात भव्य महाअवयवदान जनजागृती रॅली संपन्न
 सर्वांना अवयवदानाचा संकल्प करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 29 :- वैद्यकीय संचालनालय, आयुष संचालनालय व शासकीय आरोग्य विभागाच्यावतीने नांदेड शहरात भव्य महाअवयवदान जनजागृती रॅली आज काढण्यात आली. या रॅलीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांनी हिरवा झेंडा दाखून शासकीय आयुर्वेदीक महाविद्यालयापासून शुभारंभ केला.
यावेळी डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. श्यामकुंवर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एच. आर. गुंटुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विठ्ठल मेकाने, डॉ. हंसराज वैद्य, आयएमएचे अध्यक्ष डॉ. सुरेश कदम, एमएमसीचे सदस्य डॉ. संजय कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.  


या रॅलीचा शिवाजीनगर, महात्मा फुले पुतळा मार्गे डॉ. शंकरराव चव्हाण सभागृह येथे समारोप झाला. या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी "अवयव दान अमुल्य दान", "मृत्युला रोखण्याची ताकद तुमच्या श्रेष्ठ दानात आहे" "असहाय्य रुग्णांना द्या जीवनाची अमुल्य भेट",  "अवयवदान करु या, समाधान सन्मान मिळू या", "अवयवदान करा आणि इतरांचे जीवन वाचवा", "कोणत्याही धर्माचा माणुस कोणासाठीही अवयवदान करु शकतो", "मरावे परी अवयवरुपी उरावे" असे फलक हातात घेऊन उत्साहात घोषणा देत नागरिकांचे लक्ष वेधत होते. वैद्यकीय विद्यार्थ्यांनी रॅलीत अवयवदान सर्वश्रेष्ठ दान असल्याचे पथनाट्याद्वारे बोलीभाषेतून नागरिकांना माहितीचे सादरीकरण केले.  
डॉ. शंकरराव चव्हाण सभागृहात समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. म्हस्के म्हणाले की , अवयवदान चळवळ पुढे नेण्यासाठी तरुणाचा मोठा सहभाग असला पाहिजे. राज्यात मराठवाडा विभाग अवदानात अग्रस्थानी आहे. अवयव प्रत्यारोपणाची प्रक्रिया नांदेडनी दोनवेळेस यशस्वी करुन दाखविली आहे. राज्यात हा उपक्रम चांगला राबवण्यात येत असून सर्वांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र अवयवदानात एका वर्षात देशात दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. यावर्षी पहिल्या क्रमांकावर येण्यासाठी तसेच अवयवदानाची मोठी गरज ओळखून सर्वांनी अवयवदानाची संकल्प करुन अवयदानाचे जास्तीतजास्त संमतीपत्र भरुन दयावीत, असे आवाहन त्यांनी केले.  
यावेळी अधिष्ठाता डॉ. श्यामकुंवर यांनी शासकीय आयुर्वेदीक महाविद्यालयाकडून जिल्ह्यातील 33 महाविद्यालयात अवयवदानाविषयी प्रबोधनात्क कार्यक्रमातून जनजागृती करण्यात आले असे सांगितले. तर डॉ. सुरेश कदम यांनी रुग्णांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी, अवयवदानाला महत्व आहे. ग्रामीण जनतेतही अवयवदानाविषयी जनजागृती प्राधान्याने करणे आवश्यक आहे असे सांगितले. डॉ. संजय कदम यांनी अवयदानाची व्याप्ती वाढविण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्न करीत आहे. अवयवदानाचा संदेश प्रत्येक घरापर्यंत, माणसापर्यंत पोहचला पाहिजे यासाठी स्वयंसेवी संस्था, विद्यार्थ्यांनी या अभियानात सहभागी होणे आवश्यक आहे, असे सांगितले.   
प्रास्ताविकात अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गुंटूरकर म्हणाले, अवयवदानाच्या प्रतिक्षा यादीवरील रुग्णांना अवयवाची मोठी गरज आहे. अवयवदानाचे महत्व सर्वांनी ओळखून नातेवाईक, मित्रांना संमतीपत्र भरुन देण्याचे सांगावे, असेही आवाहन केले.  
कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजनचे प्रमुख डॉ. राजेंद्र अमीलकंठवार, वैद्यकीय अधीक्षक वाय. एच. चव्हाण, प्रशासन अधिकारी र. ह. चंचलवार, शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे अधीक्षक सुरजितसिंघ तबेलेवाले, वैद्यकीय अधिकारी, रोटरी क्लब, लायन्स क्लबचे पदाधिकारी, वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी, यांची उपस्थिती होती. सुरुवातील मान्यवरांनी सरस्वती पुजन व धन्वंतरी स्तवन केले. यावेळी डॉ. संतोष शिरशीकर यांनी उपस्थितांना अवयवदानाची प्रतिज्ञा दिली तसेच अवयवदानाचे संमतीपत्र वाटप करुन भरुन घेण्यात आलीत. सुत्रसंचलन संतोष शिरशीकर यांनी तर आभार डॉ. हजारी यांनी मानले.  

00000

  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...