Saturday, March 26, 2022

नांदेड जिल्ह्यात आज एकही कोरोना बाधित नाही

तर एक कोरोना बाधित झाला बरा  

नांदेड (जिमाका) दि. 26 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 668 अहवालापैकी एकही अहवाल पॉझिटीव्ह आढळला नाही. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 2 हजार 797 एवढी झाली आहे. यातील 1 लाख 100 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 5 रुग्ण उपचार घेत आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे. नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरणातील एका कोरोना बाधिताला औषध उपचारानंतर बरे झाल्याने आज सुट्टी देण्यात आली. 

उपचार घेत असलेल्या बाधितांमध्ये नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरणात 5 असे एकुण 5 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 94 हजार 70

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 74 हजार 138

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 2 हजार 797

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 लाख 100

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 692

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.37 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-1

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-5

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-निरंक 

कोरोना विषाणुची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुन: येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधीनंतर दुसऱ्या लसीचा डोस अवश्य घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

000000

 रस्ता सुरक्षेबाबत मार्गदर्शन शिबीर संपन्न 

नांदेड, (जिमाका) दि. 26 :- प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पोलीस मुख्यालयात रस्ता सुरक्षा मार्गर्शन शिबिराचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या शिबिराच्या अध्यक्षस्थानी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपअधिक्षक अश्विनी जगताप या होत्या. 

या शिबिरात पोलीस मुख्यालयातील जवळपास 215 अधिकारी-कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. रस्ता सुरक्षा विषयक नियमांचे पालन, वाहन चालतांना घ्यावयाची काळजी, वाहतूक चिन्ह, हाताचे इशारे, हेल्मेट, सिटबेल्टचा वापर आदी विषयांवर सविस्तर मार्गदर्शन सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी संदिप निमसे यांनी केले. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने सुरू केलेल्या या उपक्रमाबद्दल पोलीस उपअधिक्षक अश्विनी जगताप यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पोलीस उपनिरीक्षक श्रीमती पिपर खेडकर यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहा. मोटार वाहन निरीक्षक बालाजी जाधव व सर्वेश पानकर यांनी परिश्रम घेतले.

00000



 

ग्रामीण पाणी पुरवठा योजनांसाठी 

पाण्याचे शाश्वत स्त्रोत निश्चिती महत्वाची

-          पालकमंत्री अशोक चव्हाण 

नांदेड, (जिमाका) दि. 26 :- जिल्ह्यातील अनेक भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. भविष्यातील लोकसंख्या व दरडोई किमान 55 लिटर पाण्याची गरज लक्षात घेता आतापासूनच पाणी प्रश्नांवर गंभीरतेने विचार करण्याची गरज आहे. एकाबाजुला ग्रामीण पाणी पुरवठ्यासाठी शाश्वत जलस्त्रोताची उपलब्धता तर दुसऱ्या बाजुला या पाणी पुरवठा योजनांसाठी त्या-त्या ग्रामपंचायतींना विद्युत देयकांचे करावे लागणारे व्यवस्थापन याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याची अत्यांतिक गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. 

डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जल जीवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील एकुण 15 गावांमध्ये 75 किमी पाईप लाईनच्या प्रातिनिधीक शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार अमर राजूरकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, सहाय्यक जिल्हाधिकारी कार्तिकेएन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबाकले, जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पाटील, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता एम. एस. बोडके आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

या बैठकीत ग्रामीण क्षेत्रासाठी पाणी पुरवठ्याचे नियोजन व ज्या योजना साकारल्या जाणार आहेत, ज्या योजना कार्यरत आहेत अशा सर्वांसाठी जे शाश्वत जलस्त्रोत आवश्यक आहेत त्याबाबत गंभीरतेने विचार करण्यात आला. जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेसाठी कराव्या लागणाऱ्या नियोजनाबद्दल तालुकानिहाय आढावा घेऊन पाण्यचे स्त्रोत निश्चित करण्याच्या सूचना पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिल्या. शाश्वत स्त्रोताची जर असेल तर त्या योजना यशस्वी ठरतील व त्या-त्या भागातील लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा गरजा पूर्ण करतील. तसेच योजना पूर्ण केल्यानंतर त्या सुस्थितीत कार्यरत ठेवण्यासाठी धोरणात्मक निर्णय व ग्रामपंचायत निहाय लागणारा खर्च याचा आढावा घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या. एकाबाजुला आश्वाशित पाणी पुरवठा व दुसऱ्या बाजुला पाणी पुरवठा योजना सक्षम होण्याकरीता प्रत्येक ग्रामपंचायती निहाय पाणीपट्टी वसुलीचे गणित व यातील आर्थिक स्थिती याही बाबी तपासून घेत योजनेचा परीपूर्ण आराखडा करण्याच्या सूचना दिल्या.  यावेळी जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण पाणी पुरवठा योजना सक्षम करण्यासाठी चालू असलेल्या कामांचा आढावा त्यांनी घेतला.

00000



  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...