Friday, December 8, 2017

नागरिकांना माफक दरात आरोग्य सेवा
देण्यासाठी सहकारी संस्थांनी योगदान दयावे
- सहकार मंत्री सुभाष देशमुख
नांदेड दि. 8 :- सामान्य नागरिकांना माफक दरात आरोग्य सेवा देण्यासाठी श्रीगुरुजी रुग्णालयाची सहकारी तत्वावर उभारणी होत असल्याबद्दल कौतूक करुन जिल्ह्यातील सहकारी संस्थांनी यासाठी योगदान दयावे, असे आवाहन राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी केले.
नांदेड येथील नंदीग्राम वैद्यकीय सहकारी संस्थेच्या नियोजीत श्रीगुरुजी सहकार रुग्णालयाच्या भागधारक नोंदणीचा शुभारंभ ना. देशमुख यांच्या हस्ते डॉ. शंकरराव चव्हाण सभागृह येथे करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बाबु गंजेवार होते तर आ. हेमंत पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, विभागीय सहनिबंधक श्रीकांत देशमुख, सहकार विभागाचे विशेष कार्य अधिकारी संतोष पाटील, जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणीस,  किशोर भवरे आदी मान्यवर उपस्थित होते.  
सहकारी तत्वावरील रुग्णालयाच्या उपक्रमाला शुभेच्छा देवून ना. देशमुख म्हणाले की , वाढती महागाई व आरोग्याचे भेडसावणारे प्रश्न यामध्ये सामान्य माणसाला होणारा त्रास लक्षात घेवून हा उपक्रम नांदेडकरांना फायदाचा ठरणार आहे. या सहकारी रुग्णालयासाठी सर्वसामान्य नागरीकांसोबतच मान्यवर, पदाधिकारी व सहकार क्षेत्रातील संस्थांनी आपल्या नफ्याचा वाटा यासाठी दयावा, अशी सूचनाही त्यांनी केली. भागधारकासाठी संस्थेने विशेष योजना केली असून नागरिकांनी या योजनेंचा फायदा घ्यावा व संस्थेने आरोग्य सेवेसाठी नियोजीत केलेल्या सवलतीचा लाभ घ्यावा. सहकारी तत्वावर अलीकडे राज्यात काही प्रमाणात रुग्णालयाची उभारणी होत आहे. कमी खर्चात उत्तम आरोग्य सेवा देण्याचा हा प्रयत्न असून या प्रयत्नांना सर्व स्तरातील नागरिकांनी पाठबळ दिले पाहिजे. या उपक्रमात वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी सहभागी होत असल्याने हा उपक्रम यशस्वी ठरेल आणि सहकार्यातून सहकार समृद्ध होईल अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
आ. हेमंत पाटील यांनी उपक्रमाला शुभेच्छा देवून स्वत: भाग खरेदी केल्याची व बँकेच्या माध्यमातून एक लाख रुपयांचे योगदान देण्याची घोषणा केली. याबाबत आ. पाटील यांच्यासह योगदान देणाऱ्या माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, राम लोहिया व मान्यवरांचा भागधारक झाल्याबद्दल भाग प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला. तसेच सहकार मंत्री ना. देशमुख यांनीही एक लाख रुपयाचे योगदान घोषीत केल्याबद्दल यावेळी त्यांचाही सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकात रुग्णालयाचे अध्यक्ष सुधीर कोकरे यांनी रुग्णालयाच्या उभारणी मागील भुमिका स्पष्ट केली.
अध्यक्षीय समारंभात बाबुराव गंजेवार यांनी सर्वांच्या सहकार्यातून या सहकारी तत्वावरील रुग्णालयाची उभारणी होत असून यासाठी सर्वांनी सामाजिक भावनेतून योगदान दयावे, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. पुराणीक यांनी केले तर आभार डॉ. मुकुल जोशी यांनी मानले. यावेळी नागरिकांनी भागधारक नोंदणी मोठ्या प्रमाणात केली.
भाग्यलक्ष्मी सहकारी बँकेस भेट
नांदेड येथील भाग्यलक्ष्मी नागरी सहकारी बँकेस राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी आज सदिच्छा भेट दिली. यावेळी बँकेच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी आमदार हेमंत पाटील, सहकार विभागाचे विशेष कार्य अधिकारी संतोष पाटील, सहकारी संस्थचे जिल्हा उपनिबंधक पी. आर. फडणीस, राम पाटील रातोळीकर, बँकेचे अध्यक्ष शैलाताई मदनुरकर, उपाध्यक्ष प्रभाकर महाजन, मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर कुलकर्णी, संचालक डॉ. श्रीकांत लव्हेकर, दत्तोपंत देबडवार, श्रावण पाटील, गंगाधर जोशी, बालाजीराव देशपांडे, लक्ष्मणराव ठक्करवाड, व्यंकटेश साठे आदींची उपस्थिती होती.

00000
शेतमाल तारण कर्ज योजनेसाठी
बाजार समित्यांनी पुढाकार घ्यावा
- सहकार मंत्री सुभाष देशमुख
नांदेड दि. 8 :-  नांदेड जिल्ह्यातील 19 पैकी 6 कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी शासनाच्या शेतमाल तारण कर्ज योजनेचा लाभ शेतकऱ्यांना देण्यासाठी सुविधा दिली आहे. शेतमाल तारण कर्जाच्या या महत्वाच्या योजनेचा अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी इतर कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी केले.
नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात सहकार मंत्री ना. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली शेतमाल तारण कर्ज योजना व किमान आधारभुत किंमत योजनेचा आढावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस आ. सुभाष साबणे, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, अविनाश घाटे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, सहकार विभागाचे विशेष कार्य अधिकारी संतोष पाटील, राम पाटील रातोळीकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
शेतकऱ्यांच्या फायद्याच्या शेतमाल तारण कर्ज योजनेची जिल्ह्यातील अंमलबजावणीबद्दल बोलतांना ना. देशमुख पुढे म्हणाले की, बाजार समितीच्या बैठकीमध्ये सहकार विभागाच्या सहाय्यक निबंधक यांनी उपस्थित राहून बाजार समित्याच्या अडचणी सोडविल्या पाहिजेत. शेतमाल तारण कर्ज योजनेचा लाभ शेतकऱ्यांना देण्यासाठी बाजार समित्यांशी चर्चा करुन प्राधान्याने योजना राबविण्यात यावी. गोदाम नसलेल्या बाजार समित्यांचे प्रस्ताव पाठविण्यात आल्यास गोदम मंजूर करण्यात येतील. शेजारी असलेल्या वखार महामंडळाच्या व इतर गोदामाचा वापर करुन ही योजना राबविण्याचा विचार करण्यात यावा. यासाठी जिल्हाधिकारी यांनी संबंधितांची बैठक घेऊन स्थानिकरित्या निर्णय घ्यावा अशी सुचना सहकारी मंत्री देशमुख यांनी केली. शेतमाल तारण कर्ज योजनेची शेतकऱ्यांना जास्तीत जास्त माहिती व्हावी यासाठी विविध प्रसार माध्यमांचा वापर सहकार विभागाने करावा, असेही श्री. देशमुख म्हणाले.
चालु हंगामामध्ये नांदेड जिल्ह्यात किमान आधारभूत किमतींने झालेल्या मूग, उडीद आणि सोयाबिन खरेदीचा आढावा घेऊन ना. देशमुख म्हणाले की, तूरीची नोंदणी सुरु केली असेल त्याची जास्तीत जास्त प्रसिद्धी करण्यात यावी. ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांना सहकार्य करावे. खरेदी केंद्र सुरु राहतील याची दक्षता घेण्यात यावी व विहित वेळेत रक्कमा अदा होतील यासाठी प्राधान्य दयावे, असेही ते म्हणाले. शेतमालाची चाळणी जागेवरच व्हावी यासाठी प्रमुख गावांमध्ये बाजार समित्यांच्यावतीने चाळणी यंत्र स्थापित करण्यात येतील, असे सांगून त्यांनी स्वस्त धान्य दुकानातून 55 रुपये किलो दराने तूर विक्री करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे सांगितले. यावेळी लोकप्रतिनिधी आणि बाजार समित्यांच्या पदाधिकाऱ्यांनी अडीअडचणी सांगितल्या.
प्रारंभी मान्यवरांचे स्वागत करुन सहकार विभागाचे जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणीस यांनी सविस्तर माहिती सादर केली. यावेळी सहकार व पणन विभागाचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
00000


बिटी कापसाच्या जागी
हरभरा ठरतोय फायद्याचा

नांदेड दि. 8 :- कापूस पिकावर शेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने बिलोली तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी मात्र शेंदरी बोंड अळीने ग्रासीत कापुस उपटुन तिथे रब्बीमध्ये हरभऱ्याची लागवड केली आहे. बिलोली तालुक्यात फिरुन जर पाहिले तर तेथे जिकडे-तिकडे हरभराच दिसुन येत आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी दिली आहे.  
            बिलोली तालुक्यात यावर्षी साडेसात हजार हेक्टर क्षेत्रावर कापूस घेतला होता. परंतु शेंदरी बोंड अळीचा प्रकोप वाढल्याने 2 हजार 500 ते 3 हजार  हेक्टर वरील बि.टी. कापूस शेतकऱ्यांनी उपटून फेकुन त्या जागी हरभऱ्याचे पिक घेतल आहे. शेतकऱ्यांशी चर्चा केली असता त्यांनी असे सांगितले , दोन वेचण्यानंतर शेंदरी बोंड अळी वाढु लागल्याचे दिसु लागले त्यामुळे कापसाचे उत्पादन यापुढे घटेल असे वाटु लागले. कापूस उपटून हरभरा केला तर चार पैसे जास्त मिळतील असे शेतकऱ्यांनी आर्थिक गणित केल्यामुळे आता ते फायदेशीर राहीले आहेत. हरभऱ्याचे पिक उत्तम असुन एकरी 6 ते 8 क्विंटल उत्पादन येण्याची शक्यता आहे. बरेच शेतकरी स्प्रिंक्लरने पाणी देत आहेत.
            ज्याठिकाणी बि.टी. कापसावर शेंदरी बोंड अळी मोठ्या प्रमाणात आली आहे तेथील पऱ्हाट्या उपटुन नष्ट करव्यात. बि.टी. कापसाच्या बाजुने बिगर बि.टी. कापसाचे बियाणे लावल्यामुळे कापसाचा हंगाम संपल्यानंतरही फरदड कापूस घेतल्यामुळे शेंदरी बोंड अळीमध्ये बि.टी. कापसातील विष पचवायची ताकद निर्माण झाली आहे. भविष्यात ही शेंदरी बोंड अळी कापसावर येवु नये म्हणुन या दोन्ही बाबींचा विचार शेतकऱ्यांनी करावा, असे कृषि शास्त्रज्ञ सांगतात.
000000


  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...