Wednesday, March 28, 2018


जिल्हा कृषि महोत्सवाचे 30 मार्च पर्यंत आयोजन  
शेतकरी, ग्राहकांनी कृषि महोत्सवास भेट द्यावी
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे 
नांदेड, दि. 28 :- जिल्हा कृषि महोत्सवास ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असून शेतकरी व ग्राहकांनी कृषि महोत्सवास भेट देऊन विविध धान्य, कृषि उत्पादने खरेदी करुन कृषि विषयक विषयांवर तज्ज्ञांचे व्याख्यान व परिसंवादाचा लाभ घ्यावा, असे अवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे.
नांदेड कृषि उत्पन्न बाजार समिती नवा मोंढा मैदान येथे जिल्हा कृषि महोत्सव शुक्रवार 30 मार्च पर्यंत आयोजित केला आहे. या महोत्सवास जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी जिल्हाधिकारी जयराम कारभारी यांनी सपत्नीक भेट दिली. त्यांनी विविध स्टॉलाची पाहणी करुन शेतकऱ्यांची उत्पादने खरेदी करुन विविध तंत्रज्ञानाची माहिती घेतली, यावेळी ते बोलत होते.
जिल्हा कृषि महोत्सवामुळे शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळण्यास मदत होत आहे. मंगळवार 27 मार्च अखेर धान्य महोत्सवा गहू, तुरडाळ, मुगडाळ, तीळ, जवस, मका, टरबुज, आवळा ज्युस, सेंद्रीय गुळ, टाळकी ज्वारी, हरभरा, कडकनाथ कोंबडया व अंडी विक्रीतून 2 लाख 50  हजार रुपयांची उलाढाल झाली आहे. तर 26 27 मार्च अखेर 5 हजारापेक्षा जास्त शेतकरी व ग्राहकांनी कृषि महोत्सवाला भेट दिली. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेली प्रक्रियायुक्त उत्पादने, गटशेती, शेतकरी उत्पादक कंपनीचे दालने, औजारे, मशिनरी, यंत्रसामग्री, खते, औषधी, बियाणे, सिंचन साधने यांची विशेष दालने, सेंद्रिय शेतीमाल विक्रीसाठी उपलब्ध आहे. उत्पादक ते ग्राहक अशी मध्यस्थाविना येथे विक्री होत आहे.
कृषि महोत्सवात कृषि विभाग, पणन, मार्केटिंग, महाबीज, वनविभाग, रेशीम, जिल्हा उद्योग केंद्र, पुरवठा, आधार कार्ड नोंदणी, कृषि विज्ञान केंद्र, जैविक किड नियंत्रण, मृद चाचणी, शासकीय फळरोप वाटीका, जिल्हा परिषद मधील कृषि विभाग, आरोग्य विभाग, पशुसंवर्धन विभाग, महिला व बालविकास विभाग, मतदान नोंदणी आदी विभागांचे दालने उभारले आहेत. कृषि महोत्सवात प्रवेश विनामुल्य असून शेतकरी, ग्राहक व नागरिकांनी कृषि महोत्सवातील प्रदर्शनास भेट द्यावी, असेही आवाहन केले आहे.
00000



इंग्रजी माध्यमाच्या नामांकित
निवासी शाळेत आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेश
नांदेड, दि. 28 :- जिल्ह्यातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट कार्यक्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या (आदिवासी) विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेत सन 2017-18 मध्ये इयत्ता पहिली व दुसरीमध्ये प्रवेशसाठी इच्छूक पालकाकडून रविवार 1 एप्रिल ते 20 मे 2018 पर्यंत विद्यार्थ्यांचे अर्ज शासकीय अनुदानीत आश्रम शाळेच्या मुख्याध्यापकाकडून प्राप्त करुन घेऊन त्यांच्याकडेच परिपूर्ण अर्ज सादर करण्याचे आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट यांनी केले आहे.
या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणारा विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा. पालकांने विद्यार्थ्यांच्या नावे सक्षम अधिकाऱ्याने दिलेल्या अनुसूचित जमातीच्या दाखल्याची साक्षांकित प्रत सादर करावी. जर विद्यार्थी दारिद्रय रेषेखालील असेल तर यादीतील अनुक्रमांकासह मूळ प्रमाणपत्र सादर करावे. अन्यथा दारिद्रयरेषेसाठी अर्जाचा विचार केला जाणार नाही. या योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकाचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयापर्यंत असावे. त्यासाठी तहसिलदाराचे यांचे सन 2018-19 चे उत्पन्न प्रमाणपत्र जोडावे. इयत्ता पहिलेमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय 5 वर्ष पूर्ण असावे. ( जन्म 1 जून 2012 ते 1 जून 2013 या कालावधीत झालेला असावा. ) पालकाचे संमती पत्र, दोन पासपोर्ट फोटो व जन्म तारखेचा दाखला अंगणवाडी / सरपंच / ग्रामसेवक यांचा शिक्का व स्वाक्षरीसह जोडावा. 
 विद्यार्थ्यांचे वैद्यकीय अधिकारी, अधीक्षक, जिल्हा शल्यचिकित्सकयांनी दिलेले वैद्यकीय पात्रता प्रमाणपत्र जोडावे. आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांची तसेच विधवा, घटस्फोटीत, निराधार, परित्यक्ता व दारिद्रय रेषेखालील अनुसूचित जमातीच्या पालकाचे विद्यार्थ्यांना प्राधान्याने प्रवेश दिला जाईल. विधवा, निराधार, परित्यक्ता यांचेसाठी शंभर रुपये बॉन्ड पेपरवर नोटरीसह दयावे लागेल. घटस्फोटीता  करीता कार्यालयीन निवाडयाची प्रत सोबत जोडावी.
 विद्यार्थ्यांचे पालक शासकीय, निमशासकीय नोकरदार नसावेत. त्याबाबत शंभर रुपये बॉन्ड पेपरवर पालकानी लेख दयावे लागेल. खोटी माहिती सादर केल्यास प्रवेश रद्द करण्यात येईल. निवड केलेल्या विद्यार्थ्यांला एकदा एका शाळेत प्रवेश निश्चित झाल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत पालकाच्या व पाल्याच्या विनंतीनुसार शाळा बदलता येणार नाही. याबाबत पालकाचे हमीपत्र देण्यात यावे. वरील अटीची पुर्तता करत असलेल्या पालकांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट यांनी केले आहे.
000000



जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश  
नांदेड, दि. 28 :- जिल्ह्यात शनिवार 7 एप्रिल 2018 रोजी मध्यरात्रीपर्यंंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 24 मार्च रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 7 एप्रिल 2018 रोजी मध्यरात्रीपर्यत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.
अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.
000000

  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...